महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्री. श्रीहरी अणे यांनी नुकताच, ‘मराठवाड्याचे वेगळे राज्य व्हावे’ असा विचार मांडला. (त्याआधीही त्यानी, ‘विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे’, असा विचारही मांडलेला आहे).
श्री. अणे यांच्या वक्तव्यावर भिन्नभिन्न पक्षांमधल्या विविध राजकारण्यांनी ‘भावनिक गदारोळ’ केला ; इतका की, त्यानंतर श्री. अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. २३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखात, “श्रीहरी अणे यांच्यासारखा बुद्धिमान वकील, ‘चुकून बोललो’ या गटात मोडणारा नाहीं”, असे स्पष्ट म्हटलेले आहे. तो मुद्दा आपण ध्यानात घ्यायला हवा. ‘आपले काहीही चुकलेले नाही’ असाच स्टँड् राजीनामा देतांना अणे यांनी घेतलेला आहे. सरकारी पदावर असतांना एखाद्या व्यक्तीने सरकारच्या ऑफिशियल-स्टँडपेक्षा भिन्न मत मांडावे काय, हा एक वेगळाच विषय आहे. त्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. माझे ते प्रयोजन नाही. लहान-आकाराच्या राज्यांबद्दलचा ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखातील मुद्दा, हा राजकारण, ( मुख्यत्वे, सेंटर-स्टेट यांच्या संदर्भातील राजकारण), तसेच, अर्थकारण यांच्याशी संबंधित आहे. त्यावरही वेगळा विचार करता येईल. पण, अणे यांचा मूळ-मुद्दा कितपत योग्य आहे, हें मात्र आपण बघायला हवे.
पुढे जाण्यापूर्वी आपण एक बाब घ्यानात घेऊ या, ती ही की श्रीहरी अणे हे वैदर्भीय आहेत, मराठवाड्यातील नाहींत. त्यामुळे, त्यांनी मांडलेला मराठवाड्यासंबंधीचा मुद्दा भावनिक दिसत नाहीं.
(अर्थात्, विदर्भ व मराठवाडा असा दोहोंचाही मुद्दा मांडून, पश्चिम-महाराष्ट्राने राज्यातील अन्य भागावर केलेल्या अन्यायाचा मुद्दा त्यांना ब्रॉडन् करायचा असेलही. गरीब बिच्चारे कोकण ! त्याचा मुद्दा कोण उठवणार?).
मी स्वत: मराठवाड्यातला नाहीं (आणि, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधितही नाही). मी या प्रश्नाकडे भावनिक दृष्टीने पाहत नाहीये. इतिहासाच्या दृष्टिकोनातून लॉजिकली पाहिल्यावर, या प्रश्नाची काही उकल होते का, हे पाहण्याचा माझा हा प्रयत्न आहे.
अगदी पुरातन-कालापासून या (सध्या ‘मराठवाडा’ या नावाने ओळखल्या जाणार्या) भूभागाचे महत्व अखंड आहे. उत्तर-हडप्पीय संस्कृतीची नेवासे व दायमाबाद ही ठिकाणे, सध्याच्या-मराठवाड्याला अगदी लागूनच आहेत. एखाद्या ठिकाणी उत्खनन करून पुरातनकालीन वस्ती आर्कियॉलॉजिस्टांना सापडली, याचा अर्थ असा की, जवळच्या-प्रदेशात तशा प्रकारच्या अन्य वस्त्या (अजून सापडलेल्या नसल्या तरी), असू शकतात. (आणि, ती गोष्ट, सिंधु-सरस्वती संस्कृतीची जी नवनवीन ठिकाणे भारतात सापडत जात आहेत, त्यावरून सिद्ध होते). मात्र, एक गोष्ट निश्चित आहे की, जिथेजिथे अशा हडप्पीय वस्त्या सापडल्या, तिथे पाणी , greenery व शेती करण्यालायक जमीन आणि वातावरण असणारच . अशा वस्त्यांचा, त्यांच्याजवळच्या प्रदेशावरही सकारात्मक परिणाम झालेला होता असणारच, आणि परिणामस्वरूप तो भूभागही सांस्कृतिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्याही त्या काळी अधिक संपन्न झालेला होता असणार.
याचा एक अन्य पुरावा आपल्याला थोड्या-नंतरच्या काळातील अन्य माहितीतूनही सापडतो. पुरातन काळापासून, शूर्पारक (सोपारा) इत्यादी पश्चिम किनार्यावरील व्यापारी बंदरांमधून जे व्यापारी सार्थ (तांडे) पूर्वेकडे जात असत, त्याचा एक महत्वाचा थांबा होता, ( आजच्या ‘मराठवाडा’ या भूभागातील), ‘तेर’, ‘धाराशिव’. तेर, धाराशिवपासून या तांड्यांचे, वेगवेगळ्या दिशांना जाणारे वेगवेगळे गट होत असत, व ते गट पुढे जात. तसेंच पूर्वेकडून येतांना, वेगवेगळे तांडे तेर, धाराशिव येथे एकत्र येऊन, तेथून पश्चिमेकडील व्यापारी बंदरांकडे जात असत. थोडक्यात काय, तर, त्या काळी तेर, धाराशिव महत्वपूर्ण व्यापारी-जंक्शन असण्याबद्दल शंका नाही. यावरूनही त्या काळातील मराठवाडा भागाचे महत्व ध्यानात येईल.
सातवाहन काळात, पैठण ही राजधानी होती. (बर्याच नंतर ती आंध्रात हलवली गेली). राजधानीलगतच्या भागाचा उत्कर्ष होतोच. तसा तो सातवाहन काळातही झालेला असणारच. शालिवाहन शकही त्यांच्याच काळात सुरू झाला. त्यानंतरच्या काळातील राष्ट्रकूट नृप (ज्यांचे राज्य काहीसे खाली, दक्षिणेत होते), स्वत:ला ‘लत्तलूरपूरवराधीश’ असे बिरुद लावीत. त्यावरून, ते मूळचे मराठवाड्यातील लातूर या गावचे असावेत असे अनुमान इतिहाकारांनी काढलेले आहे. स्वत:च्या मूलस्थानाबद्दल प्रत्येकाला आपुलकी असतेच, आणि प्रत्येकजण आपल्या मूलस्थानाशी संपर्क ठेवायला उत्सुक असतो. त्यामुळे, राष्ट्रकूटांचे राजकीय वर्चस्व तत्कालीन मराठवाडा भागावर असो-नसो, पण सांस्कृतिक संबंध तर नक्कीच असणार. वाकाटक हे विदर्भातले, म्हणजेच मराठवाड्याच्या अगदी जवळच्या भागातले. नंतरच्या काळात, देवगिरी (औरंगाबादजवळ) ही यादवांची राजधानी होती. याचा अर्थ असा की, मराठवाडा भूभागाचा उत्कर्ष अनेक शतके झालेला होता असणार.
अल्लाउद्दीन खिलजीने जरी यादवांचा पराभव केला, तरी देवगिरीचे (दौलताबाद) महत्व मात्र कमी झाले नाही. महम्मद तुघलकाने तर आपली राजधानी उत्तरेकडून (काही वर्षे) दौलताबादला हलवली होती. (आणि, तशीच ती पुढेही राहिली असती तर, १५२६ चे बाबर-इब्राहीम लोघी युद्ध झालेच नसते, असा विचार मनात येतो. तसेंच, नंतरच्या काळातही, तैमूरलंग, नादिरशहा, अहमदशहा अब्दाली यांनी राजधानी लुटण्याचा प्रश्नही उद्भवला नसता. ते दिल्लीपर्यंत सहज पोचू शकले, पण पुढे दौलताबादपर्यंत ते आले असते कां?).
निजामशाहीची राजधानीही आधी दौलताबाद येथेच होती. नंतरच्या काळात ती अहमदनगरला हलवली गेली. अहमदनगर हें, मराठवाड्याला जवळजवळ चिकटूनच आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. शिवाजी महाराजांचे पूर्वज मालोजी राजे हेही या मराठवाडा भागातले होते. (नंतरच्या काळात, शहाजी राजांना पुणे-सुपे यांची जहागिरी मिळाली).
त्यानंतरच्या काळात, मोगलांचे दक्षिणेतील सत्तास्थान, म्हणजेच दख्खनच्या सुभ्याची राजधानी, (औरंगाबादजवळ) खडकी येथे होती, व तेथेंच औरंगझेबानें औरंगाबाद शहर स्थापले. निझामाची राजधानीही आधी औरंगाबादेतच होती. (पहिल्या बाजीरावाच्या व नानासाहेबाच्या काळात त्याला मराठ्यांनी तडाखे दिल्यामुळे, निझामाने नंतर आपली राजधानी हैदराबाद येथे हलवली).
याचा सरळ अर्थ असा की, उत्तर-हडप्पीय संस्कृतीच्या काळापासून, म्हणजे किमान इ.स. पू. च्या प्रथम सहस्रकाच्या आरंभापासून, किंवा द्वितीय सहस्रकाच्या मध्यापासूनय, अथवा त्याही आधीपासून, ते इ.स.च्या १८व्या शतकाच्या मध्यापर्यंत, अशा जवळजवळ ३०००-३५०० वर्षे अथवा त्याहून अधिक काळात मराठवाडा भूभागाला महत्व होते. (निझामाने राजधानी हलवल्यानंतर हे महत्व कमी झाले असणारच).
आपण सांस्कृतिक अंगानेही मराठवाडा या भूभागाचा विचार करू या. सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या काळाबद्दल पुनरावृत्ती न करता, आपण त्यापुढला काळ बघू. इ.स.च्या सुरुवातीच्या काळातील ‘महाराष्ट्री’ या प्राकृत भाषेतील (जी आधुनिक-मराठीची पूर्वज आहे) एक महत्वाचा काव्यग्रंथ आहे ‘हालाची गाथासप्तशती’ (सतसई). हाल हा सातवाहन वंशातील राजा. सातवाहनांची राजधानी त्याकाळी पैठणला होती, हे आपण पाहिलेच आहे. यावरूनही, १९००-२००० वर्षांपूर्वी या भूभागात किती सांस्कृतिक प्रगती होती, हे ध्यानात येईल. अजिंठा-वेरुळची लेणी, व वेरुळचे ‘कैलास’ मंदिर, ही आज जागतिक महत्वाची हेरिटेज स्थळे मानली जातात. तीही याच भागात आहेत. ती आहेत इ.स. च्या पहिल्या काही शतकांमधील अगदी ८००-९०० वर्षांपूर्वीपर्यंत, काशीनंतर महाराष्ट्रात विद्वानांचे, ज्ञानी पंडितांचे स्थान म्हणून पैठण अत्यधिक प्रसिद्ध होते. पैठणला ‘दक्षिणेची काशी’ म्हणत. (पंढरपूरचे महात्म्य वाढले नंतरच्या काळात, वारकरी पंथामुळे. आणि, तसेही, पंढरपूरही मराठवाड्यानजिकच आहे). अगदी एकनाथ, शिवाजी यांच्या काळातही पैठणला महत्व होते.
इ.स. च्या सुरुवातीच्या काही शतकांच्या काळात, देवनागरी लिपीचा ‘उगम’ पैठणमध्येच झाला, असे काही विद्वान मानतात. तसे असो-नसो, पण यावरून, पैठणचे व पर्यायाने मराठवाड्याचे तत्कालीन महत्व ध्यानात येईल.
संतांचे पहाल तर, ज्ञानेश्वर, (आणि अर्थात्, त्यांची भावंडे), एकनाथ व रामदास हे मूळ मराठवाडा भागातीलच. संत नामदेव व संत जनाबाई हेही मूळचे मराठवाडा अथवा त्याच्या अगदी नजिकच्या भागातील. ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी लिहिली नेवासे येथे, आणि आपण पूर्वी पाहिलेच आहे की, नेवासे हे, आजच्या-मराठवाड्याला चिकटूनच आहे. (त्या काळी, मराठवाडा-सोलापूर भाग-अहमदनगर भाग, असे आजचे विभाजन नव्हते, हे सांगायला नकोच).
समृद्धी असल्याशिवाय लेण्यांचे, मंदिरांचे काम सुरूही केले जात नाही, व ते पूर्णही होऊ शकत नाहीं. गाथासप्तशती काय, किंवा ज्ञानेश्वरी काय, कुठल्याही ग्रंथरचनेसाठी सुयोग्य वातावरण कुठले, तर परिसरात शांतता व स्थैर्य असावे लागते (मग, राज्य कोणाचेही असो). सभोती युद्ध चालू असतांना महिनोन् महिने, वर्षेन् वर्षे, बांधकाम, शिल्पकाम करत रहाणे, अथवा ग्रंथरचना करत रहाणें, हे अगदी कठीणच, किंबहुना अशक्यप्रायच, म्हटले पाहिजे. (पेशव्यांच्या काळात भव्य मंदिरांचे किंवा शिल्पांचे कुठलेही काम झाले नाहीं, याचे मुख्य कारण हेच, की ते सतत युध्दात किंवा युद्धजन्य परिस्थितीत वावरत होते. हे उदाहणही समजून घेतल्यावर, आपल्या वरच्या विधानाला पुष्टीच मिळते).
शिवकालातील, शिवाजी महाराजांच्या निकटचे असलेले कवी परमानंद, यांचे उपनाम (आडनाव) नेवासकर. म्हणजे, त्यांचे घराणे मूळ नेवासे येथील, म्हणजेच मराठवाडा भूभागालगतचे. शिवरायांना राज्याभिषेक करणारे काशीचे पंडित गागाभट्ट यांचे घराणे मूळचे पैठणचे. यावरूनही पैठणचे काशीच्या संदर्भातील महत्व लक्षात येईल.
शिखांचे दहावे गुरू गोविदसिंह हे त्यांच्या अखेरच्या काळात नांदेड येथे होते, म्हणजेच मराठवाड्यात. (पुरातन काळी, नांदेड हें नंदिग्राम या नांवानें प्रसिद्ध होतें) . गोविंदसिंहांना पंजाब सोडून अन्यत्र जायचे होते, तर त्यांनी मराठवाडा भागच कां निवडला, ही बाब विचारणीय आहे.
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, आणि वर्षभराने हैदराबाद संस्थानावर भारत सरकारनें कार्रवाई करून ते ताब्यात घेतले. त्यानंतर, १९५० च्या दशकात भाषावर प्रांतरचना झाली, व नंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. १९६० मध्ये, एकभाषिकत्वाच्या मुद्द्यावरून विदर्भ व मराठवाडा हे भाग महाराष्ट्रात सामील केले गेले. (त्याआधी तर, नागपूर हें शहर ‘मध्यप्रदेश’ या राज्याची राजधानी होते).
या सार्याचा अर्थ असा की, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, भाषिक व अध्यात्मिक, या सर्व अंगांनी, मराठवाडा हा भूभाग शतकानुशतके महत्वपूर्ण होता.
निझामाची राजधानी हैदराबादला हलविली गेल्यानंतर मराठवाड्याच्या महत्वाला उतरती कळा लागली, हे आपण पाहिलेच आहे. १९६० मधील राज्य-पुनर्रचनेत, मराठवाड्याला महाराष्ट्र राज्यात सामील केले गेले तेव्हा, आपल्या भूभागाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे मराठवाड्यातील जनतेला वाटले असल्यास नवल नव्हे. मात्र, नंतरच्या काळातील महाराष्ट्र राज्यात, विदर्भ, मराठवाडा व कोंकण या भागांवर अन्याय झाला, आणि त्यामुळे त्या-त्या भागातील जनतेची निराशा झाली व नाराजी ओढवली, ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाहीच. काही मुख्यमंत्री मराठवाड्यातील (किंवा विदर्भातील अथवा कोकणातील) होते, केवळ या एका गोष्टीवरून त्या-त्या भूभागाची प्रगती झाली, असे नक्कीच म्हणता येत नाहीं. एखादया शहराला केवळ, ‘राज्याची दुसरी राजधानी’ असा दर्जा देऊन (जसें की, नागपूर, बेळगाव), किंवा केवळ तेथें हायकोर्टाचे खंडपीठ असल्याने (जसें, औरंगाबाद), त्या भागातील मूलभूत प्रश्न सुटत नाहींत. एखाद्या भूभागाची, ‘आपल्यावर अन्याय झाल्याची भावना’ जर योग्य असेल, समर्थनीय असेल, तिला जर खरोखरच आधार असेल तर, त्याचे उत्तर नुसते ‘भावनिक’ असून चालणार नाही. तो अन्याय दूर होणे, हाच त्यावरचा खरा व सुयोग्य उपाय आहे. मराठवाडा (तसेंच विदर्भ व कोकण) या भागातील रहिवाश्यांच्या मनात असंतोष खदखदतो आहे, हे माझ्यासारख्या साधारण माणसालाही दिसते. राज्यकर्त्यांनी तो असंतोष दृष्टिआड करता कामा नये. नाहीतर एक दिवस त्याचा उद्रेक होऊ शकतो.
पण होते काय, की प्रत्येक प्रश्नाला दुसरी (विरुद्ध) बाजूही असते, आणि त्या बाजूलाही काही लोक अस्तन्या सरसावून उभेच असतातच. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याला राजकारणी कचरतात, कारण ‘पुढील निवडणुकीत त्याचा विपरीत परिणाम होईल’, अशी भीती त्यांना सतत सतावत असते. मग, नेहरूंच्या-काळात आंध्रप्रदेशच्या निर्मितीसाठी एखाद्याला स्वत:ला जाळून घ्यावे लागते ; संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ लोकांना प्राण गमवावे लागतात ; ‘पंजाबी सूब्या’साठी अकाली दलाला ठाम भूमिका घ्यावी लागते ; हल्लीहल्लीच्या काळात वेगळ्या (सेपरेट)-तेलंगाणा राज्यासाठी एका राजकीय पार्टीला आंदोलन करावे लागते. आणि असे काही झाल्यानंतरच मग, ते-ते प्रश्न, ‘क्रायसिस मॅनेजमेंट’ अशा स्वरूपात तातडीने सोडवणे राजकारण्यांना भाग पडते. क्रायसिस निर्माण होत नाही तोवर, बेळगावसारखे प्रश्न अनिर्णित ठेवणेच राज्यकर्त्यांना सोयीचे पडते. हा धोकादायक ट्रेंड आहे.
लहान राज्ये कितपत व्हाएबल् आहेत, या प्रश्नाला अनेक पैलू आहेत. त्यांत आपण तूर्तास जात नाही आहोत. पण, आपल्याला एक गोष्ट मात्र नक्कीच दिसते, ती ही की, आजवर मोठ्या राज्यांचे विभाजन होऊन लहान-राज्ये निर्माण झालेलीच नाहीत, असे मुळीच नव्हे. मुंबई राज्याचे महाराष्ट्र व गुजरात असे विभाजन झाले. ‘NEFA’ मधून छोटी राज्ये निर्माण केली गेली. पूर्वीच्या पंजाब राज्यामधून ‘हरियाणा’ , आसाममधून ‘मेघालय’, उत्तर प्रदेशातून ‘उत्तराखंड’ , बिहारमधून ‘झारखंड’ , मध्यप्रदेशातून ‘छत्तीसगड’, आंध्रमधून ‘तेलंगाणा’, ही राज्ये कार्व्ह् आऊट केली गेलीच की. अजूनही, उत्तरप्रदेशामधून ‘पूर्वांचल’ वेगळे राज्य करण्याची मागणी आहेच. बुंदेलखंड भागालाही, आपला भूभाग मध्यप्रदेश व उत्त्तरप्रदेश या दोन राज्यामध्ये विभागला गेल्याची खंत आहे, व त्यांना ते दोन्ही विभाग एकत्र करून आपले स्वतंत्र राज्य हवे आहे.
ही व अशी उदाहरणे असतांना, विदर्भ व मराठवाड्याची स्वतंत्र राज्ये असावीत, असे कुणा विचारवंताला वाटणें कितपत अजिबात अयोग्य आहे ? एकतर त्याला सपोर्ट तरी करा, किंवा तर्काच्या आधाराने त्याला विरोध करा. भावनिक गदारोळ फक्त त्या-त्या वेळी दबाव उत्पन्न करतो, पण त्याने लाँग-टर्म उत्तर नक्कीच मिळत नाहीं.
आणि समजा, विदर्भ व मराठवाड्याची उद्या स्वतंत्र राज्ये झालीच, तर एकच्याऐवजी तीन मराठी-भाषिक राज्ये होतील ! हिंदीचेंच पहा ना, किती हिंदीभाषिक राज्ये आहेत तें ! आता तेलगूभाषिकही २ राज्ये झाली. मराठी भाषेचा अभिमान, तुम्हाला-मला, सर्वांनाच आहे. पण, स्वतंत्र-राज्य-निर्मितीचे निकष वेगळेच आहेत, हे आपण मान्य करायला हवे.
‘शिशुपालाचे शंभर अपराध भरले’ या वाक्प्रचाराचा अर्थ हाच आहे, की ‘समोरच्याची सहनशक्ती, जी त्याने आजवर वापरली होती, ती, आता संपली; आता परिणाम भोगायला तयार हो’.
तेव्हा, असे कळीचे प्रश्न वेळीच पुढाकार घेऊन सोडवलेलेच बरे. प्रोक्रॅस्टिनेशन करणे, चालढकल करणे, म्हणजेच ‘शंभर अपराध भरेपर्यंत वाट पहाणे’ ! तसे होऊ नये, हीच आशा.
- सुभाष स. नाईक. सांताक्रूझ (प.), मुंबई.
दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५. भ्रमणध्वनी : ९८६९०९२१२६.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in. वेब-साईट : www.subhashsnaik.com
वाहनांचा कर्कश्य आवाज ,धूर .वाहतूककोंडी यामुळे जनता आधीच त्रस्थ आहे.यात आता दिवसरात्र दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सरकार नक्कीच धनदांडग्यांच्या दबावा खाली काम करते आणि नेत्यांना शहराचा बट्ट्याबोळ झाला तरी त्याची फिकीर नाही हेच असे निर्णय घेण्या मागील कारण असावे.
फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला नाही आणि त्यात हे पुन्हा नवे संकट !!!
एकदा एका शेतकऱ्याने थेट इंद्रदेवाकडे धाव घेऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली. त्या शेतकऱ्याचा आरोप होता की, पर्जन्याचा स्वामी असलेल्या इंद्राला मुळात पाऊस केव्हा, कुठे आणि कसा पाडावा याचे प्राथमिक ज्ञानदेखील नाही. जेव्हा पिकाला पाण्याची गरज असते तेव्हा आकाशात एकही ढग नसतो आणि जेव्हा उघाड पाहिजे असते तेव्हा धो-धो पाऊस कोसळतो.
आपल्या सरकारच्या कामकाजाचे एकूण स्वरूप पाहता उद्या एखाद्या पाचवी-सातवीच्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला सरकार काय करते, असा प्रश्न विचारलाच तर शिक्षकाकडे सरकार अध्यादेश काढते, यापेक्षा अधिक समर्पक उत्तर नसेल. आपले सरकार दुसरे काहीच करीत नाही. अध्यादेशांच्या कागदी भेंडोळ्या जमा करणे, त्यांचे थरावर थर रचणे यापलीकडे बाकी काही करताना सरकार दिसत नाही.
2 रविवार,डिसेंबर 2007
वीज भारनियमन संदर्भात ‘भारनियमन नव्हे देशद्रोह’ हा प्रहार आवडल्याच्या अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. आमच्या मनातले विचारच त्या प्रहारमध्ये शब्दबद्ध झाल्याचे बहुतेकांचे मत होते. भारनियमनाने केवळ उद्योगजगतच नव्हे तर सामान्यांचे दैनंदिन जीवनही प्रभावित झाले आहे, ही वस्तुस्थिती नाकारण्यात अर्थ नाही.
रासायनिक शेती मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दावणीला बांधल्या गेली आहे. महागडी बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीचा उत्पादन खर्च अतोनात वाढवीत आहेत. मिळणाऱ्या उत्पन्नातून हा उत्पादनखर्च भागविण्यासाठी उचललेल्या कर्जाचे व्याजही फिटत नाही.
काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही.
ज्या प्रमाणे एखादं चक्रीवादळ किंवा त्सुनामी आपल्या बरोबर सगळ्यांना विनाशाकडे घेऊन जाते;तद्वतच आजची पिढी व्यसन नावाच्या चक्रीवादळात पार गुरफटलेली दिसून येते.आजची युवा पिढी स्वत:च स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलतांना दिसत आहे.
तकऱ्यांच्या आत्महत्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि ती व्हायलाही हवी, कारण मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या धोरणात्मक नीतीचा परिणाम आहे. सरकार अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. हा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा आहे.
मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. त्यावर बरीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा ब्रिगेड चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापन केला आहे. काही महिन्यांमध्ये पुणे महापालिका निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिेगेडने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. कारण काही असो. कृती निषेधार्ह आहे.
मुळात मूर्तीभंजनाची परंपरा अरबस्तानातून आली आहे. जे आपल्याला पटत नाही, जे आपले नाही किंवा ज्यांचे आपण विरोधक आहोत (जे आपले विरोधक आहेत, असा अर्थ नव्हे) ते ते सर्व नष्ट झाले पाहिजे अशी ही धारणा आहे. अरबस्तानातून आलेल्या आक्रमकांनी भारतातील मंदिरे पाडली, मुर्त्या फोडल्या, ग्रंथ जाळून टाकले. ही त्यांची परंपरा आहे. कारण त्यांना चर्चा अमान्य आहे. ख्रिस्ती साहित्यातील एक कथा वाचली होती (कोणत्या पुस्तकात किंवा नियतकालिकात ते आठवत नाही). अरबस्तानातील काही आक्रमक ख्रिस्त्यांच्या देशात गेले. तेथील एका चर्चवर त्यांनी आक्रमण केले व फादरला विचारले की "सांग कोणाचा ग्रंथ महान आहे, तुझा की आमचा? जर तू म्हणालास, तुझा ग्रंथ महान आहे तर आम्ही तुला मारुन टाकू आणि जर तू म्हणालास, आमचा ग्रंथ महान आहे, मग तू आमचा ग्रंथ शिरोधार्थ न मानता तुझा ग्रंथ शिरोधार्थ मानलास म्हणून तुला मारुन टाकू". ही मूर्तीभंजकांची मानसिकता आहे. त्यांना चर्चा नकोय, त्यांना केवळ भंजन करायचे आहे. जो आपल्या विचारांचा नाही त्याच्या विचारांचा आदर करण्याची परंपरा त्यांच्यात नाही. ती परंपरा हिंदूंमध्ये आहे. म्हणूनच आपलं मस्तक गौतम बुद्ध आणि महावीर जैन यांसारख्या महापुरुषांसमोरही आपसुक झुकलं जातं. ही भारतीय परंपरा आहे. भारतीय परंपरा तोडण्यावर भर देणारी नसून जोडण्यावर आणि उभारण्यावर भर देणारी आहे. म्हणून आपल्यात मूर्त्या घडवल्या जातात. श्रद्धेचा विषय सोडा. परंतु मूर्ती घडवणे ही कलाकृती आहे. त्या कलेचा आणि कलाकाराचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे.
१८९६ रोजी चापेकर बंधूंनी व्हिक्टोरिया राणीचा पुतळा विटंबित केला होता. परंतु त्यामागची भावना उदात्त होती. त्या काळी इंग्रजांचे शासन होते आणि आपल्या कृतीतून इंग्रजांच्या साम्राज्याविषयीचा राग व्यक्त करायचा होता. तसेच इंग्रजांना दाखवून द्यायचे होते की भारतीय तरुण तुमच्या क्रूर शासनाविरोधात पेटून उठले आहेत. या भावनेने चापेकर बंधूंनी राणीच्या पुतळ्याला काळे फासले. ते राज्यच आपले नव्हते. आता लोकशाही आहे. कोणतेही सरकार असले तरी आपले भारतीयांचे राज्य आहे. स्वा. सावरकरांनी इंग्रजांचा निषेध म्हणून विदेशी कपड्यांची होळी टिळकांच्या नेतृत्वाखाली केली. हा सुद्धा चीड व्यक्त करण्याचा मार्ग आहे. कारण आपल्या देशात परकीयांचे राज्य होते आणि ते राज्य उलथवून टाकणे हे कोणत्याही देशभक्ताचे परमकर्तव्यच होते. पुढे अशीच होळी गांधीजींनी केली. ती खुप गाजली देखिल. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेले सावरकर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतः म्हणाले की आता पुढे क्रांती ही बंदूकीच्या गोळीने नव्हे तर मतदानाच्या पेटीत आपले मत टाकून करायची आहे. हे लोकशाहीचे महत्व सावरकरांनी सांगितले आहे. त्याच सावरकरांच्या अंदमानातील काव्यपंक्ती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांनी खोडल्या होत्या. त्यामुळे कॉंग्रेस आणि अय्यर सुद्धा मूर्तीभंजकांच्या परंपरेत अगदी शोभून दिसतात. ही मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे. संभाजी ब्रिगेड ही त्या मानसिकतेची अनुयायी आहे. चर्चा करण्यापेक्षा भांडण, तंटे करायचे, मारामार्या, तोडफोड करायची. कारण असे केल्याने कोणाला उत्तर देणे बंधनकारक राहत नाही आणि त्यांची कृती सुद्धा पूर्ण होते. संभाजी महाराजांची बदनामी केली असे ब्रिगेड म्हणत आहे, त्या ब्रिगेडला गोविदाग्रंजांनी शिवरायांचा रचलेला सुंदर पाळणा माहित नसावाच. असो
१९१० च्या सुमारास लिहिलेले राजसंन्यास हे नाटक कोणाच्याही लक्षात नव्हते. वादासाठी मान्य केले की गडकरींनी संभाजी महाराजांचा अपमान केला. पण त्याचा आता काय संबंध? हा वाद उपटून काढण्याला काहीच अर्थ नाही. राम गणेश गडकरींना हे जग सोडून जवळ जवळ ९८ वर्षे झालीत. त्या नाटकाचा प्रयोगही आता होत नाही. त्यात ते अपूर्ण राहिलेले नाटक आणि जर निषेध करायचाच होता, तर त्यावर सविस्तर लेख लिहून लोकांचे प्रबोधन करता आले असते. मुळात प्रबोधन या शब्दाचीच एलर्जी ह्यांना असावी. कारण प्रबोधन करण्याआधी स्वतःला बोध व्हाया लागतो. असो.
माझे फेसबुकवरील मित्र डॉ. सुबोध नाईक यांनी लिहिलेल्या माहितीनुसार, १९३७ मध्ये मुंबई प्रांताच्या विधानसभेत शिवाजी महाराज युगपुरुष नव्हते असे कॉंग्रेसने सांगितले होते. मग आता गोविंदाग्रजांची मूर्ती हटवणारे ब्रिगेडी कॉंग्रेसचे काय करतील? नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर म्हटले की "संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नाही.. ज्या मर्द मराठ्यांनी केलं त्यांना सलाम" मग आता नितेशरावांचे वडील ज्या कॉंग्रेसमध्ये आहेत, त्या कॉंग्रेसने शिवरायांचा अपमान केला होता. या विरोधात मराठाचा अभिमान वगैरे बाळगणारे नितेशराव कोणती कार्यवाई करणार आहेत? आपल्या वडीलांना राजांचा अपमान करणार्या कॉंग्रेसचा राजीनामा देण्यास भाग पाडतील का? पण असे काही होणार नाही. कारण ह्यांचा पंथ आणि परंपरा मूर्तीभंजनाची आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता या सर्व गोष्टी तोंडी लावण्यापुरत्या आहेत. हे जरी भारतीय असले तरी ही मानसिकता भारतीय नाही. ही वाळवंटाची मानसिकता आहे. ती वाळवंटातून आलेली आहे आणि नतद्रष्टांनी पोसली आहे. संभाजी ब्रिगेडच्या त्या कार्यकर्त्यांना अटक होईलही. पण ही गलिच्छ मानसिकता, ही राक्षसी परंपरा कशी आणि कधी नष्ट होणार? मुळात ती नष्ट होण्याच्या मार्गातच आहे. कारण सज्जन आता जागरुक होत आहेत. त्यामुळे दुर्जनांची कोंडी होत आहे. गोविंदाग्रजांचा पुतळा हटवला या कृतीला प्रत्यूत्तर म्हणून गोविंदाग्रजांचे सहित्य अधिक वाचले आणि खपले जाईल ही आशा आणि खात्री मला आहे. गोविंदग्रजांनी त्यांच्या कवितेत "भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा" असं म्हटलंय. पण बुद्धी नसलेले काही जीव महाराष्ट्रात राहतात हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे. तर अरबस्तानातील मूर्तीभंजनाची परंपरा चलवणार्या भारतीय ब्रिगेड्यांचे मी एक कलाकार म्हणून निषेध करतो आणि त्यांनी कितीही मूर्त्या फोडल्या तरी आम्ही विचारांची लढाई विचारांनीच आणि लोकशाही मार्गानेच लढणार, अशी प्रतिज्ञा घेतो. २३ जानेवारी रोजी राम गणेश गडकरींची पुण्यतिथी आहे. आपण सर्व साहित्यप्रेमींनी आपापल्या भागात आणि आपापल्या क्षमतेने ही पुण्यतिथी जागवायला हवी. या दिनानिमित्त गडकरींचे स्मरण करुया, त्यांचे साहित्य वाचूया, विकत घेऊया, साहित्य वाटप करुया किंवा त्यांची नाटके सादर करुया. आपल्याला जे शक्य होईल ते करुया. या भ्याड कृतीचा, या मूर्तीभंजनाच्या परंपरेचा निषेध करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Copyright © 2025 | Marathisrushti