(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • निसर्गरम्य पहाडी

    डोंगर उतरणीवरून खाली येताना, मागून चंद्र उगवावा आणि पायाखालची वाट उजळून जावी. आजूबाजूला हिरवी झाडी आणि प्रचंड वृक्षांची साथ असावी आणि बाजूनेच एखादा पाण्याची ओहोळ आपल्या निरव आवाजाने साथ देत असावा. आसमंतात अन्य कुठलाच आवाज नसावा. अशा वातावरणात बहुदा "पहाडी" रागाचा जन्म झाला असावा. अर्थात, निसर्ग आणि प्रदेश याचे ओतप्रोत दर्शन या रागातून सतत झुळझुळत असते. किंबहुना लोकसंगीताशी इतके जवळचे नाते राखणारे जे थोडे फार राग आहेत, त्यात पहाडी राग, फार वरच्या क्रमांकावर आहे. हिरव्या जर्द झाडीतून स्त्रवणाऱ्या आणि त्याला मिळणाऱ्या खळखळणाऱ्या पाण्याच्या नादाशी नाते जुळवणाऱ्या सुरांशी या रागाचे फार जवळचे साहचर्य आहे. मुळात निसर्ग काहीतरी सुचवित असतो आणि अशावेळी जर का आपण निसर्गाशी जवळीक निर्माण करण्याची इच्छा दाखवली तर निसर्गच जणू, आपल्याला या रागाशी साहचर्य घडवून आणतो. या रागात सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागत असले तरी बरेचवेळा "कोमल धैवत" वापरून, या रागात गंमत आणि वैविध्य निर्माण केले जाते. या रागाचे चलन पाहिल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते. हा राग मंद्र सप्तकात किंवा शुद्ध स्वरी सप्तकात अधिक खुलतो. अर्थात, लोकसंगीतात बरेचवेळा स्वरांच्या आकृतीबंधाबाबत जसे स्वातंत्र्य घेतले जाते तसाच प्रकार या रागाबाबत घडतो. याचा परिणाम असा झाला, चित्रपट गाणी किंवा एकूणच सुगम संगीतात, या रागावर आधारित गाणी भरपूर आढळतात. काही नकलाकार यात "कोमल गंधार" आणि "कोमल निषाद" वापर करतात आणी या रागाचे सौंदर्य अधिक खुलवून मांडतात.

    इथे आणखी एक मत मांडावेसे वाटते. तसा पहाडी राग "अटकर" बांध्याचा आहे. यमन, मालकंस प्रमाणे याचा विस्तार अफाट पसरलेला नसल्याने, बरेचवेळा हा राग "धून" स्वरूपात ऐकायला मिळतो. याच मुद्द्याला धरून आपण इथे पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी सादर केलेली पहाडी ठुमरी केवळ अप्रतिम आहे. पहिल्याच सुरांतून, या रागाचे संपूर्ण दर्शन आणि वातावरण करण्यात, हा वादक यशस्वी होतो.
    भारतीय संगीतातील जी प्राचीन वाद्ये आहेत, त्यात बासरीचा समावेश होतो. मुळातले हे सुषिर वाद्य, भारतीय रागदारी संगीतात स्थिरावले, ते पंडित पन्नालाल घोष यांनी पण त्याचा जागतिक विस्तार केला तो मात्र पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी. पंडितजींची वाद्यावरील पकड इतकी असामान्य आहे की, ऐकताना माणसाला चक्क गुंगी येते!! इथे त्यांनी जी ठुमरी सादर केली आहे, त्यात, ठुमरीचा नखरा तर आहेच पण त्याचबरोबर सूरांतील हळवेपण देखील लगेच दृग्गोचर होते.सुरवातीची जी आलापी आहे, ती बारकाईने ऐकली तर ध्यानात यावे. पुढे जेंव्हा गत सुरु होते तेंव्हा मात्र एका असामान्य गायकाच्या ठुमरीची आठवण येते. अर्थात, त्या ठुमरीच्या अंगाने जरी वादन झाले असले तरी देखील, त्यात स्वत:चा असा खास विचार दिसतो. सुरवातीच्या समेवरील आलापीनंतर, एकदम "कोमल गंधार" जो लागतो, तो विलक्षण आहे.
    आता, मघाशी मी ज्या असामान्य गायकाची आठवण करून दिली, त्या उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांच्या "तोरे तिरछी नजरिया के पार" या ठुमरीचा विचार करायला घेऊ.
    पतियाळा घराण्याचे अध्वर्यू म्हणून या गायकाचे वर्णन करता येईल. आवाजात थोडासा खर्ज पण तरी वरच्या सप्तकात सहज विहार करणारा गळा!! ठुमरी या गायनाला मैफिलीचा दर्जा देण्यात या गायकाचा महत्वाचा वाटा. खरे तर तीनही सप्तकात या गायकाला लीलया गाता येत असे आणि याचा परिणाम, परिणामकारक ठुमरी गायन. जरा बारकाईने ऐकले तर या गायकाने, ग्वाल्हेर, जयपुर गायकी देखील आत्मसात केल्याचे समजून घेता येईल.
    प्रस्तुत ठुमरी गायनात देखील याच वैशिष्ट्यांचा आढळ सापडेल. गळ्याची लवचिकता, हे खास वैशिष्ट्य सांगता येईल. याचा फायदा असा झाला, गायकीत "अनपेक्षितता" नेहमीच कायम राहिली आणि त्यामुळे गाणे अतिशय रंगतदार झाले. आणखी वेगळेपण सांगायचे झाल्यास, आपल्या शास्त्रात "प्रसादगुण" हे खास वैशिष्ट्य मानले आहे आणि उस्तादांच्या गायकीत याचे ओतप्रोत दर्शन घडते तसेच सरगम, बहुतेक गायकांच्या बाबतीत, तानेचा तांत्रिक आविष्कार अशा स्वरुपाची असते परंतु या ठुमरीत सरगम हही इतकी ओघवती आहे की कुठे ताण संपते आणि परत सुरु होते, याचा सत्कृत्त्दर्शनी पत्ता लागत नाही.
    हिंदी चित्रपट गीतांत, खैय्यामने जितका या रागाचा उपयोग करून घेतला आहे, तितका इतर कुणी केल्याचे आठवत नाही. पहाडी रागात ज्या कुठल्या भावनांचा आढळ होईल, त्या सगळ्या भावनांचा, त्याने आपल्या गाण्याच्या "तर्ज" बांधण्यासाठी उपयोग केला आहे. प्रणय, विरह, व्याकुळता, आनंदविभोर अवस्था, या सगळ्या छटा त्यांनी आपल्या चालीत गुंफलेल्या आढळतील."जाने क्या धुंढती रहती है ये आंखे मुझ मे" ही गाणे खास पहाडी रागावरील उदाहरण म्हणून घ्यावे. खरतर हे गाणे म्हणजे अनन्यसाधारण कुवतीची कविता म्हणून देखील आस्वाद घेता येईल. कैफ़े आझमी काय प्रतिभेचा कवी होता, याचे ही कविता, उत्तम निर्देश करता येईल. पहाडी रागात विरहाची अशी भावना देखील दाखवता येते, हे खैय्यामने फार सुंदररीत्या दाखवून दिले आहे.
    गाण्याचे सुरवातीचे शब्दच बघा किती प्रत्ययकारी आहेत.
    "जाने क्या धुंढती रहती है ये आंखे मुझ मे,
    राख के ढेर मे शोला है ना चिंगारी है"
    खरतर सगळी कविता हाच वाचिक अनुभव आहे आणि अशा कवितेला खैय्यामने जो स्वरसाज चढवला आहे, त्याने या कवितेचा आशय अधिक अंतर्मुख होतो. रफीच्या गायकीचा अनोखा आविष्कार आपल्याला ऐकायला मिळतो. गाण्यात कुठेही तालवाद्य नसून, गाण्यात गिटार आणि इतर "धून" वाद्यांनी ताल पुरवलेला आहे त्यामुळे, झाले असे, कवितेवर कुठेही स्वरांचे आक्रमण झाल्याचे दिसत नाही पण तरीही स्वरांनी आपली "जादू" दाखवून दिली आहे. अर्थात, ही किमया सगळी संगीतकार म्हणून खैय्याम यांचीच यांचीच.
    असेच एक गाणे, कविता म्हणून फार अर्थपूर्ण आहे. जावेद अख्तरची ही कविता आहे. खरतर हे गाणे वाचताना, चित्रपटासाठी हे गाणे लिहिले आहे, हे वाटतच नाही. साधारणपणे, गाण्यातली शब्दरचना, ठराविक "मीटर" मध्ये लिहिलेली असतात, ज्यायोगे संगीतकारांना चाल बांधण्यास अवघड होऊ नये.
    "नीला आसमान सो गया.
    आंसूओ में चांद डुबा, रात मुरझाई
    जिंदगी में दुर तक फैली है तनहाई
    जो गुजरे हम पे वो कम है, तुम्हारे गम का मौसम है".
    सिलसिला चित्रपटातील हे गाणे अतिशय श्रवणीय आहे. संगीतकार शिव-हरी या जोडगोळीने फारसे चित्रपट केले नाही पण, तरीही ह्या गाण्यासारखे चिरस्मरणीय गाणे मात्र दखल घेणारे निर्माण केले. खरतर ही कविता(च) आहे, चालीच्या सर्वसाधारण मीटरमध्ये बसू न शकणारी परंतु संगीतकारांनी गाण्याची लय अशी ठेवली आहे की सगळे गाणे ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव झाला आहे. लताबाईंनी या गाण्यात जी आवाजाची "पट्टी" लावली आहे, ती थक्क करणारी आहे आणि त्यामुळे आपण या गाण्यात कधी गुंतून जातो, हे समजत देखील नाही.
    याच रागात अशीच एक चिरस्मरणीय रचना ऐकायला मिळते. मुळात मेहदी हसन यांचे गायन, हाच श्रवणानंद असतो. उर्दू शायरी जरी गेयातापूर्ण असली तरी प्रत्येक शायरीबद्दल हेच म्हणता येणार नाही पण, या गायकाचे खास विशिष्ट्या असे, गाताना, समजा कवितेत असा शब्द आला, तर तिथे गायकी " मुडपून"घेण्याची तयारी दाखवत आणि शब्दांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत असत.
    बहादूर शहा जाफर या अलौकिक शायराच्या हातून लिहिली गेलेली गझल, एक कविता म्हणून देखील अतिशय दर्जेदार आहे.
    "बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसी तो ना थी
    जैसी अब है तेरी महफ़िल कभी ऐसी तो ना थी."
    मेहदी हसन साहेबांची खासियत अशी आहे, ऐकताना सहज, सोपे वाटणारी गायकी, कधी अवघड वळणाकडे जाते, त्याचा लगेच पत्ता लागत नाही. "बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसे" ही रचना पहाडी रागात आहे पण, रागातील अवघड हरकतींना पूर्ण फाटा देऊन,अर्ध्या ताना घेणे, किंवा एखादी हरकत इतकी जीवघेणी घेतात की, ऐकताना आपण स्तिमित होऊन जातो. अत्यंत मुलायम आवाज, साधारणपणे मंद्र सप्तक किंवा शुद्ध स्वरी सप्तकात गायकी ठेवायची आणि लिहिलेल्या शायरीला पूर्ण न्याय द्यायचा, हीच त्यांची नेहमी भूमिका राहिली. पहाडी रागाचे इतके विलोभनीय रूप इतर गाण्यांत फार तुरळक आढळेल.
    मराठीत असेच एक संयत आणि मुग्ध प्रणयाचे चित्रण असलेले गाणे या रागावर बांधले आहे. खरतर आशा भोसले यांनी गायलेल्या सर्वकालीन अप्रतिम मराठी गाण्यातील एक गाणे, अशी या गाण्याची महती सांगता येईल. कवी सूर्यकांत खांडेकर हे नाव तसे फार प्रसिद्ध नाव नाही परंतु त्यांच्या काही रचना, गाणे म्हणून अप्रतिम अशा गणल्या जाव्यात.
    "सहज सख्या एकटाच येई सांजवेळी
    वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली."
    खरतर सगळी कविता म्हणजे अनोख्या प्रणयाचे सुंदर चित्रण आहे आणि अशी शब्दकळा हाती आल्यावर, श्रीनिवास खळ्यांनी त्याला चाल अर्पिण्यासाठी "पहाडी" राग योजावा, हा काही योगायोग नव्हे. खळे साहेबांचे एक वैशिष्ट्य सांगता येईल. चाल बांधताना, सुरवातीला रागाच्या प्रमुख स्वरांचा उपयोग करतील पण लगेच रागाला दूर सारून, चालीचे स्वत:चे म्हणून वेगळे अस्तित्व दाखवून देतील आणि हे त्यांच्या बहुतेक सगळ्या रचनांमधून ऐकायला मिळते आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे संगीतकाराची कवितेवर असलेली अनन्यसाधारण श्रद्धा. गायकी अंगाची चाल आहे, हे आपल्याला गाणे प्रत्यक्ष गायला घेतल्यावर समजते अन्यथा गाणे ऐकताना साधी, सोपी चाल ऐकत आहोत, हाच भास होत असतो.
    लोकसंगीताचा आधार घेऊन जन्माला आलेला हा "पहाडी" राग म्हणजे क्षणात तुम्हाला तुमचे अस्तित्व विसरायला लावणारा राग आहे आणि असे घडणे, हाच कुठल्याही संगीताचा प्राथमिक उद्देश असतो.
    - अनिल गोविलकर

  • भारतमातेच्या वीरांगना – २७ – अहिल्याबाई रांगणेकर

    १९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली.

  • त्या’ पराभवानंतर भारतीय संघ कुठे होता?

    पुण्यातील पहिली-वहिली कसोटी अवघ्या अडीच दिवसांतच संपली. भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखला. गेले 18 महिने यशाची विविध शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारतीय संघाचे उडू पाहणारे विमान या भयानक पराभवामुळे खाडकन जमिनीवर उतरले. पण पाच दिवसांचा सामना तिसऱ्याच दिवशी आटोपल्याने दोन्ही संघांची मैदानाबाहेर गडबड झाली.

    पुढील कसोटी सामना बंगळूरला आहे. या सामन्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघ प्रवास करणार होते. त्यामुळे 'दोन दिवस पुण्यात करायचं काय' असा प्रश्‍न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला. सततच्या क्रिकेटमुळे भारतीय संघ शरीराबरोबरच मनानेही थकला होता. त्यातून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाच्या दणक्‍यामुळे निराशेचे ढग पसरत होते. चाणाक्ष अनिल कुंबळे यांनी संभाव्य धोका ओळखला. पुण्यातील दोन खास विश्‍वासातील मित्रांना बोलावून दोन दिवस संघासाठी काही उपक्रम करण्याचा विचार कुंबळे यांनी बोलून दाखविला. या मित्रांनी सुचविलेला उपाय कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनी मान्य केला आणि मग योजना पक्की झाली..

    26 फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता संपूर्ण भारतीय संघ आणि सर्व सपोर्ट स्टाफ बसमध्ये बसले. रविवार असल्याने हिंजवडी परिसरात अजिबात गर्दी नव्हती. हिंजवडीतून मागच्या रस्त्याने बस मुळशी रस्त्याला लागली. मुळशी धरण पार करून बस ताम्हिणी घाटाकडे निघाली. कुंबळे यांच्या मित्राने ताम्हिणी घाटाच्या अलीकडे असलेल्या 'गरुड माची'च्या व्यवस्थापनाला या कार्यक्रमाची कल्पना दिली होती. 'कुणीतरी खास व्यक्ती येत आहेत' असं 'गरुड माची'च्या कर्मचाऱ्यांना कळलं होतं. प्रत्यक्षात सगळा भारतीय संघच इथे अवतरला. संचालक वसंत वसंत लिमये यांच्या कडक सूचनांनुसार, 'गरुड माची'च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापले मोबाईल फोन बंद करून ठेवले. 'गरुड माची'च्या व्यवस्थापकांनी अत्यंत चोख व्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गोपनीयता बाळगली होती.

    संध्याकाळी सह्य्राद्रीच्या कुशीत विसावणारा सूर्य पाहताना खेळाडू मनोमन शांत झाले. सूर्यास्तानंतर अंधाराचे राज्य चालू झाले. मिलिंद कीर्तने आणि सुरेंद्र चव्हाण यांनी खेळाडूंसाठी मजेदार 'ट्रेजर हंट'चे आयोजन केले होते. हातात कंपास, टॉर्च आणि नकाशे घेऊन लपवलेल्या गोष्टी मिट्ट अंधारात शोधून काढण्यात दोन तास मस्त धमाल झाली. रात्रीचे जेवण चांदण्यात झाले. खेळाडूंच्या आहाराची काळजी लक्षात घेतच जेवण तयार केले होते.

    दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी सात वाजता महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्यासोबत सगळे जण ताम्हिणीतील 'कॅमल बॅक'वर ट्रेकिंगसाठी निघाले. डोके चालवत सुरेंद्र यांनी तिरंगा बरोबर घेतला होता. एका तासाच्या चढाईनंतर सगळे घाट माथ्याला पोचले, तेव्हा पहाटेच्या कोवळ्या सूर्य प्रकाशातील दऱ्याखोऱ्या बघण्यात सगळे रमले. बऱ्याच खेळाडूंनी तिथेच बरेच फोटो काढले. भारतीय खेळाडूंनी सुरेंद्र चव्हाण यांना 'हिमालयातील भटकंती आणि एव्हरेस्ट मोहिमेविषयी' प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. टेकडीच्या माथ्यावर ताठ मानेने तिरंगा फडकावून त्याला घामेजलेल्या खेळाडूंनी सॅल्यूट केला.

    थकलेल्या अवस्थेत परतल्यानंतर सगळेजण ब्रेक-फास्टवर तुटून पडले. एक संपूर्ण दिवस इथे घालवला, तरीही कुणाचाही पाय 'गरुड माची'च्या कॅम्प साईटवरून निघत नव्हता. 'बऱ्याच दिवसांनी मोकळ्या आकाशाखाली हुंदडायला मिळाले. सह्याद्रीच्या सौंदर्याने आम्ही हरखूनच गेलो..', अशी भावना एका खेळाडूने व्यक्त केली.

    काही काळ खेळापासून लांब जाऊन मनाने ताजेतवाने होण्यासाठी कोहली आणि कुंबळे यांनी हा खटाटोप केला होता. याचा प्रत्यक्षात खूपच चांगला परिणाम झाला. 24 तासांच्या मजेदार सहलीनंतर सगळे जण ताजेतवाने झाले. चेहऱ्यावरची निराशा नाहीशी झाली होती. गेले 18 महिने भारतीय संघ अव्याहत क्रिकेट खेळत आहे. यामुळे सगळेच जण थकले होते. 'गरुड माची'ची सहल गोपनीय राखण्यात यश आल्याने खेळाडूंना कोणताही त्रास झाला नाही. येथील व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना कसलाही त्रास दिला नाही किंवा फोटो काढण्याचा हट्टही धरला नाही. त्यामुळे खेळाडूंना मनसोक्त दंगा करता आला.

    अखेरीस खेळाडू इतके खुश झाले, की त्यांनीच कर्मचाऱ्यांना बोलावून फोटो काढले. इतकेच नाही, तर खास प्रशस्तिपत्रकही बहाल केले. मंगळवारी सायंकाळी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुसऱ्या कसोटीसाठी खेळाडू बंगळूरला रवाना झाले.

    सुनंदन लेले

  • चारोली

    आजच्या तरुणांकारिता

  • महासत्तेची पावले…

    आपल्या देशाने महासत्ता व्हाव ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील इच्छा आहे. २०२० पर्यंत इंडिया महासत्ता होईलच. पण भारत महासत्ता होईल का? एकीकडे झपाट्याने बदलणारा इंडियाचा कार्पोरेट चेहरा तर दुसरीकडे ‘जैसे थे’ स्थितीतील ग्रामीण भारत; याला महासत्ता म्हणता येईल का? अनेक खेडी ही समस्यांच्या अंधारात चाचपडत आहेत. अस्वछ्चता, स्थानिक राजकारण, नेतृत्वाचा अभाव, शैक्षणिक सुविधांचा अभाव, स्पर्धा परीक्षांबाबतची उदासीनता, सरकारी कर्मचाऱ्यांची मनमानी, अनिष्ठ चालीतीती या असंख्य अडचणींचा विळखा सुधारणा होऊ देत नाही. खेड्यातील तरुण व सुशिक्षित नागरिक एकत्र आले तर ही स्थिती बदलू शकेन.

  • पु ल देशपांडे यांची काही व्यक्तिचित्रे

    मला तर   नेहमी वाटत आले  आहे, जगावे ते पु. ल. कडून व्यक्तिचित्र लिहून घेण्यासाठी व मरावे ते अत्रेंकडून मृत्युलेख लिहून घेण्यासाठी. पु. ल. नी अनेक व्यक्तिचित्र लिहिली. काही खरी, तर काही अर्धकाल्पनिक. पु. ल. संपर्कातल्या लोकांकडे अतिशय डोळसपणे पाहत असत. आणि त्या व्यक्तीला टीपकागदासारखे टिपत असत.

  • बेवड्याची डायरी – भाग १० – “हॅलुस्नेशन” च्या गमती जमती !

    मॉनीटर मला भ्रम ..किवा भास होण्याबद्दल सविस्तर माहिती देत असतानाच तेथे शेरकर काका आले .. ही ऐक वल्ली होती ..प्रत्येक गोष्टीत काहीतरी मस्करी करणे ..हा शेरकर काकांच्या डाव्या हाताचा मळ होता..वयाच्या ६५ व्या वर्षी ..माणूस इतका कसा कार्यक्षम आणि गमत्या असू शकतो याचे मला नवल वाटे

  • भाडेकरार – संस्था, सदस्य आणि भाडेकरू यांच्या जबाबदाऱ्या

    भाग-२. मागील लेखामध्ये १ ते ५ प्रश्न उत्तरे आपण वाचली आहेत. आता ६ ते ११ या अंकामध्ये प्रसिद्ध करीत आहोत.

  • क्रिम ऑफ व्हेजिटेबल सूप

    थंडीच्या दिवसात गरमागरम सूप प्यायला मिळणे म्हणजे त्याची मजा काही औरच असते. घरातल्या घरात झटपट तयार होणार्‍या सूपच्या रेसिपीज् मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी..

  • जगातील जुनी योगशाळा – सांताक्रुझची योग इन्स्टिट्युट

    सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली.