(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • अटकर बांध्याचा हंसध्वनी

    भारतीय रागसंगीतात एकूणच, बहुतेक सगळे राग हे, धार्मिक, भक्तीभाव समर्पण, प्रणयी किंवा दु:खी असेच भाव दर्शविणारे आहेत. अर्थात ह्या भावना, आपल्या संस्कृतीचा स्थायीभाव असल्याने, या भावनांचे प्रतिबिंब, कलेवर पडणे साहजिक आहे. या समजाला छेद देणारे काही राग आहेत, त्यात हंसध्वनी रागाचा समावेश होतो. एकूणच या रागाची ठेवण, आनंदी, उत्फुल्ल अशी आहे. खरेतर हा राग, कर्नाटकी संगीतातून उत्तर भारतीय संगीतात "आयात" केला गेला आहे पण, आता तो इतका चपखल बसला आहे की,अशी ओळख दिली नाही तर दुसरी बाजू ओळखणे अशक्य!!
    कितीही झाले तरी कर्नाटकी संगीत हे देखील भारतीय संगीत(च) आहे. फरक आहे तो स्वर लावण्यात, सादरीकरणात. अन्यथा स्वर तेच असतात. हंसध्वनी, कलावती सारखे राग उत्तर भारतीय संगीताने आपलेसे केले तर तिलक कामोद राग कर्नाटकी संगीतात मानाने स्थिरावला. हंसध्वनी राग, हा जसा कर्नाटकी संगीतात आहे, तसाच अगदी उचलून, उत्तर भारतीय संगीतात आणला. अर्थात मांडणी वेगळी झाल्याने सत्कृतदर्शनी, हा राग उत्तर भारतीय संगीतातलाच वाटतो. दोन्ही प्रकारात, या रागात, "मध्यम" आणि "धैवत" स्वर वर्ज्य आहेत आणि "पंचम"/"षडज" हे वादी - संवादी स्वर राहिले आहेत. "हंसध्वनी" हे नाव तसे संस्कृत भाषेच्या जवळ जाणारे असल्याने, आणि त्या अनुषंगाने विचार केल्यास, हा रागाचा अगदी प्राचीन ग्रंथांतून देखील उल्लेख आढळतो. तशी या रागाची प्रकृती "अटकर" बांध्याची आहे, एखादी सुडौल तरुणी किंचित नखरेलपणा दाखवीत राजमार्गावरून हिंडावी त्याप्रमाणे या रागाचे थोडे स्वरूप आहे. षडज, पंचम स्वरांचे प्राबल्य असले तरी जेंव्हा निषाद स्वरावर "ठेहराव" होतो, तिथे या रागाची खरी खुमारी जाणवते. आणखी थोडे शास्त्रोक्त लिहायचे झाल्यास, या रागातील "निषाद" स्वर हा चतु:श्रुतिक असल्याने, आरोह संपताना, हा निषाद अगदी वेगळा लागतो. अर्थात, श्रुती आणि स्वरांतर्गत श्रुतीव्यवस्था, हा विषय किचकट आणि प्रचंड मतभिन्नता असल्याने, इथेच थांबतो.
    या रागात, उस्ताद अमीर खान साहेबांनी "जय माते" ही चीज गायलेली आहे. चीजेची सुरवात त्यांनी मध्य लयीत केली आहे. खरेतर पूर्वी, राग हा मध्य लयीत(च) सुरवात करून गात असत.
    वास्तविक पाहता उस्ताद अमीर खान साहेबांची शैली आणि या रागाचा स्वभाव, हे समीकरण काही जुळणारे नव्हे पण तरीही या रागातील गंभीर भाव शोधून काढून, "जय माते" सारखी बंदिश सादर केली आहे. या गायकाची शैली हे बहुतांशी "मंद्र" सप्तकात किंवा "शुद्ध स्वरी" सप्तकात फिरणारी. आवाज अति खर्जातील असल्याने, आणि ठाय लयीत गाणे सादर करण्याची प्रवृत्ती असल्याने, बरेचवेळा या गायकावर टीका देखील झाली आहे परंतु रागाचे शुद्धत्व, स्वरांचे लगाव आणि "राग" सादर करण्याकडे ओढा असल्याने, आजही यांची गायकी अजोड मानली जाते.
    ही बंदिश ऐकताना देखील आपल्याला हेच मिळेल. लय अगदी संथ, त्यामुळे आपण प्रत्येक स्वराचा नुसता आनंदच नव्हे तर प्रत्येक स्वर "न्याहाळू" शकतो. प्रत्येक स्वराला विस्तार करण्याची संधी, हा गायक देतो आणि असे फक्त ठाय लयीतच शक्य असते. इथे प्रत्येक तान, बोलतान, आणि हरकत ऐकण्यासारखी आहे. तान घेतली जाते पण लयीशी अचूक गणित जुळवून!! वेगळ्या शब्दात, इथे "तान" या अलंकाराला वेगळे अस्तित्व नसून स्वरसमुच्चाय बांधून, त्याला अनुलक्षून तान घेतली जाते. तसेच सरगम देखील या विचाराने घेतली आहे. रागसंगीतात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारा हा गायक आहे.
    एम.एस. सुब्बलक्ष्मी हे नाव तसे भारतीयांना अपरिचित असू नये. "वातापी गणपती भजेहम" ही रचना , तशी त्यांच्या उतरत्या वयाच्या काळात गायलेली आहे पण तरीही स्वरावरील पकड तसेच लयीवरील ताबा विलक्षण म्हणायला हवा. कर्नाटकी संगीतात, बहुतांशी रचना या मध्य लयीत सुरु करतात, याउलट उत्तर भारतीय संगीतात सुरवातीला "आलापी" साठी भरपूर अवसर असतो. अर्थात या दोन्ही शैलीत आणि सादरीकरणात भरपूर फरक आहे. साधारणपणे, सामवेदातील ऋचा पठनातून या शैलीचा उगम झाला असे म्हटले जाते आणि वीणा वादनातून रचनांची निर्मिती झाल्याचे मानले जाते. याचा परिणाम असा झाला, कर्नाटकी संगीतात, रचना सादर करताना, साथीला म्हणून, "वीणा","बांसरी"."व्हायोलीन" तसेच "घटम","खंजीरा", "मृदुंगम" इत्यादी तालवाद्ये वापरली जातात. या सगळ्याचा परिपोष प्रस्तुत रचनेत आपल्याला मिळतो.
    मी मुद्दामून, "वातापी गणपती भजेहम" हीच रचना निवडली आहे कारण, याच रचनेचा आधार घेऊन, पुढे अनेक रचना तयार झालेल्या दिसून येतील. तसे बघायला गेल्यास, documentation या दृष्टीने, पंडित शारंगदेव यांच्या लेखणीतून उतरलेला "संगीत रत्नाकर" या ग्रंथात कर्नाटकी संगीताची पाळेमुळे वाचायला मिळतात. अर्थात त्या बाबत आणखी इथे लिहिणे थोडे अप्रस्तुत ठरेल.
    प्रस्तुत गाणे म्हणजे या रागाचे लक्षण गीत असे म्हणता येईल. "जा तोसे नही बोलू कन्हैय्या" ही लताबाई आणि मन्ना डे यांनी गायलेले युगुलगीत म्हणजे रागदारी संगीत, सुगम संगीतात कसे वापरावे, याचा सुंदर वस्तुपाठ आहे.
    "जा तोसे नहीं बोलू कन्हैय्या,
    राह चलत पकडे मोरी बैय्या".
    तीन तालात सुरु होणारी ही रचना, खरे तर एक नृत्यगीत आहे पण तरीही ऐकताना, नृत्याचे बोल आणि सरगम, याचा फारच बहारीने उपयोग करून घेतलेला आहे. लताबाई काय किंवा मन्ना डे काय, दोघेही गायक, शास्त्रीय संगीताची आवश्यक तितकी तालीम घेऊनच या सुगम संगीताच्या क्षेत्रात आले. सुगम संगीतात, गायकी किती दाखवायची आणि कशाप्रकारे रंजकतेने मांडायची, यासाठी हे गाणे नक्की अभ्यासपूर्ण आहे. गाण्यात, दीर्घ ताना आहेत, वक्र गतीच्या हरकती आहेत पण हे सगळे, गाण्यात अलंकार म्हणून न वावरता, त्या गाण्याला पूरक असे यांचे अस्तित्व आहे.
    युगुलगीत हे नेहमी एकमेकांच्या गायकीला "पूरक" असे असते, निदान असावे. त्यादृष्टीने बघायला गेल्यास, या गाण्यात, दोन्ही गायकांनी ज्या प्रकारे, ताना किंवा हरकती घेतल्या आहेत, त्या खास ऐकण्यासारख्या आहेत. कधीकधी तर, संपूर्ण तान न घेता, मध्येच तान खंडित करून, रचनेतील ताण वाढवीत, सुंदररीत्या मांडणी केली आहे. इथेच तुमच्या गायकीचा खरा "कस" लागतो. तान घेताना, तुम्हाला एक सांगीतिक "अवकाश" मिळालेला असतो परंतु अशा काही प्रसंगी, तो अवकाश मध्येच खंडित करून, क्षणात दुसऱ्या गायकाने नवीनच हरकतीची निर्मिती करून ऐकणाऱ्याला स्तिमित करायचे, हा खेळ फारच बहारीचा झाला आहे.
    "राम कहिये गोविंद कही,
    करम की गती न्यारी संतो।
    बडे बडे नयन दिये मिरगन को
    बन बन फिरत उधारी".
    "करम की गती न्यारी" कविता म्हणून फारच सुंदर आहे. याच्या सुरवातीला, पारंपारिक भजनी ठेक्यात, "राम कहिये, गोविंद कहिये" या ओळी ऐकायला मिळतात पण, त्या ओळी हंसध्वनी रागाशी नाते सांगत नाहीत. लगेच लताबाईंची अप्रतिम आलापी ऐकायला येते आणि पाठोपाठ ही रचना सुरु होते. सुरवात तर पारंपारिक केरवा तालात होते परंतु पहिल्या अंतरा जिथे संपतो तिथे हाच ताल "दुगणित" जातो आणि लय देखील वाढते.
    तसे बारकाईने पाहिले तर, ही रचना काही वेळा रागाची बंधने सोडून वेगळी होते, जे सुगम संगीताच्या संस्कृतीस सुसंगत आहे म्हणा. एकुणात ही रचना, हंसध्वनी रागाशी नाते सांगते असे म्हणता येईल. अर्थात, संगीतकाराच्या शैलीनुसार (संगीतकार हृदयनाथ मंगेशकर) गाण्यात नेहमी प्रमाणे अनेक, गुंतागुंतीचे सांगीतिक वाक्यांश आहेत, जेणेकरून, रचना हळूहळू अवघड बनत जाते. परंतु तालाच्या मात्रा आणि त्यानुरून येणाऱ्या हरकती, फारच विलोभनीय आहेत.
    मराठी चित्रपटातील एक अजरामर गाणे - "आली हासत पहिली रात".
    "आली हासत पहिली रात
    उधळत प्राणांची फुलवात".
    गाण्याची चाल बघायला गेल्यास, त्यात फारशा गुंतागुंतीच्या ताना नाहीत, अपवाद गाण्याच्या सुरवातीचा असामान्य आलाप. असला अवघड आलाप केवळ लताबाईच घेऊ शकतात. तो आलाप संपतो आणि गाणे अतिशय द्रुत लयीत सुरु होते आणि गाण्याची गंमत सुरु होते. सुरवातीला, मी हंसध्वनी रागाचा "स्वभाव" आनंदी, उत्फुल्ल असा केला आहे आणि हे गाणे त्या वर्णनाला पूरक असे आहे. तसे बघितले तर गाण्याची चाल फार गुंतागुंतीची नाही पण गाण्यातच अतिशय सुंदर असा गोडवा आहे जेणेकरून ऐकणारा गाण्यात गुंगून जातो.
    आशा भोसल्यांनी काही नाट्यगीते गायली आहेत आणि ती रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून बसली आहेत. "झाले युवती मन दारुण रण" ही गाणे तर अतिशय लोकप्रिय झाले आहे. आशाबाईंच्या वडिलांनी लोकप्रिय केलेली चाल ही हंसध्वनी रागाशी साद्धर्म्य दाखवते. अगदी त्याच धाटणीवर आशाबाईंनी हे गाणे गायले आहे. मुळातला अति गोड राग आणि त्यात आशाबाई गायला!! आशाबाईंचा धारदार आवाज या गाण्यात अतिशय खुलून आहे, तसेच त्यात घेतलेल्या चक्राकार ताना देखील सुंदर आहेत आणि त्यांच्या गायकीची परिक्रमा वाढवणाऱ्या आहेत.
    "शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती,
    देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती".
    कवियत्री शांताबाई शेळक्यांच्या सहज, ओघवत्या आणि प्रासादिक शैलीत लिहिले गेलेले हे गाणे परत एकदा हंसध्वनी रागाची खेळकर प्रकृती दाखवणारे आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी तशी एकुणातच फार कमी गाणी गायली आहेत आणि त्यातील हे एक लक्षणीय गीत. चाल संगीतकार आनंदघन (लता मंगेशकर) यांनी बांधली असून, चाल गीतातील आशयाशी सुसंगत आहे. अतिशय द्रुत लयीत गाणे आहे आणि त्याला घोड्याच्या टापांचा ताल दिलेला आहे जो बऱ्याच चित्रपट गीतांतून वापरलेला आपल्या आढळून येईल.
    भारतीय रागसंगीतात सर्वसाधारणपणे भक्तीभाव, समर्पण वृत्ती किंवा मुग्ध, संयत असा शृंगार अथवा विरहाची भावना, याचा भावनांचा परिपोष आढळतो परंतु अशा वेळी "हंसध्वनी" सारख्या आनंदी, उत्फुल्ल अशा रागाचे वेगळेपण लगेच वेगळे अस्तित्व जाणवते आणि हेच या रागाचे खरे वैशिष्ट्य होऊन बसते.
    - अनिल गोविलकर

  • व्हॉईस गुरु- दिपक वेलणकर

    ‘वृत्तनिवेदक – दिपक वेलणकर” असं ऐकताक्षणीच डोळ्यासमोर येतं एक भारदस्त व्यक्तीमत्वं ज्यांना आवाजाची अनमोल देणगी आहे, ज्यात अनोखेपण लपलंय.

  • सरकार आणि त्यांचे अधिकारीच खरे गांधीवादी…

    खरा गांधीवाद सरकारलाच समजलाय का ?

  • विश्वची विश्व पहा जगती अन धावती

    बी रुजते, वाढते, त्याचे रोपटे होते, रोपट्याचा वटवृक्ष होतो. बी ला माहिती नसते तिच्या आत दडलेल्या वटवृक्षाच्या अस्तित्वाची. तिची सृष्टी वेगळी असते. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीवाची सृष्टी वेगळी, त्याची रचना वेगळी. मानवी विश्वात प्रत्येक माणुस स्वत:ची वेगळी सृष्टी बाळगुन असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला. त्याची दु:खे, त्याचे सुख याचे कारण आणि निराकारण तोच करू शकतो. जसा अवकाशाच्या सृष्टीला अंत नाही, तव्दतच मानवाच्या आत दडलेल्या सृष्टीला देखील अंत नाही. ती अनादी आहे, अनंत आहे. मानसिक पातळीवर तेथे ही अनेक उलथापालथी होत असतात, बदल घडत असतात, हे शतक धावपळीचे आहे, स्पर्धेचे आहे. स्पर्धा जशी स्वत:शी आहे, तशीच इतरांशी देखील आहे. स्पर्धेच्या या जगतामध्ये प्रत्येक सजीव आपापली सृष्टी सांभाळून आहे, हे विशेष…

    घराच्या अंगणात खेळणाऱ्या बाल गोपाळांना पाहून त्यांच्या भावविश्वाची कल्पना मनाला स्पर्शुन गेली. बालपण म्हणजे निरागस, निरलता आणि निर्लेप मनाचे विश्व. सगळ्यांकडे एकाच नजरेने बघण्याची दृष्टी. कोणाची जात माहिती नाही, त्याचा वर्ण महत्वाचा नाही. बालपणाचे हे भावविश्व साधे-सरळ आणि सोपे. क्षणात रागवायचे, क्षणात हसायचे. ना राजकारण माहित, ना कुणाला खाली खेचण्याची स्पर्धा माहिती. खेळणारे सर्वच जिंकतात, सर्वच हरतात. खेळात जो राजा असतो, पुढच्या क्षणाला तोच चोर बनुन खेळतो देखील. बालमनाच्या विश्वात अनंत प्रश्न जन्म घेतात, अन विरुनही जातात...

    इमारतीच बांधकाम सुरू होत. बाजुलाच रखवालदाराची झोपडी होती. त्याची चिल्ले-पिल्ले बांधकामाच्या ठिकाणी टाकलेल्या वाळूवर खेळतात, बागडतात, त्यांना खेळण्यांची गरज लागत नाही. रखवालदार इमाने इतबारे बांधकामावर पाणी मारत असतो. त्याची बायको चुल पेटवुन काहीतरी शिजवत असते. रखवालदाराच्या भावसृष्टीत ‘दिवस भर काम तरच रात्री भाकर’ असेच येत असेल ना? मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता त्याला सतावत नसेल का? चांगले घर असावे असे स्वप्न तो पाहत नसेल का? की त्याच्या जगण्या प्रमाणेच त्याची सृष्टी देखील उजाड झालेली असेल. स्वत:ची स्वप्ने तुडवत, परिस्थितीशी समझोता करत जगण्याची लक्तरे पांघरत, श्वासांचे येणे-जाणे सुरू असेल…

    घरात भाड्यांचा आवाज मोठ्याने यायला लागला की समजायचे मालकीणीचे काहीतरी बिनसले आहे. तिच जग जिथे बहरते, सजते आणि खुलते ते म्हणजे स्वयंपाकघर. याठिकाणी ती स्वत:शी संवाद साधत असते. बोलत असते. घरातल्या सदस्यांच्या आवडी-निवडी राखत स्वत:ची आवड बाजुला सारत असते. तिचे विश्व म्हणजे तिचं घर, तिची मुले अन तिचा पती. या सगळ्यांच्या सुखातच तिचं सुख. तिच स्वत:च अस काय असत. मनातून मात्र तिलाही वाटत असत पहाटे उशीरा पर्यंत ताणून द्यावी. कुणीतरी चहा आणुन द्यावा. एखादा दिवस कामातून सुटी मिळावी. मनातलं सगळं ऐकुन घेणारं कुणीतरी हक्काच असावं. दिवसभर राबराब राबणाऱ्या शरीराला अन मनाला सुखाचे दोन शब्द बोलणारा कुणीतरी आपला असावा. तिच्या अंतरंगातलं तिचं विश्व बाजुला सारून ती जगत असते इतरांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी…

    जगण्याच्या रहाट गाड्यात धावतांना अनेक विश्व आपल्या अवती-भोवती फिरत असतात. जो-तो आपल्याच विश्वात मग्न आहे. कुणाला घराची चिंता, कुणाला मुलांची, कुणाला भविष्याची, कुणाला देशाची, कुणाला राजकारणाची.. कुणाला प्रमोशनची… चिंतेचा पसारा जसा वाढत जातो तशी व्यक्तीच्या भावविश्वाची व्याप्तीही वाढत जाते. व्यक्तीपरत्वे विश्व निर्माण होत, बहरत आणि उलगडत जात. या विश्वाच पुढे काय होत… हा प्रश्न छळायला लागतो…

    महाभारतामध्ये अर्जुनाला गीता सांगतांना श्रीकृष्णाने म्हटलेच आहे, ‘या विश्वाचा निर्माता मीच आहे आणि संहार करणाराही मीच आहे. अवकाशात असलेल्या अनेक विश्वांची निर्मिती माझ्या पासुनच होते, आणि माझ्यातच ते विलीन होतात. जन्माला आलेला प्रत्येक सजीव त्याची – त्याची सृष्टी घेऊन जगतो, त्याचे विश्व तयार करतो, रंगवतो. ते विश्व घेऊनच तो माझ्यात विलीन होतो…’

    दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

  • निर्माता, वितरक विश्वास सरपोतदार

    प्रथम त्यांनी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपटांचे खेळ (मॉर्निंग शो) लावायला सुरुवात केली. नंतर पुण्यातील दैनिकांत चित्रपटाच्या जाहिराती देण्यासाठी स्वतःची जाहिरात संस्था सुरु केली. त्याचबरोबर ‘अजय फिल्म डिस्ट्रिब्युटर’ ही वितरण संस्था काढून मराठी चित्रपटांचे वितरण सुरु केले.

  • मातृभूमीशी ‘गद्दारी’!

    आज आपल्या देशाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, त्यावर जालीम उपाय शोधून वेळीच ठेचून टाकावयास हवी, नाहीतर त्याची लागण सर्वत्र होऊन देश पोखरला जाईल !

  • एक भिजरी आठवण

    पाऊस हा साहित्याच्याही सुगीचाचं दिवस असतो…असचं पावसाचं सुचलेलं वाचकांसाठी…

  • वाईचा ढोल्या गणपती

    सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तिरावर वसलेले वाई, जसे ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध आहे

  • बांधूनी साताजन्माच्या गाठी…

    वाढत्या महागाईमुळे प्रपंच चालवणे हीच तारेवरची कसरत बनल्याने घरात लग्नकार्य निघताच खर्चाचा मोठा आकडा परिस्थिती आणखी बिकट करतो. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल प्रतिष्ठान’ तर्फे राबवण्यात येणार्‍या सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्त्व नेमकेपणाने अधोरेखित होते. केवळ सामाजिक जाणिवेपोटी चालणारा हा आनंदसोहळा अनेकांच्या जीवनात प्रकाश फुलवत आहे. या निमित्ताने…

  • कोकण

    कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते.चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो.माती लाल,रस्ते लाल,पाणदी लाल, चिर्याची घरे लाल,  कौले  सुद्धा लाल,झाडांची पाने आपला मुळचा रंग दडवून   लाल झालेली असतात.