(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • बोफोर्सच्या भुताची पंचविशी

    एखाद्याच्या मागे ठरावीक समस्येचा ससेमिरा कायम राहतो तशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. बोफोर्स प्रकरण बाहेर आल्यावर गदारोळ उडाला आणि त्या लाटेत काँग्रेसला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सत्तेवर आल्यावर येनकेनप्रकारेन हे भूत गाडून टाकायचे असा काँग्रेसचा निर्धार होता. त्या दृष्टीने केलेले प्रयत्न बर्‍यापैकी यशस्वी झाले. पण, आता इतक्या वर्षांनंतर हे भूत पुन्हा जागे होऊन काँग्रेसच्या मानेवर बसले आहे.

  • मुंबईच्या इतिहासाच्या पाऊलखूणा – ट्राम

    p-23032-BEST-Tram-in-mumbai

    ब्रिटिशकालीन मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्राम ओळखली जायची. ससून डॉकपासून थेट किंग्ज सर्कलपर्यंत या ट्रामचे जाळे पसरले होते. ऑपेरा हाऊस, चर्नीरोड, गोल देऊळ, सीपी टँक, ताडदेव, बोरिबंदर (आत्ताचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस), जे. जे. रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदी अनेक भागांमध्ये या ट्रामने प्रवास करता येत असे. BEST कडून ही सेवा चालवली जात असे. जसजशी मुंबईतील वाहनांची गर्दी वाढत गेली तसतशी ही हळूहळू चालणारी ट्राम बहुतेक त्रासदायक व्हायला लागली आणि अखेर बंदच झाली.

    काल फोर्टमधल्या हुतात्मा स्मारक परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याखाली गाडले गेलेले ट्रामचे रूळ पुन्हा दिसायला लागले आणि कधी काळी या ट्रामने प्रवास केल्याच्या मुंबईकरांच्या आठवणी जाग्या झाल्या. मला स्वत:ला माझ्या आजोबांबरोबर केलेला या या ट्रामचा प्रवास आठवतोय. बहुतेक दादर टीटी ते परळ असा हा प्रवास केला होता. दादर टीटी हा शब्द आपण नेहमी वापरतो. हा टीटी शब्द म्हणजे ट्राम टर्मिनस चा शॉर्टफॉर्म होता. परळलाही असेच ट्राम टर्मिनस होते आणि त्यालाही परळ टीटी म्हणत. या ट्रामचं तिकिटंही होतं काही पैसे किंवा काही आणे.

    ब्रिटिशांनी जशी रेल्वे मुंबईत आणली तशीच ट्रामही त्यांचीच देणगी. १८९५ मध्ये तेव्हाचे मद्रास आणि आताचे चेन्नई येथे विजेवर चालणारी ट्राम पहिल्यांदा धावली. कोलकात्यात १९०० मध्ये, मुंबई व कानपूरला १९०७ मध्ये आणि दिल्लीत १९०८ मध्ये ट्राम सुरु झाली.

    मुंबईतल्या ट्रामची योजना ब्रिटिशांनी १८६४ मध्ये आखली. ते कंत्राट त्यांनी स्टर्नस व किटरेज यांना दिले. आणि ९ मे १८७४ ला परळ ते कुलाबा अशी पहिली ट्राम ओढली गेली. होय... ओढली गेली कारण तीच्या इंजिनाच्या जागी होते सहा किंवा आठ घोडे. विजेवरची ट्राम यायला आणखी ३३ वर्षे गेली.

    मुंबईतली ट्राम जेव्हा बंद झाली तेव्हा शेवटच्या ट्रामच्या शेवटच्या फेरीला लोकांनी केवळ निरोप द्यायला तुफान गर्दी केली आणि ते ट्राम बरोबर ट्राम डेपो पर्यंत गेले. वाहनावरचे एवढे प्रेम बघून त्या चालकाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले.

    आता मजा बघा.. जोपर्यंत फोर्ट परिसरात सापडलेले ट्रामचे हे रुळ रस्त्याच्या खाली गाडले गेले होते तोपर्यंत कोणालाच त्यांची आठवण नव्हती. मात्र आता ते सापडल्यावर BEST ने ते आपल्या मालकीचे आहेत असे सांगत हे चारही रूळ व्यवस्थित उखडून ते आणिक आगार येथील बेस्टच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. खरेतर हे रुळ म्हणजे केवळ BEST च्या आठवणींचा ठेवा नसून मुंबईच्या इतिहासाच्या पाऊलखूणा आहेत.

    आणि तसेही आपल्याकडे रस्त्यांची कामे करताना पूर्वीप्रमाणे रस्ता खणून नव्याने बांधला जात नाहीच. असलेल्या रस्त्यावरच दगड आणि डांबराचे नवे नवे थर दिले जातात. प्रशासनाने इतक्या वर्षात रस्ते शास्त्रशुद्धपणे बांधले असते तर हे रुळ तब्बल ५० वर्षे गाडून राहिलेच नसते.

    मुंबईच्या अनेक रस्त्यांखाली ब्रिटिशकालीन मुंबईतील अशा अनेक ऐतिहासिक गोष्टी दडलेल्या आहेत. इतिहासाच्या या खुणा कोणाच्याही खिजगणतीत नसून नुसत्याच रस्त्याच्या अथवा रेल्वे स्थानकाच्या बाजूला पडून आहेत. या सर्वच गोष्टींच्या माध्यमातून मुंबईतील ऐतिहासिक ठेवा सांभाळून ठेवण्याची गरज मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करणारे इतिहासकार करत आहेत.

    -- निनाद प्रधान

  • जमली गट्टी

    चाफा बोलेना ….. या गाण्याच्या चालीवर रचलेली ही कविता…..

  • आजीच्या गोष्टी

    खूप काही शिकण्यासारखे ,विस्मरण झालेले...

    1 दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे.

    2. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तर हि तयार म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असतेच ते वाढते

    3 अन्नाचे एक शीत तरि सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकारांचे आयुष्य वाढते

    4 वाळवण घालताना आज्जी सूर्य मंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची

    5 रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफड चे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची, स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये

    6. मुंग्या ना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा ग बायनो, सुखात राहा,माझ्या लेकरांना डसु नका

    7 तुळशीला दिवा लावायची, चिलटे,किडे नष्ट होऊन घरात येत नाही.ती माझ्या घशाला अराम देते मी तुळशीच्या पानांना उब देते.

    8 लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे.
    भाकरी पण चंद्रा सारखी वाटते ,
    सावल्यांची भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, भुमातेला पण शांतता मिळते म्हणायची

    9 दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची

    10 झोपताना तांब्याच्या धातुतील तांब्या पाणी भरून डोक्याशी ठेवायची, चांगले असतेच पण तापलेल्या भु चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि अपल्याला शांती देते

    अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही.

    -- आरती सातपुते

  • फालतू टोल नाके बंद केले आणि आमदारांनी फटाके वाजवले…..

    लेखकः अनंत कुलकर्णी, ठाणे

    आघाडी सरकारचे वाभाडे युतीने काढले आणि युतीची सत्ता महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राच्या जनतेला टोलमुक्तीचे आश्वासन युतीने दिले होतेच. त्याला अनुसरुनच युतीने निर्णय घेतला आणि फालतू टोल नाके बंद केले.

    जे टोलनाके जनतेला त्रासदायक वाटत होते ते तसेच राहिले. मुंबईत प्रवेश करताना अजूनही टोल भरायला लागतोच. ठाण्याहून दररोज मुंबईत जाणार्‍यांचे रोजचे ७० रुपये आणि अर्धा तास बरबाद होतोच. परट्रोल - डिझेल जळते ते वेगळेच.

    पण सगळ्यात धक्कादायक आणि संतापजनक बाब ही आहे की हे टुकार टोलनाके बंद झाले तरीही त्या आनंदाप्रित्यर्थ आमच्या आमदारांनी फटाके वाजवले..... सेलेब्रेशन केलच....

    सरकारी गाड्यांमधून फुकट फिरणार्‍यांना जनतेची दुःख काय कळणार? कॉंग्रेंस असो की राष्ट्रवादी, भाजप असो की शिवसेना.. सगळे एकाच माळेचे मणी....

  • येणार्‍या काळात मराठी भाषेचं भवितव्य काय?

    मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी साहित्य संमेलनात तर हमखास केली जातात. भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नाही. भारतातील सर्व भाषिक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत. 

  • मुंबई येथील घटना

    संतश्रेष्ठ गजानन महाराज जेवले ती गोस्ट सांगणार आहे ज्यांची श्रद्धा नाही त्यांना पुरावा देऊ शकेल, साल २०००-२००१ नाशिक येथील भिसे पती (Retd.मॅनेजर बँक ऑफ बडोदा)पत्नी (Advocate) गजानन महाराज यांचे भक्त.नाशिक येथील कॉलेज रोड चा फ्लॅट सोडून मुंबई नाका येथे नवा फ्लॅट घेतला उद्देश हाच कि इंदिरानगर येथील श्री गजानन महाराज मंदिर जवळ पडेल..झाले नव्या फ्लॅट ची वास्तूशांत ठरली..पत्रिका तयार झाल्या पहिली पत्रिका श्री गजानन महाराज यांना द्यावी म्हणून दोघेही इंदिरानगर येथील मंदिरात गेले महाराजांना विनंती केली आज पत्रिका घेवून आलो आहे पहिला मान तुमचा तुम्ही आवर्जून यावे तुमच्या अशीर्वादा शिवाय कार्य पूर्ण होणार नाही,मनोभावे नमस्कार केला आर्जव केले आणि इतरांना पत्रिका वाटायला निघाले त्यानंतर वास्तू शांतीसाठी अनेक लोक आले प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली जेवणे झाली आणि लोक निघून गेली त्या नंतर केटरर्स ने त्याचे ताट,वाटी,पेले नेले..स्वयंपाक घरात स्टुलावर एक ताट राहिले होते जे (जेवल्या नंतर जसे असते तसे) भिसे साहेबांना त्यांच्या सौ.नी (Advocate) ताट आणून दाखवले स्वच्छ केल्यावर त्यांना वाटले कि हे ताट केटरर्स चे राहिले असेल त्यानुसार त्याला फोन केला तो म्हणाला चेक करतो त्या नंतर त्याचा फोन आला कि त्याचे सगळे ताट ज्यांना नं असतो ते व्यवस्थीत पूर्ण आहेत तुम्ही चेक करा कोणा नातेवाईक यांचे असेल ...भिसे दाम्पत्यांनी थोडी माहिती घेतली पण असे कसे नातेवाइकांना विचारणार..?आडून पाडून माहिती घेतली पण काहीच पत्ता लागेना एव्हाना सौ.भिसे यांनी ताट बघितले आणि श्री.भिसे यांना दिले आणि सांगितले कि ताटामागे कोणाचे नाव टाकले आहे काय..? श्री.भिसे यांनी पहिले तर त्यावर सं.ग.सं. शेगाव ताट क्र.३०१ असे होते (पूर्वी पासून भांड्यांवर जसे नाव टाकतात तसे..) त्यांनी सौ.भिसे यांना बोलावले आणि सांगितले कि प्रत्यक्ष श्री.गजानन महाराज आपल्याकडे जेवावयास आले होते आणि तुम्हा वकील मंडळींना पुरावा लागतो म्हणून हे ताट स्वतः महाराज येथे सोडून गेले आहेत..

    आजही ते ताट त्यांच्या घरी आहे..
    खरी गम्मत पुढे आहे...

    कर्णोपकर्णी हि वार्ता मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या गृहस्थांना कळली त्या मुळे ते थेट भिसे यांच्या घरी गेले त्या ताटा ची पूर्ण माहिती घेतली त्याचा आकार इ. आणि थेट शेगाव गाठले ..

    तेथे श्री.शंकर पाटलांना त्या प्रकारच्या ताटा संबंधी माहिती विचारली तेव्हा श्री.शंकर पाटील यांनी त्यांच्या सहाय्यकास तशी किती ताटे आहेत हि माहिती विचारली ?

    साहाय्यक म्हणाला अगदी त्याच धाटणीची १५०० ताटे आहेत.
    श्री.भिसे यांच्या ओळखीच्या गृहस्थांनी सहाय्यकास श्री.शंकर पाटील यांच्या मार्फत परत पाठवले आणि ताट क्र.३०१ आणावयास सांगितले..
    तो साहय्यक परत आला आणि म्हणाला एकूण १४९९ ताटे आहेत पण ताट क्र.३०१ missing आहे.

    ओळखीच्या गृहस्थानी सांगितले कि सदर ताट तुम्हाला मिळनार नाही कारण ते नाशिक येथे श्री.भिसे यांच्या कडे आहे.त्यांनी सदर माहिती श्री भिसे यांना कळविली.
    शेगाव चे श्री.शंकर पाटील जे शेगाव संस्थानांत मोठे अधिकारी सद्गृहस्थ त्यांना माहित आहेत शेगाविचा राणा भक्त प्रतिपालक भक्तांच्या इच्छा आजही पुरवितो..

    हि तो श्रींची इच्छा!!
    आजही ते ताट श्री व सौ.भिसे यांच्याकडे आहे
    हे लिहिण्याची प्रेरणा श्री.गजानन महाराजांचीच आहे कारण भिसे यांची श्रद्धा आणि त्यांचे निमंत्रण अगदी सहज आणि भक्तीने ओतप्रोत आहे आजही ते इंदिरानगर च्या श्री.गजानन महाराज मंदिराचे खजिनदार आहेत महाराजांची प्रचिती त्यांना मिळाली kvd मध्ये धार्मिक आणि डोळस श्रद्धावान आहेत...!!

    || जय गजानन ||
    || गण गण गणात बोते ||

  • लाघवी गौड सारंग

    एकाच कुटुंबातील असून देखील, स्वभाव वेगळा असणे, हे सहज असते. तोंडावळा सारखा असतो पण तरीही स्वभाव मात्र भिन्न असतो. किंबहुना, वेगळेपण असताना देखील, इतर चेहऱ्यांशी साम्य दिसते. भारतीय रागदारी संगीताचा सम्यक विचार करताना, मला बऱ्याच रागांच्या बाबतीत हे म्हणावेसे वाटते. सूर तेच असतात पण तोच स्वर कसा "घ्यायचा" म्हणजेच त्या स्वराची "जागा" कशी मांडायची, त्यामुळे तेच स्वर आणि तो राग भिन्न होत जातो आणि रागांमधील व्यामिश्रता अधिक खोलवर डोकावते. "गौडसारंग" रागाच्या बाबतीत हे साम्य बघताना, इतर अनेक रागांच्या आठवणी मनात येतात.
    "कोवळ्या अंधारी दर्याच्या किनारी
    बसते तशीच, एकटी एकटी.
    एकटी कशी - तुझ्या विचारांत;
    तुझ्या विचारात रंगता रंगता
    येते मनाला अशी काहीशी ओढाळ मस्ती".
    कवियत्री इंदिरा संतांच्या या ओळी, गौड सारंग रागाच्या काही छटा दर्शवतात. तसे बघितले तर शब्द आणि सूर, हे नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येतात परंतु कधीही एकजीव होत नाहीत तरीही काहीवेळा "अंतरीचा" भाव दाखवण्यासाठी दोन्ही माध्यमांची गरज भासते खरी.
    खरतर हेच साम्य, रागदारी संगीताचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल. एखादा राग सादर करणे म्हणजे केवळ सुरांची बेरीज-वजाबाकी असा गणिती कारभार नसून, त्या स्वराचा (जे स्वर सामायिक असतात ) नेमका "स्वभाव" जाणून घेऊन, त्याचे सादरीकरण गरजेचे असते. स्वराला "पैलू" असतात, ही इथे लक्षात येते.
    या रागात दोन्ही मध्यम लागतात (तीव्र आणि शुध्द) आणि बाकीचे स्वर शुध्द आहेत. अर्थात,हा राग ऐकताना, "बिहाग","छायानट" या रागांच्या आठवणी मनात तरळतात पण तरीही हा राग, आपले "वेगळेपण" सिद्ध करीत असतो. "सा" "रे" "ग" "म" या स्वरांच्या साहचर्याने स्वत:ची ओळख निर्माण करता येते.
    भारतीय संगीतात, बांसुरी वाद्याचा नेमका उगम कधी झाला, याबाबत संदेह बराच आहे. परंपरागत संकेतानुसार, कृष्णाकडे या वाद्याचा मान जातो. आधुनिक भारतीय संगीतात, या वाद्याची प्रतिष्ठापना खऱ्याअर्थी कुणी केली असेल तर, ती पंडित पन्नालाल घोष यांनी. वाद्याचा स्वभाव ओळखून, त्यात सुरांचा असामान्य मुलायमपणा पंडितजींनी ज्या प्रकारे ओळखला आणि त्याचे सादरीकरण केले, त्याला आजही तोड नाही. राग सादर करताना, त्याचे शुद्धत्व राखून, लयकारी आणि ताना इतक्या सुंदरपणे सादर केली आहे की ऐकणारा मंत्रमुग्ध व्हावा.
    अत्यंत ठाय लयीत सुरवात करायची, हळूहळू स्वरांचा "भरणा" करीत, रागाची बढत करायची, असा त्यांच्या वादनाचा सर्वसाधारण असा ढाचा ओळखता येतो. याचा दृश्य परिणाम असा होतो, रसिकाला प्रत्येक स्वराचा आनंद घेता येतो. वास्तविक, या वाद्याचा थोडा विचार केला तर हे वाद्य सतारीप्रमाणे "पूर्णत्व" मिळणारे वाद्य नाही पण तरीही पन्नालाल घोष यांनी, या वाद्यावर प्रभुत्व मिळवताना, वाद्याचा नेमका गुणधर्म ओळखून, ठाय आणि मध्य लयीत वादनाची गत राखली.
    या रागाचे वादन ऐकताना, आपल्याला याच गुणांचा आढळ येतो. अतिशय ठाय लयीत वादन करताना, प्रत्येक स्वर नेमका लावणे, स्वरांची बढत करीत असताना, कपड्यावर कशिदाकाम करावे त्याप्रमाणे स्वरांची रेखीव आकृती निर्माण करायची आणि लयकारी सादर करायची, याकडे वादनाचा कल दिसतो आणि तो कल, वाद्याचा गुणधर्म ओळखून सौंदर्यनिर्मिती करतो. वाजवताना, शक्यतो दीर्घ ताना न घेता, छोट्या स्वरावलींतून लय प्रगट करायचा आग्रह दिसतो. त्यामुळे, ऐकताना देखील रागाचे सौंदर्य सहजपणे न्याहाळता येतो. रचना द्रुत लयीत वाजवताना देखील, शक्यतो सुरांचा अवकाश हा अधिकाधिक मंद्र सप्तकात राखायचा, हा विचार स्पष्ट दिसतो.
    लताबाईंनी, त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत असंख्य भजने गायली आहेत तरीही या रचनेची अवीट गोडी काही निराळीच आहे. विशेषत: हिंदी चित्रपट संगीतात तर या रचनेचे स्थान अतुलनीय असे आहे. अत्यंत सशक्त शब्दकळा, त्यालाच जोडून निर्माण केलेली अप्रतिम संगीत रचना आणि त्याचे अतिशय परिणामकारक सादरीकरण, ही या रचनेची खास वैशिष्ट्ये सांगता येतील. खरतर, या रचनेत, फक्त "गौड सारंग" राग नसून, काही ठिकाणी "भूप" रागाची संगती लागते तरीही गौड सारंग रागाची दाट छाया, या गाण्यावर निश्चित आहे. आणखी विशेष सांगायचा म्हणजे, गाण्याचे बांधणी "दीपचंदी" या काहीशा अनवट तालात बांधली आहे. या तालावर आधारित फारशी गाणी ऐकायला मिळत नाहीत. एकतर हा ताल लयीला फार अवघड आहे. चौदा मात्रांचा ताल असून, "टाळी" च्या मात्रा वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने, वाजवताना,फार कौशल्य लागते.
    "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम;
    सबको सन्मति दे भगवान".
    या गाण्यात, सुरवातीपासून जरा बारकाईने ऐकले तर तालाच्या मात्रांचा हिशेब मिळतो. संगीतकार जयदेव यांची या गाण्यात बांधलेली लय तर केवळ अपूर्व आहे. गाणे फार वर-खाली चालत आहे म्हणजे मध्येच वरच्या सुरांत जाते तर क्षणात खालच्या सुरांत जाते. चाल अतिशय श्रवणीय आहे तसेच कविता म्हणून देखील, हे गाणे असामान्य आहे. साहीरचे शब्द प्रत्ययकारी आहेत आणि त्या शब्दांचा आशय, चालीतून नेमका दृग्गोचर होईल, याची काळजी घेऊन, गाणे बांधले आहे. लताबाईंनी गाताना देखील, याच वैशिष्ट्याचा विकास होईल, या भूमिकेतून गायले आहे.
    उर्दू साहित्यात, गझल साहित्याचे स्थान फार वरच्या स्तरावर आहे. बरेचवेळा, "गझल" हे कवितेचे वृत्त आहे, असे न मानता, "गझल" हा गायकीचा एक प्रकार आहे, असे मानले जाते. एका दृष्टीने हा विचार योग्य आहे पण, तरीही, गझल, ही एक कविता आहे, हे मान्यच करावे लागेल. अर्थात, गझल आणि गझल गायकी, हे दोन्ही भिन्न प्रकार आहेत. ज्या हिशेबात ठुमरी गायनाचे मोजमाप केले जाते त्याच प्रमाणे गझल गायनाचे देखील मापदंड आहेत आणि त्यात जगजीत सिंग यांचे नाव अग्रभागी आहे. अत्यंत मुलायम आवाज, शक्यतो गायन करताना, शब्दांना कुठेही "जखम" करायची नाही, हा विचार ठामपणे दिसतो!! कालांतराने त्यांची गायकी थोडीशी "एकांतिक" झाली तरी देखील, गझल गायनात त्यांनी आपले नाव प्रस्थापित केले, यात शंकाच नाही. "दैर ओ हरम मे बसने वालो" ही रचना,केरवा तालात गायली आहे.
    "दैर-ओ-हरम मे बसने वालो,
    मैखानो में फुट ना डालो".
    रचनेच्या सुरवातीलाच सरगमचा उपयोग केला आहे आणि पुढे देखील बऱ्याच ठिकाणी सरगम ऐकायला मिळते. ऐकताना रचना जरा द्रुत लयीत आहे, असे वाटते पण केवळ तालाच्या आघातामुळे, लय थोडी द्रुत वाटते. गायन ऐकताना, जगजीत सिंग यांच्या सगळ्या गायकीची वैशिष्ट्ये ऐकायला मिळतात. एखाद्या शब्दावर "खटका" घेताना देखील, त्या शब्दाचे पावित्र्य राखले जाईल, याकडे लक्ष दिलेले सहज समजून घेता येते. गौड सारंग रागाची ओळख करून घेण्यासाठी, ही रचना दर्शविता येईल.
    आता आपण, मराठीतील असेच एक "समृध्द" भावगीत ऐकुया. "काल पाहिले मी स्वप्न गडे" हेच ते गाणे. आशा भोसले यांनी आपल्या असामान्य गायकीने हे गाणे फारच अवीट गोडीचे करून ठेवले आहे. योगेश्वर अभ्यंकर, या काहीशा अप्रसिद्ध कवीने लिहिलेले हे गाणे, आपल्याला गौड सारंग रागाची आठवण करून देतात. संगीतकार श्रीनिवास खळे, यांनी ही चाल बांधली आहे. हा संगीतकार म्हणजे मराठी भावगीतातील अद्भुत रसायन होते. यांच्या बहुतेक चाली अतिशय संथ, तरीही गळ्याची परीक्षा घेणाऱ्या असतात. "गायकी" ढंगाकडे चाल बांधण्याची विशेष प्रवृत्ती दिसते. गमतीचा भाग असा असतो, गाणे ऐकताना, गाणे सुश्राव्य वाटत असते परंतु तेच गाणे गायला घेतले म्हणजे त्यातील "खाचखळगे" दिसायला लागतात आणि गाण्याची चाल भलतीच अवघड वाटायला लागते!!
    "काल पाहिले मी स्वप्न गडे,
    नयनी मोहरली ग आशा,
    बाळ चिमुकले खुदकन हसले,
    रंग सावळा तो कृष्ण गडे".
    सुरवातीच्या आलापीमध्येच आपल्याला गौड सारंग दिसतो. हा आलाप ऐकायला सहज, सोपा वाटतो पण गाताना घेतले तर आपल्याला समजेल की, आलापीत किती "अवघडले" पण आहे. तसेच प्रत्येक ओळ संपविताना, जे "खटके" घेतले आहेत त्याचबरोबर पहिला अंतरा सुरु करताना, एकदम वरच्या सुरांत रचनेला सुरवात करून, चालीतील "काठीण्य" दर्शवून द्यायचे, हा सगळाच भाग अतिशय विलोभनीय आहे.
    "छोटी छोटी बांते" या चित्रपटात "कुछ और जमाना कहेता है" हे गाणे गौड सारंग रागाची आठवण करून देतात. संगीतकार अनिल बिस्वास यांची स्वररचना असून, मीना कपूर यांनी गायले आहे. वास्तविक चाल अतिशय सहज गुणगुणता येईल अशी आहे पण तरीही स्वररचना नित ऐकली तर त्यात अनेक "कंगोरे" आढळतात.
    "कुछ और जमाना कहेता है,
    कुछ और है जिद मेरे दिल कि,
    मै बात जमाने कि मानू,
    या बात सूनू अपने दिल कि".
    गाण्याच्या चालीला बंगाली लोकसंगीताचा गंध आहे आणि त्यामुळे चाल खूपच श्रवणीय झाली आहे. अनिल बिस्वास यांची कुठलीही चाल ऐकायला घेतली म्हणजे त्यात काही ठराविक गुणांचा आढळ हमखास आढळतो. त्यात गाण्यातील "मेलडी" चा उल्लेख रास्त आहे. गाण्याची चाल कुठेही 'तुटक" वाटत नाही. एखादी सरळ, सलग रेषा ओढावी तशी स्वररचना चालत असते.
    हिंदी चित्रपटातील बहुदा पहिली "रागमाला" ही "हमदर्द" चित्रपटात, संगीतकार अनिल बिस्वास यांनी सादर केली. "रितू आये रितू जाये सखी री" या रचनेत, चार रागांचा समावेश आहे आणि त्यातील रचनेचा मुखडा हा "गौड सारंग" रागावर आधारित आहे.
    "रितू आये रितू जाये सखी री,
    मन के मित ना आये,
    जेठ महिना जिया घबराये,
    पल पल सुरज आग लगाये".
    अर्थात, रचना तयार करताना, आपण चित्रपटातील गाण्याची रचना तयार करीत आहोत, याचे नेमके भान दिसून येते. प्रत्येक रागातील नेमकी सौंदर्यस्थळे हुडकून, त्यातील भावनेचा भाग शोधून, त्या स्वरावलींचा गाण्याची चाल बांधताना, अतिशय समर्पक उपयोग केलेला आढळतो आणि जरी प्रत्येक कडवे वेगवेगळ्या रागात बांधले असले तरी समेवर येताना, कुठेही विसंगती निर्माण होणार नाही, याची वाजवी काळजी घेतली आहे. संगीतकार म्हणून अनिलदा यांचे हे नि:संशय प्रशंसनीय कार्य म्हणावेच लागेल आणि चित्रपटात रागमाला कशी सादर करायची याचा आदिनमुना सादर केला.
    - अनिल गोविलकर

  • महाराष्ट्रात विस्तारतेय अतिरेक्यांचे नेटवर्क

    गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिरेक्यांचे नेटवर्क विस्तारू लागले आहे. स्थानिक पातळीवरील गरजू, बेरोजगार तरुणांना हाताशी धरून नवनवीन अतिरेकी कारवायांच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यासाठी विविध शहरांमधून माहिती गोळा करणारे स्लिपर्स सेल कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या समाजजीवनाला लागत असलेली ही कीड वेळीच रोखली नाही तर राज्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.

  • मोतियाचे प्रकाशमान कंदील

    श्रावण संपला की पाठोपाठ सणाचा मौसम सुरु होतो. गणपती, नवरात्री आणि मग सगळ्यांचा आवडता सण दिवाळी.

    दिवाळी म्हटली की त्याच्यासोबत दिवे, पणत्या, आकाशकंदील या सगळ्या वस्तू येतातच. थर्माकोल, कागद, प्लास्टिक या निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या आकाश कंदिलांपेक्षा वेगळ्या वस्तू वापरून त्याचे आकर्षक आकाश कंदील बनवण्याचा निर्णय घेतला विलेपार्ले येथील नंदिनी जोशी यांनी.

    २०१४ च्या डिसेंबरमध्ये एका ठिकाणी नंदिनी यांनी मोत्याचे छोटे कंदील बघितले. त्यानंतर लगेचच त्यांनी अशा प्रकारचे मोठ्या आकारातले कंदील बनवायला सुरुवात केली. बघता बघता आठ महिन्यात त्यांनी २०० कंदील बनवून पूर्ण केले. त्यापैकी अनेक कंदील विकलेसुद्धा गेले.

    पहिला कंदील बनवायला नंदिनी जोशी यांना एक महिना लागला. त्याचा आकार कसा वाढवावा, एखादं डिझाईन त्या कंदिलात कसं बसवावं हे समजून
    घेण्यात महिना गेला. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितलं नाही. त्यांच्या काही मैत्रिणींनीसुद्धा यात रस दाखवला. नंदिनी यांनी स्वत:
    त्या मैत्रिणींना ही कला शिकवली आणि आज त्यांच्या मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला आहे. या सगळ्यांनी मिळून गेल्या काही महिन्यांत शेकडो कंदील बनवले असून त्यातले अनेक कंदील दिवाळीच्या आधीच विकले गेले आहेत.

    या आकाश कंदिलासाठी वापरलेल्या वस्तू जितक्या भन्नाट तितक्याच याच्या डिझाईन्ससुद्धा भन्नाट असतात. विमान, मासा, हंस, गोल, षटूकोन
    असे अनेक निराळे आणि भन्नाट आकार या आकाश कंदिलात बघायला मिळतात.

    आकाश कंदिलासारख्या कलात्मक प्रकारातली त्यांची ही भरारी खरोखरच प्रेरणादायी आहे.