वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
२००४ साली झालेली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक ही एक ऐतिहासिक निवडणूक ठरली. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राने मतपेटी कालबाहय ठरविली. आगामी सर्वच निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर सर्वत्र केला जाणार आहे. या यंत्रामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक जलद विश्वासार्ह होण्याबरोबरच मतदारांना मतदानासाठी लागणार्या वेळात बचत झाली आहे. मतदान प्रक्रिया अधिक सुलभ करणार्या या यंत्राबाबात माहिती …..
भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आपल्या घटनेतच तसे लिहिले आहे. प्रजासत्ताक म्हणजे सत्तेची सूत्र प्रजेच्या हाती असलेले. सोबतच आपल्या घटनेने प्रत्येक नागरिकाला समान वागणूक, समान दर्जा आणि समान अधिकार देण्याचे आश्वासन दिलेले आहे. घटनेच्या या मार्गदर्शक तत्त्वानुसार किंवा घटनेशी बांधीलकी राखूनच देशाचा कारभार चालत असतो, किमान तसे सांगितले तरी जाते.
भारताच्या विविध प्रांतात देव दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. महाराष्ट्रात विशेषतः कोकण भागात मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी आपल्या कुलदेवतेला विशेष नैवेद्य दाखविला जातो. धर्मसिंधु आणि कार्तिक मास महात्म्य या ग्रंथात देव दिवाळीच्या व्रताचे महत्व नोंदविलेले आहे.
उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते.
सा-या भूतलावर शरदाचे चांदणे बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो. सर्वाना आनंद वाटणा-या या रात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया…. कोजागरी, कौमुदी जागर, दीपदान जागर अशा विविध नावांनी ही रात्र ओळखली जाते.
गणपती ही विद्येची व सकल कलांची आराध्य देवता,गणांचा अधिपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.प्रतिवर्षी येणा-या गणेश उत्सवाची प्रतीक्षा सर्व भक्त आतुरतेने करीत असतात. गणेशाची प्रतिष्ठापना आणि त्यामागील आशय समजून घेतला तर या उत्सवाची खुमारी अधिकच वाढेल.
मृत्यू हा अटळ आहे, त्याला पर्याय नाही , ती मनुष्य जीवनाची अनिवार्यता आहे. असे असले तरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही नक्कीच सुखावह घटना नाही. जवळच्या आप्ताचा, स्नेहीजनाचा मृत्यू अनुभविताना कोणत्याही सहृदय माणसाचे मन हेलावते, शोकमग्न होते.
‘जन्माष्टमी”’ म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.
वारली चित्रकला ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची ही कला ही या जमातीची ओळख बनलेली आहे. पण ही ओळख एवढीच मर्यादित नाही. वारली समाजात होणारा विवाह संस्कार हासुद्धा त्यांच्या कलेइतकाच वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याविषयी हा लेख.
(श्राद्ध हा हिंदू धर्मशास्त्रातील एक जटील आणि गहन असा विषय आहे. या विधीचा साकल्याने विचार एका छोट्या लेखात करणे शक्य नाही. त्यामुळे प्रातिनिधीक रूपात विषयाचा परिचय करून देण्याचा हा अल्प प्रयत्न.)
हिंदू धर्म संस्कृतीमधील एक महत्वाची संकल्पना म्हणजे धार्मिक आचार. नामकरण, मुंज, विवाह अशा विधींच्या जोडीनेच हिंदू जीवनप्रणालीत श्राद्धविधीचे महत्व विशेषत्वाने आहे.
श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. श्राद्धाच्या विविध व्याख्या धर्मशास्त्रकारांनी सांगितल्या आहेत. त्यामध्ये दिवंगत पूर्वजांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी देश काळ आणि पात्रता विचारात घेता ब्राह्मणाला काही देणे याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धामध्ये दिवंगत व्यक्तीला अनुसरून पिंडदान केले जाते. ब्राह्मण व गरजू व्यक्तीना भोजन व दान दिले जाते. अशी एकूण ९६ प्रकारची विविध श्राद्धे करणे विहित मानले जाई. आता या सर्व श्राद्धविधींचे आचरण करणे काळाच्या ओघात शक्य नसले तरी व्यक्तीच्या निधनानंतर केले जाणारे श्राद्ध, वर्षश्राद्ध असे काही निवडक श्राद्धविधी आजही समाजात केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे महालय श्राद्ध-
भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि काही कौटुंबिक गणपतींचे विसर्जन होते. अनंताची पूजा काही कुटुंबांमध्ये श्रद्धेने केली जाते. प्रौष्ठपदी पौर्णिमा गणेश विसर्जनाची धामधूम संपविते आणि दुस-या दिवशी सुरु होतो पितृपक्ष. भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष म्हणजे प्रतिपदा ते अमावास्या हा काल हिंदू धर्म-परंपरेत पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सर्वसामान्यपणे शुभ कार्य करीत नाहीत, त्याविषयी बोलणी करीत नाहीत आणि खरेदीही करीत नाहीत !
महालयाचा काळ
या काळात महालय करणे न जमल्यास आश्विन अमावास्येला दिवे लावून हे श्राद्ध करावे. या श्राद्धात विश्वेदेव तसेच धुरिलोचन नावाच्या पितरांना पिंडदान केले जाते.
महालयश्राद्धाचा गौण काळ आश्विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत मानण्यात आला आहे.
( याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात विपुल चर्चा आढळते, तरी येथे केवळ निवडक संदर्भच नोंदविले आहेत. जिज्ञासूंनी याविषयी अधिक माहिती अवश्य घ्यावी. )
महालयाचे वेगळेपण- वसुधैव कुटुंबकम।
महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज/ पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात आणि त्यांची पूजा या दिवसात केली जाते म्हणून हा काल शुभ मानला जात नाही !
महालय श्राद्धात आपण आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण –पूजन पिंडरूपाने करतो.यामध्ये आपले दिवंगत आई- वडील, आजी, आजोबा , पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहिण , काका-काकू, मामा-मामी, मावशी , आत्या ,सासू-सासरे, व्याही, विहीण अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतो. आपण विविध गुरूंकडून आयुष्याभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे असे आपले गुरु आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त , आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशून आपण हे श्राध्द करतो. अनेक लोकांवर निधनानंतर कोणताही संस्कार केला जात नाही. त्यांच्याप्रतीही आपण कृतज्ञता व्यक्त करतो .आपल्या नकळत झाडे तोडली जातात, कीड-मुंगी-कीटक आपल्या हातून नकळत मारले जातात . त्यांचीही आठवण आपण यावेळी करतो.सारांश,आपल्या जवळचे असोत वा दूरचे असोत, हे विश्वचि माझे घर या न्यायाने आपण सर्वच दिवंगत लोकांचे स्मरण महालय श्राद्धात करतो. चारही दिशांना असलेल्या ज्ञात अज्ञात अशा सर्वासाठी श्रद्धेने पुष्प अर्पण करण्याचे हे दिवस. तसेच माझया कुटुंबाचा "वंशवृक्ष" आठवण्याची संधी. त्यानिमित्ताने कुटुंबाचेही संघटन !
ज्या काळात समाजात विधवा महिलांचे स्थान हे निम्न दर्जाचे होते त्या काळात पती जिवंत असताना सुवासिनी असताना मृत्यू येणे हे महिलेच्या सामाजिक आयुष्यात फार महत्वाचे होते. त्यामुळे अर्थातच सवाष्ण गेलेल्या महिलेसाठी अविधवा नवमीचा स्वतंत्र दिवस योजला गेला असावा.
जसे गणपती, गौरी यानिमित्ताने सर्व घर एकत्र येते त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने आपल्याला आपला वंशवृक्ष समजतो. त्यानिमित्ताने आपण कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती करून घेतो. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंबासाठीचे त्यांचे योगदान याबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने आपलाही आत्मविश्वास वाढतो व आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून आपल्यालाही प्रेरणा मिळत राहते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या सामाजाची मदत घेत असतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही यानिमित्ताने व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते. निसर्गातील पशु-पक्षी, झाडे यांचेही निसर्गचक्रात महत्वाचे स्थान असते. त्यांच्यामुळेही आपल्या नकळत का होईना आपण चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य जगत असतो. त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही महालयाकडे पाहता येऊ शकेल.
आधुनिक काळातही असे अनुभवास येते की या काळात सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात शक्यतो टाळले जाते. शुभकार्याची चर्चाही या काळात केली जात नाही. खरं म्हणजे आपले दिवंगत पूर्वज या काळात पृथ्वीलोकात येवून आपल्या सर्व गोष्टींचे अवलोकन करीत असतील तर आपल्या कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार का करू नये ?
भारतातील संस्कृती ही कृषी आधारित आहे. त्यामुळे शेतीची कापणी' होऊन पहिले पीक हाती आल्यावर मगच कदाचित कृषीवलाला आर्थिक स्थिरता मिळे ज्यामुळे तो काही आवर्जून खरेदी करू शकत असे. पण ज्या काळात पिके अजून शेतातच कापणीसाठी वाट पाहत उभी आहेत त्या काळात खरेदी करणे टाळणे इष्ट असावे. त्यातूनच कदाचित या काळात खरेदी करू नये असा संकेत रूढ झाला असावा.
ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्या आपल्या पूर्वजांचे आपल्या वंशजांसाठी आशीर्वाद असावेत असा सकारात्मक विचार आपण करायला हवा. श्राध्द म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण . त्यामुळे पितृपक्षात सर्व दिवंगत पूर्वजांच्या सामूहिक स्मरणाची संधी अवश्य घ्यावी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
आधुनिक वेगवान काळात महालय श्राद्ध विधीपूर्वक करणे शक्य झाले नाही तरी आपल्या कुळातील तसेच ज्ञात अज्ञात अशा दिवंगत व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना गरजूला दान देणे, समाजाच्या आणि पर्यावरणाच्या हितार्थ उपक्रमाला हातभार लावणे किंवा आपल्या शक्ती बुद्धीनुसार आणि आवडीनुसार कोणत्यातरी विधायक उपक्रमाला हातभार लावण्याची संधी श्रद्धापूर्वक अवश्य घ्यावी.
-- आर्या आशुतोष जोशी
Copyright © 2025 | Marathisrushti