(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विजया दशमी (दसरा)

    अश्विन शुक्ल दशमीला विजया दशमी म्हणतात. या दिवशी शुंभ-निशुंभ, महिषासुर इत्यादी राक्षसांवर श्री दुर्गादेवीने विजय मिळविला, श्री रामांनी रावणावर याच दिवशी विजय मिळवला या कारणाने विजया – विजय मिळवून देणारी दशमी असे म्हटले जाते.

  • विकल भैरवी

    "झिमझिम पाऊस,आभाळ भरून.

    शिरशिर गारवा, वाराभरुन.
    कातरवेळा, अंधारभरून.
    मिणमिण दिवे, सांवल्याभरून.
    मुकें घर. दालन दालन.
    मुकें तन. मुकें मन.
    मुकें काहूर. इथून-तिथून.
    मुका ताण पदर भरून.
    कवियत्री इंदिरा संत यांच्या "पदर भरून" या कवितेच्या या ओळी, भैरवी रागीणीच्या भावछटा नेमक्या दर्शवून देतात. या रागिणीचे सूर असेच आहेत, पहिल्या सुरांपासून विरहाची तसेच विकल भावनेची आर्तता दर्शवतात. मनात एकप्रकारची पोकळी निर्माण करतात आणि रितेपण दाखवतात. अर्थात हे झाले भैरवी रागिणीचे एक भावविश्व. भारतीय रागदारी संगीत हे बहुतेकवेळा भावनांच्या वेगवेगळ्या छटा दर्शवून रसिकांना चकित करण्याची किमया करते आणि याला ही रागिणी देखील अपवाद नाही इथे ज्या प्रमाणात विरही छ्टा आहेत, त्याचबरोबर भजनातून येणारा समर्पित भाव देखील विपुल प्रमाणात आढळतो.
    उस्ताद अली अकबर खान साहेब म्हणजे सरोद वादनातील अपूर्व नाव. द्रुत लय चालू असताना, मध्येच खंडित तान घेऊन, त्यातून "मिंड" काढायचे त्यांचे कौशल्य केवळ असामान्य असेच म्हणायला हवे. वादन करताना, प्रत्येक सूर आणि त्याचे सादरीकारण, यात सतत वैविध्य आणण्याचे त्यांचे कसब लाजवाब म्हणायला लागेल. वास्तविक सरोद म्हणजे तंतुवाद्य, तेंव्हा त्यातून निघणारे स्वर हे नेहमीच "तुटक" असणार पण तरीही तारेची खेच आणि तारेवर दाब देऊन, निर्मिलेली रचना रसिकांना नेहमीच चकित करून सोडते. भैरवी सारखी अत्यंत लवचिक रागिणी सादर करताना, "सा ग रे ग म" ही स्वरसंहती ऐकण्यासारखी आहे. "गंधार" आणि "मध्यम" घेताना, ज्याप्रकारे "षडज" स्वरावर "उतरतात" हे ऐकणे अतिशय विलोभनीय आहे.यात आणखी एक मजेशीर बाब आढळते. सरोदवर भैरवीचे सूर ऐकायला मिळत असताना, एकदम "सिंध भैरवी"चे सूर देखील ऐकायला मिळतात. वास्तविक, "सिंध भैरवी" ही रागिणी "भैरवी" कुटुंबातील सदस्य पण, फरक इतकाच आहे, "सिंध भैरवी" ही लोकसंगीताच्या आधारे सादर केली जात असल्याने, त्यात सुरांना बरेच स्वातंत्र्य मिळते आणि रचनेची शोभा अधिक खुलून येते.
    माडगूळकरानी "गीत रामायण" लिहून, गेयताबद्ध कवितेचा एक मानदंड निर्माण केला असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. गीत रामायणातील कुठलेही गीत, ही आधी अप्रतिम कविता आहे, याचे आपल्याला भान येऊ शकते. गाण्यासाठी लेखन करताना, आपली शैली चित्रदर्शी असावी म्हणजे सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर विनासायास येऊ शकतो आणि ही अट, गीत रामायणात पूर्णांशाने झालेली दिसते. भारतीय समाजाच्या मानसिकतेचे खरे प्रतिबिंब या काव्यातून दिसून येते. या गीत रामायणाचा शेवट करताना, माडगूळकरांनी,
    रघुराजाच्या नगरी जाऊन,
    गा बाळांनो, श्रीरामायण.
    अशा ओळीने केला आहे. प्रसंग असा - रामाचे चरित्र सांगून पूर्ण झाले असताना, आता चरित्राची "सांगता" करण्यासाठी योजलेले हे गीत. एका अर्थाने अतिशय प्रभावी समारोप. एक मोठा कालखंड संपल्याची इतिश्री पण त्याचबरोबर योजलेले काम यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद, हे दोन्ही भाव या गाण्यातून व्यक्त होतात.
    अर्थात, सुधीर फडक्यांनी अत्यंत समयोचित अशी भैरवी रागिणी इथे योजलेली आहे. "रघुराजाच्या नगरी जाऊन" या पहिल्याच ओळीत आपल्याला भैरवी दिसते आणि पुढे संपूर्ण रचना याच रागीणीच्या छायेत वावरते. संगीत रचना अतिशय द्रुत लयीत आहे आणि याचे मुख्य कारण, एका भव्य समारंभाचा अंत देखील तितक्याच सहजतेने आणि कायमस्वरूपी रहावा, हीच इच्छा. इथे देखील सुधीर फडक्यांचे अतिशय विशुद्ध, भावपूर्ण गायन, हेच वैशिष्ट्य आढळते. गायनात स्पष्टोच्चार असावेत पण त्याच जोडीने भावपूर्ण गायनाला कुठेही "ढळ" लागता कामा नये, अशी दुहेरी कसरत करायची. वरती ज्या प्रमाणे, मी माडगूळकरांचा मानदंडाबद्दल लिहिले, त्याच शब्दात सुधीर फडक्यांच्या गायनाबाबत लिहावे लागेल.
    मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, भैरवीत भजनी अंग देखील सुंदररीत्या रंग भरते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ज्ञानेश्वरांची "अजि सोनियाचा दिनू" ही रचना. संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानेश्वरी स्वरबद्ध केली त्यात, ही रचना आहे. मुळात, ज्ञानेश्वरांची रचना म्हणजे प्रासादिक रचनेचा आदिनमुना!! अत्यंत लयबद्ध शब्दकळा, हे तर वैशिष्ट्य आहेच पण त्याला जोडून, आशयाची अभिवृत्ती आपला वाचिक अनुभव श्रीमंत करणारी. काहीवेळेस, रचना काहीशी गुढार्थात शिरते परंतु संपूर्ण रचना वाचायला घेतल्यावर आशयघनता संगीतकाराला आव्हान देणारी.
    अजि सोनियाचा दिनु,
    वर्षे अमृताचा घनु.
    स्वररचना करताना, संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांनी फक्त "एकतारी" आणि "चिपळ्या" यांचाच वापर केला. त्यामुळे, रचनेतील ज्ञानेश्वरांची शब्दकळा आपल्याला, गाण्याच्या स्वरुपात ऐकताना देखील स्वच्छपणे समजून घेता येते. आता एकूणच शब्दकळा बघितली तर, आज ईश्वराचा साक्षात्कार शाल आहे आणि आता आयुष्यात आणखी काही बघायचे, अनुभवायचे राहिले नाही, या विरक्तीची जाणीव लखलखित दिसते आणि मग अशा आशयाला भैरवीचे सूर आत्ममग्न स्वरूप नेहमीच प्रदान करतात. गाण्याच्या पहिल्या सुरापासून, भैरवीची आळवणी सुरु आहे आणि ती संपूर्ण गाणे भारून टाकणारी आहे.
    मराठी संगीत नाटक "संन्यस्त खड्ग" मध्ये अशीच एक असामान्य रचना, भैरवी रागाचे अनोखे रूप दाखवणारी आहे. नाटककार आणि कवी सावरकरांनी इथे दोन्ही भूमिका बजावलेल्या आहेत. नाटक सरळ, सरळ ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या विरोधात लिहिलेले आहे, त्यामुळे बरेचसे प्रचारकी झालेले आहे. असो, तो भाग वेगळा. नाट्यगीताच्या बाबतीत एक बाब अवश्यमेव घडत असते आणि ती म्हणजे, गायक कलाकाराच्या मगदुरानुसार संगीत रचनेत बदल घडू शकतात, क्वचित प्रसंगी चाल देखील बदलली जाते. "शत जन्म शोधिताना" ही मुळातली कविता, आधी मास्टर दीनानाथांनी प्रसिद्ध केली. नंतर मग वसंतराव देशपांड्यांनी त्यात आणखी वेगळे रंग भरले आणि ही रचना अधिक श्रीमंत केली. कविता म्हणून देखील ही रचना अतिशय समृद्ध आणि आशयाधिष्ठीत आहे. पहिल्या वाचनात आकळून घेणे, सगळ्यांना जमेलच असे नाही. सावरकर, कवी म्हणून आपली ओळख नव्याने आणि फार वरच्या दर्जाने करून देतात.
    शत जन्म शोधिताना, शत आर्ती व्यर्थ झाल्या;
    शत सूर्यमालिकांच्या, दीपावली विझाल्या.
    संगीतरचना म्हणून देखील हे गाणे फारच सुंदर आहे. मध्य लयीत सुरु होते आणि बघत, बघत द्रुत लयीत शिरते. मास्टर दीनानाथ काय किंवा वसंतराव देशपांडे काय, गायनाचा आवाका प्रचंड आणि ऐकणाऱ्याला दिपवून टाकणारा, अस्वस्थ करणारा. भैरवी रागिणीचा विचार करता, या रचनेत भैरवी सरळ समोरून आपल्याला भेटत नाही. एकूणच सगळी रचना एकदम अंगावर येत असल्याने, आपल्याला शांतपणाने ऐकण्याची चैन घेता येत नाही आणि त्यामुळे भैरवी नेमकी कुठे आहे, याचा संभ्रम पडतो.अर्थात, जरा शांतपणे आस्वाद घेण्याचे ठरवले तर गाण्यातील भैरवीचे अंग समजून घेता येईल.
    मुळातल्या रागदारी गायिका तरीही सुगम संगीतात देखील सहज विहार करणाऱ्या गायिका म्हणून किशोरी आमोणकरांचे नाव घ्यावेच लागेल. गळ्यावर "जयपुर" घराण्याचा ठसा तरी देखील रागदारी गायनात इतर घराण्यातील सौंदर्यस्थळांचा सहज आढळ!! एकूणच रागदारी गायन म्हणजे बुद्धीगम्य गायन, हा विचार ठामपणे मांडणारी गायिका. भैरवी रागातील काही अप्रतिम भजनांपैकी "अवघा रंग एक झाला" या भजनाचे स्थान अनन्यसाधारण आहे. अर्थात जरी भजन गायन असले तरी, गळ्यावरील रागदारी गायनाचा ठसा पुसणे अशक्य आणि हे तर सगळ्याच शास्त्रीय गायन करणाऱ्या कलाकारांबाबत म्हणता येते. सततच्या रागदारी गायनाच्या रियाजाने, कलाकाराचा गळा "जड" होतो आणि त्यामुळे स्वरांची फेक देखील त्याच अनुषंगाने होत असल्याने, सुगम संगीतात जो सहजपणा आवश्यक असतो तिथे बरेचवेळा हे कलाकार अपुरे पडतात.
    अवघा रंग एक झाला,
    रंगी रंगला श्रीरंग.
    या रचनेत, भैरवी रागाचे सूचन पहिल्या झटक्यात आपल्या लक्षात येते रचना सरळ, सरळ भजनी अंगाने विस्तारलेली आहे. " अवघा रंग एक झाला" या ओळीत, "झाला" या शब्दावर भैरवीचे "तोंड" दिसते. भजनी ठेका आहे. अर्थात, मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, गाण्यातील हरकती, ताना इत्यादींवर रागदारी गायनाचा पगडा दिसतो. अर्थात, इथे आणखी वेगळा मुद्दा मांडता येतो. ज्या हिशेबात गझल गायन देखील "भावगीत" अंगाने तसेच "मैफिली" अंगाने, दोन्ही प्रकारे सादर करता येते तर मग भजन देखील त्याच वळणाने सादर होऊ नये? अर्थात कलाकाराला सुरांची नेमकी जाण असल्याने, एकूणच सगळी रचना समृद्ध होते, हे निश्चित.
    मराठी चित्रपट "एक गाव,बारा भानगडी" - या चित्रपटात, सुमन कल्याणपूर यांनी अतिशय सुश्राव्य असे गाणे गायले आहे. "कशी गौळण राधा बावरली, बावरली". संगीतकार राम कदमांची चाल आहे. संगीतकार राम कदम, यांच्या चालीवर मराठी लोकसंगीताचा नेहमीच प्रभाव जाणवतो. इथे तर चित्रपटातील नायिका तमाशामधील असल्याने, खास मराठी लोकसंगीताचा ठसा उमटणे साहजिक ठरते. कवियत्री शांताबाई शेळक्यांची शब्दरचना आहे. शांताबाई मुळातल्या भावगीत लेखिका, याचा परिणाम या गाण्यात देखील दिसून यतो. जसे वरती माडगूळकरांच्या रचनेबद्दल लिहिले आहे, तेच शब्द इथे शांताबाईंच्या कवितेबद्दल लिहिता येतील. सहज, सोप्या शब्दातील रचना परंतु आशयसंपन्न. त्यामुळे संगीतकाराला चाल बांधायला हुरूप देणारी.
    कशी गौळण राधा बावरली, बावरली.
    जलभरणा यमुना गेली, शीळ खुणेची अवचित आली;
    रोमांचित काया थरथरली, कशी गौळण राधा बावरली.
    सुमन कल्याणपूर यांच्या गायकीशी किंचित फटकून वागणारी ही रचना आहे पण, मुळात चालीत गायकी अंग असल्याने, गायनात तितकाच उठाव मिळतो. गाण्यात बारीक हरकती आहेत पण त्या हरकती सहजगतीने गळ्यावर चढणाऱ्या नाहीत. गाण्यातील "गौळण" शब्द या दृष्टीने ऐकावा. किंचित स्वरांत हेलकावा आहे पण सुरांचे जराही ओझे होत नसून, गाण्यातील सौंदर्य वाढवणारे आहे. भैरवी रागिणीचे हे देखील अनोखे तितकेच अप्रतिम विलोभनीय रूप.
    -- अनिल गोविलकर

  • जैविक शेतीचा प्रसार आणि प्रचार

    अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतीक्षेत्रात रासायनिक खतांचा आणि किटकनाशकांचा वापर बेसुमार वाढला. मात्र, याचे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतीक्षेत्रात नैसर्गिक खतांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. शिवाय जैविक पद्धतीने शेती करण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे. असे असले तरी हे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

  • वैभवशाली, शांत, निरव…दरबारी

    "इश्क मुझ को नहीं वहशत ही सही
    मेरी वहशत तेरी शोहरत ही सही
    हम भी दुश्मन तो नहीं हैं अपने
    गैर को तुझ से मोहब्बत ही सही"
    मिर्झा गालिब यांच्या एका सुप्रसिद्ध गझलेतील या ओळी म्हटले तर दरबारी रागाची तोंडओळख दाखवतात अन्यथा एका प्रेमी मनाची हैराणी अवस्था दर्शवतात. दरबारी राग हा असाच आहे, एकाच वेळी मानवी भावनांच्या अनंत छटा दर्शवून रसिकांना चकित टाकणारा. खरतर हे वैशिष्ट्य बहुतेक सगळ्या रागदारीबद्दल मांडता येईल.
    लखलखती झुंबरं, लालगर्द गालिचा, आजूबाजूला खाशा स्वाऱ्या, प्रशस्त दालनाच्या एका टोकाला; पण मध्यभागी रत्नजडीत सिंहासन. सर्वत्र गंभीर वातावरण. तरीही, अत्तराच्या फवाऱ्यानं सुगंधित झाल्याने वातावरणात काहीसा हलकेपणा. दालनाच्या बरोबर मध्यभागी खास बिछायत अंथरलेली आणि त्यावर वाद्यं मांडून ठेवलेली आणि सगळेजण राजगायक येण्याची आतुरतेने आहेत. अशा अत्यंत आलिशान दरबारात राजगायकाचे आगमन होते आणि त्याच्या सोबत, कोमल धैवत आणि कोमल निषाद स्वरांची चाहूल लागते.
    दरबारी राग ऐकताना, मनासमोर असंच वैभवशाली चित्र उभं राहतं. संगीतसम्राट तानसेननं अकबर बादशहाच्या विनंतीवरून आणि त्याच्या दरबाराच्या मांडणीतून हा राग तयार केला, असं इतिहासात वाचायला मिळतं. अर्थात, याला तसा शास्त्राधार काही नाही. मात्र, हा राग अतिशय वैभवशाली आहे. यात सगळे स्वर लागत असल्यामुळे या रागात स्वरविस्ताराला भरपूर वाव असतो. म्हणून हा खऱ्याअर्थी ‘संपूर्ण’ राग आहे. यात ‘गंधार’ स्वर इतका ‘कोमल’ लागतो की, कधीकधी आधीच्या ‘रिषभ’ या स्वराशी नातं जाणवून देतो. अर्थात, असा प्रकार ‘अवरोही’ स्वरांत दिसतो, म्हणजे त्याचं ‘मध्यम’ स्वराशी नातं जोडलेलं असतं. या रागाची प्रकृती गंभीर. त्यामुळे तो गाणाऱ्या गायकाची परीक्षाच असते. म्हणून कदाचित बहुतेक गायकांच्या हा राग पचनी पडत नसावा. याची आलापी तर फारच कठीण. मंद्र सप्तकातून सुरुवात होते, ‘गंधार’ स्वर आंदोलित पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे गायकाचा रियाज किती ‘कसदार’ आहे, याचा पडताळा घेता येतो. या रागाची स्वरसंहती बघितल्यास, "सा सा रे रे सा नि सा","म ग म रे सा","नि ध नि ध नि नि सा". या स्वरसंहितीवरून आपल्याला या रागातील प्रमुख स्वरांची ओळख करून घेत येते.
    सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं. वातावरणात एकांत इतका की, साध्या काजव्याचं कुजबुजणंही अंधारावर ओरखडा उमटवून जाईल. वाराही झुळकीच्या स्वरूपात स्वत:चं अस्तित्व दाखवतोय. त्यामुळे वातावरण थंडगार, स्निग्ध झालेलं. चंद्राचा प्रकाश आपलं नाममात्र अस्तित्व दाखवतोय. अशा वेळी दूरवरून पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या बासरीचे हलके आलाप कानावर येतात.
    सुरांची अनुभूती, या शब्दाची प्रचिती यावी तर अशी! फक्त आलापी! त्याला तालवाद्याचा धक्काही सहन होणं अवघड. अत्यंत नाजूक; पण लपेटदार स्वरांची वळणं... हे सर्व आपल्याला फक्त ‘दरबारी’ रागाचीच आठवण करून देतं. याचा प्रत्येक स्वर इतका शांत, गंभीर असतो की, तिथं स्वत:चा श्वास आणि त्याचा आवाजही नको वाटावा! स्वरांचं ते ‘आत्मगत’ वळण, आपल्याला संमोहित करतं. इथं स्वरांची ‘जात’ कळून येते. याचं तंतोतंत प्रात्यक्षिक या वादनातून समजून घेता येईल. यात, ‘आंदोलित’ गंधार स्वर आणि त्याचं संपूर्ण सप्तकातील अस्तित्व, याची खुमारी जाणता येते. त्याचसोबत स्वरभाषा म्हणजे काहीतरी न कळण्यासारखा विषय आहे, ही समजूत खोडून काढण्यासही मदत होते.
    सुगम संगीतात या रागावर आधारित भरपूर गाणी आहेत. शांत, नीरव अंधाराचं नेमकं प्रत्यंतर ‘मीलन’(१९५८) चित्रपटातील ‘हाये जिया रोये’ या गाण्यात येते.
    वास्तविक हे गाणं तसं प्रसिद्ध नाही; पण या गाण्यातील, लताताईंची गायकी अपूर्व आहे. यात दरबारी रागाची केवळ ‘छाया’ आहे. बहुधा, संगीतकार हंसराज बहेल यांना या रागातील एखादी ‘फ्रेज’ ऐकून, त्यातून या असामान्य गाण्याची चाल सुचली असणार. अर्थात, हा केवळ तर्क आहे. लताताईंच्या सगळ्या सप्तकात सहजगत्या विहार करण्याच्या असामान्य कुवतीचा या गाण्यात पुरेपूर वापर करण्यात आला आहे. या गाण्यातील विरहाची भावना इतकी टोकाची आहे की, आपण ऐकताना थक्क होतो. सुरुवातीच्या ‘हमिंग’मधून या रागाची थोडी कल्पना येते आणि पार्श्वभागी वाजत असलेल्या बासरीनं त्याचं स्वरूप स्पष्ट होतं. चालीचा ‘मुखडा’ बांधताना या रागाचे काही सूर घ्यायचे; पण पुढे चाल आणि राग स्वतंत्रपणे आपापला मार्ग शोधीत जातात. इथे हेच झालं आहे. सुरुवातीला ‘रिषभ’ आणि ‘पंचम’ या दोन स्वरांच्या आधारे इतर स्वर जोडून घेतले, त्याला ‘कोमल’, ‘गंधार’ स्वराची विलक्षण जोड दिली आणि त्यातून चाल झाली.
    संगीतकाराची बुद्धिमत्ता अशा वेळी दिसून येते. पुढे या गाण्याची चाल रागापासून दूर जाते, म्हणजे नक्की काय होतं? त्यासाठी ‘तुमने तो देखा होगा, ई चांद तारो’ ही ओळ ऐकावी. ‘तुमने’मधील ‘तु’ शब्दावर किंचित वजन देऊन तो शब्द उच्चारला आहे... आणि क्षणात लताताईंचा आवाज वरच्या स्वरांत जातो, अगदी टिपेला पोहोचतो, तो ‘तारो’ या शब्दापर्यंत. स्वर सतत ‘चढता’ आहे. हे ‘वळण’ साध्या गळ्याला पेलणारं नाही. या चालीच्या स्वरांत कुठेही नेमका ‘दरबारी’ दिसत नाही. म्हणजे बघा, सुरुवात या रागावर; पण पुढे चाल त्याच स्वरांच्या साक्षीनं; पण वेगळी वाट चोखाळते. सुगम संगीतात प्रयोग करायला तसा वाव कमी असतो, पण तरीही अशा ठिकाणी संगीतकाराला वाव मिळतो.
    दुसरं गाणं जरा वेगळ्या धाटणीचं आहे. एकतर त्यात दरबारी ‘शोधायला’ लागतो आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, दरबारी म्हणजे गंभीर, असं जे चित्र निर्माण होतं, ती ओळख आपल्याला पूर्णत: पुसून टाकावी लागते. अर्थात, असा प्रकार अनेक रागांच्या बाबतीत घडला आहे. जुन्या ‘आझाद’ चित्रपटातील ‘कितना हंसी है मौसम, कितना हंसी सफर है’ हे गाणं अतिशय बारकाईनं ऐकलं, तर एक-दोन ठिकाणी दरबारी रागातील स्वरांची झलक ऐकायला मिळते.
    अर्थात, राग डोळ्यासमोर ठेवून गाण्याची चाल बनवली, तर लगेच त्याचा अदमास घेता येतो. इथं चाल आधी तयार झाली आणि मग त्या गाण्याच्या सुरावटींचं दरबारी रागाशी कुठेतरी नातं जुळलं. अत्यंत हलकीफुलकी आणि त्या गाण्यातील शब्दांच्या भावार्थाशी नेमकी जुळणारी चाल आहे. रागाच्या प्रकृतीशी फटकून वागणारी ही चाल दरबारी रागावर आहे, हे मानायलाच मन तयार होत नाही. ही किमया अर्थात, संगीतकार सी. रामचंद्र यांची. ‘मिलती नही मंझील राही हो जो अकेला’ या ओळीत या रागाशी नातं सांगणारे सूर सापडतात; पण तरीही स्वरांची ‘ठेवण’ भिन्न आहे. म्हणजे या कडव्याची सुरावट दरबारीच्या सुरांशी मिळतीजुळती आहे; पण जेव्हा गाणं पुन्हा मूळ ध्रुवपदाकडे वळतं, तेव्हा हीच चाल आपला नवीन मार्ग सोडून, मूळ मार्गावर येते. हेही संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचंच कौशल्य!
    दरबारी रागाचं खरं वैभव दाखवून देणारं आणखी एक गाणं म्हणजे, ‘तू प्यार का सागर है’. यात दरबारी रागाच्या श्रीमंतीचं पुरेपूर दर्शन घडतं.
    रागाची गंभीर वृत्ती, शांत स्वभाव आणि स्वरांचं मंद्र सप्तकातील चलन. आंदोलित ‘कोमल गंधार’, तसंच ‘रिषभ’ आणि ‘पंचम’, या दोन प्रमुख स्वरांचं नातं. गाण्याचा सुरुवातीचा जो वाद्यमेळ आहे, ऑर्गन आणि व्हायोलिन, त्यांच्यातून जी सुरावट निर्माण होते, ती दरबारी रागाची खूण. अगदी नेमके सूर या वाद्यमेळातून निघतात. तोच गंभीर भाव, तेच शांत सूर आणि गायक मन्ना डे यांचं अतिशय परिणामकारक गायन. परिणामी हे गाणं अजरामर झालं.संगीतकार शंकर/जयकिशन या जोडगोळीने हे गाणे स्वरबद्ध केले आहे. गाण्याच्या सुरवातीला, "ऑर्गन" सारख्या अति गंभीर वाद्यातून आपल्याला या रागाची खूण पटते. पुढील रचनेवर, याच रागाची सावली तरळत असते आणि रागच जो मूळचा गंभीर भाव आहे, त्याचीच प्रचीती ऐकताना मिळते.
    भारतीय चित्रपट संगीत किती विविधतेनं नटलेलं आहे, याचा आणखी एक पुरावा. ‘अगर मुझसे मुहब्बत है, मुझे सब अपने गम दे दो’ हे गाणे.
    हे असंच आणखी एक सुंदर गाणं. यात लताताईंच्या सर्वव्यापी गायकीचा पुरेपूर वापर केला आहे. चालीला अतिशय अवघड; पण तितकंच सुश्राव्य. मदन मोहन यांच्या शैलीतील एक प्रातिनिधिक गीत, असं याचं वर्णन करता येईल. गाण्याच्या सुरुवातीला जो व्हायोलिनवरील सुरांचा तुकडा आहे, त्यातून या रागाची ओळख होते. गमतीचा भाग म्हणजे, पुढे ही ओळख पुसट होत जाते. इतकी की, या गाण्याची चाल हे एक स्वतंत्र प्रकरण होतं! हे फार अवघड चालीचं गाणं केवळ लताबाईंच्याच गळ्याला साजेसे असे हे गाणे आहे. वास्तविक या संगीतकाराच्या रचना ऐकल्या तर आपल्याला लगेच जाणीव होते, याची संगीतकाराची प्रकृती ही मुळात "गीतधर्मी" आहे, त्यामुळे गाण्याची चाल किती अवघड असली तरी गाणे ऐकताना, अतिशय सुश्राव्य वाटते आणि हीच तर या संगीतकाराची खासियत आहे.
    "दैय्या रे दैय्या लाज मोहे लागे" हे गाणे वास्तविक रंगमंचावरील "नृत्य गीत" आहे आणि नृत्य गीत जसे असायला हवे, त्याच प्रकृतीने बांधलेले आहे. संगीतकार नौशाद यांची रचना आहे आणि आशा भोसले यांनी गायलेले आहे. गाण्यातील खटके तसेच धारदार हरकती, ही खास सौदर्यस्थळे आहेत. आशा भोसले यांच्या आवाजातील ही नजाकत नेमकी ध्यानात घेऊन, नौशाद यांनी गाण्याची चाल बांधली आहे. आता रंगमंचावरील नृत्य असल्याने, गाणे जलद गतीत आहे. वैजयंतीमाला या अभिनेत्रीच्या नृत्यकौशल्याचा अतिशय सुरेख उपयोग करून घेताना, गाण्याची रंगत वाढलेली आहे. गाणे जिथे संपते, तिथे एक छोटीशी सतारीची गत आहे, ही गत म्हणजे दरबारी रागाची स्पष्ट खूण.
    काही वर्षांपूर्वी "साजन" नावाचा हिंदी चित्रपट आला होता आणि त्यातील बहुतेक सगळीच गाणी खुप गाजली होती. त्या चित्रपटात, "देखा है पहेली बार, साजन की आंखो में प्यार" हे गाणे देखील खूप गाजले होते. या गाण्यातील काही सांगीतिक वाक्यांश दरबारी रागाशी नाते सांगतात. संगीतकार नदीम/श्रवण या जोडीने या गाण्याची तर्ज बांधली आहे. चाल अतिशय सोपी आहे, अलका याज्ञिक आणि बाल सुब्रमणियम यांनी गायलेले युगुलगीत आहे. सुंदर प्रणयी भावनेचे गीत आहे आणि गाण्यातील ठेका, आपल्याला डोलायला लावतो.
    दरबारी रागाची अशीच खासियत आहे. नावाप्रमाणे रागाचे सून आपल्याला रागाची "शान-ओ-शौकत" दर्शवित असतात आणि हेच ऐट, स्वरांचे ऐश्वर्य, स्वरांची अथांग गंभीरता आपल्या मनावरून कधीच पुसून टाकता येत नाही. कुठल्याही स्वरावलींचे हेच तर मूळ उद्दिष्ट असते किंवा असावे.
    -- अनिल गोविलकर

  • गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या आत्महत्या !

    काय शेतकर्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसायच ? शेतकर्यावर कोणतही नैसर्गिक संकट ओढावल की त्यांना ताबडतोब मदत मिळायलाच हवी. वराती मागून घोडे नाचवून त्याचा उपयोग काय ? सरकार आपल्या पाटीशी आहे.

  • भारतमातेच्या वीरांगना – ३८ – अवंती बाई लोधी

    राणीने आपल्या प्रजाजनांनमध्ये स्वातंत्र्याचे बीज पेरले होते. इंग्रजी राजवटी विरुद्ध काम सुरू केले होते, शेतसारा इंग्रजांना न देण्याचा हुकूम काढला होता. प्रजा आणि आसपासचे छोटे छोटे राजे देखील राणी च्या नेतृत्वा खाली इंग्रजांना परतवून लावायला तयार झाले होते. १८५७ चे समर शिंग फुंकले गेले होते.

  • काळाच्या पडद्याआड गेलेले मुंबईचे ‘कॅफे समोवर’

    दक्षिण मुंबईच्या काळा घोड्याजवळील प्रख्यात जहांगिर आर्ट गॅलरीच्या आडोशाला राहून मुंबईच्या सांस्कृतिक घडामोडींचे साक्षीदार बनलेल्या ‘कॅफे समोवर’ने २०१५ मध्ये मुंबईकरांना अलविदा म्हटले आणि सवयीने या कॅफेकडे वळणारी अनेक असंख्य पावले थांबली! यामध्ये होती अमोल पालेकर, शाम बेेनेगल वगैरेंसारखी नामांकित मंडळी आणि तुमच्या-माझ्यासारखे असंख्य मुंबईकर.

  • कथा एका कथेची

    एका वेबसाईटवरील एका भव्य कथा स्पर्धेचा मी कधी नव्हे तो भाग होण्याचा निर्णय घेतला. माझ्या कथा म्हणजे लघू कथा ! ज्या बर्‍याचदा दिवाळी अंकात प्रकाशित होत असतात.

  • देश विदेशातील गणपती……..!!

    ह्या गणपतीस अग्नी रुपी सुद्धा म्हणतात कारण त्यांना जी चार आयुध्ये ब्रम्हदेवाकडून मिळालीत ती सूर्याच्या तेजापासून निर्माण झालेली आहेत. ‘पाश’, ‘अंकुश’, ‘कमल’ आणि ‘परशू’ ही आयुधे ही होत.

  • प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

    राज्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही निवड निश्चित होईल असे दिसते. मुख्य म्हणजे आपल्याला हवी ती व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी विराजमान व्हावी यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि केंद्रातील मंत्री विलासराव देशमुख हे दोघेही कसून प्रयत्न करत आहेत. ही त्यांच्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची नामी संधी आहे. यात कोण बाजी मारतो हे पहायला हवे.