ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्यातील अनुभव लिहिलेले आहेत.
कर्करोगाने ग्रासलेल्या आणि अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून पत्नीसमवेत मी मध्यंतरी तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर आंघोळ वगैरे उरकून ‘हॉस्पिस’(हॉस्पिटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंत:काळ जवळ आलेला असतो अशांना ‘हॉस्पिस’मध्ये ठेवतात. त्या ठिकाणी कुठलाही रोग बरा करणारा औषधोपचार होत नाही, परंतु अटळ असणारा मृत्यू सर्वार्थाने शांतपणे व्हावा, वेदना न होता यावा यासाठी वेदनामुक्तीच्या उपचाराची सर्व व्यवस्था हॉस्पिसमध्ये असते. (‘हॉस्पिस’ ही संकल्पना आता भारतातही रुजू लागली आहे. भारतातील काही शहरांमध्ये ‘हॉस्पिस’ आहेत.) अमेरिकेतील ‘हॉस्पिस’मध्ये रुग्ण जास्तीत जास्त किती काळ जगण्याची शक्यता आहे, याची स्पष्ट कल्पना रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना देण्यात येते. स्वच्छ आणि टापटीप असणाऱ्या या हॉस्पिसमध्ये भेटायला जाणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांवर वेळेचे बंधन नसते. रात्री- अपरात्री केव्हाही, कितीही नातेवाईक हॉस्पिसमध्ये जाऊन मरणासन्न रुग्णाला भेटू शकतात. रुग्णाच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपूस होते. त्यांना कॉफी, केक इत्यादी पदार्थ मिळण्याची आणि विश्रांती घेण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. हात र्निजतुक करण्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझर्स ठेवलेले असतात. हॉस्पिसमधील कर्मचारी आणि नर्सेस अत्यंत अदबीने वागतात. रुग्ण मरणासन्न अवस्थेत असल्याने त्याच्या मनाने खचलेल्या नातेवाईकांची काळजी सातत्याने जाणीवपूर्वक घेतली जाते. रुग्णाच्या नातेवाईकांसाठी इंटरनेटची आणि फोनची व्यवस्था असते.
आम्ही सकाळी ११ च्या सुमारास हॉस्पिसमध्ये पोहोचलो आणि दुपारी ४.२५ वाजता माझ्या पत्नीची वहिनी निवर्तली. हॉस्पिसमधल्या सुंदर, शांत आणि आरामदायी वातावरणात हळूहळू श्वास मंद होत तिला मृत्यू आला. योग्य प्रमाणात वेदनाशामके दिल्यामुळे मृत्यू येताना तिच्या चेहऱ्यावर अथवा शरीरावर कुठलीही वेदना अथवा घुसमट जाणवली नाही. हॉस्पिसमधील डॉक्टर जवळच होते. त्यांनी व्यवस्थित तपासले आणि ‘सॉरी’ म्हणून मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
मृत्यू एक-दोन दिवसांत येईल, याची पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे फ्यूनरलची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. न्यूयॉर्कमधील लाँग आयलन्ड या भागात असलेल्या ‘फ्यूनरल होम’ या संस्थेस अंत्ययात्रेचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. दु:खाचा पहिला आवेग ओसरल्यावर फ्यूनरल होमच्या व्यवस्थापकास फोन केला गेला. काही मिनिटांच्या आत सुटाबुटातील एक तरुण आणि त्याचा साहाय्यक शववाहिका घेऊन आले. त्याने डेथ सर्टिफिकेट ताब्यात घेतले. मृतदेहाचा ताबा घेतला. चेन असलेल्या कापडी बॅगेत मृतदेह काळजीपूर्वक ठेवून तो शववाहिका घेऊन गेला. जाताना त्याने हळुवारपणे सर्व नातेवाईकांचे सांत्वन केले आणि अत्यंत खुबीने पुढील कार्यक्रमाची माहिती दिली.
शास्त्रशुद्ध पद्धतीने मृतदेह स्वच्छ करण्यात आला. काही रासायनिक द्रव्ये शरीरात सोडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी काही जवळचे नातलग फ्यूनरल होममध्ये गेले. त्या मृत शरीरास साडी-चोळी नेसवण्यात आली. फ्यूनरल होममधील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला चक्क मेकअप केला. मखमली पेटीत पहुडलेला तो मृतदेह एखाद्या सुंदर बाहुलीसारखा दिसत होता. दुपारी २ ते ४ आणि संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत त्या मृतदेहाच्या अंत्यदर्शनाचा (viewing) चा कार्यक्रम होता. सुंदर मखमली पेटीत मृतदेह ठेवला होता. ज्या हॉलमध्ये मृतदेह ठेवला होता, तो हॉल उंची फर्निचर, गुबगुबीत गालिचे आणि चांगल्या आसन व्यवस्थेने सजवला होता. फ्यूनरल होमचे सर्व कर्मचारी सुटाबुटात होते. इमारतीच्या समोर सुमारे २०० गाडय़ा उभ्या राहतील, अशी पार्किंगची सोय होती. प्रवेशद्वारावरील दोन तरुणी अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे अदबीने स्वागत करीत होत्या. अमेरिकेतील भारतीय मंडळीसुद्धा सुटाबुटात आली होती. येताना अत्यंत शोभिवंत असे फुलांचे मोठे गुच्छे मृतदेहाशेजारी ठेवण्यासाठी आणत होते. शवपेटीच्या मागे अमेरिकेचा राष्ट्रध्वज होता. मंद आवाजात श्रीमद्भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायाची सीडी लावलेली होती. वातावरणात खिन्नता होती पण कुठल्याही प्रकारची भयाणता, भीती, दडपण जाणवत नव्हते.
तिसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता क्रिमेशन होते. स्थानिक ब्राह्मणांनी फ्यूनरल होममधील हॉलमध्ये काही धार्मिक विधी केले. मंत्रघोषात शवपेटी बंद करण्यात आली. त्या वेळी सर्व भारतीय आणि अमेरिकन मंडळींनी हात जोडून नमस्कार केला. शवपेटी एका लांब रुंद शववाहिकेत ठेवण्यात आली. शववाहिका मार्गस्थ होण्यापूर्वी शववाहिकेबरोबर असलेल्या गाडय़ांचा जो ताफा होता, त्या ताफ्यातील प्रत्येक चालकाच्या हातात क्रिमॅटॉरिअमपर्यंत जाण्याचा मार्ग आणि नकाशा दिला गेला. शववाहिका मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वी विशिष्ट प्रकारचे दिवे लावून गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला. प्रचंड ट्रॅफिक असूनही या अंत्ययात्रेतील गाडय़ांच्या ताफ्याला कुणीही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत नव्हते. उलट सन्मानाने पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करीत होते. क्रिमॅटॉरिअममध्ये जाण्यापूर्वी शववाहिका मृताच्या घरापाशी गेली. घराच्या दरवाजात फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी गुलाबाची फुले ठेवली. काही काळ सर्वजण स्तब्ध उभे राहिले आणि पुन्हा गाडय़ांचा ताफा मार्गस्थ झाला.
सुमारे ३५ मैलांवर असलेल्या क्रिमॅटॉरिअममध्ये सर्वजण पोहोचले. पुन्हा मंत्रपठण होऊन विद्युत दाहिनीमध्ये हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. फ्यूनरल होमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार होण्यासाठी साहाय्य केले. मंत्रपठण होत असताना मान खाली ठेवून आणि अदब दाखवून आपल्या धार्मिक भावनांचा आदर राखला जात होता.
विद्युतदाहिनी असलेली इमारत भव्य नक्षीकाम केलेली होती. एखाद्या चर्चसारखी तिची रचना होती. सभोवती सुंदर फुलांची बाग होती, कारंजी होती. हल्ली दफन करण्यासाठी जमिनीचा तुटवडा असल्याने पुष्कळ अमेरिकन लोकही पुरण्याऐवजी विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये विद्युत दहन करण्याच्या पर्यायावर एका पत्रकाराने भलामोठ्ठा लेख लिहून विद्युतदहनाची आवश्यकता असल्याचे ठासून सांगितले होते.
ज्या दिवशी दहन झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी अस्थी देण्यात आल्या. व्यवस्थितपणे एका खोक्यात प्लॅस्टिकच्या झिपलॉक असलेल्या पिशवीत पॅक करून अस्थी देण्यात आल्या. या अस्थींबरोबर डेथ सर्टिफिकेट आणि क्रीमेशन सर्टिफिकेट एका फाईलमध्ये देण्यात आले. ही सर्व कामे फ्यूनरल होमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना कुठलीही तसदी नव्हती. या सर्टिफिकेटबरोबर फ्यूनरल होमतर्फे सांत्वनाचे पत्र होते आणि एका भल्या मोठय़ा पुडय़ात केक्स्, बिस्किटे, कुकीज वगैरे पदार्थ दिले होते.
(२७ नोव्हे.२०१० साली चतुरंग लोकसत्ता मधे सदर लेख मी प्रसिद्ध केला होता. तो पुन्हा या ठिकाणी देत आहे.)
-- चिंतामणी कारखानीस
प्रश्न : तुझ्या शाळेतील एखादी आठवण सांग.
सौरभ : शाळेतील आठवणी तर खुप आहेत. त्यापैकी एक सांगतो… आमच्या शाळेतही नाटकं बसवायचो तेव्हा मी छोटा शिवाजी करत होतो आणि तो सीन सुरु होता.. दादाजी कोंडदेव शिवाजीला हत्यारे चालवायला शिकवत होते. तेव्हा आम्ही स्टेजवर तोफ सुद्धा लावायचो आणि एकदा असं झालं की मी तोफ लावल्यावर त्याची ठिणगी दादाजी कोंडदेव बनलेल्या मुलाच्या धोतरावर उडाली आणि त्याचं धोतर जळालं. तेव्हा मी लगेच त्याला वींगेत ढकलले. आणि बिच्चारा सावरासावर करुन परत आला.. हा एक गमतीदार प्रसंग आठवतो.
उष्ण तापमानात शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला थंड पेय पितो. मात्र बाजारात मिळणारी थंड पेय अनेकदा आरोग्यास हितकारक ठरतीलच, असे नाही. आपल्या आयुर्वेदात सांगितलेल्या घटकांपैकी एक घटक सध्या लोकांनी आवर्जून वापरण्याची गरज आहे. तो म्हणजे वाळा.
देशात विठ्ठल कामत यांनी पहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल सुरु केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आपल्या बिझनेसची वाढ फ्रॅन्चायझी पद्धतीने केली. आज देशातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठल कामत यांचे हॉटेल आहेत. एवढेच नव्हे तर देश-विदेशातील ४५० हून अधिक ठिकाणी या हॉटेल्सच्या बिझनेस विस्तारला आहे.

“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न होतोय “मराठीसृष्टीद्वारे ! आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल...
“मराठीसृष्टी”ने ऑनलाईन माध्यमांमध्ये लिखाण करणार्या लेखकांचे साहित्य इ-बुकद्वारे प्रकाशित करण्याची योजना आखली आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. इ-बुक सोबतच छापील पुस्तकेही प्रकाशित करावीत असा बर्याच लेखकांचा आग्रह होता आणि म्हणूनच “मराठीसृष्टी”ने याही क्षेत्रात पाऊल टाकले.
“मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. सर्वप्रथम हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या माध्यमातून आपल्यासाठी आणत आहोत.
आपल्या प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला सुप्तावस्थेतून जागं करुन लिखाणासाठी एखादं व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून “मराठीसृष्टी”ची निर्मिती झाली. “मराठीसृष्टी” या वेबपोर्टलवर वाचकांनी मनोमन प्रेम केलेलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाचक इथे येतात. या वाचकांतूनच लेखक बनतात.
प्रतिथयश प्रकाशकांचे दरवाजे या नव्या लेखकांसाठी बंदच असतात. यातूनच प्रकाशन व्यवसायात काही गैरप्रवृत्ती बळावल्या आणि लेखक त्या गैरप्रवृत्तींना बळी पडू लागले. स्वखर्चाने प्रकाशन करु इच्छिणार्या लेखकांनाही मार्गदर्शनाअभावी या गैरप्रवृत्तींना बळी पडावं लागलं. त्यामुळे “मराठीसृष्टी”ने प्रकाशन व्यवसायात पाय टाकताना संपूर्ण पारदर्शकतेचं धोरण स्विकारलंय आणि त्याचप्रमाणे आमची वाटचाल सुरु आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून मराठीत लिहिणार्या आणि लिहू इच्छिणार्याही, नव्या दमाच्या आणि जुन्या ताकदीच्याही सर्व लेखकांना शुभेच्छा!
निनाद अरविंद प्रधान
व्यवस्थापकीय संचालक आणि संपादक
मराठीसृष्टी डॉट कॉम
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिरेक्यांचे नेटवर्क विस्तारू लागले आहे. स्थानिक पातळीवरील गरजू, बेरोजगार तरुणांना हाताशी धरून नवनवीन अतिरेकी कारवायांच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यासाठी विविध शहरांमधून माहिती गोळा करणारे स्लिपर्स सेल कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या समाजजीवनाला लागत असलेली ही कीड वेळीच रोखली नाही तर राज्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.
त्या पोलीस चोकीत लगेच रेल्वे स्टेशन च्या बाहेरील स्टँडवरचे माझे आँटोचालक मित्र गोळा झाले आमचा मित्र विलास पाटील तेथेच हॉटेल ' मराठा ' मध्ये बसलेला होता त्यालाही समजले , तो देखील चौकीत आला . सगळे जण नेमके काय झाले हे विचारात होते व त्या पोलिसांना जाऊ द्या सोडून द्या म्हणत होते पण पोलिसांनी सांगितले याला मुख्य पोलीस स्टेशनला साहेबांसमोर हजर करायचे आहे आम्हाला . पोलिसांनी मग तेथून रिक्षा करून मला नाशिक रोड पोलीस स्टेशन ला आणले आणि साहेबांसमोर उभे केले , साहेब नेमके कोठेतरी बाहेर निघाले होते म्हणून त्यांनी मला बसवून ठेवायला सांगितले ...मला आता परत टर्की सुरु झाली होती , सकाळी भाऊ कामावर जाईल व नंतर पैसे मिळतील या आशेवर मी होतो तो पर्यंत फारसा त्रास जाणवला नव्हता पण आता आपल्याला अजिबात ब्राऊन शुगर मिळणे शक्य नाही हे लक्ष्यात आले तव्हा त्रास जास्त जाणवू लागला...
मला सारख्या जांभया आणि शिंका येत होत्या . तेथील पोलीस मला कुतूहलाने ब्राऊन शुगर कशी असते वगैरे प्रश्न विचारात होते ( मुंबई , नाशिक , पुणे या पट्ट्यात ब्राऊन शुगर चे आगमन व विक्री साधारणतः १९८० साली सुरु झाली होती , ही घटना ८४ सालची , अनेक पोलिसांना ब्राऊन शुगर म्हणजे नेमके काय हे देखील माहित नसे , काहीना गांजासदृश काहीतरी असावे असे वाटत होते , नंतर मग NDPS अँक्ट आल्यावर पोलिसांना खास ब्राऊन शुगर बाबत केसेस कश्या करायच्या याचे प्रशिक्षण दिले गेले , व त्यांना माहित झाले की हा प्रकार काय आहे ते ) मला साहेबांच्या ऑफिस मधून दुसऱ्या खोलीत जेथे पोलिसांचे लिखापढीचे काम चालते त्या ठिकाणी नेण्यात आले आणि एका कोपर्यात भिंतीला टेकून खाली बसायला सांगितले गेले , माझी हालत टर्की ने खराब होत होती . अश्या वेळी स्मोकिंग केल्याने जरा दिलासा मिळतो पण माझ्या खिशात बिड्या देखील नव्हत्या , स्वतच्या नशिबाला दोष देत मी गुढघ्याभोवती हात बांधून विमनस्क बसलो होतो . तेथे माझे वडील आणि मोठा भाऊ ही मग येऊन पोचला , मी त्यांना आता असे करणार नाही मला सोडायला सांगा म्हणून आग्रह करू लागलो तर एका हवालदाराने मला दटावले व ' चूप बस ' असे ओरडला . पुन्हा मी गरीब चेहरा करून करुण डोळ्यांनी त्यांच्या कडे पाहत बसून राहिलो ..
त्याच वेळी नाशिकरोड शिवसेना अध्यक्ष श्री . प्रभाकर कर्डिले . त्याच्या काही कामानिमित्त आले होते ( आमच्या सिन्नरफाटा ' शिवसेना ' शाखेचे उद्घाटन ते आणि साबीर शेख यांच्या हस्ते झाले होते व येथील शाखेचा सेक्रेटरी म्हणून ते मला ओळखत होते ., एकदोन वेळा काही कामानिमित त्यांच्या कडे गेलोही होतो मी ) मला तेथे असा बसलेला पाहून त्यांनी शिपायांना काय भानगड आहे ते विचारले तेव्हा त्यांना पोलिसांनी मी काल पासून केलेल्या तमाशाची माहिती दिली , ते माझ्या जवळ येऊन म्हणाले ' काय रे , तू शिवसैनिक आहेस ना , आणि असली व्यसने करतोस , हे तुला शोभत नाही " मी मान खाली घातली मग म्हणाले ' जाऊ दे ! घाबरू नकोस , तुला कोणी मारणार नाही इथे , सोडून देतील जरा वेळाने , नंतर भेट मला येऊन " आणि ते निघून गेले . भाऊ आणि वडील तेथील मुख्य हवालदाराशी काहीतरी बोलले त्यावर त्याने मान हलवली आणि ते देखील निघून गेले हे सर्व घडेपर्यंत दुपारचे ४ वाजले होते ..
त्या ऑफिसात आता फक्त चार हवालदार आपापल्या टेबलवर काम करत बसलेले होते आणि ड्युटीवरील बाकी तीनचार पोलीस बाकावर गप्पा मरत बसले होते , गप्पा मारता मारता त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला व माझी विचारपूस करू लागले , ब्राऊन शुगर कुठे मिळते ? , कशी दिसते , कशी पितात , किती रुपयाला ? वगैरे कुतुहलाचे प्रश्न होते ते मला त्यांच्याशी बोलणे जीवावर आले होते पण उत्तरे दिल्यावाचून इलाज नव्हता तसेच असेच बोलता बोलता जर त्यांच्याकडून मला बिड्या काढता आल्या असत्या तर हवेच होते , अधून मधून बाहेर ड्युटी करणारे किवा पेट्रोलिंग करणारे पोलीस जेव्हा ऑफिस मध्ये येत तेव्हा माझ्या कडे पाहून नवीन केस कोणती याची चौकशी करत , काही जण तर डायरेक्ट चौकशी न करता एकदम ' काय रे , भडव्या .. तूच ना तो पर्वा दरोडा घातलेला , सांग अजून तुझे साथीदार कोठे आहेत , किवा तूला १ वर्षापूर्वी मी पकडले होते ना रे चोरीच्या केस मध्ये ' असे म्हणत ( नंतर मला समजले की पोलीस गुन्हेगारावर मानसिक दबाव आणून त्याने सर्व कबुली द्यावी यासाठी असे त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याच्याशी बोलतात व त्याला घाबरवतात , न केलेले गुन्हे देखील अंगावर टाकतील या भीतीने काही नवखे गुन्हेगार मग लगेच केलेले गुन्हे कबुल करुन टाकतात )
तेथे एका हवालदाराने जेव्हा बिडी काढून पेटवली तेव्हा लगेच मी त्याच्याकडे बिडी मागू लागलो या वर तो म्हणाला ' अरे , माझा मुलगा तुझ्या इतका आहे , तुला लाज वाटत नाही का माझ्याकडे बिडी मागायला ' साधारणतः तो हवालदार माझ्या वडिलांच्याच वयाचा होता , झुबकेदार मिशा , केसात चंदेरी छटा , मी खूप गयावया केल्यावर त्याला माझी दया आली व त्याने एक बिडी दिली मला मग माझी चौकशी करू लागला तू कोणत्या वर्गात शिकतोस ? कोणत्या कॉलेजला आहेस ? वगैरे , मी त्याला बिटको कॉलेजला आहे असे सांगितल्यावर तो जरा चपापला म्हणाला , माझा मुलगा पण याच कॉलेजला आहे आणि तो पण शेवटच्या वर्षाला आहे , मी त्याला मुलाचे नाव विचारले तर त्याने सांगितलेले नाव माझ्या चांगलेच ओळखीचे होते , म्हणजे त्याचा मुलगा आमच्या सोबत ' सटाणा ' युवक महोत्सवात समूहनृत्याच्या समूहात होता . आम्ही चांगले ओळखत होतो एकमेकांना . मग म्हणाला ' ओळखतोस का माझ्या मुलाला ? त्याला काही व्यसन नाही ना तुझ्यासारखे ? . त्या हवालदाराचा मुलगा कधीतरी स्मोकिंग करत असे फक्त, ते मला माहित होते पण मी ते सांगितले नाही व म्हणालो नाही साहेब ओळखतो मी त्याला खूप चांगला आणि हुशार मुलगा आहे तुमचा , यावर तो मिशीत हसला व खुश झाला...
असाच तासभर गेला मला उलटी होईल अशी मळमळ सुरु झाली होती टर्कीमुळे , मी त्याला तसे सांगताच मला हात धरून त्याने बाहेर पटांगणात कोप -यात नेले मी तिथे उलटी केली , पोटातील सगळे पित्त बाहेर पडले , एकदम थकल्यासारखा मी खाली बसलो तेव्हा त्याने एकाला पाणी आणण्यास सांगितले ,घोटभर पाणी पिऊन पुन्हा मी आत ऑफिस मध्ये आलो , माझी अवस्था पाहून त्याला दया येत होती , मला तो ' व्यसने चांगली नसतात , असे वागू नये वगैरे समजावू लागला , ' मी त्याला जेव्हा विचारले की मला केव्हा सोडणार तेव्हा म्हणाला ' पाहू साहेब आल्यावर काय ते पण तुला दोन तीन दिवस तरी डांबून ठेवावे असे तुझ्या घरच्या लोकांचे म्हणणे आहे ' ' माझ्यावर कोणती केस केली' असे विचारले तर हसला म्हणाला ' कसली केस न काय , केस केली तर पुढे तुला नोकरी मिळेल का ? काही केस नाहीय फक्त असेच तुला अद्दल घडावी म्हणून तुझ्या भावाने साहेबाना विनंती करून दोन चार दिवस अडकवण्यास सांगितले आहे ' . मी थोडा निश्चिंत झाले तेव्हा , त्यांनी मला एकदम कोठडीत न टाकता ऑफिस मध्ये बसवले तेव्हाच मला अंदाज आला होता की केस वगैरे केली नाहीय ते ..
मला आता पोटात एकदम ढवळून आले जोराची संडास आली ( ही सगळी टर्की ची लक्षणे असतात ) मी त्याला तसे म्हणालो तेव्हा म्हणाला चल माझ्या सोबत व त्याने मला त्या बैठ्या इमारतीच्या डाव्या बाजूला पटांगणात असलेल्या कोपर्यात नेले तेथे चार संडास होते आजूबाजूला वाळक्या पानांचा वगैरे खूप कचरा होता तेथे जाण्यास सांगितले व तो माझ्या पासून साधारण १० फुट अंतरावर उभा राहिला मी आजूबाजूचे निरीक्षण केले संडासच्या मागे २० फुट अंतरावर तारेचे कुंपण होते तेथून बाहेर रस्ता आणि त्या पलीकडे मेनगेटची क्वार्टर्स होती ( मेनगेट क्वार्टर्स म्हणजे प्रेस मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या साठी बनवलेली सरकारी वसाहत आता ती सगळी घरे पाडण्यात आली आहेत ) मी संडास मध्ये जाऊन जोरात दार लावले , आधी पटकन माझे काम उरकले आणि मग हळूच आवाज न करता दाराची कडी काढून बाहेर डोकावून पहिले तर तो हवालदार संडासकडे पाठ करून पोलीस स्टेशनच्या दिशेला पाहत उभा होता ही चांगली संधी होती ,..
मी ताबडतोब चपला तिथेच सोडल्या व दबकत संडासच्या मागील बाजूला पोचलो आणि तारेच्या कुंपणांकडे धूम ठोकली साधारण आठदहा पावले नीट पडली आणि नंतर एकदम जाणवले पाय चिखलात रुतल्या सारखे रुतत आहेत खाली लक्ष गेले तर एकदम ओकारी सारखे झाले , खाली त्या संडास मधून बाहेर पडलेला मैला साचला होता काही वाळलेला तर काही ओला , माझे पाय साधारणतः पोटऱ्या पर्यंत त्यात भरले होते एकदम दुर्गंधी आली तरी मागे न पाहता तसाच नेटाने ते तुडवत कुंपणा जवळ गेलो आणि कुंपणाची तार हाताने वर उचलून तारेखालून बाहेर रस्त्यावर आलो पळत सुटलो मेनगेट क्वार्टर्सकडे . बाहेर कोठेतरी बहुतेक सत्यनारायण पूजा सुरु असावी तेथे लाउडस्पीकर वर सुरु असलेले कालिया सिनेमाचे गाणे लागले होते ' कौन किसी को रोक सका , सैयाद तो एक दिवाना है , तोड कें पिंजरा , देखना एक दिन ..पंछी को उड जाना है ! .' पळताना ते गाणे कानात शिरत होते आणि मी अजून वेग पकडल...
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
फळ्यावर सरांनी " आम्ही निर्भय होऊन आमच्या गतजीवनातील नैतिकतेचा शोधक आढावा घेतला " असे वाक्य लिहिले होते .." मित्रानो या पूर्वी अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या पहिल्या तीन पायऱ्या तसेच " फक्त आजचा दिवस ' या बाबत चर्चा केली आहे..ज्यात दारू तसेच अन्य मादक पदार्थांबाबत असलेली आपली मानसिक आणि शारीरिक गुलामी मान्य करत ...आपले जीवन कसे अस्ताव्यस्त झालेय हे पाहण्याचा प्रयत्न केलाय ..दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीत या संपूर्ण विश्वात सुसूत्रपणे कार्यरत असलेल्या ईश्वरी अथवा नैसर्गिक शक्तीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत ..यापुढे आपले जीवन या शक्तीच्या नियमानुसार किवा या शक्तीची मदत घेवून जगण्याचा निश्चय केलाय ..थोडक्यात सांगायचे तर आपल्याला स्वता:च्या इच्छेने जीवन व्यतीत करता यायला हवे हा अट्टाहास सोडून... ईश्वरासमान असलेले माझे नातलग ..शुभचिंतक ..यांच्या सूचना व सल्ल्याने जगण्याचा तसेच निसर्गनियम पाळण्याचा निश्चय केला आहे ...
' फक्त आजचा दिवस ' या संकल्पनेत रोज एक दिवस या तत्वाने कोणतेही मादक द्रव्य अथवा दारू सेवन न करता आपल्या चंचल मनाला कशी शिस्त लावता येईल ..आपली वैचारिक ..भावनिक व कृतीशीलते बाबतची अस्ताव्यस्तता ..बिघडलेपण कसे दूर करता येईल ते पहिले आहे ..आज आपण अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमसच्या चवथ्या पायरीवर चर्चा करणार आहोत ..ज्यात मला आत्मपरीक्षण ...आत्ममंथन ..आत्मचिंतन करण्यास सुचवले गेले आहे ..केवळ व्यसने बंद करून माझे काम भागणार नाही ...तर पुन्हा व्यसने सुरु होऊ नयेत या करिता ..माझ्या अंतर्मनात व्यसनांची ओढ कशी व का निर्माण झालीय हे बघत ..व्यसनांमुळे किवा माझ्या व्यक्तिमत्वातील स्वभावदोषांमुळे माझ्या गतजीवनात मी कसे बेताल वर्तन केले आहे ..हे शोधून पुढे माझे स्वभावदोष व्यक्तीमत्वातून हद्दपार करत ' आत्मशुद्धी ' ची प्रक्रिया सुरु होणार आहे.." असे सांगत सरांनी चौथ्या पायरीची प्रस्तावना केली .
" फळ्यावर लिहिलेल्या वाक्यात निर्भयता हा शब्द आधी आलाय ..म्हणजे ' आत्मपरीक्षण ' करण्यासाठी निर्भयतेची गरज आहे हे स्पष्ट सांगितलेय ..कारण मानवी मन असे आहे की ते कधीच स्वतःहून स्वता:च्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत नाही ....पत्येक व्यक्तीचा मनात त्याच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करणारा हुशार वकील दडलेला असतो ..हा वकील नेहमी ' मी कसा चूक नाही ' हे स्वतःला तसेच इतरांना पटवून देण्यात मग्न असतो .. माझ्या तुलनेत इतर लोक कसे जास्त चुका करतात ..अपराध करतात ..गुन्हे करतात हे सांगत जातो ..प्रसंगी स्वतःच्या चुकांसाठी इतर लोक अथवा परिस्थिती कशी जवाबदार आहेत असे दोषारोप देखील करतो ..स्वताच्या अंतरंगात पारदर्शकतेने व तटस्थपणे डोकावून बघण्यास खरोखर निर्भय व्हावे लागते ..
या अंतरंगात काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर या विकारांमुळे सतत.. अशांती ..अस्वस्थता ..असमाधान निर्माण होत असते ..माझ्या गतजीवनात या विकारांमुळे मी अनेकदा ..माझे संस्कार ..थोरांनी शिकवलेली नैतिकता ...कायद्याने घातलेली बंधने ..कौटुंबिक व सामाजिक बंधने कशी लाथाडली याचे उत्खनन करण्याचा चौथ्या पायरीत प्रयत्न आहे ..केवळ व्यसन सुरु झाल्यापासून नाही तर मला समजायला लागल्यापासून अथवा मला आठवते आहे तेव्हा पासूनचे माझे विचार ..भावना ..वर्तन याची नैतिकतेच्या कसोटीतून तपासणी करायची आहे ..आपल्या अंतरंगातील समर्थनाचा ..इतरांवर दोषारोप करणारा वकील बाजूला करण्यासाठी निर्भयता असावीच लागते..
सर हे सगळे बोलत असताना आम्ही त्यांच्या तोंडाकडे नुसतेच पाहत होतो ..बापरे !.. हे सगळे सहज सोपेपणाने समजण्यासारखे नव्हतेच मुळी..आमची अवस्था सरांच्या लक्षात आली असावी ..ते हसून म्हणाले .." बरेच जड जड शब्द वापरले आहेत वाटते मी ..कारण सगळ्यांचे चेहरे मख्ख वाटत आहेत..हे काय नवीन लफडे असेच भाव दिसत आहेत तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर .." आम्ही सगळे हसलो ..' घाबरू नका ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया आहे ..माझ्या आत दडलेल्या समर्थनाच्या वकिलाला हाकलून लावून .. मी वेळोवेळी कसा चुकला आहे हे तपासताना कंटाळा येणारच ..आत्मपरीक्षण करायचे म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न पडेल ..कारण आपल्याला स्वता:च्या ऐवजी इतरांच्या वागण्याचे परीक्षण करण्याची सवय लागली आहे ..माझ्या तुलनेत जगात जास्त पापी ..अनैतिक वर्तन करणारे लोक आहेत ..दारू प्यायलो म्हणजे मी काही फार मोठा गुन्हा केलेला नाहीय ..असे वाटेलच ..
शिवाय नैतिकता म्हणजे नक्की काय ? हा पुढचा प्रश्न आहेच ..कारण आजवर आपण जे करत आलोय ते नैतिक आहे किवा अनैतिक आहे याचा आपण कधीच विचार केला नव्हता ..मी माझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांनुसार वर्तन करत गेलो ..मी जे करतो ते नैतिक आहे किवा नाही याबाबत कधीच सावधगिरी बाळगलेली नाही ..आता हे सर्व शोधायचे कसे ? शोधून काय फायदा ? असे प्रश्न मनात उद्भवतील ...ज्या वर्तनाला अथवा कर्माला सर्व संतांनी वाईट म्हंटलेले आहे ..समाजात ज्या प्रकारच्या वर्तनाला वाईट समजले जाते ..कायद्याने ज्या प्रकारच्या वर्तनाला बंधने बंधने घातली आहेत ..अशी सर्व बंधने तोडून मी माझ्या आनंदासाठी ..इच्छापूर्तीसाठी ..कसा वागलोय हे शोधायचे आहे ..त्यात ..खोटे बोलणे ..इतरांच्या भावना दुखावणे ..हिंसा ..इतरांवर अन्याय करणे ..भ्रष्टाचार ..चोरी ..लबाडी ..टोपीबाजी ..विश्वासघात ..आर्थिक अफरातफर ..वगैरे प्रकारचे सगळे वर्तन तपासायचे आहे ..कठीण आहेच थोडे ..कारण माझ्या वर्तनाबाबत मी स्वतःचा उत्तम वकील असतो व इतरांच्या वर्तनाबात मी न्यायधीश बनतो ...इतरांना कशी शिक्षा झाली पाहिजे ..त्यांनी किती घोर अपराध केलंय हे लगेच ठरवून त्यांना शिक्षा व्हावी अशी कामना करतो ...मात्र स्वतःची वेळ येताच मला ..मी किती गरीब ..बिच्चारा ..निष्पाप आहे असेच वाटते....
( बाकी पुढील भागात )
-- तुषार पांडुरंग नातू
" मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५
Copyright © 2025 | Marathisrushti