वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हल्ली जीवनशैली कमालीची व्यस्त बनली आहे. सतत धावपळ हा आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अशावेळी कितीही काळजी घेतली तरी काही अपघात घडतात. यामध्ये एक म्हणजे पाय मुरगळणे. काही वेळा चालताना, पायर्या उतरताना पाऊल किंचित तिरके पडते आणि पाय मुरगळतो. पाय मुरगळतो तेव्हा पायातील सांध्यांच्या दोन हाडांना जोडणार्याि उती अर्धवट फाटतात किंवा काही वेळा पूर्णही फाटतात. असे झाले तर पायाच्या घोट्याजवळ सूज येते. सूज आली असता त्या भागावर बर्फाने शेक द्यावा. बर्फाने शेकण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. बर्फाचे खडे जाडसर पिशवीत घेऊन त्यात थोडे मीठ घालावे. पिशवीला गाठ मारावी आणि दुखत असणार्याख जागेवर ही पिशवी काही वेळ ठेवावी. वेदना तीव्र होईपर्यंत ही पिशवी तशीच ठेवावी. नंतर पुन्हा ती दुसर्याे जागेवर ठेवावी. अशा प्रकारे सलग 15 मिनिटे बर्फाने शेकावे. दिवसातून साधारणपणे दोन वेळा बर्फाचा शेक द्यावा. मुरगळल्यानंतर पायाला पूर्ण विश्रांती द्यावी. पाय शक्यतो उशांवर ठेवावा. बाजारामध्ये पायाला बांधण्यासाठीचे बँडेज मिळते. ते पायाच्या बोटांपर्यंत बांधावे जेणेकरून पायांच्या स्नायूंना आधार मिळतो आणि सूज लवकर कमी होण्यास मदत होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. संजय गायकवाड
‘मेनोपॉज’ अर्थात ‘रजोनिवृत्ती’ हा आजार नव्हे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यातील या टप्प्याला सामोरे जावेच लागते. मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात मुली मनाची जी घालमेल अनुभवतात, तीच घालमेल आणि अस्वस्थता मेनोपॉजच्या काळातही स्त्रियांना सतावते. मात्र हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे. जीवनातल्या या पर्वाला सकारात्मक दृष्टीकोनाने स्वीकारणे आवश्यक आहे.
मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. अशा वेळी जर एखाद्या स्त्रीला एक वर्षांपर्यंत मासिक पाळी आलीच नाही तर तिला मेनोपॉज आला असे म्हणता येते. तरीही या स्त्रियांनी पाळी चुकल्याची शंका आल्यावर स्त्रीरोग तज्ञांकडून तो मेनॉपॉजचाच टप्पा असल्याची शहानिशा करून घेणे आवश्यक आहे. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला ‘पेरीमेनोपॉजल पिरीयड’ म्हणतात. हा काळ साधारणपणे ३ ते ४ वर्षांचा असू शकतो. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नाही. निसर्गचक्राचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रातील बातमीने लक्ष वेधून घेतले. बातमी होती एका लग्न होऊ घाललेल्या २८- २९ वर्षांच्या मुलीला ‘मेनोपॉज’ आल्याबाबतची. सहाजिकच ही बातमी वाचणाऱ्या बऱ्याच जणी अकारण काळजीत पडल्या. जर एखाद्या स्त्रीला वयाच्या ३५ वर्षांच्या आधीच मेनोपॉज आला तर त्याला ‘अर्ली’ किंवा अकाली मेनोपॉज असे म्हटले जाते. अकाली मेनोपाज अर्थातच विरळा आढळतो. लवकर मेनाोपॉज येण्याची ही तक्रार आनुवांशिक असू शकते. आईला लवकर मेनोपॉज आला असेल तर मुलीचीही तीच प्रवृत्ती असू शकते. स्त्रीला ‘पेल्व्हिक इन्फेकशन’ किंवा क्षयासारखा एखादा आजार होऊन गेल्यामुळे तिच्या ओव्हरीजवर परिणाम होऊनही अकाली मेनोपॉज येऊ शकतो.
मेनोपॉजची लक्षणे
* मासिक पाळी अनियमित होऊन हळूहळू पूर्णपणे बंद होणे.
* मानसिक स्थितीत अकारण बदल होणे. एका क्षणी आनंदी वाटणे तर दसऱ्याच क्षणी काहीही सबळ कारण नसताना निराशा दाटून येणे.
हॉट फ्लशेस
सारे काही व्यवस्थित असताना काही क्षणातच शरीराचे तापमान वाढते. लगेच थोडय़ा वेळात हे तापमान कमी होऊन थंड वाटते. यामुळे दरदरुन घाम सुटतो. कधी- कधी रात्री झोपमोड होते.
* पचनशक्ती मंदावल्यामुळे सतत पोट गच्च झाल्यासारखे वाटते.
* स्मरणशक्ती कमी होते.
* योनीमार्ग कोरडा पडून शारिरिक संबंधास त्रास होतो.
* सांधे दुखी
* वजनात वाढ. विशेषत: पोटाचा घेर वाढतो.
* त्वचेवर दिसणारे परिणाम. त्वचा कोरडी होऊन अंगाला खाज येणे. त्वचेवर सुरकुत्या दिसणे, त्वचा सैल पडणे.
* नखे/ हाडे ठिसूळ होणे. इ.
ही सगळी लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये दिसतीलच असे नाही. लक्षणांची तीव्रताही कमी- अधिक होऊ शकते.
मेनोपॉजनंतर स्त्रीच्या शरीरातील ‘फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन’ आणि ‘ल्युटेनायझिंग हॉर्मोन’ या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढते तर ‘इस्ट्रोजेन’ या हॉर्मोनचे प्रमाण कमी होते.
मेनोपॉज नंतरच्या आवश्यक तपासण्या
* सीरम कॅल्शिअम.
* सीरम व्हिटामीन डी- ३
* बोन डेन्सिटी-
वयाच्या चाळीसाव्या वर्षांनंतर दर दोन वर्षांनी बोन डेन्सिटी तपासणी करणे आवश्यक
मॅमोग्राफी – स्तनांतील गाठी आणि स्तनांच्या कर्करोगाची शक्यता पडताळण्यासाठी वयाच्या ४५व्या वर्षांनंतर दर दोन वर्षांनी मॅमोग्राफी तपासणी करणे आवश्यक आहे.
मेनोपॉजनंतर जीवनशैलीमध्ये करावयाचे बदल
* शारीरिक क्षमतेनुसार नियमित व्यायाम आवश्यक.
* मानसिक ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान (मेडिटेशन) करावे.
* शक्यतो सुती आणि सैलसर कपडय़ांचा वापर करावा.
* कोणत्याही प्रकारे तंबाखूचे सेवन टाळावे.
* भरपूर पाणी प्यावे.
* कॅल्शिअमयुक्त आहार घ्यावा. आहारात सोयाबिनचे एक किलो पीठ पाच किलो गव्हाच्या पिठात मिसळून त्याचा वापर रोजच्या जेवणातील चपात्या/ पोळ्यांसाठी करता येईल. सोयाबिनच्या दुधाचे पनीर (टोफु), सोया चंक्स, सोया मिल्क लाभदायक ठरते. भरपूर प्रमाणात फळे, भाज्यांचे सेवन करावे. भोपळा मेनोपॉजसाठी अतिशय लाभदायक. दररोज किमान १ ग्लास दूध प्यावे. एकाच वेळी भरपूर खाण्यापेक्षा ४-५ वेळा थोडे थोडे खावे. तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खावेत. कॉफीचे अतिरिक्त सेवन टाळावे. दररोज ४-५ बदाम खाल्ले तर उत्तम. तीळ आणि जवसाचाही रोजच्या जेवणात समावेश करणे लाभदायक.
सतत मूड बदलण्याच्या तक्रारीवर (मूड स्विंग) ओट्स, पनीर, कडधान्यांचा आहारात अधिक प्रमाणात असणे फायदेशीर ठरू शकते. सफरचंद, पिअर, द्राक्षे ही फळे आणि खजुर, मनुका हा सुकामेवा जरूर खावा. या फळांमुळे हाडे ठिसूळ होण्याची म्हणजे ऑस्टिओपोरॉसिसच्या प्रक्रियेचा वेग मंदावू शकतो.
वयाची पस्तिशी उलटण्यापूर्वीच काही मुलींना मेनोपॉज येऊ शकतो.
अकाली (अर्ली) मेनोपॉजला कारणीभूत ठरू शकणाऱ्या गोष्टी-
* आनुवंशिकता
* हायपोथायरॉइडिझम
* क्षय (टीबी)
* गालगुंड
स्त्रीचे गर्भाशय व अंडाशय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकावे लागले असल्यास कर्करोगावरील उपचारांत रेडिएशन व केमोथेरपी द्यावी लागल्यास अकाली मेनोपॉजसाठी करावयाच्या तपासण्या-
* एफएसएच (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) टेस्ट
* एलएच (ल्युटेनायझिंग हॉर्मोन) टेस्ट
* इस्ट्राडिऑल टेस्ट
* प्रोजेस्टेरॉन टेस्ट
* टेस्टॉस्टेरॉन टेस्ट
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- लोकसत्ता
शिवांबू म्हणजे स्वमुत्र प्राशन करणे. शरीर रक्तापासून मूत्र वेगळे करून शरीराबाहेर टाकते. परंतु हे मूत्र प्राशन केल्याने शरीरातील रोग, त्रास कमी होतात असे अनुभव आहेत. मी गेले ४० वर्षे शिवांबू घेत आहे. माझे वय ७० आहे. शिवांबू घ्यायला सुरवात केल्यापासून मला डॉक्टरची औषधे घ्यावी लागली नाहीत. मी दररोज शिवांबू घेतो. हवा बदल, खाणे यातून ताप येणे, जुलाब, सर्दी, खोकला, लघवीला आग हे होतच असते. त्यावेळी शिवांबू जास्त घेतो. सध्या माझ्या तोंडात दोनच दात शिल्लक आहेत. तरीसुद्धा सर्वकाही खातो. अगदी पिझ्झा, बर्गर, सामोसे, पंजाबी डिशेस सुद्धा खातो. नंतर शिवांबू घेतो. त्यामुळे हे पदार्थ बाधत नाहीत. मी ह्या वयातही माझे लाईफ एन्जॉय करतो. मला डायबेटीस, हार्टचा त्रास नाही. मी गेल्या ४० वर्षात बर्याच लोकांना शिवाम्बुचा सल्ला दिला. ज्यांनी केले त्या प्रत्येकाला फायदा झाला. अगदी डायबेटीस वाल्यांना सुद्धा! काहींची ऑपरेशन्स वाचली. तर काहींची जाडी कमी झाली. त्या अनुभवांचे 'शिवांबू कसे व का घ्यायचे?' हे पुस्तक प्रसिद्ध केले. ते वाचून अनेक लोकांची शिवांबू घेण्याची मनाची तयारी झाली.
फायदे:
शिवांबू हे शरीरच देत असल्याने डायग्नोसिस साठी टेस्ट कराव्या लागत नाहीत.
औषधाला पैसे मोजावे लागत नाहीत किंवा कमतरताही नसते.
ह्यात आपल्याशिवाय कोणीही भेसळ करू शकत नाही.
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी आपल्या बरोबरच असते.
आपण घेतलेले कुणालाही कळत नाही अगदी लाईफ पार्टनरलासुद्धा!!
शिवांबू सुरु करताना पहिला महिनाभर शिवांबू निम्याला निम्मे पाणी घालून प्यावे.
शिवाम्बुचा सर्वसाधारण डोस वय गुणिले १० मिली असा असावा.
(२० वर्षे * १० मिली = २०० मिली = १ ग्लास/४० वर्षे * १० मिली = ४०० मिली = २ ग्लास)
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Hot & cold food list
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
लिंबू - उष्ण
कांदा - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो - उष्ण
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
वांगे - उष्ण
भेंडी - उष्ण
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊस - उष्ण
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
कॉफी - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड
उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो .
आयुर्वेदातून संकलन
चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. कोलेस्टेरॉलपासून अत्यंत महत्त्वाच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. म्हणूनच या गटामधील ‘हॉर्मोन्स’ना ‘स्टेरॉइड्स’ म्हणून संबोधले जाते. या स्टेरॉइड हॉर्मोन्समध्ेय टेस्टॉस्टेरोन, प्रोगेस्टेटोन, अल्डोस्टेरॉन, इस्ट्राडीऑल आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोन्सचा समावेश होतो. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ नाही.
कोलेस्टेरॉलचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत. हलके कोलेस्टेरॉल म्हणजे ‘एल.डी.एल.’ या कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्त वाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्त दाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एच.डी.एल. हे हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्त वाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालते. म्हणून त्याला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो. म्हणूनच ‘स्टॅटिन’ प्रकारात मोडणारी औषधे खूप लोकप्रिय आहेत. आहारातील स्निघ्ध पदार्थाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. सोयाबीन तेल वापरावे की शेंगदाणा तेल, खोबरेल तेल वापरावे की ऑलिव्ह तेल या संभ्रमाचा खरे तर रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाशी फारसा संबंध नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे व तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहार व कोलेस्टेरॉल यांचा संबंध मर्यादित आहे.
रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यात आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा आहे. डॉ. हेगडे यांच्या मते अगदी गवत खाऊन राहिले तरी दहा टक्क्य़ांपेक्षा कोलेस्टेरॉल कमी होणार नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे. आहारामध्ये मोठे बदल करून किंवा औषधांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून जर हृदयविकाराच्या धोक्यावर फार मोठे दूरगामी फायदे दिसत नसतील तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये मिळते. मानसिक शांतता आणि कोलेस्टेरॉल यांचा जवळचा संबंध आहे. कॉर्टीसॉल हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलपासून बनते. कॉर्टीसॉल आणि मानसिक ताण यांचा जवळचा संबंध असतो. तणावाखाली असलेल्या मेंदूकडून पिटय़ुटरी ग्रंथींना संदेश जातो आणि नंतर अॅडरेनल ग्रंथींना कॉर्टीसॉल तयार करण्याचा संदेश मिळतो. मात्र अधिक कॉर्टीसॉलमुळे मानसिक ताण वाढतो की वाढलेल्या तणावामुळे कॉर्टीसॉलची निर्मिती होते, हे कोडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आहे! परंतु उत्तम मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम या त्रीसूत्रीमध्येच कोलेस्टेरॉल संतुलनाची गुरुकिल्ली आहे, हे मात्र निश्चित!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
योगासनांची विविध अंगं आणि प्रकार आहेत. योगाचे अंग आणि प्रकार यामध्ये फरक आहे. प्राचीन ग्रंथामध्ये योगाचे विविध प्रकार सांगितले आहेत. ज्ञानयोग, हठयोग, कर्मयोग, भक्तियोग, राजयोग हे काही योगाचे प्रकार आहेत. तसंच यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही योगाची अंगं आहेत. आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या योगासनाची सखोल माहिती
योगासनामुळे शरीर लवचिक राहतं तसंच शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरतात. या योगासनाचे काही प्रमुख प्रकार आहेत. सूर्यनमस्कार, पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन, सिद्धासन, पवन मुक्तासन, सर्वागासन, पश्चिमोतानासन, शीर्षासन, श्वसन, सुखासन हे काही प्रमुख प्रकार असून त्यातला पहिला प्रकार कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत.
सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतील प्राचीन व्यायाम आहे. सूर्यनमस्काराला सवरेश्रेष्ठ आसन मानलं जातं आणि त्याचे अनेक फायदे आहेत. कोवळ्या किरणात पूर्वेला नमस्कार करून सूर्यनमस्कार घालावेत. तसंच ते शांत आणि स्वच्छ जागेत करावेत. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. सूर्यनमस्काराला सुरुवात करताना सुरुवातीला जमतील तेवढेच सूर्यनमस्कार घालावेत. तसेच ते अनशापोटी केलेले उत्तम. वेळेअभावी ते संध्याकाळी करायचे असतील तर त्यापूर्वी कमीत कमी दोन तास तरी खाऊ नये. सूर्यनमस्कारात बारा क्रिया असतात. त्यातील पहिली क्रिया म्हणजे प्रणामासन.
प्रणामासन प्रणामासन ही सूर्यनमस्कारातली पहिली पायरी आहे.
सरळ उभं राहावं आणि दोन्ही पाय जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या मध्यभागी नमस्काराच्या स्थितीत जोडलेले असावेत. मान ताठ आणि नजर समोर असावी. पाठीचा कणा ताठ असावा. शरीर शांत ठेवून आरामशीर श्वास घ्यावा.
फायदा: मन स्थिर होण्यास मदत मिळते. शरीराचा तोल साधला जातो.
हस्तउत्तासन किंवा उध्र्वनमस्कार यात पहिल्या अवस्थेत उभं राहून मान वर करावी. पाठीचा कणा मागच्या बाजूला वाकवावा. आणि हात वर करावेत. या स्थितीत असताना श्वास आत घेतला जातो. तसंच या स्थितीतून पूर्वावस्थेत येताना पाठीच्या कणावर ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
फायदा : या अवस्थेत असताना पोटावरची चरबी खेचली जाते. यामुळे तिथली चरबी कमी होण्यास मदत होते.
पादहस्तासन हस्तउत्तसानाच्या स्थितीत असताना जेव्हा श्वास आत घेतला जातो तो श्वास हळुवारपणे सोडत दोन्ही हाताचे पंजे जमिनीला पूर्णपणे टेकवावेत. यात डोकं गुडघ्याला लावावं. ज्याप्रकारे ओणवं उभं राहतो तसंच राहावं पण या स्थितीत हाताचा पंजा जमिनीला टेकलेला असतो.
फायदा : या स्थितीमुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसंच हृदय आणि फुप्फुसांची क्षमता वाढतेच पण पायांचीही ताकद वाढते. या स्थितीमुळे पोटावर आणि ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांची मासिक पाळीसुद्धा नियमित होते. तसंच पोटावरची आणि कमरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळते.
अश्यसंचलनासन तिसरी क्रिया केल्यानंतर आता हात जमिनीला टेकवून एक पाय मागे ताणायचा तर दुसरा पाय गुडघ्यातून वाकवायचा या अवस्थेत असताना मान किंचीत उंचवावी. पुढे ठेवलेला पाय आणि हात समांतर रेषेत नसले तरी चालतील पण पायाचा अंगठा आणि हाताचा पंजा समान रेषेत असावा.
फायदा : मूत्रसंस्था आणि प्रजननसंस्थेच्या आरोग्यासाठी ही स्थिती उपयुक्त ठरते.
अधोमुखश्वसनासन पूर्वावस्थेतून बाहेर येण्यासाठी आपले दोन्ही पाय समान रेषेत आणावे आणि हात तसेच ठेवावेत. अधोमुखश्वसनासन करताना श्वास बाहेर सोडायचा असतो. यात कमरेखालचा भाग उंचवायचा म्हणजेच इंग्रजी अक्षराच्या उलटय़ा व्ही सारखी स्थिती असते. या अवस्थेत डोकं खालच्या दिशेला असेल.
फायदा : या अवस्थेमुळे पायांचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्नायू लवचिक होतात. तसंच खांदे मजबूत होतात. पायामध्ये आणि पोट-यांमध्ये गोळे येणं कमी होतं.
अष्टांग नमस्कार : मागील स्थितीतून पुढे जाण्यासाठी हातांवर योग्य प्रमाणात जोर देऊन शरीर जमिनीला टेकवावे. पाय सरळ रेषेतच ठेवून हनुवटीही जमिनीला टेकवावी.
फायदा : हात आणि खांद्याचे स्नायू मजबूत होतात आणि ताकद वाढते.
भुजंगासन यात दोन्ही हात सरळ रेषेत ठेवून जमिनीला टेकवावे व संपूर्ण शरीराचे वजन हात व पायांच्या चौडय़ांवर तोललं जाईल अशा अवस्थेत राहावं. या आसनामध्ये श्वास आत घेतला जाईल आणि मान जमेल तितकी मागे घेण्याचा प्रयत्न करावा.
फायदा : हे आसन करण्याचा फायदा म्हणजे गॅस आणि पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते. तसंच फुप्फुसांची क्षमता वाढते. पाठीच्या कण्यासाठी खूप लाभदायक ठरतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
लालबुंद दिसणारा टोमॅटो हा मनाला आल्हाददायक व शरीरासही आरोग्यदायक आहे.
टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाटय़ाखालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.
औषधी गुणधर्म
कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.
उपयोग
० आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.
० टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कबरेदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.
० अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
० टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.
० रक्ताची कमतरता (अॅयनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
० टोमॅटोच्या १ कप रसामध्ये ‘क’ जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.
० टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अॅयसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.
० पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.
टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.
सावधानता
टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. शारदा महांडुळे
आपल्या सगळ्यांच्याच धकाधकीच्या जीवनशैलीचा मोठा परिणाम होत आहे तो आपल्या हृदयावर. म्हणूनच आपल्या हृदयासाठी आपण एकदा थांबून शांतपणे विचार करायला हवा, तोही हृदयापासून..
हृदयविकाराचे प्रमाण भारतात झपाटय़ाने वाढत आहे. जर हे प्रमाण असेच वाढत राहिले तर २०२० मध्ये भारतात सर्वात अधिक हृदयविकाराचे रुग्ण असतील. भारतात कारोनरी आर्टरी या आजाराचे प्रमाण पूर्वी १९६० साली ४ टक्के होते आणि आता ते ११ टक्के इतके वाढले आहे. पूर्वी हा आजार वयस्कर व्यक्तीमध्येच आढळत होता. त्याचे प्रमाण ३० ते ४० वर्षे वयाच्या तरुणांमध्ये आता झपाटय़ाने वाढत आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाण १९५० साली जवळपास १ ते ३ टक्के होते, पण तेच आता १० ते ३१ टक्के इतके वाढलेले आहे. भारतात दरवर्षी लाखो हृदयविकारच्या आजाराने बळी पडतात. हे सर्व टाळण्यासाठी हा आजार का होतो, त्याची उपचारपद्धती काय आणि ते टाळण्याचे उपाय काय हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
हृदयविकार
हृदय हे स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. ते सतत आकुंचन-प्रसरण पावत असते. या स्नायूंना ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात, त्या रक्तवाहिन्यांना ‘कोरोनरी’ धमनी म्हणतात आणि जर या कोरोनरी धमन्यामध्ये अवरोध निर्माण झाला तर हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, त्यावेळी रुग्णाला ‘हृदयविकार’ आहे असेही म्हणतात. हृदयात रुग्णाला थोडे काम केल्यावर छातीच्या मध्यभागी दुखणे, छाती भरून येणे, डाव्या हातामध्ये दुखणे, दम लागणे, छातीमध्ये धडधड होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. या छातीतील दुखण्याला ‘अंजायना’ (हृदयशूळ) म्हणतात.
मधुमेह असलेल्या रुग्णाला कदाचित छातीत वेदना होणार नाहीत, अशा रुग्णाला दम लागणे, थोडेच काम केल्यावर थकवा येणे, कमजोरी वाटणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जेव्हा कोरोनरी धमनीतील अवरोध हा शंभर टक्के होतो. (१०० टक्के BLOCK) तेव्हा रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी छातीत तीव्र वेदना होणे. दरदरून घाम येणे.. भोवळ येणे.. दम लागणे.. असा त्रास होतो. कधी कधी हृदयविकारच्या तीव्र झटक्यामुळे ताबडतोब मृत्यूसुद्धा होऊ शकतो. या सर्व आजारांना हृदयविकार असे म्हणतात. हृदयविकार टाळण्यासाठी खालील बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
* हृदयविकाराचे निदान करणे.
* धोक्याची घटके ओळखणे.
*धोक्याची घटके टाळण्याचा प्रयत्न करणे.
* औषधोपचार करणे.
* नवीन तंत्राचा उपयोग करून हृदयविकाराचा उपचार करणे.
* अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.
हृदयविकाराचे निदान : हे सर्व टाळण्यासाठी या आजाराचे लवकर व योग्य निदान होणे आवश्यक आहे. हृदयरोगतज्ज्ञ (काíडओलॉजिस्ट) रुग्णांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर हृदयाच्या काही विशिष्ट टेस्ट करायला सांगतील. त्यात ई.सी.जी, हृदयाची सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट किंवा थॅलियम यांचा समावेश होतो. या सर्व नॉन इन्वेसिव्ह टेस्ट असून यात हृदयविकाराचे निदान होण्याची शक्यता ८० ते ९० टक्के आहे, पण सर्वात महत्त्वाची व शंभर टक्के निदान करणारी गोल्ड स्टॅण्डर्ड टेस्ट आहे. ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी.’ हृदयरोगाचे निदान करण्याचे, त्याची तीव्रता, प्रमाण, विस्तार बघण्याची एकमेव तपासणी म्हणजे ‘कोरोनरी अॅन्जिओग्राफी. अत्यंत सुरक्षित, सोपी व १०० टक्के निदान देणारी तपासणी.!
तज्ज्ञ हृदयविशारदाकडून ही तपासणी १० ते १५ मिनिटांत होते. रुग्णाच्या मांडीच्या आर्टरीमधून एक छोटीशी पोकळ नळी १.५ मि. मी. व्यासाची, हृदयाच्या कोरोनरी धमनीपर्यंत नेण्यात येते. मॉनिटरवर याचे एक्स-रे स्कॅनिंगद्वारे चित्रण चालू असते. आणि दुसऱ्या मॉनिटरवर रुग्णाचे रक्तदाब, हार्ट रेट (स्पंदन), ई. सी. जी, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे सर्व काही दिसत असते. तीन तासांच्या विश्रांतीनंतर रुग्णाला सुट्टी करण्यात येऊ शकते. ही प्रक्रिया एकंदरीत अत्यंत सुरक्षित असून शंभर टक्के निदान करणारी आहे.
धोक्याचे घटक
हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर त्याचे धोक्याचे घटक ओळखणे जरुरी आहे.
वय : वाढत्या वयानुसार हृदयविकाराचे प्रमाणसुद्धा वाढते. वयाच्या ५५ ते ६० वर्षांनंतर हे प्रमाण अधिक असते. पण आता मध्यम वयामध्येसुद्धा हे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. वाढत्या वयानुसार रक्त वाहिन्यांमध्ये कठिणीकरणाची प्रक्रिया होत असते, म्हणून हे प्रमाण वाढत्या वयानुसार वाढते.
लिंगभेद : पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे प्रमाण कमी असते. स्त्रियांमधील ईस्ट्रोजन नावाचा आंतरिक स्राव हा हृदयविकार टाळण्यास मदत करतो. पण जेव्हा स्त्रीची मासिक पाळी थांबते, तेव्हा या स्रावाचे प्रमाण कमी होते आणि अशा स्त्रियांत हृदयविकाराचे प्रमाण पुरुषांप्रमाणेच असू शकते.
आनुवंशिकता : हृदयविकाराचा आजार बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक आहे. आईवडिलांना हा आजार असेल तर मुलांना तो होण्याची शक्यता दाट असते.
धूम्रपान : हा सर्वात मोठा धोक्याचा घटक आहे. तंबाखूमध्ये चार हजार धनरूप किंवा वायूरूपात असणारी रसायने असतात. कार्बन, कार्बन मोनॉक्साईड आणि निकोटीन हे पदार्थ हृदयाला हानीकारक असतात. त्यांनी रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्यास सुरुवात होते आणि रक्तवाहिन्यांतील अवरोध वाढू लागतो. हृदयाची ऑक्सिजनची आवश्यकता वाढते. निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांच्या अवरोधामध्ये तडे जाऊन तेथे रक्ताच्या गुठळ्या जमा होण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अॅटॅक येऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, त्यामुळे दम लागतो. जगात जवळपास १० लाख लोक धूम्रपानामुळे दरवर्षी मरतात.
मद्यपान : मद्यपानामुळे स्नायूंचे आजार होतात. हृदयाच्या पेशींच्या सेल्युलर पातळीवर दुष्परिणाम होऊन हृदयपेशींची कार्यक्षमता कमी होते. मद्यामुळे हृदयाची लय आणि गती बिघडू शकते.
हृदयविकार टाळण्यासाठी
* आहारात योग्य तो बदल करणे.
* व्यायाम करणे.
* योगा- मेडिटेशन करणे.
* औषधोपचार करणे.
*अॅन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे.
आहार
संपूर्ण शाकाहार हा आरोग्यदायी आहे.
रोजच्या आहारातून मिळणाऱ्या उष्मांकांपैकी १० टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी उष्मांक स्निग्ध पदार्थामधून आलेले असावेत. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. अगदी स्निग्धांशविरहित मध्ये थोडंसं कोलेस्टेरॉल असतं. संपृक्त स्निग्धांश जवळजवळ वज्र्य करावेत. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीनं उपयुक्त असलेले कांदा, लसूण, गाजर, वांगी, सोयाबिन, स्किम्ड मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे.
कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावे. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, पालक, मेथी, लेटय़ूस अशा भाज्या, मोडाची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत.
चहा, कॉफीचा अतिरेक टाळावा.
मांसाहार टाळावा. मटन-चिकन टाळावे, अंडय़ातील पिवळा भाग टाळावा. दुधाचे पदार्थ : मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे. मिताहारी असावे.
चायनीज पदार्थ, तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.
आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण पुष्कळ असावे.
मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.
खाल्ल्यानंतर ताबडतोब झोपू नये. थोडी शतपावली घ्यावी.
उपवास टाळावे. सकाळी व्यवस्थित न्याहारी करावी, पण दुपारचे आणि रात्रीचे जेवण मात्र हलकेच घ्यावे. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये योग्य अंतर ठेवावे. त्या वेळा नियमितपणे पाळणे.
व्यायाम
भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवावी यासारखा व्यायाम जितक्या वेळा सहन होईल तोपर्यंत करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी व्यायामाचा वेळ आणि प्रकार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावा. शरीरांतर्गत ऊर्जा दीर्घकाळासाठी, पण प्रमाणशीरपणे आणि योग्य गतीने वापरली जाते त्याला एरोबिक व्यायाम असे म्हणतात. असे व्यायाम हृदयविकार टाळण्यास मदत करतात. योगासने करावीत.
योगा-मेडिटेशन
मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळवून देणारा उत्तम मार्ग म्हणजे योगा-मेडिटेशन. यात प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी (मेडिटेशन) आणि यम, नियम, योगासने, प्राणायाम यांचा समावेश होतो. अशांत मन शांत करण्याचा हा योग्य मार्ग आहे. या सर्व गोष्टींमुळे जीवनात उत्साह वाढू लागतो. जीवनातील नकारात्मक दृष्टिकोन बदलतो. ही भावना फार महत्त्वाची असते. यामुळे जीवनातील ताणतणाव, स्ट्रेस कमी होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी
कोरोनरी अॅन्जिओग्राफी या तपासणीमध्ये जर कोरोनरी आर्टरीला अवरोध असल्याचे निदर्शनास आले, या अवरोधाची ट्रीटमेंट म्हणजे प्रत्येक वेळी बायपास सर्जरीच करावी लागते, असे नाही. गेल्या १५ वर्षांपासून कमी त्रासदायक, कमी विच्छेदन लागणारी औषधोपचार पद्धती विकसित झाली असून तिचे नाव ‘कोरोनरी अॅन्जिओप्लास्टी’. अवरोध हा मुख्यत: चरबीनी बनलेला असल्यामुळे ह्य बलूनद्वारे दाबला जातो व आर्टरी पूर्ववत होऊ शकते. ज्या ठिकाणी आर्टरीमध्ये अवरोध आहे त्या ठिकाणी आधी बलून अॅन्जिओप्लास्टी केली जाते; त्यानंतर अवरोधाच्या आकारमानाप्रमाणे आणि रक्तवाहिनीच्या आकाराप्रमाणे स्टेंट निवडला जातो आणि बलून अॅन्जिओप्लास्टीप्रमाणेच त्या ठिकाणी स्टेंट बसवण्यात येतो. ह्य प्रक्रियेला अॅन्जिओप्लास्टी विथ स्टेंट असे म्हणतात.
अॅन्जिओप्लास्टीचे फायदे
अॅन्जिओप्लास्टी ही औषधोपचार पद्धती अत्यंत सुरक्षित व कमी वेळात होणारी आहे. (अर्धा तास) ह्यत कुठेही चिरफाड करण्याची आवश्यकता नसते, ना भूल देण्याची आवश्यकता असते. रुग्ण हा पूर्ण वेळ शुद्धीवर असतो, त्यामुळे जनरल अॅनेस्थेशिया देण्याचे जे धोके असतात, ते टाळता येतात. मुख्यत: वयस्कर लोकांमध्ये ही फारच उपयोगाची गोष्ट आहे. ज्यांना हृदयविकारावर सोबत बाकी आजारसुद्धा आहेत, उदा. दम्याचे विकार, किडनीचे आजार, हाडांचे आजार किंवा फार वयस्कर अशा लोकांना बायपास सर्जरीचा किंवा ४-६ तास अॅनेस्थेशियाचा त्रास होऊ शकतो अशा रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी वरदान ठरू शकते. बायपास सर्जरीमध्ये लावण्यात आलेल्या ग्राफ्टमध्ये जर अवरोध निर्माण झाला तरी त्याचीसुद्धा अॅन्जिओप्लास्टी करता येते. त्याला ‘ग्राफ्ट अॅन्जिओप्लास्टी’ असे म्हणतात.
रुग्ण फारच सिरिअस असेल, शॉकमध्ये असेल किंवा हार्ट अटॅकमुळे त्याचा रक्तदाब कमी झाला असेल अशा वेळी ज्या आर्टरीमुळे हार्ट अटॅक आला आहे, त्या आर्टरीची अॅन्जिओप्लस्टी केल्यास रुग्ण वाचू शकतो किंवा त्याचा रक्तदाब स्थिर होऊ शकतो. ज्यांना एक किंवा दोनच आर्टरीमध्ये मर्यादित अवरोध आहे त्याना अॅन्जिओप्लास्टी फार उपयोगी असते. तरुण रुग्णांवर सहसा अॅन्जिओप्लास्टी करण्यात येते. बायपास सर्जरी टाळता येत असल्यास टाळावी किंवा लांबवावी.
बायपास सर्जरी
जर कोरोनरी आर्टरीमध्ये अवरोधाचे प्रमाण जस्त असल्यास किंवा मुख्य कोरोनरी आर्टरीला जर अवरोध असल्यास किंवा विभाजन होणाऱ्या दोन आर्टरीच्या उगमावर जर अवरोध असल्यास बायपास सर्जरी करणे योग्य आहे.
हृदयरोग टाळण्यासाठी
दररोज सकाळी योग्य असा व्यायाम करावा. ह्य व्यायामाचे स्वरूप हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरकडून आखून घ्यावे. डॉक्टर रुग्णाच्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे आणि हृदयाच्या कार्यक्षमतेवरून त्याच्या व्यायामाचे स्वरूप ठरवतात. सकाळी उठून वेगाने चालण्याचा व्यायाम हा सर्व वयाच्या लोकांसाठी चांगला आहे.
आपल्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा. वजन आणि कमरेचा घेर कमी करावा. ह्यासाठी आहारात योग्य तो बदल करावा. आनंदी राहा. मानसिक शांतता व स्थैर्य याचा हृदयरोग्यांना उत्तम फायदा होतो. त्यासाठी ध्यान- धारणा, योगा ह्य गोष्टीचा उपयोग करावा. योग्य वेळी आणि शांत झोप शरीराला आवश्यक असते म्हणून रात्री ७ ते ८ तास छान झोप घ्यावी. धूम्रपान टाळा, तंबाखूचे सेवन बंद करा. मद्यपान टाळा. जेवणात मिठाचे आणि मसाल्यांच्या पदार्थाचा वापर कमी करावा. संताप, चिडचिड, वैताग, मत्सर, द्वेष, निराशा यांना सोबत वागवू नका. सामाजिक असहिष्णुता व एकाकी राहणे टाळा. आपला रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, नेमाने वैद्यकीय तपासणी करा अणि डॉक्टरचा सल्ला घ्या.. तो पाळा. आहार, विहार, आचार, विचारात योग्य तो बदल करून आपलं आरोग्य आणि शरीर निरोगी ठेवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. लोकसत्ता / डॉ. गजानन रत्नपारखी
बेल! शिवाची प्रिय गोष्ट ज्याखेरीज शिवपुजा पुर्णच होत नाही.
अगदी १००% भारतिय असलेला हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष माहित नसलेली व्यक्ती अर्थातच विरळाच. संपुर्ण भारतभर आढळणारं हे मध्यम आकाराचं झाड त्याच्या धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. "बिल्वे शाण्डिल्यशैलूषौ मलूरश्रीफ़लावपि" अशी वर्णनं अमरकोशात या झाडाची केली आहेत. Rutaceae ह्या लिंबू कुळाचा सदस्य असलेलं हे झाड, वनस्पतीशास्त्रात Aegle marmelos असं नाव धारण करतं. यातल ’एइगल’ हे नाव एका पुरातन ग्रीक निसर्गदेवतेच्या नावावरुन तर ’मारमेलॉस’ हे युरोपातल्या ’क्विन्स’ नावाच्या फ़ळाशी असलेल्या सांम्यावरुन ठेवलं गेलय. आजही, स्वातंत्र्यानंतरही आपण परकियांनी दिलेली नाव वापरण्यातच धन्यता मानत असतो. ईंग्रजीत ' गोल्डन अँपल ' किंवा 'बेंगाल क्विन्स' सारखी रुक्ष नावे मिळालेल्या ह्या भारतिय वृक्षाला गंधफ़ल, सदाफ़ल, शैल, महाकपित्थ, ग्रंथिल, कण्टकी, बिल्वम, बेल अशा सुंदर संस्कृत नावांनी गौरवलं गेलय.
बेलाचा वृक्ष पानझडी या सदरात गणला जातो. हा वृक्ष मध्यम आकाराचा असतो असं वरच्या ओळीतच मी लिहिलंय. साधारण १०-१२ मिटर उंची गाठणाऱ्या ह्या वृक्षाची पानं आपल्याला सुपरिचीत असतात. त्रिदल म्हणजेच तीन पर्णिकांची असलेली ही पानं हिरवीगार या सदरात मोडतात. जर नीट निरिक्षण केलं तर सहज दिसून येतं की या त्रिदलातली मधली पर्णिका कायम मोठी असते. या पानांचा देठही मोठा म्हणजे साधारण ४/५ सेमी असतो ज्यामुळे हे बेलपान त्याच्या अंगापासून लांब, एकाआड आलेली दिसतात. या बिल्वपत्रांना स्वत:चा एक खास सुगंध असतो जो त्यांना चुरडल्यावर सहज जाणवतो. या सुगंधाचे कारण म्हणजे या पानांवर सुगंधी तैलग्रंथींचे ठिपके असतात. हे ठिपके पान उजेडाकडे धरल्यास सहज दिसुन येतात. या पानांचे शिवपुजेत अनन्यसाधारण महत्व असल्याने वर्षभर यांना प्रचंड मागणी असते. मात्र धार्मिक उपयोगाखेरीज यां पानांचे आयुर्वेदिक उपयोग आहेतच. या पानांचा उपयोग सर्दीवरील काढा करण्यासाठी अजुनही केला जातो. तसेच ताज्या बेलपानांचा वापर लेप करून जखमांसाठीही करताना मी खेड्यांंमधे पाहिला आहे. साधारण हिवाळा संपत आला की या वृक्षाची पानं गळायला सुरुवात होते. अर्थात, वसंताच्या आगमनाबरोबरच येणारी नविन पालवी त्याच्या फ़ुलण्याची जणू नांदीच असते. साधारण एप्रिल मे च्या सुमारास बेलाला २ ते २.५ सेमी आकाराची हिरवट पांढरी सुवासिक फ़ुलं यायला सुरुवात होते. चार पाकळ्यांच हे फ़ुल अगदी मंद रंगाच असतं ज्यातून फ़लधारणा होवुन पुढे पावसाळ्यात बेलफ़ळं दिसायला लागतात.
पावसाळ्यात बाळसं धरणारी ही बेलफ़ळं बेलाच्या पानापेक्षा जास्त औषधी महत्व बाळगतात. शिवमंदिरांसमोर विकायला ठेवलेली लहानमोठी बेलफ़ळं आपण पाहिलेली असतातच. कठीण सालीचे हे फ़ळ पिकलेल्या स्वरुपापेक्षा कच्चं असतानाच अधीक वापरले जाते. लांबट गोल आकाराची ही फ़ळं पिकायला मात्र पुढचा उन्हाळा यावा लागतो. ही फ़ळं आतून चिक्कट गोडसर असतात. याचा गर चक्क केशरी रंगाचा असतो नी भरपूर बियाळ असतो. बेल मुरंबा खाऊन अनेकांची लहानपणं समृद्ध झाली आहे हे नक्की. याच बेलफ़ळाच्या पिकलेल्या गराचे सरबत तर अगदी अमृततुल्य लागते. याचे अनेक औषधी उपयोग आयुर्वेदात लिहिलेले आहेत. पचनशक्ती सुधारण्यासाठी, पोटाचे आजार दूर व्हायला, मलावरोधावर रेचक, मधुमेहावर साखर कमी करण्यासाठी, काविळीसाठी, वात नाशनासाठी... एक न दोन. अनेकाविध उपयोग ह्या वृक्षाचे आहेत.
अनेकांनी बेलाची पानं पाहिली असतात पण झाड पाहिले नसते. याचं खोड खडबडीत असतं नी साल करडट, पिवळसर रंगाची असते. या झाडाचे लाकूड पिवळट करडट रंगाचे असते. साधारण आपल्याला माहितच नसतं की बेलाचे लाकूड मजबूत समजले जाते. या लाकडाची गम्मत म्हणजे, कापल्यावरही काही काळ ते सुगंधीत रहातं.या लाकडाचा उपयोग बैलगाड्या, , हत्यारांच्या मुठी, शेतकामाची अवजारं बनवायलाही होतो. उत्तरेकडे, या लाकडाचा वापर कोरीव कामाच्या वस्तू बनवायला होतो. खास सांगायचं म्हणजे, या लाकडाचा लगद्याचा उपयोग आवरणाच्या कागदासाठी केला जातो. या झाडाचा डिंक चांगल्या दर्ज्याचा असून अगदी बाभळीच्या डिंकाइतका दर्जा त्यात असतो. रहाता राहीली याची मुळं! यांचाही वापर औषधांमध्ये केला जातो. प्रसिद्ध दशमुलारिष्टात याची मुळे वापरली जातात...
आपल्या पुर्वजांना या औषधी वृक्षाचं महत्व कधीच कळलं होतं. म्हणुनच अथर्व वेदात याला जळणासाठी तोडू नये असे लिहिले आहे. आजही संथाल जमातीत या झाडाला देवता म्हणुन पुजण्यात येतं नी प्राणपणाने जपलं जातं. तास पाहायला गेलं तर बेलाबद्दल लिहावं तितक कमीच. मी आयुर्वेदाच्या द्रुष्टीने मला माहीत असलेल्याच गोष्टी इथे लिहिल्या असून या वृक्षाचे अनेक औषधी गुण मला माहित नाही. जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे, बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनीत लागते नी वाढते. ताज्या बियांपासून , मुळांच्या फ़ुटव्यातून नविन रोपं सहज बनतात. ह्यामुळेच शासनाने वनशेतीसाठी हे झाड पुरस्कृत करायला हल्ली सुरुवात केली आहे.
हे लिखाण थांबवताना बेलाबद्दल सांगायचं वैशिष्ठय म्हणजे, बेल हा एकमेव वृक्ष आहे ज्यावर संस्कृत भाषेत अष्ट्क लिहिलं गेलय.
-- सुषमा मोहिते
( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )
माझे वडील वैद्य अरविंद जोशी यांच्या सांगण्यात असे आले की एका वैद्याने एका दमेकरी पेशंटला १५ दिवस पुरणपोळी खायला सांगितली आणि त्याचा दमा गेला. ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.
माझे म्हणणे होते की डाळीचे पदार्थ खाल्ले की गॅसेस होतात. मग एवढे दिवस फक्त पुरणपोळी खाल्ली तर किती गॅसेस होतील. त्रास होईल. मात्र बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते.
त्यांचे म्हणणे होते की हरबरा डाळीने गॅसेस होत नाहीत तर बाहेर पडतात. आणि आपले पूर्वज काय वेडे होते काय ज्यांनी दिवाळी सोडून इतर सर्व सणांना पुरणपोळी करायची पद्धत पाडली?
मुद्दा विचार करायला लावणारा होता.
मी ठरविले १५ दिवस नाही ७ दिवस करून तर बघू. आपल्याला दमा नाही का इतर त्रास ही नाहीत बघूया काय होते ते. दि. २६ जुलै २०१६ पासून मी पुरणपोळीचा उपवास सुरु केला.
माझे बघून माझ्या पत्नीनेही सुरु केला. तीची कंबर दुखत होती फार वेळ बसवत नव्हते. झोपावे लागत होते.
नाष्ट्या पासून रात्री झोपे पर्यत जे काही खायचे ते फक्त पुरणपोळीच.
पहिले दोन दिवस बरेच गॅसेस सुटले. नंतर थोडे अँसिडीक वाटले म्हणून बाबांशी बोललो. ते म्हणाले काकडी खा. म्हणून दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण झाले की काकडी खायला सुरवात केली. आणि काय गम्मत अँसिडीटी ही नाही आणि गॅसेस ही सुटेनसे झाले.
दर तीन ते चार तासांनी सडकून भूक लागायला लागली. शरीर मागणीच करत होते.
दुसर्याच दिवसापासून शरीर अतिशय हलके वाटायला लागले. पोट साफ व्हायला लागले. भूक वाढली. एनर्जी वाढली. रात्री पर्यत फ्रेश रहायला लागलो. खाल्लेले सगळे पचून जाते असे जाणवायला लागले.
४ थ्या दिवशी मात्र गोडाचा कंटाळा येऊ लागला. पण शरीर इतके हलके वाटत होते की उपवास सोडायची काही इच्छा होत नव्हती.
मला गोड पुरणपोळी खायचा कंटाळा आला होता, इतर पदार्थ खावेसे वाटू लागले होते. पण मन मारले. आपण स्वतः वर प्रयोग करत आहोत तर तो पूर्ण करायलाच पाहिजे. पेशंट असतो आणि एखाद्या वैद्याने सांगितले असते तर मध्येच सोडून चालले असते का? आणि सोडले तर गुण आला नसता तर दोष कोणाचा? माझा की वैद्याचा? अजून तीन दिवसच आहेत करू पूर्ण काय होतंय त्यात.
तिकडे बायाकोने पण पुरणपोळीचा उपवास सुरु केला होता. पण तिचा निग्रह कमी पडला. तिने तिसर्याच दिवशी रात्रीचे जेवण सुरु केले पण ते म्हणजे ज्वारी व डाळीचे पीठ एकत्र करून त्याचे थालीपीठ करून खाऊ लागली . पण तो पर्यत तिलाही फायदा झाला. तीला सहसा गॅसेस सुटत नाहीत. पण तिलाही प्रचंड गॅसेस सुटले. तिची कंबर दुखी ९०% कमी झाली. ती दोनच दिवसांत चार पाच तास बसू लागली. पाच दिवसांनी विचारले तर कंबरदुखी पूर्ण पणे थांबली होती.
भूषण जोशी
व्दारा वैद्य अरविंद जोशी,
६१५ नारायण पेठ नवश्रीमान सोसायटी लोखंडे तालीम जवळ पुणे ३०
सोमवार, गुरुवार, शनी वारी संध्याकाळी ४ ते ६
Copyright © 2025 | Marathisrushti