(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • केसातील कोंडा घालवणे

    केसातील कोंडा घालवण्याचे सोपे उपाय

  • “अ‍ॅग्रेसिव्ह” – माईल्ड,कोल्ड आणि रिग्रेसिव्ह

    नाटकाचा विषय बोल्ड असला तरीही त्यात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशा प्रकारे नाटकाची हवा निर्माण करण्यात आली. जणू लैंगिक विषयावरचे एक गंभीर उद्देशपूर्ण नाटक. त्यामुळे हे नाटक मी आवर्जून बघितले. तुम्ही गालातल्या गालात हसत अर्थातच म्हणू शकता की गृहस्थ आबंटशौकीन आहे आणि हिट अ‍ॅन्ड हॉट नाटक बघण्यासाठी त्याने हा बहाणा शोधलेला आहे.

  • गंगा आणि जल (उमा भारती यांच्यासाठी कांहीं माहिती)

    २५ जून २०१६ च्या टाइम्स ऑफ इंडियातील एक बातमी गंगेबद्दल आहे. बातमीचें शीर्षक आहे : ‘Dams will doom Ganga’. उमा भारती यांनी ( किंवा त्यांच्यातर्फे, त्यांच्या ‘वॉटर रिसोर्सेस’ खात्यानें) सुप्रीम कोर्टाला सांगितलें की, अलकनंदा, भागीरथी व मंदाकिनी या नद्यांवर (हायड्रोइलेक्ट्रिक वीजनिर्मितीसाठी) धरणें बांधणें हें गंगेसाठी घातक ठरेल , नदीच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होईल , आणि अर्थातच, त्याचा अनिष्ट परिणाम ecology वरही होईल. त्यांच्या या वक्तव्यात वावगें कांहींच नाहीं. (अर्थात, देशाला हायड्रोइलेक्ट्रसिटीची जरूर आहेच, ही नाण्याची दुसरी बाजू झाली).

    आपण या बाबीवर चर्चा करतांना अर्थकारण, समाजकारण, विद्युतनिर्मिती, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून, फक्त ‘पाणी’ या विषयावर लक्ष केंद्रित करूं या, व पाहूं या, उमा भारतीजींना आपण कांहीं उपयुक्त माहिती पुरवूं शकतो कां, तें.

    १. सरस्वती : आपल्याला हें माहीतच आहे की ‘सरस्वती’ नांवाची महा-नदी, जिचें पात्र रुंदी कांहीं ठिकाणी ८-१२ किलोमीटर रुंद होतें , व जिच्या काठावर पुरातन ‘सिंधु-सरस्वती-गंगा’ संस्कृतीची वाढ झाली, ती महा-नदी आटत गेली, आणि इ.स.पू. १९००-१५०० च्या सुमाराला लुप्तच झाली. अनेकांना हेंही माहीत असेलच की, आतांच्या युगात पर्यावरणामुळे बर्फ वितळण्याचें प्रमाण वाढल्यानें हिमनद्या (glaciers) लहान-लहान होत चालल्या आहेत, व त्यामुळे हिमालयातून वाहणार्‍या (गंगेसारख्या) नद्यांच्या अस्तित्वाला धोका आहे. एक ग्लेसियर गंगेसारख्या मोठ्या नदीला १०,००० वर्षें मानी पुरवूं शकतो. त्यापेखी किती वर्षें उलटून गेलेली आहेत ? त्यायून, ग्लेसियर्स् आटत चालले आहेत. म्हणून, गंगा नदी तर एक दिवस आटणारच आहे ; फक्त, ती घटना आपल्या आयुष्यात, किंवा अगदी नजिकच्या भविष्यात घडणार नाहीं, एवढेंच. भगीरथानें महा-प्रयत्नानें गंगा हिमालयातून (स्वर्गातून) खाली (समतल प्रदेशात) आणली (असें पुराणें सांगतात). त्या गंगेला सध्याच्या काळीं कसें जगवायचें, आणि / किंवा गंगा-खोर्‍याला पाणी-पुरवठा कसा कमी होणार नाहीं, हें आपण पहायला हवें.

    २. सरस्वतीबद्दल आणखी कांहीं : डॉ. एस्. कल्याणरामन् त्यांच्या पुस्तकात ( संदर्भ नंतर दिलेला आहे) म्हणतात की हा ‘सिंधु-सरस्वतीचा प्रदेश’ म्हणजे एक विशाल homogeneous-aquifer आहे, जणूं एक प्रचंड मोठा स्पाँज आहे.
    सरस्वती नदी जरी आजच्या ३५००-३९०० वर्षें आधी आटून गेलेली असली, तरी, तिच्या ‘लुप्त’ पात्रात आजही पाणी लागतें. राजस्थानातील जैसलमेर हा भाग वाळवंटी आहे. पण त्या भागात बोअर-वेल् घेतली असतां खाली बारमाही-पाणी लागतें. ‘रेडिओ-कार्बन डेटिंग’नें हें दिसून आलेलें आहे की, हें groundwater (भूगगर्भजल) इ.स.पू. २९५० ते २४०० या (म्हणजेच, आजच्या काळाच्या ४४००-५००० वर्षें आधीच्या) काळातील आहे . हें वहातें पाणी आहे. त्याचा वेगही मोजला गेलेला आहे. ज्याअर्थी हें पाणी वहातें आहे, त्याअर्थी त्याचा आजही, जमिनीखालून, त्याच्या हिमालयीन उगम-भागाशी संपर्क आहे. या , डीप-वॉटर / ग्राउंड-वॉटर / अॅक्विफर च्या BARC नें केलेल्या ‘Tritium (Hydrogen Isotope) Analysis’ नें याचा काळ, इ. स.पू. ५४०० ते इ.स.पू. ४०० असा दाखवला आहे. BARC च्या रिसर्चर्सनी असें दाखवलेलें आहे की, हें राजस्थानमधील अॅक्विफर्समधील पाणी हिमालयीन आहे, व त्याचा उगम-काळ इ.स.पू. ६००० इतका आहे. (सर्व संदर्भ : Kalyanraman यांचा सरस्वतीसंबंधी ग्रंथ, ‘The River Saraswati : Legend, Myth and Reality’). हे ई.स.पू.चे वेगवेगळे निष्कर्ष असें नक्कीच दाखवतात, की हें भूगर्भजल फार-पुरातन-कालीन आहे.
    ही अगदी हल्लीची बातमी पहा : ती सांगते की राजस्थानातील थर वाळवंटात आतां शेतकर्‍यांना Tube-wells मध्ये भरपूर बारमाही पाणी मिळत आहे, आणि तेंही इतक्या जोरात (forcefully) वर येत आहे की तें थांबवणें कठीण आहे. वृत्तपत्र म्हणतें की, याचा अर्थ असा असूं शकतो की सरस्वती नदी पुन्हा बाहेर येत आहे. (संदर्भ : टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई, दि. २६ एप्रिल २०१६ च्या अंक).
    जैसलमेर नजिकच्या, पाकिस्तानातील-भूभागातही अशीच परिस्थिती आहे, तेथेंही, वाळवंटी भागातील bore-wells ना पाणी मिळत आहे.

    ३. USA मध्ये दक्षिण-पश्चिम भागात, जमिनीच्या खाली एक प्रचंड तलाव आहे, (युरोपमधील एखाद्या लहान समुद्राएवढा) , जो अनेक states च्या खाली पसरलेला आहे. त्यातलें पाणी उपसा करून वापरलें जातें.

    ४. गंगा-खोरें : जसें जसें आपण पूर्वेकडे जाऊं तसें तसें गंगेला वेगवेगळ्या उपनद्या मिळत रहातात, जसें , यमुना,शोण इत्यादी इत्यादी, व तिच्यातील पाणी वाढत रहातें. म्हणजे, गंगेच्या-पाण्याचा जो कांहीं प्रश्न आहे तो पर्वतराजींपासून अलाहाबादपर्यंतचा आहे.
    पुरातत्वशास्त्रज्ञ श्री. ढवळीकर यांनीं लिहिलें आहे की, देहरादूनपासून ते अलाहाबादपर्यंतच्या प्रदेशात उत्खनन करतांना तें चिखलातच करावें लागतें. तसेंच, या भागात खूप लहान-लहान तळी आहेत. या सर्वाचा अर्थ ते असा काढतात की, वेद-पुराणात जो ‘प्रलयाचा’ (महापुराचा) उल्लेख आहे, त्या प्रलयामुळे हें जमिनीतील मुरलेलें पाणी आहे.
    तें असो-नसो, पण गंगेनें अनेकदा पात्र मात्र बदललेले आहे, त्याचाही कांहींतरी परिणाम असणारच.
    मला असें वाटतें की, ही तळी व हा चिखल याचा अर्थ एकतर असा असूं शकतो की, तिथें जमिनीखालीं एक, पुरातन-काळीं-वहात-असलेली पण नंतर-‘लुप्त’-झालेली (जशी सरस्वती झाली तशी ) ‘नदी’ असूं शकेल. इंडियन टॅक्टॉनिक प्लेट ही एशियन प्लेटला घासली गेल्यामुळे गेल्या कांहीं सहस्त्रकांत बर्‍याच उलथापालथी झालेल्या आहेत. त्यामुळेच, सरस्वतीच्या उपनद्या असलेल्या सतलज व यमुनेनें प्रवाह बदलले, दृशद्वती नष्ट झाली, तोंस ही यमुनेची उपनदी झाली, व सरस्वती लुप्त झाली. त्याचप्रमाणें गंगेजवळही, सहस्त्रों-वर्षांपूर्वी-अस्तित्वात-असलेली एखादी नदी लुप्त होणें शक्य आहे.
    किंवा, USA मध्ये आहे तसा एखादा मोठा भूअंतर्गत (underground) तलावही त्या भागात असूं शकेल.अखेरीस, हिमालयीन पर्वराजींमधून सगळेंच पाणी फक्त जमिनीवरील वाहत्या नद्यांमधूनच जात असेल असें नाहीं, तर कांहीं पाणी जमिनीखाली, वहात किंवा स्थिर असूंही शकेल
    रिमोट सेन्सिंग एजन्सीनें जसा घग्गर-हाक्रा या सध्याच्या नद्यांच्या भूभागाचा सर्व्हे केलेला आहे (लुप्त सरस्वती नदीसाठी) , तसा गंगाखोर्‍याचा केलेला आहे काय ; किंवा जिऑलॉजिकल सर्व्हे, आर्कियॉलॉजिकल सर्व्हे, वॉटर-रिसर्च कमिशन, वगैरे संस्थांनी त्या भागात भूगर्भजल शोधण्यासाठी कांहीं प्रयोगादाखल उत्खनन केले आहे काय, बोशर-वेल्स् खणून पाहिल्या आहेत काय, व कांहीं माहिती गोळा केली आहे काय , याची मला कल्पना नाहीं . पण , तसें केलेलें नसल्यास तो अभ्यास व्हायला मात्र हवा.

    ५. भूगर्भजल : कल्याणरामन् सांगतात की, जैसलमेरच्या पश्चिमेच्या ( वाळवंटी ) सरस्वती-पात्रात (भूगर्भात) अंदाजे ३००० मिलियन क्युबिक मीटर इतका रिझर्व आहे. त्याचा वापर सुयोग्य प्रकारें करतां येऊं शकेल . सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डाचे भूतपूर्व डायरेक्टर. डॉ. के. आर्. श्रीनिवासन् त्यांच्या एका लेखात सांगतात की, ‘सेंट्रल-सरस्वती-बेसिन’ या राजस्थानातील केवळ एका भूभागातच, १० लाख ट्यूब-वेलस् ना कायमस्वरूपी पाणी पुरवण्याची क्षमता आहे. कल्याणरामन् हेंही सांगतात की पाकिस्तानातील-पंजाब भागात detailed investigations झालेलें आहे, आणि त्याचा निष्कर्ष असा आहे की , सिंधु व तिच्या उपनद्यांमधून जेवढें पाणी वाहून जातें, त्याच्या दसपट groundwater-reservoir ( भूगर्भजल-साठा) तेथें आहे.

    ६. जसें जेसलमेर भागात जमिनीखाली पुरातन-काळातील भूगर्भजल मिळालें आहे ; जसें पाकिस्तानातील पंजाब भागात प्रचुर भूगर्भजल आहे ; तसें, कदाचित, किंवा बहुतेक, गंगा-खोर्‍यातही असूं शकेल. गंगाखोर्‍यातही जर पुरातन-भूगर्भजलसंचय मिळाला, किंवा जमिनीखाली पुरातन-‘लुप्त’-नदी मिळाली, तर तिथेंही, वापरायला पाणी मुबलक मिळेल, आणि मग, धरणांमुळे गंगा-प्रवाहात कमतरता येण्याबद्दलची काळजी करायचें कारण रहाणार नाहीं.

    ७. मंत्रीजी उमा भारती यांच्यावर गंगेबद्दलची जबाबदारी आहे. तेव्हां, त्यांनी पुढाकार घेऊन, गंगा-खोर्‍यातील भूगर्भजलाच्या अभ्यासाला चालना द्यावी, वेग द्यावा. त्यातून प्राप्त होणार्‍या माहितीनें कदाचित गंगेच्या पाण्याचा प्रश्न सुटेलही !

    - सुभाष स. नाईक

  • भारतमातेच्या वीरांगना – 15 – झाशीची राणी

    मे १८५७ ला मेरठ मधून संग्रामला सुरवात झाली. झाशी अजूनतरी शांत होते. राणी लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून, स्त्री शक्तीला जागृत केले, त्यांना आणि इतर बांधवांना धैर्य दिले. झाशी सदैव स्वतंत्र राहील ह्याचे आश्वासन सुद्धा दिले. जुनमहिन्यात संग्रामच्या झळा झाशीपर्यंत पोचल्या. आधी शेजारी राज्य ओरछा आणि दातीया राज्याकडून आक्रमण आणि मग ब्रिटिश सैन्याचे आक्रमण. शेजारी राज्यांना पराभूत करून राणी इंग्रजांविरुद्ध च्या लढाईसाठी सज्ज झाल्या. त्यावेळी राणीने आपल्या सैन्याला, लोकांना सांगितले, ‘आपण युद्धाला सज्ज आहोत, जर जिंकलो तर विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि जर हरलो तर आपल्याला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल की आपण शरणागती पत्करली नाही.’

  • अवखळ आनंदी खमाज

    सर्वसाधारणपणे उर्दू शायरीत एकतर कमालीचे दु:ख किंवा प्रणयी छेडछाड तसेच काही प्रमणात उदात्त विचार भरपूर वाचायला/ऐकायला मिळतात. बरेचवेळा या भावनांचे थोडे अतिरंजित उदात्तीकरण देखील वाचायला मिळते. आता इथे हाफिज होशियारपुरी या शायरने अशाच प्रकारची भावना व्यक्त केली आहे.

    "जमानेभर का गम या इक तेरा गम,
    ये गम होगा तो कितने गम ना होंगे"
    असे लिहून त्याने प्रणयी तडफड व्यक्त केली आहे. वास्तविक, एक कविता किंवा गझल म्हणून या रचनेत तसे फारसे नाविन्य नाही, वेगळा विचार नाही तसेच असामान्य असा आशय व्यक्त होत नाही पण, याच शब्दांना संगीताची जोड मिळाली की लगेच हेच शब्द आपल्या मनात रुतून बसतात.
    उस्ताद मेहदी हसन साहेबांनी हीच कमाल, खमाज रागाच्या सहाय्याने अप्रतिमरीत्या सादर केली आहे. मी इथे मुद्दामून गझलेच्या पहिल्या ओळी दिल्या नाहीत पण, आता देतो.
    "मुहब्बत करनेवाले कम ना होंगे,
    तेरी महफ़िल मे लेकिन हम ना होंगे"
    मेहदी हसन यांची ही अतिशय प्रसिद्ध रचना खमाज रागावर आधारित आहे.
    शब्दांचे अचूक उच्चारण, खमाज रागावर आधारित असले तरी गझल गायकीचा स्वत:चा असा खास "खुशबू" असतो, त्याची यथार्थ जाणीव करून देणारी गायकी आणि आपण, राग सादर करत नसून, त्या रागाच्या सावलीत राहून, शायरीमधील आशय अधिक अंतर्मुख करीत आहोत, हा विचार, हे सगळे गुण या रचनेत अप्रतिमरीत्या ऐकायला मिळतात. रागाच्या सुरांची मदत तर घ्यायची पण, शायरीला प्राधान्य द्यायचे, अशी दुहेरी कसरत मेहदी हसन खरोखरच अप्रतिमरीत्या सादर करतात. कुठेही शब्दांना म्हणून दुखवायचे नाही, ही आग्रह तर प्रत्येक ओळीच्या गायकीतून दिसून येतो.
    "अगर तू इत्तफाकन मिल भी जाये,
    तेरी फुरकत से सदमे कम ना होंगे"
    या ओळी, माझे वरील म्हणणे तुम्हाला पटवतील. वास्तविक, पहिली ओळ खमाज रागापासून थोडी दूर गेली आहे पण, लगेच दुसऱ्या ओळीत, गायकाने चालीचे वळण, योग्य प्रकारे आणून, आपल्या बुद्धिमत्तेचा अफलातून प्रत्यय दिला आहे.
    इथे मी थोडी गंमत केली आहे. लेखाचे शीर्षक "अवखळ आनंदी खमाज" असे दिले आहे पण, वरील रचना तर या भावनेपासून फार दूर आहे. हेच तर भारतीय संगीताचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या रागाचे नेहमी एकाच भावनेत वर्णन करणे, सर्वथैव अशक्य!! रिषभ वर्जित आरोही सप्तकात दोन्ही निषाद बाकीचे सगळे स्वर शुध्द लागतात तर अवरोही सप्तकात सगळे स्वर लागतात पण, निषाद फक्त कोमल वापरला जातो. वादी स्वर गंधार तर संवादी स्वर निषाद असलेल्या या रागाची खरी ओळख तुम्ही (कोमल) निषाद कसा लावता आणि तो लावताना पुढच्या षडजाला किंचित स्पर्श करून अवरोही सप्तकाकडे कसे वळता, या कौशल्यावर आहे. खरे तर या रागात संपूर्ण "ख्याल" फारसे आढळत नाहीत.
    वेगळ्या भाषेत, ख्याल गायक, या रागाकडे तसे फार बघत नाहीत असे दिसते. परंतु वादकांचे मात्र अलोट प्रेम या रागाला लाभले आहे तसेच सुगम संगीतात, या रागावर आधारित भरपूर रचना आढळतात. हे थोडेसे पिलू रागासारखे झाले.
    उस्ताद विलायत खानसाहेबांनी खमाज वाजवताना हीच असामान्य करामत करून दाखवली आहे. उस्ताद विलायत खान म्हणजे सतार वादनात स्वत:चे "घराणे" निर्माण करणारे कलाकार. वास्तविक सतार म्हणजे तंतुवाद्य, म्हणजेच वाद्यावर "मिंड" काढणे तसे अवघड काम पण तरीही, सतारीच्या तारेवरील "खेंच" आणि मोकळी सोडलेली तार, यातून ते असा काही असमान्य सांगीतिक वाक्यांश "पेश" करतात की ऐकताना रसिक अवाक होतो. विशेषत: द्रुत लयीत, गत संपूर्ण सप्तकाचा आवाका घेत असताना,मध्येच "अर्धतान" घेऊन, सम, ते ज्याप्रकारे गाठतात, तो प्रकार तर अविस्मरणीय असाच म्हणायला हवा.
    या वादनात उस्तादांच्या कौशल्याची पुरेपूर प्रचीती येते. जरा बारकाईने ऐकले तर सहज ध्यानात येईल, वादन "जोड" आणि "झाला" यांच्या मध्ये किंचित गुंतलेले असताना, एके ठिकाणी ठुमरी अंगाची तान घेतली आहे पण तिचे अस्तित्व किती अल्प आहे. आणखी विशेष म्हणजे "जोड" वाजवताना, एके ठिकाणी, तारेवर किंचित दाब देऊन, स्वर रेंगाळत ठेवला आहे, म्हणजे बघा, लय मध्य लयीत चाललेली आहे पण, इथे तान सगळी न घेता मध्येच किंचित खंडित करून त्या रेंगाळलेल्या स्वरावर संपवलेली आहे. फार, फार अवघड कामगत आहे.
    कवी अनिलांच्या बऱ्याच कविता, गीत म्हणून रसिकांच्या समोर आल्या आहेत. त्यातलीच ही एक रचना, खमाज रागाशी मिळती जुळती आहे. अर्थात, हे गाणे, गीत म्हणून लिहिले नसल्याने, कविता म्हणून देखील फार सुरेख रचना आहे. संगीतकार यशवंत देवांनी चाल देखील फार सुरेख लावली आहे. मुळात यशवंत देव हे कवी प्रकृतीचे संगीतकार असल्याने, ते कवीच्या भावना फार नेमक्या दृष्टीने अभ्यासतात आणि शब्दांना सुरांचा साज चढवतात. देवांच्या चालीत, कवितेचे मोल, त्यांनी जाणलेले सहज दिसून येते आणि चाल लावताना, ओळीतील कुठल्या शब्दाने, कवितेचा आशय अधिक गहिरा होईल, याकडे लक्ष दिलेले आपल्या देखील लक्षात आणून देतात. त्यांची बहुतेक गाणी तपासली तर असे दिसून येईल, गाण्याच्या पहिल्याच ओळीत, कवितेतील नेमका शब्द पकडून, त्यावर नेमका "जोर" देऊन, कवितेतील आशय व्यक्त करतात. इथे देखील, त्याचा हाच आग्रह दिसून येतो.
    "वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर जळते उन,
    नको जाऊ कोमेजून माझ्या प्रीतीच्या फुला"
    प्रणयी ढंगाची कविता आहे. या ओळीतील, "माध्यान्ह" हा शब्द आणि पुढे "जळते उन" हे शब्द ऐका. दुपारचा रखरखाट आहे, डोके उन्हाने तापले आहे आणि असे असून देखील, माझ्या प्रिये, तू कोमेजून जाऊ नकोस. या संदर्भात वरील शब्द ऐकावेत म्हणजे, "शब्दप्रधान गायकी" म्हणजे क्काय याचे आपल्याला उत्तर मिळेल.
    हिंदी चित्रपट गीतांत देखील खमाज राग भरपूर पसरलेला आहे. दिलीप कुमारच्या "देवदास" चित्रपटात अशीच अत्यंत मनोरम अशी रचना ऐकायला मिळते. मुबारक बेगमच्या खणखणीत आवाजात ही चीज ऐकायला फारच बहारीचे वाटते.
    "वो ना आयेंगे पलट कर, उन्हे लाख हम बुलायेंगे;
    मेरी हसरतो से केह दो की ये ख्वाब भूल जाये".
    "वो ना आयेंगे पलट कर,उन्हें लाख हम बुलाये" हीच ती साहीरची अफलातून रचना. खरतर गाणे फार थोडा वेळ, चित्रपटात ऐकायला मिळते पण तरीही सुरांची, स्वत:ची अशी खासियत असते, ज्यायोगे एखादा सूर देखील आपल्या मनावर परिणाम करून जातो. इथे तसेच घडते. मुबारक बेगमचा स्पष्ट, खणखणीत आवाजाने, खमाज रागाची झलक देखील मनाला मोहवून जाते.
    मराठी भावगीतात असेच एक मानाचे पान राखून असलेली रचना ऐकायला मिळते. माणिक वर्मांच्या आवाजात "त्या चित्तचोरट्याला का आपुले मी" ही रचना, खमाज रागाशी फार जवळचे नाते सांगून जाते. कविता म्हणून, गझल सदृश रचना आहे. मधुकर गोलवळकरांनी अतिशय सुंदर चाल लावून, या कवितेला अप्रतिमरीत्या सादर केले आहे.
    "त्या चित्त - चोरट्याला का आपुले म्हणू मी?
    स्मृतीजाल आंसवांचे दिनरात का विणू मी?'
    माणिकबाईंचा किंचित "नक्की" स्वरांतला आवाज परंतु शास्त्रीय संगीताच्या रियाजाने, आवाजाला घोटीवपणा प्राप्त झालेला. सहजता आणि संयमितपणा हे त्यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागते. तसेच त्यांनी मराठी भावगीत गायनात उत्तरेचा रंग आणि ढंग व्यवस्थितपणे रुजवला आणि हे वैशिष्ट्य, ही रचना ऐकताना आपल्याला सहज दिसून येईल. गायकी ढंगाची चाल आहे, त्यामुळे गाण्यात, "ताना","हरकती" भरपूर आहेत तसेच तालाच्या गमती जमती देखील आहेत. शास्त्रीय संगीताचा रियाज असल्याने, गायनात नेहमी विस्ताराच्या जागा, त्या निर्माण करतात. याचा परिणाम, गाणे ऐकायला अतिशय वेधक झाले आहे.
    देव आनंदच्या "काला पानी" या चित्रपटात "नजर लागी राजा" हे गाणे खमाज रागाची व्यवस्थित ओळख करून देते. वास्तविक, "नजर लागी राजा" नावाची बंदिश देखील प्रसिद्ध आहे आणि याच बंदिशीचा आधार घेऊन, चित्रपटात हे गाणे तयार केले आहे.
    "नजर लागी राजा तोरे बंगले पर,
    जो मै होती राजा बनके कोयलिया,
    कुहुकू रहेती राजा तोरे बंगले पर".
    संगीतकार एस.डी.बर्मन यांनी गाणे बनवताना, बंदिशीतील भावनेचा भाग तेव्हडा उचलला आहे आणि त्यावरून गाण्याची चाल बनवली आहे. अर्थात, अशा गायकी ढंगाची चाल गाताना, आशा भोसले यांची गायकी खुलली तर काय नवल!!
    "गंगा जमना" चित्रपटात अशाच धर्तीचे एक गाणे आशा भोसले यांनी खुलवले आहे - तोरा मन बडा पापी सांवरिया रे". खमाज रागाची अचूक ओळख करून घेत येते.
    "हां मतलब का है तू मीत बेदर्दी, गरज की रखे प्रीत;
    दुखिया मन को घायल करना, समझे तू अपनी जीत;
    तोरा मन बडा पापी सांवरिया रे,
    मिलाये छलबल से नजरिया रे".
    या गाण्यात "तोरा मन बडा पापी रे" या ओळीत आपल्याला खमाज राग भेटतो. संगीतकार नौशाद यांनी. गाण्याची प्रकृती ओळखून, उत्तर भारतीय लोकसंगीताची कास धरून, चाल बांधली आहे. अर्थात त्याचबरोबर गाणे कोठीवरील आहे, हे ध्यानात घेऊन, त्यात, "लखनवी" नखरा मिसळला आहे. खमाज "अवखळ" प्रवृत्तीचा आहे, हे नेमकेपणाने दाखवून देणारी ही रचना!!
    - अनिल गोविलकर

  • हा तर पुरुषाचाच धिक्कार

    स्त्री-पुरुष संबंधांचा व त्यांच्यातील नात्याचा गाभा काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला आहे आणि अजूनही करत आहेत. स्त्री-पुरुषांचे शारीरिक मीलन अपत्यप्राप्तीपर्यंत जाते. म्हणून त्यांच्यातील नाते नैसर्गिक आहे, अशी पुरुषी समाजाची धारणा असते. पण जे नैसर्गिक आहे, ते नैतिक कशावरून? स्त्री-पुरुष संबंध नैसर्गिक अवस्थेत परिपूर्ण असू शकत नाहीत. त्यावर प्रेम, आदर, समानता हे संस्कार झाले, तरच ते नैतिक होतात. निव्वळ नैसर्गिक संबंध ही प्रकृती आणि अनैसर्गिक मार्गाने मिळालेले सुख ही विकृती होय. पण जेव्हा या संबंधांवर प्रेम, विश्वास आणि आदर याचा साज चढवला जातो, तेव्हाच ती संस्कृती ठरते.

  • मी, एक पुतळा

    नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील एक पुतळा. जिवंत असताना या देशातील जनतेच्या म्हणण्यानुसार मी खरंच महापुरुष होतो की नाही हे मला माहित नाही, पण आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दीनदुबळ्यांना त्यांच्या अमानवीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. या कामाचा अवाका इतका मोठा होता की, मी जिवंत असेपर्यंत हे काम संपू शकण्यासारखं नव्हतं. माझ्या मृत्यूनंतर अनेकांना 'महापुरुष' होण्याची घाई झाल्यामुळे माझ्या जिवंत विचारांऐवजी माझे निश्चल पुतळे जागोजागी उभारणेच त्यांना जास्त सोईस्कर वाटले. माझ्या विचारांशी असलेल्या तथाकथित बांधिलकीची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या नावांनी राजकारणाची दुकानं थाटली. अनेक दुकानं म्हणजे जीवघेणी स्पर्धा आलीच व जीवघेणी स्पर्धा म्हणजे एकमेकाचे गळे कापणं हेही ओघाने आलंच!

    माझ्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अनेक वर्षांमध्ये इकडे एकदाही फिरकण्याची इच्छा न झालेले एक नेताजी अपरात्री माझ्या दिशेने येताना दिसले आणि त्यांची माझ्यावरील निष्ठा बघून मला अक्षरश: गहिवरून आले. पण ते माझ्याजवळ पोहोचताच ती 'निष्ठा' नसून 'विष्ठा' आहे हे बघून मी हादरून गेलो. माझ्या काही लक्षात येण्याच्या आतच नेताजींनी त्यांच्या हातातील विष्ठेने माझा चेहरा माखून टाकला व क्षणार्धात ते अंधारात दिसेनासे झाले. पहाटे तरतरीत चेहऱ्याने मॉर्निंग वॉकला निघालेले 'तेच' नेताजी माझ्या पुतळ्याची अवस्था बघून प्रचंड संतापले आणि बघता बघता त्यांच्या कार्यकर्त्यांचा जमाव माझ्याभोवती जमला. माझ्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या दुसऱ्या एका नेत्याचे हे दुष्कृत्य आहे अशी बातमी अगदी सुनियोजितपणे पूर्ण शहरात पसरविण्यात आली व अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणारी दंगल पद्धतशीरपणे भडकवून मला विष्ठा फासणारे नेताजी अतीव समाधानाने त्यांच्या आलिशान बंगल्याच्या हिरवळीवर महागड्या व्हिस्कीचे घुटके घेत पुढील राजकीय डावपेचांची आखणी करण्यात गर्क झाले!

    माझ्या पुतळ्यावरून झालेली पहिलीच दंगल ही परकीयांसाठी एक सुवर्णसंधी ठरली. अनेकांचे नाहक जीव घेणारी व असंख्यांचे संसार एका दिवसात उद्ध्वस्त करणारी ती दंगल शांत झाल्यानंतर एक दिवस माझी नजर माझ्या चौथऱ्याकडे गेली तर मध्यरात्री तिथे दोन परदेशी नागरिक गंभीर चर्चा करीत बसले होते. त्यांच्या हातात आपल्या देशातील पुतळ्यांच्या लांबलचक याद्या होत्या. पुतळ्यांच्या नावांसमोर त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचा तपशील लिहिला होता. कोणत्या पुतळ्याला केव्हा मानवीय विष्ठा, शेण किवा डांबर फासायचे, कोणत्या पुतळ्यांच्या गळ्यात चपला व जोड्यांचे हार घालायचे याची योजना तयार करण्यात ते गर्क झाले होते. चर्चेच्या शेवटी एक दुसऱ्याला अत्यानंदाने म्हणाला, ''या पुतळ्यांमुळे आपलं काम किती सोपं झालं. स्वार्थाच्या पोळ्या शेकण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचा वापर अत्यंत निर्लज्जपणे जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या देशात मनसोत्त* धुमाकूळ घालण्यास आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहे!''

    परकीयांनी आमच्या वागण्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे म्हणूनच अगदी क्षुल्लक कारणावरून ते आमच्या देशात मोठ्या दंगली भडकवू शकतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ न निष्पाप नागरिकांना भडकवणारे स्थानिक नेते हे तर त्यांचे बिनीचे सरदारच! मी अंतर्मुख झालो असतानाच जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा पळणाऱ्यांना बघून आश्चर्यचकित झालो. एका नेत्याचे पोस्टर दुसऱ्या नेत्याने फ ाडल्यामुळे शहरात प्रचंड दंगल उसळली होती. त्या गदारोळात ते दोन परकीय नागरिक अचानक माझ्या दृष्टीस पडले. विलक्षण आनंदाने एक दुसऱ्याला टाळी देत म्हणाला, ''काल पुतळा, तर आज पोस्टर, तर उद्या आणखी काही. या देशात वर्षानुवर्षे हे असंच चालत राहणार!''

    -- श्रीकांत पोहनकर, पुणे

    98226 98100

  • आठवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

    मी आणि व्ही.पी. सिंग आम्ही दोघेही संभ्रमावस्थेत असण्याचा तो १९८८-८९ चा मंतरलेला काळ होता. पंतप्रधान बनण्याच्या कल्पनेने ते आणि कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या आशेने मी ,असे आम्ही दोघेही पछाडलेले होतो. निर्माता, दिग्दर्शक आणि नायक बनण्याच्या कल्पनेने महेश कोठारे ( डँम इट ) ‘झपाटलेला’ होता जवळपास तसेच.

  • जेलची हवा

    आजकाल निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. सरकार, समाज आणि कुटुंब घटक हतबल झालेला दिसत आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या …..

  • आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन

    रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.

    तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.

    थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच.

    एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.

    एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय तुझं...?"

    मी नाव बोललो

    कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?

    मी पुन्हा बोललो

    त्या हसत हसत बोलल्या "अच्छा . छान आहे नाव"

    त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, "डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही ओ आजी". का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा"

    हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.

    घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील"

    मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.

    दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं.

    संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.

    मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, "आजी काय करताय हे ?"

    त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.

    कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.

    त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.

    कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.

    जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या "आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू... मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू "

    मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.

    पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.

    मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.

    मी जवळच्या टपरीवर गेलो
    आणि विचारलं, "इथल्या आजी कुठे आहेत ?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.

    मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.

    अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!

    आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन