वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा हे अश्विन महिन्यातील महत्वाचे दिवस. आयुर्वेदाच्या दृष्टीनेही हे दिवस किंवा सण तसेच महत्वाचे आहेत कारण त्यांचा आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचा संबंध आहे.
भाद्रपद महिन्यात गणपतीची धावपळ आटोपते आणि मध्ये १५ दिवस गेले की नवरात्र सुरु होतं .हा बदल होताना वातावरणही बदलत असतं ,पाऊस कमी होऊन हळूहळू परतीचा रस्ता धरतो आणि पिवळेधमक ऊन पडायला सुरुवात होते ,वातावरणात उष्णता जाणवू लागते ज्याला आजच्या आधुनिक भाषेत " ऑक्टोबर हिट" असे म्हणतो.दुपारच्या वेळात चांगलाच उन्हाचा तडाखा वाटायला लागतो .
हे बदल आपल्या शरीरातही काही मोठे बदल घडवून आणतात.पावसाळ्यात पाऊस पडू लागला की नवीन पाणी पचायला तर जड असतेच पण अम्लविपाकी असते म्हणजे शरीरात आंबटपणा वाढवणारे असते ,तसेच दमट ,थंड अशा पावसाळी हवेचा परिणाम म्हणून शरीरात पित्त दोष वाढू व साठू लागतो .पुढे पाऊस थांबून ऊन पडले की ह्या साठलेल्या पित्ताचा प्रकोप होतो म्हणजेच उद्रेक होतो आणि काही विशेष लक्षणे दिसू लागतात .
छातीत जळजळ होणे ,घशात आंबट पाणी येणे,मळमळ होणे ,उलटी होणे ,डोके दुखणे ,अंगावर पित्ताच्या गाठी उठणे ,नाकातून रक्त येणे ,नागीण,डोळे तसेच तळहात ,तळपाय यांची आग होणे ,उष्ण मूत्रप्रवृत्ती होणे ,अंगावर कुठेतरी बेंड उठणे असे अनेक उष्णतेशी निगडीत व्याधी अचानक डोके वर काढतात .
आयुर्वेद हे शास्त्र केवळ आजार बरे करणारे शास्त्र नाही तर आजार होऊच नयेत म्हणूनही ते फार महत्वाचे काम करते ज्याला आजच्या भाषेत " Preventive Aspect " म्हटले जाते.हे बदल नैसर्गिकपणे घडणारच आहेत पण त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू नये म्हणून या दिवसात काय खावे ,प्यावे ,काय पथ्य पाळावे ,कोणती शरीरशुद्धी करावी की जेणेकरून आपले आरोग्य अबाधित राहील या विषयी आयुर्वेद मार्गदर्शन करतो.
वाढलेले पित्त शरीराबाहेर काढून टाकावे म्हणजे व्याधी निर्माणच होणार नाहीत,ह्या साठी या दिवसात म्हणजेच "शरद" ऋतूत विरेचन ही पित्ताची शुद्धि करणारी ,जुलाबावाटे दोष शरीराबाहेर काढून टाकणारी पंचकर्मातील क्रिया करून घ्यावी.
त्याचप्रमाणे रक्तातील दोष ,उष्णता निघून जावी आणि नवीन रक्त तयार व्हावे या दृष्टीने " रक्तमोक्षण " ही शुद्धीक्रियाही वैद्यांच्या सल्ल्याने जरुर करून घ्यावी.यामध्ये ठराविक प्रमाणात रक्त शिरेवाटे बाहेर काढून टाकले जाते.
खाण्यात पित्तशामक पदार्थांचा वापर करावा ,गोड किंवा मधुर रसाचे पदार्थ अधिक असावे .त्यामुळे दूध ,तूप यांचा वापर नियमित करावा.त्यासाठीच दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे श्रीखंड ,बासुंदी असे पक्वान्न करायची पद्धत आहे जी अतिशय शास्त्रीय आहे.याच हेतूने कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात आटीव दूध थंड करून पिण्याची पद्धत आहे.या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचा आपण आदर करायला हवा कारण त्यात शास्त्रीयता लपलेली आहे .उगीचच fad म्हणून एखादी गोष्ट मुद्दाम बदलायचा प्रयत्न करू नये कारण त्यात आपलेच नुकसान आहे .हल्ली कोजागिरीला भेळ आणि दूध किंवा पावभाजी आणि दूध असे काहीतरी चमत्कारिक combination खायची पद्धत रूढ झाली आहे जे विरुद्धान्न आहे.भेळ बनवताना आपण चिंच ,tomato अश्या आंबट पदार्थांचा वापर करतो आणि पावभाजी बनवताना त्यात भरपूर tomato ,लिंबू वापरतो,या नंतर गोड दूध पिण्याने ते सगळेच अम्लगुणाचे होते ,जणू नासतेच आणि मग जळजळ होऊ लागते .त्यामुळे या वर्षी आपल्याकडून अशी काही चूक होणार नाही याची आपण नक्की दक्षता घेऊया.
फळे खाताना डाळिंब नक्की असूद्या .पुढे लक्ष्मीपूजनालाही याच हेतूने सगळ्या पित्तशामक वस्तूंचा वापर सांगितला आहे .साळीच्या लाह्या,डाळिंब आणि बत्तासे !! त्या सगळ्या गोष्टीचा नक्की वापर करूया आणि आपणच आपले स्वास्थ्य रक्षण करूया .
-- वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D. (आयुर्वेद)
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
सर्दी पडसे होणे, नाकातले हाड वाढणे या बद्दलची माहिती देणारा लेख.
सुक्या मेव्याचा राजा म्हणून बदामाला ओळखले जाते. शरीर व मनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी औषधी व अन्न अशा दोन्ही स्वरूपात बदाम वापरले जातात. त्यात असणाऱ्या अलौकिक गुणधर्मामुळे सौंदर्यप्रसाधन म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तेल, साबण, क्रीम, मिठाई अशा विविध ठिकाणी बदामाचा वापर केला जातो.
औषधी गुणधर्म
शुष्क बदाम बी मधुर, कषाय, तीक्त गुणात्मक असून मधुर विपाकी व उष्ण वीर्यात्मक आहे. त्यामुळे बदाम बी स्निग्ध, बलकर, पौष्टिक, वातनाशक व कफकर आहे. या सर्व गुणधर्मामुळे आयुर्वेदात अनेक औषधांमध्ये बदामाचा वापर करतात. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, ‘ब’ जीवनसत्त्व, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, खनिज, प्रथिने, स्निग्धता ही घटक द्रव्य बदामामध्ये असतात. या घटकांनी उत्साह वाढतो व शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राहून दीर्घायुष्य लाभतं. बदामाच्या देशी व जंगली अशा दोन जाती आहेत. जंगली बदाम हा चवीला कडू असतो. तर देशी बदाम हा गोड असतो.
उपयोग
० बदामाचं तेल केसांच्या मुळाशी लावलं असता केसांना पोषक घटक मिळाल्यानं केसांची वाढ चांगली होते व केस गळणं, कोंडा होणं, अकाली केस पिकणं या समस्या दूर होतात.
० डोळयांखाली काळी वर्तुळं तयार झाली असतील तर बदाम दुधामध्ये उगाळून त्यांचा लेप लावावा. लेप सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. नियमितपणे ही प्रक्रिया केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे निघून जातात.
० बदाम पेस्ट, दुधाची साय व गुलाब पाणी एकत्र वाटून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग, मुरुमे जाऊन चेहरा टवटवीत व कांतीयुक्त होतो.
० बदाम रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी सोलून खावेत. याने स्मृतिभ्रंश, विस्मरण हे आजार कमी होतात.
० भिजलेल्या बदामाची पेस्ट दुधात कालवून दूध उकळावे व गाईचे तूप, वेलची, साखर घालून त्याची खीर बनवावी. ही खीर खाल्याने अशक्तपणा व थकवा दूर होतो. यासह वंध्यत्व
असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे या खिरीचं सेवन करावं.
० वारंवार डोकेदुखी होत असेल तर बदामाची खीर खावी. तीव्र डोकेदुखीमध्ये बदाम आणि कापूर दुधात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा.
० शरीरामध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलची निर्मिती होण्यासाठी नियमितपणे ४ बदाम रोज सकाळी उपाशीपोटी खावेत. यामुळे चांगल्या कोलेस्टेरॉलची (एच.डी.एल) निर्मिती होते व वाईट कोलेस्टेरॉलला (एल.डी.एल.) प्रतिबंध केला जातो. तसंच हदयविकार, रक्तदाब हे विकार टाळले जातात.
० जुनाट मलावरोधाची तक्रार असेल तर नियमितपणे झोपताना ६-८ बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होतं.
० चेहऱ्यावर काळे वांग आले असतील किंवा ओठ काळे दिसत असतील तर दुधाच्या सायीमध्ये बदाम उगाळून हळुवार मालीश करावी. यामुळे काळसरपणा दूर होतो.
० त्वचा कांतीयुक्त होण्यासाठी बदामाचं तेल, चंदन तेल, लोणी व मध यांचं मिश्रण त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन रंग उजाळतो.
० मेंदू, हदय, डोळे यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमितपणे बदामाचं सेवन करावं. ० शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी, बाळंतिणीचं दूध वाढविण्यासाठी, तिच्या शरीराची झीज भरून तसंच वातप्रकोप कमी करण्यासाठी बदाम,काजू, िडक, खोबरं, मनुका, चारोळी, पिस्ता, खारीक यांचे गूळ घालून लाडू बनवावेत. रोज नियमित एक लाडू खाल्ल्याने खूप फायदा
होतो.
सावधानता
सहसा बदाम बी ही कवचाच्या आत असल्यामुळे सुरक्षित आहे. फक्त बदाम खाताना अति प्रमाणात खावू नये. ते सारक गुणधर्माचे असल्यामुळे अति खाल्ल्यास जुलाब होण्याची शक्यता असते.
-- डॉ. शारदा महांडुळे, sharda.mahandule@gmail.com
आरोग्यदूत या WhatsApp Group वरुन साभार
अनेक ऍलर्जीकारक घटक, ते वातावरणात समाविष्ट असतात, जसे, फुलांचे परागकण, धूळ, धूर, त्याचप्रमाणे विविध अन्नघटक, धातू, कीटकदंश, निरनिराळ्या प्रकारची औषधे ही त्वचेची तसेच श्वाचसनलिकेची संवेदनशीलता वाढवू शकतात, तेव्हा असे ऍलर्जीन्स किंवा ऍलर्जीक सूक्ष्मकण आपल्या शरीरातील IGE अँटीबॉडीस‘शी संयोग पावतात, तेव्हा हिस्टॅमिन नावाच्या रसायनाचे रक्तातले प्रमाण वाढते आणि त्याचे पर्यवसान निरनिराळ्या ऍलर्जीक त्रासांमध्ये होते. प्रामुख्याने दिसून येणाऱ्या निरनिराळ्या ऍलर्जीस कोणत्या व त्या कशा प्रकारची लक्षणे निर्माण करतात याविषयी आपण थोडी माहिती.
ऍलर्जीक सर्दी व सायनुसायटीस - ऍलर्जीक विकारांमध्ये सर्वांत जास्त आढळून येणारा हा विकार आहे. सध्याचे वाढते प्रदूषण हेही या विकाराच्या प्रमाणामध्ये भर टाकत आहे. ही ऍलर्जीक सर्दी, हवेतील घटकांमुळे होते. हवेतील धूळ, धूर, परागकण आणि इतर काही सूक्ष्मकण यांच्यामुळे नाकातील पटलाला सूज येते- त्यामुळे नाकातून वारंवार पाणी येणे, साधारणतः 10 ते 20 किंवा कधी कधी जास्तच शिंका येणे, नाक चोंदणे, नाकात व टाळ्याला खाज येणे, डोळ्यालाही खाज येऊन डोळे लाल होणे, नाकातून पाण्याची धार लागणे या प्रकारच्या लक्षणांनी रुग्ण बेजार होतो. ही लक्षणे विशिष्ट ऋतूत तर काही व्यक्तींमध्ये वर्षभर त्रास देत राहतात. वेळीच या त्रासावर उपाय केले गेले नाहीत, तर या त्रासाचे रूपांतर सायनुसायटीस, नाकातील पॉलिप्स किंवा कानाच्या विकारातही होऊ शकते. या सर्दीला गंभीर व्याधीचे स्वरूप बिलकूल नसूनही सततच्या शिंका, वाहते नाक, डोळ्यांची खाण यामुळे व्यक्तीची कामातली तत्परता, उत्साह खरोखरच कमी होते आणि व्यक्ती संत्रस्त बनते.
ऍलर्जीक दमा बऱ्याच व्यक्ती, या ऍलर्जी सर्दीने त्रस्तत असतात, त्यांच्यामध्ये ऍलर्जीक दम्याचेही प्रमाण अनेक वेळा दिसून येते. ऍलर्जीक सर्दी आणि ऍलर्जिक दमा ते एकमेकांबरोबरच बऱ्याच वेळा आढळून येतात. थोडासा धूर, धूळ, अत्तरांचे सुगंध, फुलांचे गंध या आणि अशा प्रकारच्या गोष्टींशी विशेषतः वासातून संपर्क आला, की छाती जड वाटणे, भरून येणे दम लागणे, श्वाशस घ्यायला त्रास होणे, थोडाफार खोकला येणे अशी लक्षणे दिसायला लागतात आणि ही लक्षणे ठराविक ऋतूत जास्त तीव्र होतात.
अर्टिकॅरिआ किंवा अंगावर गांधी उठणे (अंगावर पित्त उठणे)
अनेक प्रकारच्या गोष्टींशी विशेषतः खाण्यातून संपर्क आला की अंगावर पुरळ, चट्टे उठणे, मोठ्या गांधी येऊन खाज येणे यालाच वैद्यकीय भाषेत अर्टिकॅरिआ असे म्हटले जाते. अशा प्रकारची त्वचेची तक्रार अंडी, मासे, सागरी खाद्ये, ठराविक भाज्या यांच्या सेवनाशी निगडित असते. कधी कधी काहीच न खाताही पित्त उठू शकते. लक्षणांची सुरवात अंगावर छोटे पूरळ उठण्याने होते. थोड्या वेळाने हे पूरळ मोठे होतात, त्यांचे चट्टे बनतात व खाज येऊ लागते. या चट्ट्यांचे प्रमाण पोटावर, पाठीवर, हातापायांवर मानेवर, कधी कधी चेहऱ्यावरही जास्त असते. त्वचेची ऍलर्जी कशामुळे यावी याला तसा काहीच नियम नाही. कोणाला गवारीच्या भाजीमुळे तर कोणाला कोबीच्या भाजीमुळे पित्त उठते. सालीसकट खाल्ली जाणारी फळेही जंतुनाशक फवारा मारल्यामुळे जर स्वच्छ धुतली गेली नाहीत, तर ऍलर्जीचे चट्टे उठू शकतात.
ऍलर्जीक इसब (अटोपिक दाह किंवा अटोपिक डरमॅटायरीस) ऍलर्जीमुळे होणारा त्वचेचा दाह यालाच वैद्यकीय भाषेत अटोपिक डरमॅटायरीस (Atopic dermatitis) असे म्हटले जाते. बऱ्याच वेळा ऍलर्जीक सर्दी, ऍलर्जीक दमा आणि त्वचेचा ऍलर्जीक दाह हे एकत्रच दिसतात. यांना "ऍलर्जीचा त्रिकोण‘ असेही म्हणतात. ही तक्रार शक्यहतो लहान वयातच सुरू होते. यामध्ये त्वचा रुक्ष व कोरडी बनते. त्वचेला लाली, सून येऊन खाज येते. व कात्रेही पडतात. लहान मुलांमध्ये अंगावर कोठेही तर जसजसे वय वाढेल तसतसे त्वचेचे हे चट्टे गुडघ्याच्या मागे, कोपरावर येत राहतात. ऍलर्जीचा हा प्रकार अत्यंत चिवट आहे. तो आपली उपस्थिती परत परत दाखवतो- वेळप्रसंगी होमिओपॅथिक औषधांच्या मात्रा बदलून त्याला शह देत राहावे लागते.
त्वचेचा संपर्कदाह (contact dermatitis) त्वचेचा जो भाग काही प्रकारच्या ऍलर्जीक घटकांच्या संपर्कात येतो, तो लाल होणे, खाज उठणे, पूरळ येणे यालाच वैद्यकीय भाषेत कॉन्टॅक्टट डरमॅटायरीस म्हणतात, काही साबणे, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, खोटे दागिने यांच्या वापरानंतर अशा प्रकारचा त्वचेचा दाह सामान्यतः दिसून येतो. हाही ऍलर्जीचाच एक प्रकार आहे.
अशा सर्व ऍलर्जीक व्याधींमध्ये ऍलर्जिन्सचा संपर्क टाळणे हा जरी उपाय असला तरी तो व्यावहारिक खचितच नाही. अशा वेळेला अशा तक्रारींवर ऍटीऍलर्जीक (ऍन्टीहिस्टॅमिनिक्सट- Antihistaminics) औषधे घेऊन ती ऍलर्जी सतत दाबून टाकायचा प्रयत्न करणे याखेरीज यावर उपाय काय असा प्रश्नत पडणे अगदी साहजिकच आहे. या प्रश्नातला होमिओपॅथी अगदी समर्पक उत्तर देऊ शकते. वर नमूद केलेल्या ऍलर्जीक खेरीज ऍलर्जीचे अनेक प्रकार आहेत; परंतु वरील प्रकारच्या ऍलर्जीमध्ये होमिओपॅथी अत्यंत गुणकारी ठरते, असे अनुभवाप्रमाणे दिसून येते. होमिओपॅथीत अतिसंवेदनशील ते वर अनेक परिणामकारक औषधे आहेत जी सर्दी, दमा, त्वचेचा दाह, पित्ताच्या गांधी यासारखी लक्षणे तर कमी करतातच; पण त्वचेची अतिसंवेदनशीलताही मर्यादित करतात. त्यामुळे नेहमी त्रास देणारे वातावरणातले घटक, खाद्यपदार्थ हेसुद्धा तितकेसे त्रासदायक ठरत नाहीत. होमिओपॅथीत ऍलर्जीक दमा, सर्दी यावर ऍलियम सेपा, अर्सिनिक अलव, नक्सयहोमिका ही आणि अशी अनेक गुणकारी औषधे आहेत, तसेच त्वचेच्या दाहावर कोपायव्हा, एपिसमेल, आर्टिकायुरेन्स यासारखे रामबाण उपाय आहेत, जी प्रकृतीसाधर्म्यानुसार, तज्ज्ञांच्या साहाय्याने योग्य शक्तींमध्ये घेतली तर ऍलर्जीकारक प्रवृत्ती, ऍलर्जीक लक्षणे कमी करतातच याशिवाय प्रतिकारशक्तीही वाढवतात आणि त्या पदार्थाप्रति असणारी अतिसंवेदनशीलताही कमी करतात.
एकतर लक्षात ठेवले पाहिजे, की ऍलर्जी ही मुळात खोलवर रुजलेली, जुनी प्रवृत्ती आहे. कधी कधी तर ती आनुवंशिकही आहे, त्यामुळे पेशंटने दाखवलेला "पेशन्स‘ डॉक्टृरची आपल्या पेशावरची आणि उपचारपद्धतीवरची निष्ण, होमिओपॅथीक शास्त्राची नवीन युगातही पुरून उरणारी व्यापकता या साऱ्यांचा संगम झाला तर वैद्यकशास्त्रातील अनेक अवघड समस्यांची उत्तरे निश्चि तच उलगडत जातील.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२२३०१७३३
संदर्भ. डॉ. अपर्णा पित्रे
आपल्याला तपासताना डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. हा अनुभव बहुतेकांना आला असेल. जिभेचा संबंध अन्नाची चव घेण्याशी असतो आणि बोलताना जीभ महत्त्वाचे कार्य करते हेदेखील सर्वांना माहीत असावे. सामान्यपणे आपली जीभ आपल्या मुखाच्या पोकळीच्या आतच असते. मानवी जीभ दहा सेंटिमीटर लांब असते आणि जिभेचे वजन 56 ग्रॅम असते. इतर प्राण्यांमध्ये जीभ दुसरी कामे करताना दिसते. बेडूक आपल्या जिभेने कीटकांना पकडू शकतो. सापाची जीभ अंधारात आजूबाजूच्या वस्तूंना स्पर्श करीत मार्ग काढण्यास मदत करू शकते. माणसाची जीभदेखील चव आणि वाचा याखेरीज इतर महत्त्वाची कार्ये करते. आपण अन्न चावून खातो तेव्हा तोंडातल्या तोंडात एका बाजूने दुसरीकडे अन्न सारखे फिरवले जाते. या फिरवण्यामुळे अन्न सगळ्या बाजूने चांगले चावले जाते. असे चांगले चावून मऊ झालेल्या अन्नात लाळ व्यवस्थित मिसळू शकते. लाळेत महत्त्वाचे विकर असते. टायलिन या नावाने ते ओळखले जाते.
हे टायलीन विकर (इन्झाईम) कर्बोदकांच्या पचनात महत्त्वाचे कार्य करते. नीट चावून मऊ झालेल्या अन्नात लाळ मिसळण्याने कर्बोदकांच्या पचनाला सुरवात होते. कर्बोदक नीट न पचताच आंतड्यात गेली, तर ती शोषली जात नाहीत. न शोषली गेलेली कर्बोदके मोठ्या आतड्यात जातात. तेथील जिवाणू (बॅक्टेपरिया) या कर्बोदकांचे विघटन करतात. या प्रक्रियेतून अखेर मिथेन हा वायू तयार होतो. या वायूला दुर्गंधी नसते; परंतु "वारा सरताना‘ हा वायू आवाज करतो. त्यामुळे व्यक्तीला ओशाळल्यागत होते. कर्बोदकांच्या चांगल्या पचनाची सुरवात आपल्या मुखात होण्यात जिभेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या मुखाच्या पोकळीत जिभेचे टोक दात, हिरड्या, मुखाचे छप्पर, ओठ येथे असलेले सर्व पदार्थ गिळते. अशा रीतीने आपल्या मुखाच्या आतील स्वच्छता ठेवण्याचे कार्य जीभ सतत करीत असते.
जिभेचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्न गिळण्याची सुरवात करणे हे होय. जिभेचा पुढचा भाग (टोक व शेजारचा भाग) मुखाच्या छपरावर घट्ट दाबला जातो. जिभेचा मागचा भाग उचलला जातो. आता चावून मऊ व लाळ मिसळून ओला झालेला घास घशाकडे ढकलला जातो. इथून तो अन्ननलिकेकडे घसाच्या स्नायूंच्या आकुंचनाने नेला जातो. या कार्यात विविध स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या वेळचा ताल अचूकपणे सांभाळला जाणे आवश्यघक असते. गर्भावस्थेतच ही क्रिया करण्याचे प्रशिक्षण अर्भकाला मिळालेले असते. त्यामुळे जन्मल्या जन्मल्याच मूल स्तनपान करू शकते. जिभेच्या बाहेरच्या बाजूने पातळ त्वचा असते. आतून स्नायू, रक्तरवाहिन्या आणि ज्ञानतंतूच्या शिरा असतात. जिभेच्या वरच्या भागावर छोटे छोटे उंचवटे असतात. या उंचवट्यातील काही उंचवटे चव समजण्याच्या क्रियेत महत्त्वाचा भाग घेतात. त्यांना टेस्ट बडस् म्हणतात या टेस्ट बडमधील पेशी रासायनिक क्रियेमार्फत "चवीचे‘ वेगळे वेगळे प्रकार ठरवितात. हे टेस्ट बडस् जिभेप्रमाणे मुखाच्या पोकळीच्या अस्तरात सर्वत्र असतात. अन्नाला वेगळी वेगळी चव समजते, त्यात या टेस्ट बडस्च्या जोडीला वासाचेदेखील महत्त्व असते. चवदेखील चार प्रकारची आहे, असे शास्त्र मानते. आंबट चव ही ऍसिड (आम्लता) मुळे समजते. खारट चव विविध क्षारांमुळे जाणवते. गोड चव कोणत्याही एका विशिष्ट प्रकारच्या रासायनिक रेणूमुळे निर्माण होत नाही. काही रासायनिक रेणूंची चव गोड लागते; परंतु साखरेच्या रेणूप्रमाणे हे पदार्थ उष्मांक निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे ज्यांना आपले वजन कमी करावयाचे आहे, अशा व्यक्तींना हे कृत्रिम गोडी आणणारे (आर्टिफीशियल स्वीटनर्स) घटक वापरता येतात. या रेणूच्या वापरातून पोटात वायू (गॅसेस) मात्र निर्माण होतात. कडू चवदेखील अनेक प्रकारच्या रासायनिक रेणूंमुळे जाणवते. यांपैकी अल्कलॉईडस प्रकारचे रेणू अनेक औषधांत असतात. उदाहरणार्थ क्विनीन, कॅफेन, स्ट्रिकवीन किंवा निकोटिन.
तिखट ही वेगळी "चव‘ नसून, काही रेणू आपल्या जिभेवरील ज्ञानतंतूंच्या टोकाला झोंबतात, त्यातून तिखट जाणवते. चव समजण्याकरता अन्नाचे हे विशिष्ट रासायनिक रेणू विरघळणे आवश्यतक असते. हे काम लाळ करते. कोणत्याही कारणाने तोंड कोरडे पडले (लाळ सुटणे थांबते) तर अन्नाची चव कळेनाशी होते. त्यातून लाळ न सुटल्यामुळे जिभेवर मृत पेशीचे किटण जमले, तर त्या मृत पेशीतील काही रसायनांचे विघटन होऊन कडू चव असणारे रेणू निर्माण होतात. व तोंडात कडू चव जाणवत राहते. अनेक औषधांचादेखील असा परिणाम असतो. माणसामाणसात त्याच अन्नाला वेगळी वेगळी चव जाणवते. पालक काहींना चवदार वाटतो, तर इतरांना कडू लागतो. अर्थात तोच पदार्थ काहींना आवडतो; इतरांना आवडत नाही. शिवाय आवडीनावडीचे प्रकार मानसिक अनुभवावरही अवलंबून असतात. त्यामुळे आवडीनावडी बदलू शकतात. तरुण वयात गोड न आवडणाऱ्या व्यक्तींवना वार्धक्या जसे जवळ येऊ लागते, तसे गोड पदार्थ आवडू लागतात. हा अनेकांचा अनुभव असतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. मधुरा भिडे
आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खातायना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.
ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
ज्वारीचे फायदे -
1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.
ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.
ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर (गोड ज्वारीपासून) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषकमूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.
शरीरातील एक किंवा अधिक स्नायू कार्य करीत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. चेतासंस्थेला विशेषकरून व मेरुरज्जूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. पक्षाघातामुळे स्नायू लुळे व दुबळे होतात. अशा स्थितीत जर संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात.
पक्षाघात पक्षाघाताच्या इतर कारणांमध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबणे (स्ट्रोक), डोक्याला किंवा पाठीला मार बसून चेतांना किंवा मेरुरज्जूला इजा पोहोचणे, पोलो, बोटुलिन या जीवविषाचा परिणाम, चेतातंतू आवरणदाह इत्यादींचा समावेश होतो. चेतापेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असते. काही कारणाने उदा., मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीतील गाठ अवरोधामुळे रक्तपुरवठा थांबला तर चेतापेशींचे कार्य थांबते. अशा चेतापेशी ज्या अवयवाचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि पक्षाघात होतो. काही वेळा अचानक रक्तदाब वाढल्यास मेंदूमधील धमनी फुटून मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव होतो. या रक्तस्रावामुळे चेतापेशींवरील दाब वाढून पक्षाघात होतो. मस्तिष्कस्तंभामध्ये (मज्जारज्जू आणि मेंदू यांना जोडणाऱ्या भागामध्ये) रक्तस्राव झाल्यास पक्षाघाताबरोबर मृत्यूही ओढवतो.
पक्षाघात एखाद्या विशिष्ट भागापुरता (स्थानिक) किंवा सार्वदेहिक असू शकतो. शरीराच्या ज्या भागावर परिणाम घडतो त्यानुसार पक्षाघाताचे वर्णन करता येते. उदा., एका बाजूचा हात आणि त्याच बाजूचा पाय लुळा पडणे (अर्धपक्षाघात), कमरेखालील भाग व दोन्ही पाय लुळे पडणे (अधरपक्षाघात), दोन्ही हात व पाय लुळे पडणे (चतुरांगघात).
पक्षाघाताचे सामान्यपणे सौम्य आणि तीव्र असे दोन प्रकार करता येतात. सौम्य पक्षाघात बहुतेक वेळा रेम झोपेच्या कालखंडामध्ये होतो (पहा: झोप). अंथरुणातून उठताना चालणे, बोलणे किंवा डोळे न उघडता येणे, चेहरा निश्चल होणे, डाव्या किंवा उजव्या बाजूच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होणे, ओठ खाली पडणे, हातातून वस्तू खाली पडणे, चप्पल घातल्यानंतर ती नकळत पायातून निसटणे ही सौम्य पक्षाघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. वेळीच उपचार झाल्यास सौम्य पक्षाघात बरा होतो.
अतिधूम्रपानामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. तसेच रक्तदाबाची औषधे नियमित न घेतल्यास किंवा उच्च रक्तदाब नियंत्रणाखाली न ठेवल्यास मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता वाढते. मेंदूमध्ये रक्तस्रावाचे निदान चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा (एमआरआय) तंत्राने करता येते. निदानानंतर लागलीच शस्त्रक्रिया करून मेंदूमधील रक्ताची गुठळी काढली तरी मेंदूच्या ज्या भागात गुठळी झाली होती तो भाग पूर्ववत कार्यरत होणे कठीण असते. शरीराचा डावा किंवा उजवा भाग पक्षाघाताने लुळा पडल्यास संवेदी चेतापेशींच्या कार्यामध्ये फारसा अडथळा येत नाही. भौतिक चिकित्सा उपचारांनी काही प्रमाणात अशा अवयवांची हालचाल पुन्हा होऊ शकते. घसा आणि ग्रसनी यांचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या भागाला पक्षाघात झाल्यास बोलणे आणि गिळणे या क्रियांवर परिणाम होतो.
मेंदूमध्ये वाढलेली गाठ लगतच्या निरोगी पेशीवरील दाब वाढवते. त्यामुळे निरोगी पेशी निकामी होतात आणि पेशीनियमन करणाऱ्या भागाचा पक्षाघात होतो. पोलिओसारख्या विकारामध्ये चेतांच्या संदेशवहन क्षमतेमध्ये बिघाड होऊन स्नायू दुर्बल होतात. हा सुद्धा पक्षाघाताचा प्रकार आहे. पक्षाघात झाल्यानंतर त्वरित उपचार केल्यास काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता वाढते. ज्या चेतापेशी मृत होतात त्यांच्याजवळील चेतापेशींच्या वृक्षिका मृत चेतापेशींची जागा घेऊन अवयवांचे नियंत्रण करतात. मर्यादित प्रमाणात अवयवांची हालचाल, बोटांची हालचाल किंवा हातापायांचा उपयोग करता आल्यास पक्षाघात झालेल्या रुग्णाचे जीवन परावलंबी होत नाही.
प्राणिमात्रांमधील पक्षाघात काही प्राण्यांच्या जाती भक्ष्य पकडण्यासाठी त्या भक्ष्यामध्ये परिणाम घडून येईल अशा जीवविषाचा वापर करतात. काही प्राणी अशा तंत्राचा वापर शिकारी प्राण्यापासून सुटका करून घेण्यासाठीही करतात. गांधीलमाशीच्या काही जाती प्रजनन चक्र पूर्ण करताना तिची मादी नाकतोडयासारख्या भक्ष्याला दंश करून पक्षाघात घडवून आणते आणि त्याला घरट्यात आणून ठेवते. त्यानंतर ती या नाकतोडयाच्या शरीरात अंडी घालते. अंडयातून बाहेर पडलेले डिंभ त्या नाकतोडयावर जगतात.
जपानमध्ये आढळणारे फुगू हे विषारी मासे आहेत. या माशांमध्ये टेट्रोडोटॉक्सिन हे चेतासंस्थेवर परिणाम करणारे जीवविष असते. हे मासे ज्यांना दंश करतात त्यांच्या चेतापेशींमधील सोडियम आयनांच्या कार्यात बिघाड निर्माण करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
गुदद्वाराच्या आतील भागास असलेल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे तेथील आंतरवर्णासह सैल सुटते त्या वेळी हाताला कसला तरी कोंब किंवा मोड लागतो. ब-याचदा यामध्ये वेदना व रक्तस्राव प्रकट होतो. या स्थितीलाच मूळव्याध असे म्हणतात. मूळव्याधीचे दोन प्रकार करण्यात आलेले आहेत. 1. आंतर मूळव्याध व 2. बाह्य मूळव्याध. मोड किंवा अंकु र किंवा व्रण गुदद्वाराच्या आतील भागात निर्माण झाले असतील तर त्याला आंतर मूळव्याध असे म्हणतात. हेच अंकुर जेव्हा आणखी खाली सरकून गुदद्वाराच्या बाहेर येतात तेव्हा त्याला बाह्य मूळव्याध, असे म्हणतात. एकाच व्यक्तीला वरील दोन्ही प्रकारचा त्रास असू शकतो.
मूळव्याधीची लक्षणे : मलत्यागाच्या वेळी जळजळणे, वेदना होणे आणि रक्तस्राव होणे हे या आजाराचे प्रारंभिक लक्षण होय. याशिवाय मलाच्या वरील भागावर लालसर रेषा प्रकट होणे, थेंब थेंब रक्त पडणे, मलाशयातून रक्तस्राव होऊन अॅ निमिया निर्माण होणे इत्यादी लक्षणे प्रकट होतात.
योगासने व व्यायाम : योगासने ही मूळव्याधीवर अतिशय उपायकारी व्यायाम पद्धती आहे.
रोज सकाळी २-३ किलोमीटर चालणे. सकाळ-संध्याकाळ सर्वांगासनाच्या स्थितीमध्ये राहून सायकल चालवण्यासारखा व्यायाम करावा. या उपचाराने पूर्णपणे मूळव्याधी बरी झाली असता नैसर्गिक जीवन पद्धतीची कास सोडू नये.
ऑपरेशनच्या नावाखाली मूळव्याधीला जाळण्याचे व कापण्याचे प्रयोग चालतात. यामुळे वरवर फायदा निश्चितच दिसून येतो, परंतु चुकीच्या आहाराविहारात सुधारणा न केल्याने मोठ्या आतड्याचे इतर विकार उद्भवतात. दुसरे विकार होऊ नयेत म्हणून ऑपरेशननंतरही नैसर्गिक उपचार पद्धती अमलात आणली पाहिजे.
आहार चिकित्सा व उपचार रोज १०-१२ ग्लास पाणी प्यावे. हिरव्या पालेभाज्या जास्त आहारात असाव्यात. चिकन, मटन, मसाल्याचे पदार्थ, तेलकट, बाजरीची भाकर, जास्त गरम पदार्थ टाळावेत. ओवा, जंगली ओवा, खुरासणी ओवा यांचे बारीक चूर्ण करून थोड्याशा लोण्यात कालवून सकाळ-संध्याकाळ मूळव्याधीच्या फोडांवर लावावे. वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.
होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथिक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. यापासून कोणतेही दूष्परिणाम होत नाही. रुग्णाचा सर्वांगीण अर्थात शारीरिक आजाराचा व मानसिकतेचा अभ्यास करून रुग्णाला औषध दिले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोकं हाताऐवजी चमच्याने जेवतात. आणि या प्रकारे जेवताना स्वत:ला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. आयुर्वेदाप्रमाणे आमचे शरीर पंचतत्त्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्त्वाचे अस्तित्व आहे.
अंगठा- अग्नी
तर्जनी- वायू
मध्यमा- आकाश
अनामिका- पृथ्वी
कनिष्का- पाणी
जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाची बोटांना आपसात जोडून तोंडात घास भरतो, याने पंचतत्त्वांचा समतोल होत असून शरीराला मिळणारं अन्न ऊर्जा देणारं असतं. हाताने जेवल्याने आमचा मेंदू आमच्या पोटाला अन्नग्रहण करण्याचा इशारा देतो ज्याने पचन क्रिया सुधारते.
हाताने जेवताना आमचं सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित असल्याने शरीराला मिळणारी पोषकता वाढते.
याव्यतिरिक्त हाताने जेवण केल्याने तोंड भाजण्याचा धोकाही कमी होतो. कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही याचा अंदाज येतो.
आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुपवरुन
Copyright © 2025 | Marathisrushti