जीवन असावं पिकल्या आंब्यागत
मोहकगोड, रसाळ, सतेज रसरशीत
जीवन असावं चंदनाच्या खोडागत
ललाटं रेखून अनेकांची रहावं दरवळत
जीवन असावं देवाजीचा देव्हारा
पावित्र्याच्या ज्योतीने उजळावा गाभारा
आयुष्याच्या ढालीने सग्यासोयऱ्यांना जपावं
उकळत्या दुधावर कसं सायीगत पसरावं
जीवन असावं स्वच्छ अंगण मोकळं
सर्वांसाठी एैसपैस मध्ये तुळशीचं खळं
जीवन असावा एक आधारवृक्ष
विशाल, समृद्ध, शीतल सावलीछत्र
जीवन असावं टवटवीत नित जिवंत
मोह व्हावा मृत्यूसही स्पर्शण्या हरक्षणात
जीवन आहे देवाचं देणं, वांछिल तो तेव्हा ते समर्पण
तोवर सजवावं, तोऱ्यात मिरवावं, समाधानी लेवून तृप्तीचं लेणं
जीवन व्हावं असंख्य कणांचं, सुगंधी नि रंगीबेरंगी क्षणांचं
उत्कटतेने, उदंडतेने, उधळत वहावं, जुळून नातं मनामनाचं
-- यतीन सामंत
ऋणानुबंध या कवितासंग्रहातून
कुठे तु गेलीस न्याय देवते,
जगास सोडूनी याच क्षणी ।
अन्यायाची कशी मिळेल मग,
दाद आम्हाला या जीवनी ।। १ ।।
परिस्थितीचे पडता फेरे,
गोंधळूनी गेलीस आज खरी ।
उघड्या नजरे बघत होती,
सत्य लपवितो कुणीतरी ।।२।।
दबाव येता चोहबाजूनी,
मुस्कटदाबी होती कशी ।
शब्दांना परि ध्वनी न मिळता,
मनी विरताती, येती जशी ।।३।।
बळी कुणाच्या पडली तू गे,
मार्ग रोखीले तुझे कसे ते ।
अपयश येता सत्यालाही,
म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’ ।।४।।
आज न आले यश जरी,
न्याय येईल उफाळूनी ।
अंतिम विजय हा सत्याचा,
जाणीव आहे ह्याची मनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
केला सुखाचा शोध धनसंपत्ती ठायीं
उशीरा झाला बोध ऐष आरामांत ते नाहीं
एका गोष्टीची उकलन कळली विचारापोटीं
आयुष्य हवे होते वाढवून देह सुखासाठीं
परि लागता ध्यान प्रभूचे चरणावरी
नको मजसी जीवन हीच भावना उरीं
सर्वस्व अर्पा प्रभुला हाच मार्ग सुखाचा
तेव्हांच मिळेल सर्वाला आनंद जीवनाचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
हाडे, मांस, रक्ताने,
शरीर बनविले छान,
सौंदर्य खुलते त्या देहाचे,
जर असेल तेथे प्राण ।।१।।
प्राण नसे कुणी दुजा हा,
परि आत्मा हेची अंग,
विश्वाचा जो चालक,
त्या परमात्म्याचा भाग ।।२।।
ईश्वरी सेवा, संकल्प मनीं,
प्रेमभरे देह भजावा,
अंतर बाह्य शुद्धता राखी,
समर्पणाचा भाव असावा ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कापलेले पंख अन्,
तोडलेले हातपाय,
विचारेना इथे कुणी,
देईना धरणी ठाय,--!!!
काय करू, जाऊ कुठे ,
मन विषण्ण होई,---
सांगायाची कोणाला
आपुली कर्मकहाणी,--!!!
जग सारे पसरलेले,
चालते आहे एकटी,
स्थिती अगदी अनवाणी,
रणरणत्या वाळवंटी,--!!!
पाखरा किती गोंडस तू,
गोडुली तुझी वाणी,
आधार देई मम बुडती'ला,
देऊन काडी काडी,--!!!
*निराशेच्या गगनीही,
आशेचा पक्षी उडे,
संगतीला मी तुझ्या,
शांत हो राजसबाळे*,--!!!
दूर क्षितिजावरती,
प्रकाशकिरण चमचमती,
तुझ्या जीवनपथावरही,
डोकावेल तो एक दिनी,--!!!
सुमार"" नसेल आनंदाला,
इतुके सुख येईल जीवनी,
हे घेऊ की ते घेऊ,---
सुख वाटशील भरभरूनी,--!!!
एवढी खिन्नता कशाची,
काळोख दाटे का मनी,
आनंद जगाला वाटसी,
खूण पटेल समाधानी,--!!!
गर्तेत उदासीनतेच्या,
का अशी जाऊन पडशी,
पुन्हा पंख फैलावुनी,
आसमंती घे भरारी,--!!!
कितीदा तरी दुःखे,
मानवाला मागे लोटती,
परंतु बाहू फैलावुनी,
नव्हत्याचे होते करती,--!!!
हिमगौरी कर्वे.©
एक वाक्य लिहिलं की पुर्णविराम देतो.
दुसरं तिसरं वाक्य लिहून झालं की
पुन्हा पूर्णविराम.
अजून काही वाक्ये लिहत राहतो.
पुर्णविराम देत देत.
सगळं लिखाण संपतं पुर्णविरामानं.
तरीही काही आठवलं की
ताजाकलम म्हणून अजून वाढवत राहतो लिखाण.
पुर्णविराम देवुन पुन्हा.
या अपुर्णविरामांना दुसरं नाव शोधतोय मी.
मधल्या सगळ्या पुर्णविरामाच्या टिंबाला वेगळं अन
शेवटच्या खरोखरच्या पुर्णविरामाच्या चिन्हाचा
आकारच वाढवावा म्हणतो मी ॰
-- श्रीकांत पेटकर
आयुष्यात काही लोकांना एक जाणीव करून
देना खूप महत्वाचे असते....
कि त्यांच्या असण्याने काही फरक नाही पडत,
तेव्हा त्यांच्या नसण्याने तर कदापिही
फरक पडणार नाही....!!
-- मयुरी राम विखे
खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते
आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते ।।१
इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि
लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी ।।२
मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या
बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या ।।३
इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला
चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला ।।४
चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी
दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लोहगडाच्या त्या कड्यावरून
आज फक्त एक देह कोसळला नाही,
कोसळला विश्वास,
कोसळली स्वप्नं,
आणि प्रेमाच्या नावावर उभं असलेलं
माणुसकीचं मंदिरही ढासळलं.
ज्याच्या हातात आयुष्यभराची साथ होती,
त्याच हातांनी जर अंधाराची वाट दाखवली,
तर जखम रक्ताची नसते,
ती आयुष्यभर वाहणाऱ्या वेदनेची असते.
तेव्हा मनात एकच प्रश्न उसळतो...
प्रेम जर शेवटी प्राणच हिरावून घेणार असेल,
तर अश्वत्थाम्यासारखं
युगानुयुगे एकटं भटकण्याचं दुःखही स्वीकारावं.
कारण एकटेपण जगायला शिकवतं,
पण विश्वासघात जगण्याचं कारणच हिरावून घेतो.
प्रेम म्हणजे मालकी नव्हे,
प्रेम म्हणजे समर्पण.
प्रेम म्हणजे संशय नव्हे,
प्रेम म्हणजे निस्सीम विश्वास.
जिथे विश्वासाचा कडेलोट होतो,
तिथे प्रेम आधीच मृत झालेलं असतं.
उरतात फक्त आठवणी,
आणि न भरून येणाऱ्या जखमा.
म्हणून प्रेम करा
पण इतकं निर्मळ,
की त्यातून कोणाचाही अंत नव्हे,
तर नव्या आयुष्याची पहाट जन्माला यावी.
कारण...
खरं प्रेम कोणाचा जीव घेत नाही,
ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्याचं बळ देतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
लग्न म्हणजे प्रारंभात, प्रेम आणि श्रृंगार,
लग्न म्हणजे पूर्वार्धात, तडजोड आणि संसार,
मध्यंतरात तर लग्न म्हणजे, वाद-वैताग-अंधार,
पण लग्न म्हणजे उत्तरार्धात, सोबत आणि गंधार |
-- सौ. अलका वढावकर
Copyright © 2025 | Marathisrushti