कुन फू पांडा – चक्क मराठीत !!!!!
स्थळ : १० वी 'ब' वर्गाचा पहिलाच दिवस.बालमोहन विद्यामंदिर,दादर, मुंबई.
काळ : (पालकांनी आडून आडून सुचविल्याप्रमाणे) गांभीर्याने घेण्याजोगा.
वेळ : १३ जून १९७७, सकाळी १०.४२.
प्रवेश पहिला : (वर्गात गलबला. एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे मराठेसर वर्गात प्रवेश करतात आणि वर्गातील कुजबुज आपोआपच कमी कमी होत वर्गात संपूर्ण शांतता पसरते.)
मराठेसर पाच मिनिटे 'राष्ट्राच्या खऱ्या संपत्ती'समोर स्वागत आणि प्रोत्साहनपर भाषण करुन हजेरी घ्यायला सुरुवात करतात.
'प्रफुल्ल अग्निहोत्री'
"Present Sir".....
सुट्टी सत्कारणी लावून कमावलेल्या जबरदस्त अमेरिकन ऍक्सेंटमधे प्रफुल्ल आपली उपस्थिती नोंदवतो.
(सहा मुलींच्या भुवया उंचावतात.)
'हेमंत बावकर'
"Yes Sir"
हेमंत नेहमीच्याच तरल आवाजात गुणगुणतो.
(मराठेसरांच्या कपाळावर क्षणभर दीड मिलीमिटर जाडीची आठी उमटून जाते.)
नंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीप्रमाणे हजेरी संथगतीने चालू रहाते.
'प्रविण रेगे'
"नमस्ते गुरुजी !"
'ऑं ?'.....धीरोदात्त नायकाचा चेहरा मानधनाचा धनादेश न वटल्यासारखा गोरामोरा होतो.
आपण चुकून तळकोकणातील
"जिल्हापरिषद मराठी शाळा क्र.४,वेताळबांबर्डे."मधे आलो असणार अथवा दादांनी (पक्षी : शिक्षणमहर्षी मा.दादासाहेब रेगे) आपल्या गळ्यात १० वी 'ब' च्या ऐवजी १० वी 'फ' चा वर्ग अडकविला असणार असे, आंगणेवाडीच्या जत्रेत हरविल्यासारखे भाव मराठेसरांच्या चेहऱ्यावर परावर्तित होतात.
कथानायक प्रविणच्या चेहऱ्यावर मात्र एखाद्या अजाण बालकासारखे निष्पाप व निरागस भाव असतात.
प्रविण मार्तंड रेगे !
चेहऱ्यावर हेच भाव घेऊन प्रविण आमच्याबरोबर शाळेतील बारा वर्षे वावरला.
माझे आवडते लेखक जयवंत दळवी त्यांच्या 'आल्बम' कादंबरीत लिहितात...
"आपलं आयुष्य हे भागाकारासारखं असतं. समजा चौदाला चारने भागायचय. तर चार त्रिक बारा.बाकी उरले दोन.आता या बाकीचं काय करायचं ? अशीच काही ना काही बाकी आपल्या आयुष्यातसुद्धा उरत जाते आणि आपण पुढे चालत रहातो."
मला वाटतं माझ्या मनातदेखील प्रविणच्या खात्यात थोडी गर्दगहिरी बाकी शिल्लक आहे.
शिवसेनेचा पाळणा जिथे हलला त्या दादरच्या खांडके बिल्डिंगसारख्या राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टया जागृत असणाऱ्या परिसरात तो लहानाचा मोठा झाला.त्याच्या पहिल्या मजल्यावरच्या घराबाहेर "सारस्वतांचा उपाध्ये" अशी,फुटपाथवरुनही वाचता येणारी पाटी लावलेली होती.(ती बहूदा त्याच्या आजोबांच्या व्यवसायाची जाहिरात असावी.)
जगातील प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गात पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या दरम्यान रेंगाळणारी एक अल्पसंख्य जमात असते. प्रविण त्या जमातीचा बिनीचा शिलेदार होता.रवी शास्त्री, मदनलाल व बिन्नी हे जसे भारतीय संघातील उपयुक्त खेळाडू होते त्याप्रमाणे प्रविण हा आमच्या वर्गातील उपयुक्त सदस्य होता.तो वर्गाच्या कबड्डी आणि क्रिकेट संघात तर असायचाच पण मिलिंद नेरुरकरला शनिवारच्या नाटुकलीमधे काम करायला कोणी मिळाले नाही की तो ऐनवेळी प्रविणला गळ घालायचा.मला स्मरतय,"थांब टकल्या भांग पाडते"सारख्या विनोदी नाटुकलीची नेमकी फार्सीकल नस पकडून तो बघता बघता मिलिंदसकट इतर सहकलाकारांना आरामात खाऊन टाकायचा.(अभिराम भडकमकरच्या 'हसत खेळत' नाटकात विनय येडेकरने जसे अशोक सराफ आणि कंपनीला खाल्ले होते ना,अगदी तसेच.) प्रविण म्हणजे "कमी तिथे आम्ही" या उक्तीची जणू चालतीबोलती जाहिरातच.किंबहुना कोणाच्याही मदतीला धावून जाणे हा त्याचा स्थायीभाव होता.
पत्यांमधल्या जोकरप्रमाणे कोणाबरोबरही त्याचे गोत्र सहज जमायचे.शाळेतील त्याचा वावरही एखाद्या विदूषकासारखाच असायचा.कधी वर्गावर मुद्दामून उशीरा येऊन,शिक्षकांसकट सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा रोखलेल्या असताना,तो बदकासारख्या दुडक्या चालीने दरवाजापासून आपल्या बाकापर्यंत चालत जायचा.तर कधी केसांचा गोटासदृश्य झीरोकटच करुन यायचा.
पण आज इतक्या वर्षांनंतर वाटतं की या विदूषकी मुखवट्याआड तो त्याच्या मनातली खदखद किंवा अस्वस्थता आमच्यापासून लपवित तर नव्हता ?
तो लवकर घरी जायला फारसा उत्सुक नसायचा आणि शक्य तितका वेळ घराबाहेर काढायचा असा मला तेव्हाही अंधुकसा संशय होता.
एकदा तो मला संध्याकाळी उशीरा शाळेच्या युनिफॉर्ममधेच पार्कात भेटला.त्याच्या खिशात चक्क चार आणे होते.आमच्या शर्टला तर त्याकाळी खिसाच नसायचा.मला न कटवता उलट तो मला पाणीपुरी खायला घेऊन गेला.
त्यानंतर त्याचा भय्याशी खालीलप्रमाणे प्रेमळ संवाद झडला.
"भय्या, पानीपुरी कैसा दिया ?"
'आठ आणा'
"एक प्लेटमे कितना पुरी आयेगा ?"
'सात'
"हम दो दोस्त सात पुरी बराबर कैसे खायेगा ?"
प्रविणने बिनतोड गणिती सवाल केला.
(या भय्याने नंतरच्या काळात पवई परिसरात बऱ्याच अनधिकृत चाळी बांधल्या.पण इतका अवघड प्रश्न त्याला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील कधी विचारला नसावा.)
'ठीक है बाबा, आठ पुरी देगा !'
"ये ठिक है,यह लो चार आना,हम दोनो को दो-दो पुरी देना !"
प्रविण विजयी स्वरात म्हणाला आणि हे संभाषण कौतुकाने ऐकणाऱ्या पाच-सहा गिऱ्हाईकांसमोर भय्याचा नाईलाज झाला.
भय्याला जेरीस आणणारा पहिला मराठी माणूस मी पाहिलेला आहे.
कधीकधी त्याच्या खिशामधे उघडझाप करणारा एक चार इंची चाकू असायचा.(एकदा सुजाता नाडकर्णीने बसमधून शाळेच्या सहलीला जाताना,सामुदायिक भेळेवर पिळण्यासाठी म्हणून त्याला एक लिंबू कापायला दिले.त्याच्या त्या बोथट चाकूने पातळ सालीचे लिंबूदेखिल कापले जाईना तेव्हा,आपल्याला विश्वासाने हातभर राख्या बांधणाऱ्या वर्गभगिनींसमोर आपले नाक कापले गेले म्हणून तो कमालीचा ओशाळला होता.) हे हौस म्हणून खिशात चाकू बाळगणं वगैरे ठिक आहे पण तो स्वभावाने बिल्कुल खुनशी अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नव्हता.शाळेत त्याने कधी कोणाशी पंगा घेतल्याचे किंवा कोणाशी मारामारी अथवा दादागिरी केल्याचे मला तरी आठवत नाही. तो मूलतः मवाळपंथी असावा असं मानायला बरीच जागा आहे.
१९९१ सालातल्या एका भल्या पहाटे,बांद्राच्या टीचर्स कॉलनीसमोरील रस्त्यावर,प्रतिस्पर्धी टोळीकडून झालेल्या गोळीबारात तो मारला गेला.त्याच्या टोळीप्रमुखावर झालेला गोळीबार मधे पडून त्याने स्वतःच्या अंगावर झेलला म्हणतात.समोरच्याला मदत करण्याचा घेतलेला वसा त्याने मृत्यूच्या दारातदेखील टाकला नाही.
तो काही राजकारण्यांना आणि बिल्डर्सना वेठीला धरणारा हाय प्रोफाईल गँगस्टर नव्हता.त्यामुळे त्याच्या मृत्यूचाही फारसा गवगवा झाला नाही. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात 'विवाहितेस जाळले' अथवा 'तरुण बुडाला' अशा सिंगल कॉलमी बातम्यांखाली त्याच्या मृत्युची बातमी छापून आली होती असे सांगतात.
तो वाममार्गाला का,कधी व कसा लागला याचा शोध घेण्याची वेळ तर कधीच निघून गेली होती. त्याकाळी फिशपॉंड देण्याची पद्धत होती की नाही माहीत नाही पण "आदमी सडक का" हा फिशपॉंड त्याला चपखल बसला असता.
तो आज असता तर आमच्या वर्गाच्या रियुनियन संयोजनात त्याने उत्साहाने भाग घेतला असता.आणि किमान यावेळेस तरी चांगला धारदार चाकू आणून त्याने लिंबू आणि उकडलेली अंडी कापायला आम्हाला नक्कीच मदत केली असती.
प्रविण मार्तंड रेगे !!
संदीप सामंत.
९८२०५२४५१०
१४/०३/२०२२.
वकील जातचं लय चतूर
प्रसंग - काल सकाळी...
स्थळ - सांगली स्टेशन...
फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच.
कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी...
एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली...
"तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!"
वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन काढला...
त्यावर लिहीलं...
"मी मुकबधीर आहे...मला बोलता येत नाही ;ऐकू येत नाही... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या कागदावर लिहून द्या.."
बाई जे बोलली ते तिनं लिहून दिलं...
त्या वकीलांनी ते वाचलं...
कागदाची घडी करुन खिशात ठेवला आणि म्हणाले..
"हं...
बोंबला जोरात आता कि मी तुमची छेड काढली म्हणून,
माझ्याकडे तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे पुरावा म्हणून "
बाई पळाली ना सैराट !!!!
वकिलांचा नाद करायचा नाय !
तात्पुरता सदस्य म्हणजे नेमकं काय? त्या संदर्भातील इत्थंभूत माहिती देणारा हा लेख.
एकदा, बस स्थानकावर भर पावसात ओले चिंब भिजलेल्या तरुणीला पाहिल्यावर सुचलेली हि कविता!!!!
अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी ...माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ' घटस्फोट ' या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता ...कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..
तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला .." नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? " त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले .." होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे " .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला " छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच " हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे " असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली .." अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत ...तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? " पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..
एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..' अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..
अलका जायला उठल्यावर म्हणालो .." बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला " माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..' काय मग ? खुश ना ? ' मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..' ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले .
जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती .." विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला ." त्याने पिशवी माझ्यापुढे केली .." नको अहो ..मला भूक नाहीय .." शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली ...मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले .." अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता .." " काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी " असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..
रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती.." विजय भाऊ ..कुठे हरवलात ? " काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली ...बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण !
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
" मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५
वातावरण निर्मित होते, जसे जातां वागूनी ।
हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी...१,
फिरत असती वलये , सारी अंवती भंवती ।
चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती...२,
जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी ।
चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी....३,
जाता दुष्ट व्यक्ती , आपल्या जवळूनी ।
चलबिचल मन होते, केवळ सानिध्यानी.....४,
याच लहरी घुसुनी शरीरि, मनी आघांत करती ।
मनामध्ये बदल करूनी, तीच वृत्ती बनविती...५,
विहीरी वरच्या दगडांनाही, खुणा पडती जेथे ।
कसे टिकेल तन मन तेथे, नाजूक जे असते...६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
माझ्या वाचक मित्रांण्साठी मझी एक अप्रकाशित कविता ..यौवन
Copyright © 2025 | Marathisrushti