र्पियकाराला र्पेयसी मेटलयावर काय वाटत ते वरणन केले आहे.
पूर्वी अंगण मोठे असायचे. त्यात मुलांना खेळण्यासाठी जागा असायची. विशेष म्हणजे अंगणभर पुरेल अशी सावली देणारं मोठं झाडही असायचं. आजीच्या संगतीनं नातवंड झाडाखाली बसुन अनेक गोष्टी ऐकत बसायचे. ते बालपण खरच मोठे गमतीशीर आणि नशीबवान होतं.. असो…
अंगणातून रस्त्यावर आलेल्या आणि नंतर बोन्साय बनुन घराच्या गॅलरीत आलेल्या झाडाची स्वत:ची एक कहाणी असेल का? असू शकते ना? तर अंगणातलं हे झाड बोलू लागलं, म्हणालं, मलापण जरा बोलू द्या, खुप दिवस झाले कुऱ्हाडीचे घाव मुकपणाने सोसुन. आता बोललं पाहिजे….
जमिनीत रुजलेलं माझं बालपण अंकुरलं…. बहरलं… आणि वाढलं… उन, वारा, पाऊस अंगावर झेलतं वाढत होतं, फांद्यांचं फुटणं आणि पानांच बहरणं अनुभवलं होतं मी. जमिनीपासुन जरी उंच होत असलो तरी मुठीत माती घट्ट धरलेली होती. कधी सोडली नाही मातीची साथ. फांद्या फोफावू लागल्या, पानं बहरू लागली… मस्ती होती वाढण्याची.. जगण्याची. अशातच एक दिवस एक चिमणी उडत अलगद येऊन बसली माझ्या खांद्यावर… तिचा चिवचिवाट लोभस वाटू लागला, ऐकत रहावासा वाटू लागला. थोड्यावेळाने तिचा जोडीदारही आला. तसे क्षणभरात दोघेही उडाले.. थोड्या वेळाने दोघे परत आले. दोघांच्या चोचीत काड्या होत्या, घरटे बांधण्यासाठी. माझ्याच एका फांदीवर त्यांनी घरटं बांधलं. त्यांच चिवचिवणं मला रोज ऐकायला मिळेल हे पाहुन मनोमन समाधान वाटलं. चिमणा-चिमणीचा संसार बहरला… फुलला..
माझ्या फांद्यां पसरत होत्या, तशी माझी सावलीही वाढत होती. या सावलीत अनेक प्रकारची माणसे येऊन बसत होती. त्यांच्या गप्पांचे विषयही वेगवेगळे असायचे. काही खलबतेही करत रात्री बसुन माझ्या आडोशाला. काही रचत डाव, माणसांचे पाय ओढण्याचे. मी मात्र सारे जाणुनही गप्प असायचो. सगळं साठवून ठेवलंय आतल्या आत…
पुढे दिवस पालटत गेले, वातावरणात बदल होत गेले. तसे माझ्यातही बदल होऊ लागले. पानगळीचा मोसम सुरू झाला. माझ्याच अंगाचा भाग असलेली पानं मला सोडून जाऊ लागली. ज्यांच्या असण्यानं माझ्या सौदर्यांत भर पडत होती ते मला सोडून जाऊ लागले होते, त्यांचं हिरवेपण जाऊन शुष्कता आली होती. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर ती माझ्यापासुन दूर जाऊन पडत होती. त्यांच्या दुरावण्याचं दु:ख होतं. पण जुनं गेल्यावरच नव्याला जागा मिळते हे मी जाणत होतो… त्यामुळे हे दु:ख क्षणभराचं होतं. ऋतू बदलला तशी नवी, हवीहवीशी कोवळी पानं पुन्हा माझ्या फांद्यांमधुन उमलू लागली. सृजनाच्या या सोहळ्याचं वर्णन तरी कसे करणार…
हे सारं चांगलं चाललेलं असताना, कुणाची नजर लागली कुणास ठाऊक? खांद्यावर कुऱ्हाडी घेऊन आलेल्या दोघांनी कशाचीही तमा न बाळगता थेट घाव घातला माझ्या हृदयावर… असंख्य वेदनांची त्सुनामी शरीरभर पसरली… वेदनेचा हुंकार पसरला… पण तो कुणाला ऐकू जाणार होता…!
कोण ऐकणार होत…!
दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये सौ. इंदिरा दास यांनी लिहिलेली ही कविता
नतमस्तक तुझ्या चरणी हे प्रभू मी सदा
बरसणार कारे सुखाचा यंदा ।।
भिजले कारे काळी माती
होतील कारे तडे हद्दपार
उगवतील कारे टपोरे मोती
बनेल शिवार हिरवे गार
नको गुरांचे हाल अन् खेळ जिवाशी औंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।। १ ।।
देशील कारे आनंद आमुच्याही वाटी
भरशील कारे पैशानी झोळी मोठी
नको तो अवकाळी पाऊस
नको तो गारपिटाचा मारा
नको कर्जबाजार अन् फाशीचा फंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।।२।।
पेरीन मी बियाणे पांघरुन काळी माती
वाढतील रोपे शेतामंदी करतील दाटी वाटी
करीन मी मशागत अन् कापणी मळणी
भरीन माझे घरकुल धानियांच्या कणग्यांनी
नको करु देवा चुराडा सपनाचा अन् नशिबाचा सौदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...।।३।।
देवानी दिल रे परी दैवानी नेलं
सौदा कराया मंदीमंदी आला दलालं
झाला दलालं शिरीमंत, मी मात्र कंगाल
फेडू कसे कर्ज आता, झालो मी हवालदिल
देवा नको हा नशिबाचा सौदा अन् दलालीचा धंदा
बरसणार कारे पाऊस सुखाचा यंदा...॥४॥
- सौ. इंदिरा दास मैत्री गार्डन, ठाणे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
२१ वॉर्ड ऑफिस, चार जिल्हा उपनिबंधक कार्यालये, एक विभागीय सहनिबंधक कार्यालय आणि त्यामध्ये नोंदणी झालेल्या ३३६०० सहकारी संस्था. या संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणारी शासकीय यंत्रणा म्हणजे सहकार खात्याचा मुंबई विभाग. त्यांच्याकडे कर्मचारी अवघे २५०!
संसारी लोणच्याच्या फोडी आधी
करकरीत असतात,
नंतर कुरकुरत का होईना
हळूहळू मुरतात.
हे लोणचं बाजारात मिळत नाही
कुटुंबानं मिळून ते घालायचं
असतं त्याशिवाय जगण्याला
चव येत नाही...
कडवट शब्दांची मेथी जरा
जपूनच वापरावी
स्वत:च्या हातांनी कशाला
लोणच्याची चव घालवावी ?
जीभेने तिखटपणा आवरला तर
बराच फायदा होतो
लोणच्याचा झणझणीतपणा
त्यांन जरा कमी होतो.
"मी" पणाची मोहरी जास्त झाली
तर खार कोरडा होतो
इतरांच्या आपुलकीचा रस
त्यात उगाच शोषला जातो.
रागाचा उग्र हिंग तसा तितकासा
बाधत नाही
लवकर शांत झाला तर
लोणच्याची चव बिघडत नाही.
प्रेमाची हळद लोणच्याला खरा
रंग आणते
विकारांच्या बुरशीपासुन संरक्षण
ही करते.
समृध्दीचं तेल असलं की
काळजीचं कारण नसतं..
त्या थराखाली लोणचं बरचसं
सुरक्षित असतं...
लोणचं न मुरताच नासावं तसं
काही संसारांच होतं
सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण
बहुदा कमी पडलेलं असतं....
आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो?
मागच्याच मंगळवारची गोष्ट आहे. मी सकाळी दुध आणायला गेले असताना तो माझ्या गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता. कसाबसा जोरात ब्रेक मारून मी गाडी उभी केली होती आणि गाडी बाहेर येऊन त्याला खूप ओरडले होते. माझा राग अनावर झाला होता.
"कळत नाही का रे? एवढी गाडी समोरून येत आहे, दिसत नाही का रे? जोरात हॉर्न वाजतोय, तुला ऐकायला नाही आले? असे गाडी समोर येतात आणि मग तुमचे आईवडील याचे भांडवल करून आमच्या सारख्या माणसांकडून पैसे काढतात. कोण आहे मोठे तुझ्याबरोबर? बोलव इकडे."
मी तावातावाने इतके सगळे बोलत होते तरीही एक नाही की दोन नाही. तो आपला निर्विकारपणे माझ्याकडे बघत होता. जशी काही मी अगदी मूर्ख. मी जे काही बोलत होते त्याच्याशी जणू काही त्याचा संबंधच नसावा. मला अतिशय राग आला होता. त्या रागातच काहीतरी बडबड करत मी पुन्हा गाडी चालू करून घरी आले. डोक्यात राग तसाच होता. चहा केला, चहा घेता घेता माझी आपली बडबड चालूच होती. " आज नशीब चांगलं होतं. तो मुलगा वाचला नाहीतर सकाळी सकाळी पोलीस चौकीत जायची वेळ होती." “काय झाले? काय बडबड चालली आहे तुझी?” सासूबाई म्हणाल्या. “काही नाही” असे म्हणून समोर पेपर पडला होता तो वाचायला घेतला आणि वाचता वाचता जरा राग ही शांत झाला आणि सगळा प्रकार विसरूनही गेले. नंतर पूजा करताना मला त्याचा तो निरागस शांत, माझ्याकडे कुतूहलाने बघणारा चेहरा आठवला.
सात-आठ वर्षाचाच असावा तो. लांब, फाटका तुटका कोणीतरी दिलेला जुना कोट त्याच्या अंगात होता. पायात पायजमा होता परंतु तो देखील मापाचा नसावा. खाली खूप दुमडून दुमडून त्याने तो स्वत:च्या उंचीचा केलेला होता. पयत चप्पलही नव्हती. लांब वाढलेले काळेभोर केस. त्याला कित्येक महिन्यात तेलही लावलेले नसावे त्यामुळे ते राठ दिसत होते. शेंबडाने भरलेले नाक, काळा सावळा रंग आणि त्याच्या उंचीपेक्षाही जास्त लांब वाटणारे पाठीवर टाकलेले सिमेंटचे पांढऱ्या रंगाचे कचऱ्याने, व प्लास्टिकच्या तुटक्या फुटक्या बाटल्यांनी भरलेले पोते होते. असा तो निर्विकार चेहऱ्याचा मुलगा मला आठवला आणि काळजात चर्रर्र झाले.
असे वाटले, अरे हा एवढासा चिमुरडा इतक्या थंडीत कचरा गोळा करत फिरत होता. दिवस पूर्ण उगवलाही नव्हता. थोड्याशा अंधारातच कसलीही भीती न बाळगता तो आपल्या आईवडिलांना मदत करण्याचा प्रयत्न करत असावा. मी इतके सगळे बोलले त्याला, आरडा ओरडाही केला पण त्याला ‘आईबाबा’ तरी असतील का?"
मला गाडीत बसून, हिटर चालू ठेऊन अंगात स्वेटर घालून बाहेरच्या थंडीची कल्पनाही नव्हती आणि हा मात्र इतक्या थंडीत सकाळी सकाळी कानटोपीही न घालता, अनवाणी फिरून कचऱ्यातून काहीतरी शोधून दोन पैसे मिळतील का ते पहात होता.
कदाचित त्याने माझी समोरून येणारी गाडी पाहिलीही असेल, हॉर्न ऐकलाही असेल पण रस्त्यापलीकडे समोर पडलेला कचरा त्याला जास्त महत्वाचा वाटला असवा. किंबहुना त्यामध्ये त्याला त्या दिवसाची ‘रोजी-रोटी’ही दिसली असेल.
त्या चिमुरड्या पावलांना "अरे गाडी आहे, थांब" असा त्याच्या मेंदूचा संदेशही ऐकू आला नसेल. असे नको नको ते विचार मनात येऊन माझे मन खूप बेचैन झाले.
आपण आपल्या मुलांना किती जपतो. ‘अरे स्वेटर घाला, बूट घाला, डोक्याला टोपी घाला’. या बिचाऱ्याला असे सांगायला तरी कोणी असेल का? चपलात पावलांना जाणवणारी ऊब, डोक्यातल्या टोपीने कानांना जाणवणारा उबदारपणा कसा असतो याची त्याला कल्पना तरी असेल का? असे अनेक चटका देणारे विचार मनाला शिवून गेले आणि मला स्वत:चीच लाज वाटली.
तेंव्हापासून माझ्या मनात सारखा विचार येत आहे की तो माझ्याकडे एकटक का बघत असावा? कदाचित तो असा विचार तर करत नसेल की "काय मूर्ख बाई आहे, मला काय वेड लागले आहे की मी कारणाशिवाय गाडीसमोर पळालो? हिला दिसत नसेल की समोरच्या एवढ्या बाटल्या आणि कचरा मी उचलून पोत्यात टाकल्या आणि विकला तर मला आज पैसे मिळतील आणि आजचे जेवण मिळेल"
ह्या विचाराने माझे मन अगदी उदास झाले. असे वाटू लागले की त्या चिमुरड्या मुलाला एकदा तरी 'Sorry' म्हणावे. परंतु तो मला परत दिसलाच नाही. आजही त्या रस्त्यावरून जाताना माझे डोळे त्याला शोधत असतात. माझ्या मनाला एक 'रुखरुख' लागून राहिली आहे.............
सौ. वैजयंती गुप्ते
9638393779.
कोणी म्हणत तू खूप पुढचा आहेस… कोणी म्हणत चांगला आहे तर कुणी वाईट… नक्की मी कसाय हे कुणालाच कस कळलं नाही अजून..? मी कुठे चुकलो ज्यामुळे माझेच मित्र माझ्याबद्दल वेगळं वेगळं बोलतेत …? खरंच काय चुकीचं वागलो.. कुठे चुकतो मी …..??? काय चुकत नक्की माझं…..?
बऱ्याचवेळा पत्र पोस्ट करण्यासाठी पोस्टात जावे लागते किंवा कुरियरने पत्र किंवा टपाल पाठवावे लागते. पण या मागचा इतिहास माहीत नसतो आणि करून घेण्याची कोणी तसदी घेतही नाही. मग अश्यावेळी आठवते ती कविता रूपी पोस्टाचा इतिहास जो त्याने स्वत:च सांगितला आहे..!!
Copyright © 2025 | Marathisrushti