(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कुन फू पांडा – चक्क मराठीत !!!!!

    कुन फू पांडा – चक्क मराठीत !!!!!

  • तो असायला हवा होता म्हणून

    स्थळ : १० वी 'ब' वर्गाचा पहिलाच दिवस.बालमोहन विद्यामंदिर,दादर, मुंबई.
    काळ : (पालकांनी आडून आडून सुचविल्याप्रमाणे) गांभीर्याने घेण्याजोगा.
    वेळ : १३ जून १९७७, सकाळी १०.४२.
    प्रवेश पहिला : (वर्गात गलबला. एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे मराठेसर वर्गात प्रवेश करतात आणि वर्गातील कुजबुज आपोआपच कमी कमी होत वर्गात संपूर्ण शांतता पसरते.)
    मराठेसर पाच मिनिटे 'राष्ट्राच्या खऱ्या संपत्ती'समोर स्वागत आणि प्रोत्साहनपर भाषण करुन हजेरी घ्यायला सुरुवात करतात.

    'प्रफुल्ल अग्निहोत्री'
    "Present Sir".....
    सुट्टी सत्कारणी लावून कमावलेल्या जबरदस्त अमेरिकन ऍक्सेंटमधे प्रफुल्ल आपली उपस्थिती नोंदवतो.
    (सहा मुलींच्या भुवया उंचावतात.)
    'हेमंत बावकर'
    "Yes Sir"
    हेमंत नेहमीच्याच तरल आवाजात गुणगुणतो.
    (मराठेसरांच्या कपाळावर क्षणभर दीड मिलीमिटर जाडीची आठी उमटून जाते.)
    नंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीप्रमाणे हजेरी संथगतीने चालू रहाते.

    'प्रविण रेगे'
    "नमस्ते गुरुजी !"
    'ऑं ?'.....धीरोदात्त नायकाचा चेहरा मानधनाचा धनादेश न वटल्यासारखा गोरामोरा होतो.
    आपण चुकून तळकोकणातील
    "जिल्हापरिषद मराठी शाळा क्र.४,वेताळबांबर्डे."मधे आलो असणार अथवा दादांनी (पक्षी : शिक्षणमहर्षी मा.दादासाहेब रेगे) आपल्या गळ्यात १० वी 'ब' च्या ऐवजी १० वी 'फ' चा वर्ग अडकविला असणार असे, आंगणेवाडीच्या जत्रेत हरविल्यासारखे भाव मराठेसरांच्या चेहऱ्यावर परावर्तित होतात.
    कथानायक प्रविणच्या चेहऱ्यावर मात्र एखाद्या अजाण बालकासारखे निष्पाप व निरागस भाव असतात.

    प्रविण मार्तंड रेगे !

    चेहऱ्यावर हेच भाव घेऊन प्रविण आमच्याबरोबर शाळेतील बारा वर्षे वावरला.
    माझे आवडते लेखक जयवंत दळवी त्यांच्या 'आल्बम' कादंबरीत लिहितात...
    "आपलं आयुष्य हे भागाकारासारखं असतं. समजा चौदाला चारने भागायचय. तर चार त्रिक बारा.बाकी उरले दोन.आता या बाकीचं काय करायचं ? अशीच काही ना काही बाकी आपल्या आयुष्यातसुद्धा उरत जाते आणि आपण पुढे चालत रहातो."
    मला वाटतं माझ्या मनातदेखील प्रविणच्या खात्यात थोडी गर्दगहिरी बाकी शिल्लक आहे.

    शिवसेनेचा पाळणा जिथे हलला त्या दादरच्या खांडके बिल्डिंगसारख्या राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टया जागृत असणाऱ्या परिसरात तो लहानाचा मोठा झाला.त्याच्या पहिल्या मजल्यावरच्या घराबाहेर "सारस्वतांचा उपाध्ये" अशी,फुटपाथवरुनही वाचता येणारी पाटी लावलेली होती.(ती बहूदा त्याच्या आजोबांच्या व्यवसायाची जाहिरात असावी.)

    जगातील प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गात पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या दरम्यान रेंगाळणारी एक अल्पसंख्य जमात असते. प्रविण त्या जमातीचा बिनीचा शिलेदार होता.रवी शास्त्री, मदनलाल व बिन्नी हे जसे भारतीय संघातील उपयुक्त खेळाडू होते त्याप्रमाणे प्रविण हा आमच्या वर्गातील उपयुक्त सदस्य होता.तो वर्गाच्या कबड्डी आणि क्रिकेट संघात तर असायचाच पण मिलिंद नेरुरकरला शनिवारच्या नाटुकलीमधे काम करायला कोणी मिळाले नाही की तो ऐनवेळी प्रविणला गळ घालायचा.मला स्मरतय,"थांब टकल्या भांग पाडते"सारख्या विनोदी नाटुकलीची नेमकी फार्सीकल नस पकडून तो बघता बघता मिलिंदसकट इतर सहकलाकारांना आरामात खाऊन टाकायचा.(अभिराम भडकमकरच्या 'हसत खेळत' नाटकात विनय येडेकरने जसे अशोक सराफ आणि कंपनीला खाल्ले होते ना,अगदी तसेच.) प्रविण म्हणजे "कमी तिथे आम्ही" या उक्तीची जणू चालतीबोलती जाहिरातच.किंबहुना कोणाच्याही मदतीला धावून जाणे हा त्याचा स्थायीभाव होता.

    पत्यांमधल्या जोकरप्रमाणे कोणाबरोबरही त्याचे गोत्र सहज जमायचे.शाळेतील त्याचा वावरही एखाद्या विदूषकासारखाच असायचा.कधी वर्गावर मुद्दामून उशीरा येऊन,शिक्षकांसकट सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा रोखलेल्या असताना,तो बदकासारख्या दुडक्या चालीने दरवाजापासून आपल्या बाकापर्यंत चालत जायचा.तर कधी केसांचा गोटासदृश्य झीरोकटच करुन यायचा.
    पण आज इतक्या वर्षांनंतर वाटतं की या विदूषकी मुखवट्याआड तो त्याच्या मनातली खदखद किंवा अस्वस्थता आमच्यापासून लपवित तर नव्हता ?

    तो लवकर घरी जायला फारसा उत्सुक नसायचा आणि शक्य तितका वेळ घराबाहेर काढायचा असा मला तेव्हाही अंधुकसा संशय होता.
    एकदा तो मला संध्याकाळी उशीरा शाळेच्या युनिफॉर्ममधेच पार्कात भेटला.त्याच्या खिशात चक्क चार आणे होते.आमच्या शर्टला तर त्याकाळी खिसाच नसायचा.मला न कटवता उलट तो मला पाणीपुरी खायला घेऊन गेला.
    त्यानंतर त्याचा भय्याशी खालीलप्रमाणे प्रेमळ संवाद झडला.
    "भय्या, पानीपुरी कैसा दिया ?"
    'आठ आणा'
    "एक प्लेटमे कितना पुरी आयेगा ?"
    'सात'
    "हम दो दोस्त सात पुरी बराबर कैसे खायेगा ?"
    प्रविणने बिनतोड गणिती सवाल केला.
    (या भय्याने नंतरच्या काळात पवई परिसरात बऱ्याच अनधिकृत चाळी बांधल्या.पण इतका अवघड प्रश्न त्याला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील कधी विचारला नसावा.)
    'ठीक है बाबा, आठ पुरी देगा !'
    "ये ठिक है,यह लो चार आना,हम दोनो को दो-दो पुरी देना !"
    प्रविण विजयी स्वरात म्हणाला आणि हे संभाषण कौतुकाने ऐकणाऱ्या पाच-सहा गिऱ्हाईकांसमोर भय्याचा नाईलाज झाला.
    भय्याला जेरीस आणणारा पहिला मराठी माणूस मी पाहिलेला आहे.

    कधीकधी त्याच्या खिशामधे उघडझाप करणारा एक चार इंची चाकू असायचा.(एकदा सुजाता नाडकर्णीने बसमधून शाळेच्या सहलीला जाताना,सामुदायिक भेळेवर पिळण्यासाठी म्हणून त्याला एक लिंबू कापायला दिले.त्याच्या त्या बोथट चाकूने पातळ सालीचे लिंबूदेखिल कापले जाईना तेव्हा,आपल्याला विश्वासाने हातभर राख्या बांधणाऱ्या वर्गभगिनींसमोर आपले नाक कापले गेले म्हणून तो कमालीचा ओशाळला होता.) हे हौस म्हणून खिशात चाकू बाळगणं वगैरे ठिक आहे पण तो स्वभावाने बिल्कुल खुनशी अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नव्हता.शाळेत त्याने कधी कोणाशी पंगा घेतल्याचे किंवा कोणाशी मारामारी अथवा दादागिरी केल्याचे मला तरी आठवत नाही. तो मूलतः मवाळपंथी असावा असं मानायला बरीच जागा आहे.

    १९९१ सालातल्या एका भल्या पहाटे,बांद्राच्या टीचर्स कॉलनीसमोरील रस्त्यावर,प्रतिस्पर्धी टोळीकडून झालेल्या गोळीबारात तो मारला गेला.त्याच्या टोळीप्रमुखावर झालेला गोळीबार मधे पडून त्याने स्वतःच्या अंगावर झेलला म्हणतात.समोरच्याला मदत करण्याचा घेतलेला वसा त्याने मृत्यूच्या दारातदेखील टाकला नाही.

    तो काही राजकारण्यांना आणि बिल्डर्सना वेठीला धरणारा हाय प्रोफाईल गँगस्टर नव्हता.त्यामुळे त्याच्या मृत्यूचाही फारसा गवगवा झाला नाही. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात 'विवाहितेस जाळले' अथवा 'तरुण बुडाला' अशा सिंगल कॉलमी बातम्यांखाली त्याच्या मृत्युची बातमी छापून आली होती असे सांगतात.

    तो वाममार्गाला का,कधी व कसा लागला याचा शोध घेण्याची वेळ तर कधीच निघून गेली होती. त्याकाळी फिशपॉंड देण्याची पद्धत होती की नाही माहीत नाही पण "आदमी सडक का" हा फिशपॉंड त्याला चपखल बसला असता.

    तो आज असता तर आमच्या वर्गाच्या रियुनियन संयोजनात त्याने उत्साहाने भाग घेतला असता.आणि किमान यावेळेस तरी चांगला धारदार चाकू आणून त्याने लिंबू आणि उकडलेली अंडी कापायला आम्हाला नक्कीच मदत केली असती.

    प्रविण मार्तंड रेगे !!

    संदीप सामंत.
    ९८२०५२४५१०
    १४/०३/२०२२.

  • वकील जातचं लय चतूर

    वकील जातचं लय चतूर

    प्रसंग - काल सकाळी...
    स्थळ - सांगली स्टेशन...

    फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच.

    कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी...

    एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली...

    "तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!"

    वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन काढला...

    त्यावर लिहीलं...

    "मी मुकबधीर आहे...मला बोलता येत नाही ;ऐकू येत नाही... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या कागदावर लिहून द्या.."

    बाई जे बोलली ते तिनं लिहून दिलं...

    त्या वकीलांनी ते वाचलं...
    कागदाची घडी करुन खिशात ठेवला आणि म्हणाले..

    "हं...

    बोंबला जोरात आता कि मी तुमची छेड काढली म्हणून,

    माझ्याकडे तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे पुरावा म्हणून "

    बाई पळाली ना सैराट !!!!
    वकिलांचा नाद करायचा नाय !

  • पंगत सोलापुरची

    पिकतं तिथं विकत नाही ,अशी एक म्हण आहे.
    पण सोलापुरात ती खोटी ठरते..
    इथे जे पिकतं ,तेच विकतं...
    कमी पाऊस आणि काळी माती असणार्या सोलापूर परिसरातील ज्वारी ,बाजरी,तूर,हरभरा,भुईमूग
    ही प्रमुख पिके...
    त्यामुळे "ज्वारीची भाकरी " हा सोलापुरी जेवणातील मुख्य पदार्थ..
    सोलापुरातील पंचतारांकित हॉटेला पासून ते साध्याशा धाब्यावर मिळणारा नि
    श्रीमंत आणि गरीब घरातही खाल्ला जाणारा!
    दुपारी बाराच्या सुमारास सोलापुरातल्या कोणत्याही घरात "ठक् ठक् " असा आवाज ऐकू येतोच
    तो भाकरी बडवण्याचा असतो..
    हो..इथे भाकरी थापत नाहीत ...बडवतात..
    ज्वारीच्या पिठाचा गोळा भरपूर मळून ,पोळपाटावरील भरपूर ज्वारीच्या पिठावर ठेऊन दोन्ही हातांनी एका लयीत नि बांगड्याच्या सुरात बाई भाकरी बडवू लागली की पाहणार्याचीही समाधी लागते..
    दोन मिनिटात भाकरी थापून तयार होते नि तव्यावर पडते..
    तव्यावर पाणी पिऊन ती अशी टम्म फुगते की तिच्यावरून नजर हटत नाही..
    एकही काळा डाग न पडू देता छान भाजलेली पांढरीशुभ्र भाकरी करणं हे अतिशय कौशल्याचं काम...
    ही भाकरी एवढी पातळ असते की नवीन माणूस ही पोळी आहे की भाकरी या संभ्रमात पडावा...
    अशी भाकरी बनवायला अंगीभूत कौशल्य नि सराव लागतोच..
    म्हणूनच सोलापुरात लग्नासाठी मुलगी पसंत करताना रूप,रंग ,पैसा यांपेक्षा मुलीला चांगली भाकरी करता येते की नाही, हे पाहिलं जातं..
    चुलीवर भाकरी करता येत असेल तर तिला शंभर गुण मिळतात..
    कारण चुलीवरची भाकरी म्हणजे
    अतीव कौशल्याचं नि संयमाचं काम!
    अंगच्या गोड सोलापुरी ज्वारीला चुलीचा खरपूस स्वाद मिळाला की फक्त "अहाहा "...
    या भाकरीच्या चवीत जितका करणारीचा हातगुण असतो तितकाच इथल्या ज्वारीचाही असतो.
    कदाचित कमी पावसामुळे इथल्या ज्वारीची चव,गोडी टिकत असावी..
    लग्नापूर्वी भाकरीला नाक मुरडणारी मी लग्न करून सोलापुरात आल्यापासून भाकरीशिवाय राहू शकत नाही...
    " कडक भाकरी " हे सोलापुरचं खास वैशिष्ट्य..
    अतिशय पातळ थापलेली भाकरी तव्यावर भाजून चुलीच्या धगीपाशी उभी करून ठेवली जाते..
    ती थोड्याच वेळात कडक होते..
    मीठ,तीळ ,हळद घालून केलेली बाजरीची कडक भाकरी पापडासारखी चविष्ट नि खुसखुशीत लागते..
    अनेक दिवस टिकणारी कडक भाकरी प्रवासासाठीही उत्तम..
    लग्न झाल्यानंतर चार दिवसात आम्ही एका धाब्यावर जेवायला गेलो होतो .
    तिथे कोपर्यात अनेक पोती उभी करून ठेवलेली होती..
    ती भाकर्यांनी भरलेली होती...
    हॉटेलातल्या शिळ्या भाकर्या ( भाकरीचं अनेकवचन भाकरीच होतं पण सोलापुरसाठी ते भाकर्याच असत..विषय संपला )
    अशा का पोत्यात भरून ठेवल्यात?
    उत्सुकता गप्प बसू देईना..
    शेवटी वेटरकाकांना विचारलच ...
    आणि तिथे "कडक भाकरी" शी पहिली ओळख झाली.
    "कडक चहा","कडक लक्ष्मी ","कडक शिक्षक" " कडक उपास" ...यांच्या पंगतीत आता "कडक भाकरी " ही बसली..
    प्रामुख्याने मटन किंवा चिकन रस्स्यांत चुरा करून खाल्ली जाणारी ही कडक भाकरी आमटी किंवा वांग्याच्या आणि शेंगाभाजीच्या रश्श्यात कुस्करून खायलाही छान लागते....
    धपाटा ...हा भाकरीचा खमंग चुलत भाऊ...
    ज्वारीच्या पिठात थोडी कणिक,थोडं बेसन (कणिक ,बेसन ऑप्शनल बरंका),ओवा,तीळ, जिरे,हळद,मीठ,लसणाची पेस्ट , भरपूर कोथिंबीर घातली ,पाणी घालून भाकरीच्या पिठासारखा गोळा केला ,लहान गोळा घेऊन ओल्या कापडावर अगदी पातळ थापला आणि तव्यावर टाकला,त्यावर तेल पडलं की असा काही खमंग सुवास आसमंतात दरवळतो की तुम्ही ताटली घेऊन बसायलाच पाहिजे...
    धपाटे भाजून झाले की त्याच तापलेल्या तव्यावरून "चुर्र....." असा आवाज येतो , दणदणीत खाट नाकात शिरतो नि तुम्ही खोकू लागता..
    हा ठसका असतो तव्यावर जन्माला येऊ पाहणार्या ठेच्याचा..
    भाकरीच्या किंवा धपाट्याच्याच तव्यावर तेल ,जिरं ,भरपूर लसूण नि हिरव्या मिरच्या परतल्या जातात, त्यात खडेमीठ,शेंगदाणे पडतात नि खरपूस भाजल्यावर त्याच तव्यात वाटीने या सगळ्या गोतावळ्याला खरडलं जातं...आणि ठेसा(शब्द सोलापुरी) जन्माला येतो.
    एका ताटलीत गरम-गरम धपाटा किंवा ज्वारी/बाजरीची पातळ भाकरी,ठेचा,घट्ट दही घ्यायचा नि मारायचा ताव...
    काहीतरी राहिलय वाटतय नं...
    हो, श्येंगा चटणी...हा तर सोलापुरी जेवणाचा आत्मा..
    लालभडक ,मुद्दाचटणीशिवाय नाष्टा काय,जेवण काय पूर्ण होतच नाही ...
    गावरान सोलापुरी शेंगदाणे अतिशय गोड नि चविष्ट.
    हे शेंगदाणे खरपूस भाजून,साले काढून घ्यायचे. उखळात किंवा खलात जिरं ,मीठ , हिंग,लाल तिखट घालायचं.( लसूण, चिंच पाहिजे असल्यास) कुटायचं नि मग शेंगादाणे घालून मुद्दा होईपर्यंत कुटायचं..
    ही चटणी किलोवर करावी लागते बरंका...
    सोलापुरमधे घरात एखादेवेळी फर्निचर नसलं तरी चालतं पण श्येंगाचटणी मात्रं घरात नसेल तर पाप लागतं..
    ही शेंगाचटणी भाकरी/पोळी,धपाटा,पुरी,बटाटेवडा,उत्तप्पा,डोसा अगदी पिझा,बर्गरसोबतही चालते..
    सोलापुरातलं लहान मूल बालवाडीत जातं ते भाकरी चटणीचा डबा घेऊन नि हॉस्पिटलात ऐडमिट केलेल्या आजोबांनाही शेंगाचटणी भाकरीचे चार घास खाल्ल्याशिवाय आराम पडत नाही.
    आता तुम्ही म्हणाल सोलापुरकर भाज्या खातात की नाहीत की फक्त चटणी भाकरीच?
    खातात हो खातात..
    पण कोणती खातात हे तुम्हाला ओळखूच येणार नाही .
    भरपूर शेंगाकूट आणि काळा मसाला यात लपलेली भाजी कोणती आहे ,हे कसं बरं ओळखणार?
    कळस म्हणजे इथे फक्त शेंगाची भाजी असते..म्हणजे शेंगाकूट,मसाला,तेल आणि मीठ यांचा बनवलेला रस्सा..छान लागतो बरं का ...!!
    पण इथली वांग्याची भाजी खास...!!
    नुकतीच शेतातून काढलेली ताजी -ताजी छोटी ,जांभळी,काटेरी वांगी पाहिली की कधी एकदा भाजी करून रिचवतोय ,असं होऊन जातं.
    शेंगादाणे,भरपूर कोथिंबीर,लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यायची.
    त्यात मीठ,काळा मसाला,लवंगाचीपूड घालायची नि हे मिश्रण छोट्या वांग्यात भरायचं..
    जरासं जास्त तेल घालून तेलावर ही भरली वांगी शिजवून घ्यायची..
    नुसती खायलाही अप्रतीम लागतात..
    रस्सा हवा असेल तर यातच पाणी घालून शिजवायचं ...
    कोवळ्या ताज्या पालेभाज्या हे सोलापुरच्या बाजाराचं वैशिष्ट्य..
    मेथी,पालक,अंबाडी,करडी,चुका,राजगिरा,तांदुळसा, कांदापात,हरबर्याची भाजी या पालेभाज्यांनी बाजार हिरवागार झालेला असतो..
    "पेंडपाला" सोलापुरकरांचा आवडता..
    कोणत्याही कोवळ्या पालेभाजीत तूर,मूग किंवा मसुराची भिजवलेली डाळ नि लसूण ,मिरची आणि शेंगाकूट घालून केलेली कोरडी भाजी म्हणजे पेंडपाला..
    अतिशय चविष्ट नि पौष्टिक!!
    पालक,चुका,मेथी शिजवून त्यात तुरीचं वरण नि लसणाची फोडणी दिली की "गरगट्टा " तयार होतो..
    याच गरगट्ट्यात जास्तीचं वांगी,घेवडा,गाजर,ओला हरबरा,
    पेरू,बोरं,हरबर्याची भाजी,सगळ्या डाळी हे सगळं घातलं की तयार होते
    ती संक्रातीच्या भोगीची " भज्जी "
    भाज्या तर भारीच असताना पण सोलापुरकरांना जास्त आवडतं ते
    " बेसन ".
    पिठल्याला सोलापुरात बेसन म्हणतात..
    ओवा,हिरवी मिरची ,जिरं,मोहरी,कढीलिंब घालून केलेलं पातळ नाही पण कोरडंही नाही ,असं पिठलं..
    सोलापुरी जेवणात भात असतो ...
    पण त्याचं स्थान दुय्यम...
    बरं तो आंबेमोहर,बासमती,इंद्रायणी पाहिजे असली नाटकं नाहीत..
    भात दमळदार नि मोकळा असणं पुरेसं असतं..
    भाताशी खायला डाळ लागते..
    तूरडाळ
    टोमॅटो,हिरवी मिरची,लसूण ,जिरं आणि मीठ एवढ्याच भांडवलावर केलेली डाळ अप्रतीम लागते..
    पण मला इथली तेलगु पद्धतीची भरपूर चिंच घातलेली आंबट आमटी जास्त आवडते..
    आणि इथे ती वाटीतून न देता पाणी पिण्याच्या फुलपात्रातून दिली जाते..
    मज्जा म्हणजे हिला तेलगुत "पप्पू " म्हणतात.
    गरम-गरम भात आणि पप्पू खाणं ही भातप्रेमींसाठी मेजवानी असते...
    असाच नोव्हेंबर,डिसेंबर,जानेवारीसारखा थंडीचा एखादा महिना असावा...
    नेहमीच्या उकाड्यापासून सोलापुरला काडीमोड मिळालेला असावा.
    गुलाबी थंडीत अख्खं गाव लपेटलेलं असावं...
    शनिवार रविवार धरून पाहुणे यावेत..
    शनिवारी रात्री एखाद्या धाब्यावर जाण्याची टूम निघावी..
    गावाच्या गर्दीपासून दूर पण फार लांब नसलेल्या एखाद्या हॉटेलात
    आकाशाखालील लॉनवरील किंवा मातीवरील खुर्च्यांत स्थानापन्न व्हावं..
    बाळगोपाळांनी हॉटेलातील घसरगुंडी,झोक्याचा आनंद लुटावा..
    मोठ्यांनी राजकारण,समाजकारण,अर्थकारणावर जोरजोराने चर्चा झोडाव्यात..
    एवढ्यात खाकरा, मसाला शेंगदाणे यावेत..त्यासोबतच एखादं शीतपेय
    आणि चाटमसाला शिंपडलेली खेकडा भजी मागवावीत..
    उगाच सूपबिप मागवून सुपाचा अपमान करू नये..
    पोरांना खेळून आणि मोठ्यांना गप्पांमुळे पोटात कावळे ओरडू लागले की जेवण आणायला सांगावं..
    तोपर्यंत आकाशदर्शनात रमून जावं..
    एकावर एक ठेवलेली ताटांची चळत
    वेटरने आणावी..
    तुमचं ताट तुमच्यासमोर यावं.
    त्यात एका वाटीत पिवळंजर्द बेसन, दुसरीत हिरवागार पेंडपाला,तिसरीत लालबुंद मसाला वांगं , चौथीत पांढरंशुभ्र दही आणि पाचव्या वाटीत
    पुन्हा पिवळीजर्द डाळ असावी.
    डावीकडे कांदा,लिंबू ,ठेचा आणि ही भाजी की चटणी असा संभ्रम पडावा असा
    मोठा शेंगाचटणीचा ढीग...
    या पदार्थांच्या सप्तरंगांनी नि सुगंधाने पोटातील जाठररसाला नि लाळग्रंथीना साद घालावी..
    आणि गरमागरम ,पातळ पांढर्याशुभ्र भाकर्या घेऊन वेटरची स्वारी यावी...
    आपल्या पानात भाकरी पडताच दही चटणी नि भाकरीचा पहिला घास पोटात जावा, मग बेसन -भाकरीचा दुसरा , तिसरा वांगं नि भाकरीचा...
    या रसोत्सवात इतकं मश्गुल व्हावं की भोवतालच्या जगाचा विसर पडावा..
    पहिली भाकरी संपल्यावर पुन्हा या जगात यावं नि कुणी बाजरीची भाकरी तर कुणी धपाटा मागवावा..
    भाकर्या नि धपाट्यांची गणती न करता खात जावं...
    आणि आपल्या खाण्याची आपल्याला लाज वाटली की मोर्चा
    भैरवीच्या भाताकडे वळवावा..
    डाळ भाताचा आस्वाद घेऊन शेवटचे दोन घास दहीभातासाठी ठेवावेत..
    " साहेब ,गोड काय आणू ?"
    वेटरने अन्नसमाधीतून जागे करावे ..
    शेंगापोळ्या ,खवापोळी नि हुग्गीची ऑर्डर निघावी..
    पाच मिनिटांत गावरान तुपात थबथबलेल्या शेंगापोळ्या ,खवापोळ्या नि हुग्गीच्या वाट्या याव्यात..
    पोटात भूक नाही असं वाटत असतानाही मऊसूत खवापोळी, खुसखुशीत शेंगापोळी खातच जावी..
    हुग्गीच्या वाट्यांवर वाट्या रिकाम्या व्हाव्यात...
    आपण केवढं जेवतोय असे वाटून खजील व्हावे ,नि जेवणाला पूर्णविराम द्यावा..
    पाहुण्यांचे समाधानी चेहरे नि जेवणाचं कौतुक ऐकून ऊर भरून यावा...
    बिल देऊन निघायला सुरुवात करावी नि उभे राहिल्यावर लक्षात यावे ..
    आपण इतके जेऊनही पोटाला जडपणा, जळजळ काहीच होत नाहीये...
    हेच तर सोलापुरी जेवणाचं वैशिष्ट्य .....!!
    --नीला महाबळ गोडबोले
    --सोलापूर
  • तात्पुरता सदस्य

    तात्पुरता सदस्य म्हणजे नेमकं काय? त्या संदर्भातील इत्थंभूत माहिती देणारा हा लेख.

  • कविता – अविस्मरणीय पाऊस…

    एकदा, बस स्थानकावर भर पावसात ओले चिंब भिजलेल्या तरुणीला पाहिल्यावर सुचलेली हि कविता!!!!

  • अहंकाराची लुडबुड ! (बेवड्याची डायरी – भाग ३९ वा)

    अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी ...माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ' घटस्फोट ' या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता ...कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..

    तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला .." नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? " त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले .." होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे " .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला " छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच " हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे " असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली .." अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत ...तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? " पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..

    एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..' अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..
    अलका जायला उठल्यावर म्हणालो .." बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला " माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..' काय मग ? खुश ना ? ' मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..' ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले .

    जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती .." विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला ." त्याने पिशवी माझ्यापुढे केली .." नको अहो ..मला भूक नाहीय .." शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली ...मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले .." अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता .." " काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी " असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..

    रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती.." विजय भाऊ ..कुठे हरवलात ? " काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली ...बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण !

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • वातावरणाची निर्मिती

    वातावरण निर्मित होते, जसे जातां वागूनी ।

    हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी...१,

    फिरत असती वलये , सारी अंवती भंवती ।

    चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती...२,

    जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी ।

    चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी....३,

    जाता दुष्ट व्यक्ती , आपल्या जवळूनी ।

    चलबिचल मन होते, केवळ सानिध्यानी.....४,

    याच लहरी घुसुनी शरीरि, मनी आघांत करती ।

    मनामध्ये बदल करूनी, तीच वृत्ती बनविती...५,

    विहीरी वरच्या दगडांनाही, खुणा पडती जेथे ।

    कसे टिकेल तन मन तेथे, नाजूक जे असते...६

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • जोग रागाचे विलोभनीय जग

    "अनोळख्याने ओळख कैशी
    गतजन्मींची द्यावी सांग;
    कोमल ओल्या आठवणींची
    एथल्याच जर बुजली रांग!!"
    मर्ढेकरांच्या या अजरामर ओळींतून जोग रागाची पुसटशी ओळख मिळते. खरतर शब्द आणि सूर यांची नेमकी सांगड घालणे ते फार अवघड असते. त्यातून कविता हे माध्यम एका बाजूने शब्दमाध्यमातील सर्वाधिक लवचिक माध्यम आणि सूर तर नेहमीच अर्धुकलेली भावना दर्शविणारे. त्यामुळे कवितेसारख्या अत्यंत सक्षम आविष्कारातून देखील सुरांची नेमकी ओळख पटविणे तसे नेहमीच अवघड असते. जोग रागाचे सूर ऐकताना, नेहमीच, काहीसे अनोळखी सूर वाटत असतानाच एकदम, नव्याने ओळख झाल्यासारखे होते. एकतर हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही पण वादकांनी मात्र या रागावर प्रेम केले आहे, त्यामुळे या रागाचे सूर तसे अपरिचित वाटतात.
    "रिषभ,धैवत" हे दोन्ही सूर वर्ज्य असलेल्या या रागात, "कोमल निषाद" आणि "कोमल + शुद्ध गंधार" या सुरांचे प्रमुख अस्तित्व दिसते. यातील "शुद्ध गंधार" हा आरोही स्वरांमध्ये तर "कोमल गंधार" हा अवरोही स्वरांमध्ये स्थान मिळवून आहे. दोन सूर वर्ज्य असल्याने, रागाची जाती - औडव/औडव असणे क्रमप्राप्तच ठरते.
    मुख्य स्वरसंहती बघायला गेल्यास, "सा ग म प","नि प म ग","ग म ग सा","ग म प नि सा" या स्वरसमुहांचे विशेष प्राबल्य आढळून येते. उत्तरांग प्रधान राग असून, कधीकधी अवरोहात "तार षडज" वापरला जातो आणि विशेषत: मिंडकामासाठी या स्वराचा उपयोग केला जातो. प्राचीन ग्रंथांत या रागच समय रात्रीचा दुसरा प्रहर दिलेला आहे, त्यामुळे असेल पण, रागाची ठेवण बरीचशी नाजुकपणाकडे झुकलेली आहे. ताना, बोलताना यात फारशी वक्रता आढळत नाही.
    सतार वादनात, पंडित रविशंकर हे नाव फार मोठ्या आदराने घेतले जाते आणि ते योग्यच आहे. सतार वादनाची नवीन "भाषा" तयार करणारे आणि रूढ करणारे, असा हा अद्वितीय कलाकार. सतार हे तंतुवाद्य, तेंव्हा वाद्याला अनुकूल असे वादनाचे "तंतकारी" तंत्र या कलाकाराने विकसित केले आणि त्याला जगभर मान्यता मिळवून दिली. इथे आता आपण जोग राग ऐकताना, याचीच प्रचीती येईल. आलापीमध्ये, वर निर्देशिलेल्या स्वरसंहतीचे प्रत्यंतर घेता येते. सुरवातीलाच, "सा ग म प" आणि " ग म ग सा" ऐकायला मिळतो आणि "कोमल गंधार" स्वरावर घेतलेला ठेहराव, आपल्याला जोग राग दाखवून देतो. आणखी एक वैशिष्ट्य ऐकायला मिळते, स्वरांच्या तुटक आघातातून, घेतलेली मिंड. हा प्रकार तर फारच विलोभनीय आहे. रचना कशी हळूहळू विस्तार करत, "बढत" घ्यायची, हा भाग देखील तितकाच अप्रतिम आहे. "आलाप","जोड" आणि पुढे "झाला" असे सगळे अलंकार व्यवस्थित सादर करून मग, वादनातील "गत" सादर केली आहे.
    " दिल से रे" ही "दिल से" चित्रपटातील अप्रतिम रचना आपण ऐकायला घेऊया. संगीतकार रेहमान, ही कधीच, रागाचा संपूर्ण असा आधार घेत नाही. रागातील एखादीच हरकत, सुरावट, त्याला चाल बांधण्यासाठी प्रवृत्त ठरू शकते. या गाण्याच्या बाबतील, जेंव्हा "जोग" रागाशी आपण "जोड" लावायला जातो तेंव्हा, आपल्याला गाण्याकडे सरळ दृष्टीने बघून, चालणारे नाही कारण रागाचे वळण आणि या गाण्याच्या चालीचे वळण, यात बरीच तफावत आढळते. पहिली ओळ तार स्वरात आहे पण, तीच ओळ परत घेताना, जेंव्हा काहीश्या ढाल्या किंवा खर्जातील स्वरांत गाणे येते, तिथे जोग रागाची ओळख मिळते. परंतु, अशा रीतीने रागाची ओळख करून दिली तर तो रेहमान कसला? एकतर त्याला, कर्नाटकी ढंगात, पाश्चात्य सुरावटींचा प्रयोग नेहमी करावासा वाटतो. त्यामुळे, गाण्यात, पारंपारिक ठसा तसा सहज आढळत नाही. आता या गाण्यात केरवा तालाचा उपयोग आहे पण, जर का तालाच्या मात्रा हातावर मोजायला घेतल्या तरच, तालाची खूण पटते अन्यथा कुठला ताल आहे, याचा पत्ता लागत नाही. या गाण्यात, रेहमान, गायक म्हणून आपल्या समोर येतो. तसे बघितले तर गायक म्हणून त्याच्या आवाजाला मर्यादा आहेत आणि त्याच्या एकूणच सांगीतिक प्रवृत्तीवर, कर्नाटकी संगीताचा जाड ठसा बघायला मिळतो. त्यामुळे, काहीवेळा शब्दांचे उच्चार खटकतात पण, इथे एक बाब ध्यानात घ्यायला हवी, रेहमान हा काही "गायक" नव्हे. प्रासंगिक तत्वावर गायन,हेच खरे.
    "एक सुरज निकला था, कुछ पर पिघला था;
    एक आंधी आयी थी, जब दिल से आह निकली थी;
    दिल से रे दिल से."
    आता, रेहमान, एक संगीतकार म्हणून थोडे मुल्यमापन करायला घेऊया. चित्रपट संगीताच्या रूढ आणि मान्य शैलीपासून अनेक बाबतींत दूर सरकणारी अर्थपूर्ण रचनापद्धती रेहमानने वापरली आहे. अधिक महत्वाची बाब म्हणजे, भारतीय तालाच्या वर्तुळात्मकते ऐवजी तो अखंड कालविभाजनाने लयावतार घडविण्याचा अवलंब करतो. त्यामुळे त्याचे लयबंध आधुनिक वाटतात. रेहमानने आणखी एक रचनापद्धत योजली आहे आणि ती अशी, की तसे पाहता स्वतंत्र म्हणजे एकल गायनाच्या मार्गाने जाणाऱ्या संगीतात, त्याने अनपेक्षित जागी आणि वेगळ्या प्रकारे समुहगायन किंवा आवजी सादरीकरण आणले आहे. काहीवेळा हे सामुहिक आविष्कार पार्श्वसंगीताची जागा घेतात, तर काही वेळा आपतत: स्वनरंग पुरवणाऱ्या रचनातत्वांचा अंतर्भाव करतात. तसेच रेहमान आपल्या संगीतात ध्वनी आणि संगीतकाराची चल गती यांनाही समोर ठेवतो. अनेकदा त्याचे संगीत आकर्षक पण भंग पावलेले आणि गीतत्वापर्यंत न पोहोचू शकणारे सुरावटींचे आकृतिबंध निर्माण करते. याचाच वेगळा अर्थ, अजूनही त्याच्यावर जाहिरात किंवा जिंगल्स संगीताचा प्रभाव आहे. आणखी एक मत मांडायचे झाल्यास, रेहमानच्या कामाची पुर्वावृत्ती राहुल देव बर्मनच्या संगीतात होती, असे जाणवते. भारतीय कलासंगीतापासून दोघेही दूर जातात, पण पुन्हा पुन्हा त्या परंपरेकडे वळूनही पाहतात.
    "त्या सावळ्या तनूचे" हे गाणे, "जोग" रागाशी फार जवळचे नाते दर्शवते. माणिक वर्मांच्या आवाजातील ह्या गाण्याने एके काळी, महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. वास्तविक, मुळातील रागदारी संगीतातील गायिका परंतु सुगम संगीतात, स्वत:चे ठाम स्थान निर्माण केले. एका दृष्टीने विचार केल्यास, ही फारच दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. या गाण्यात, "जोग" रागाच्या खुणा अनेक ठिकाणी दिसतात. विशेषत:, गाण्याच्या हरकतींतून तर लगेच ओळख पटते. दशरथ पुजारींच्या सरळ, साध्य, अनलंकृत चालीतून, रागाचे स्वरूप उभे राहते. दशरथ पुजारी हे तसे फार लोकप्रिय संगीतकार नव्हते, शंभर एक भावगीते - इतकीच त्यांची बव्हंशी सांगीतिक कारकीर्द होती पण तरीही, अनेक अजरामर गाण्यांचा जन्म त्यांच्या हातून झाला, असे नक्कीच म्हणावे लागेल. या गाण्याची चाल, काहीशी गायकी ढंगाची आहे पण, तरीही गाण्यातील हरकती बघत, त्यात फार काही "वक्र" गतीच्या ताना आहेत, असे आढळत नाही.
    "त्या सावळ्या तनूचे मज लागलें पिसें ग;
    न कळे मनांस आता या आवरू कसे ग."
    माणिक बाईंचे गायन आणि सुगम संगीतातील योगदान, हा खरे तर दीर्घ निबंधाचा विषय आहे. ज्या हिशेबात, रागदारी गायनात, सहजता आणि संयम, या गुणांचा आढळ होता, त्याचेच नेमके प्रत्यंतर सुगम संगीतात येत असे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, सुरवातीच्या गाण्यांत ताजेपणा अधिक होता, त्यात पुढे सफाईदारपणा आला. त्यांची भावगीते ऐकताना, विस्ताराच्या शक्यता भरपूर आढळतात. तालाशिवाय घेतलेली आलापी, किंवा तालासाहित घेतलेले आलाप किंवा हरकती ऐकताना, गायकी अंग अधिक स्पष्ट होते. तसे बघितले तर मराठी भावगीतात, त्याने उत्तरेचा ढंग मिसळला. पंजाब अंगाची फिरत पण त्यात मादकपणाचा अंश नाही, नखरा देखील लखनवी ढंगाचा नाही. त्या दृष्टीने बनारसी ढंग जवळचा वाटतो. मुखडा खालच्या अंगाने येणारा असला तरी, पहिली लकेर सफाईने खालून वर जाणार आणि अनेकदा पंजाबी वक्र वळणे घेत खाली येणार. संदिग्ध गोडवा हा स्थायीभाव, हेच खरे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
    "पाणीग्रहण" नाटकात जोग रागाचा आधार घेतलेले एक सुंदर गाणे आहे - प्रेम हे वंचिता. संगीतकार श्रीनिवास खळे साहेबांनी याची चाल बांधली आहे.
    "प्रेम हे वंचीता, मोह ना जीवनाला;
    द्या कुणी आणून द्या प्याला विषाचा."
    गाण्याची चाल जरा बारकाईने ऐकली तर काहीशी उर्दू "गझल" थाटावर चाल गेली आहे असे वाटते आणि त्या दृष्टीने गायन देखील त्याच धर्तीवर झालेले आहे. प्रसिद्ध लेखक प्रल्हाद केशव अत्र्यांची शब्दकळा आहे आणि गीतरचना चालीच्या दृष्टीने ठीकठाक आहे.
    सुप्रसिद्ध गायक गुलाम अलींची एक रचना - उन पे कुछ इस तरह प्यार आने लगा, जोग रागाशी नाते सांगणारी आहे. खर तर ही रचना म्हणजे गझल न म्हणता गीतसदृश रचना म्हणता येईल आणि नेहमीप्रमाणे, गुलाम अली हे केवळ रागाचा आधार घेतात आणि विस्तार मात्र आपल्या मगदुराप्रमाणे करतात. त्यामुळे त्यांच्या रचनेत रागाचे नेमके स्थान ठरवणे बरेचवेळा दुरापास्त होते.
    "उनपे कुछ इस तरह प्यार आने लगा,
    बेकरारी को करार आने लगा".
    गायनात गुलाम अलींची नेहमीची खास गायकी दिसते म्हणजे लयीचे वळण, मध्येच अकल्पितपणे बदलायचे, एखादा शब्द उच्चारताना त्याला हरकतीची जोड द्यायची इत्यादी. अर्थात ही हरकत देखील अति अवघड घ्यायची, ज्यायोगे ऐकणारा अचंबित होऊन जातो.
    -- अनिल गोविलकर

  • यौवन

    माझ्या वाचक मित्रांण्साठी मझी एक अप्रकाशित कविता ..यौवन