वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.
‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्या साठी कुशाग्र बुध्दीला पर्याय नाही ह्या बद्दल कोणाचे दुमत असणे शक्य नाही.
आयुर्वेद हे जगातील सर्वात पुरातन असे भारतीय वैद्यक शास्त्र आहे. ह्या लहानशा लेखातून त्यातील औषधीकरणाचा मौलिक विषय नव्या स्वरुपात वाचा.
आरशात बघितलं की सर्वप्रथम आपण आपली केश रचना ठीकठाक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. केसांच्या उत्पादनाच्या जाहिराती पेपर, टी.व्ही., वेबसाईट, होर्डिंग्ज अशा कितीतरी माध्यमातून बघायला मिळतात. अमुक तेल वापरलं तर तळहातावर पण केस येतील अशा जाहिराती काही वर्षांपूर्वी पहाण्यात आल्या. थोड्याच दिवसांत त्या उत्पादनाची वारेमाप विक्री झाली पण लवकरच त्याची हवा गेली. केसांसाठी मनुष्य काय काय करु शकतो, काय काय कमाऊ शकतो आणि काय काय गमाऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणे देता येतील. अॅडव्होकेट रत्नपारखींची “शेपटा” ही कविता वाचली की लक्षात येईल की एस.एस.सी.ला बसलेल्या एकाचं आयुष्य शुभदा जोशीच्या (काल्पनिक नाव) केसांमुळे कसं उध्वस्थ झालं. तिच्या काळाभोर केसांचा शेपटा बघत अख्खा पेपर बिचार्याने कोरा ठेवला.
| “एस एस सीस मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेशपेपर पहिला, घंटा पहिली, क्षण उत्सुकतेचा, माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा
मानेला ती देऊनि झटका नकळत सवईने, लिहू लागली पेपरमधली पानावर पाने मऊ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार, तिचा तत्क्षणी येऊनि पडला माझ्या बाकावर तीन ताशी एकचित्त मी तिच्या शेपटात, एक ओळही लिहिली नाही उभ्या पेपरात शेवटचीती घंटा झाली आलो भानावरी, कळले आता अपुले जीणे गावी खेड्यावरी शेतीवरती मोटेवरतो माझी उपजीविका, शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका केसानी त्या गळा कापला अलगदजी माझा, परि बैलांचा पिळुनि शेपटा जगतो हा राजा” . . . . . . . . कवी - अॅडव्होकेट रत्नपारखी |
बायकांना टक्कल का पडत नाही?
शंभरात तीस टक्के पुरुषांना टक्कल पडलेले दिसते. पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण खूपच कमी आहे. केस गळतात अशी तक्रार बायका करतात खर्या पण केस जसे गळतात तसे नवीनही येतात. म्हणून पूर्णपणे कॅरम बोर्ड झालेल्या स्त्रिया सहसा दिसत नाहीत. पित्त वाढल्यामुळे केस पातळ होणे, तांबूस रंगाचे होणे, अकाली टक्कल पडणे ही लक्षणे होतात. पित्त हे रक्तामध्ये निवास करते. मासिक पाळीच्या माध्यमाने दर महिन्यात थोडे रक्त शरिरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीरातील पित्त दोष चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्याची निसर्गाची ही किमया स्त्रियांमध्ये आपोआप घडत राहते. ह्या उलट पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन नावाचे हॉर्मोन असते. हे हॉर्मोन उष्ण जातीचे असल्यामुळे शरीरात पित्त वाढवण्याचे कार्य करते. ह्या टेस्टोस्टिरॉन चे प्रमाण वाढले तर केस अधिकच गळतात. टेस्टोस्टिरॉन अधिक असल्यामुळे पुरुषांमध्ये कामशक्ती वाढते. म्हणूनच असे बघण्यात येते की टक्कल पडलेले पुरुष तुलनेने कामशक्ती मध्ये जरा अधिक सक्षम असतात. स्त्रियांमध्ये पण हे हॉर्मोन असते पण त्याचे प्रमाण अतिशय अल्प असते.
केसांचे विकार
केस गळणे, कोंडा होणे अणि अकाली पांढरे होणे हे मुख्यत: तीन आजार केसांच्या बाबतीत पहायला मिळतात. वास्तविक ह्यांना आजार म्हणावं का इथपासुनच सुरुवात करुया. डोक्यावरचे जवळपास १० टक्के केस हे सुप्तावस्थेत असतात. ह्याला “रेस्टिंग फेज” असे म्हणतात ह्या रेस्टिंग फेजची जागा सतत बदलत असते. साधारण सहा महिने हे केस रेस्टिंग फेजमध्ये असतात. ह्या काळात त्या केसांना पोषण मिळत नाही आणि पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे थोड्याशा ताणामुळे ते केस गळून पडतात. मात्र इतर ९० टक्के भागात पोषण सुरु असते म्हणून हे केस वाढतातही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात केस गळणे हे नैसर्गिक आहे. त्याला आजार म्हणणे योग्य नाही. हे प्रमाण जर खूप जास्त असेल तर मात्र आजार समजला पाहिजे आणि त्याचे कारण शोधून मग इलाज केला पाहिजे.
दुसरी तक्रार म्हणजे कोंडा होणे, कोंडा हा मुळात केसांचा आजार नसून केसांच्या खालची त्वचा (Scalp) ह्या भागाचा आजार आहे. फंगस नामक जिवाणूंमुळे हा त्वचेचा आजार होतो. अकाली केस पांढरे होणे हा आजार म्हणावा का? हा पण एक समजून घेण्यासारखा विषय आहे. केसांचा मूळ रंग पांढराच असतो. मिलेनिन नावाचे एक काळे रंजक द्रव्य केसाला काळा रंग देते. वय वाढत गेल्यावर हे मिलेनिन निर्माण करण्याची क्षमता कमी होत जाते आणि म्हणून केसांचा रंग पांढरा होऊ लागतो.
केसांच्या समस्या – प्रमुख कारणे
वर बघितल्याप्रमाणे ‘केस गळणे, कोंडा होणे आणि अकाली पांढरे होणे’ हे केसांचे तीन प्रमुख विकार आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून केस हा आपल्या हाडांचा मळ आहे. हाडे चांगली सशक्त व सुदृढ असतील तर केस चांगले राहतात. हाडांचा काही आजार झाला किंवा अपघातामुळे फ्रॅक्चर वगैरे झाल्यास केस भरपूर गळू लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. हाडांच्या आजारावर उपचार करुन ठीक झाल्यानंतर केसांची वाढ पूर्ववत सुरु होते. शरीरात हाडांमध्ये वात दोष प्रामुख्याने असतो आणि वातासाठी सर्वात श्रेष्ठ औषध म्हणजे तेल. अशा प्रकारे केसांचा आणि तेलाचा अप्रत्यक्ष संबंध आहे. केसांना नियमित तेल लावणार्यांचे पण केस गळून टक्कल पडते तर काहीजण आजिबात तेल लावत नाहीत तरीपण केस गळत नाहीत. याचे कारण म्हणजे हाडांचे आरोग्य. शरीरात एक दोष वाढला की तो दुसर्या दोषाला कमी करतो. केसांच्या बाबतीतही हा नियम लागू पडतो.
केशस्वास्थ्याचा विचार करतांना आहारातील काही घटकांचा परिणाम होतो का हे समजणे पण आवश्यक आहे. शरीरातील हाडा-मासापासून तर नख-केसांपर्यंत सर्व गोष्टी आपल्या आहारातूनच तयार होत असतात. त्यामध्ये काही कमी जास्त झाले तर शरीरातील धातूंमध्ये त्याचे परिणाम आजाराच्या स्वरुपात दिसू लागतात. केसांना पोषण मिळते आपल्या आहारतूनच. आहारात काही घटक कमी-अधिक होत असतील तर केसांच्या गळण्याला निमित्त होऊ शकते. केसांच्या बाबतीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीठ. मीठ म्हणजे केसांचा एक नंबरचा शत्रू. ज्यांच्या खाण्यात मीठ थोडे वरचढ असते त्यांचे केस तुलनेने कमजोर असतात व गळू लागतात. म्हणून केसांची खरोखर काळजी घ्यायची असेल तर किंचित वरचढ मिठापेक्षा थोडे अळणी अन्न घेणे आवश्यक आहे. लोणची, पापड ह्यांसारख्या पदार्थांमध्ये मुळातच मीठ भरपूर असते. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो टाळावेतच. आहारात मीठ जास्त घेण्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे वाढते.
केसांच्या सुयोग्य पोषणासाठी आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांची व कॅल्शियमची नितांत आवश्यकता आहे. दूध, मांसाहार, द्विदल धान्य, सोयाबीन अशा पदार्थांमध्ये सकस प्रथिने असतात. तीळ, पालेभाज्या, केळी, संत्री, बदाम, कोबी, फ्लॉवर सारख्या अनेक गोष्टींमध्ये प्रचुर प्रमाणात कॅल्शियम असते. संपूर्णपणे शाकाहारी असणाऱ्यांनी ह्यांचे सेवन आहारात नियमितपणे केले पाहिजे.
अनुवांशिकता हे केसांच्या विकारांचे एक प्रमुख कारण आहे. केस हा पित्रुज भाव असल्याने वडिलांच्या गुणसूत्रानुसार ह्याचे स्वास्थ्य असते. अनुवंशिकतेचा विचार केला तर वडिलांचे केस ज्या विशिष्ट वयात गळू लागले त्याच वयात मुलांमध्येही केस गळती सुरु होऊ शकते.
मानसिक ताण, चिंता, क्रोध हे केसांच्या समस्यांचे महत्वाचे कारण आहे. अशा मानसिक असंतुलनामुळे कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन ह्यांची वाढ होऊन केसांना धोका संभवतो. आयुर्वेदात वर्णन केलेल्या काही वनस्पतींच्या सेवनाने ह्या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येते.
प्रदूषण हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा. पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिनेशन करण्याची पद्धत आहे. ह्या पद्धतीत क्लोरिनचे प्रमाण अधिक झाले व केस धुण्यासाठी असे पाणी वापरले तर केस गळती झपाट्याने होऊ लागते. ह्यावर सोपा उपाय म्हणजे स्नानासाठी वापरावयाचे पाणी २ – ३ तास बादलीत काढून ठेवावे. ह्याने त्यातील अतिरिक्त क्लोरीन उडून जाते व केसांना होणारी इजा टाळता येते. प्रदूषित हवा, त्यातील कमी झालेले प्राणवायूचे प्रमाण व वाढलेले इतर घातक वायु हे असंतुलन रोखणे जवळजवळ अशक्यच आहे. निसर्ग संगोपन, वृक्षारोपण व संवर्धन हे ध्येय प्रत्येकानेच पाळणे नितांत गरजेचे आहे.
केसांची निगा – समज / गैरसमज
केसांच्या चिकित्सेबद्दल विचार करताना शांपू आणि तेल ह्याशिवाय काही उपचार असू शकतो असे सर्वसामान्यांच्या मनातही येत नाही. ह्याचे मुख्य कारण आहे जाहिरातींचा भडिमार. ह्या उत्पादनांच्या इतक्या जाहिराती रोज बघायला मिळतात की नेमकं काय योग्य आहे हेच कळेनासं होतं.
“कोणता शांपू चांगला?” अशी विचारणा बरेच लोक करतात. मुळात शांपूचा उपयोग काय हे लक्षात घेतले पाहिजे. शांपू हा फक्त केस धुण्यासाठी वापरला जाणारा फेसाळणारा साबणासारखा (इमल्सिफायर) पदार्थ आहे. केसांवरील तेलकट अंश ह्यात विरघळतो आणि पाण्याने धुवून टाकला जातो. शांपूचा संपर्क केसांशी फक्त काही सेकंद असतो. तेवढ्या थोड्या वेळात त्याचा कोंड्याशी काय म्हणून संपर्क होणार? कोंडा हा एक त्वचा रोग आहे आणि त्वचारोगावर इलाज करायचा असेल तर जे काही औषध त्वचेवर लावाल ते निदान तासभर तरी त्या ठिकाणच्या त्वचेवर राहिले पाहिजे. शांपूचा परिणाम फक्त कोंडा वाहून नेण्यासाठी होऊ शकतो. कोंडा निर्माण होण्याची क्रिया त्याबे थांबू शकत नाही.
हर्बल शांपू प्रकाराचे प्रस्थ सध्या फार वाढलेले दिसते. ह्या हर्बल शांपूमध्ये वनस्पतींच्या अर्काचा फक्त थोडासाच अंश असतो, बाकी सर्व रसायनेच असतात. रासायनिक घटक असल्यामुळे ते वाईट असे म्हणणे नक्कीच चुकीचे ठरेल. परंतु हर्बल म्हणण्यासारखे त्यात वास्तविक काहीच नसते. केसांना मुलायम (हेअर सॉफ्टनिंग) करणारे, चकाकी (ग्लॉस) देणारे शांपूही आजकाल मिळतात. ह्या शांपुंमध्ये मुख्यतः रासायनिक स्निग्ध पदार्थ असतात, जे केसांना मुलायम करतात, गुंतागुंत होऊ देत नाहीत व चकाकी देतात. तरीदेखील हा कृत्रिमपणा केसांच्या स्वास्थ्यासाठी कितपत सुरक्षित आहे हा वादाचा मुद्दा आहे. शांपूचा दर्जा ठरतो त्याच्या pH वरून. शांपू हा अॅसिडिक किंवा अल्कलाईन नसावा, तो न्युट्रल असावा हे सर्वात महत्वाचे.
केसांसाठी तेल आवश्यक आहे खरे, पण ते केवळ केसांना वर वर लावून उपयोगी नाही, तर ते मुळाशी शोषले जाणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार तेल नाकात टाकावे म्हणजे त्याचा परिणाम केसांच्या मुळांपर्यंत होतो. आयुर्वेदाच्या तत्वानुसार नाक हे शिरोभागाचे द्वार आहे. त्यातील यंत्रणा व श्लेष्मल स्तरांमधून द्रव्याचे शोषण होते.
पुढचा महत्वाचा भाग आहे औषध पोटातून घेण्याचा. पोटात घेतलेल्या औषधी द्रव्यातील कार्यकारी घटक रक्ताद्वारे केसांच्या मुळांमार्फत केश संरक्षण व वर्धन करून अस्थि धातु पोषणाचेही कार्य करतात. झाडांच्या पानांवर पाणी किंवा खत शिंपडून उपयोग नाही तर ते पोषक घटक झाडाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. केसांच्या बाबतीतही हाच नियम लागू पडतो. आयुर्वेदात काही विशिष्ट वनस्पती व औषधी द्रव्ये ह्यासाठी वर्णित आहेत. ह्यांच्या सेवनाने अगदी ५ - ६ दिवसांतच फरक दिसू लागतो असे अनुभव प्राप्त झाले. साधारण दोन ते तीन महिन्यांत केसांची लक्षणीय वाढ दिसून येते. ही औषधे ३ महिने सातत्याने घेतल्यावर १५ ते २० दिवस बंद करुन पुन्हा चालू करावीत. एकच एक औषध सतत चालू ठेवण्यामुळे शरीर प्रतिसाद देणे बंद करते. म्हणून ही गॅप ठेवावी.
केशप्रभा – केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी प्रभावी गोळ्या
गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.
केसांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी शारीरिक, मानसिक, आहार, विहार व औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून अक्षय उद्योग समूहाने ‘केशप्रभा’ नावाचे एक अभिनव उत्पादन वटी स्वरुपात सादर केले आहे. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता देण्याचा प्रयत्नही केला आहे. केसांच्या स्वास्थ्यासाठी केशप्रभा गोळ्यांमधील प्रत्येक औषधी कशी कार्य करते ते आता पाहूया.
प्रत्येक विलेपित गोळीतील घटक द्रव्य व प्रमाण
कृष्णसारिवा, माका प्रत्येकी ८० मिलिग्रॅम, ब्राह्मी, गुडुची प्रत्येकी ७० मिलिग्रॅम, गोखरू, शतावरी, वटजटा प्रत्येकी ६० मिलिग्रॅम, सुवर्णमाक्षिक भस्म, मौक्तिक पिष्टी प्रत्येकी ३० मिलिग्रॅम; भावना वटजटा क्वाथ.
कृष्णसारिवा : शारीरिक पेशींच्या जडणघडण प्रक्रियेत काही विषारी घटक सतत उत्पन्न होत असतात. त्यांना काबूत ठेवण्यासाठी शरीर आपणहून प्रयत्नशील असते. तरीदेखील सदोष आहार, उग्र रासायनिक घटकांचा संपर्क, चुकीची जीवनशैली अशा कारणांमुळे चयापचयातून अतिरिक्त विषारी घटक निर्माण होतात. ह्यांना पेशीविघातक (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. ह्या फ्री रॅडिकल्समुळे केसांच्या स्वास्थ्यावर घातक परिणाम होतात, केस झपाट्याने गळू लागतात, पांढरे होतात. कृष्णसारिवा वनस्पतीमध्ये फिनाइलप्रोपेनॉइड नामक पेशीरक्षक घटक असतो. हा घटक फ्री रॅडिकल्सना उत्तमप्रकारे काबूत ठेवून केस गळणे थांबवतो.
माका : केसांसाठी निर्मित उत्पादनात ही वनस्पती आवर्जून असतेच. माक्याचे केशवर्धक गुण विविध संशोधातून सिद्ध झाले आहेत. ह्याचा उपयोग बाह्य आणि अभ्यंतर अशा दोन्ही प्रकारे होतो. दोन्ही प्रकारात ह्यातील घटक रक्तात शोषले जाऊन केशवर्धनाचे अपेक्षित कार्य करतात.
गुडुची : केसांच्या स्वास्थ्यासाठी गुडुची विविध प्रकारे उपयुक्त ठरते. रसायन असल्यामुळे शरीराच्या सर्वच धातूंना बळ देते. यकृताचे कार्य उत्तम राखण्यामुळे बाकीच्या अन्तःस्रावी ग्रंथींवर नियंत्रण राखून हॉर्मोन्सचे संतुलन उत्तम राहते. हॉर्मोन्सचा संबंध केसांच्या स्वास्थ्यासाठी सर्वमान्य आहेच. सीबम हा त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक असलेला स्निग्ध पदार्थ आहे. केसांचे पोषणही त्वचेच्या माध्यमातूनच होत असल्याने गुडुचीचे गुण केसांच्या स्वास्थ्यासाठी उपयोगी ठरतात. गुडुची ही अस्थि पोषणासाठी एक उत्तम वनस्पती आहे. अस्थिधातूचा केसांशी असलेला संबंध लक्षात घेता गुडुचीचा उपयोग अस्थिपोषणासाठी व परिणामी केसांच्या स्वास्थ्यासाठी सिद्ध होतो. फंगसच्या नियंत्रणासाठी प्रभावी असल्याने केसातील कोंड्यासाठी देखील ह्याचा विशेष उपयोग होतो.
गोखरु : केसांच्या व त्वचेच्या काळ्या रंगासाठी कारणीभूत असणारे रंजकद्रव्य म्हणजे मेलॅनिन. गोखरु सेवनाने मेलॅनिन स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (MSH) प्रेरित होते. शिवाय त्याने मेलॅनिन निर्मिती, त्वचेमध्ये पसरण्याची क्रिया व सुप्त मिलॅनोसाईट कोशिकांवर उत्तेजक क्रिया होते. केसांच्या कृष्ण वर्णासाठी ह्याच्या सेवनाने उत्तम लाभ होतो.
शतावरी : इस्ट्रोजिन नामक हॉर्मोनचे संतुलन बिघडले तर केस गळण्याचे प्रमाण वाढते. मासिक रजःस्राव नियमित होणे हे इस्ट्रोजिनचे संतुलन योग्य असल्याचे निदर्शक आहे. ज्या स्त्रियांमध्ये रजःस्राव अनियमित असतो त्यांना केसांचे विकार अधिक संभवतात. शतावरीमध्ये फायटो इस्ट्रोजिन्स असल्याने रजःस्रावाचे संतुलन राखले जाते व केस गळणे आटोक्यात राहते. पुरुषांमध्ये अल्प प्रमाणात असलेले इस्ट्रोजिनचे प्रमाण वाढले तर टेस्टोस्टेरॉन घटू शकते. शतावरीमुळे इस्ट्रोजिन्सचे संतुलन चोख राहते व पुरुष असो वा स्त्रिया, दोघांच्याही केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते.
वटजटा : वडाच्या पारंब्यांचा उपयोग केसाच्या वाढीसाठी होतो. प्राप्त निष्कर्षानुसार केसांची जाडी ३१ % वाढते, १५ % नवीन केसांची निर्मिती होते तर संख्या सुमारे ४६ % वाढते.
सुवर्णमाक्षिक भस्म : रस – रक्त – मांस – मेद – अस्थि – मज्जा व शुक्र असे सात धातु शरीराच्या धारणासाठी निसर्गाने निर्माण केले आहेत. सुयोग्य पोषण मिळाले तर सर्व धातु, उपधातु आणि मल सुदृढ राहतात. रक्त धातुमधील लोहाचे प्रमाण उत्तम राखण्याचे कार्य सुवर्णमाक्षिक भस्मामुळे होते. अर्थात पुढे त्यापासून निर्माण होणारे धातु-उपधातु सुस्थितीत राहून केस झडण्याची शक्यता कमी होते.
मौक्तिक पिष्टी : अस्थि धातूचे परिपूर्ण पोषण करणारे सागराच्या कुशीतून निर्माण होणारे हे द्रव्य आहे. मौक्तिक म्हणजे मोती. ह्यामध्ये ८२ ते ८६ % एवढ्या मोठ्या मात्रेत कॅल्शियम आढळते. मानवी शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी १० % कॅल्शियम हे रक्त संवाहनात असते तर ९० % अस्थिधातुमध्ये असते. म्हणून अस्थि पोषणासाठी कॅल्शियमची गरज सर्वात अधिक असते. निसर्गनिर्मित मोत्यांमध्ये असलेले कॅल्शियम उत्तम दर्जाचे असून मानवी शरीरात सहज शोषले जाते. अस्थींच्या पोषणाने अर्थातच केसांचे स्वास्थ्य उत्तम राहून हाडांनाही बळकटी मिळते.
ब्राह्मी : मानसिक ताण, चिंता, भय अशा कारणांमुळे केसांचे विकार संभवतात. ह्या गोष्टींमुळे कॉर्टिकोस्टिरॉन आणि नॉरअॅड्रिनलीन नावाची हॉर्मोन्स वाढून केसांची गळती सुरु होते. ब्राह्मी सेवनाने कॉर्टिकोस्टिरॉन व नॉरअॅड्रिनलीन नियंत्रणात राहून केसांची गळती रोकण्यास हातभार लागतो. केस गळण्याच्या कारणांमध्ये थायरॉइड मधील T4 जातीच्या स्रावांची कमतरता हेदेखील महत्वाचे कारण आहे. ब्राह्मी सेवनाने ह्या T4 स्रावांची हळुवार वाढ होते व केसांचे स्वास्थ्य उत्तम राखले जाते. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे स्राव जरुरीपेक्षा अधिक वाढत नाहीत, फक्त योग्य मात्रेत वाढ होईपर्यंतच ह्याची क्रिया घडते.
केशप्रभा सेवन करण्याची पद्धत
२ – २ गोळ्या दिवसातून दोन वेळा, सकाळी रिकाम्यापोटी व रात्री झोपतांना.
वैद्य संतोष श्रीनिवास जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
फोन - +917208777773
Email: drjalukar@akshaypharma.com
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.
आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.
तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला - दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.
पथ्यपाणी विचार –
ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.
सोपा घरगुती उपचार –
हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.
कानाचे यंत्र –
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे. कान यंत्र घेण्यापूर्वी हा कान मंत्र समजून घेतला तर इंद्रियाची जपणूक होईल.
डॉ. संतोष जळूकर
संचालक, अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
दूरध्वनी - +917208777773
ईमेल – drjalukar@akshaypharma.com
अपानो अपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः l . . . . अ. हृ. सूत्रस्थान १२/९
मोठे आतडे (पक्वाशय) हे अपान वायूचे मुख्य स्थान आहे. हा अपान वायु उदराचा खालचा भाग, मूत्राशय (बस्ति) आणि प्रजनन यंत्रणेच्या भागात राहतो. शुक्रनिष्क्रमण, मासिक रजःस्राव, मल वेग प्रवर्तन, मूत्र वेग प्रवर्तन आणि प्रजनन ह्यांचे कार्य सुरळीत ठेवणे हे अपान वायूचे कार्य आहे.
कोणतेही काम करण्यापूर्वी त्या कामासाठी साठी निवडलेली जागा निर्मळ असावी ह्याबाबत दुमत असणे शक्य नाही. पूजा असो, स्वयंपाक असो वा दुसरे कोणतेही शुभकार्य असो स्वच्छतेला पर्यायच नाही. दिवसाची सुरुवातही मलमूत्र विसर्जन आणि स्नानाने केली जाते. शरीराची स्वच्छता जशी आपण बाहेरून करतो तशीच आतूनही करण्याची गरज असते. पूर्वी घरातील वडील मंडळी सर्व लहानामोठ्यांना आठवड्यातून एकदा ‘एरंडेल तेल’ पिण्याची सक्ती करीत असत. शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी ही प्रथा चांगली होती परंतु काळाच्या ओघात लोकांना ह्याचा विसर पडला. मात्र अशी स्वच्छता गर्भावस्थेत करणे योग्य नाही व शक्य नाही म्हणून काही निराळ्या प्रकाराने स्वच्छता करून मगच गर्भधारणेचा विचार करावा. आयुर्वेदात ह्यासाठी पंचकर्म करून देहशुद्धी करण्याचे वर्णन आहे. वमन, विरेचन, बस्ति, नस्य आणि रक्तमोक्षण अशा ५ देहशुद्धीकर क्रियांना एकत्रिपणे ‘पंचकर्म’ म्हणतात. गर्भाधानाचा संकल्प केल्यावर ह्या ५ पैकी किमान बस्ति चिकित्सा तरी स्त्री-पुरुषांनी नक्कीच करून घेतली पाहिजे.
बस्ति म्हणजे काय –
साध्या शब्दात बस्ति म्हणजे एनिमा. शौच मार्गाने तेल आणि काढे वापरून मोठ्या आतड्याद्वारे करण्याची ही एक चिकित्सा पद्धती आहे. इसवी सन पूर्व १५०० वर्ष इजिप्तच्या वैद्यकीय चिकित्सेत कोलोन लॅव्हेज म्हणजे आतड्यांची स्वच्छता करण्याचे उपाय ताडपत्रांवर लिखित आहे. ह्यामध्ये फक्त पाण्याचा वापर केला जात असे. आयुर्वेद शास्त्र त्याहीपेक्षा पुरातन आहे आणि त्यात बस्ति चिकित्सेचा उल्लेख पंचकर्म विषयात आढळतो. त्यात तेल, तूप, मध, काढे, गोमूत्र अशी अनेक प्रकारची द्रव्ये वापरली जातात.
आयुर्वेदाने शरीराचे ढोबळ मानाने तीन हिस्से केले आहेत. डोक्यापासून हृदयापर्यंत कफाचा, हृदयापासून बेंबी (नाभी) पर्यंत पित्ताचा आणि बेंबीच्या खालचा वाताचा. गर्भाचे वास्तव्य शरीराच्या खालच्या भागात (वाताच्या) असल्याने तेथे स्वच्छता आणि स्निग्धता असणे गर्भवाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.
आयुर्वेदाने वाताच्या चिकित्सेत बस्ति चिकित्सेचे महत्व श्लोकरूपाने दिले आहे.
तस्यातिंवृद्धस्य शमाय नान्यद्वस्तेर्विना भेषजमस्ति किञ्चित् l
तस्माश्चिकित्सार्द्ध इति प्रदिष्टः कृत्स्ना चिकित्सा अपि च बस्तिरेकैः ll अ. हृ. सूत्रस्थान १९/८७
अतिप्रमाणात वाढलेल्या वाताला नियंत्रणात ठेवण्यासाठी बस्ति पेक्षा दुसरी कोणतीही चिकित्सा श्रेष्ठ नाही, अर्थात बस्ति हीच सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे.
स्त्री व पुरुषाने गर्भधारणेपूर्वी ही चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना बस्ति चिकित्सा केल्याशिवाय गर्भधारणा होऊ देणे म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता लांबच्या प्रवासाला जाण्यासारखे आहे.
पुरुषांमध्ये बस्तिचे महत्व -
पुरूषबीज (शुक्र) निर्मिती वृषणात होते. त्याठिकाणी तयार झालेले शुक्र उदराच्या खालच्या भागात असलेल्या इंगॉयनल कॅनलच्या मार्गे शिस्नातून बाहेर पडते. ह्या कॅनलवर अख्ख्या उदराचा दाब पडतो. त्यामुळे उदरातील रचना जेवढ्या हलक्याफुलक्या असतील तेवढे ह्याचे वहन कार्य सुलभ होते. बरेचदा शुक्र तपासणी केल्यावर शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येते. अशावेळी फक्त बस्ति चिकित्सा करून पुन्हा तपासणी केल्यास ही संख्या वाढल्याचे दिसते. बस्तिमुळे आतड्यातील मळाचे खडे, साठलेला वायु बाहेर पडून जातो आणि इंगॉयनल कॅनलवरचा दाब हटतो. नळाला रबरी पाईप लावून नाल सोडला पण पाईपवर कोणी पाय ठेऊन उभा राहिला तर पाईपमधून पाणी बाहेर पडणार नाही व पाय हटवला की ताबडतोब पाणी येऊ लागते तसाच हा प्रकार आहे. वैद्यांनी बस्ति सुचवल्या बरोबर रुग्ण म्हणतात “आम्हाला दररोज शौचाला साफ होते, मग ही भानगड कशाला?” त्याचे उत्तर – “घरी रोज दैनंदिन साफसफाई आपण करतोच तरीही सणासुदीच्या वेळी कपाटे, पलंग किंवा इतर फर्निचर बाजूला केल्यावर लक्षात येते की त्यामागे किती मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. शरीरातही असाच कचरा साठतो आणि त्याचा दाब इंगॉयनल कॅनलवर पडून शुक्रवहनात अडथळा होतो. शिवाय हा दाब शुक्रजनन यंत्रणेला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांवरही पडतो. त्यामुळे त्या भागांना प्राणवायूची कमतरता होते. परिणामी त्यांचे शुक्रजननाचे कार्य खालावते. झोपेत हातावर उशीचा किंवा शरीराच्या इतर भागाचा दाब पडल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बधिरता येते व त्याची हालचाल जवळजवळ बंद पडण्याची वेळ येते. दाब नाहीसा झाल्यावर परत रक्तपुरवठा सुरळीत होऊन त्याचे कार्य पूर्ववत सुरु होते. तसाच हा प्रकार आहे. बस्ति द्रव्यांमध्ये तेल, तूप, वनस्पतींचे काढे इत्यादींचा वापर धातुपोषणासाठी होतो आणि संपूर्ण प्रजनन यंत्रणेचे उत्तम प्रकारे सर्व्हिसिंग होते.
स्त्रियांमध्ये बस्तिचे महत्व -
स्त्री शरीरामध्ये बस्तिचे कार्य अधिक व्यापक स्वरूपाचे असते कारण गर्भाच्या संपूर्ण वाढीची जबाबदारी तिच्या स्वास्थ्यावरच अवलंबून असते. पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणेच्या सर्व्हिसिंग साठी जसा बस्तिचा उपयोग होतो तंतोतंत तसाच उपयोग स्त्री शरीरातही होतो. बीजकोष, बीजवाहिन्या, गर्भाशय ह्या भागांवरील दाब आणि त्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरील दाब हटतो. परिणामी त्यांचे कार्य निर्विघ्नपणे सुरु होते. गर्भधारणा झाल्यावर गर्भाशयाचा आकार हळूहळू वाढू लागतो. बाजूचा दाब हटल्यामुळे गर्भाशयाचा विस्तार होण्यास पुरेशी जागा उपलब्ध होते. अशी जागा उपलब्ध न झाल्यास गर्भाची वाढ होण्यात बाधा येऊ शकते. गर्भाधानापूर्वी ही चिकित्सा केल्याने गर्भवाढीमध्ये अडथळा येत नाही.
गर्भधारणेनंतर -
गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यापर्यंत पंचकर्मातील कोणताही उपक्रम करू नये. गर्भधारणेपूर्वी केलल्या देहशुद्धीचा सुपरिणाम आठव्या महिन्यापर्यंत टिकून राहतो. शास्त्रादेशानुसार आहार-विहाराकडे लक्ष केंद्रित करावे जेणेकरून गर्भपोषण योग्यप्रकारे होत राहील.
आठव्या महिन्यात बस्ति महत्व -
आठव्या महिन्यापासून गर्भाचे आकारमान जास्त वाढते म्हणून आयुर्वेदात आठव्या महिन्यात पुन्हा खालील औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले बस्ति देण्यास सुचविले आहे.
शुष्कमूलककोलाम्लकषायेण प्रशस्यते । शताह्वाकल्कितो वस्तिः सतैलघृतसैन्धवः । . . . . अ.हृ. शारीर १/६५
अष्टमे बदरोदकेन बलातिबलाशतपुष्पापललपयोदधिमस्तुतैललवणमदनफलमधुघृतमिश्रेणास्थापयेत् पुराणपुरीषशुद्ध्यर्थमनुलोमनार्थं च वायोः, ततः पयोमधुरकषायसिद्धेन तैलेनानुवासयेत्, अनुलोमे हि वायौ सुखं प्रसूयते निरुपद्रवा च भवति, अत ऊर्ध्वं स्निग्धाभिर्यवागूभिर्जाङ्गलरसैश्चोपक्रमेदाप्रसवकालात्; एवमुपक्रान्ता स्निग्धा बलवती सुखमनुपद्रवा प्रसूयते | . . . . संदर्भ: सुश्रुत संहिता, शारीर १०/४
आठव्या महिन्यात ओज अस्थिर असते. अशा वेळी गर्भस्थैर्यासाठी विशिष्ट द्रव्यांनी सिद्ध असा निरूह बस्ति प्रयोग ग्रंथात नमूद आहे. अष्टांगहृदयकारांनी ह्यामध्ये शुष्क मुळा, आंबट बोरे, बडीशेप, तिळ तेल, तूप व सैंधव ह्या द्रव्यांचा अंतर्भाव केला आहे. सुश्रुत संहितेत बोरे, बला, अतिबला, बडीशेप, मांसरस, दुध, दह्याची निवळ, तेल, मीठ, गेळफळ, मध व तूप असा पाठ सांगितला आहे. निरुह बस्ति मुळे आतडी स्वच्छ होतात, त्यानंतर "सुप्रसव पिचु तेलाचा" अनुवासन बस्तिही घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे प्रसुती अतिशय सहज व सुलभ होते. ह्या औषधी द्रव्यांचा नेमका लाभ कसा होतो हे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे. सूज्ञ आणि जाणकार मंडळींनी “अप्तोपदेश” समजून ह्या चिकित्सांचा अनुभव घ्यावा. अनेक वैद्यक व्यावसायिकांनी ह्या बस्तिचा प्रयोग आपल्या रुग्णांवर करून त्यापासून होणारे लाभ प्रत्यक्ष पाहिले आहेत. आयुर्वेदीय औषधे आणि चिकित्साक्रम निर्धोक असतात असे सर्वमान्य असले तरीही वैद्यांच्या सल्ल्याशिवाय केवळ वाचून किंवा ऐकून बस्तिप्रयोग करणे योग्य नाही हे कायम लक्षात ठेवावे.
-- वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com
खाद्य तेले
आहारात नियमित वापरासाठी कोणते तेल घ्यावे असा आजकाल सगळ्यांच्याच मनात संभ्रम असतो. मोठमोठ्या कंपन्या आकर्षक पॅकिंग करून बेसुमार जाहिराती करतात. त्यामुळे हा संभ्रम दिवसेंदिवस आणखीनच वाढत जात आहे. काही सुशिक्षित कुटुंबांमध्ये तर तेल म्हणजे जणू विषच अशी धारणा झालेली आढळते. तेलाने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हार्ट अटॅक येणारच अशी भीती मनात कुठेतरी बसलेली मंडळी आहेत. ह्या विषयावर प्रकाश टाकणार आहेच, परंतु त्यापूर्वी एका ओळीत सांगायचे तर “अति सर्वत्र वर्जयेत” हे वाक्य कायम ध्यानात ठेवावे. स्निग्धपदार्थ दोन प्रकारे आहारातून सेवन केली जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे तूप तेल यांसारखे पदार्थ आणि अप्रत्यक्ष म्हणजे आहारातील इतर पदार्थांमधून जाणारा स्निग्धांश, जसे शेंगदाणे, चिक्की, लाडू इ.
ही भीती कोठून आली?
स्निग्ध पदार्थ हृदयाला घातक आहेत ही भीती पश्चिमी देशांकडून आपल्याकडे आली. ज्यांच्या आहारात फक्त आणि फक्त मांसाहारच असतो त्यांना ही भीती असणे साहजिक आहे. मांसाहारातून (रेड मीट) अप्रत्यक्षपणे अवाजवी प्रमाणात घातक स्निग्धांश शरीरात जातो आणि त्यामुळे अशांना “तेल – तूप खाऊ नका” हे आवर्जून सांगणे जरुरीचे आहे. शाकाहारी लोकांच्या आहारात फोडणीच्या स्वरूपात आणि अप्रत्यक्ष स्वरूपात स्निग्धांश सेवन केला जातो. त्यामुळे शाकाहारींनाही ही भीती बाळगायला हवी. प्रथिनांमध्ये आणि पिष्टमय पदार्थांमध्ये प्रत्येक ग्रॅममध्ये ४ तर स्निग्ध पदार्थांमध्ये ९ उष्मांक (कॅलरीज) असतात. म्हणून जास्त स्निग्ध पदार्थ सेवन करणाऱ्यांना व्यायामाच्या माध्यमातून त्या बर्न करणे अधिक जरुरीचे असते. तेल तूप पचायला तुलनेने अधिक जड असतात आणि शरीरातील मेदाशी ह्याचे साधर्म्य असते म्हणून ह्याने चरबी वाढते. प्रौढ पुरुषांना दर दिवशी सुमरे २५ ते ४० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते तर स्त्रियांना २० ते ३० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते.
आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा आणि मज्जा असे ४ प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात. ह्यापैकी गुणधर्मांच्या दृष्टीने घृत हे सर्वोत्तम, तेल हे त्यापेक्षा कमी, वसा त्याहून कमी आणि मज्जा सर्वात कनिष्ठ असल्याचे वर्णन आहे. ह्या ४ स्निग्ध पदार्थांपैकी तेल संपूर्णपणे वनस्पतीजन्य असून बाकीचे प्राणिज स्नेह आहेत. घृत (तूप) हे प्राण्यांच्या दुधातील स्निग्धांश वेगळा काढून तयार केले जाते आणि वसा आणि मज्जा प्रत्यक्ष प्राण्यांच्या शरीरातून काढली जाते. ह्यात ट्रान्स फॅट्स, धार्मिक विचारांच्या दृष्टीने ह्याचा वापर आपल्याकडे जास्त होत नाही. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही वसा आणि मज्जा खूप जड आहेत. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्यपदार्थाची चव सुधारते. भाजलेला पापड आणि तळलेला पापड, साधे वरण आणि फोडणीचे वरण किंवा साधी भाजलेली पोळी आणि तूप लावलेली पोळी अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.
आधुनिक विज्ञान शाखेत स्निग्ध पदार्थांवर बरेच संशोधन झाले आहे. स्निग्ध पदार्थांचे विश्लेषण करून त्यातील सूक्ष्म घटकांचा अभ्यास आज आपल्याला उपलब्ध आहे. विविध खाद्य तेलांविषयी विचार करतांना पुफा, मुफा, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड असे अनेक शब्द आपल्या वाचण्यात आले असतील. त्याविषयी नेमकी व थोडक्यात माहीती आपल्याला असणे जरुरीचे आहे.
वनस्पतींमधून निर्माण केल्या जाणाऱ्या तेलांना टिकाऊपणा विशेष नसतो. अशा तेलांना लवकर खवट वास येऊ लागतो म्हणून आहारात वापरता येत नाहीत. त्यांना अधिक टिकाऊ व अधिक स्वादिष्ट करण्यासाठी हायड्रोजनेशन नावाची प्रक्रिया केली जाते. ही हायड्रोजनेशनची क्रिया अपूर्ण झाल्यास त्यांच्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात. ह्या ट्रान्स फॅट्स रक्तातील एल. डी. एल. (स्वास्थ्यास घातक चरबी) वाढवितातव एच. डी. एल. (स्वास्थ्यवर्धक चरबी) कमी करतात. परिणामी हृदयाला रक्ताभिसरण करणाऱ्या धमन्या कडक होतात, कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून तेल खरेदी करतांना शक्यतो हायड्रोजनेटेड तेलाचा वापर करू नये. सरकारी नियमांनुसार तेलाच्या डब्यावर/ पाकिटावर हे छापणे बंधनकारक आहे.
स्निग्ध पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड असे दोन प्रकार आढळतात. २२ ते २५० डिग्री तापमानात गोठणारे सॅच्युरेटेड व ह्याच तापमानात द्रवावस्थेत राहणारे अनसॅच्युरेटेड असे ढोबळ मानाने समजावेत. सॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेल द्रव्य स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक व अनसॅच्युरेटेड त्यामानाने चांगली असतात. संपूर्णपणे अनसॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेले असत नाहीत. त्यात किंचित प्रमाणात सॅच्युरेटेड स्निग्धता असतेच. पण हे प्रमाण नगण्य असावे एवढेच ध्यानात असावे.
अनसॅच्युरेटेड स्निग्धता ही पण दोन प्रकारांची असते. ह्यात मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) आणि पॉलिअनसॅच्युरेटेड (PUFA) असे दोन प्रकार आहेत. ओमेगा जातीचे वसाम्ले मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) मध्ये असतात व ही स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायक असतात. हृदय, मेंदू, सांधे, ज्ञानेंद्रियांची शक्ती उत्तम राखणे अशी गुणवत्ता त्यांमध्ये असते.
भारतीय आहारात मुख्यतः खालील तेलांचा वापर मुख्यत्वाने होतो. त्यातील घटकांमधील रसायनांचा तक्ता –
| मराठी नाव | इंग्रजी नाव | सॅच्युरेटेड
स्निग्धांश |
MUFA | PUFA | ओमेगा ३ | ओमेगा ६ |
| तीळ तेल | Sesame oil | १४ % | ४३ % | ४३ % | ०.३ % | ४१ % |
| भुईमूग तेल | Peanut oil | १८ % | ४९ % | ३२ % | ० % | ३१ % |
| पाम तेल | Palm oil | ५२ % | ३८ % | १० % | ०.२ % | ९.१ % |
| सोयाबीन तेल | Soybean oil | १५ % | २४ % | ६१ % | ६.७ % | ५० % |
| सुर्यफुल तेल | Sunflower oil | ११ % | २० % | ६९ % | ० % | ५६ % |
| सरकी तेल | Cotton seed oil | २४ % | २६ % | ५० % | ०.२ % | ५० % |
| खोबरेल तेल | Coconut oil | ९२ % | ०६ % | ०२ % | ० % | १.८ % |
| करडई तेल | Safflower oil | १० % | १३ % | ७७ % | ० % | ७४ % |
| ऑलिव्ह तेल | Olive oil | १४ % | ७३ % | ११ % | ० % | ० % |
| राईचे तेल | Mustard oil | १३ % | ६० % | २१ % | ५.९ % | १५ % |
| तांदूळ कोंड्याचे तेल | Rice Bran oil | २० % | ७४ % | ३३ % | १.६ % | ३३ % |
| मक्याचे तेल | Corn oil | १३ % | २५ % | ६२ % | १.१ % | ५३ % |
| जवसाचे तेल | Flax Seed oil | ११ % | २१ % | ६८ % | ५३ % | १३ % |
तीळ तेल -
रिफाइंड आणि नॉन रिफाइण्ड असे तिळाचे तेल दोन प्रकारचे असते. सेंद्रिय, रिफाइण्ड न केलेले तिळाचे तेल आपल्या अन्नाला मोहक सुगंध देते. तीळ तेलात मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्स् असतात जे फ्री रॅडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे गुण आहे. तीळ तेल चिंता करणार्यांसाठी तसेच आपल्या नसा (नर्व्ह) आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. ते रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. तसेच पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. जे लोक तीळ तेल नियमितपणे वापरतात, ते ताण-तणावावर मात करू शकतात, मज्जासंस्थेला पोषक ठरते, थकवा कमी करते, रात्री झोप बरी येते आणि आयुष्य वाढवते. तीळ तेलाने कर्करोगापासून रक्षण होऊ शकते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.
शेंगदाणा तेल :
यामध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या फॅट्स्चं उत्तम मिश्रण आहे. शेंगदाण्याच्या तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडन्ट्स असतात जे फ्री रॅडिकल्स (पेशीविघातक दोष) तयार होण्यापासून रोखतात आणि विविध प्रकारच्या कर्करोगांपासून रक्षण करतात. ते शरीरातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉलचीही पातळी कमी करतात. चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एचडीएल. हे कोलेस्टेरॉलची परत यकृताकडे पाठविते आणि अडथळ्यांपासून बचाव करते. वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल. हे कोलेस्टेरॉलचे वहन पेशींकडे आणि वाहिन्यांकडे करून वाहिन्यात अडथळे निर्माण होतात.
पाम तेल
जगात होणाऱ्या खाद्य तेलाच्या निर्मितीपैकी ४४ टक्के हिस्सा पाम तेलाचा आहे. ह्यात पाल्मेटिक अम्ल नावाचा घटक असतो. ह्यात ट्रान्स फॅट व सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे प्रमाण मोठे आहे व हृदयाच्या रक्ताभिसरणासाठी योग्य नाही असे जागतिक आरोग्य संघटन संस्थेने प्रसिद्ध केले आहे.
सोयाबीन तेल
सोयाबीनच्या द्विदल बियांपासून सुमारे ५०% खाद्य तेल काढता येते. यात प्रथिनांचे प्रमाण उत्तम असते. रिफाइंड सोयाबीन तेलाचा खप शेंगदाण्याच्या तेलाच्या खालोखाल आहे. रक्तातील घातक स्निग्धांश व स्वस्थ्यकर स्निग्धांशांचा याने समतोल राखला जातो. प्रथिनांचे उत्तम स्रोत असल्याने शुद्ध शाकाहारी लोकांनी ह्याचा वापर जरूर करावा. सोयाबीनमधील अॅन्टिऑक्सिडंट घटक विशिष्ट कॅन्सर पेशींना आळा घालून त्यांची वाढ रोखतात असे संदर्भ मिळतात.
सनफ्लॉवर तेल -
या तेलामध्ये जीवनसत्त्व ‘ई’ जास्त आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असते. हे तेल हृदयास हितकर आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते कारण त्यात पॉलिसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असते. यातील PUFA आणि MUFA जातीची स्निग्धाम्ले तीव्र उष्णता, प्रखर प्रकाश, हवेतील बाष्प अशा कारणांमुळे तेलाचे गुणधर्म नाश पावतात. म्हणून ह्याच्या निर्मिती प्रक्रियेत आणि साठविण्याच्या पद्धती नियंत्रित असणे जरुरीचे आहे.
सरकी तेल –
कपाशीच्या बियांना सरकी म्हणतात. यात फॉस्फरससुक्त संयुगे, स्टेरॉल, क्षार आणि अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे आहेत. याशिवाय सरकीत अल्प प्रमाणात पण विशिष्ट गुणधर्मांचे घटक म्हणजे ‘गॉसिपॉल’ नावाचे संयुग आणि कच्च्या सरकी तेलाला गडद रंग देणारी रंगद्रव्ये असतात. पितळी भांड्यांवर ह्याची रासायनिक क्रिया होते म्हणून स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. हृदय स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले आहेच शिवाय ई जीवनसत्वाचे प्रमाणही ह्यात चांगले आहे. गॉसिपॉल’ नामक विशिष्ट घटकामुळे स्त्री व पुरुष प्रजननक्षमता खालावते असे काही वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहे.
खोबरेल तेल -
खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक आहे. त्यानुसार हे खाण्यास अत्यंत घातक आहे असा निष्कर्ष निघतो. परंतु ह्यातील मीडियम चेन फॅटी अम्ल हृदयाला हितकार आहेत. ह्याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमधील घातक चरबी कमी होते. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच दोन बाजू तेलांनाही असतात. सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे लाभही अनेक आहेत. मेंदूच्या जडणघडणीमध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अशा तेलांना पूर्णपणे वर्ज्य करून चालत नाही. अल्झेमर्स डिसीजमध्ये (वार्धक्यात होणारा स्मृतिभ्रंश) खोबरेल तेलाचा उपयोग अतिशय प्रशंसनीय आहे असे संशोधन नुकतेच झाले आहे.
करडई तेल (सॅफ्लॉवर) -
ह्या तेलात पॉलिअन्सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करते. तसेच ते पेशीचे आवरण मजबूत करण्यात मदत करत ज्यामुळे विषारी घटकांना प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो ज्यामुळे मग रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या रोगांपासून बचाव करते. हे तेल मधुमेहींनासुद्धा वापरायला सांगितले जाते कारण ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच स्त्रियांमध्ये पाळी येण्यापूर्वीची लक्षणे कमी करते.
ऑलिव्ह तेल
हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो. या तेलाचा वापर तळणीसाठी केल्यास गुणधर्म नाश पावतात म्हणून कच्च्या स्वरूपात याचा वापर करणे अधिक योग्य आहे.
राईचे तेल –
हे खाद्यतेल मोहरीपासून बनविण्यात येते. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात. हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो. भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली कडे याचा वापर होतो. ह्यात MUFA चे प्रमाण उत्तम असल्याने ओमेगा ३ जातीचे मेदाम्ल प्रचुर प्रमाणात आहेत. हे प्रमाण एकंदरीत स्वास्थ्यासाठी चांगले आहे. मात्र याचा वास उग्र असतो. अन्य तेलांचा वापर करणाऱ्यांना रुचत नाही.
राईस ब्रान तेल -
या तेलात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि ट्रान्स फॅट नसतात. त्यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडन्ट्सही असतात. त्यामुळे ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याला सूक्ष्म असा वास असतो आणि धुराचा बिंदू जास्त असतो. त्यामुळे ते तळणासाठी व अन्न शिजवण्यासाठी व भाजण्यासाठीही वापरता येते.
मक्याचे तेल –
मक्याच्या अंकुरापासून तेल काढतात. याच्यात क्लोरेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असल्याने हृदयरोगावरती उपयुक्त आहे. मक्याच्या अंकुरातून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीपासून जनावरांचे खाद्य तयार केलं जात. तसाच कोरडया प्रक्रियेतून निघालेला कोंडा पशुखाद्यात वापरला जातो. ऑलिव्ह तेलाच्या तुलनेत हे तेल अधिक उष्णता सहन करते म्हणून तळणीसाठी हे अधिक योग्य आहे. मशीनद्वारे काढलेले मक्याचे तेल अधिक स्वास्थ्यकर आहे. आजकाल बाजारात हेक्झेन किंवा आयसोहेक्झेन या रसायनांचा वापर करून काढलेले तेल अधिक प्रमाणात मिळते. त्यातील रसायनांचा घातक परिणाम होण्याची शक्यता असते.
जवसाचे तेल -
जवसाच्या बिया (flaxseed किंवा linseed) अत्यंत आरोग्यदायी आहेत. यालाच अळशी असेही नाव आहे. आजकाल जवसाला खूप महत्त्व लाभले आहे. याचे प्रमुख कारण आहे जवसामध्ये असलेले ओमेगा-3 हे मेदाम्ल. आहारशास्त्रानुसार आपल्या आहारात ओमेगा-3 व ओमेगा-6 या दोन मेदाम्लांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. सामान्यतः ओमेगा-6 हे मेदाम्ल रोजच्या वापरातल्या तेलांमधून सहजपणे मिळत असते; परंतु ओमेगा-3 असलेले पदार्थ कमी आहेत. म्हणून हे मेदाम्ल शरीराला सहजासहजी मिळत नाही. तेलीय मासे, अक्रोड, मोहरी, मेथी, जवस या पदार्थांपासून आपल्याला ओमेगा-3 मिळू शकते. हे मेदाम्ल विशेषत्वाने हृदय व त्याच्या धमन्यांचे आरोग्य राखण्याचे काम करते. रक्तातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स या घटकांचे प्रमाण ओमेगा-3 ने कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उच्चरक्तदाब, संधीविकार, कर्करोग व स्थूलता यांपासून संरक्षण मिळते. ओमेगा-3 या मेदाम्लामुळे स्मरणशक्ती वाढते, डोकेदुखी, नैराश्य कमी होते. जवस हे रजोनिवृत्तीशी संबंधित तक्रारी कमी करते. रोज साधारणपणे ३० ग्रॅम जवस खाण्याने रजःनिवृतीपूर्वी होणारी डोकेदुखी, चिडचिडेपणा, शरीरातून गरम वाफा निघणे, हे त्रास कमी होतात. जवसाची चटणी किंवा जवसाचे तेल या स्वरूपात जवसाचा आहारात वापर करता येईल. जवसाच्या बिया बडीशेपेसारखे तव्यावर परतून खाव्यात. किंचित मीठ घालून मुखवास रूपाने खूप रुचकर लागतात. जवसाचे तेल शक्यतो तापवू नये, ते चटणीवर किंवा सॅलडवर घ्यावे. तापवल्याने याला विशिष्ट उग्र वास येतो.
सारांश:
खाद्य तेलांबद्दल एवढी माहीती वाचल्यावर “मी कोणते तेल वापरू” हा प्रश्न आपल्याला नक्कीच भेडसावणार आहे. म्हणून सारांशाने थोडक्यात महत्वाचे मुद्दे आता पाहूया –
१) लेबलवर “हायड्रोजनेटेड” शब्द दिसला तर असे तेल वापरू नये.
२) तळणीसाठी एकदा वापरलेले तेल परत वापरू नये. (निरांजनात वापरण्यास हरकत नाही)
३) “ट्रान्स फॅट्स” असलेले तेल वापरू नये.
४) मांसाहाराचे बंधन नसेल तर मधूनच फिश ऑईलचा आहारात वापर करावा.
५) सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असलेले तेल टाळावे (याला खोबरेल तेल अपवाद आहे)
६) नॉन-रिफाइंड तेलांना नैसर्गिक गंध असतो व ती तेले अधिक पौष्टिक असतात. परंतु तुलनेने लवकर खवट होतात. तळणीसाठी अशा तेलांचा वापर शक्यतो करू नये.
७) रिफाइंड तेलांचा वापर तळणीसाठी अधिक योग्य असतो. रिफायनिंग प्रक्रियेत तेलामधील कित्येक स्वास्थ्यकर जीवनसत्व नाश पावतात. रिफाइंड तेल अधिक टिकाऊ असते, मात्र त्याला नैसर्गिक स्वाद फारच कमी असतो.
८) ज्याज्या ठिकाणी गायीचे तूप वापरता येईल त्यात्या ठिकाणी तेलाऐवजी अशा तुपाचा वापर करावा.
९) उपलब्ध असलेल्या सर्व तेलांचा वापर अदलून बदलून करावा. एकच एक तेल कधीही खाण्यास वापरू नये.
१०) आहारात कोणतेही तेल घ्या पण ‘४५ मिनिटे नियमित व्यायाम करणे’ हा नियम कधीही विसरू नका.
११) स्निग्ध पदार्थ म्हटल्यावर सर्वांच्या मनात “कोलेस्टेरॉलची” दहशत बसलेते. म्हणून ह्याबद्दल थोडी माहीती हवीच -
कोलेस्टेरॉलबद्दल ज्यांच्या मनात भीती आहे त्यांनी त्याचे फायदेही समजून घेतले पाहिजेत. कोलेस्टेरॉल हा यकृतात निर्माण होणारा एक घटक आहे. हा घटक सर्वस्वी वाईट असता तर निसर्गाने ह्याची निर्मिती केलीच नसती. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अति सर्वत्र वर्जयेत हा नियम येथेही लागू होतो. त्याचे संतुलन शरीराच्या गरजेपुरते असावे, अति वाढू नये ह्याची काळजी घ्यावी. शरीरात निर्माण होणाऱ्या कोलेस्टेरॉलशिवाय आपण आहारातून घेतलेले कोलेस्टेरॉल देहाचे स्वास्थ्य खालावत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डॉ. संतोष जळूकर, मुंबई
+917208777773
आपापल्या दैवतांची उपासना कशी करावी? हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न. समाधानासाठी माणसं काहीही करतात. घरी सत्यनारायण, धार्मिक विधी करुन अंधश्रध्दा निर्मूलन करणारेही आहेत. देव, धर्म, उत्सव यामुळे समाजामध्ये थोडे चैतन्यही आहे पण अवडंबर नको.
ज्यांचे शिक्षण झाले किंवा नाही माहित नसतांना त्यांचे मूल्यमापन करण्याचे आव्हान सध्या आहे. कॉपी रोखणे जसे ऑफलाईन मध्ये आव्हान होते तसेच आव्हान ऑनलाइन परीक्षा पद्धतीमध्ये ही आहे. ऑफलाइन परीक्षेमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना यश मिळत असे पण ऑनलाईन परीक्षेमध्ये अभ्यास न करणारें ही वरचढ ठरत आहेत
कर्नाटकातील बदामी येथील अतिशय उंच आणि अतिविशाल खडकात कोरलेली लेणी पहायला मी आणि सौभाग्यवती जातो काय आणि सर्वात उंच असलेल्या खडकात कोरलेल्या लेण्यांसमोरच्या प्रांगणात निवांत बसलेले डॉ . प्रकाश आमटे आणि सौ. मंदाताई आमटे, दिसतात काय , सगळं अगदी अनपेक्षित आणि तरीही आनंददायक .
Copyright © 2025 | Marathisrushti