एका संकेतस्थळावर बोली भाषेत भाषेत साहित्य पाठविण्याचा संदेश मिळाल्यावर विचारात पडलो माझी बोली भाषा कुठली. घरात हि हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा बोलली जाते. एकांतात विचार सुद्धा कधी हिंदीत तर कधी मराठीत करतो. शालेय शिक्षण हिंदीत आणि पुस्तके वाचून शिकलेली मराठी. या दोन्ही निश्चित माझ्या बोली भाषा नाही. कारण मला हिंदीतली कुठली हि बोली भाषा अवगत नाही. मराठीतील बोली भाषेचा प्रश्नच येत नाही.
आमचे आजोबा दिल्लीत स्थायिक झाले होते. वडिलांचे शिक्षण हि दिल्लीतलेच. आमच्या वडिलांची भाषा म्हणजे उर्दू, हिंदी, मराठीचे मिश्रण. जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात आम्ही भाड्यावर राहायचो तिथे पंजाबी, गुजराती, बंगाली, हिंदी भाषी आणि मराठी भाषी असे ८-९ भाडेकरू होते. शेजार बनिया आणि मुसलमान. आमचे घरमालक कडक शिस्तीचे होते. वाड्यात राहणाऱ्या कुणा मुलाच्या तोंडून ‘साला’ शब्द जरी बाहेर पडला तर श्रीमुखात फडकावयाला कमी करत नसे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर तोंड-हात धुवायचे आणि नंतर आई देवासमोर दिवा लावायची. रामरक्षा आणि शुभंकरोती म्हणायचो. (आंम्हाला तीच मराठी वाटायची, नंतर कळले रामरक्षा आणि स्त्रोते इत्यादी संस्कृत भाषेत असतात).
जुन्या दिल्लीत मराठी परिवार हि होते. रविवारच्या दिवशी सर्व मराठी मुले, महाराष्ट्र समाजात खेळायला जमत असू. आपसांत बोलताना सुरुवात मराठीतून व्हायची आणि नंतर केंव्हा हिंदीत बोलू लागू कळत नसे. कुणी मोठ्यानी टोकले ‘जरा मराठीच बोला’ तेंव्हा लक्ष्यात यायचे. अश्यारितीने अधकचरी मराठी बोलायला शिकलो. माझ्या बोली भाषेवर - उर्दूची अदब आणि तहजीब, शुद्ध हिंदी (शालेय शिक्षक) आणि घरची मराठी या सर्वांचा परिणाम झाला. वर्ष-दोन वर्षांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्ही नागपूरला जायचो. तिथे गेल्यावर वाटायचे इथली मुले किती असभ्य. यानां बोलण्याची तमीज सुद्धा नाही. मोठ्याशी हि अरे-तुरे करतात. तिथे आमची, “काका आपल्या साठी पाणी आणू का?(चाचाजी आपके लिये पानी लाऊं क्या).” काका वैतागून म्हणायचा हे काय आप, आपण लावून ठेवले आहे, अरे मला तू म्हणत जा. पण मला, आपल्यापेक्षा मोठ्यांना तर सोडा, लहान मुलांना हि, ‘तू’ म्हणणे आजगयात जमले नाही.
आई भंडार्याची होती. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यात एक दोन वेळा आजोळी गेलो होतो. तेही ८-१० वर्षाचा होतो तेंव्हा. एवढे आठवते, आम्हा भावंडांचे बोलणे ऐकून, तुम्ही मुसलमान आहात का? अशी विचारणा केल्या गेली. नंतर एकदा लहान मामाच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो. नुसती मुंडी हलविण्याचे काम केले, कारण लोक काय बोलत आहे काहीच कळत नव्हते. असो.
पुन्हा प्रश्न आलाच, माझी बोली भाषा कुठली. मला आठवले, एकदा माझ्या भावाला एक शेजारच्या मुलाने शिवी दिली, दगड हातात उचलीत तो म्हणाला, “मनोजजी, इज्जत से बात कीजिएगा, आइन्दा बत्तमीजी की तो हमसे बुरा कोई नहीं होगा, हमारा निशाना सटीक है, तुम्हारा डोक फोड़ दूंगा. समझे.” बहुधा हीच माझी बोली भाषा. कारण भांडताना आपण आपली खरी भाषा लोकांसमोर उघडी करतो.
-- विवेक पटाईत
तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी; माझे मीपण हरवून तुझ्यात हरवलेला मी…. जेव्हापासुन तु(सह्याद्री) आयुष्यात आलिस तेव्हापासुन असंच वाटु लागलंय.. कूठुन आलोय, कुठे जायचयं, दिशाहीन भरकटलेल्या नावेसारखा या माणसांच्या समुद्रात मी वाहत चाललो होतो…तुझ्या येण्याने निदान प्रवाह तरी मिळाला.. …
ऊन-पावसाच्या खेळात व धुक्यात हरवणारा गगनचुंबी डोंगर म्हणजे रायगड जिल्ह्यातील पाली येथे असलेला ‘सरसगड’ जो आजही शिवरायाच्या स्मृती जागृत करून देतो. स्वराज्य मिळवून देण्यासाठी या सरसगडाचे मोठे योगदान असल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो..
सौंदयर्… हेच का ते?
अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे……
ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतला एक अद्भुतरम्य चमत्कार आहे. चमत्कारंच! त्यांचं भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद वदवून घेणं हे चमत्कार कुणी श्रद्धेनुसार मानावेत वा न मानावेत.. सोळाव्या वर्षी एखादी व्यक्ती गीतेवर इतकं रसोत्कट, सखोल आणि सामान्य सकळांना आपलंसं वाटणारं, जीवनोद्धार करणारं भाष्य लिहिते, अभंग रचते, अखिल विश्वासाठी पसायदान मागते, वारकरी पंथाचा पाया रचते, एकविसाव्याच वर्षी संजीवन समाधी घेऊन आपल्या कार्याची इतिश्री सुद्धा करते आणि साक्षात सर्वनाशी काळ त्या व्यक्तीचा मोरपीस आपल्या माथ्यावर अभिमानाने धारण करतो तेही अनंत काळासाठी!! यापरता दुसरा चमत्कार कुठला? हा चमत्कार नक्कीच कुणालाही अमान्य करता येत नाही!
अगदी कोवळ्या वयात, आज आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या हालअपेष्टा सोसून सामाजिक क्षोभाला तोंड देऊन सुद्धा माऊली आपल्या लेखनात समाजाविरुद्ध तिरस्कार वा दुःख दाखवणारा उद्गार काढत नाहीत याचं कारण म्हणजे त्यांची जन्मसिद्ध करुणा, याचं कारण म्हणजे त्याचं माऊलीपण, याचं कारण म्हणजे तुकोबांच्या शब्दात सांगायचं तर 'बुडते हे जन पहावेना डोळा' हेच. सगळे अपराध पोटी घेऊनसुद्धा असलेल्या कळवळ्याचं कारण, मातृप्रेमाचं सहृदय प्रयोजन ही माऊलींच्या नम्रतेची एक लोकविलक्षण खुण आहे.
सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ सिद्ध करून इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकमान्यता मिळूनही माऊलींचा समाजाप्रती हेटाळणीचा उद्गार नाही. इथे या नम्रतेचं विशेष वाटतंच पण त्याचसोबत या वयात थोडं जरी वेगळं आणि मोठं काम केलं तरी सामान्यपणे असलेली एक अभिमानाची जाणीव, तो मिरवण्याची तहान माऊलींनी केव्हाच सोडून दिलेली पाहून किंबहुना ती प्रकटलेलीच नाही हे पाहून आश्चर्य वाटलं नाही तर नवलच! गीताभाष्याचं इतकं अलौकिक कार्य तितक्याच समर्थपणे पार पाडून माऊली म्हणतात काय? 'रचिली धर्मनिधाने । निवृत्तीदेवे' असं म्हणून माऊली सारं श्रेय आपल्या गुरूंना देऊन मोकळे होतात. हे देशीकार लेणं निर्माण करताना देखील आरंभी आपली ओळख 'म्हणे निवृत्ती दासु । अवधानी जोजी' अशीच करून देतात माऊली. बोली अरुपाचे रूप दाखवून देण्याची, अतींद्रिय इंद्रियांकरवी भोगवून देण्याची माऊलींची प्रतिज्ञा त्यांनी सार्थ सुफळ केली आहे हे आपण जाणतोच. पण तसं केल्यानंतरही त्यांचा निर्वाळा काय? तर 'म्हणे निवृत्तीदासु। ज्ञानदेवो' ग्रंथारंभी हे नमन आणि विनम्रता आजच्या काळात एक वेळेस स्वाभाविक वाटेलही. पण इतकं विलक्षण आपल्या हातून घडलं असताना, शेवटी देखील तितकीच समर्पित विनम्रता असणं या माऊलींच्या शालीनतेला विशेषणच नाही! ही अभिजात शालीनता आपण जेव्हा जेव्हा म्हणून पाहतो तेव्हा ती अध्यात्मचाच नव्हे तर आयुष्याच्या एकूण कोणत्याही क्षेत्रात कुठल्याही मार्गावर माणसाला नम्रच ठेवते. माऊलींची गुरूंप्रति, पांडुरंगाप्रति आणि तोच 'जळी स्थळी भरला' म्हणून प्रत्येक ठिकाणी दिसणारी ही बहुपदरी शालीनता म्हणजे भक्ती योगाचं निधानच वाटतं!
खरंतर सर्वच संतांमधे हा नम्रपणा दिसतो. गुरूंना अर्पण केलेलं श्रेयस आणि प्रेयस दिसतं. पण ज्ञानदेव याबाबतीत कुठेतरी अधिक महत्त्वाचे वाटतात. कारण ज्ञानदेव या सर्वांचेच पूर्वासुरी, आणि प्रत्येक संतांच्या अभंग निर्मितीवर, स्व-भावावर परंपरेतील पूर्वासुरींचा प्रभाव पडणं, संस्कार होणं स्वाभाविक आहे. ही नम्रता ही परंपरेतून प्रवाही झालेली दिसते आणि प्रत्येक संताच्या ठाई वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विलास झालेला दिसतो. या नम्रतेचं मूळ देखील माऊलीच आहेत. निवृत्तीनाथ निश्चित आहेतच, पण अधिक मोठ्या प्रमाणात आणि माऊली म्हणजे संप्रदायाचा पाया असल्यामुळे हा निर्देश माउलींकडेच अधिक जातो.
साक्षात शारदा जिव्हेवर असताना, ज्ञानसंपन्नता ओथंबून वाहत असताना देखील माऊलींची गुरुनिष्ठा सुटत नाही की विठ्ठलभक्तीचे पाझर आटत नाहीत. इथेच या शालीनतेची महती कळते. 'ज्ञान गिळूनि गावा गोविंदा रे' असा उद्गार म्हणूनच त्यांच्या आतून येतो, नव्हे तो भावनिक मानसिक वर्तवणूक या सर्वच पातळ्यांवर अखंड असतो.
माऊली एका ठिकाणी म्हणतात की 'बहु जन्म आम्ही, बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले, कृपा केली' सहज वाटतं, की माऊलींकडे थोडीच शब्दांचा दुष्काळ होता? इंदिरा संतांच्या शब्दांत सांगायचं झालं तर कवीकडे शब्दांची रांजणं भरलेली असतात आणि माऊली तर परतत्त्वाचा अमृतरस शब्दांत पेलणारे कवी! त्यांना कसली शब्दांशी वानवा? वाटतं की या ओळींमध्ये ते सहज लिहू शकत होते की 'बहु जन्म आम्ही, बहु पुण्य केले, तेव्हा मिळविले, विठ्ठलास' किंवा 'तेव्हा हे लाभले, संतपण' वगैरे वगैरे.. पण ते तसं लिहीत नाहीत. त्यांना तसं वाटतही नाही, कारण त्यांच्यासाठी आम्ही बहुजन्मांमध्ये बहु पुण्य केले म्हणून आम्ही त्याची कृपा मिळविली असं म्हणण्यापेक्षा तेव्हा त्याने कृपा केली हे म्हणणं अधिक अर्थपूर्ण आहे. त्यातून आपोआप अहंकार लोक पावतो. स्वतःचं महत्त्व कमी होत नाही, पण 'त्या'ला निश्चित आपल्यापेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं, त्याच्या कृपेने आपलं महत्त्व वाढतं, आपल्यामुळे नाही! माऊलींची हीच शालीनता त्यांच्या ललितरम्य शैलीतून जागजागी खुणावत राहते.
म्हणूनच त्यांच्या आरतीमध्ये यथार्थपणे 'महा कैवल्यतेजा' असं म्हटलं असलं, तरी हे तेज आपल्याला दाहक किंवा भिववून टाकणारं वाटत नाही. सामान्यातल्या सामान्यांना सुद्धा ते अगदी आपलंसं वाटतं. कारण, माऊली 'चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन' असेच तर आहेत! म्हणूनच, तेज होऊन तेजाला शब्द देणं असंच वाटतं माऊलींच्या बाबतीत! आपण खरे कुणीच नसताना आपला 'मी' मात्र इतका ताठ उभा असतो त्याला अंतर्बाह्य लाजवून टाकणारी ही अभिजात शालीनता म्हणजे माऊली! म्हणूनच तर माऊली अमृतानुभावाची फुलं वेचू शकले.. आधी त्यांचा बहर सबाह्य फुलारला होता म्हणूनच ही शालीनताही उत्फुल्ल होती.
आपल्याला किमान त्यांच्या अभंगाची फुलं अशी वेचता आली, आस्वादता आली, तरी देखील थोडीफार नम्रता अधिक वाहू लागेल रक्तातून. त्या फुलांचे सुगंधी लाभ तर थेट आपल्या देठात रुजणारे! माऊलींच्या अशा अगणित अ-भंग फुलांपैकी ओंजळभर जरी वेचता आली तरी सार्थक होईल आयुष्याचं! ज्या भूमीत 'माऊली' नावाचा शीतल मोगरा सर्वांगी फुलून आला तिथे जन्मल्याचं केवढं आपलं भाग्य!
फुले वेचिता बहरु..
-पार्थ जोशी
28parthjoshi@gmail.com
हा टोलचा राक्षस गाडूनच टाकायला हवा. महाराष्ट्रातील जनता सोशिक आहे म्हणूनच हे राज्यकर्ते रस्त्यावरुन फिरु तरी शकतात. तामिळनाडूमध्ये हा उद्योग करुन बघा बरं... एकेकाला लाथ मारुन हाकलून देतील .....
Anil Nachane - anc@gmail.com
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषाशुध्दीसंबंधी मूलभूत योगदान दिले आहे. त्याचे पुतणे श्री. विक्रम सावरकर यांचेशी फोनवर अनेक वेळा बोलतांना, बरेच मराठी शब्द स्वातंत्र्यवीरांनी सुचविल्याचे कळले. महापौर, कलामंदीर (स्टुडियो), दिग्दर्शन, दिनांक वगैरे सुटसुटीत आिण चपखल मराठी शब्द सावरकरांचेच. परंतू त्यांनीच सुचविलेली अ ची बाराखडी मागे का राहिली? त्यासंबंधी काही विचार….
सुप्रसिद्ध चित्रकार कै कमलाकांत राजे यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून निर्माण झालेले, मराठीसृष्टी प्रस्तुत श्री गणेश कला हे इ-पुस्तक श्री गणेशाच्या विविधांगी चित्रांवर आधारित असून अशाप्रकारचे कदाचित एकमेव पुस्तक असावे. या संक्षिप्त इ-पुस्तकात निवडक २१ कलाकृतींचा समावेश आहे. संक्षिप्त पुस्तकाची किंमत रु.१००/- असून ते मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी मोफत उपलब्ध केले आहे.
आशा आणि अपेक्षा या दोन जुळ्या बहिणी....
जिथे जिथे आशा असेल तिथे तिथे अपेक्षा भेटणारच...
मनुष्यप्राणी आशेवरच जगतो... आणि सतत कसलीतरी अपेक्षा करतोच करतो..
माणुसच कशाला.. अगदी कोणताही प्राणी तेच करतो..
आपण कोणाकडूनतरी कसलीतरी अपेक्षा करतो.. आपल्याला आशा असते की आपली ती अपेक्षा पूर्ण होईल..
कधीकधी आशा आणि अपेक्षा अगदी १०० टक्के पावतात आणि सहजगत्या प्राप्त होतात..
पण कधीकधी अगदीच अपेक्षाभंग होतो..
आशा कधी निराशेत परिवर्तित होते ते कळतंच नाही..
अशावेळी अपेक्षाभंगाचं दु:ख होतं आणि ते पचवायला फार कठीण होतं..
अशी निराशा आणि अपेक्षाभंग आपल्या जवळच्या माणसांकडून पदरी पडला तर त्याचं दु:ख जास्त होतं..
पण मग सुखी रहाण्यासाठी काय करायचं ?
साधं.. सोप्प आहे..
“आशा”च करायची नाही.. म्हणजे निराशेला आपल्याकडे येण्याचं कारणंच नाही...
“अपेक्षा” ठेवायचीच नाही.. म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख पचवायची वेळच येणार नाही..
मी तेच करायला सुरुवात केलेय.. तुम्हीही करुन बघा..
आयुष्य जास्त आनंदी होईल !!
Copyright © 2025 | Marathisrushti