वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेदाच्या नावाखाली काहीतरी फ़ंडे खपवण्याचे एकेक नवीन पीक येत असते. खरीप असो व रब्बी; कोणत्याही हंगामात अशी पिकं उगवतात. अर्थात ही पिकं जास्त काळ टिकत नसली तरी आयुर्वेदाचे नाव पुढे करून लोकांचा बुद्धिभेद करण्यात मात्र बऱ्यापैकी यशस्वी होत असतात. अशापैकीच एक फॅड म्हणजे Detox water
Detox water म्हणजे काय?
काही भाज्या आणि फळांचे तुकडे करून ते थंड पाण्यात बुडवून त्याचा स्वाद आल्यावर तयार झालेले पाणी म्हणजे Detox water. याकरता पाण्याच्या जारमध्ये फळांचे तुकडे वापरतात किंवा त्यासाठी विशेष infuser bottles देखील सर्वत्र उपलब्ध असलेल्या दिसतात. या पाण्यात हे तुकडे घातल्यावर पाणी फ्रिजमध्ये थंड करून घेण्यावर भर असतो. शिवाय एका वेळी तयार केलेल्या तुकड्यांवरच दोन-तीन वेळा नव्याने पाणीदेखील भरण्यात येते.
Detox water मागील पोकळ दावे आणि तथ्य!!
१. Detox water ही आयुर्वेदीय संकल्पना आहे.
प्रत्यक्षात ही थेट आयुर्वेदीय संकल्पना नाही. फारतर मन्थ वा हिम यांसारख्या आयुर्वेदीय संकल्पनांचे हे भ्रष्ट रूप आहे असे एकवेळ म्हणता येईल. मात्र या दोन्ही संकल्पना फार वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या अवस्थांत वापरल्या जातात. (कशा ते आपण पुढे पाहू)
२. Detox water घेतल्यास जेवण्याची गरज नाही!
आपल्याला आश्चर्य वाटेल; पण Detox water चं मार्केटिंग आहाराला पर्याय म्हणून केलं जात आहे. वजन कमी करायचं असल्यास न जेवता फक्त Detox water प्या अशी जाहिरात केली जात असून त्याने वजन कमी होईल इथपासून ते एकंदरीतच आरोग्य उत्तम राहील अशा प्रकारे गैरसमज पसरवून जणू काही माणसाला जगण्यासाठी जेवणाची काहीच आवश्यकता नाही असे घातक चित्र उभे केले जात आहे.
३. Detox water घेतल्याने वजन कमी होते.
प्रत्यक्षात याला काही शास्त्राधार नाही. या विधानाची पुष्टी करणारी संशोधनेदेखील नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि तेही फ्रीजमधील थंडगार पाणी पिऊन वजन कमी होणे तर सोडाच; उलट वाढू शकते.
Detox water ही पूर्णपणे त्याज्य संकल्पना आहे का?
नक्कीच नाही. मात्र त्याच्या वापराचे क्षेत्र नीट ठरवायला हवे. याआधी वर्णन केल्याप्रमाणे या संकल्पनेला 'आयुर्वेदीय' म्हणायचे असल्यास मन्थ वा हिम यांच्यासारखे उन्हाळा, ऑक्टोबर महिन्यातील गरमी यांसारख्या उष्ण काळात आणि पित्ताशी संबंधित व्याधी असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने Detox water चा वापर करता येईल. मात्र याकरता फ्रिजमधले पाणी न वापरता माठातले पाणी वापरावे. मातीच्या माठात वाळ्याची जुडी घातलेले Detox water हे आमच्याकडे पूर्वीपासून गावा गावात पिण्यासाठी वापरले जात आहे! शिवाय कोणत्याही परिस्थितीत असे पाणी हा आहाराचा ऐवज होऊ शकत नाही हेदेखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
ही पथ्ये न पाळता आयुर्वेदाच्या नावाखाली फोफावू पाहत असलेल्या प्रकारांना बळी पडू नका.
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
ग्लूटेन फ्री डायट हे नाव आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. तरीही ज्यांना याविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी थोड्क्यात सांगतो. ग्लूटेन हे गहू, जव आणि नाचणी यांसारख्या धान्यांत सापडणारे एक प्रोटीन असते. काहीजणांना ते न पचल्याने अनेक त्रास होतात; पैकी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे Celiac disease. या रोगात ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने लहान आतड्यांना इजा पोहचणे, अंगावर रॅशेस येणे वगैरे लक्षणं दिसतात. परिस्थिती गंभीर झाल्यास लहान आतड्यांच्या कर्करोगाचीदेखील शक्यता असते असे सांगितले जाते.
आधुनिक शास्त्रात यावर इलाज म्हणून जन्माला आलेली संकल्पना म्हणजे ग्लूटेन फ्री डायट. अर्थात ज्या पदार्थांत ग्लूटेन आहे ते टाळणे आणि त्याचे पर्याय शोधणे. थोड्क्यात; आहारातून गहू, जव इत्यादि गोष्टी हद्दपार करणे. आता या ग्लूटेन फ्री डायटबाबत आयुर्वेदाचा दृष्टिकोन जाणून घेऊ.
१. एखादा पदार्थ पचत नसल्यास तो टाळणे हा मार्ग नसून तो कसा पचेल यावर विचार करणे हे अधिक योग्य ठरते. थोड्क्यात आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेला 'अग्निविचार' हा याठिकाणी महत्वाचा आहे.
२. ग्लूटेन फ्री डायटच्या दुष्परिणामांतील सर्वात प्रमुख म्हणजे पोषणमूल्यांची कमतरता आहे असे आधुनिक आहारशास्त्रच सांगते. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
३. ग्लूटेनची समस्या प्रामुख्याने ब्रेडसारख्या बेकरी उत्पादनांत मोठी असून त्यामागे किण्वीकरण प्रक्रियेचा मोठा हात आहे हे लक्षात घेणे महत्वाचे. भारतासारख्या देशातील पोळी/चपाती, दलिया यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना तोच न्याय लावणे योग्य होणार नाही. याकरताच मी शीर्षकात 'गवगवा' हा शब्द वापरला. ग्लूटेन फ्री डायट ही संकल्पना सध्या आपल्या देशात जोमाने रुजू पाहत आहे. हे चित्र समाधानकारक नक्कीच नाही.
४. ज्यांना पोळी/चपाती पचायला जड जाते त्यांनी ग्लूटेन फ्री डायटच्या मागे न लागता भाकरी वा थेट निखारे अथवा गॅस बर्नरवर भाजलेले फुलके यांचा आहारात समावेश करावा. तसेच जेवताना पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.
५. आयुर्वेदीय उपचार आणि आहारातील नाममात्र पथ्ये यांच्या सहाय्याने 'ग्लूटेन फ्री डायट' पासून 'फ्री' राहण्यास मदत होते. त्यामुळे चपाती पचत नाही म्हणून लगेच आपल्याला ग्लूटेन फ्री डायटच हवे असा गैरसमज करून घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आयुर्वेदाने गहू हे धान्य 'संधानकर' म्हणजे शरीराला जोडणारे/ बळकटी देणारे सांगितले आहे. पंजाबसारख्या प्रचुर मात्रेत गहू पिकवणाऱ्या राज्यातील नागरिकांची शरीरयष्टी याची साक्षच नाही का? त्यामुळे एखाद्या संकल्पनेमागे वाहवत जाऊन उत्तम पोषक अन्न खाण्याच्या आनंदाला मुकू नका!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
जेवढ्या वेळा आपण डोळ्यांची उघडझाप करता त्या प्रत्येक वेळी डोळ्यांमध्ये अश्रू तयार होतात. अश्रू हे तेल, पाणी आणि बलगम यांचे मिश्रण आहे. अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात. डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवतात. पण काही वेळा डोळ्यांतून अश्रू येणे बंदच होऊन जाते. डोळे कोरडे पडतात. डोळ्यांना खाज सुटते. या समस्येतूनच पुढे डोळ्यांना जखम होण्याची आणि त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. जर आपल्याही डोळ्यांना खाज सुटत असेल, डोळे खूप लाल होत असतील, डोळे थकल्यासारखे वाटत असेल तर आपल्याला आय सिंड्रोम हा त्रास होत आहे.
यावर उपाय काय? जाणून घ्या.
डोळ्यांची उघडझाप करा, डोळ्यांचा थकवा कमी होईल.
सतत कंप्युटरवर काम करण्यासाठी अथवा वाहन चालवल्यासाठी एकटक बघावे लागते. खूप वेळ एकटक बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते. डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. डोळ्यांची उघडझाप ही सामान्य प्रक्रिया आहे. हवेसोबत डोळ्यात विविध प्रकारचा कचरा जातो. डोळ्यांची उघडझाप केल्यावर निर्माण होणारे अश्रू हा कचरा साफ करतात आणि डोळ्यांचा ओलावा कायम ठेवतात.
कंप्युटरवर खूप वेळ काम करणे.
कंप्युटरवर खूप वेळ काम केल्यावर डोळे थकल्यासारखे वाटते. सतत एकटक कंप्युटरकडे बघताना डोळ्यांची उघडझाप कमी होते आणि डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. यावर उपाय म्हणून थोड्या वेळाने काम थांबवून मुद्दाम डोळ्यांची उघडझाप करा.
गाडी चालवताना डोळ्यात धूर, हवा आणि धुलीकण जाणे.
वाहन चालवताना डोळे कोरडे पडण्याची तसेच डोळ्यात कचरा, धूर, धुलीकण जाण्याची शक्यता आहे. धुरामुळे डोळ्यांचा ओलावा कमी होते. अश्रूंचे प्रमाण कमी होते.
वाढते वय आणि हार्मोनमधील बदलांमुळे डोळे कमकुवत होतात. वाढते वय आणि शरीरात होणारे बदल याचा डोळ्यांवर परिणाम होतो.
व्हेरिकोज व्हेन्स आणि मधुमेह.
व्हेरिकोज व्हेन्स आणि मधुमेहासारख्या आजारांनी पीडित असलेल्यांना डोळ्यांच्या समस्या हमखास जाणवतात. अशा मंडळींना डोळे कोरडे पडणे हा त्रास अनेकवेळा होण्याची शक्यता आहे. मधुमेहामुळे तर डोळे कमकुवत होण्याची शक्यता असते. काही वेळा तर थेट दृष्टीपटालवर परिणाम होऊन डोळे कायमचे कमकुवत होण्याची शक्यता असते.
डोळ्यांना पुरेसा आराम देण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय. कंप्युटरवर काम करताना, वाहन चालवताना मुद्दाम थोडा वेळ थांबून डोळ्यांची उघडझाप करा, थोडे इकडेतिकडे बघा आणि पुन्हा आपले काम सुरू करा. आपण आय स्पा वापरुन डोळ्यांचा कोरडेपणा कमी करू शकता. आय स्पा डोळ्यांना सुटणारी खाज, डोळ्यांचा थकवा, डोळ्यांचा कोरडेपणा यावर उपाय करतो. बाजारात विविध चांगले ड्रॉप्स उपलब्ध आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. कारण पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. मांस न खाणाऱ्या अनेक लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे.
प्रोटिनचा सर्वोत्तम स्रोत
काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
भुकेवर नियंत्रण राहते
पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.
दात मजबूत होतात
पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.
फॅट्स बर्न होण्यास मदत होते
प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
घातक आजारांपासून लांब ठेवते
कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.
पनीर शरीरासाठी पोषक असले तरी त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांबाबत काही मतभेद आहेत. काही लोकांच्या मते, पनीरमुळे वजन वाढत असल्याने ते खाऊ नये. 100 ग्रॅम पनीरमधून 292 ग्रॅम कॅलरी मिळतात हे खरे असले, तरी कष्टाची कामे करणाऱ्या लोकांनी पनीर खाल्ल्यास त्यातील कॅलरी सहज बर्न होऊन त्यांना पोषक घटक मिळू शकतात. म्हणून पनीर प्रमाणात खावे, अतिजास्त खाऊ नये किंवा खाणे टाळूही नये.
कच्चे पनीरही चवीला स्वादिष्ट असते. त्यावर काळी मिरी आणि मीठ भुरभुरून खाल्यास चव चांगली येते. मात्र तुम्हांला पनीर मसाला किंवा पनीरचा कोणताही पदार्थ करायचा असेल तर त्यासाठी पनीर तळून घेऊ नका.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
अँटी बायोटिक्स हा शब्द माहीत नसलेला मनुष्य आज घडीस सापडणे अवघड आहे! 1930 साली अपघाताने लागलेल्या या शोधाने औषधोपचाराची दिशा बदलली!
मात्र जनक फ्लेमिंग, यांच्या "या अस्त्रा चा वापर जपून करा" या सांगण्याला अक्षरशा हरताळ फासत, मनुष्य आणि प्राण्यावर याचा मारा करण्यात आला! आणि आज सुपर बग्स आणि अँटिबोटिक्स रेजिस्टन्स नावाचा भस्मासुर आपल्या वर उलटू लागला आहे!
हे कसे रोखता येईल!
पेशंट म्हणून जाताना
1) योग्य डॉक्टर/प्याथि निवाडा.
2) डॉक्टर मला लवकर बरे व्हायचे आहे,स्ट्रॉंग औषधे द्या असा बाल हट्ट धरू नका.
3) शरीरातील रोग प्रतिकार शक्तीस थोडा वाव द्या.
4) डॉक्टरांनी अँटी बायोटिक्स लिहिली असतील तर त्याचा कोर्स पूर्ण करा. अर्धवट सोडलेला कोर्स आपणास ड्रग रेजिस्टन्स कडे पावला पावलाने ढकलत असतो.
बॅक्टरीया अर्थात जिवाणू अतिशय हुशार असतो,अँटी बायोटिक्स चे स्वरूप ओळखून त्याच्या कामाच्या पद्धती पाहून आपले स्वरूप बदलतो,
आणि मग पुढील दर खेपेस नवे अँटी बायोटिक या प्रमाणे तो यशाची नवी शिखरे पादाक्रांत करतो !
आताच सापडलेला एक जिवाणू इतका शक्तिशाली निघाला की त्याला सुपर बग हे नाव देण्या वाचून गत्यंतर राहिले नाही.
अजिंक्य मी! अमर्त्य मी! अशी दर्पोक्ती करत आपल्या ला ड्रग रेजिस्टन्स च्या गर्तेत ढकलत जातो!
मागील एका वर्षात 7 लाख लोक अँटी बायोटिक चा प्रभाव न चालल्याने मृत्यू मुखी पडले आणि प्रति जैविकांचा वापर असाच चालू राहिल्यास ही संख्या काही काळात एखाद्या देशाची असणार आहे हे सांगायला ज्योतिषी नको!
सर्व सामान्य माणूस याकरता काय करू शकतो
1) स्वच्छता राखणे.
2) हात धुण्याच्या सवयी लावून घेणे.
3) खाद्य पदार्थाचे स्रोत तपासून पाहणे.
फार्मासिस्ट म्हणून आपली जबाबदारी काय?
1) काउंटर ला कोणतेही अँटी बायोटिक न देणे.
2) योग्य डॉक्टर च्या प्रिस्क्री.वर च औषध विक्री करणे.
3) जुन्या चिट्ठी वर परत परतअँटी बायोटिक्स न देणे.
4) विक्रीचा पूर्ण रेकॉर्ड ठेवणे.
5) अँटी बायोटिक्स च्या सुयोग्य वापरा बाबत पेशंट चे समुपदेशन करणे!
आपल्या येणाऱ्या पिढ्या करता काही सुयोग्य कृती करावी असे वाटत असेल तर फक्त त्यांच्या करता ही औषधे वापरण्यास शिल्लक ठेवा अन्यथा या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत!
दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर अनेकजणी केसांचा आंबाडा बांधून घरातल्या कामाला लागतात. पण असेच केस बांधून तुम्ही रात्री झोपता का ? केस बांधून झोपल्याने केसगळतीची समस्या वाढते असे काहीजण मानतात तर केस मोकळे ठेवल्यानेही गुंता वाढतो. मग अशावेळी नेमके काय करावे ? हा प्रश्न तुम्हांला पडलाय ?
रात्री झोपताना केस मोकळे ठेवावेत की त्याची वेणी बांधावी हे व्यक्तीपरत्वे बदलते. झोपताना केस मोकळे ठेवणे त्रासदायक नाही मात्र यामूळे केस गुंतण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सैलसर वेणी किंवा आंबाडा बांधावा. पण तुमच्या केसानुसार ते कसे सांभाळावेत हे सविस्तरपणे वाचण्यासाठी.....
स्ट्रेट केस असल्यास
तुमचे केस मोकळे आणि सरळ असतील तर रात्रीच्या वेळेस तुम्ही सैलसर पोनीटेल बांधून ठेऊ शकता. म्हणजे ते सकाळी फ्रिझी होत नाहीत. सैलसर वेणी बांधून ठेवल्यास केसांमध्ये गुंता होणार नाही. तसेच त्यांना नॅचरल टॅंग्स मिळतील. तुमचे केस लांब असतील ते बांधून ठेवणे सोयीस्कर ठरते. पण खूप वेळ आणि घट्ट बांधून ठेऊ नका. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक आहे.
केस कुरळे असल्यास
तुमचे केस कुरळे असतील तर डोक्यावर त्याचा आंबाडा बांधा किंवा एका बाजूला बांधून ठेवा. यामुळे तुमची झोपमोड होणार नाही याची काळजी घ्या. पण तो खूप घट्ट बांधू नका.
केस ओले असताना ते मूळीच बांधून ठेऊ नका. परंतू केसांमधील गुंतागुंत कमी करण्यासाठी तुम्हांला ते बांधून ठेवणे गरजेचे वाटत असेल तर ते 80 % सुकल्यानंतरच बांधा. यामुळे ते तुटण्यापासून बचावतील. हाच नियम ब्लो ड्रायसाठीदेखील लागू होतो. शक्य असेल तर नैसर्गिकरित्याच सुकवण्याचा प्रयत्न करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मेकअप आर्टीस्ट पायल बालसे
आजकाल लहान वयातच केस पांढरे होणे ही साधारण समस्या बनली आहे. या समस्येचे मुख्य कारण व्यस्त जीवनामध्ये केसांची नीट देखभाल न होणे, प्रदूषण हे आहे. यामध्ये लहान वयाचतच झालेले पांढरे केस लपविण्याकरिता हेअर डाय किंवा हेअर कलर हा एकमात्र उपाय नाही. काही घरगुती उपाय केले तर पांढ-या केसांना नैसर्गिकरित्या आपण काळे करू शकता.
दोडक्याचे काप खोबरेल तेलात काळे होईपर्यंत उकळा. यांनतर हे तेल गाळून एका बाटलीमध्ये भरून ठेवा. रोज हे तेल केसांना लावल्यास हळूहळू तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतील.
तीळाचे तेल ही गुणकारी असते. बरोबरच याच्या सेवनाने बरेचसे फायदे होतात. जर आपण जेवणात तीळाचा समावेश केला तर दीर्घकाळापर्यंत केस काळे व घनदाट होतील.
केस धुताना शिकेकाई पावडर किंवा माईल्ड शॅम्पू वापरावा.
एक कप पाण्यात चहापत्ती उकळून यामध्ये एक चमचे मीठ टाकावे. हे मिश्रण केस धुण्यापूर्वी एक तास आधी लावून ठेवल्याने केस काळे होतात.
खोबरले तेलात ताज्या आवळ्यांना काळे होईपर्यंत उकळा. या मिश्रणाला थंड करून रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावा. आणि सकाळी केस धुवा.
आले वाटून त्यामध्ये थोडासा मध घालून पेस्ट तयार करावी आणि ती केसांना लावावी. हा उपाय दररोज केल्याने पांढरे केस काळे व्हायला लागतात.
केसांना दररोज मोहरीचे तेल लावल्याने केस नेहमी काळे राहतात.
खोबरेल तेलात कडिपत्त्याची पाने काळी होईपर्यंत उकळा. या तेलाला केसांच्या मुळाशी लावल्याने केस काळे व घनदाट होतात.
रोज उपाशी पोटी आवळ्याचा रस पिल्याने केस दीर्घकाळापर्यंत काळे राहतात.
सुक्या आवळ्यांना पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये निलगीरीचे तेल मिसळा. या तेलाला एक रात्र लोखंडी भांड्यात ठेवा. सकाळी यामध्ये दही, लिंबूचा रस व अंडे घालून केसावर लावा. पंधरा दिवस हा उपाय केल्यावर केंसामध्ये एक चमक येऊन पांढरे केस काळे होऊ लागतात.
आवळ्याचा रस, बादाम तेल व लिंबाचा रस एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी लावल्याने केस पांढरे होणार नाहीत.
कोरफडीचा गर केसांना लावल्याने केस गळायचे थांबतात व पांढरे होत नाहीत.
लहानपणीच केस पांढरे झाल्यास एक ग्रॅम मिरी पावडर दह्यात मिसळून लावल्याने केस काळे होतात.
१ चमचा मेहंदी पावडर, १ चमचा मेथी, ३ चमचे कॉफी, २ चमचे तुळशीची पावडर, ३ चमचे पुदीना पेस्ट एकत्र मिसळून केसांना लावा. ३ तासानंतर केस धुवा. पांढरे केस काळे होऊ लागतील.
मेहंदीला खोबरेल तेलात मिसळून त्याची पेस्ट बनवा. या पेस्टला केसांना लावल्यानंतर केसांचा रंग डार्क ब्राऊन होऊ लागतो.
केस धुण्यासाठी लिंबू रस मिसळलेल्या पाण्याचा उपयोग करावा. केस नैसर्गिकरित्या ब्राऊन होतात.
लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून नियमितपणे लावल्यास केस काळे होऊ लागतात.
आवळा व आंब्याची कोय ही एकत्र वाटून केसांना लावल्यास केस काळे होतात.
केसांना रोज मेरी तेल लावल्यास केस काळे होतात.
कांद्याचा रस काढून केसांच्या मुळाशी हलक्या हाताने लावल्यास केस काळे व घनदाट होऊ लागतील.
आवळा पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने किंवा ताज्या आवळ्यांना वाटून त्याची पेस्ट केसांना लावल्यास केस काळे व घनदाट होतात.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti