वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भल्या पहाटे फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती स्त्री होती. बोलतांना तिला भावना आवरणं कठीण जात होतं. बराच वेळ केवळ हुंदके ऐकायला आले. त्यानंतर मोठ्या प्रयासाने अगदी काही शब्दच बोलून तिने भेटण्याची वेळ ठरवली. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच येऊन ती खुर्चीवर स्थानापन्न झाली. मार्गदर्शनासाठी येणा-या व्यक्तीसाठी आपली समस्या सांगण्यास कुठून व कशी सुरुवात करावी हे एक अवघड काम असतं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली विवाहित स्त्री बराच वेळ मान खाली घालून बसली होती. बोलण्याऐवजी तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. थोड्याच वेळात ती ओक्साबोक्शी रडू लागली. स्त्रियांना तणावाच्या व्यवस्थापनाचा किती हमखास उपाय सापडलाय नाही? मला त्या तशा परिस्थितीतही तिचा हेवा वाटला. भावनांचा उद्रेक ओसरल्यानंतर ती शांत झाली. तीन वर्षांपूर्वी तिच्या राहत्या गावातल्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाशी तिचा विवाह झाला होता. पहिलं मूल होईस्तोवर ब-यापैकी चाललं होतं. त्यानंतर मात्र गाडी हळूहळू रुळावरून घसरू लागली. नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची पतीला सवय नसल्यामुळे तिला त्याच्या नाराजीचं कारण प्रयत्न करूनही कळत नव्हतं. घरात कोणत्याही प्रकारे गोंधळ न घालता त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग होत नाही हे कळल्यानंतर मात्र त्या पुरुषाचा संयम संपला. त्याचे तिच्या मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती तिला एक दिवस अचानक कळली व ती नखशिखांत हादरली आणि त्याच अवस्थेत मार्गदर्शनासाठी येऊन पोहोचली.
असे आम्ही कसे? लग्न झाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच पतीला विवाहबाह्य संबंध ठेवण्याची गरज का भासली असावी? अनैतिक संबंध समर्थनीय नसतात हे जरी खरं असलं तरी पत्नीच्या शरीरसंबंधांबाबतच्या विलक्षण थंडपणाने जर तरुण पतीला ऐन तारुण्यात विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उद्युक्त केलं तर त्यात दोष कुणाचा? टीव्हीवरील विविध मालिकांचा परिणाम अशी टीका करून या पराकोटीच्या गंभीर व अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणा-या विषयाकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करता येईल? मार्गदर्शनासाठी येणा-या विवाहित स्त्रियांच्या तोंडून ‘पतीने आमच्याशी चांगलं वागावं यातच आम्हाला समाधान वाटतं. आम्हाला शारीरिक संबंधांचं विशेष महत्त्व वाटत नाही,’ किंवा ‘लैंगिक संबंधांना जास्त महत्त्व द्यायचं नसतं,’ असे उद्गार अनेकदा ऐकायला मिळतात तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ होतो आणि समोर बसलेल्या स्त्रीच्या लवकरच उद्ध्वस्त होणा-या संसाराचं भयाण चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळू लागतं. पोटाच्या भुकेइतकीच लैंगिक भूकही अत्यंत महत्त्वाची असते हे घराघरातील आईवडील आपल्या उपवर मुलींना का सांगू शकत नाहीत? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी केवळ पतीचेच नाही तर पत्नीचेही लैंगिक समाधान होणे अत्यावश्यक आहे, हे पुरुषांना कोणी का समजावून सांगत नाही? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटून संसारात सुखी व समाधानी कसं व्हावं याचं ज्ञान उपजतच प्रत्येक स्त्री-पुरुषाला असतं तर या पृथ्वीवरील असंख्य दांपत्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले असते. पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. पत्नीने या बाबतीत चतुरपणा कसा दाखवावा हे तिला माहीत नसल्यामुळे विवाहित पुरुषांचे विवाहबाह्य संबंध मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत तर लैंगिक सुख प्राप्त करण्यात किंवा अगदी स्पष्टच बोलायचं तर ‘ओरबाडण्यात’ पुरुषप्रधान संस्कृती तमाम नव-यांच्या मदतीला धावत असल्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवणा-या असमाधानी स्त्रियांची संख्याही चिंताजनकरीत्या वाढत चालली आहे. पती-पत्नीमधील निकोप लैंगिक संबंध हे सुखी व समाधानी वैवाहिक जीवनाच्या पायव्याचे दगड असतात ही जाणीव प्रत्येक स्त्री-पुरुषाने ठेवली तर किती बरं होईल नाही?
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
April 1, 2017
आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार?
मग या ताणतणावाच्या अगदी विरुद्ध क्रिया केली तर? आपलंच शरीर आणि मन. त्यात दोन वेगवेगळ्या भावनांच्या प्रभावाने जर दोन वेगळे परिणाम मिळणार असतील तर?
आपणच आपले डॉक्टर व्हायला काय हरकत आहे?
ताणतणावामुळे जर सगळंच बिघडत असेल तर जरा हसून पाहा काय होतं ते !
March 15, 2016
कोल्हापूर शहराच्या पूर्वेला एका टेकडीवर “टेंबलाई देवीचं” मंदिर असून तेमलाई ही महालक्ष्मी देवीची दासी होय,
October 5, 2013
वण्य म्हणजे सौंदर्य! साध्या भाषेत सांगायचं तर ला सुंदरता! परंतु हे लावण्य प्रत्येकाच्या डोळ्यात असते. कुणाला कोणती गोष्ट सुंदर वाटेल हे सांगता येणार नाही. लावण्यवती स्त्रीचं उदाहरण घेऊ. कुणाला तिचे डोळे सुंदर वाटतात तर कुणाला तिचे ओठ सुंदर वाटतात
September 2, 2023
पावसाळ्याची चाहूल लागताच निसर्गात बदल दिसू लागतात. गेल्या काही वर्षात मृगासहित पावसाच्या साऱ्याच नक्षत्रांची महाराष्ट्रावर आणि त्यातही विशेषत: विदर्भ-मराठवाड्यावर अवकृपा झाली असली तरी यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, या वेड्या आशेवर बळीराजा पेरणीपूर्व कामाला दरवर्षी उत्साहाने सुरुवात करतो. जुन्या कर्जासोबतच गेल्या हंगामातले कर्जाचे ओझेही पाठीवर असतेच.
May 29, 2005
माझा जन्म साताऱ्यातील एका खेडेगावचा. एक वर्षाचा झाल्यावर पुण्यात आलो. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणं व्हायचं. या गावी जाण्यामुळे खेड्यातील जीवन जवळून पाहिलं. शहरातून काही दिवसांसाठीच गावी जात असल्याने आमच्या वयाची मुलं आमच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पहायची आणि मोठी माणसं ‘आली बामणाची पोरं’ म्हणायची.
May 14, 2023
मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. ‘तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे’ असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो.
August 1, 2010

आपण शाही पुलावावर पेरलेला सुका मेवा बघितला असेल, त्यावर भरपूर काजू पेरलेला पुलाव फार आकर्षक दिसतो. आज आपण या काजूचा विचार करणार आहोत.
काजू हा सदाहरित वृक्ष अॅनाकार्डिएसी म्हणजेच आम्र कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव अॅनाकार्डियम ऑक्सिडेंटेल आहे. या वृक्षाचे मूलस्थान मध्य अमेरिका आणि इतर उष्ण प्रदेशातील देश आहेत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीज लोकांनी हे फळ भारतात दक्षिण अमेरिकेतून आणले. पोर्तुगीज भाषेत त्याला काजू म्हणतात. मराठीतही तेच नाव रूढ झाले आहे.
काजूचे झाड फार काटक असते. त्याची उंची सु. १२ मी. असते. कधीकधी तो विस्तारलेला असतो. बुंधा आखूड, जाड व वाकडातिकडा असतो. पाने मोठी व अंडाकृती, टोकाला गोल व चिवट असून त्यांची वरची बाजू चकचकीत असते. फुले लहान व पिवळी असून त्यांवर गुलाबी छटा असतात. वृक्षाला बहर नोव्हेंबर-फेब्रुवारी येतो. काजूच्या फळाचे आभासी फळ आणि खरे फळ असे दोन भाग असतात. आभासी फळ लहान सफरचंदाच्या आकाराचे, पिवळ्या रंगाचे, फुगीर व रसाळ असते. यालाच बोंडू म्हणतात. बोंडू खाल्ले जाते. काजूचे खरे फळ (काजूगर) मूत्रपिंडाकृती हिरवट व पिवळ्या नारिंगी रंगाचे असून त्यावर कठिण कवच असते. कवच वेगळे केले की काजूचे बी मिळते. काजूचे बी भाजून सालपट वेगळे केले की काजू मिळतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी ६८ किग्रॅ. फळे व ९ किग्रॅ बिया मिळतात. काजूबियांचे प्रति हेक्टर सरासरी उत्पादन सुमारे ८४० किलोग्रॅम आहे.
हवामान, लागवड व जमीन : काजूची लागवड सर्वसाधारणपणे बियांपासून रोपे तयार करून केली जाते. भारतात विशेषत: केरळ राज्यातील महाराष्ट्र; कोकण व कोल्हापूर जिल्ह्याचा भाग, गोवा, तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली, तंजावर व दक्षिण अर्काट हे जिल्हे, आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा, नेल्लोर, गोदावरी व विशाखापटनम हे जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील दक्षिण व उत्तर कानडा जिल्हे या प्रदेशांत काजूची प्रामुख्याने लागवड केली जाते. महाराष्ट्रातील कोकण व त्यालगतच्या समुद्रकिनारी वेंगुर्ला, सिंधदुर्ग, रत्नागिरी व शेजारच्या गोवा राज्यात काजूची लागवड खूप प्रमाणात होते.
काजूची लागवड सामान्यत: ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावर करतात. याप्रमाणे प्रति हेक्टरी २०० ते १५५ अनुक्रमे झाडे बसतात. काजू झाडाची पूर्णवाढ होऊन वरीलप्रमाणे असलेले लागवडीचे अंतर व्यापण्याकरिता १० वर्षाचा कालावधी लागतो. जर काजूची घन लागवड ४ बाय ४ किंवा ५ बाय ५ मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी प्रचलित ७ बाय ७ मीटर किंवा ८ बाय ८ मीटर अंतरावरील लागवडीपेक्षा सुमारे दुप्पट झाडे बसतात. शिवाय सदर घन लागवडीपासून दुप्पट उत्पन्नसुद्धा मिळते.
काजूचे झाड उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत वाढू शकते, परंतु त्याला थोडीशीही थंडी सहन होत नाही. यामुळे ते उत्तरेकडील प्रदेशात वाढत नाही. काजू पिकाला उष्ण व दमट हवामान फारच अनुकूल आहे. समुद्र सपाटीपासून ७०० मी. उंचीच्या प्रदेशात आणि कमीतकमी ४०० मिमी व जास्तीत जास्त ४००० मिमी पाऊस पडणा-या भागात हे पीक चांगले येते. काजूची लागवड समुद्रकिनाऱ्यानजीकच्या प्रदेशात केली जाते. मात्र क्षार जमीन त्यास मानवत नाही.
झाडाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षी फुले, फळे यावयास सुरुवात होते. झाडे ७-८ वर्षांची झाल्यावर भरपूर फळे येतात. योग्य काळजी घेतल्यास ती ३०-३७ वर्षापर्यत भरपूर फळे देतात. खोल व चांगला निचरा असलेल्या समुद्रकाठची जांभ्या दगडापासून तयार झालेली उत्तम निच-याच्या आम्लधर्मीय जमिनीत ही झाडे 70 वर्षापर्यंत उत्पन्न देतात. नोव्हेंबर-फेब्रुवारी या दरम्यान त्यांना फुले येतात. परागण (परागसिंचन) झाल्यापासून दोन महिन्यांत फळे पिकतात. फुले येण्याच्या काळात ढगाळ हवा किंवा पाऊस पडल्यास फळ चांगले लागत नाही. मात्र फळ लागल्यानंतर पाऊस पडल्यास चांगले असते. सामान्यतः वर्षातून एकदा बहार येतो.
काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात काजू लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता यामध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
काजूत पुढीलप्रमाणे घटक असतात. पाणी (५.९ %), प्रथिने (२१.२ %), स्निग्ध पदार्थ (४६.९ %), कर्बोदके (२२.३ %), खनिजे (२.४ %), कॅल्शियम (०.०५ %) आणि फॉस्फरस (०.४५ %), काजूचे पोषणमूल्य प्रति १०० ग्रॅमला ५९० कॅलरी आहे.
हवामान
यास स्वच्छ व भरपूर सुर्यप्रकाश आवश्यक असतो. कोकणात या पिकाची लागवड डोंगर उतारावर किफायतशीर ठरत आहे. खेळती हवा व भरपूर सुर्यप्रकाशामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात अधिक भर पडते. काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या ७-८ वर्षात आंतरपिके घेतल्यास आर्थिक फायदा होतो, तसेच लागवडीवरील खर्च कमी होण्यास मदत होते. भोपळा या आंतरपिकांची लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आढळून आली आहे. त्याचप्रमाणे अननसाची लागवड देखील सुरुवातीच्या कालावधीत फायदेशीर आहे. नंतरच्या कालावधीत अननस लागवडीमुळे काजू बी गोळा करण्यास आंतरपीक म्हणून लागवड करण्याबाबत संशोधन सुरू आहे.
या पिवळ्या लाल, गोड, लोभस, व देखण्या फळाच्या पोटाशी त्याची बी चिकटलेली असते.
काजू संबंधात संशोधनाची माहिती:
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथून विकसित झालेल्या भरघोस उत्पादन व निर्यातक्षम गुणधर्म असलेल्या वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ६, वेंगुर्ला ७, वेंगुर्ला ८ आणि वेंगुर्ला ९ या जातीची कलमे लावून लागवड करावी.
कोकणात काजू लागवडीस भविष्यात भरपूर वाव असून आजमितीस या पिकाखाली २.८४ लाख हेक्टर क्षेत्र असून अजुनही ३ लाख हेक्टर क्षेत्र काजू लागवडीस उपयुक्त आहे. कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, केळी, मसाला पिके इत्यादी महत्त्वाच्या पिकासाठी भविष्यात लागवडीयोग्य सदरचे ३ लाख हेक्टर क्षेत्र लागणार असल्याने यापैकी ५० टक्के म्हणजेच १.५० लाख हेक्टर क्षेत्र काजू लागवडीखाली आल्यास वर्षभर लागणारी काजू कारखान्याला लागणारी मागणी पूर्ण करता येईल तसेच परदेशातून होणारी काजू बीची आयात थांबवून काजू उत्पादनात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होईल.
त्याचप्रमाणे विद्यापीठाने विकसित केलेले नवीन काजू लागवड तंत्रज्ञान काजू बागायतदारांनी आत्मसात केल्यास सध्या मिळणा-या सरासरी १३०० किलो ग्रॅम प्रति हेक्टर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊन काजूचे सरासरी उत्पादन २ टन प्रति हेक्टर यापेक्षा जास्त मिळू शकेल. काजू पिकावरील शेतक-यांना विविध शिफारशी देण्यात आल्या. त्यामुळे एकत्रितरित्या काजू लागवडीखाली क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पादकता वाढून रोजगार निर्मिती होऊन शहराकडे जाणारा तरूण वर्ग ग्रामीण भागात स्थिरावेल.
काजू वरील औद्योगिक प्रक्रिया :
काजूच्या फळावर होणाऱ्या औद्योगिक प्रक्रिये च्या माहिती शिवाय हा लेख अपूर्णच राहील.
भारतात काजूगर व टरफल तेल काढणे हा धंदा मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर चालतो. काजूगर फोडण्याचे व टरफल तेल काढण्याचे १५० कारखाने देशात आहेत. त्यापैकी १०० कारखाने क्किलॉन (केरळ) शहराच्या आजूबाजूस आहेत.
काजूचे फळ व बिया दोन्ही महत्वाची आहेत. फळापासून सरबत, सायरप व मद्य तयार करतात तर बियांपासून काजूगर, गरतेल व टरफल तेल मिळते. काजूबिया भाजून त्यातील गर वेगळा करणे हे काम कौशल्याचे आहे. काजूबिया भाजल्याने आतील गराच्या गंधात व चवीत वाढ होते. काजूबिया जरुरीपेक्षा कमी किंवा जास्त भाजल्या गेल्यास त्याचा काजूगराच्या प्रतीवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काजूबिया भाजत असताना निर्माण होणारा धूर आणि बाहेर फेकल्या जाणाऱ्या तेलाच्या थेंबापासून अपाय होत असल्याने या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते.
टरफलतेल : टरफलांत २५ ते ३०% तेल असते. यातील मुख्य रासायनिक घटक म्हणजे कार्डोन व ॲनाकार्डिक आम्ल होय. हयामुळे हया तेलाचा शरीरास स्पर्श झाल्यास कातडीवर फोड येतात.
काजू प्रक्रिया उद्योगाची थोडक्यात पद्धती अशी : झाडावरून पडलेले काजू गोळा करतात, किंवा काजू बिया विकत आणतात. त्या स्वच्छ पाण्यात धुऊन चार दिवस उन्हात सुकवतात. नंतर बिया ९० ते १०० अंश सें., तापमानात ४५ मिनिटे उकळून घेतात. (बॉयलर वापरून हे करता येते.). बिया तशाच १२ तास सावलीत वाळवतात (यासाठी ड्रायर वापरता येतो.). दुसर्या दिवशी बिया (काजू बी कटर) मशीनद्वारे फोडतात. बियांची टरफले काढून, त्या सुमारे आठ तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर, काजूगरांच्या आकारमानानुसार वर्गीकरण करून हाताने पॉलिश केल्यानंतर त्यांचे पॅकिंग करतात.
काजूच्या बोंडांपासून कोकण, मलबार, तामिळनाडू यासारख्या प्रदेशात विविध तर्हेचे मद्य तयार केले जाते. गोव्यातही काजूचे भरपूर प्रमाणात पीक घेतले जाते. गोव्यातील काजूची फेणी प्रसिद्ध आहे.
बोंडूचा रस आंबटगोड व तुरट असतो. रस टिकविण्यासाठी तो तापवून त्यात संरक्षक पदाथ घालतात. या रसापासून जॅम, गोळया, सरबत, सायरप, मद्य व शिर्का (व्हिनेगार) तयार करतात. रस आंबवून ऊर्ध्वपातन केल्यास (उकळून व वाफ थंड करुन) मद्य मिळते. प्रथम ऊर्ध्वपातित द्रवास `अरक’ म्हणतात व अरक पुन्हा ऊर्ध्वपातित करुन मिळणाऱ्या द्रवास `कजेल’ म्हणतात. गोव्यामध्ये हे मद्य `फेणी’ या नावाने प्रसिध्द आहे.
काजूचे उपयोग :
व्यावहारिक उपयोग:
१. सुक्या मेव्यामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून काजूची गणना होऊ शकते. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत काजू सर्वानाच आवडतो. खाण्यास अतिशय सोपा व कुठल्याही मेव्यासोबत खाल्ल्यास त्याची रुची व पौष्टिकता अजूनच वाढवतो.
२. काजूगराचे तेल बदामाच्या तेलासारखे असून पेंडीचा उपयोग पौष्टिक खाद्य म्हणून होतो.
३. सालीपासून कपड्यावर खुणा करण्यासाठी न पुसली जाणारी शाई मिळवितात.
४. जलाभेद्य रंग, व्हार्निश, रंगद्रव्ये, मोटारींचे गतिरोधक अस्तर वगैरेंच्या निर्मितीमध्ये तेलाचा उपयोग होतो. या तेलाचे उपयोग व मागणी सतत वाढत आहे.
५. काजूचे लाकूड तांबूस वा तपकिरी रंगाचे व कठिण असते.त्याचा उपयोग होड्या, कोळसा तयार करण्यासाठी करतात.
६. काजू हे निर्यातक्षम फळ आहे. काजूच्या जागतिक व्यापारात भारताला अग्रस्थान आहे. भारताचा हिस्सा काजू निर्यातीत ६० टक्के आहे तर ब्राझीलचा हिस्सा ३० टक्के आहे. एकूण निर्यातमूल्याच्या १.५ टक्के परकीय चलन काजू निर्यातीपासून मिळते.
७. काजू टिन फिलिग मशीन, टिन पॅकिंग मशीन, कॅश्यू साइझिंग मशीन अशा प्रकारच्या मशिनरीसुद्धा पॅकिंगसाठी उपलब्ध असतात. शक्यतो पाव किलो, अर्धा किलो व एक किलोचे पॅकिंग ठेवणे किफायतशीर असते.
८. ओल्या काजूगरांची भाजी फार छान होते.
ब. औषधी गुणधर्म व उपयोग:
1. झाडाची साल स्तंभक (आकुंचन करणारी) आहे.
2. काजू सर्वांना सुपरिचित असा सुकामेवा आहे. चवीनं तुरट, गोड असलेला काजू गुणानं उष्ण, लघू आणि धातुवर्धक आहे. वात, कफ, पोटातला गोळा, ताप येणं, कृमी, व्रण या तक्रारीत उपयुक्त आहे. अग्निमांद्य, त्वचारोग, पांढरे कोड, पोटदुखी, मूळव्याध, पोटफुगी इत्यादि विकारांचा काजू नाश करतो. पायाला चिखल्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी काजूच्या बियांचा चिक लावावा म्हणजे चिखल्या बर्या होतात.
3. जनावरांच्या पायांना विशेषत गायी, म्हशींना एक प्रकारचा उपद्रव होतो. त्याला ‘लाळ्या’ म्हणतात. यामुळे पाय सुजून गुरांना चालता येत नाही. या तक्रारींवर काजूच्या बियांचा चिक लावला असता त्रास कमी होतो.
४ काजू किमतीनं महाग असल्यानं सर्वसामान्यांना परवडत नाही. तथापि कृश व्यक्तींना काजूमध्ये असणारे स्निग्ध घटक उपयुक्त ठरतात आणि त्याचे दौर्बल्य कमी करून शक्ती वाढवतात.
५. सुकलेले काजू चवीला अत्यंत गोड, किंचित कषाय, मधूर विपाकी, उष्ण वीर्यात्मक व पित्तकर आहेत. तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्व, तंतूमय, पिष्टमय पदार्थ , खनिजे, मेद अशी सर्व घटकद्रव्ये त्यात असतात.
६. भिजविलेल्या मनुक्यासह ४-५ काजू रोज सकाळी खाल्ल्यास मलावरोध दूर होतो.
७. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून पायात मोजे घालावेत, काही दिवसातच भेगा नाहीशा होतात.
८. हृदयरोगाशी लढण्यास सक्षम आणी उच्च रक्तदाब कमी करण्यात व मज्जासंस्था बळकट करण्यास मदत होते.
९. वजन कमी करण्यात, हाडांसाठी फायदेशीर, कोलन, पुर:स्थ आणि यकृत कर्करोग रोखण्यास मदत करते
१०. काजूचे पिकलेले फळ, सुंठ, मिरे व संधव घालून खाल्ल्यास पोटदुखी कमी होते. तसेच पोटात गुब्बारा धरणे, शौचास साफ न होणे ही लक्षणे कमी होतात.
११. रक्ताची कमतरता झाली असेल तर रोज ४ ते ५ काजूचे सेवन करावे. यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने रक्त वाढण्यास मदत होते. काजू रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
१२. चिरतारुण्य टिकविण्यासाठी व शरीर काटक व प्रमाणबद्ध करण्यासाठी काजूचे सेवन नियमितपणे करावे.
१३. काजूमद्धे फ्री रॅडिकल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ते अँटी ऑक्सीडेन्ट प्रमाणे काम करतात व त्वचा, मेंदू व आतड्याच्या कॅन्सरला प्रतिबंधित करतात.
तर असा हा काजू बहुगुणी, औषधोपयोगी व भारताला परकीय चलन मिळवून देण्यात अग्रेसर असे फळ आहे.
-- डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
August 3, 2021
स्वशक्त्यादिशक्त्यंत सिंहासनस्थं
मनोहारि सर्वांगरत्नोरुभूषम् |
जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं
पराशक्तिमित्रं नमः पंचवक्त्रम् ‖ ३ ‖
भगवान श्री शंकरांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
स्वशक्त्यादिशक्त्यंतसिंहासनस्थं- स्वतःची शक्ती अर्थात चैतन्यसत्ता असणाऱ्या आदिशक्ती परांबेच्या सोबत भगवान शंकर आपल्या सिंहासनावर आरूढ असतात.
आचार्यश्री या सिंहासनाकरिता शक्त्यंतसिंहासन असा शब्दप्रयोग करतात. याचा अर्थ ज्यांच्यावर कोणाची शक्ती चालत नाही. कोणाची सत्ता चालत नाही. जिथे अन्य सर्व शक्तींचा लय होतो असे सिंहासन. परमसत्ता.
मनोहारि- अत्यंत आकर्षक अशा, सर्वांगरत्नोरुभूषम् - उरु म्हणजे विपुल, प्रचुर, श्रेष्ठ, मूल्यवान. तशा रत्नांनी बनविलेली आभूषणे ती रत्नोरुभूष. भगवंतांनी सर्व अंगावर अशी आभूषणे धारण केली आहेत.
जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं- या शब्दामध्ये जटा,अहि,इंदु, गंगा, अस्थि, शम्याक आणि मौली अशा शब्दांचे एकत्रीकरण आहे.
जटा म्हणजे तुमच्या वर बांधलेले केस. अहि म्हणजे सर्प. इंदू म्हणजे चंद्र.गंगा. अस्थि म्हणजे नरमुंडक्यांची माला. शम्याक म्हणजे बहाव्याच्या फुलांची माळ. या सगळ्या गोष्टी मौली म्हणजे मस्तकावर, गळ्यात धारण केल्या आहेत असे. यातील गंगा, चंद्र, सर्प या थंड वस्तू , समुद्रमंथनातून निघालेले हालाहल प्राशन केल्याने होणारा भयानक दाह शमविण्यासाठी भगवान धारण करतात.
पराशक्तिमित्रं - पराशक्ती जगदंबेचे स्नेहपात्र. तिच्या सोबत सर्व वेदांतरहस्य उलगडून दाखविणारे.
नमः पंचवक्त्रम् - अशा पंचमुखधारी भगवान श्रीशंकरांना नमस्कार असो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 12, 2020
सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते.
महाभारतातील युध्दप्रसंगी शंखाचा रणवाद्य म्हणून उपयोग केल्याचे आढळून येते तर देवपूजेच्या वेळीही शंखनाद केला जातो, ज्याच्या ध्वनीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होऊन एकाग्रता लाभते. म्हणून देवघरात शंख असणे भाग्याचे लक्षण आहे.
January 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti