जन्माला यावं आणि एकदा तरी इंदौरला जाऊन सराफा आणि ५६ दुकानांच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा... ते जर जमलं नाही तर आपलं आयुष्य फुक्कट वाया गेलं असं समजावं आणि धोकटी खांद्याला अडकवून वाट चालायला सुरुवात करावी...
पैलं म्हणजे इंदौरी पोहे... कोथिंबीर, बारीक इंदौरी शेव, ओलं खोबरं आणि डाळिंबाचे दाणे पसरलेले...
नंतर विकास स्वीट्सची टमटमीत फुगलेली एक दाल कचौरी आणि एक आलू कचौरी खावी आणि तिथंच भल्यामोठ्या लोखंडी कढईत असं झक्कासपैकी ऊकळत असलेले, वरुन असं लालबुंद केशर तरंगत असलेले, बदाम, पिस्ते, काजू भरपूर असलेले, चार चमचे दाट केशरी साय ग्लासात वरुन पांघरलेले केसरिया दूध ग्लासभर प्यावे...
जोशींचा हवेत फेकून परत झेललेल्या दहिवड्याला मोक्ष द्यावा...
हे जोशी, एकाच हाताच्या प्रत्येक बोटाची चिमूट करुन त्या पाच चिमूटीत पाच प्रकारचे मसाले पकडून... एकेक करत दह्यावर सोडतात आणि अशी मस्त नक्षी बनवतात... (जसं सीसीडी मधे कॉफीवर नक्षी बनवतात ना तसं)... जोशी दह्यावर मसाला सोडताना बघून आपण असं स्वतःला विसरुन जातो की बास्स यार... विचारायचंच नाही... फक्त तिथं ऊभं राहून तो अनुभव घ्यायचा...
गराडू खावं...
खुसखुशीत तळून लाल रंगाच्या साखरेच्या पाकातून निथळून काढलेली जिलेबी खावी...
ती निथळणारी जिलेबी बघितली की आठवतंय बघ... न्हाऊनिया ऊभी मी....
नंतर दहा स्वादांची पाणीपुरी खावी... रेग्युलर, शाही रेग्युलर, पुदिना, जिरा, प्याज, लसणी... वगैरे वगैरे दहा टेस्ट्स आणी सगळं झाल्यावर दोन गोड मसाला पुरी... नांकावरुन येणारा घामाचा थेंब सावरत सावरत... सुर्र सुर्र करत ते उरलेले पाणी पिऊन घ्यावे...
नंतर पुढं यावं आणि भुट्टे का कीस... कीस म्हणजे अक्षरशः किसचा अनुभव देणारा हा कीस ! दिसायलाच एवढा आकर्षक तर मग चवीला तर अतिशय भन्नाट !
जरा अजून इच्छा असेल तर फरियाली साबुदाणा खिचडी... एकदम खल्लास...
जरा पुढं आलं की नेमा आईस्क्रिम... फक्त केशर मलई पिस्ता कुल्फी खायची आणि तोपर्यंत फालुदा बनवायाला सांगायचा... कुल्फी संपवायची आणि फालुद्याला सामोरं घ्यायचं... अतिशय मन लावून, अंतर्मन शांत करत करत हळूवारपणे फालुद्याचा एकेक घास नमामि फालूदा म्हणत स्वअर्पण करायचा...
हे सगळं झाल्यावर तृप्त होतंय सगळं... विलक्षण समाधान येतंय चेहेऱ्यावर... या संपूर्ण साधनेचं तेज चढतेय सर्वांगावर... आपोआपच समोरची वाट स्पष्ट होते... अंतिम विश्रांतीचं ठिकाण स्पष्ट दिसायला लागतं...
बाहेर यायचं तिथून... गाडीत बसायचं आणि चालकाला गाडी हायकोर्ट समोरच्या पार्श्वनाथ पान सदनकडे घ्यायला सांगायची...
दादा तिथे बसलेले असतातच...
कड्डक असं कलकत्ता प्युअर १२०/३००, प्युअर नवरतन किवाम आणि चटणी, थोडीशी खूश्बू, एकदम बारीक सुप्पारी (भाजलेली) एकच चिमूट, दोन वेलदोडे आणि लवंग त्यात उभी करुन जाळून... लवंग जळतानाच पानाची अलगद् घडी करुन घ्यायचे आणि त्याला आपल्या तोंडात डावीकडे सिंहासनावर विराजमान करायचे... तीनेक मिनीटे तिथंच थांबायचे... घोळवायचं असं गारशार तोंडात... आजिबात चावायचं नाही, गिळायचं नाही, इकडून तिकडे तोंडात फिरवायचं निही... घेतला वसा टाकायचा नाही... ऊतायचं नाही... मातायचं नाही... शांत बसायचं... आपोआप ब्रह्मानंदाशी आपला परिचय होतो... दाट ओळख होते... समाधिस्थ हलकेपणा येतो आपल्याला कवटाळून घेतो...
हलकेच गाडीत येऊन बसायचं...
सारथ्याला खूण करायची...
गाडी मुक्कामाच्या दिशेने निघालेली असते... आपण आपलं अन्नदाता सुखी भव म्हणत ब्रह्मानंद समाधीत भान विसरलेलो असतो...
अशी आहे इंदौरी खाऊ गल्ली
आणि
इंदौरी मेहमान नवाजी़...
खरंखुरं अतिथी देवो भव हे तत्त्व जपणारं इंदौर ...!!!
आपल्यावर प्रेम करणारी आणि आपल्याला प्रेम करायला लावणारी...
उमेश कुलकर्णी.
हम को जो करना था हमने किया…. किती शक्तीशाली वाक्य आहे हे, हे नुसतेच शब्द नव्हे तर ही कृती आहे. जी कुठल्याही परिस्थितीशी समझोता न करता केली गेली, वारंवार केली गेली. इतक्या पक्क्या विचारांच्या होत्या आपल्या भारतमातेच्या वीरांगना राजकुमारी गुप्ता.
मागील तीन महिन्यात जहाजावरुन दिसणाऱ्या बेटाचे ज्याचे नाव पेबेलॉकॉन आयलंड आहे त्याच्याबद्दल सगळ्यांकडून खूप ऐकले होते. जहाजावरुन आयलंड दिसायचं पण थोडंसंच. पाण्याच्या वर तरंगणारी थोडीशी हिरवीगार झाडी आणि एका चिमणीतून जळणाऱ्या गॅसची एक तांबडी फडफडणारी ज्वाला. रात्रीच्या निरव शांततेत आणि अंधारात तर ही ज्वाला आणखीनच प्रखर दिसायची.
सरांनी त्यांच्या हातातील पुस्तक सर्वाना दाखले त्यावर ‘ रोजचे प्रतिबिंब ‘ असे नाव होते .. मित्रानो हे अल्कोहोलीक्स अँनॉनिमस या संघटनेने प्रकाशित केलेले पुस्तक असून या पुस्तकातील सर्व विचार हे पूर्वी व्यसनी असलेल्या माणसांनी लिहिले आहेत ..अल्कोहोलिक्स अॅनाॅनिमस या संघटनेने सुधारणेसाठी ज्या बारा पायऱ्या किवा ज्या सूचना दिल्या आहेत ..त्यावर हे पुस्तक आधारित आहे..प्रत्येक महिन्यात एका पायरीवरचे विचार यात दिलेले आहेत
सजीवांचे शरीर हे एक स्वयंचलीत यंत्र आहे. त्यामुळे त्याला, आपले नैसर्गिक व्यवहार करण्यासाठी उर्जेची गरज असते. निसर्गाने, ही उर्जा मिळण्यासाठी, परिपूर्ण अशी योजना फार कल्पकतेने केली आहे असे दिसून येते आणि तीही कोट्यवधी वर्षांपूर्वी. प्रत्येक सजीवाचा आहार हेच निसर्गाने शोधलेले आणि अत्यंत यशस्वीरित्या वापरलेले उर्जासाधन आहे.
हकार कायद्यातील नविन बदलानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देणेची तरतूद नाही. परंतु, कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवर कायद्यात केलेल्या बदलाने सर्व गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास ३१ मार्च, २०२१ पर्यंत सुट देऊन मोठा दिलासाच दिला आहे. तसेच, काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या आहेत. तथापि, सदर सुचना सर्वसामान्य सदस्यांना माहित नसल्याने बरेच गोंधळून जातात. कायदे तज्ञाचा सल्ला न घेता, इतर कमेटी सदस्यांचा विचार न करता फक्त स्व:ता कायद्याच्या बडग्यापासून वाचण्यासाठी कमेटी सदस्यत्वाचा राजीनामा देतात.
.... यमूनेशी कलून बसलेल्या यशोदेची अस्वस्थता काठाच्या पाण्याबरोबर लपलप करत होती. तिचं पाण्यातलं प्रतिबिंब विरळ होत चाललं... यमूना सावळी दिसू लागली, तशी आपल्या मागे चोरपावलांनी खट्याळ कान्हाच येऊन उभा की काय वाटून गर्रकन फिरून यशोमती उभी झाली. पण तिची काजळभरली नजर लांब जाऊन रिकामीच परत आली.. दूरपर्यंत फक्त हळूवार पावलांनी उतरत जाणारी सांज तेव्हढी दिसली. क्षितीजावर कायम उठावदार दिसणारी पर्वतरांग खरोखरच धूसर झालीय, की तिच्या डोळ्यांची डबडब धुकं होऊन उरलीय तिला कळेना...
.... यमुनेपल्याडच्या देवळात संध्यारतीचा घंटारव झाला अगदी त्याचवेळी दूर धुळीचा लोळ उठला, गाई परतून येतानांचा घुंगुरवाळा वातावरणात घुमला तशी माऊली आनंदली...
कान्ह्याच्या इच्छेविरुद्ध आज त्याला गाई राखायला पाठवल्याने, दुपारी त्याने गोपाळकाला केला पण स्वतः खाल्ला नाही ह्याची खबर तिच्यापर्यंत आली होती. त्याचं असं उपाशी राहणं तिला वेदना देतं हे पक्क जाणून असलेला तो नाठाळ, सांजेला परतून जाऊ तेव्हा यशोदेनं ताजं लोणी घुसळून ठेवलेलं असणार आणि आज नेहमीपेक्षा जास्त मायेने मला ती ते भरविल हे जाणून त्याने मुद्दाम काला चुकवला हे तिलाही कळलं होतंच.... पण म्हणून असा राग मनात धरून संपूर्ण गोकुळातल्या गाई- गुराखी परतून घटका उलटत आली तरी ह्याने मात्र परतू नये, ही शिक्षा आता माऊलीला सहन होईना... धुळीच्या लोटाकडे सावळ्याच्या ओढीनं धावत सुटलेली ती कुठल्याही क्षणी त्याचं दर्शन होईल आणि त्याला कुशीत घेऊ, गोंजारू अपार मायेने भरवू ह्या आशेनं निघाली. सांज गडद होत गेल्याने तिला आता वाटा दिसेनात, प्रत्येक वाट जणू तिच्या सावळ्याच्याच रंगाची होऊन गेलीय असं तिला वाटलं आणि त्या वाटण्याचं हसू फुटलं...
गाई गोपी परतले... पाखरं परतली... धूळ शमली..... कान्हा मात्र दिसेना.
नक्की लपून बसला असेल, आज तिला टोकाचं अस्वस्थ केल्याशिवाय हा शांत होणारच नाही, ओळखून तिने त्याच्या सार्या जागा धुंडाळल्या. ताजं लोणी वाडग्यात भरून, ते हाती घेऊन इथे- तिथे शोधत राहिली... त्याला आर्त हाका मारत राहिली... बाळ गोपाळांच्या घरी गेली, विचारपूस केली, सारी म्हणाली आम्ही त्याला दुपारनंतर पाहिलंच नाही.. आता मात्र माऊलीच्या डोळ्यांचं पाणी खळेना. का मी त्याला त्याच्या मनाविरुद्ध धाडलं म्हणत स्वतःला दुषण देऊ लागली. हातातलं लोणी पाहून अजूनच हळवी झाली. त्याचा माग काढायला ह्याला- त्याला पाठवू लागली.
इतक्यात हवेच्या झोताबरोबर बासरीचा स्वर कानी आला आणि कान्हा येत असल्याची तिला खूण पटली.. आवाजाच्या दिशेने तिने धाव घेता, तो आवाज मात्र चारी दिशांनी येऊ लागला... इथे जावे की तिथे सैरभैर झाली. सारी त्याची माया आहे, रुसवा गेलेला नाही उमजून, शेवटी आहे तिथे बसली.
भरल्या डोळ्यांनी सभोवताली पाहता उभं गोकूळच शामरंगाने रंगलंय असं तिला जाणवलं. तिने ज्याला दारात- घरात शोधलं त्याची छाया विश्वावर उमटलीय, जो तिला बसल्याजागी ब्रम्हांड दर्शन घडवतो त्याची चिंता करणारी ती कोण? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधू लागली.
बघता बघता, ही सांज म्हणजे स्वतः यशोदा आहे आणि गडद अंधार जणू तिचा पान्हा होऊन चौफेर पसरतो आहे असं तिला वाटू लागलं... त्या पान्हयाची ओळख पटून तरी कान्ह्याने माऊलीकडे धाव घ्यावी अशी उर्मी तिच्या तना- मनातून वाहू लागली. त्याचवेळी खांद्यावर झालेल्या उबदार स्पर्शानं ती अचानक शांत झाली आणि डोळे अथक झरू लागले. तिच्या हातातलं वाडगं काढून घेत, लोण्याचा शांतपणे आस्वाद घेत तो तिच्या पुढ्यात बसला....
तिचं ओतप्रोत वात्सल्यानं माखलेलं ते रूप कान्हा कितीतरी वेळ बघत राहिला....
-बागेश्री देशमुख
*******
"सांज ये गोकुळी" हे गाणं मला असं भेटतं.
सुधीर मोघेंच्या शब्दातली जादू मनावर रेंगाळत राहते. सावळी सांज धुंद करून टाकते... आशाबाईंचा आवाज, (श्रीधर) फडके सरांचं संगीत प्रत्येक शब्दाला काळजापर्यंत पोहोचवतो.
WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
राशी :- मीन
स्वामी :- गुरु
देवता :- चक्रपाणि
जप मंत्र :- ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः
उपास्यदेव :- हनुमान
रत्न :- पुष्कराज / लसणी
जन्माक्षर :- दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं ही द्विस्वभावी राशी आहे.कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली जाते. माशाला पाठीचा कणा नसतो. त्यामुळे मीन मानसिक व शारीरिक बाबतीत खूप लवचिक असतात. मीन राशीचे लोक सदैव मदतीस तत्पर, संवेदनशील, कल्पक, कधीही नाही न म्हणणारे असे असतात. मीन राशीला व्यवहार जमत नाही. तसेच जास्त वेळी लक्ष देणाऱ्या व्यायाम प्रकारांना ते कंटाळतात. मीन राशीचा खाण्यावर ताबा अजिबात नसतो. पोहता न येणारी मीन राशीची व्यक्ती क्वचित आढळते.
विजय कुलकर्णी स्वामी समर्थ सेवा केंद्र काठापुर बु जिल्हा पुणे(आपल्या सर्वांच्या माहितीसाठी)
Copyright © 2025 | Marathisrushti