(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • स्वर्गत – तळकोकणातली सोयरिक

    तळकोकणात सोयरिक जुळवणे या प्रक्रीयेला स्वर्गत म्हणतात....

    आता याचा स्वर्गाशी काय संबंध तो मात्र माहित नाही... आणी ते पवित्र कार्य, खुप पुण्य वगैरे मिळते म्हणून तसेच मोठेपणाचा सोपा मार्ग म्हणून... या प्रक्रियेत लोक हिरहिरीने भाग घेतात.... पण या अतिऊत्साही मध्यस्थ्यामुळे काहीवेळा मजेदार प्रसंग ऊद्भवतात.....

    त्यातलाच एक तुम्हाला सांगतो....

    काही दिवसापुर्वी आमच्या सौ.व दोन्ही मुलांसोबत सासुरवाडीला जाण्याचा बेत ठरला.... ऐनवेळी काजूच्या बागेतुन यायला ऊशिर झाला... मग घाईत बागेतुन आलो तसाच हाप पँट आणी टिशर्टवर गाडीत ड्रायव्हींगला बसलो....

    वाटेत सौंच्या मैत्रीणीचे दुकान... शकूंतलाचे...10 वर्षापूर्वी तिच लग्न झालय अशी सौनी माहीती दिली.

    मैत्रीणीचे दुकान म्हणजे खरेदी अपरिहार्य... पण सुदैवाने ती मला ऒळखत नव्हती... खाउची खरेदी झाल्यावर... तिला गाडीत कुणी ऒळखीचे वाटले... बघितले तर मैत्रीण.... मग मुलाला आणखी एखादा पुडा दिला बहुधा.. आणी आणखी गिऱ्हाईक नसल्यामुळे गाडीजवळ आली.... व ईकडच्या तिकड़च्या गप्पा सुरू झाल्या... मध्येच ती सौं ना बोल्ली,

    "बघ गो कोन पोरग्या आसा तर भावाक... "

    ही खास ताकाला येऊन भांड लपवण्याची मालवणी स्टाईल....

    मी मध्येत तोंड घातले....

    "वो ताई माका पोरग्या बघा खय आसा तर"

    तीचे डोळे अचानक चमकले बहुदा कुणीतरी मुलगी असावी पाहुण्यात....

    तिने पटकन विचारले मैत्रीणीला....
    "गो वय काय हेंचा? काय करतात? तुमच्याकडेच ड्रायव्हर आसत मा?

    आणि आमच्यातलेच......... /जातितले/........ मा?

    आसा एक पोरग्या पण अपेक्षा काय?

    एव्हाना "गाडी" गरम होउ लागली होती.... मला अंदाज आला पण ईलाज नव्हता .. ऊत्तर दिल्याशिवाय गाडी पुढे नेता येत नव्हती...

    शेवटी सौनि ऊत्तर दिले...

    " अपेक्षा काय नाय..... फक्त एक समोर आसा ती बायको.... आणि दोन पोरा संभाळुक व्हयी"

    मी काहीही न बोलता गाडी चालू केली.... आणि शकुंतला वेड्यासारखी माझ्याकडे व सौकडे आलटुन पालटुन बघत होती

    बापूर्झा.
    डॉ. बापू भोगटे

  • सट्टाबाजार आणि सामान्य मनुष्याचे होणारे हाल

    आपल्या लाडक्या सरकारने म्हणजे आम आदमीचा विचार करणारे सरकार,

  • रांगोळी

    rangoli-01

  • पंगत सोलापुरची

    पिकतं तिथं विकत नाही ,अशी एक म्हण आहे.
    पण सोलापुरात ती खोटी ठरते..
    इथे जे पिकतं ,तेच विकतं...
    कमी पाऊस आणि काळी माती असणार्या सोलापूर परिसरातील ज्वारी ,बाजरी,तूर,हरभरा,भुईमूग
    ही प्रमुख पिके...
    त्यामुळे "ज्वारीची भाकरी " हा सोलापुरी जेवणातील मुख्य पदार्थ..
    सोलापुरातील पंचतारांकित हॉटेला पासून ते साध्याशा धाब्यावर मिळणारा नि
    श्रीमंत आणि गरीब घरातही खाल्ला जाणारा!
    दुपारी बाराच्या सुमारास सोलापुरातल्या कोणत्याही घरात "ठक् ठक् " असा आवाज ऐकू येतोच
    तो भाकरी बडवण्याचा असतो..
    हो..इथे भाकरी थापत नाहीत ...बडवतात..
    ज्वारीच्या पिठाचा गोळा भरपूर मळून ,पोळपाटावरील भरपूर ज्वारीच्या पिठावर ठेऊन दोन्ही हातांनी एका लयीत नि बांगड्याच्या सुरात बाई भाकरी बडवू लागली की पाहणार्याचीही समाधी लागते..
    दोन मिनिटात भाकरी थापून तयार होते नि तव्यावर पडते..
    तव्यावर पाणी पिऊन ती अशी टम्म फुगते की तिच्यावरून नजर हटत नाही..
    एकही काळा डाग न पडू देता छान भाजलेली पांढरीशुभ्र भाकरी करणं हे अतिशय कौशल्याचं काम...
    ही भाकरी एवढी पातळ असते की नवीन माणूस ही पोळी आहे की भाकरी या संभ्रमात पडावा...
    अशी भाकरी बनवायला अंगीभूत कौशल्य नि सराव लागतोच..
    म्हणूनच सोलापुरात लग्नासाठी मुलगी पसंत करताना रूप,रंग ,पैसा यांपेक्षा मुलीला चांगली भाकरी करता येते की नाही, हे पाहिलं जातं..
    चुलीवर भाकरी करता येत असेल तर तिला शंभर गुण मिळतात..
    कारण चुलीवरची भाकरी म्हणजे
    अतीव कौशल्याचं नि संयमाचं काम!
    अंगच्या गोड सोलापुरी ज्वारीला चुलीचा खरपूस स्वाद मिळाला की फक्त "अहाहा "...
    या भाकरीच्या चवीत जितका करणारीचा हातगुण असतो तितकाच इथल्या ज्वारीचाही असतो.
    कदाचित कमी पावसामुळे इथल्या ज्वारीची चव,गोडी टिकत असावी..
    लग्नापूर्वी भाकरीला नाक मुरडणारी मी लग्न करून सोलापुरात आल्यापासून भाकरीशिवाय राहू शकत नाही...
    " कडक भाकरी " हे सोलापुरचं खास वैशिष्ट्य..
    अतिशय पातळ थापलेली भाकरी तव्यावर भाजून चुलीच्या धगीपाशी उभी करून ठेवली जाते..
    ती थोड्याच वेळात कडक होते..
    मीठ,तीळ ,हळद घालून केलेली बाजरीची कडक भाकरी पापडासारखी चविष्ट नि खुसखुशीत लागते..
    अनेक दिवस टिकणारी कडक भाकरी प्रवासासाठीही उत्तम..
    लग्न झाल्यानंतर चार दिवसात आम्ही एका धाब्यावर जेवायला गेलो होतो .
    तिथे कोपर्यात अनेक पोती उभी करून ठेवलेली होती..
    ती भाकर्यांनी भरलेली होती...
    हॉटेलातल्या शिळ्या भाकर्या ( भाकरीचं अनेकवचन भाकरीच होतं पण सोलापुरसाठी ते भाकर्याच असत..विषय संपला )
    अशा का पोत्यात भरून ठेवल्यात?
    उत्सुकता गप्प बसू देईना..
    शेवटी वेटरकाकांना विचारलच ...
    आणि तिथे "कडक भाकरी" शी पहिली ओळख झाली.
    "कडक चहा","कडक लक्ष्मी ","कडक शिक्षक" " कडक उपास" ...यांच्या पंगतीत आता "कडक भाकरी " ही बसली..
    प्रामुख्याने मटन किंवा चिकन रस्स्यांत चुरा करून खाल्ली जाणारी ही कडक भाकरी आमटी किंवा वांग्याच्या आणि शेंगाभाजीच्या रश्श्यात कुस्करून खायलाही छान लागते....
    धपाटा ...हा भाकरीचा खमंग चुलत भाऊ...
    ज्वारीच्या पिठात थोडी कणिक,थोडं बेसन (कणिक ,बेसन ऑप्शनल बरंका),ओवा,तीळ, जिरे,हळद,मीठ,लसणाची पेस्ट , भरपूर कोथिंबीर घातली ,पाणी घालून भाकरीच्या पिठासारखा गोळा केला ,लहान गोळा घेऊन ओल्या कापडावर अगदी पातळ थापला आणि तव्यावर टाकला,त्यावर तेल पडलं की असा काही खमंग सुवास आसमंतात दरवळतो की तुम्ही ताटली घेऊन बसायलाच पाहिजे...
    धपाटे भाजून झाले की त्याच तापलेल्या तव्यावरून "चुर्र....." असा आवाज येतो , दणदणीत खाट नाकात शिरतो नि तुम्ही खोकू लागता..
    हा ठसका असतो तव्यावर जन्माला येऊ पाहणार्या ठेच्याचा..
    भाकरीच्या किंवा धपाट्याच्याच तव्यावर तेल ,जिरं ,भरपूर लसूण नि हिरव्या मिरच्या परतल्या जातात, त्यात खडेमीठ,शेंगदाणे पडतात नि खरपूस भाजल्यावर त्याच तव्यात वाटीने या सगळ्या गोतावळ्याला खरडलं जातं...आणि ठेसा(शब्द सोलापुरी) जन्माला येतो.
    एका ताटलीत गरम-गरम धपाटा किंवा ज्वारी/बाजरीची पातळ भाकरी,ठेचा,घट्ट दही घ्यायचा नि मारायचा ताव...
    काहीतरी राहिलय वाटतय नं...
    हो, श्येंगा चटणी...हा तर सोलापुरी जेवणाचा आत्मा..
    लालभडक ,मुद्दाचटणीशिवाय नाष्टा काय,जेवण काय पूर्ण होतच नाही ...
    गावरान सोलापुरी शेंगदाणे अतिशय गोड नि चविष्ट.
    हे शेंगदाणे खरपूस भाजून,साले काढून घ्यायचे. उखळात किंवा खलात जिरं ,मीठ , हिंग,लाल तिखट घालायचं.( लसूण, चिंच पाहिजे असल्यास) कुटायचं नि मग शेंगादाणे घालून मुद्दा होईपर्यंत कुटायचं..
    ही चटणी किलोवर करावी लागते बरंका...
    सोलापुरमधे घरात एखादेवेळी फर्निचर नसलं तरी चालतं पण श्येंगाचटणी मात्रं घरात नसेल तर पाप लागतं..
    ही शेंगाचटणी भाकरी/पोळी,धपाटा,पुरी,बटाटेवडा,उत्तप्पा,डोसा अगदी पिझा,बर्गरसोबतही चालते..
    सोलापुरातलं लहान मूल बालवाडीत जातं ते भाकरी चटणीचा डबा घेऊन नि हॉस्पिटलात ऐडमिट केलेल्या आजोबांनाही शेंगाचटणी भाकरीचे चार घास खाल्ल्याशिवाय आराम पडत नाही.
    आता तुम्ही म्हणाल सोलापुरकर भाज्या खातात की नाहीत की फक्त चटणी भाकरीच?
    खातात हो खातात..
    पण कोणती खातात हे तुम्हाला ओळखूच येणार नाही .
    भरपूर शेंगाकूट आणि काळा मसाला यात लपलेली भाजी कोणती आहे ,हे कसं बरं ओळखणार?
    कळस म्हणजे इथे फक्त शेंगाची भाजी असते..म्हणजे शेंगाकूट,मसाला,तेल आणि मीठ यांचा बनवलेला रस्सा..छान लागतो बरं का ...!!
    पण इथली वांग्याची भाजी खास...!!
    नुकतीच शेतातून काढलेली ताजी -ताजी छोटी ,जांभळी,काटेरी वांगी पाहिली की कधी एकदा भाजी करून रिचवतोय ,असं होऊन जातं.
    शेंगादाणे,भरपूर कोथिंबीर,लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची.
    त्यात मीठ,काळा मसाला,लवंगाचीपूड घालायची नि हे मिश्रण छोट्या वांग्यात भरायचं..
    जरासं जास्त तेल घालून तेलावर ही भरली वांगी शिजवून घ्यायची..
    नुसती खायलाही अप्रतीम लागतात..
    रस्सा हवा असेल तर यातच पाणी घालून शिजवायचं ...
    कोवळ्या ताज्या पालेभाज्या हे सोलापुरच्या बाजाराचं वैशिष्ट्य..
    मेथी,पालक,अंबाडी,करडी,चुका,राजगिरा,तांदुळसा, कांदापात,हरबर्याची भाजी या पालेभाज्यांनी बाजार हिरवागार झालेला असतो..
    "पेंडपाला" सोलापुरकरांचा आवडता..
    कोणत्याही कोवळ्या पालेभाजीत तूर,मूग किंवा मसुराची भिजवलेली डाळ नि लसूण ,मिरची आणि शेंगाकूट घालून केलेली कोरडी भाजी म्हणजे पेंडपाला..
    अतिशय चविष्ट नि पौष्टिक!!
    पालक,चुका,मेथी शिजवून त्यात तुरीचं वरण नि लसणाची फोडणी दिली की "गरगट्टा " तयार होतो..
    याच गरगट्ट्यात जास्तीचं वांगी,घेवडा,गाजर,ओला हरबरा,
    पेरू,बोरं,हरबर्याची भाजी,सगळ्या डाळी हे सगळं घातलं की तयार होते
    ती संक्रातीच्या भोगीची " भज्जी "
    भाज्या तर भारीच असताना पण सोलापुरकरांना जास्त आवडतं ते
    " बेसन ".
    पिठल्याला सोलापुरात बेसन म्हणतात..
    ओवा,हिरवी मिरची ,जिरं,मोहरी,कढीलिंब घालून केलेलं पातळ नाही पण कोरडंही नाही ,असं पिठलं..
    सोलापुरी जेवणात भात असतो ...
    पण त्याचं स्थान दुय्यम...
    बरं तो आंबेमोहर,बासमती,इंद्रायणी पाहिजे असली नाटकं नाहीत..
    भात दमळदार नि मोकळा असणं पुरेसं असतं..
    भाताशी खायला डाळ लागते..
    तूरडाळ
    टोमॅटो,हिरवी मिरची,लसूण ,जिरं आणि मीठ एवढ्याच भांडवलावर केलेली डाळ अप्रतीम लागते..
    पण मला इथली तेलगु पद्धतीची भरपूर चिंच घातलेली आंबट आमटी जास्त आवडते..
    आणि इथे ती वाटीतून न देता पाणी पिण्याच्या फुलपात्रातून दिली जाते..
    मज्जा म्हणजे हिला तेलगुत "पप्पू " म्हणतात.
    गरम-गरम भात आणि पप्पू खाणं ही भातप्रेमींसाठी मेजवानी असते...
    असाच नोव्हेंबर,डिसेंबर,जानेवारीसारखा थंडीचा एखादा महिना असावा...
    नेहमीच्या उकाड्यापासून सोलापुरला काडीमोड मिळालेला असावा.
    गुलाबी थंडीत अख्खं गाव लपेटलेलं असावं...
    शनिवार रविवार धरून पाहुणे यावेत..
    शनिवारी रात्री एखाद्या धाब्यावर जाण्याची टूम निघावी..
    गावाच्या गर्दीपासून दूर पण फार लांब नसलेल्या एखाद्या हॉटेलात
    आकाशाखालील लॉनवरील किंवा मातीवरील खुर्च्यांत स्थानापन्न व्हावं..
    बाळगोपाळांनी हॉटेलातील घसरगुंडी,झोक्याचा आनंद लुटावा..
    मोठ्यांनी राजकारण,समाजकारण,अर्थकारणावर जोरजोराने चर्चा झोडाव्यात..
    एवढ्यात खाकरा, मसाला शेंगदाणे यावेत..त्यासोबतच एखादं शीतपेय
    आणि चाटमसाला शिंपडलेली खेकडा भजी मागवावीत..
    उगाच सूपबिप मागवून सुपाचा अपमान करू नये..
    पोरांना खेळून आणि मोठ्यांना गप्पांमुळे पोटात कावळे ओरडू लागले की जेवण आणायला सांगावं..
    तोपर्यंत आकाशदर्शनात रमून जावं..
    एकावर एक ठेवलेली ताटांची चळत
    वेटरने आणावी..
    तुमचं ताट तुमच्यासमोर यावं.
    त्यात एका वाटीत पिवळंजर्द बेसन, दुसरीत हिरवागार पेंडपाला,तिसरीत लालबुंद मसाला वांगं , चौथीत पांढरंशुभ्र दही आणि पाचव्या वाटीत
    पुन्हा पिवळीजर्द डाळ असावी.
    डावीकडे कांदा,लिंबू ,ठेचा आणि ही भाजी की चटणी असा संभ्रम पडावा असा
    मोठा शेंगाचटणीचा ढीग...
    या पदार्थांच्या सप्तरंगांनी नि सुगंधाने पोटातील जाठररसाला नि लाळग्रंथीना साद घालावी..
    आणि गरमागरम ,पातळ पांढर्याशुभ्र भाकर्या घेऊन वेटरची स्वारी यावी...
    आपल्या पानात भाकरी पडताच दही चटणी नि भाकरीचा पहिला घास पोटात जावा, मग बेसन -भाकरीचा दुसरा , तिसरा वांगं नि भाकरीचा...
    या रसोत्सवात इतकं मश्गुल व्हावं की भोवतालच्या जगाचा विसर पडावा..
    पहिली भाकरी संपल्यावर पुन्हा या जगात यावं नि कुणी बाजरीची भाकरी तर कुणी धपाटा मागवावा..
    भाकर्या नि धपाट्यांची गणती न करता खात जावं...
    आणि आपल्या खाण्याची आपल्याला लाज वाटली की मोर्चा
    भैरवीच्या भाताकडे वळवावा..
    डाळ भाताचा आस्वाद घेऊन शेवटचे दोन घास दहीभातासाठी ठेवावेत..
    " साहेब ,गोड काय आणू ?"
    वेटरने अन्नसमाधीतून जागे करावे ..
    शेंगापोळ्या ,खवापोळी नि हुग्गीची ऑर्डर निघावी..
    पाच मिनिटांत गावरान तुपात थबथबलेल्या शेंगापोळ्या ,खवापोळ्या नि हुग्गीच्या वाट्या याव्यात..
    पोटात भूक नाही असं वाटत असतानाही मऊसूत खवापोळी, खुसखुशीत शेंगापोळी खातच जावी..
    हुग्गीच्या वाट्यांवर वाट्या रिकाम्या व्हाव्यात...
    आपण केवढं जेवतोय असे वाटून खजील व्हावे ,नि जेवणाला पूर्णविराम द्यावा..
    पाहुण्यांचे समाधानी चेहरे नि जेवणाचं कौतुक ऐकून ऊर भरून यावा...
    बिल देऊन निघायला सुरुवात करावी नि उभे राहिल्यावर लक्षात यावे ..
    आपण इतके जेऊनही पोटाला जडपणा, जळजळ काहीच होत नाहीये...
    हेच तर सोलापुरी जेवणाचं वैशिष्ट्य .....!!
    --नीला महाबळ गोडबोले
    --सोलापूर
  • एक हटके Send off Party

    आज रात्री मला वर्षा खेरकडे Sendoff Party ला जायचंय. ती म्हणाली मैत्रि 5Gणींमधे कुणाला बोलवायचं ती योजना तूच कर बाई.

  • अलौकिक अडाणा

    असेच काही द्यावे…. घ्यावे….
    दिला एकदा ताजा मरवा;
    देता घेता त्यात मिसळला
    गंध मनातील त्याहून हिरवा.
    कवियत्री इंदिरा संत यांच्या "मरवा" कवितेतील या ओळी, "अडाणा" राग ऐकताना, बरेचवेळा माझ्या मनात येतात. वास्तविक पाहता, दरबारी रागाच्या कुटुंबातील, हा महत्वाचा सदस्य पण जातकुळी मात्र फार वेगळी आहे. एकाच कुटुंबातील भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्वे असावीत आणि तरीही रक्ताचे नाते असावे, त्यातला हा प्रकार आहे. दरबारी गंभीरतेकडे झुकणारा तर अडाणा थोडा अवखळता दर्शविणारा!! राग अडाणा शक्यतो मध्य आणि तार सप्तकात रमत असल्याने, रागातील भावना देखील काहीशा तीव्र असतात.
    रागाच्या तांत्रिक भागाकडे वळल्यास, आरोही सप्तकात "गंधार" स्वराला प्रवेश नाही तर अवरोही सप्तक, सगळ्या सुरांना सामावून घेते. त्यामुळे रागाची जाती ही "षाडव/संपूर्ण" अशी होते. त्यापुढे बघायचे झाल्यास, "गंधार","धैवत"आणि "रिषभ" स्वर कोमल आहेत आणि बाकीचे सगळे स्वर शुद्ध. असे असले तरी "कोमल निषाद" स्वर या रागात फार महत्वाची भूमिका बजावतो. अर्थात, नेहमीप्रमाणे, "षडज-पंचम" वादी - संवादी असल्याने, कोमल निषाद स्वराचे नाते, या स्वरांबरोबर जुळून येते. रागच समय, रात्रीचा दुसरा प्रहर दिला असल्याने, आपसूक कोमल स्वरांना प्राधान्य मिळणे क्रमप्राप्त होते.
    आता आपण, या रागाची बंदिश ऐकायला घेऊ. "माता कालिका" ही अत्यंत सुप्रसिद्ध चीज म्हणजे, पंडित जसराज यांच्या गायनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे, इतक्या जवळची आहे. ही बंदिश ऐकताना, आपल्याला रागदारी गायन, लालित्यपूर्ण पद्धतीने कसे मांडता येऊ शकते, याचा अप्रतिम अंदाज घेत येतो. किंचित अनुनासिक स्वर, तिन्ही सप्तकात सहज विहार, तारता पल्ला अतिशय विस्तृत असल्याने, ताना, बोल ताना तसेच मुर्घ्नी स्वर, इत्यादी अलंकार सहजपणे गळ्यातून दृष्टीस पडतात. वास्तविक, नेमका मुर्घ्नी स्वर, ही फार कौशल्याची बाब मानली जाते पण, पंडितजी, अतिशय सहजपणे, हा अलंकार गळ्यातून साकार करतात.
    प्रस्तुत रचनेत, या सगळ्या गुणांचा आढळ तर दिसतोच पण, त्यापेक्षा वेगळी बाब म्हणजे शब्दोच्चार. बंदिशीत स्पष्टपणे, काली मातेची पूजा आहे तेंव्हा स्वरांत समर्पण वृत्ती आढळणे, सहज शक्य आहे. भावनेच्या अंगाने सादरीकरण,हे पंडित जसराज यांच्या गायकीचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
    "ऐ दिल मुझे ऐसी जगह" हे "आरझू" चित्रपटातील,अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेले गाणे, म्हटले तर "अडाणा" रागावर आहे. याचे मुख्य कारण, गाण्याची सुरवात, "दरबारी" रागाच्या काठाने होते पण, अस्ताईच्या दुसऱ्या ओळीत आपल्याला "अडाणा" रागाची खूण सापडते. मी वरती म्हटल्याप्रमाणे, दरबारी आणि अडाणा, हे दोन राग एकाच कुटुंबातले पण, वेगळ्या स्वभावाचे. त्यामुळे एखादा सूर जरा वेगळ्या प्रकारे लागला की लगेच रागाची अदलाबदल होते आणि हेच भारतीय रागदारी संगीताचे फार मोठे वैशिष्ट्य मानावेच लागेल. केरवा तालात, ही रचना बांधली आहे. अनिल दा, आपली रचना कधी "आक्रोशी", "अनघड" स्वरुपाची करीत नाहीत परंतु रचना गाताना, त्यातील गायकी अंग आपल्याला दिसून येते. खरतर असे म्हणता येईल, "अनिल दा" म्हणजे हिंदी चित्रपट गीतातील एक असामान्य "स्कूल" होते आणि त्यांच्या रचनेचा प्रभाव, अगदी राहुल देव बर्मन पर्यंत अव्याहतपणे पडलेला होता. शास्त्रीय संगीताचा सांगोपांग व्यासंग आणि चित्रपटासाठी गाणे कसे बांधायचे, याची नेमकी जाण असलेला हा संगीतकार. तलत मेहमूद आणि मुकेश, या गायकांना प्रकाशात आणणारा संगीतकार, म्हणून या रचनाकाराची ओळख दीर्घकाळ स्मरणात राहील.
    "ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहां कोई न हो,
    अपना पराया मेहरबां ना मेहरबां कोई न हो".
    लखनौ सारख्या संगीताने प्रभावित असलेल्या शहरात वावरल्याने, आवाजात खास "लखनवी तहजीब" बाळगून असलेला गायक म्हणजे तलत मेहमूद. तसे बघितले तर तलतच्या आवाजाला काही प्रमाणात मर्यादा होत्या, चित्रपटात अनेक प्रसंग असतात आणि त्यानुरूप गायन करणे, ही गायकाची गरज असते. तलतने आपल्या गळ्याची "जात" ओळखली होती आणि त्यानुरूप गाणी स्वीकारली. परिणाम असा झाला, संख्येच्या दृष्टीने, तलतची गाणी फारच तुरळक झाली.वरील गाणे जे आपण ऐकले, तोच या गायकाचा खरा पिंड!! लखनौच्या संपन्न, शिष्ट,सुसंस्कृत आणि संयमित वातावरणाचा हा अपरिहार्य परिणाम म्हणावा लागेल. थोडक्यात, बेगम अख्तर यांनी गझल गायनात जो आदर्श निर्माण केला, त्याच्या जवळपास फक्त तलत जाऊ शकतात. १९६० नंतर या गायकाची पीछेहाट झाली कारण, नंतरच्या संगीत शैलीत, सुरावट, संथ गती व नाजूक प्रक्षेपणास जागा नव्हती. आपण कुठली गीते गायची त्यांच्या संहितेबाबत ते चोखंदळ होते. अर्थात लखनौचा वारसा म्हटल्यावर, उर्दूचे स्वच्छ, शुद्ध उच्चारण आणि कोणत्या रचनेस गाण्याच्या योग्यतेचे काव्य समजायचे याबाबतची उच्च अभिरुची!! शक्यतो, मंद्र आणि शुद्ध स्वरी सप्तकात, गायनाची पातळी ठेवायची. गाताना, शायरीचे नितांत महत्व जाणून, गायकी दाखवायची तसेच ताना घेताना देखील कधीही आशयाच्या अभिव्यक्तीला धक्का पोहोचणार नाही, हीच वृत्ती ठेवायची. परिणाम असा झाला, गायनात, कधीही संपूर्ण सप्तक आवाक्यात घेतले आहे, असे ऐकायला मिळत नाही. अर्थात, हा मुद्दा सुगम संगीताच्या बाबतीत गैरलागू आहे.
    "मन मोहन मन मे हो तुम्ही" हे "कैसे कहू" चित्रपटातील असेच एक अतिशय सुश्राव्य चालीचे गाणे, या रागाच्या सावलीत वाढते. संगीतकार एस.डी.बर्मन,याच्या चतुरस्त्र प्रतिभेचे आणखी अप्रतिम उदाहरण, म्हणून या गाण्याचा निर्देश करता येईल. गाण्याच्या सुरवातीच्या आलापीपासून, आपल्याला "अडाणा" रागाची ओळख करून घेता येते पण, हा संगीतकार, नेहमीप्रमाणे, रागाच्या आधार स्वरांना हाताशी घेतो आणि पुढील वाटचाल, स्वतंत्र करतो, जणू या संगीतकाराचा हा स्वभाव असावा, असेच वाटते. त्रिताल वापरलेला आहे आणि तो देखील सरळ, स्पष्ट वापरला आहे. रफी/सुमन कल्याणपूर/एस.डी. बातीश, या त्रयींनी हे गाणे गायले आहे. गाणे जरा बारकाईने ऐकले तर आपल्याला सहज समजून घेता येईल, या रागाचे जे वादी/संवादी स्वर आहेत, (षडज/पंचम) ते ज्या वजनाने, या रागात वावरतात, त्याच वजनाने, या रचनेत वावरत आहेत. "मन मोहन मन मे" ही ओळ ऐकताना(च) आपल्याला या रागाची ओळख होते. असे असून देखील, आपण, पुढील अंतरा ऐकला तर, रागाच्या सावलीतून ही रचना बाहेर पडते आणि आपले "स्वतंत्र" अस्तित्व प्रगट करते. अशा खेळात, हा संगीतकार फार वाकबगार होता.
    "मन मोहन मन में हो तुम ही,
    मोरे अंग अंग तुम ही समाये,
    जानो या जानो ना हो तुम ही".
    आवाजाचा पल्ला, भरीवपणा, समान ताकदीची फेक, मर्दानी जोमदारपणा, सुरेल आणि लहान स्वरांशांचे सफाईदार द्रुतगती गायन, हे गुण, रफी यांच्या बाबतीत मांडता येतील. सुरवातीच्या काळात, ढाल्या स्वरात आणि नंतर अवतरलेल्या नाटकी प्रत्ययाशिवाय गायलेली आढळतात. आवाज आणि गायनशैली या बाबतीतल्या, नव्या युगाच्या मागण्या त्यांनी विनासायास पूर्ण केल्या. आपल्या आवाजात "गोलाई" आहे, याची त्यांना यथार्थ जाणीव होती आणि प्रसंगी त्या विशेषाचा त्यांनी वापर केल्याचे आढळून येते. अर्थात इथे एक प्रश्न उपस्थित होतो. प्रचलित म्युझिक व्हिडियोसाठी गायन करणे, त्यांना कितपत भावले असते? खरतर चित्रपटीय आविष्कारांच्या गतीमानतेस लवचिक प्रतिसाद देण्याचे रफी यांचे कौशल्य अतुलनीय होते पण, कलाविचारांत अशा "जर-तर" या बाबींना तसा फारच कमी वाव असतो.
    सुमन कल्याणपूर हे असेच काहीसे दुर्लक्षित गेलेले नाव. सुरेल आवाज, हलका पल्लेदार आणि पारदर्शक आवाज, भडक नसलेले स्वनरंग आणि त्यांच्या छत विपुलतेने ऐकायला मिळतात. परिणाम असा, त्यांच्या गायनातून विस्तीर्ण भावपट धुंडाळता येतो. या गायिकेला रागदारी संगीत अवगत होते, का नव्हते, याची प्रचीती देणाऱ्या रचना फारशा मिळाल्या नाहीत पण, जिथे शक्यता होती, तिथे त्या रचनेनुरुप पडताळा घेता येतो. लताबाईंनी आवाज आणि लगाव, याबाबत जे कौशल्य ज्या प्रकारे आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत दाखवले त्याच्या जवळपास, केवळ हीच गायिका पोहोचू शकली असती, असे ठामपणे मांडता येते. तितकी या गायिकेच्या गळ्याची क्षमता आणि ताकद नक्कीच होती. अर्थात, त्यांना जर का संधी लीलाल्या असत्या, अधिक टिकाऊ चित्रपट मिळाले असते तर लताबाईंच्या कर्तृत्वास पर्यायी केंद्र म्हणून उभी राहण्याची क्षमता, त्यांच्या गायकीत निश्चित आढळत होती पण दुर्दैवाने तसे घडले नाही!!
    हिंदी चित्रपट "अनपढ" मध्ये कितीतरी मधुर, सुश्राव्य गाणी आहेत. त्यातील ""आप कि नजरो ने समझा" हे गाणे आजही संगीतकार मदन मोहन यांच्या सर्वोत्तम रचनांपैकी एक रचना मानली जाते. गाण्याची तर्ज अतिशय अवघड आहे, क्षणात चाल वरच्या स्वरांत जाते तर पुढल्या क्षणी चाल, मंद्र सप्तकात प्रवेश करते. परिणाम असा होतो, गळ्याची परीक्षा सतत घेतली जाते. त्यातून, गाण्यात तालवाद्य म्हणून पारंपारिक वाद्ये नसून, अतिशय खालच्या स्वरांत गिटार वाजत असते आणि त्या वाद्याचा सूर, हीच समेची मात्रा गृहीत धरली आहे. त्यामुळे, गाणे लयीला फार कठीण होऊन बसले.
    "आप कि नजरो ने समझा प्यार के काबिल मुझे,
    दिल कि ऐ धडकन ठेहर जा, मिल गयी मंझील मुझे".
    गाण्यात सुरवातीलाच "अडाणा" रागाचे स्वर ऐकायला मिळतात पण नेहमीप्रमाणे संगीतकार मदन मोहन रागाची "कास" सोडतात आणि चालीला, शब्दानुरूप वेगळे वळण देतात. त्याबाबतीत या संगीतकाराची शैली ही गीतधर्मी आहे. आपण सादर करीत आहोत, तो आविष्कार चित्रपट गीताचा आहे आणि याची वाजवी जाणीव मदन मोहन यांच्या प्रत्येक रचनेत ठळकपणे उठून दिसते.
    प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही, शांताराम यांच्या "झनक झनक पायल बाजे" या चित्रपटाचे शीर्षक गीत याच, अडाणा रागावर आधारलेले आहे. संगीतकार वसंत देसायांनी याची चाल बांधली आहे. वास्तविक, या शब्दांची चीज देखील प्रसिद्ध आहे. परंतु चित्रपटाचे शिषक गीत कसे असावे, याचा हे गाणे म्हणजे उत्तम उदाहरण ठरावे. तीन मिनिटांच्या अवकाशात रागाची सगळी लक्षणे दाखवायची पण रचना म्हणजे "राग" नव्हे ही जाणीव यथार्थपणे जाणवून द्यायची, अशी दुहेरी कसरत या गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळते. गायक उस्ताद अमीर खान साहेब म्हणजे रागदारी संगीतातील स्वतंत्र प्रकरण!! त्यांच्या गायकीचा अंदाज घेऊन, रचनेत ताना, हरकती, सरगम इत्यादी अलंकारांचा व्यवस्थित उपयोग केला आहे.
    "झनक झनक पायल बाजे,
    पायलिया की रूनक झुनक पर,
    छम छम मनवा नाचे".
    वर उल्लेख केल्याप्रमाणे, गाण्यात रागाचे स्वरूप प्रथमक्षणी ऐकायला मिळते आणि संपूर्ण चाल ही याचा रागाभोवती फिरत आहे. या बाबत एक किस्सा ऐकायला मिळाला आहे. सुरवातीला संगीतकार वसंत देसायांनी "दरबारी" रागात चाल बांधली होती पण चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही, शांताराम, यांना ती चाल फारशी पसंत पडली नाही. त्यामुळे वसंत देसाई काहीसे चक्रावले पण लगेच त्यांनी दरबारी रागातील स्वरांना अडाणा रागाच्या अंगाने घेतले आणि चालीचे स्वरूपच बदलून गेले. भारतीय रागादारी संगीताच्या श्रीमंतीचे हे सुरेख उदाहरण!!
    -- अनिल गोविलकर

  • शिस्तीचा एक जबरदस्त नमूना – रोम पोलिसांचा व्हिडिओ

    शिस्तीचा एक जबरदस्त नमूना पहायचा असेल तर हा व्हिडिओ बघायलाच हवा.

  • विट्यातील विजयादशमी पालखी शर्यतीची परंपरा

    सांगली जिल्ह्यातील विटा (ता. खानापूर) येथे विजयादशमी दिवशी देवांच्या पालखी शर्यतीचे आयोजन केले जाते. गेल्या १५० वर्षांची परंपरा असलेल्या देवांच्या या पालखी शर्यती संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहेत. विट्यातील श्री रेवणसिद्ध व मूळस्थान श्री रेवणसिद्ध या दोन देवांच्या पालखी शर्यती येथील विजयादशमीचे (दसरा) खास आकर्षण आहे.

    दसऱ्याच्या दिवशी मूळस्थानी श्री रेवणसिद्ध देवाची पालखी विट्यातील श्री भैरवनाथ मंदिरात येते. मूळस्थान रेवणसिद्ध व विटा येथील श्री रेवणसिद्ध या दोन पालख्यांची आरती झाल्यानंतर देवाच्या सासनकाठ्या, देवांना वारे घालणाऱ्या चवऱ्या, आबदागिरी, चांदीच्या काठ्या, लाल छत्र्या, हलगी व डिमडीच्या निनादात या पालख्या शर्यतीसाठी सज्ज होतात. या दोन्ही पालख्यात देवांचा मुखवटा ठेवलेला असतो. काळेश्वर मंदिराजवळ पालख्या येतात. पालख्या शर्यतीसाठी सोडण्याचा मान विठ्ठल (आबा) पाटील यांच्या कुटुंबाकडे आहे. त्यावेळी मूळस्थानची पालखी पाहुणी असल्याने या पालखीला पाच पाऊले पुढे थांबण्याचा मान दिला जातो. त्यानंतर उजव्या बाजूला मूळस्थानचे नागरिक तर डाव्या बाजूला विटेकर नागरिक पालखी घेऊन धावण्यासाठी सज्ज होतात.

    विजयादशमी दिवशी सायंकाळी 5 वाजता या दोन देवांच्या पालखींची शर्यत सुरु होते. काळेश्वर मंदिर ते खानापूर रस्त्यावरील शिलंगण मैदान हे सुमारे एक ते दीड कि.मी. अंतर कापण्यासाठी पालखीचे खांदेकरी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे या पालख्या शिलंगण मैदानाकडे धावतात. त्यावेळी रस्त्यात काही ठिकाणी विटेकर तर काही ठिकाणी मूळस्थान सुळेवाडीचे नागरिक विरोधी बाजूची पालखी अडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यातून सुटका करुन घेत या दोन्ही पालख्या शिलंगण मैदानाकडे धाव घेतात. या मैदानात प्रथम पोहोचलेली पालखी विजयी घोषित केली जाते. त्यानंतर पाठीमागून श्री भैरवनाथ, श्री म्हसवडसिद्ध व श्री भैरोबा या देवांच्या पालख्या शिलंगण मैदानात जातात. त्याठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम होतो. आपट्यांची पाने (सोने) देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात.

    विजयादशमी दिवशी देवांच्या पालख्या पळविण्याच्या शर्यतीची परंपरा विटेकरांनी गेल्या 150 वर्षांपासून जोपासली आहे. जात, पात, धर्म, गट-तट आणि राजकारणाच्या भिंती भेदून विटेकर नागरिक ही पालखी शर्यत यशस्वीरित्या पार पाडून जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. विजयादशमी दिवशी सांगली जिल्ह्यातील विटा शहरात जोपासलेली देवांच्या पालखी शर्यतीची परंपरा महाराष्ट्रात आजही सुप्रसिद्ध आहे. या शर्यती पाहण्यासाठी राज्यातून लाखो भाविक हजेरी लावतात.

    (-- `महान्यूज' मधील दिलीप मोहिते, विटा यांच्या लेखावर आधारित. )

  • एक जागा अद्भुत बागा!

    "वाळवंटात फुललेली बाग तुम्ही पाहिलीत का हो?" गाडी चालवता चालवता अचानक यशोधनने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच समजेना.

    "तू वेडा आहेस की काय? वाळवंटात बाग, तीही फुललेली? छे, काहीतरीच प्रश्न!" अशीच काहीशी प्रतिक्रिया माझी होती! कारण वाळवंट म्हटले की डोळ्यासमोर येतो तो वाळूचा अथांग समुद्र, त्यावर उठणारी वाळूची वादळे, त्यामुळे तयार होणाऱ्या वाळूच्याच लाटा... क्वचित त्यात दिसणारी खुरटी, काटेरी टोकदार पानांची झुडुपं व कधीकधी दिसणारे 'उंटावरचे शहाणे'. पण जेंव्हा 'मिरॅकल गार्डन' कडे यशोधनने गाडी वळवली तेंव्हा पाहिलेल्या आश्चर्याने दाही बोटे तोंडात गेली असे म्हटले तरी चालेल.

    जेंव्हा हाच माझा मुलगा-यशोधन-पहिल्यांदा दुबईला जायला निघाला, तेंव्हा मी दुबईची अशीच काहीशी कल्पना केली होती. म्हणजे पूर्वी कधीतरी वाचलेली 'अगदी नुसतेच वाळवंट व त्यात तुरळक घरे' ही लहानपणची वाळवंटाची कल्पना मागे पडून आखाती देशातही उंच इमारती, सुखसोयीयुक्त घरे, दुकाने असतात पण बाकी सर्वत्र वाळू असे चित्र मनात रुजले होते. तिथल्या माती नसलेल्या वाळवंटात झाडे, फुलबागा वगैरे नसणारच याची खात्री होती. त्यामुळे सिंगापूर सारख्या फुलझाडांनी बहरलेल्या देशातून प्रथमच दुबईला जाताना विमानातून उत्तरेपर्यंत "बाईसाहेब आता सिंगापूरची हिरवाई, फुलझाडांची नयनरम्य आरास सगळे विसरा१५ दिवस" असे स्वत:लाच बजावत होते. दिवस नोव्हेंबरचे होते. उतरताना रात्र असल्याने खाली फक्त दिव्यांचा चकचकाट व समुद्राच्या बाजूने चमकणाऱ्या दिव्यांची रोषणाई एवढेच दिसले होते. पण दुसऱ्या दिवशी उठून पहाते तर चौपदरी रस्ता, त्याला कापणारा दुभाजक दिसला. त्यावर शिस्तीत दोनच्या रांगेत लावलेली छोटीछोटी झुडपे होती व त्यावर चक्क पिवळ्याधमक व लाल चॉकलेटी रंगाची फुले वाऱ्यावर डुलताना दिसत होती. त्यांच्या मधूनच थोड्या थोड्या अंतरावर खजुराची पुरुष-दीड पुरुष उंचीची झाडे आपल्या झावळ्या पसरून उभी होती. मुलाचे घर कॉर्निशवर (समुद्राच्या जमिनीत घुसलेल्या पट्ट्यावर) होते, त्यामुळे सूर्यप्रकाशात चमचमणारे पाणी, त्यावर मधूनच बोटींच्या येण्याजाण्याने उठणाऱ्या लाटा व मधूनच पटकन पाण्यापाशी सूर मारून मासा मटकवणारे समुद्रपक्षी निसर्गचित्रात भरच घालत होते व दुबई म्हणजे फक्त वाळवंट व त्यातील घरे या कल्पनेला सुरुंग लावत होते. जसजशा माझ्या दुबईभेटी वारंवार होऊ लागल्या तसतशा दुबईतल्या वाळवंटाच्या कल्पनाही बदलत गेल्या. वाळवंटात फुले लाऊन त्याची निगा किती काळजीपूर्वक घेतली जाते याची कल्पना येऊ लागली. रस्त्याचे डिव्हायडर, चौकातले राउंड अबाऊट किंवा फ्लाय ओव्हर्सचे उतार....काहीही सोडलं नव्हतं. उपलब्ध जागेचे आकर्षक लँडस्केपिंग करून त्यावर रंगीबेरंगी फुलझाडे, खजूराची झाडे लाऊन सगळीकडे मिनीबागांची रेलचेल करणे असा प्रकार जागोजागी पहायला मिळत होता. जितके पहावे तितके कमीच अशी परिस्थिती होती. बरं ही झाडे-फुलझाडे वाटेल तशी उगवलेली नव्हती हं! दगड विटा व वाळूचे उत्तम आखीव रेखीव आकार तयार करून, त्यात मऊ मुलायम लुसलुशीत हिरवळ लाऊन त्यात आकर्षक रंगसंगती करून लावलेली होती. फुलांची भरपूर विविधता पाहायला मिळाली. समुद्राच्या कडेकडेने असणाऱ्या बऱ्याच ठिकाणी हिरव्यागार बागा, जॉगिंग ट्रॅक, दुबईची शोभा अधिकच वाढवत होती. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा वगैरे ठिकाणी प्रचंड हिमवर्षाव होतो तेथे बर्फाखाली गाडली गेलेली फुलझाडे व बागा हिवाळा संपला की परत फुलवाव्या लागतात. दुबईत हीच गोष्ट उन्हाळ्यात होते. ४-५ महिने तरी ४० च्या वर तपमान जात असेल. त्याकाळात दुभाजकांच्यावरच्या आणि छोट्या बागा उन्हाने अक्षरश: करपून जातात तरीही मोठ्या बागा किंवा फुलझाडे आग ओकणारे ऊन, पावसाचे अत्यल्प प्रमाण, वाळूची वादळे यांना दाद न देता जिवंत रहातात याचं श्रेय इथल्या यंत्रणांना आहे. खरंतर सभोवताली पाणीच पाणी दिसत असूनही "समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही" अशी अवस्था दुबईची! त्यामुळे इतक्या ठिकाणी फुलझाडे वाऱ्यावर डुलताहेत याचे खूप आश्चर्य वाटते. घराघरातून व कारखान्यांतून वाया जाणारे पाणी शुद्ध करून या बागांसाठी वापरले जाते. त्यासाठी ते ठिबक सिंचनाद्वारे किंवा जमिनीच्या अगदी वरच्या थराखालून मुद्दाम पसरलेल्या भोकाभोकांच्या नळ्यातून मुळापाशी पोहोचवले जाते व भर उन्हाळ्यातही त्यांना जिवंत ठेवते ही पद्धत खूपच कौतुकास्पद वाटली.

    मिरॅकल गार्डन म्हणजे खरोखर मानवनिर्मीत चमत्कार म्हणावा लागेल. सुमारे ८०,००० चौ.फू. जागेवर बनवलेल्या आणि फेब्रुवारी २०१३ मध्ये सर्वांसाठी खुल्या झालेल्या या बागेत पर्यटक्रांची नुसती रीघ लागलेली असते. अप्रतिम हा शब्द कमी पडावा अशी ही वाळवंटातील अफलातून करामत 'दुबईलँड' या भागात आहे. तेथे पोहोचण्यासाठी एमिरेट्स मॉलपासून बस असल्याने तेथे पोहोचणे सोपे जाते. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा ठिबक सिंचन प्रकाराने वापर करून सर्वत्र हिरवीगार हिरवळ निर्माण केली आहे. रंगीत फुलझाडे मात्र बऱ्याच प्रमाणात छोट्या छोट्या कुंड्यात वा भांड्यात लावलेली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात ती सुरक्षित जागी हलविणे सोपे जाते. ऊन्हाळा संपल्यानंतर ती बागेत परत मांडताना रचना बदलता येत असल्याने, पुनः भेट देणाऱ्या अभ्यागतांना दरवेळी नवीन रचना पाहण्याचा आनंद मिळतो.

    या बागेत हिरवळीखेरीज छोटेछोटे तलाव, त्यात जलचर पक्षी, फ्लेमिंगो, कारंजी व सर्वत्र दिसणारी फुले मन वेडावून टाकतात. बागेत नुसत्या जमिनीवरच्या कुंड्याच आहेत असे मात्र नाही. मोठमोठ्या कमानीतील टोपल्यात बसून थंडगार वाऱ्यावर डोलणाऱ्या फुलांनी आमचे लक्ष वेधून घेतले. कमानींवर हिरव्यागार वेली, पुष्पलता मुद्दाम चढवल्या होत्या. त्यात मूळच्या वेताच्या कमानी लपून गेल्या होत्या. त्याखालून जाणारा स्वछ लालचुटुक पेव्हर ब्लॉकचा रस्ता अगदी चित्रातल्यासारखा दिसत होता. त्या कमानींखालून जाताना खूपच छान वाटले. पायाखाली लाल पायघड्या, बाजूला व डोक्यावर लोंबणाऱ्या वेली, वाऱ्यावर डुलणारी फुले, त्यांचा मंद सुगंध आणि मधूनच येणारी वाऱ्याची थंडगार झुळूक आपल्याला स्वप्ननगरीत घेऊन जातात.

    कमानीशिवाय इतरही खूप वेगवेगळे आकार तयार करून त्यावर फुले व वेली चढवलेल्या आहेत. पिरॅमिड, फेरारी मोटार, चार डब्यांची आगगाडी, दिव्यांच्या शेड, आयफेल टॉवर, सफरचंद, कमळे, सूर्यफुले असे असंख्य आकार तयार करून फुलांनी सजवलेले दिसले. एक मोठी बोटही होती, जिच्या नांगराला फुलांच्या परड्या लोंबकाळत होत्या. एका तळ्याच्या काठावर बसून झाडांना झारीतून पाणी घालणाऱ्या मुलीचे शिल्पही फार आकर्षक आहे. तिच्या केसांच्या फुलांच्या बटा अलगद पाण्यात उतरल्या आहेत. त्यांच्या रंगाचे मिक्सिंग अतिशय सुंदर जमले आहे. तिचा गोरापान रंग, लाल पांढरी फुले व हिरवी गार पाने यांनी तयार झालेल्या फ्रॉकवर उठून दिसत होता. शेजारच्या तळ्यातल्या मुलीचे अश्रू फुलांच्या रूपाने पाण्यात उतरत होते. तिचा चेहरा, केस सगळ्याची रंगसंगती अतिशय सुंदर होती, ते दृश्यही खूप छान होते. परंतु इतक्या सुंदर बागेत बसून ही का बरे रडत असावी हा प्रश्न मनात सलतच राहिला.

    एके ठिकाणी १३मी. व्यासाचे भले मोठे फुलांचे घड्याळ आहे. त्यातले पांढरे ठसठशीत आकडे गुलाबी लाल रंगाच्या फुलांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसत होते. हिरव्या पानांची व चॉकलेटी रंगांच्या फुलांची गोलाकार कड घड्याळाला उठाव देत होती. घड्याळाच्या मधोमध बसलेला छोटासा पक्षी दर १५ मिनिटांनी आवाज करून आपले अस्तित्व दाखवत होता.

    अरेबियन डिझाईनची वैशिष्ट्यपूर्ण कमान आम्हाला तिकडे खेचत होती. तिकडे गेल्यावर वेगळीच गंमत पहायला मिळाली. बुर्ज खलिफाची प्रतिकृती, पालथे अर्धगोल(डोम) टपोऱ्या केशरी संत्र्यांनी व पिवळ्याधमक लिंबांनी सजलेले होते. हिरव्यागार वेलींच्या मधून ही पिवळीधमक लिंबे, संत्री, बागेची शोभा आणखीच वाढवत होती. सगळे बघता बघता वेळ कसा जातो कळतच नाही. परतीच्या वाटेवर माथेरानच्या टॉय ट्रेनची आठवण करून देणाऱ्या आगगाडीने तिच्यावरील फुलांच्या रंगांनी लक्ष वेधून घेतले. इंजिनाशेजारी उभा ड्रायव्हर हात उंचावून आपल्याला निरोप देतो व नुसती चक्कर मारायच्या उद्देशाने बागेत शिरलेले आपण उल्हसित मनाने पण थकलेल्या पायांनी बागेबाहेर पडतो. अर्धा दिवस तरी फुलांच्या राज्यात सहज संपतो. मन तृप्त झाल्यावर पोटपूजेची आठवण झाली. इथे खानपान सेवा असणार हे तर उघडच होते. वेगवेगळी दुकाने विविध पदार्थ तयार करून आपली भूक आणखीनच वाढवत होती. हा भागसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण व बागेची शोभा वाढवणाराच होता. लोकांना क्षुधाशांती करण्यासाठी आरामदायी वाटिका तयार केल्या आहेत. त्यामध्ये ऊन लागू नये म्हणून रंगीबेरंगी छत्र्या उलट्या टांगून त्यांच्या दांड्यांना फुलांच्या परड्या लटकवलेल्या होत्या. नुसत्या वासाने चाळवलेली भूक पोटभर भागवून तिथून बाहेर येतांना मागे वळून पहाण्याचा मोह काही आवरत नाही. ३० डिरहॅमचे तिकिट काढतानाची सुरुवातीची चुटपुट बागेत कधीच हरवून गेलेली असते. मन भरून प्रसन्नता, फुलांचा दरवळ, फुलपाखरांचे विविध रंग.. कितीही वर्णन केले तरी कमीच! 'Largest Vertical Garden' अशी गिनीज बुकमधे नोंद झालेले हे उद्यान म्हणजे वाळवंटातील खरोखर 'मिरॅकल' आहे यात संशय नाही.

    बागेच्या विकसनातील 'मिरॅकल गार्डन' हा पहिला टप्पा होता. मार्च २०१५ मधे या बागेच्या शेजारील सुमारे ४०००स्क्वे.मी. च्या परिसरात दुसरी फेज आकाराला आली. ती म्हणजे 'Dubai Butterfly Garden'. 'मिरॅकल गार्डन' व 'बटरफ्लाय गार्डन' शेजारी शेजारी असले तरी त्यांची प्रवेशद्वारे, प्रवेश शुल्क आणि रांगाही वेगवेगळ्या आहेत. दोन्ही बागांची थीम भिन्न आणि म्हणून अंतर्भागातील सुशोभीकरणाचे प्रकारही भिन्न. दाराशीच एक भलेमोठे फुलपाखरू आपल्या विविध रंगांनी पर्यटकांना आकर्षित करते. त्याला फोटो व सेल्फी काढून हैराण केल्यावरच आपण आत शिरतो. आतमध्ये जिकडे बघावे तिकडे रंगीबेरंगी फुलपाखरांचे कट आऊटस दिसतात. त्यावर विविध रंगी फुलांच्या कुंड्या ठेवून त्यात रंग भरले आहेत. रंगीत फुलांवर नाचणारी खरी फुलपाखरे अतिशय विलोभनीय दिसतात. जरा पुढे गेल्यावर विविध रंगी नऊ मोठे डोम दिसले. हे डोम म्हणजे फुलपाखरांसाठी तयार केलेली उत्तम घरेच म्हणाना. फुलपाखरांना २० ते ३० तपमान आवश्यक असते. दुबईत ते अशक्यच! त्यासाठी डोममध्ये २४ से. तपमान कायम ठेवले आहे. डोममधल्या बागेत आमचे स्वागत वेगवेगळ्या फुलपाखरांनी केले. खरे तर त्यांना आमच्या खांद्यावर डोक्यावर बसून मैत्री करायची होती. पण आपल्याला एकदम दचकायला होते ना! तिथे असणारे स्वयंसेवक आपल्याला फुलपाखराला किती हळुवारपणे हाताळणे आवश्यक आहे, त्यांना अजिबात इजा न करता कसे पकडायचे हे दाखवतात. हे पहिलेच बटरफ्लाय गार्डन असावे, जिथे अभ्यागत फुलपाखरे हाताळू शकतात. या डोममध्ये २४ देशातून आणलेली विविध प्रजातींची फुलपाखरे गोळा केली आहेत. छोटी मोठी फुलपाखरे आपल्याभोवती रुंजी घालतात. आपल्याला उगीचच आपण सौंदर्यवती असल्यासारखे वाटते. या फुलपाखरांसमवेत छोटी छोटी गोबरी मुलेही गमतीजमती करत असतात, आनंदाने चीत्कारतात. मोठी मजा येते.

    या डोमच्या मधोमध फुलपाखराच्या आकाराचे म्युझियम आहे. या म्युझियमलाही फुलपाखरांच्या आकारात त्रिमिती पद्धतीने फुलांच्या वेगवेगळ्या डिझाइन्सने सुशोभित केले आहे. तेथे अनेक भिन्न भिन्न कीटक, फुलपाखरे, यांच्या जाती व प्रकार पाहाता येतात. शिवाय म्युझियममधील काचेच्या घरात फुलपाखरांचे जीवनचक्रही नीटपणे अभ्यासता येते. या विभागात बरीच मुले व त्यांना माहिती देणारे पालक यांची गर्दी होती. या बागेत तीन तळीही आहेत. या तळ्यात 'कोई' जातीचे मासे सोडलेले आहेत. दहा वेगवेगळ्या रंगांच्या या माशांचे पोहणे, मधेच पटकन पाण्याच्या पृष्ठभागावर येणे, सुळकन पाण्यात शिरणे, कधी गप्पा मारायला एकत्र येणे व भांडण झाल्यास तडकाफडकी पाठ फिरवून निघून जाणे.. सारेच विलोभनीय!

    ४०००चौ.मी.चे गोलाकार बटरफ्लाय गार्डन पहाता पहाता दमणूक तर होतेच पण तहान-भूकही लागते. अर्थातच त्याचीही सोय येथे आहेच. आणि घरी परतताना फुलपाखरांची आठवण सोबत नको का? त्यांना तर नेणे शक्य नाही, पण त्यांच्या प्रतिकृती तर आपण घेऊ शकतोच ना! फुलपाखरांची रंगीबेरंगी व वेगवेगळ्या आकारातली भिंतीवर लावावयाची चित्रे, फ्रीजवर लावण्यासाठीचे लोहचुंबक, की चेन्स, टी शर्ट, स्कार्फ वगैरे घेण्याचा मोह पाडणारे एक भेटवस्तूंचे दुकानही आहे. या बटरफ्लाय गार्डनचे तिकीट ५० दिरहॅम असूनही फुलपाखरांच्या आकर्षणामुळे तिथे भेट देणाऱ्यांची गर्दी खूप आहे.

    'मिरॅकल गार्डन'च्या तिसऱ्या टप्प्याचे म्हणजे 'हवे तेवढे पहा, हवे तेवढे तोडा व (पैसे देऊन) घेऊन जा' या तत्वावर उभारण्यात येणाऱ्या फळभाजीच्या बागेचे, त्यातच असणाऱ्या रोलर कोस्टर, मेरी-गो-राऊंड वगैरे मुलांच्या करमणुकीच्या साधनांनी युक्त अश्या बागेचे कामही सुरू झाले आहे. ते लवकरच पूर्णत्वाला जाण्याच्या मार्गावर आहे असे समजले.

    या दोन्ही बागांचे वारा, वाळूची वावटळ व वाळूकणांपासून रक्षण करण्यासाठी अगदी सोपी युक्ती वापरलेली आढळते. मुख्य रस्त्यापासून दोन्ही बागांकडे येणाऱ्या छोट्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १०-१५ फूट उंचीची अगदी दाट झाडे लावली आहेत. या झाडांमुळे एका छानशा कॉरिडॉरमधून आपण जातो हे तर छान वाटतेच, पण जवळच मोठा रहदारीचा रस्ता असूनही वाहनांच्या आवाजाचा अजिबात त्रास होत नाही व बागेचे संरक्षणही उत्तमरीत्या होते... असेच आणखी एक दुबईतील 'झाबील पार्क'चा स्वतंत्र भाग असणारे आगळे वेगळे सुंदर उद्यान World's First Unique Themed Park म्हणून ज्याची नोंद झालेली आहे ते Dubai Glow Garden. नुकतेच २२डिसेंबर २०१५ ला त्याचे उद्घाटन झाले. रमादान पर्यंत ही बाग प्रेक्षकांचे मन रिझवणार आहे.

    या वर्षीची थीम आहे: 'केनियन सफारी, नेदरलँडची ट्युलिप व इतर मनमोहक फुले.' येथे जगातील सुमारे १५० कलाकारांनी एकत्रित २००,००० तास काम करून व ३ कोटी दिरहॅम खर्च करून जवळपास ४० एकर जागेत ३२ वेगवेगळ्या रचना साकार केल्या आहेत. याखेरीज येथे लेझर फाउंटन शो., चकचकीत चंदेरी कपडे घातलेल्या कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मन्स संध्याकाळच्या आल्हाददायी वातावरणाला अधिकच आनंददायी बनवतात. वापरून टाकून दिलेल्या सामानातून कला निर्माण होऊ शकते हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा खटाटोप! दिवसाच्या उजेडात बागेचे रंग कसे दिसतात हे पहायला आम्ही मुद्दाम जरा लवकरच बागेत प्रवेश केला होता. पटकन एक चक्कर मारून येऊ असे म्हणत आत शिरलेले आपण बघता बघता बागेतील रंगीबेरंगी प्राणी, झाडे, फुले, बदके यात रमून जातो. जबडा वासलेले व चीत्कार करणारे अनेक अक्राळविक्राळ डायनॉसॉर बघून आपण नकळत तिथून पळ काढतो. हे डायनॉसॉर खोटे आहेत हे माहिती असूनही आपण घाबरतो हे मात्र खरं! अगदी मुलांपेक्षा मूल होऊन आपण या जगात हरवून जातो. हे सगळे अनुभव बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे खूप मजा वाटली. बराच वेळ बागेत भटकून आम्ही दमलो होतो. तेवढ्यात पहाता पहाता दिवस मावळला व संध्याकाळच्या केशरी, लाल, पिवळ्या प्रकाशाने आकाश व्यापून टाकले. बघता बघता आकाश निळ्या काळ्या रंगाने झाकोळून गेले व अंधाराच्या पार्श्वभूमीवर बागेचे वेगळेच रूप दिसले. झाडांच्या अंगाखांद्यावर कुंपणाच्या कडेने लाखो छोटे मोठे रंगीबेरंगी एल ई डी दिवे लखलख करू लागले व आकाशातल्या चांदण्याच आपल्याला जमिनीवर उतरून वाट दाखवताहेत असा भास झाला. परत एकदा आम्ही बागेकडे वळलो व दिवसा बघितलेलीच बाग नव्याने पहायला सुरुवात केली.

    अगदी दारातच आम्हाला दुबईची स्कायलाईन असणारी इमारतीची बाह्य रेषा दिसली. १४मी. उंचीच्या, बुर्ज खलिफाच्या निमुळत्या स्तंभाने आमचे लक्ष वेधून घेतले. त्याचे उंची-आकारमानाचे प्रमाण तर उत्तम जमले आहेच पण त्या आकारमानानुसार इतर इमारतींची बाह्य रेषाही उत्कृष्ट जमली आहे. या इमारतींच्या कडांवर लावलेले दिवे लांबूनसुद्धा खूप सुंदर दिसतात. या बुर्ज खलिफाची निर्मिती विविध औषधांच्या अंदाजे ३,३०,०००रिकाम्या बाटल्यांपासून केली आहे हे समजल्यावर या कृतीच्या निर्मात्याच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटली. बागेच्या आतल्या भागाकडे वळलो तो २-३ मोठ्या कृत्रिम झाडांच्या शेजारी एक बोलणारे झाड समोर आले. हिरव्या झाडांच्या पार्श्वभूमीवर हे पिवळसर केशरी झाड उठून दिसत होते. बुंध्याच्या वरच्या भागात डोळे, भुवया, पापण्यांसह प्रमाणबद्ध चेहरा साकारला होता. त्यावरच्या व खोडावरच्या चॉकलेटी रेषा त्याचे वाढलेले वय निर्देशित करीत होत्या. त्याच्या शरीरातून उजळून टाकणारा प्रकाश एक प्रकारचे समाधान व तृप्ती दाखवत होता. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या हालचाल करून येणाऱ्या जाणाऱ्यांची दखल घेत होत्या. आपल्या तोंडून निघालेली वाक्ये आश्चर्योद्वार पुन: त्याच्या तोंडून ऐकू येत होते. लहान मुलांबरोबरच आम्ही मोठी माणसेही त्याला हाय, हॅलो करत होतो. पिवळ्या व हिरव्या अर्धपारदर्शी रेशमी कापडांची बनवलेली ही झाडे अंधाराच्या पार्श्वभूमीमुळे व आतून प्रकाशमान होणाऱ्या उजेडामुळे उठून दिसत होती. हिरव्या झाडांची व पिवळ्या बोलणाऱ्या झाडांची उघड्या छत्रीसारखी पसरलेली पानेही उजळून निघाली होती. ही पानेही हिरव्या पिवळ्या कापडांच्या सांगाड्यावर लावलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांची बनवलेली पाहून खूपच कौतुक वाटले.

    बोलणाऱ्या झाडानंतर अचानक पाटी समोर आली...BEWARE OF DINOSAURS ! मघाशी आम्ही दिवसा ह्या भागात येऊन गेलो होतो त्यामुळे यावेळी थोडे शूरपणाने आत घुसलो. आता या भागात डायनॉसॉरचे ओरडणे व अंधूक प्रकाश यामुळे वातावरण थोडेसे भीतिदायक झाले होते. आम्ही पायवाटेने पुढे गेलो तर अंधारात काही हालचाल दिसली. ते काय असावे याचा विचार करतोय तोच आमच्यापासून ३-४ फूट अंतरावर हवेत काहीतरी आडवे फिरले. एक पाऊल मागे सरलो तेव्हा लक्षात आले की ती डायनोसॉरची भली लांब काटेरी शेपटी होती. ती मागे गेली अन् त्याचा वासलेला अक्राळ विक्राळ जबडा पुढे आला. त्याचे अणकुचीदार दात व लालभडक जीभ पाहून धडकीच भरली! त्याची मोठी गर्जना ऐकून तिथून पळालो खरे पण लगेच दुसऱ्याच्या तावडीत सापडलो. हा डायनॉसॉर तर सगळीकडे पुढे मागे फिरत, नाचत होता. कुंपणाबाहेर तोंड काढून मुलांच्या टोप्या, हातातला खाऊ खेळणी पकडण्याचे नाटक करीत होता. त्याचा आवाज ऐकताच पुढे झेपावणारी बच्चे कंपनी एकदम आईबाबांच्या मागे लपत होती. कोणी फोटो काढत असेल तर डायनॉसॉर मस्त पोझही देत होता. सगळे पाहून गंमत वाटत होती. एके ठिकाणी उभारलेला तंबू, शेकोटी, डायनॉसॉरने धडक मारून मोडतोड केलेली गाडी शेजारी उभी, असे दृश्य... खोटेखोटेच, पण त्या भागातून बाहेर पडल्यावर हायसे वाटले हे खरे! एकच ठिकाण पण दिवसा व रात्री कित्ती वेगळे दिसले!

    पुढचा भाग केनियन सफारीचा होता. त्यामुळे छोटीशी झोपडी, एक दोन झाडे, जंगल, तळे व त्यातले प्रकाशमान असलेले 'बिग फाईव्ह'. जिराफ, हरणे, झेब्रे तर होतेच, पण भले मोठे हत्ती, चित्ते, तळ्याकाठी पाणी प्यायला येणारे वाघ सिंह वगैरेही त्यांच्या योग्य आकारमानाप्रमाणे होते. त्यांचे रंग प्रकाशामुळे उठून दिसत होते. शिवाय झाडांवर फुले, माकडे, विविध पक्षी, तळ्याकाठी छोटे ससे तर तळ्यात बदके व कमळेही होती. एके ठिकाणी वनराज आपली राणी व दोन राजपुत्रांसह दिमाखात खडकावर विराजमान झाले होते. झोपडीजवळ मोठमोठ्या म्हशी चरत होत्या. झोपडीबाहेर २ गोंडस मुले खेळत होती व त्यांचे आईबाबा त्यांच्या लीला पाहून हसत होते. सगळेच खूप छान होते. जंगल सफारीचे पूर्ण दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुढे सरकलो.

    पुढचे दृश्य अगदीच वेगळे होते. सिंगापूरला लँटर्न फेस्टिवलमध्ये बरेच प्राणी, फुले, झाडे आकाशकंदिलाच्या स्वरूपात पाहिले होते. पण इथे प्रथमच मुंग्यांची भली मोठी रांग बघितली. काळसर चॉकलेटी डोके, काळे डोळे, लाल पोट व पिवळे पाय अशा २-३ फूट उंचीच्या मुंग्यांची रांग समोर दिसत होती, तर काहींच्या पाठीवर साखरेचे कण. काही जणी फळे, मिठाईचे, पावाचे तुकडे नेत होत्या. सगळ्याजणी एका भल्यामोठ्या वारुळाकडे जात आहेत, वारुळाच्या भोकातून त्यांची छोटासा मुकुट घातलेली राणी मुंगी त्यांच्याकडे बघत आहे असा अप्रतिम देखावा... कितीही वेळ पाहिला तरी मन तृप्त होत नव्हते. सगळे दृश्य त्या ठिकाणी उभे राहून डोळ्यात साठवताना शेवटी पायाला मुंग्या आल्या तेव्हाच आम्ही पुढे सरकलो.

    पुढे होता एका मोठ्या तळ्याचा देखावा. त्यात विहार करणारी बदके व हंस, फुललेली विविध रंगांची कमळे, कमलपत्रांवर उडी मारून बसलेले बेडूक, कमळांभोवती रुंजी घालणारे भुंगे व मधमाश्या..... जितकं वर्णन करावे तेवढं थोडंच. एव्हाना रात्र झाली होती. त्यामुळे सगळे जास्तच उजळून निघाले होते. तेवढ्यात लाईट व साउंडचा शो सुरू झाला. छान सुरेल संगीत व प्रकाश आणि सावल्यांचे खेळ मोठे मनोहर दिसत होते. इकडून तिकडे धावणाऱ्या उजेडाच्या झोतांनी काठावरची झाडे मधून मधून उजळून वेगवेगळे रंग दाखवत होती. २-३ झाडांवर विविध रंगांची फुले उमलली होती. एकंदर खूपच नेत्राकर्षक दृश्य होते ते. हा खेळ रंगात आला असतानाच तळ्यात उभारलेल्या स्टेजवर चंदेरी कपडे घातलेले नर्तक तालात पावले टाकत अवतरले. त्यांच्या नृत्याच्या हालचाली मनोवेधक होत्या. मधुर संगीत, उजळलेली बाग, तळ्यातील कमळे सगळेच आकर्षक !

    शो संपताच परतीच्या वाटेला लागलो तो, समोर मशिदीची भलीमोठी पांढरी शुभ प्रतिकृती दिमाखात उभी दिसली. जवळ जाऊन पाहिले तर दुरून संगमरवरी वाटणाऱ्या शुभ भिंती प्रत्यक्षात पोर्सिलीनच्या टाकून दिलेल्या कप, बशा यांच्या बनवलेल्या होत्या. जवळ जवळ ९०००० असे तुकडे वापरले गेले आहेत यासाठी. तसेच बागेतील प्राणी, पक्षी, दृश्ये सर्व रीसायकल्ड सिल्कची बनवली आहेत आणि जवळ जवळ ४० लाख वीज वाचवणारे बल्ब वापरले आहेत. प्रत्येक वस्तूचा पुनर्वापर करा, वीज वाचवा, पर्यावरणाचा तोल सांभाळा असा जगभर प्रचार होत आहे, पण इतक्या मोठ्या बागेच्या रूपाने असा मनोरंजक संदेश देणारा उपक्रम मी प्रथमच पाहिला.....आणि तोही वाळवंटात!! ६० दिरहॅम तिकीट-बाहेर पडताना 'फक्त ६० दिरहॅमच' असे वाटून गेले. या कल्पक शिल्पकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच!

    या तीन बागा म्हणजे कलात्मकतेचा खरोखरीच उत्तम नमुना आहे. मुलांच्या खेळण्यांनी युक्त, फुलांची पखरण असणाऱ्या इतरही बऱ्याच बागा दुबईत फुलवलेल्या आहेत पण या तीन बागा जरा हटकेच आहेत!

    -अनामिका बोरकर

  • ओल्या काजूची उसळ