वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
चाळिशीपर्यंत सगळेच जण आरोग्याकडे दुर्लक्षच करीत असतात. चाळिशी पार केली की मग मात्र शरीर धोक्याची घंटा वाजवायला लागतं. ती वेळेवर ऐकली आणि आहाराविहारात वयानुरूप बदल केले तर पुढचे अनेक धोके टाळता येतात.
दिवसेंदिवस मानवी जीवन खूपच वेगवान, धावपळीचे होत चालले आहे. एक काळ शहरी व ग्रामीण, जीवनात खूप वेग नव्हता; ‘वाघ मागे लागल्यासारखी’ धावपळ नव्हती; रात्रपाळी हा रोजचा जीवनमंत्र नव्हता; जेवण बहुधा घरचेच असे; पण आता सगळ्यांचीच जीवनशैली बदललेली आहे. आत्ताच्या ‘फास्ट’ युगात मानवी जीवनाचे सहा टप्पे करता येतील. पाच वर्षांपर्यंतचे शिशुजीवन, पंधरा-सोळा वर्षांपर्यंतचे बाल व नवतरुणाचे जीवन, अठरा ते पस्तीस-चाळिशीपर्यंत ऐन तरुणाईचा काळ, चाळीस ते साठपर्यंत तारुण्य व जबाबदारी असा सुंदर मिलाप असणारा; आयुष्यात काहीतरी निश्चित घडविण्याचा काळ; साठीनंतर ऐंशीपर्यंत ‘फ्रुटफुल’ आयुष्य जगण्याचा निवृत्तिकाळ व त्यानंतरचे नव्वदी-शंभरीपर्यंतचे ‘बोनस लाइफ’ यातील सर्वात महत्त्वाच्या चाळिशीनंतरच्या तरुणाईच्या निरंतर आरोग्याकरिता आहार, विहार व व्यायाम कसा असावा हे पुढील लेखात आपण पाहत आहोत.
आपला व्यवसाय व नोकरीधंदा चालू असताना वय वर्षे चाळीस-पंचेचाळीसपर्यंतचा काल हा ऐन तारुण्याचा, कर्तृत्वाचा, हिमतीचा, आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करण्याचा, भविष्याबद्दल फिकीर न करता एका विशेष मस्तीत पौरुषत्वाने संपूर्ण जीवन, पुरेपूर रस घेऊन जगण्याचा काळ आहे. हा काल पित्ताचा काळ आहे, ऊर्जेची गरज असणारा व ऊर्जा खर्च करण्याचा काळ आहे. या काळांत कितीही आव्हाने, संकटे, अडचणी, प्रश्न उभे राहोत, ते पेलण्याची, त्यांना तोंड देण्याची हिंमत शरीर व मनाची असावी. असे आरोग्य निसर्गत:च अपेक्षित असते. ‘फरशीवर पडलो तर फरशीला खड्डा पडेल, मला काही होणार नाही,’ अशी हिंमत बांधूनच पुढे जावे लागते. या काळात कमावलेले शरीर व मन पुढील उतरणीच्या काळांत साथ देणारे असते. त्याकरिता कर्तृत्व दाखवता येईल याकरिता पुरेशी ऊर्जा, बलदंड शरीर कमवायलाच हवे व त्याचबरोबर पुढील आयुष्याकरिता उपयोगी पडेल असे काटक शरीर व नाना मगजमारीकरिता सामना देईल असा ‘वरचा मजला’ सक्षम हवा. या सक्षमतेकरिता संगतसुद्धा चांगलीच हवी. गृहस्थाश्रमाचा आदर्श कसा असावा, हे सांगणारे कविवर्य मोरोपंत काय म्हणतात?
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो ।
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो ।।
आजकाल सकाळी पहाटे उठून फिरायला जाण्याची मोठीच ‘क्रेझ’ फक्त वृद्धातच नव्हे तर तरुणाईमध्येही आहे; ही मोठी आनंदाची बाब आहे. अलीकडे लहान-मोठय़ा शहरात जिममध्ये जाऊन, पैसे मोजून, शरीर कमावण्याचे प्रयत्न वाढत आहेत. पूर्वी घरच्या घरी सकाळी उठल्या उठल्या; ‘आईच्या नावाने दोन, वडिलांच्या नावाने दोन व देवाच्या नावाने दोन’ असे सहा सूर्यनमस्कार घातले जात. असे सूर्यनमस्कार किती ‘जिमवाले’ घालतात? अशा सहा सूर्यनमस्कारांपासून सुरुवात करावी; रोज एक-एक याप्रमाणे वाढवत किमान चोवीस-पंचवीस सूर्यनमस्कार सकाळी घालावेत. नंतर स्वस्थपणे दोन-तीन मिनिटे दीर्घश्वसन-प्राणायाम करावा. आवश्यकतेनुसार पश्चिमोत्तानासन, अर्धवज्रासन, कमान, मानेचे व्यायाम व सर्वात शेवटी शवासन करावे. या सगळ्यांकरिता बारा ते पंधरा मिनिटे पुरेशी होतात. हा व्यायाम आपल्या आयुष्यभरची आरोग्य इस्टेट कमावण्याकरिता नेहमीच साथ देतो.
कोणताही उद्योग, व्यवसाय, श्रमाचा वा बैठा असला तरी अन्न हवेच. या अन्नात आपल्या राहणीमानानुसार गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी अशी पोटभरू धान्ये आहेत. मराठी माणसाच्या प्रकृतीला व येथील हवामानाला धरून कोकणांत तांदूळ व नाचणी किंवा नागली व देशावर जोंधळा वा ज्वारीच हितकर आहे.
चाळिशीच्या आसपास पोचलेली व्यक्ती, मग ती व्यापारी वा नोकरदार असो; व्हाइट कॉलर वा ब्लू कॉलर असो; धनवान वा हातावर पोट असणारा मजूर असो; शेतात, रस्त्यावर, खाणीत, खाडीत राबणारा; श्रमसंस्कृती जपणारा कर्मचारी असो. या सर्वाना रोज किमान दहा-बारा तास काम करावेच लागते. कामाच्या मानाने शरीराला दर क्षणाला ऊर्जेची, ‘पेट्रोलची’ गरज, शरीराची गाडी नीट चालविण्याकरिता लागते. आयुर्वेदात ‘अन्नं वृत्तिकरणां श्रेष्ठम्’ असे शास्त्रवचन आहे. कोणताही उद्योग, व्यवसाय, श्रमाचा वा बैठा असला तरी अन्न हवेच. या अन्नात आपल्या राहणीमानानुसार गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी अशी पोटभरू धान्ये आहेत. मराठी माणसाच्या प्रकृतीला व येथील हवामानाला धरून कोकणात तांदूळ व नाचणी किंवा नागली व देशावर जोंधळा वा ज्वारीच हितकर आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात जे रोग त्रास देऊ शकतात असे मधुमेह, स्थौल्य, आमांश, आमवात, संधिवात, मूळव्याध, प्रमेह, हृद्रोग, रक्तदाब, दमा, स्थौल्य, अर्धागवात, सायटिका, सूज, मूत्रपिंडाचे विकार, ग्रहणी, अग्निमांद्य, पोटात गॅस धरणे, बुद्धिमांद्य, त्वचाविकार या सगळ्या विकारांना शरीरांत साठवायला थारा द्यायचा नसेल तर ‘ज्वारी सकाळी व जोंधळा सायंकाळी’ असे प्रमुख अन्न असावे. ज्वारीत फाजील कोलेस्टरॉल नाही, याउलट पोट भरण्याकरिता व कितीही श्रम शरीराला सहन होतील अशी ऊर्जा आहे. त्याला तेल तूप लागत नाही. शिळी भाकरी झाली तरी खराब होत नाही. नुसत्या पाण्याबरोबर ज्वारीची भाकरी खाता येते. क्वचित ज्वारी थंड पडते, त्यांनी त्यात बाजरी मिसळून भाकरी करावी. बाजरीत ज्वारीचेच गुण आहेत. पण बाजरी उष्ण आहे. काहींना बाजरी खाल्ल्यावर शौचाला रक्त पडते. बाजरीची भाकरी तारतम्याने वापरावी, शक्यतो ज्वारीचाच वापर करावा. ज्वारीचे मी कितीही गुणगान केले तरी लोक गहू वापरणारच, कारण घरोघरी, हॉटेलमध्ये, बेकरीच्या पदार्थात सर्वत्र गहू आहेच. हा गहू महाराष्ट्रात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आला व त्याने आमच्या मोठमोठय़ा ज्वारीला दुय्यम स्थान दिले आहे. स्थूल व मेदस्वी व्यक्तींनी सुकी चपाती आणि कृश व वातप्रधान व्यक्तींनी व्यवस्थित तेल घालून गव्हाची पोळी खावी. भावी आयुष्यात ज्यांना मधुमेहाचे भय आहे त्यांच्याकरिता मेथीपोळी व आमांश, आमवात, मलावरोध, संधिवात, सायटिका, फ्रोजन शोल्डर यांच्याकरिता एरंडेल पोळी आहे. पण ऐन तारुण्यात या सवयी लावून घेऊ नयेत. ज्यांना भाताशिवाय चालत नाही त्यांनी शक्यतो जुना तांदूळच वापरावा. मिळाला तर हातसडीचा तांदूळ वापरावा. त्यामुळे शरीरात नाना तऱ्हेचे सूजेचे विकार होण्याची कारणे टळतील. नवीन तांदळामुळे आमांश, सर्दी, कफ हे विकार बळावतात. नाचणी किंवा नागली हे धान्य अशक्त व्यक्ती, हलका कोठा असणारे, दीर्घ काळचा ताप वा अन्य आजारांतून उठण्याकरिता आहे. भरपूर श्रम करणाऱ्यांकरिता त्याची गरज नाही.
कडधान्य त्यांत तूर, मूग, मसूर, उडीद, हरभरा, वाटाणा हे सगळे पचवायची तारुण्यात पचनशक्ती असावयास हवी. पोटांत वायू धरू नये म्हणून त्यांच्याबरोबर आले, लसूण, जिरे अशी योजना असावी. पालेभाज्या, फळभाज्या या ऋतुमानानुसार सर्वच खाव्यात, पचवाव्यात, बटाटा व कांदा हे सर्वाचेच रोजचेच आवडीचे असो-नसो, गरजेचे तोंडी लावण्याचे अन्न आहे. यांतील कांदा हा अधिक चांगला. त्यात रोगप्रतिकारशक्तीआहे. भाज्यांमध्ये लसणीचा वापर न करिता स्वतंत्र लसूण नियमितपणे खाल्ला तर भावी आयुष्यांत ‘दर क्षणाला टिकटिक करीत चालेल असे हृदयाचे घडय़ाळ’ कधीच दगा देणार नाही. याप्रमाणेच जेवणात आले असेल तर आमाशय म्हणजे पोटाचे स्वास्थ्य नीट राहील. माझ्या लहानपणात खूप फळे खावयाची सार्वत्रिक सवय नव्हती. अलीकडे फळांचे बंड खूप माजले आहे. ऋतुमानानुसार सर्वच फळे चांगली. दीर्घायुष्याकरिता फलाहार जरूर असावा. त्यातल्या त्यात पपई, डाळिंब, ताडफळ, सफरचंद, वेलची केळे, पांढरे खरबूज, नारळाचे ओले खोबरे, अंजीर, केमिकल्सवर न पोसलेली गोलाई असलेली आंबट नसलेली द्राक्षे, अननस यांचा तारतम्याने व खिशाला परवडेल असा वापर करावा. दैनंदिन आहारात फाजील तेल, तूप, मीठ, मिरची, तिखट मसाला नसावा. डालडा किंवा तत्सम वनस्पतिजन्य तेल टाळावेच. कारण त्यामुळे केस, दृष्टी, हृदय, मेदसंबंधी विकार नक्कीच बळावतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकप्रभा/ वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.
दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. तोंड धुताना जीभ टंग क्लिनरनं स्वच्छ करावी. टंग क्लिनरनं जीभ स्वच्छ करताना जीभेवर जास्त दबाव टाकू नये. दोन-तीन वेळा हलक्या हतांनी टंग क्लिनरचा उपयोग करावा. आपल्या तोंडामध्ये हानिकारक जीवाणूंना जराही थारा देवू नका.
गडद रंगाचे खाद्य पदार्थ खाल्यामुळं जीभेचा रंग बदलतो. परंतु ते एवढे हानीकारक नसते आणि ते टंग क्लिनरच्या साहाय्यानं स्वच्छ करता येवू शकतात. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा धातुचा टंग क्लिनर वापरता येतो. काही कंपन्याच्या ब्रशच्या मागं जीभ स्वच्छ करण्यासाठीची सोय केलेली असते. ज्यामुळं आपण दातही घासू शकतो. आणि जीभही साफ करू शकतो.
जीभ स्वच्छ करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे माउथवॉशचा वापर करणे. अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाच-सहा वेळा गुळण्या करण्यानं सुध्दा जीभ स्वच्छ करता येते. जीभेवर घाण असल्यास ते डिहॉयड्रेशनचं कारण ठरु शकतं. त्यामुळं आपल्या जीभेची काळजी घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की "लवकर नीजे लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे "हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया....
खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.
रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात(Liver) रोखलेलीअसते.तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची(Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री 11 ते पहाटे 3च्या वेळेत होत असते.
तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.
. जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो.
जर 12 वाजता झोपलात तर 3तास
. जर 1 वाजता झोपलात तर 2 तास
. आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी.....
आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?
दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही.जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ?
काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता ?
ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ?
ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.
पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते. ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.
सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.
सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.
असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग....
अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी ताजेतवाने होऊन ऊठा.
त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या.
आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या.
ह्यात काहीच आश्चर्य नाही की ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात.ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.
शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश , टी व्ही , आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही.
आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना....
एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि मला घड्याळात 7 वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे. तर मी माझा नाश्ताआहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी 9 च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन.
जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर ? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील.
ह्याप्रकारे जास्तत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल
-जेम्स पॅंग
आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने (व्हयब्रेशनने) तो अवयव नीट काम करू लागतो आणि आपले आरोग्य सुधारते.
षट्चक्रांची बीजाक्षरे या विषयाचा अभ्यास सुरु केला तेव्हाची गोष्ट. माझ्या पत्नीला दोन दिवस शौचास झाली नव्हती. रंगकिरण चिकित्सा, चुंबक चिकित्सा करूनसुद्धा फायदा झाला नव्हता. मी तिला २५-२५ वेळा वं शं षं सं बं भं मं यं रं लं ही अक्षरे अनुस्वार देऊन म्हणायला सांगितली. तिने तसे केल्यावर तिच्या ओटीपोटात हालचाल जाणवली आणि तासाभराने काँल आला व एकदाचे पोट रिकामे झाले.
लहान मुलांना शु शी व्हावी म्हणून आपल्याकडे मोठी माणसे शु षू म्हणतात व मुलाला लघवी / शौच होते. लहान मुलाचे शरीर अतिशय कोवळे व नाजूक असते त्यामुळे ह्या बिजाक्षरांच्या दुसर्याने केलेल्या उच्चरांच्या कंपनांचाही परिणाम होतो.
सातार्याला एका बाईंना छातीत दुखले तर ठं म्हणा असे सांगितले. त्या म्हणाल्या अहो लक्षात कसे ठेवायचे? मी म्हटले विठ्ठल म्हणा. ही चर्चा येथेच संपली. दोन दिवसांनी त्या बाईंच्या छातीत दुखले. त्यावेळी त्यांना आठवला तो चर्चेतला विठ्ठल! नुसते विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले आणी स्वस्थ झाले
एका आजींना (वय ७३) संडासला त्रास, त्यामुळे gases असा त्रास होता. डॉक्टरांच्या मते आतड्यांना वयोपरत्वे शिथिलता आली. मी त्यांना मूलाधार व स्वाधिष्ठान ची अक्षरे म्हणावयास सांगितले. त्या म्हणाल्या ही अक्षरे लक्षात कशी ठेवायची? म्हणून त्यांना ‘बं भोले नमः शिवाय’ म्हणण्यास सांगितले. (यामध्ये मूलाधार व स्वाधिष्ठान ची बरीच अक्षरे येतात) आठ दिवसात त्यांनी सांगितले की ‘काका मला चांगला फरक पडला तुमच्या मंत्रामुळे’ दोन महिन्यांनी माझ्या पत्नीला आजी भेटल्या तिलाही सांगितले ‘काकांनी दिलेला मंत्र म्हणते आणि माझी तब्येत ठीक आहे. औषध घेत नाही!’
डोंबिवलीच्या एका बाईंचा फोन शनिवारी संध्याकाळी आला. ‘मला गेले १५-२० दिवस जुलाब होत आहेत. पोटात दुखते आहे. डॉक्टरांच्या औषधांनी फरक नाही. तुमची रंगकीरण चिकित्सेची औषधे तातडीने पाठवा.’ मी म्हणालो 'कुरिअर सर्व्हिस रविवारी बंद. तुम्हाला मंगळवारी औषधे मिळतील.’ ‘मग मी काय करू?’ मी म्हणालो 'तुमच्याकडे माझे षट्चक्रे आणि आरोग्य हे पुस्तक आहे ना? त्यातील मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूरची अक्षरे ५०-५० वेळा म्हणा
पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!
आमच्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार (ज्यात वैद्याला व डॉक्टरला पैसे मिळत नाहीत) दिले. त्यांना आम्ही जुनाट, अडाणी म्हणतो. अशास्त्रीय (पाश्चात्य लोकांना मान्य नाही असे) म्हणतो.
मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. तरी वाचकांना विनंती की विश्वास ठेऊन अथवा न ठेवता मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा. माझ्या अनुभवा प्रमाणे एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते. बर्याचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्रांची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते
मूलाधार चक्राची अक्षरे -
वं, शं, षं, सं
स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे -
बं, भं, मं, यं ,रं, लं
मणिपूर चक्राची अक्षरे -
डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं
अनाहत चक्राची अक्षरे-
कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं,टं, ठं
विशुद्ध चक्राची अक्षरे-
अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अंः
अज्ञा चक्राची अक्षरे-
हं, क्षं
अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी माझे जून २००१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेले 'षट्चक्रे आणि आरोग्य' हे पुस्तक अभ्यासावे.
-- अरविंद जोशी
९४२१९४८८९४
WhatsApp वरील वैद्य सुविनय दामले यांच्या आरोग्यदूत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.
आयुर्वेदाच्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध असलेला शब्द म्हणजे ‘इंटिग्रेटेड प्रॅक्टिस’. शब्दकोषानुसार या शब्दाचा अर्थ एकात्मिक असा असला तरी आयुर्वेदात मात्र हा शब्द वेगळ्या अर्थाने पाहिला जातो. इंटिग्रेटेड म्हणजे आयुर्वेदाची पदवी घेऊन आधुनिक शास्त्राचे उपचार देणे वा त्यांची सरमिसळ करणे. आयुर्वेदाची विद्यमान शिक्षणपद्धती आणि धोरणे ठरवणाऱ्या शीर्ष परिषदेची उदासिनता यामुळे सध्याचा आयुर्वेदाचा विद्यार्थी ग्रंथांपासून दूर आणि औषधी विक्रेत्यांच्या जवळ कसा जाईल याची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याने असे विचार बऱ्याचदा वाढीला लागतात.
ज्या दोन शास्त्रांचे मूलभूत सिद्धांतच न जुळणारे आहेत त्यांना इंटिग्रेट करण्याचा विचार करणं म्हणजे तेलात पाणी ओतून ‘एकजीव मिश्रण’ तयार केल्याचा दावा करणे होय. या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळू शकतील का? नाही. आहारापासून विचारापर्यंत कोणतीच गोष्ट जुळत नाही; किंबहुना अगदी विरुद्ध टोकाची आहे अशा व्यक्तींची लग्न जुळवण्याचा अट्टाहास हा सप्तपदीपासूनच घटस्फोटाच्या दिशेने पावले टाकणारा असतो. त्याचप्रमाणे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकाचे आहे. आयुर्वेदाचा अवघा डोलारा ज्या दोष- धातू- मल आदि संकल्पनांवर आधारित आहे त्यांनाच आधुनिक शास्त्र मानत नाही. पुढे बोलण्याचा प्रश्नच येतो कुठे?! याकरताच MBBS नंतर MD/MS (Ayurved) करायला देण्याच्या आत्मघातकी निर्णयावरील चर्चेला आम्ही वैद्यांनी विरोध दर्शवला होता.ज्यांना आयुर्वेद शिकायचा आहे त्यांनी BAMS करूनच तो शिकावा हे स्वच्छ गणित आहे. काहीजण मात्र उफराटे कारभार करत आयुर्वेदानुसार निदान आणि आधुनिक चिकित्सा वा आधुनिक शास्त्रानुसार निदान आणि आयुर्वेदीय चिकित्सा असे विचार करत असतात. काहीजण तर त्यापलिकडे जाऊन आधुनिक औषधे आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार कशी कार्य करतात हे ‘ओढून ताणून बसवून’ सांगत असतात. मात्र त्याच वेळेला आयुर्वेदानुसार ही औषधें कोणत्या ‘भैषज्यकल्पनेत’ बसतील यावर मात्र गुळणी धरून (बिटाडीनची?!) गप बसतात.
आयुर्वेदाला कोणाहीसमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. आचार्य चरकांच्या शब्दांत हे शास्त्र ‘शाश्वत’ आहे. पण मग आयुर्वेद स्वतःला फारच ग्रेट समजतो किंवा आयुर्वेदाचे आधुनिक विज्ञानाशी वावडे आहे का; तर मुळीच नाही. आयुर्वेदाला व्यक्त होण्यास आधुनिक वैद्यकाच्या कुबड्यांची गरज नाही इतकेच आमचे मत आहे. पण मग आयुर्वेदीय वैद्यांना तपासणीची प्रयोगशालेय साधने का लागतात? असा प्रश्न कित्येकजण उपस्थित करत असतात. मुळात हा प्रश्नच फसवा आहे. स्टेथोस्कोपपासून ते एमआरआय पर्यंतचे सगळे शोध हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी इत्यादि मूलभूत शास्त्रीय शाखांचे आहेत; आधुनिक वैद्यकाचे नाहीत!! त्यामुळे वैद्यांनी त्यांचा गरज पडेल तेथे वापर करण्यास काहीच प्रत्यवाय नाही. मात्र पुन्हा हा वापर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हवा. ही परीक्षणे आयुर्वेदानुसार प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. त्यापुढील अनुमान, युक्ति आदि प्रमाणे वापरताना आणि निदान-उपचार ठरवताना ते आयुर्वेदाच्या संकल्पना वा सिद्धांतांनुसार असायला हवे. याला खऱ्या अर्थाने ‘इंटिग्रेटेड’ म्हणता येईल. वैद्यांनी आधुनिक वैद्यकाच्या ओंजळीने पाणी पिणे बंद करावे असे मला तरी वाटते. काही घ्यायचेच असेल तर आपले शास्त्र सार्वभौम करण्याची आधुनिक वैद्यकाच्या पदवीधरांची वृत्ती आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेण्याची तयारी हे गुण घ्यावेत. त्यातच शास्त्राचे खरे ‘उपबृंहण’ करण्याची क्षमता आहे.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्यक असते. पाठदुखी व कंबरदुखीचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो, दुखण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी पाठदुखी सर्वांना माहिती असते. तसे पाहिले तर पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्यक असते. पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार असतो. वाकणे, उठणे, बसणे, वळणे, चालणे अशा बहुतेक सर्वच क्रिया करताना आपण पाठीच्या कण्याचा वापर करत असतो. मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागामध्ये बारा, कंबरेमध्ये पाच मणके असतात, माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेल्या स्थितीत असतात व त्याच्याही खाली तीन ते पाच मणके
जुळलेल्या स्थितीत असणारा कॉसिक्स म्हणून कण्याचा शेवटचा भाग असतो. अशा प्रकारे कवटीपासून ते बैठकीच्या भागापर्यंत हे सर्व मणके एकावर एक रचलेल्या स्थितीत असतात. दोन मणक्यांमध्ये जणू रबरापासून बनविल्यासारखी चकती असते, जिला "डिस्क (गादी)' असे म्हटले जाते. या मधल्या चकतीमुळेच कणा वाकू शकतो, वळू शकतो. या शिवाय या सर्व मणक्यांना व चकत्यांना धरून ठेवणारे अनेक संधिबंधने, स्नायू असतात. या कण्यामध्ये मज्जारज्जूचे स्थान असते. अतिशय महत्त्वाच्या व नाजूक मज्जारज्जूला पाठीचा कणा चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम करत असतो. पाठदुखीचे कारण पाठदुखी असे म्हटले जाते तेव्हा हे दुखणे पाठीच्या कोणत्याही भागात उद्भवलेले असू शकते, तसेच पाठीच्या कण्यातील कुठल्याही संरचनेतील बिघाडाशी संबंधित असू शकते. उदा. पाठीच्या हाडांमधली ताकद कमी झाली तरी पाठ दुखू शकते. इतर हाडे ठिसूळ होतात त्याप्रमाणे मणके ठिसूळ होऊ लागले तरी पाठ दुखू शकते, कण्याला बांधून ठेवणाऱ्या संधिबंधनांना दुखापत झाली तरी पाठ दुखू शकते, कण्याला आधार देणारे स्नायू जखडू लागले तरी पाठदुखी सुरू होऊ शकते. दोन मणक्यांमधल्या चकतीची झीज झाली किंवा काही कारणाने ती स्वस्थानातून थोडी जरी निसटली आणि याचा दाब नसेवर आला तरी तीव्र स्वरूपाची पाठदुखी निर्माण होऊ शकते. याशिवाय स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयातील अशक्तता पाठदुखीला कारण ठरू शकते. अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अतिरक्तस्राव होणे हेसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देऊ शकते. स्त्रीप्रजननसंस्थेत कुठेही सूज असली, जंतुसंसर्ग असला तरी त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी उद्भवू शकते. अर्थात अशा वेळी फक्त पाठीवर नाही तर आतील दोषावर नेमके उपचार करणे आवश्यक असते. वाढत्या वयानुसारही पाठ-कंबरदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, संगणकावर रोज 10-12 तास काम हीसुद्धा पाठदुखीची कारणे होत. फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे हीसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात. बिघडलेला वातदोष आयुर्वेदानुसार विचार केला तर पाठदुखी, कंबरदुखी ही वातदोषातील बिघाडाशी संबंधित तक्रार होय. पाठीतील लवचिकता कमी होणे, उठता-बसताना आधाराची गरज भासणे, पाठ जखडणे, पाठीत चमक भरणे वगैरे सर्व तक्रारी वातदोषाशी संबंधित असतात आणि म्हणूनच सहसा पाठदुखी बरोबरीने वाताची इतर लक्षणेही उदा. गुडघेदुखी, मलावष्टंभ, गॅसेस, त्वचा कोरडी पडणे, अशक्तपणा जाणवणे, पाय दुखणे, नेहमीच्या हालचाली करताना सहजपणा न राहणे, सांध्यांमधून कटकट आवाज येणे वगैरे त्रास जाणवू लागतात. म्हणूनच पाठदुखी, कंबरदुखीवर उपचार करताना वाढलेल्या, बिघडलेल्या वातदोषाला संतुलित करणे, झीज झालेली असल्यास ती भरून काढणे आणि ज्या कारणामुळे पाठदुखी सुरू झाली असेल ते कारण दूर करणे अशा प्रकारे योजना करणे आवश्यक असते. पाठ दुखायला लागली, की विश्रांती घ्यावीशी वाटते हा सर्वांचा अनुभव असतो आणि सहसा यामुळे बरेही वाटते. मात्र, फार तीव्र स्वरूपाची पाठदुखी असेल, अगदी साध्या हालचाली करणेही अवघड होत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. विशेषतः वेदना पाठीतून सुरू होऊन पायांच्या टोकापर्यंत पोचत असतील, श्वासोच्छ्वास करताना त्रास होत असेल, छातीत दुखत असले तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे इष्ट होय; परंतु अशी परिस्थिती येऊ नये यासाठी दक्ष राहणेच इष्ट. प्रतिबंधात्मक उपाय संपूर्ण शरीराचा आधार असणाऱ्या पाठीच्या कण्याची सुरवातीपासून काळजी घेतली तर पाठदुखी-कंबरदुखीला प्रतिबंध तर होतोच, पण एकंदर चेतासंस्थेचे आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते. वातदोष संतुलित राहावा, पाठीच्या कण्यातील हाडे व सांधे तसेच आतील मज्जारज्जू यांचे पोषण व्हावे यादृष्टीने पुढील उपचार करता येतात. मान व पाठीला तेल लावणे. वाताला संतुलित ठेवण्यासाठी, सांध्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय होय. स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी खालून वर या दिशेने पाठीच्या कण्याला तेल उदा. संतुलन कुंडलिनी तेल लावता येते. नस्य - रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरचे साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे. विशेषतः हे मानेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. तसेच मेरुदंडाला ताकद देण्यासाठी साहायक असते. रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे. वाताच्या असंतुलनामुळे पोट साफ होत नाही आणि पोट साफ झाले नाही तर त्यामुळे वात अजूनच बिघडतो. अर्थातच या दुष्ट चक्राचा पाठीच्या कण्यावरही दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे चांगले. आवश्यकतेनुसार अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेता येते. आहारात वातशामक, कफपोषक पदार्थांचा समावेश असणे - किमान चार-पाच चमचे घरचे साजूक तूप रोजच्या आहारात ठेवणे, रोज कपभर ताजे सकस दूध पिणे, दुधात खारकेची एक चमचा पूड टाकणे, बरोबरीने शतावरी कल्प, चैतन्य कल्प घेणे हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे हितकारक ठरते. मज्जापोषक, अस्थिपोषक पदार्थांचे सेवन करणे - खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, च्यवनप्राश, मॅरोसॅनसारखे रसायन रोज घेणे हे मणके, मेरुदंड अशा दोघांच्या आरोग्यासाठी चांगले असते. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे - पाठीचा कणा आणि मानसिक ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. ताणामुळे कण्याजवळील पेशी कडक झाल्या तर त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते, पर्यायाने मानेचे व पाठीचे त्रास होण्याची शक्यता वाढते. मानसिक ताण आला तरी तो कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, संगीत ऐकणे, ॐकार गुंजन यांसारखे उपाय करता येतात. पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम. यामध्ये सर्वप्रथम येते ते चालणे. रोज 30 मिनिटे नियमित चालल्यास पाठीच्या मणक्यांची, मणक्यांमधील गादीसारख्या डिस्कची लवचिकता नीट राहते, त्यामुळे मान-पाठीचे त्रास कमी होण्यास प्रतिबंध होतो. याखेरीज ताडासन, अर्धशलभासन, स्कंध चक्र, मार्जारासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, विस्तारण ही आसनेही मानेच्या-पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. मानेचे सोपे व्यायाम, उदा. ताठ बसून मान हलकेच मागे नेणे, पुढे आणणे, डावी-उजवीकडे फिरविणे, खांद्यांच्या बाजूला शक्य तेवढी वाकवणे, पुन्हा सरळ करणे या प्रकारचे व्यायाम करता येतात. बैठे काम असणाऱ्यांनी, विशेषतः संगणकावर काम करावे लागणाऱ्यांना तर हे व्यायाम खुर्चीत बसल्या बसल्यासुद्धा करता येतात. प्राणायाम, दीर्घश्वसन किंवा या दोघांचा एकत्रित परिणाम देणारे ॐकार गुंजनसुद्धा पाठीच्या कण्यासाठी उत्कृष्ट उपाय होय. या उपायांनी हवेतील प्राणशक्ती अधिक प्रमाणात मिळू शकते व ती मेंदू, मेरुदंड यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्यक असते. प्राणशक्तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला की वेदना, जखडणे, अवघडणे यांसारख्या तक्रारींना वाव मिळत नाही, उलट रक्ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. रोज किमान 10-15 मिनिटे यासाठी काढली तर पाठीच्या कण्यासंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होऊ शकेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे.
जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रणदेखील असू शकतं.
हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.
पित्त प्रकृती
‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.
काय टाळावं-
यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.
वात प्रकृती
‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.
कफ प्रकृती
‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.
कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.
काय टाळावं-
पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- वैद्य राहुल सराफ
एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत. मुळात होऊन जाणार ही संकल्पनाच आकर्षक आणि मजेशीर वाटावी अशी आहे. एरोबिक्स सत्तरच्या दशकातच परदेशात एरोबिक्स लोकप्रिय होऊ लागले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या गरजेनुसार इतर प्रकार शोधून काढायला सुरुवात केली. झुंबा असो की बॉलीवूड डान्स. सगळ्याचा पाया एरोबिक्स हाच! एरोबिक्स म्हटलं की म्हणजे तालबद्ध कवायत डोळ्यासमोर येते. पण उगीचंच कशाही उडय़ा मारणे किंवा इकडे-तिकडे वळून व्यायाम करणे म्हणजे एरोबिक्स नव्हे. एरोबिक्समध्ये ‘फ्लोअर एरोबिक्स’ व ‘बेंच एरोबिक्स’ असे दोन प्रकार आहेत. फ्लोअर एरोबिक्समध्ये सुरुवातीला ‘वॉर्म अप’ व्यायाम करावे लागतात. यातही नुसते कसेही हात-पाय हलवून चालत नाही. वॉर्म अपच्याही ठरलेल्या स्टेप्स असतात. त्यालाच जोडून ३० ते ४० मिनिटे पोटावरील स्नायूंना (अॅअब्ज) तसेच कमरेखालच्या व वरच्या शरीराला व्यायाम दिला जातो.
एरोबिक्स मध्ये वॉर्म अप असतोच. पण प्रत्यक्ष व्यायाम ‘बेंच’वर म्हणजे ठरावीक उंचीच्या मोडय़ांवर साधारण ३० मिनिटांसाठी असतो. कमरेखालचे आणि वरचे शरीर व हृदय यांच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे. यात बेंचच्या स्टेप्स चढणे व उतरण्यात पायांचाही खूप वापर होतो. झुंबा आणि बॉलीवूड डान्स झुंबा या प्रकारात एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर ठरावीक पद्धतीने बसवलेल्या नृत्यासारख्या स्टेप्स केल्या जातात. यातली संगीत व गाणी ठरलेली असतात. संगीत हेच झुंबाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संगीताच्या तालावर पाय आपसूक थिरकायला लागतात आणि नाचायचा हुरूप येतो. ७-८ वर्षांपूर्वीपासून झुंबा आपल्याकडे आला आणि हळूहळू लोकप्रियही होऊ लागला. बॉलीवूड डान्समध्येही वॉर्म अप चुकत नाही. पुढची ३० ते ४० मिनिटे व्यायाम करायचा असल्याने तो गरजेचा असतो. एरोबिक्स, झुंबा आणि बॉलीवूड डान्स या तिन्ही व्यायामांमध्ये नाचताना इतर कोणताही विचार मनात येत नाही. कारण इतर विचार करताना नाचाच्या स्टेप्स हटकून चुकतात, त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्यावेच लागते. या सर्व व्यायामप्रकारांमध्ये शेवटी ‘कूल डाऊन’ व्यायाम तसेच स्नायूंचे व शरीराला चांगल्या प्रकारे ताण देण्याचे (स्ट्रेचिंग) व्यायाम केले जातात. असा हा ५५ मिनिटे ते १ तासाचा ‘वर्कआऊट’ असतो. या व्यायाम प्रकारांना जिमच्या भाषेत ‘कार्डिओ-रेस्पिरेटरी वर्कआऊट’ असे संबोधले जाते.
त्यामुळे शरीराला होणारे फायदे असे. * हालचाली करताना शरीराला चांगला रक्तपुरवठा व्हावा लागत असल्यामुळे अर्थातच हृदयाचे काम वाढते. प्राणवायू अधिक घ्यावा लागतो त्यामुळे श्वासोश्वासही वाढतो. ३ ते ४ महिने सातत्याने हे व्यायाम केल्यानंतर शरीराचा ‘स्टॅमिना’ वाढल्याचे जाणवू लागते. * नाचात पाय आणि हाताच्या हालचाली खूप असतात. पुन:पुन्हा झालेल्या एकाच प्रकारच्या हालचालींमुळे स्नायूंना उत्तम व्यायाम होतो आणि स्नायू पिळदार होतात. (स्नायूंचे टोनिंग) * नाचताना घाम खूप येतो आणि शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. * शरीरात स्त्रवणाऱ्या संप्रेरकांची यंत्रणा, चयापचय क्रिया सुधारते, चांगली भूक लागू लागते. * इतर कोणताही विचार न करता तासभर पूर्ण लक्ष देऊन नाचाचा व्यायाम करताना अक्षरश: प्राणायाम केल्यावर जसा शांत अनुभव मिळतो तसाच अनुभव येतो. हलके, ताजेतवाने वाटू लागते. * उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हे व्यायाम करता येतात. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यायामांनी काही प्रमाणात कमी करता येतात. * एरोबिक्स व नाचाच्या व्यायामात सांध्यांनाही चांगला व्यायाम होतो. भविष्यात संधिवात, हाडे ठिसूळ होणे या गोष्टी टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. * चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजन कमी व्हायला याची मदत होते. पण अर्थात वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीच्या आहाराचाही मोठा भाग असतो. कमी झालेले वजन कमी राखण्यासाठी हे व्यायाम व जोडीने ‘वेट ट्रेनिंग’सारखे इतर व्यायामही सुचवले जातात. व्यक्तीला मुळात ज्या कारणासाठी व्यायाम करायचा आहे ते लक्षात घेऊन नाचाबरोबर इतर प्रकारच्या व्यायामांचा योग्य मेळ घालता येतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- लोकसत्ता / डॉ. पलक कुलकर्णी
मौखिक अस्वच्छता हे श्वासाला दुर्गंध येण्याचे एक कारण असू शकते. किंबहुना दात, जीभ, हिरड्या यांच्या म्हणजेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे, हे श्वाेसाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण असते. काहीही खाल्ल्यानंतर दातात अन्नाचे छोटे मोठे कण अडकतात. तोंडातील जीवाणूंद्वारे त्या कणांचे विघटन होऊन दुर्गंधीयुक्त रासायनिक पदार्थ आणि वायू तयार होतात. या रासायनिक पदार्थांमुळे आणि वायूंमुळे तोंडाचा वास येऊ लागतो. शिवाय त्यांच्यामुळे दात किडतात आणि हिरड्या सुजून त्यात पू भरतो. दात आणि हिरड्यांच्या या जंतुसंसर्गामुळे हा वास अधिकच दुर्गंधीयुक्त बनतो. अनेकदा दातांची कवळी, काही दातांची डेन्चर्स, दातांना बसवलेल्या तारा ज्या व्यक्ती वापरतात, त्यांनी त्या त्या गोष्टींची स्वच्छता न बाळगल्याने त्यांना श्वचसन दुर्गंधीची बाधा होते. दातांमध्ये अन्नाचे कण अडकतात तर जिभेवर द्रवपदार्थांचा साका जमा होतो. जिभेवर हा अन्नपदार्थांचा साका जमा होऊन त्यामध्ये जंतूंचा शिरकाव होतो आणि त्याचा वास येऊ लागतो. श्वावस दुर्गंधीच्या या कारणाला आळा घालण्याकरिता दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासावेत. दातांबरोबर जीभसुद्धा घासून स्वच्छ करावी. काहीही खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या कराव्यात. अधूनमधून "डेंटल फ्लॉस‘ वापरून दातांच्या फटीतले अन्नकण काढावेत. वर्षातून किमान एकदा दंत वैद्याकडून दातांच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी.
विशिष्ट अन्नपदार्थ आणि पेयपान
लसूण, कांदा, मसाल्याचे पदार्थ असे तीव्र वासाचे पदार्थ खाण्यात आले तर तोंडाला वास येतोच. चहा, कॉफी, मद्यपान अशा पेयांच्या सेवनानेसुद्धा श्वासाला दुर्गंध येतोच. मद्यसेवनानंतर उच्छवासात येणारा त्याचा अंश "ब्रेथ ऍनॅलायझर‘ या यंत्राच्या साह्याने पोलिसही तपासतात. या घन आणि द्रवपदार्थांच्या सेवनाने येणारा दुर्गंध जर टाळायचा असेल तर ते खाणे (किंवा पिणे) टाळणे हाच त्यावरचा उपाय असतो. कारण कितीही ब्रश केला किंवा गुळण्या केल्या तरी, कांदा-लसणाचा किंवा दारूचा वास सहजी नाहीसा होत नाही. याउलट दिवसभरात पाणी कमी पिणाऱ्या व्यक्तींचे तोंड कोरडे पडून त्यांच्या श्वाससामध्येसुद्धा दुर्गंध जाणवू शकतो.
तंबाखूजन्य पदार्थ
धूम्रपानाचा वास हादेखील मद्याप्रमाणे उच्छवासातून येत असतो. तंबाखू, गुटखा, पान यांच्या सेवनानंतर त्यांच्यापासून निघणारा रस तोंडातील लाळेमध्ये मिसळतो. हा मिश्र द्रव तोंडातील दात, गालाची आतली बाजू, जीभ, हिरड्या यांच्यावर एक पातळ थर निर्माण करतो. त्याचा वास येत राहतो. त्याशिवाय विडी-सिगारेटच्या धुराचा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा तोंडातील दात, हिरड्या, टाळू आणि जीभ यांच्यावर रासायनिक परिणाम होऊन दातांवर लालसर काळ्या रंगाचे किटण तयार होते. त्याचाही कायमस्वरूपी दुर्गंध येत राहतो. या गोष्टींच्या व्यसनापासून मुक्त होणे, हाच या दुर्गंधावर मात करण्याचा ठोस उपाय आहे.
फॅड डाएट
व्यायाम करून वजन कमी करण्याऐवजी काहीतरी नवीन जाहिरातबाजी करणाऱ्या "विशेष आहाराच्या‘, डाएटच्या, उपाशी राहण्याच्या नादी लागण्याकडे आजकाल बहुसंख्य लोकांचा कल असतो. अशा डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ अत्यल्प खायला आणि साखर पूर्णपणे वर्ज्य करायला सांगितलेली असते. हा सल्ला अतिशय अशास्त्रीय असतो. कारण शरीराला पिष्टमय पदार्थ हे दैनंदिन जीवनात लागणारी ऊर्जा निर्माण करण्यासाठी अत्यावश्यसक असतात. ते कमी मिळाल्यामुळे शरीरातील चरबी वितळून तिच्यापासून ऊर्जा मिळवली जाते. या प्रक्रियेत शरीरात "कीटोन्स‘ नावाचे दूषित पदार्थ निर्माण होतात. यांचा एक वेगळाच गोडसर वास श्वासाला येत राहतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त प्रमाणात राहिली तर असाच वास येत राहतो.
औषधे
काही ठराविक औषधांच्या नियमित वापरानंतर श्वाासाला दुर्गंध येऊ शकतो. यात छातीतल्या दुखण्यावर घेतल्या जाणाऱ्या नायट्रेट्स, केमोथेरपीमध्ये वापरली जाणारी काही औषधे, फिनोथायाझिन गटातली चिंतानाशक औषधे येतात. याशिवाय ऍसिडिटी कमी करणारी अल्सरविरोधी औषधे. उच्च रक्तदाबावरील, अर्धशिशीवरील, रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारी काही औषधेदेखील अशीच त्रासदायक ठरू शकतात. डोके आणि मानेच्या भागात एखाद्या अवयवाचा कर्क असेल तर त्या रुग्णाला दिल्या जाणाऱ्या किरणोपचारांमध्येसुद्धा असेच घडते.
काही आजार
काही विशिष्ट आजारांमध्ये तोंडाला दुर्गंधी येणे प्रकर्षाने आढळते.
पोटाचे आजार- एच. पायलोरी नावाच्या जंतूचा संसर्ग जठर आणि लहान आतड्याच्या सुरवातीच्या हिश्या आजात होतो. यामुळे हायपरऍसिडिटी, पोट दुखणे अशा प्रकारच्या त्रासांसमवेत तोंडाला दुर्गंधी येण्याचे आणि करपट ढेकर येण्याची लक्षणे आढळतात. हाच प्रकार जी.ई.आर.डी. या आजारात होतो. यामध्ये पोटातील आम्ल हे अन्ननलिकेत येत राहते.
श्वासनसंस्थेचे आजार- सर्दीने नाक चोंदणे, सर्दी पिकणे, सायन्युसायटीस, घशाला सूज तसेच जंतुसंसर्ग होणे, टॉन्सिलायटिस, ब्रॉन्कायटिस, ब्रॉंकिएकटॅसिस अशा श्वेसन संस्थेच्या आजारात श्वावसाला हमखास दुर्गंधी येते.
झीरोस्टोमिया- या आजारात तोंडात लाळ तयार होत नाही. त्यामुळे तोंडातील जंतूंची बेसुमार वाढ होते, शिवाय सर्वसामान्य लोकांच्या तोंडात आढळणाऱ्या जंतूंव्यतिरिक्त इतर प्रकारचे जंतूदेखील नव्याने तयार होतात. त्यांचा अन्नकणांशी संपर्क होऊन, सातत्याने खूपच दुर्गंधी येत राहते.
स्योग्रेन्स सिंड्रोम- या स्वयंप्रतिकार रोगात (ऑटोइम्युन डिसीज) रुग्णाची लालोत्पादक पिंडे नष्ट होतात. त्यामुळेसुद्धा तोंड कोरडे पडून दुर्गंधी येत राहते.
"हॅलिटोफोबिया‘ या मनोविकारात रुग्णाला सतत आपल्या तोंडाला दुर्गंध येतोय असं वाटत असतं. प्रत्यक्षात तसा तो येतच असतो असेही नाही, पण अशा व्यक्ती इतरांच्या साध्या बोलण्याचा तसा अन्वयार्थ लावतात. "आपल्या तोंडाची दुर्गंधी टाळणे‘ हा एक विचार त्यांच्या मनात पक्के घर करतो, त्यामुळे सतत दात घासणे, फ्लॉस करणे, च्युईंग गम खाणे, माउथ फ्रेशनर्स वापरणे अशा गोष्टी ते सतत अकारण करत राहतात. आजच्या जमान्यात "सेल्फ इमेज‘ किंवा स्वयं प्रतिमा या गोष्टीला खूप महत्त्व दिले जाते. चांगले दिसण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. पण यामध्ये वेशभूषा, केशभूषा, स्वतःला नटवण्यासाठी अनेक प्रसाधने वापरणे एवढेच केले जाते. पण तोंडाचे आणि पर्यायाने शरीराचे आरोग्य टिकवणाऱ्या मौखिक आरोग्याकडे लक्ष दिल्यास, श्वास दुर्गंध तर जाणवणार नाहीच; पण व्यक्तिमत्त्वदेखील उजळून जाईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. अविनाश भोंडवे
नवीन वर्षी नवी ध्येय, स्वप्न पूर्ण करण्याचं एक टार्गेटच आपण आपल्यासमोर ठेवतो. पण आरोग्याचं काय? असा प्रश्न उरतोच. स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात आपण आरोग्याकडे सरास दुर्लक्ष करतो. आरोग्याशी निगडीत काही खास टिप्स...
दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावं. त्यामुळे त्वचेला तेज येतं.
साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटं चालावं. यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं.
दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. नियमितपणे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
श्वासोच्छवास महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्नायूंना आराम मिळण्यासाठी त्या प्रकारचे व्यायाम करा.
व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि नंतर पाणी जरुर प्या.
प्रशिक्षित प्रशिक्षक निवडा. जेणेकरुन भविष्यातील अपव्यय टाळता येईल.
वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करू नका. त्याशिवाय नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य द्या.
सकारात्मक विचारसणीचा अवलंब करा. जे तुम्हाला यश मिळवण्यास उपयोगी ठरेल.
ताजी फळं आणि सालाड खाण्यावर भर द्या.
एकाच वेळी खूप जास्त खाऊ नका. याचा पचन संस्थेवर परिणाम होतो. दिवसातून पाच ते सहा वेळा अल्पसा आहार घ्या.
हळुहळू आणि व्यवस्थित चावून खा. तुम्ही जेवढं हळू खाल तेवढं तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल.
मानवी शरीराला दररोज अर्धा किंवा एक टिस्पून मीठाची गरज असते. त्यापेक्षा जास्त मीठाचं सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो.
ताण-तणाव किंवा मानसिक त्रास कमी करण्यासाठी जास्त खाणं हा काही उपाय नाही.
दररोज ध्यानधारणा आणि प्राणायम करण्याची एक वेळ निश्चित करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.नमिता जैन
Copyright © 2025 | Marathisrushti