स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे. बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर येऊन कितीही गोड बोलली तरी उन्दिरांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. एवढेच नव्हे तर बाहेर जमिनीवर तिच्या विष्ठे जवळ हि उन्दिरांनी फिरकू नये. तिच्या विष्ठेत अशी काही जादू आहे कि एकदा उंदराने तिचा वास घेतला कि तो पुन्हा बिळात परत येत नसे.
स्वामीजी बोलता बोलता थांबले, पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, बच्चा, ज्याला उंदीर, परजीवी आणि बिल्ली मौसीचा अर्थ कळेल, त्याला आज काय चालले आहे, हे हि कळेल. स्वामीजी पुन्हा समाधीत गेले. मला काही गोष्ट कळली नाही, तुम्हाला कळली का.
-- विवेक पटाईत
सोळावे वर्ष हे असे वर्षे असते जिथे विद्यार्थ्यांच्या मन आणि शरीरात अमुलाग्र बदल होत असतात. सोळावे वर्ष हे आपण तारुण्याच्या पदार्पनाचे वर्ष मानतोत. शाळेच्या कडक शिस्ती मधून विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या मुक्त जीवनामध्ये प्रवेश केलेला असतो. जिथे बारावीला उत्तम मार्क घेऊन पुढील आयुष्याच्या दिशा ठरवायच्या असतात त्याच क्षणी या वयात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी भुरळ घालण्याचा प्रयत्न करत असतात.
भिती माणसांच्या विचारांमध्ये असते, ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. भितीग्रस्त माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट सर्वात मोठी समजतो, ज्या गोष्टीला तो घाबरत नाही त्या गोष्टीला तो तुच्छ समजतो. भितीग्रस्त माणूस ज्याची भिती वाटते अशा गोष्टींच्या सूचना अंमलात आणतो, भीतीदायक माणसांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीची भीती वाटत नाही त्यांना अक्षरशः नजरअंदाज करतो.
वेदनेला आणि दुःखाला गळ्याला लावायला कोणाला आवडेल? दुसऱ्यांचं दुःख पाहायला सुद्धा काही लोकांना आवडत नाही. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचे दुःखं समजून त्यांनी आणलेली भीक सुद्धा त्यांच्याबरोबर खाऊन त्यांना आपलेसे करणारे व असे काही भिकारी जे अनेक दिवस एका जागेवर सर्व विधी करणारे व त्यामुळे त्यांच्या हातापायांना संसर्ग झालेला असला तरी त्या हाताने खाणारे व संसर्ग हातात नसून मनात असतो असे मानणारे आगळे वेगळे डॉक्टर केवळ त्या भिकाऱ्याविषयी सहानुभूती दाखवत नाहीत तर त्यांच्या वर उपचार करून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून, त्यांनां नातेवाईकांनी सोडले असले तरीही पुन्हा आयुष्यात आणणारे व वेळ प्रसंगी एखाद्याला पुढील आयुष्य जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा करणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे हे झपाटलेलं व्यक्तिमत्व आजही कार्यरत आहे.
शिक्षकांमुळे शाळेला ओळख मिळते व शाळेमुळे विद्यार्थ्यांना ओळख मिळते. अशीच ओळख सुनील खेडकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी या शेवटच्या टोकावरच्या गावाला मिळवून दिली. महाराष्ट्रातील कायम दुष्काळी छायेत असणारा पाथर्डी तालुका व या तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात छोटीशी लोकवस्ती असणारे मौजे जोगेवाडी गाव तालुक्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात बहुसंख्येने भटक्या जमातीतील लोक राहातात. यात वंजारी, मागासवर्गीय यांचा प्रामुख्याने समावेश होतो. गावात विकासाच्या मागासलेपणासोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक अनास्था होती.
कार्यकारणभाव, विज्ञान यांकडे दुर्लक्ष करु नये. एखाद्या कथित ‘चमत्कारामागील कार्यकारणभाव समजला, की तो चमत्कार – “चमत्कार” राहत नाही, ती केवळ घटना ठरते. मात्र, आज हे होताना दिसत नाही…
मराठय़ांचे मूक मोर्चे निघू लागल्यापासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्याला पुष्टी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे उत्तर खणखणीत आहे, 'केवळ ब्राह्मण असल्याच्या कारणावरून मला दूर केले जाणार नाही. काही चुका झाल्या तरच बदल होईल; अन्यथा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ मी पूर्ण करेन.'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतकेच बोलून थांबलेले नाहीत. 'मंत्री नेमण्याचा आणि मंत्र्याला काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे,' असे त्यांनी सुनावले आहे. मुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न भगवान गडावरचा होता. पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत आपल्यामुळे मंत्री झाल्याचे सांगितले. तर धनंजय मुंडेंना लाल दिवा आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांचे उत्तर भगवान गडाच्या संदर्भात असले, तरी इशारा तिसर्या मंत्र्याला होता. पंकजा ताईंच्या उद्गारात अहंकार प्रकटला असला, तरी या घडीला त्या काही मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धक नाहीत. पब्लिसिटी, अॅडव्होकसी आणि लॉबिंगसाठी स्वत:ची यंत्रणा उभे केलेले एक ज्येष्ठ मंत्री गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. मीडियात त्यांच्या बातम्या आणण्यात त्यांचे पीआर डिपार्टमेंट यशस्वी होत असले, तरी अॅडव्होकसी आणि लॉबिंगचा कस दिल्लीत लागायचा आहे.
मोर्चांनंतर सुरू झालेली चर्चा भाजपाच्या अंतर्गत हालचालींना वेग देत असल्याचा सुगावा मुख्यमंत्र्यांना लागला असणार, म्हणून त्यांनी उघडपणे उत्तर दिलं. मुख्यमंत्री कोण असावे? हा सत्ताधारी पक्षाचा अधिकार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण असावे आणि नसावे हे महाराष्ट्रात जातीवरून ठरणार काय? हा खरा प्रश्न आहे. मराठय़ांचे मोर्चे निघत आहेत आणि मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, एवढय़ावरून हा प्रश्न उपस्थित होत असेल, तर मामला गंभीर आहे. तशी मागणी मोर्चांनी केलेली नाही. मोर्चांना बदनाम करण्यासाठी कुणी ती आग लावत असेल, तर ती गोष्ट आणखी गंभीर आहे.
ही ठिणगी टाकली कुणी? त्याला हवा दिली कुणी?
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचे वंशज संभाजी राजे यांना भाजपाने राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर नेमले. तेव्हा मोर्चे निघायचे होते. भाजपाची ती खेळी विलक्षण होती. प्रमोद महाजनांची आठवण करून देणारा तो डाव खुद्द मुख्यमंत्र्यांनी टाकला होता. त्यावर महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांची दिलेली प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय भूगर्भात अस्वस्थता निर्माण करून गेली. 'पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे. पेशवे फडणवीसांना नेमायचे. आता फडणवीस थेट छत्रपती नेमायला लागले आहेत.' पवार साहेबांची ही प्रतिक्रिया नुसती खोचक नव्हती. महाराष्ट्राच्या राजकीय गोलावरील टेक्टॉनिक प्लेट्स हलवण्याची ताकद त्या प्रतिक्रियेत होती. त्या प्रतिक्रियेने ठिणगी पडली. त्या ठिणगीला भाजपाच्या अंतर्गत राजकारणात हवा देण्याचे काम नंतर लगेचच सुरूही झाले. म्हणून त्याची दखल खुद्द फडणवीसांना घ्यावी लागली.
कोल्हापूरच्या संभाजी राजांच्या नेमणुकीवरून ती प्रतिक्रिया आली म्हणून आठवले. फाटक्या गादीसाठी का भांडता? असे यशवंतराव चव्हाणांनी कोल्हापूरच्या दत्तक विधानावरती म्हटले होते. यशवंतरावांचा हेतू प्रामाणिक होता; पण तरीही त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. शरद पवारांना त्यांच्या ताज्या विधानाची किंमत मोजावी लागणार नाही. उलट किंमत मिळेल. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरानंतर विशेषत: मराठवाड्यात हरवलेला प्रभाव त्यांना पुन्हा अलीकडच्या घटनांनी मिळवता आला आहे. एका मोठय़ा समाजातल्या राजकीय विभागणीला रोखून पुन्हा एकदा एकसंध करण्याची संधी ते पाहात असतील.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद ब्राह्मणाकडे असावे की नसावे? आणीबाणीनंतर देशात जनता राजवट आली. महाराष्ट्रातही परिवर्तन घडू लागले होते. जनता पक्षाला संधी असूनही आणि सर्वांचे एकमत असूनही एस. एम. जोशी यांनी मुख्यमंत्री पद नाकारले. महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री नको, असे डी कास्ट झालेले एस. एम. म्हणाले. पुढे शरद पवारांना त्यांनीच मुख्यमंत्री केले. सेनेची सत्ता आली, तेव्हा बाळासाहेब खेरांनंतर महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री झाला. शरद पवार ज्यांना पंत किंवा श्रीमंत म्हणून हाक मारत ते मनोहर जोशी मुख्यमंत्री होण्यामध्ये त्यांचाच रोल महत्त्वाचा होता. पवारांनी तो केला नसता, तर सुधीर जोशी कदाचित मुख्यमंत्री झाले असते. त्यांना हुलकावणी मिळाली. मनोहर जोशींना जावे लागले आणि नारायण राणे आले ते निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण मुख्यमंत्री नको, या प्रमोद महाजनांच्या भूमिकेमुळे.
अन् आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या जातीची. ते स्वत: जात, पात मानत नाहीत. जाती सापेक्ष वागत नाहीत. तो संस्कार त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. भाजपामध्ये जी उदार, आधुनिक नेत्यांची फळी आहे, त्या गटातले ते आहेत. ही फळी भाजपात अल्पसंख्य आहे; पण अन्य भाजपा मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत हे ठामपणे सांगता येईल की, फडणवीस 'खट्टर'वादी नाहीत. भाजपात जात पात पाहिली जात नाही, हे मात्र खरे नाही. जात हे वास्तव आहे आणि कोणताही राजकीय पक्ष त्या वास्तवापासून दूर जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे, यापेक्षा तो कोणत्या बाजूचा आहे, हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राने ब्राह्मण्याला कायम नकार दिला आहे, ब्राह्मणाला नाही. फुले-शाहू-आंबेडकर ते थेट यशवंतराव चव्हाण या सर्वांचा इतिहास तेच सत्य अधोरेखित करतो. महात्मा फुलेंच्या शाळेसाठी आपला वाडा देणारे नारायणराव भिडे, शाहू महाराजांची वेदोक्त प्रकरणात पाठराखण करणारे राजारामशास्त्री भागवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थनार्थ मनुस्मृती जाळणारे बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणात त्यांना साथ देणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.
- कपिल पाटील
(लेखक, मुंबईचे शिक्षक आमदार आहेत)
पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी २६ ऑक्टोबर २०१६
संकलित
संतोष ताठे
शिक्षक भारती परिवार महाराष्ट्र
सायन्स अजून पर्यंत व्हेन्स म्हणजे नसा बनऊ नाही शकल. डॉ.अब्दुल कलाम यांनी स्वतः त्यांच्या एका भाषणात म्हटलेले आहे की आपण या जगाला चालवतो, पण आपल्याला चालवणारी आपल्याला कंट्रोल ठेवणारी एक शक्ती वर आहे. ते तर स्वतः एक खूप मोठे सायंटिस्ट होते.
सद्या चार्लस् डार्विन आणि त्याचा माकड सगळीकडे धुमाकुळ घालतोय…. अनेकजण जणु काय डार्विनला आपण कोळून प्यालोय, अशा आविर्भावात बोलतायत…(जसं क्रिकेटबद्दल बोलताना प्रत्येकजण एक्सपर्ट कॉमेन्टेटर असल्यासारखा बोलतो, तसं..) खरंतर यापैकी कितीजणांना डार्विन, त्याचं ते जगप्रसिद्ध पुस्तक आणि क्रांतिकारक सिद्धांत याच्याबद्दल किती माहिती आहे, हे त्यांचं त्यांनाच माहित.
दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ ही ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून लिहिलेल्या लेखाचा हा पुढील भाग.
संस्कृती, पुरातन वाङ्मय, इतिहास वगैरेंच्या आधारने या विषयाची चर्चा करू या.
पैलू दुसरा : संस्कृती, वाङ्मय, इतिहास :
संस्कृती, वाङ्मय व इतिहास हे, आपल्या चर्चेच्या अनुषंगाने, परस्परसंबंधी (interdependent) आहेत.
१) आपल्याला रामायण, महाभारत अशा ग्रंथांमधून रावणवध, शिशुपालवध, अशा प्रकारचे शब्द आढळतात. राम व कृष्ण यांना अवतारी पुरुष मानल्यामुळे, आणि, रावण, शिशुपाल इत्यादी जन हे ‘व्हिलन’ (किंवा व्हिलनिश) होते, असे दाखविलेले असल्याने आपला असा समज होतो की, ‘वध’ हा फक्त खलांचाच होतो.
पुढील विश्लेषणापूर्वी हे स्पष्ट केलेले बरे की, श्रीराम व श्रीकृष्ण यांचा कुठल्याही प्रकारे अधिक्षेप करण्याचा माझा हेतू नाहीं. ते वंद्य आहेत, हे मान्य. (त्यांना अवतारत्व हे, त्यांच्या स्वत:च्या खूप-नंतरच्या काळात दिले गेले. म्हणजेच, ते महापुरुष होते, पण मानवच होते ). पण, ते महामानव होते याचा अर्थ असा नाहीं की त्यांचे प्रत्येक कृत्य योग्यच होते. किंबहुना, त्यांच्या काळी ते कृत्य योग्य मानले गेले असेलही; पण आज त्याचे विष्लेषण करतांना आपल्याला सद्य परिस्थितीनुसार त्याचा वेगळा संदर्भ दिसतो, भिन्न अर्थ लागतो.
( हें स्पष्टीकरण हेतुत: देण्याचे कारण असे आहे की, ‘मूळ चर्चा बाजूला पडून दुसर्याच विषयावरील भावनिक उच्चारव टळावा’ ).
२) रावण, शिशुपालादि वस्तुत: खल होते की नाहीं, ही बाब प्रथमत: गैरलागू आहे. ते, या ग्रंथांच्या सांप्रत उपलब्ध आवृत्यांमध्ये ‘खल’, व्हिलन, दाखविलेले आहेत. या ग्रथांच्या मूळ आवृत्या, या सध्या उपलब्ध असलेल्या आवृत्यांहून शेकडो वर्षे आधीच्या होत्या असणार.
तेव्हा, त्या मूळ स्वरूपातील ग्रंथामध्ये, रावण शिशुपालादि लोक तसेच ( खल) दाखवलेले होते काय, हा प्रश्नच आहे. हा मुद्दा, म्हणजे काळाचा संदर्भ, आपण ध्यानात ठेवायला हवा.
३) पुढे जाण्यापूर्वी, हें ध्यानात घ्यायला हवे की, ‘खून‘ हा शब्द भारतात, व पर्यायानें मराठी, हिंदी इत्यादी ‘आधुनिककालीन’ भाषांमध्ये मध्ययुगात आला. तेव्हा, प्रश्न असा उठतो की, त्याआधी कुठला शब्द वापरला जात असेल ? तर, त्याचे उत्तर स्पष्ट आहे की, अर्थातच, पुरातन संस्कृत ग्रंथामध्ये तर संस्कृत शब्दच असणार ; आणि ‘आधुनिक’ भारतीय भाषांमध्येही तेव्हा, संस्कृत किंवा संस्कृतोद्भव (तत्सम अथवा तद्भव) शब्दच वापरला जात होते.
४) आपण ज़रा वेळ रावण, शिशुपाल यांना बाजूला ठेवू. त्यांच्याकडे नंतर वळायचे आहेच. आधी ज़रा दुसरी काही उदाहरणे पाहू या.
४.१. रामानें सुग्रीवाचा ज्येष्ठ भाऊ बाली याचा वध केला. असे पहा, रामाची आणि बालीची आधी ओळखच नव्हती. सीताहरण झाल्यानंतर राम-लक्ष्मण तिचा शोध घेत-घेत दंडकारण्यात आले, तेव्हा पंपा सरोवर भागात त्यांना मारुती भेटला ; त्यानें सुग्रीव व बाली यांच्यामधील परिस्थिती वर्णन केली, व सुग्रीवाला सहाय्य करण्याची रामाला विनंती केली. बाली काही व्हिलन नव्हता, तो ‘वा-नरां‘चा बलशाली राजा होता, सुद्रीव हा त्याचा धाकटा भाऊ होता.
एका द्वंद्व / युद्धातून जेव्हा तो काही काळ परत आला नाही, तेव्हा तो मेला आहे असे समजून त्याचा कनिष्ठ भाऊ सुग्रीव राजा बनला व बालीच्या पत्नीलाही त्यानें तत्कालीन प्रथेनुसार आपली पत्नी बनवले. ( असेंही वाचनात आलेलें आहे की, बाली परत येऊं नये म्हणून, ज्या गुहेत बाली व त्याचा प्रतिद्वंद्वी यांचें द्वंद्व / युद्ध चाललें होते, त्या गुहेच्या मुखावर सुग्रीवानें अन्य वानराच्या - मारुतीच्या - मदतीनें, शिळा बसवली. तसें असेल तर, बाली परतूं नये, असाच सुग्रीवाचा उद्देश होता ; आणि मग, villan कोण, याचें उत्तर स्पष्ट आहे ! ).
परंतु, त्यानंतर काही काळाने बाली परतला. आपले राज्य व पत्नी यांचा सुग्रीवाने अपहार केला असे दिसून आल्यानें, त्यानें सुग्रीवाला राज्यातून हाकलून दिले व स्वत:चे राज्य पुन्हा ग्रहण केले.
नंतर, बाली व सुग्रीव यांच्या द्वंद्वाच्यावेळी, कुठला सुग्रीव हे ओळखता यावे म्हणून रामाने तसुग्रीवाला एक पुष्पहार परिधान करायला सांगितले होते. यावरूनही, राम बालीला ओळखत नव्हता हेच सिद्ध होते.
आता सांगा, कुठल्या तर्काने बालीला व्हिलन म्हणता येईल ? आणि, समजा तसे असते, तर मग, लपून, झाडाच्या मागून बाण मारून बालीवध करायची रामाला काय आवश्यकता होती ? याचे कारण स्पष्ट आहे की, रामानें अनोळखी बालीची, स्वत:शी-संबंधित असे कुठलेही कारण नसतांना, हत्या करणें, हे न्यायसंगतच नव्हते. बालीला मारणें ही रामाची राजकीय गरज होती. म्हणजेच, ज्याचा वध झाला , तो बाली ‘खल’ नव्हता.
( गीत रामायणामधील यासंबंधीचे गदिमांचे शब्द पहा : ‘बालीवध ना , खल-निर्दाळण’. यातून स्पष्ट ध्वनित होते की, वध हा खलाचाच होतो, असे नाहीं. नाहींतर गदिमा म्हणाले नसते कां, की ‘बालीवधची खल-निर्दाळण’? आपण गदिमांच्या रचनेत फक्त विरामचिन्हाचा बदल करून, असे म्हणू या की – ‘बालीवध ; ना खल-निर्दाळण’. )
४.२. याच प्रभू रामचंद्रानें शंबर याचाही वध केलेला आहे, त्याचे कारण काय तर, जन्मवर्णाने अपात्र असूनही शंबर वेदाध्ययन करत होता. त्याला खरे तर, ऋषीमुनींसमानच मानायला हवे! पुढील स्पष्टीकरणाची खरे तर गरजच नाही. म्हणजेच, हा वधही ‘खला’ची हत्या नव्हेच.
४.३. कृष्णाने भीमाकरवी जरासंध याचा वध करविला. जरासंध काही व्हिलन नव्हता. तो होता मगधाचा राजा . आणि त्याने एवढा fair-play केला की, ‘मी-अर्जुन-भीम यांच्यापैकी तू कोणाशीही मल्लयुद्ध कर’, असे श्रीकृष्णाने सांगूनही, जरासंधाने स्वत:ला तुल्यबळ अशा भीमाची निवड केली. त्याने द्वंद्वासाठी कृष्ण किंना अर्जुन यांची निवड केली असती, तर काय झाले असते, याची कल्पना करावी. जरासंध खल नव्हता, त्याचा वध वध राजकीयच होता.
५) रावण व शिशुपाल यांच्याकडे नजर टाकण्यापूर्वी, प्रथम हें ध्यानात घ्यायला हवे की –
* मूळ-रचलेल्या ग्रंथामध्ये बर्याच-नंतरच्या काळात पुराणिकांनी हवी-तशी भर घातलेली आहे, आणि हीरोच्या प्रत्येक विरोधकाला व्हिलन बनवलेले आहे. (अर्थातच, त्यामुळे कथानकाची नाटकीयता वाढते; आणि पुराणिकांना निरूपण-कीर्तनाच्यावेळी त्या नाटकीयतेचा नक्कीच उपयोग होत असणार) .
* हे सांगायला नकोच की, नायकाचे (हीरोचे) महत्व अधोरेखित होते, वाढते, तें व्हिलनमुळे.
हीरो-अँटीहीरो, नायक-खलनायक अशा जोड्या सर्वच वाङ्मयात सापडतातात. जैन परंपरेतही वासुदेव-प्रतिवासुदेव आहेत. बौद्ध साहित्यात, बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वीचा, गौतम व मार यांचा संघर्ष उल्लेखलेला आहे. ख्रिस्चॅनिटीसुद्धा Christ-Antichrist मानते. मध्ययुगीन भविष्यवेत्ता नोस्ट्रॅडेमस यानेही Christ-Antichrist या जोडीचा उल्लेख केलेला आहे. ईश्वर आणि सैतान ही जोडीही प्रसिद्ध आहेच.
५.१ रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. असा माणूस सच्चरित्र असावा अशी अपेक्षा असते. तो एकदम व्हिलन कसा झाला ? आणि, तसा तो असता, तर मग सीतेला अनेक महिने अशोकवनात ठेवायची आवश्यकताच काय ? तो सहज सीतेला आपली पत्नी बनवू शकला असाता, अगदी तिच्या इच्छेविरुद्धही. किंवा, ( आणि, हें लिहायलाही माझ्या मनाला त्रास होतो आहे, की ) रावण सीतेला पत्नी न बनवताही जबरदस्तीने तिचे स्त्रीत्व ‘लुटू’ शकला असता. पण, रावणाने तसे केले नाही ! आपल्याला पती म्हणून स्वीकारण्याची तो सीतेला विनंती करत राहिला, आणि त्याने तिच्या अंगाला हातही लावला नाहीं. अशा माणसाला व्हिलन म्हणता येईल कां? सीता-हरणाला व राम-रावणाचे युद्ध यालाही तत्कालीन राजकीय पदर होते.
५.२. शिशुपालानें राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्णाला अग्रपूजेचा मान द्यायला विरोध केलेला होता. इरावती कर्वे यांनी स्पष्ट केलेले आहे की, कृष्ण तसेच शिशुपाल या दोघांनाही ‘वासुदेव’ व्हायचे होते ( इथे, वासुदेव म्हणजे ‘वसुदेवाचा पुत्र’ असा अर्थ अभिप्रेत नाहीं, तर ‘वासुदेवपण’ ही एक तत्कालीन महत्वाची उपाधि होती, त्यात राजकीय संदर्भ, राजकीय व सांस्कृतिक शक्ती, असा अर्थ भरलेला होता. म्हणजेच, शिशुपाल काही व्हिलन नव्हता, तर तो वासुदेवत्वासाठी श्रीकृष्णाचा प्रतिस्पर्धी होता. म्हणून त्याने राजसूय यज्ञाच्या वेळी हरकत घेतली ; आणि संधीचा फायदा घेऊन कृणानें त्याचा वधच करून टाकला. कृष्णाने शिशुपालाचा असाअचानक वध केलेला पाहून सगळे आश्चर्यचकित आले होते. म्हणजेच, ती कृती अगदी sudden होती, व ती कितपत योग्य होती याबद्दल उपस्थित जनांच्या मनात संदेह होता.
६) अशी अनेक उदाहरणे देता देतील. उदा. भीष्मवध, द्रोणवध इत्यादी. भीष्म व द्रोण हे दोघेही कुठल्याही व्याख्येनुसार खल ठरत नाहीत. उलट, दोघांचाही वध कपटाने केला गेला. घटोत्कचाचेंही पहा. तो वीर योद्धा होता. तो खल कसा ? तसेच कर्णवध, दुर्योधनवध यांचेही आहे. दोघांनाही तत्कालीन युद्धनियमांच्या विरुद्ध जाऊन मारले. ते खल होते काय ? त्यांना पुराणिकांनी खल बनविले आहे. ‘सुयोधन’ याचा उल्लेख कथेमध्ये ‘दुर्योधन’ असा करणे, हेही सूत-पुराणिकांचेच काम. (दुर्योधनाचा उल्लेख पुढेही आहे).
७) हे महाभारतातील आणखी काही उल्लेख :
* कर्णानें कुंतीला वचन दिले होते की मी अर्जुनाव्यतिरिक्त कुठल्याही पांडवाचा वध करणार नाही.
* कुरुक्षेत्रयुद्धाआधी भीष्माने दुर्योधनाला सांगितऋले होते की मी कुठल्याही पांडवाचा वध करणार नाहीं.
या दोन्हींतील ‘वध’ शब्दावर टिप्पणी करायची आवश्यकताच नाही, कारण पांडव तर महाभारतातील ‘हीरो’च आहेत.
८) वस्तुत: कौरव-पांडव युद्ध हें, ‘राज्यावर खरा अधिकार कोणाचा’ या मुद्द्यावरून, चुलत बंधूमध्ये लढले गेलेले युद्ध आहे. (मी कौरवांचा पक्षपाती नाही, पण,) दुर्योधनाचे लॉजिक अयोग्य कसे? तो तर मोठ्या भावाचा मोठा मुलगा होता. युद्धात, पांडवांकडे सात अक्षहौणी तर कौरवांकडे अकरा अक्षहौणी, म्हणजे जवळजवळ दीडपट सेना होती. याचाच अर्थ असा की, त्याकाळातील आर्यावर्तामधील बर्याच नृपांना दुर्योधनाचा राज्यावरीळ हक्क योग्य वाटत होता. भीष्म पितामह, गुरु द्रोण, कृपाचार्य , हे खाल्या मिठाला जागले म्हणून नव्हे, तर न्यायाच्या दृष्टीने योग्य वाटले म्हणूनच, पांडवांबद्दल सहानुभूती असूनही, कौरवांच्या बाजूने लढले. कारण, ती बाजू त्यांना अधिक न्याय्य वाटली होती असणार. बलरामालाही हे युद्ध अयोग्यच वाटत होते, म्हणून तर तो तीर्थयात्रेला निघून गेला.
म्हणजेच, हे स्पष्ट आहे की, ‘राज्यावर अधिकार कोणाचा’ याविषयीच्या युद्धाला विनाकारण, उगाचच ‘सुष्ट विरुद्ध दुष्ट’ असा रंग दिला गेला.
* सध्याचे महाभारत व्यासशिष्य वैशंपायन याचें आहे व त्याने ते जनमेजयाला यज्ञाच्या वेळी कथन केले होते. त्यात पुढे सूतांनी भर घातली. व्यासांच्या विभिन्न शिष्यांनी व्यासांच्या ‘जय’ या मूळ रचनेवर आधारित वेगवेगळी महाभारतें लिहिली होती असे म्हणतात. ‘जय’ कथेची एक विस्तारित-रचना व्यासशिष्य जैमिनीने केली होती, व त्यात त्याने कौरवांच्या बाजूने लिहिले होते.( म्हणजेच, ते पर्यायी ‘महाभारत’ होते ). अर्थातच, आता त्याची प्रत उपलब्ध नाहीं. कशी असेल? पण ती उपलब्ध असती, तर जैमिनीने या वधांबद्दल काय लिहिले असते, याची कल्पना करणें अवघड नाही.
(तशा प्रकारचें पुस्तक काही दशकांपूर्वी श्री. आनंद साधले यांनी लिहिलेले आहे, ते वाचून जिज्ञासूंना थोडीशी कल्पना येईल) .
९) असुर :
आता आपण ज़रा वैदिक साहित्यावरही नजर टाकू या. इंद्राने असुरांचा वध केल्याचे उल्लेख वेदांमध्ये आहेत. जसें, वृत्रासुर, त्रिपुरासुर इ. असुर हे खल होते काय ? ते चांगले प्रगत, सुधारलेले होते. त्रिपुरासुराची तर तीन पुरे होती. (महाभारतकाळीही असुर दिसतात. बाणासुराची कन्या उषा ही, श्रीकृष्णाचा पौत्र अनिरुद्ध याच्याशी विवाहबद्ध झालेली होती. असुर प्रगत नसते तर, असे संबंध यादवांना मान्य होऊ शकले असते काय?).
मुख्य गोष्ट ही की, ऋग्वेदकाळी, ‘देव’ आणि ‘असुर’ या दोन जमातींमध्ये, दोन टोळ्यांमध्ये, दोन संस्कृतींमध्ये, संघर्ष झाला. ( भारतीय ‘आर्य’ हे मूळ भारतातीलच आहेत, की कुठून बाहेरून आले, या वादात तूर्तास आपण शिरण्याचे कारण नाही). मात्र, देव व असुर यांचा संघर्ष झाला याचा अर्थ असा मात्र नाहीं की वध केले गेलेले असुर ‘खल’ होते.
‘देव’ सुष्ट’ होते असे म्हटले की मग, त्यांचे शत्रू जे असुर हे ‘दुष्ट’च असायला हवेत, अशी एक धारणा आहे. पण, ते दुष्ट असते तर मग, अनेकदा त्यांनी तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले, व देवाधिदेव ‘महादेवा’ने त्याना वर दिले, हे कसे ?
आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी , आणि ती ही की : ‘कोण चांगला व कोण वाईट’, हे अनेकदा बघणार्याच्या दृष्टिकोनावर, तो कोणाच्या पक्षाचा आहे यावरही, अवलंबून असते. (ही बाब, आपण जेव्हा या चर्चेचा समारोप करू, तेव्हाही ध्यानात घ्यावी).
ऋग्वेदाने, देवांना ‘चांगले’ व असुरांना ’वाईट’ ठरवले. पारशी जमातीचा ‘अवेस्ता’ हा ग्रंथही खूपच पुरातन आहे. ऋग्वेद व अवेस्ता यांच्यात भाषिक साम्यही बरेच आहे. मात्र, अवेस्ताच्या ‘पुरातन-पर्शियन’ भाषेत, ‘देव’ याचा अर्थ ‘चोर’ असा होतो. तसेच, पारशांचा परम-ईश्वर (biggest deity) आहे ‘अहुर मज्द’. ऋग्वेदीय ’स‘चा पुरातन-पर्शियन मध्ये ‘ह’ होतो. जसें, सोम - होम , सिंधु – हिंदु . म्हणजेच, पर्शियनमधील ‘अहुर’ हा, ऋग्वेदीय ‘असुर’ आहे. याचाच अर्थ असा की पुरातन-पर्शियन सर्वश्रेष्ठ deity ‘असुर’ ही आहे. मग, त्यांनी देवांना चोर म्हटले, यात काय आश्चर्य ?
तेव्हा, सुष्ट-दुष्ट, चांगला-वाईट, हीरो-व्हिलन, अशी विभागणी करतांना आपण सावध असायला हवे. मात्र, एक गोष्ट असुरांच्या उदाहरणावरूनही स्पष्ट होते, की, ज्या व्यक्तीचा ‘वध’ होतो, ती व्यक्ती ‘दुष्ट’च असते, असे अजिबात नाही.
१०) चक्रधरस्वामी व श्रीबसवेश्वर हे दोघेही संतच. पण, चक्रधरांच्या बाबतीत, हेमाद्री पंडितानें त्यांचा वध करविला/हत्या करविली, असा शब्दप्रयोग माझ्या पाहण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, शिष्यांच्या चुकांचे फळ बसवेश्वरांना भोगावे लागले व त्यांचा वध झाला / हत्या झाली, अशा अर्थाचा उल्लेख मी वाचलेला आहे. (हे उल्लेख असलेल्या पुस्तकांचे संदर्भ तूर्तास, readily माझ्या हाताशी उपलब्ध नाहीत. मात्र, त्यांचा ‘खून’ झाला’ असा उल्लेख नक्कीच झालेला नाहीं, हे निश्चित). आपला मुद्दा स्पष्ट आहे.
११) औरंगज़ेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह हा अतिशय सज्जन होता. त्याला हिंदू धर्माबद्दल आस्था होती. त्याने काही हिंदू ग्रंथांचे फारसीत भाषांतर केले होते अथवा करवून घेतले होते. आपण तूर्तास इथे, हिंदू, मुस्लिम असा धर्मविचार करत नाहीं आहोत; पण असे म्हणायला काहीच हरकत नाहीं की दारा तत्कालीन ‘धर्मसमभाव’ पाळत होता. दारा हा शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र होता, म्हणजे तत्कालीन प्रथेनुसार, राज्यावरही त्याचाच हक्क होता. औरंगज़ेबाने शहाजहानविरुद्ध बंड केले, तेव्हा दारा त्याच्याशी शहाजहानचा प्रतिनिधी म्हणून लढला. अशा सत्प्रवृत्त दाराला औरंगज़ेबानें मौलवींकरवी दोषी ठरविले व त्याला मारविले, अगदी ऑफिशियली. आतां तुम्ही सांगा, याला दाराचा वध म्हणायचे, हत्या म्हणायचे, खून म्हणायचे, सजा म्हणायचे की काय म्हणायचे ?
१२) येशू ख्रिस्त याच्या मृत्यूला काय म्हणायचे ? (त्याचे ‘रिसरेक्शन’ झाले की नाही, या मुद्द्याने, आपल्या चर्चेत व निष्कर्षात काही फरक पडत नाही). ध्यानात घ्या, येशूला व ख्रिश्चन धर्माला महत्व आले तें इ.स. ३५० नंतरच. येशूच्या स्वत:च्या वेळी तर, त्याला बंडखोरच मानले गेले, व तत्कालीन कायद्यानुसार त्याला क्रूसावर चढवले. आणि, त्याचवेळी, त्याच्याचबरोबर, दोन चोरांनाही क्रूसावर चढवले होते. आता सांगा, येशूला ‘क्रूसावर चढविण्या’च्या कृतीला, आपण वध म्हणायचे, हत्या म्हणायचे, शिक्षा (सजा) म्हणायचें की खून म्हणायचे ?
समारोप :
आपण हे पाहिले की ‘वध’ व ‘खून’ (तसेच , ‘हत्या’) हे अनेकांशी समानार्थी शब्द आहेत. हिंदुमहासभा, आर्. एस्. एस्. वगैरे संस्था ‘वध’ हा शब्द वापरतात, कारण त्यांना संस्कृत शब्दांबद्दल, व त्यांच्याशी संबंधित संस्कृतीबद्दल, आपुलकी वाटते, आणि तसे शब्द वापरायचा त्यांचा आग्रह असतो. उदा. ‘जामीन‘ या रूढ शब्दाऐवजी ‘प्रतिभू’ या शब्दाचा वापर. (अर्थात्, अशा वापरात अयोग्य, किंवा चुकीचा-अर्थ directly or indirectly रूढ करण्याचा हेतू , असे काही दिसत तरी नाही. असा, संस्कृत शब्दांचा वापर योग्य आहे कां, किंवा तो अतिरिक्त आहे का, अथवा तो कितपत, कुठल्या level पर्यंत, योग्य आहे, हा एका वेगळ्या चर्चेचा विषय होईल. तूर्तास आपण त्यात शिरायचे कारण नाही.)
मात्र, गांधीजींचा ‘वध’ की ‘खून’ हा शब्दांचा काथ्याकूट आवश्यक नाहीच. या विषयाला खासकरून लागलेल्या राजकीय वळणामुळे उगीचच घोळ घातला गेलेला आहे, या शब्दाच्छलाला उगीचच अवाजवी महत्व प्राप्त झाले आहे. सूज्ञांस अधिक सांगणे नलगे.
(१३ मार्च, २०१६)
- सुभाष स. नाईक .
दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५. भ्रमणध्वनी : ९८६९००२१२६.
ईमेल : vistainfin@yahoo.co.in.
Copyright © 2025 | Marathisrushti