वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मार्कण्डेय पुराणाचे रचयिता मार्कण्डेय ऋषींनी हे अष्टक रचून शंकराचा धावा केला अशी लोककथा आहे. मृगशृंग ऋषींचा पुत्र मृकण्डू याला संतान नसल्याने त्याने भगवान शंकराची आराधना केली. शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला, परंतु दीर्घायुषी पुत्र मंद बुद्धीचा तर अल्पयुषी पुत्र (१६ वर्षे) अत्यंत बुद्धिमान असेल असा विकल्प दिला. मृकण्ड ऋषींनी दुसरा विकल्प निवडला. तोच हा पुत्र. मृकण्डाचा पुत्र म्हणून त्याचे नाव मार्कण्डेय. १५ वर्षे विद्याध्ययन केले. १६ व्या वर्षी जेव्हा कृतांत काळ आला तेव्हा मार्कण्डेयाने भगवान शंकराचा धावा केला. यमदूतांनी आपल्याला ओढून नेऊ नये म्हणून त्याने शिवलिंगाला घट्ट मिठीच मारली. शंकराने प्रसन्न होऊन त्याचे रक्षण केले व यमाला रिक्तहस्ते परत पाठवून दिले. त्यानंतर त्याने हे स्तोत्र म्हटले अशी समजूत आहे.
सदर अष्टक मार्कण्डेय ऋषींनी रचले आहे. त्याच्या पठणाने अकाल मृत्यू टळतो, तसेच हे मानवाला सांसारिक कष्टांपासून वाचवणारे कवच आहे अशी भाविकांची धारणा आहे.
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर पाहि माम् ।
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥१॥
मराठी- हे शंकरा, माझे पालन कर. हे शंकरा माझे रक्षण कर.
हे सदाशिव शंकरा जगती करी मम रक्षणा ।
हे सदाशिव शंकरा जगती करी मम पालना ॥ ०१
रत्नसानुशरासनं रजताद्रिशृङ्गनिकेतनं
सिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युताननसायकम् ।
क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदिवालयैरभिवन्दितं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥२॥
मराठी- चांदीसारख्या शुभ्र पर्वता (हिमालया) चे शिखर हेच ज्याचे घर आहे, ज्याने रत्नखचित मेरू पर्वताचे धनुष्य बनवले, त्याला सर्पराज (वासुकी) ची प्रत्यंचा जोडली, ज्याच्या बाणावर श्रीविष्णू आरूढ झाला, आणि ज्याने तीन नगरे झपाट्यात जाळून टाकली, ज्याला देवता वंदन करतात, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील?
मेरुचे धनु, वासुकी गुण, विष्णु सायक ज्या करी (गुण- धनुष्याची दोरी)
नष्ट तीन पुरे झणी, सुर पाउले नमिती बरी ।
जो वसे शिखरी हिमालय, तो मला नित आसरा
काय काळ करी तिथे मज, त्यास पाड नसे जरा ॥ ०२
टीप- या श्लोकाला संदर्भ शिव पुराण व मत्स्य पुराणातील, शंकराने सर्व देवांच्या साहाय्याने त्रिपुरांचा नाश केला त्या कथेचा आहे.
पञ्चपादपपुष्पगन्धपदांबुजद्वयशोभितं
भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम् ।
भस्मदिग्धकलेबरं भव नाशनं भवमव्ययं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥३॥
मराठी- पाच वृक्षांच्या फुलांनी आणि त्यांच्या सुवासाने ज्याची पदकमळे सुशोभित (आणि सुगंधित) झाली आहेत, कपाळावरील नेत्रातून बाहेर पडलेल्या अग्नीने ज्याने मदनाला जाळून टाकले, ज्याने सर्वांगावर राख फासली आहे, जो या जीवनातील दुःखे नष्ट करतो आणि जो सर्वकाळ अस्तित्त्वात रहातो, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?
पावले सुम पंचकी खुलली सुवास उफाळला
वन्हिने नयनातल्या उघडून मन्मथ जाळिला ।
सर्वव्यापक, दुःख नाश करीत, राख तनूवरी
त्यास पाड नसे जरा मज काळ काय तिथे करी ॥ ०३
टीप- येथे पहिल्या चरणातील ‘पंचपादप’ चा संदर्भ मंदार,पारिजात,संतान,कल्पवृक्ष आणि हरिचंदन या ‘देवतरु’ या उपाधीने ओळखल्या जाणार्या झाडांशी आहे.
मत्तवारणमुख्यचर्मकॄतोत्तरीयमनोहरं
पङ्कजासनपद्मलोचनपूजितांघ्रिसरोरुहम् ।
देवसिन्धुतरङ्गसीकर सिक्तशुभ्रजटाधरं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥४॥
मराठी- ज्याने माजलेल्या हत्तीचे कातडे आपल्या पाठीवर पांघरले आहे, ज्यामुळे तो (आणखीच) मनोहर दिसत आहे, ज्याच्या पदकमळांची कमळात बसणारा (ब्रह्मा) आणि कमळासारखे नेत्र असणारा (विष्णू) पूजा करतात, स्वर्गंगेच्या लाटांमुळे ज्याच्या शुभ्र जटांवर पाण्याचे तुषार फवारल्यासारखे दिसतात, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?
जो दिसे रमणीय ओढुन मत्त कुंजर चामडे
पादपद्म विधी-अनंतहि पूजिती नत त्यापुढे । (विधी-ब्रह्मा, अनंत-विष्णू)
जान्हवी जल लाट फेकत शुभ्र थेंब जटांवरी
शंकरा शरणा मला मग काळ काय तिथे करी ॥ ०४
यक्षराजसखं भगाक्षहरं भुजङ्गविभूषणं
शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेबरम् ।
क्ष्वेडनीलगलं परश्वधधारिणं मृगधारिणं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥५॥
मराठी- कुबेराचा मित्र असणार्या, भगाच्या डोळ्याचे हरण करणार्या, नाग हेच ज्याचे अलंकार आहेत, ज्याच्या शरीराचा डावा भाग नगसुता पार्वतीच्या रूपाने सुशोभित झाला आहे, विषप्राशनामुळे ज्याचा गळा निळा झाला आहे, ज्याच्या हाती परशू आहे, ज्याच्याबरोबर (शिरावरील चंद्रामध्ये) एक हरीण आहे,अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?
मित्र वैश्रवणा, भगा नयनारि, पन्नग दागिना
पार्वती विलसे सदाशिव अंग वाम सुलक्षणा ।
प्राशुनी विष नील कंठ मृगा सवे परशू करी
शंकरा शरणा मला मग काळ काय तिथे करी ॥ ०५
कुण्डलीकृतकुण्डलेश्वर कुण्डलं वृषवाहनं
नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम् ।
अन्धकान्तकमाश्रितामरपादपं शमनान्तकं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥६॥
मराठी- ज्याच्या कानावर सर्पराजाचे वेटोळे कर्णभूषण म्हणून घातले आहे, नंदी ज्याचे वाहन आहे, जो त्रिभुवनाचा स्वामी असून नारद इत्यादी मुनीश्रेष्ठ ज्याच्या ऐश्वर्याचे गुणगान करतात, ज्याने अंधकासुराचा नाश केला, जो शरणागतांसाठी कल्पवृक्ष आहे, ज्याचे यमावर नियंत्रण आहे, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?
वर्तुळाकृति वासुकी श्रवणी, नि नंदिक वाहना (नंदिक- नंदी, शिवाचे वाहन)
तीन लोकधनी, मुनीजन गात वैभव वंदना ।
अंधका वधिले, शिवा, शरणास कल्पतरू खरा
काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०६
टीप- काही अभ्यासकांनी ‘अन्धकान्तकमाश्रितामरपादपं’ चा संदर्भ वृष्णिवंश व अंधक वंशाच्या शिव भक्तीशी लावलेला दिसतो.
भेषजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं
दक्षयज्ञविनाशनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनम् ।
भुक्तिमुक्तिफलप्रदं सकलाघसंघनिबर्हणं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥७॥
मराठी- या भव रूपी जगातील रोग्यांना औषधस्वरूप असणार्या, सर्व संकटांना दूर सारणार्या, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणार्या, ज्याच्या ठायी (सत्व,रज,तम हे) तिन्ही गुण एकवटले आहेत, अशा तीन लोचन असलेल्या, भौतिक सुखोपभोग आणि मोक्ष रूपी फळ देणार्या,पातकांच्या राशींचा नाश करणार्या अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?
तोडगा भव रोगियां, विपदा समस्त दुरी झणी
दक्षहोमविनाश, सुंदर नेत्र तीन, त्रयो गुणी ।
सौख्य मोक्षद, पापनाशक आसरा मज शंकरा
काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०७
भक्तवत्सलमर्चितं निधिक्षयं हरिदंबरं
सर्वभूतपतिं परात्परमप्रमेयमनुत्तमम् ।
सोमवारिदभूहुताशनसोमपानिलखाकृतिं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥८॥
मराठी- ज्याची (भक्तजन) पूजा करतात, जो भक्तांप्रती दयाळू आहे, जो अक्षयनिधी आहे, या दिशाच ज्याची वस्त्रे आहेत, जो सर्व प्राणिमात्रांचा स्वामी आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अमर्याद आहे, ज्याच्यापेक्षा अधिक उत्तम कोणीही नाही, जो सूर्य,चंद्र, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आदि स्वरूपात विराजमान आहे, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?
सेवकां कनवाळु, पूजत भक्त, अक्षय राशि जो
जो दिगंबर, भूतनाथ, अनंत, उत्तम सर्व जो ।
तेज वायु रवी रसा नभ इन्दु जो जल साजिरा
काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०८
विश्वसृष्टिविधायिनं पुनरेव पालनतत्परं
संहरन्तमपि प्रपञ्चमशेषलोकनिवासिनम् ।
कीडयन्तमहर्निशं गणनाथयूथसमन्वितं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥९॥
मराठी- जो या विश्वाचा आणि सृष्टीचा निर्माता आहे, तसाच त्याचे पालन करण्यातही तत्पर आहे, आणि शेवटी योग्य वेळी असंख्य जनांसाठी वसतीयोग्य अशा या जगाचा सर्वनाश करतो, आपल्या भूतगणांच्या गटांसमवेत रात्रंदिवस खेळत असतो, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?
निर्मितो जगता, नियामक सृष्टिची जपतो धुरा
शेवटी जग नाश मानव वास जो करितो बरा ।
संघनायकसंग खेळत आपल्या नित जो खरा
काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०९
मृत्युभीतमृकण्डुसूनुकृतस्तवं शिवसन्निधौ
यत्र कुत्र च यः पठेन्न हि तस्य मृत्युभयं भवेत् ।
पूर्णमायुररोगतामखिलार्थसंपदमादरात्
चन्द्रशेखर एव तस्य ददाति मुक्तिमयत्नतः ॥१०॥
मराठी- मरणाची भीती असलेल्या मृकण्डूच्या पुत्रा (मार्कण्डेया) ने केलेले हे स्तवन जो कोणी शंकराच्या जवळ किंवा जेथे कोठेही पठण करेल, त्याला मृत्यूचे भय राहणार नाही. सदाशिवच त्याला संपूर्ण निरामय आयुष्य, सर्व पुरुषार्थपूर्ण धनदौलत आणि (जनमानसात) आदर व सहज मुक्ती प्रदान करतो.
मृत्युचे भय ज्या मृकण्डुसुतास ही सुचली स्तुती
गातसे कुणि ही कुठे हि तयास वा शिव संगती ।
काळभीति तया नसे, परिपूर्ण सार्थक जीवनी
शंभु दे धन स्वास्थ्य आदरयुक्त, सद्गति देउनी ॥ १०
इति श्रीचन्द्रशेखराष्टकस्तोत्रं संपूर्णम् ॥
-- धनंजय बोरकर
९८३३०७७०९१
श्रीमद् आदिशंकराचार्यांनी भुजंगप्रयात वृत्तात रचलेले कालिकाष्टक आदिमायेचे रौद्र स्वरूप साकार करणारे स्तोत्र आहे. असुरांचा समूळ संहार करणारी, अत्यंत भीषण दिसणारी जगन्माता रुंडमाला, शवाकार कुंडले, हातांच्या आकाराची मेखला धारण करते, त्याचबरोबर ती सज्जनांसाठी मधुर हास्य धारण करून अभयदानही देते. हे स्तोत्र अंबिकेचे ध्यान व स्तुती असे विभागलेले आहे.
पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त आहे. आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा केवळ अंशभाग आहे हा या सूक्ताचा मुख्य विषय. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणार्या या सूक्तात सोळा ऋचा असून रचयिता नारायण ऋषी व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. मुख्यत्वे अनुष्टुप् छंदात रचलेल्या या सूक्ताची शेवटची ऋचा मात्र त्रिष्टुप् छंदात गुंफलेली आहे. पहिले पाच मंत्र त्या भव्य आदितत्त्वाचे (पुरुषाचे) वर्णन आहे. येथे पुरुष या शब्दाने अभिप्रेत आहे ते चराचराला व्यापणारे एक अमूर्त, अविनाशी, अनंत, अशरीरी तत्व. श्लोक ६ व ७ त्या विराट पुरुषाचाच यज्ञ करून यज्ञाचे हवन केल्याचे वर्णन येते. सर्वसाधारणतः यज्ञ एका विशिष्ट हेतूने किंवा देवतेच्या कृपाप्रसादासाठी केला जाई. परंतु येथे हा यज्ञ देवांनीच मांडला आहे. ८ ते १५ पर्यंतच्या ऋचांमध्ये त्या यज्ञातून काय निर्माण झाले याचा उहापोह आहे. या उत्पत्तीचा क्रमही लक्षणीय आहे. त्या काळी यज्ञात पशूंचा बळी देण्याची प्रथा होती आणि त्या प्राण्याचे वेगवेगळे भाग शिजवून त्या यज्ञातील वेगवेगळ्या ऋत्विजांना अधिकाराप्रमाणे आणि यजमानाला भक्षणार्थ दिले जात. या मानस यज्ञात तर प्रत्यक्ष त्या विराट पुरुषाचाच बळी दिला आहे. त्यामुळे त्यातून संपूर्ण विश्व आणि समाज निर्मिती झाल्याची कल्पना मांडली आहे.
काही अभ्यासकांच्या मते पुरुषसूक्तात प्रथमच चार वर्णांचा स्पष्ट उल्लेख येतो. परंतु अनेक अभ्यासकांच्या मते येथे चार लोकसमूहांचा निर्देश असला तरी त्यास ‘वर्ण’ असे म्हटलेले नाही. त्यामुळे चातुर्वर्ण व्यवस्था वैदिकोत्तर काळात रूढ झाली असावी. काही अभ्यासकांच्या मते ह्या दोन ऋचा (क्र ११ व १२) प्रक्षिप्त (मागाहून भर घातलेल्या) आहेत. ह्याच सूक्ताच्या आधारे (ऋचा क्र.१५) नरमेधाचा पुरावा दिला जातो. परंतु बहुतेक भाष्यकारांनी पशू या शब्दाचा अर्थ सर्वद्रष्टा परमेश्वर (पश्यति इति पशुः) असा लावला आहे. या सूक्तातील बहुतेक वर्णन मानसयज्ञाचे आहे. सृष्टीची उत्पत्ती होताना एखाद्या पुरुषाच्या अंगांपासून विश्वाचे वेगवेगळे भाग तयार झाले अशी कल्पना जगभरातील पुराकथांमध्ये आढळून येते.
ऋग्वेदाखेरीज इतर अनेक वैदिक साहित्यात हे सूक्त उद्धृत केलेले आहे. यजुर्वेदात त्यातील १५ वा मंत्र ७ वा करून त्यात अधिक सुसंबद्धता आणली आहे. पौराणिक काळापासून हे सूक्त नित्य पठणात असून षोडशोपचार पूजा करताना पुरुषसूक्तातील एकेक ऋचा म्हणून एकेक उपचार अर्पण करण्याची पद्धत रूढ आहे. याशिवाय हल्ली पूजा, आरत्यांनंतर म्हटल्या जाणार्या मंत्रपुष्पांजलीतही पुरुषसूक्तातील ‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः’ या मंत्राचा विनियोग केला जातो.
सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।
स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङुलम् ॥१॥
मराठी- ज्याला हजार मस्तके, डोळे, पाय आहेत, असा पुरुष (परमात्मा) या धरतीला वेढून दहा बोटे अधिकच उरला आहे.
पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् ।
उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति ॥२॥
मराठी- जे काल होते, आज आहे आणि उद्या असेल ते जग म्हणजे हा पुरुषच आहे. अमरत्वाचा अधिपती असलेला हा पुरुष अन्नरूपाने त्या सर्वापलिकडे जातो.
टीप- येथे काही अभ्यासकांनी दुसर्या चरणाचा अर्थ ‘प्राणिमात्रांच्या सुखदुःखाप्रीत्यर्थ परमेश्वर आपले मूळ स्वरूप सोडून जगामध्ये येतो. वस्तुतः ते त्याचे मूळ स्वरूप नव्हे’ असा केलेला आढळतो.
एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः ।
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥३॥
मराठी- ही अशी या पुरुषाची थोरवी त्यामुळे तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा एक पाय या विश्वात आहे तर तीन पाय अंतरिक्षात आहेत. (हे जग म्हणजे त्याचा एक चतुर्थांश आहे तर उर्वरित तीन चतुर्थांश दिव्य लोकात आहे.)
त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः ।
ततो विष्वङ् व्यक्रामत्साशनानशने अभि ॥४॥
मराठी- असा हा तीन अंश (विश्वाच्या पलिकडे) उंच अवकाशात असणारा पुरुष (सृष्टीची उत्पत्ती,स्थिती आणि लय स्वरूपात) पुनः पुनः अंशरूपात प्रकट झाला. त्यानंतर त्याने अन्न भक्षण करणार्या आणि न करणार्या अशा अनेक रूपांनी विश्व व्यापून टाकले.
टीप- काही अभ्यासकांनी ‘एक अंशभाग उत्पत्ती - लयाच्या चक्रामध्ये भ्रमण करीत राहतो’ असा अर्थ लावला आहे.
तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः ।
स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥५॥
मराठी- त्या (आदिपुरुषा) पासून भव्य (ब्रह्माण्डरूपी) पुरुष निर्माण झाला. पण त्याहीपेक्षा तेजस्वी परमात्म्याने त्याला व्यापून, त्यानंतर भूमी व शरीरधारी जीवांना उत्पन्न केले.
यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत ।
वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ॥६॥
मराठी- जेव्हा देवांनी (या) पुरुषाला यज्ञीय अग्नी मानून होम सुरू केला, तेव्हा त्या (यज्ञा) साठी वसंत ऋतू साजूक तूप, ग्रीष्म ऋतू समिधा आणि शरद ऋतू (इतर) हविद्रव्ये झाले.
तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः ।
तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ॥७॥
मराठी- जो सर्वांच्या अगोदर उत्पन्न झाला अशा त्या पुरुषाचे बर्ही (कुश गवत) गवताच्या आसनावर प्रोक्षण केले (जल शिंपडले) आणि त्याच्याच योगाने देव आणि साध्य प्रवर्गातील (दैवी) ऋषींनी हवन केले.
तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम् ।
पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये ॥८॥
मराठी- संपूर्ण आहुती दिल्यानंतर त्या यज्ञापासून कणीदार रवाळ तूप तयार झाले. आणि त्यापासून हवेवर उपजीविका करणारे (पक्षी), तसेच जंगली आणि पाळीव पशू निर्माण झाले.
टीप- काही अभ्यासकांनी ‘पृषदाज्य’ चा अर्थ दहीमिश्रित तूपभात, तसेच दही युक्त तूप असा केलेला आढळतो.
तस्मात् यज्ञात् सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे ।
छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥९॥
मराठी- त्या सर्व आहुती दिलेल्या यज्ञापासून ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद (हे तीन वेद) आणि (वैदिक गीतांचे गायत्री सारखे) छंद निर्माण झाले.
टीप- येथे अथर्ववेदाचा उल्लेख नाही हे लक्षणीय आहे.
तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः ।
गावोः ह जज्ञिरे तस्मात् तस्माज्जाता अजावयः ॥१०॥
मराठी- त्या यज्ञापासून घोडे,गाई,बोकड,एडके असे दोन्ही जबड्यात दात असणारे प्राणी उत्पन्न झाले.
यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् ।
मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते ॥११॥
मराठी- या (विराट) पुरुषाला कोणकोणते अवयव होते? (देवांनी) त्याची कशीकशी कल्पना केली ? त्याचे तोंड काय होते; दोन हात, मांड्या आणि पाय यांच्यासाठी काय योग्य होते ?
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२॥
मराठी- ब्रह्म जाणणारा त्याचे मुख, क्षत्रिय त्याचे हात, व्यापार उदीम करणारा त्याच्या मांड्या होते व पायांपासून शूद्र उत्पन्न झाला.
चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत ।
मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥१३॥
मराठी- चंद्राची उत्पत्ती त्याच्या मनापासून, रवीची डोळ्यांपासून, इन्द्र आणि अग्नी मुखापासून आणि प्राणापासून वारा (हवा) उत्पन्न झाला.
नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत ।
पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन् ॥१४॥
मराठी- त्याच्या बेंबीपासून अंतराळ, शिरापासून स्वर्ग, दोन पावलांपासून धरती, कानांपासून सर्व दिशा आणि विचिध लोक निर्माण झाले अशी देवांनी कल्पना केली.
सप्तास्यासन् परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः ।
देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम् ॥१५॥
मराठी- या होमकुंडाभोवती सात कठडे होते, यज्ञासाठी एकवीस समिधा केल्या होत्या. देवांनी त्या विराट पुरुषाला बळी देण्याचा पशू म्हणून खांबापाशी (बलिस्तंभाशी) बांधले.
टीप- विविध अभ्यासकांनी ‘परिधी’ व ‘समिधा’ यांचा वेगवेगळा अर्थ घेतलेला दिसतो.
परिधी :- १. सप्तछंद (गायत्री, अनुष्टुप्, त्रिष्टुभ, जगती, उश्निह, बृहति, पङ्क्ती हे सात छंद वैदिक वाङ्मयात मुख्यत्त्वे वापरलेले आहेत.) २. सात समुद्र
समिधा :- १.एकवीस छंद २. बारा मास, पाच ऋतू, तीन लोक आणि आदित्य. ३. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, शरीरातील पंचनाड्या, मन, बुद्धी, जाणीव, अहंकार, धर्म आणि अधर्म.
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥१६॥
मराठी- देवांनी यज्ञ करून यज्ञरुप विराट पुरुषाचे पूजन केले, जे यज्ञ आणि तत्सम धार्मिक उपासनेचे प्राथमिक स्वरूप (धर्मविधी) होते. पूर्वी ज्या स्वर्गात महान देवता आणि साध्य (ऋषी) निवास करीत ते स्थान (यज्ञ करून) त्यांनी निश्चितच प्राप्त केले.
हेच पुरुष सूक्त इतर ग्रंथातही (तैत्तिरीय आरण्यक) आढळून येते. तेथे त्यात अठरा मंत्र आहेत. अधिकचे दोन मंत्र असे :
वेदाहमेतं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसस्तु पारे ।
सर्वाणि रूपाणि विचित्य धीरः नामानि कृत्वाऽभिवदन्यदास्ते ॥१७॥
मराठी- मी त्या महान बुद्धिमान पुरुषाला जाणतो, जो सूर्यासारखा तेजस्वी आहे, जो अंधकारा पलिकडे आहे, ज्याने सर्व आकृती आणि आकार निर्माण केले, सर्वांना नावे दिली आणि जो सर्व गुणविशेषांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्व विश्व सांभाळतो.
धाता पुरस्ताद्यमुदाजहार शक्रः प्रविद्वान्प्रदिशश्चतस्त्रः।
तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते ॥ १८॥
मराठी- सर्वप्रथम ब्रह्मा प्रजापतीने या पुरुषाला ओळखले (जगासमोर आणले), त्यानंतर सर्व दिशांमध्ये पसरलेल्या या पुरुषाची इन्द्राला जाणीव झाली. हा पुरुष ज्याला समजला, त्याला या जन्मातच अमरत्व मिळते (मोक्ष मिळतो), त्यासाठी दुसरा कोणताच मार्ग आवश्यक नाही.
खालील मंत्र तैत्तिरीय आरण्यकाच्या प्रथम प्रपाठकातील प्रथम अनुवाकात आहे. तो पुरुषसूक्ताच्या सुरुवातीस म्हटला जातो.
मराठी- आम्ही आमच्या सध्याच्या आजारांच्या व भविष्यात होणार्या रोगांच्या निवारणाकरिता त्या (ओम् किंवा परमेश्वरा) ची विशेषत्त्वाने प्रार्थना करतो. (हा) यज्ञ (विघ्नरहित) गतिमान व्हावा (पार पडावा), तसेच त्याच्या यजमानाला चांगली गती मिळावी म्हणून विशेषत्त्वाने प्रार्थना करतो. आमचे स्वर्गीय कल्याण व्हावे. आमच्या मुला नातवंडांचे कल्याण होवो. आमच्या औषधी (वनस्पती) उंच वाढोत. आमच्या (नातलग, दासदासी इत्यादी) माणसांचे, तसेच (गाई, घोडे इ.) पशूंचे कल्याण होवो. सर्वत्र शांती नांदो.
खालील ऋचा तैत्तिरीय आरण्यकातील ३ र्या प्रपाठकातील १३ व्या अनुवाकात येतात.
अद्भ्यः संभूतः पृथिव्यै रसाच्च विश्वकर्मणः समवर्तताधि ।
तस्य त्वष्टा विदधद्रूपमेति तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे ॥
मराठी- हा विराट आकाराचा नारायण नामक पुरुष सर्वत्र पसरलेल्या जलामध्ये (मण्डवत्- दुधातील लोण्याच्या गोळ्यासारखा) उत्पन्न झाला. केवळ जलच नव्हे तर पृथ्वीशी संबंधित जे जे रस होते त्यापासून तो उत्पन्न झाला. या विश्वाला उत्पन्न करणार्या परमेश्वरापासून श्रेष्ठ ब्रह्मा उत्पन्न झाला. या विश्वाच्या निर्मात्याने (ब्रह्म्याने) चौदा लोक उत्पन्न केले व तो त्या लोकात व्याप्त झाला.
टीप- त्वष्टा या शब्दाचे अनेक अर्थ - जसे एक आदित्य (सूर्य), विश्वाचा निर्माता, बांधकामाशी संलग्न कारागीर - आहेत. वेगवेगळ्या अभ्यासकांनी विभिन्न अर्थ घेऊन त्या दृष्टीने दुसर्या चरणाचा अर्थ लावलेला दिसतो. त्यात ‘ त्या रसाला धारण करून सूर्य रोज प्रकट होतो ’ असाही अर्थ दिसतो. सायणाचार्यांनी ‘ब्रह्म्याने चौदा लोक निर्माण केले’ असा अर्थ घेतला आहे.
वेदाहमेतं पुरुषं महान्तं आदित्यवर्णं तमसः परस्तात्
तमेवं विद्वानमृत इह भवति नान्यः पंथा विद्यतेऽयनाय ॥
मराठी- मी त्या महान बुद्धिमान पुरुषाला जाणतो, जो सूर्यासारखा तेजस्वी आहे, जो अंधकारा पलिकडे आहे. त्याला ओळखूनच मृत्यूला जिंकता येते. प्रगतीसाठी दुसरा मार्ग नाही.
प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते
तस्य धीराः परिजानन्ति योनिं मरीचीनां पदमिच्छन्ति वेधसः ॥
मराठी- ज्याला (लौकिक अर्थाने) जन्म (आणि मरणही) नाही असा ब्रह्मा (प्रजापती) या ब्रह्माण्डरूपी गर्भाच्या अंतर्भागी विहार करतो. योगाने आपल्या चित्तवृत्ती ज्यांनी संयत केल्या आहेत असे धैर्यशील जन त्या प्रजापतीचे जगत्कारणरूप जाणतात. ज्ञानी जन मरीची (सारख्या सप्तर्षीं) चे (अढळ) पद मिळावे अशी कामना करतात.
यो देवेभ्य आतपति यो देवानां पुरोहितः
पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये ॥
मराठी- जो देवांसाठी प्रकाशतो, जो देवांचा सल्लागार आहे, जो देवांच्या आधी अस्तित्त्वात आला, अशा तेजस्वी परब्रह्म स्वरूपाला मी नमस्कार करतो.
रुचं ब्राह्मं जनयन्तः देवा अग्रे तदबृवन् ।
यस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन् वशे ॥
मराठी- अशा तर्हेने सृष्टि उत्पत्तीच्या अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या चैतन्यमय परब्रह्मासंबंधी देव बोलले. जो हे जाणणारा ब्रह्मवेत्ता असेल, देव त्याचे अंकित होतात.
ह्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यौ अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपं ।
अश्विनौ व्यात्तम् इष्टं मनिषाण अमुं मनिषाण सर्वं मनिषाण ॥
मराठी- हे ब्रह्मन्, लज्जा आणि लक्ष्मी या तुझ्या दोन भार्या आहेत. दिवस आणि रात्र या तुझ्या दोन कडा आहेत. (आकाशात पसरलेले) चांदणे तुझे शरीर आहे. दोन अश्विनीकुमार तुझे विस्तृत मुख आहेत. तू आम्हाला इच्छिलेले (आत्मज्ञान) दे, जगात दृश्यमान गाई-घोडे इत्यादी दे, सर्व ऐहिक संपत्ती दे.
ॐ शांतिः ॐ शांतिः ॐ शांतिः ॥
******************
धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी निशीथ कालव्यापिनी असेल तो दिवस महाशिवरात्रीचा मानला जातो. यात निशीथ काल म्हणजे काय याची अनेकांना कल्पना नसेल. रात्रीच्या एकूण वेळेचे १५ समान भाग केले म्हणजे त्यातील प्रत्येक भागाला मुहूर्त असे म्हणतात. त्यातील आठव्या मुहूर्ताला निशीथ असे म्हटले जाते.
भारतीय संस्कृतीने आपल्याला श्रेष्ठ संस्कारांचा बहुमोल खजाना दिला आहे. पारंपारिक प्रथा, उत्सव, जयंती, उपवास…. ह्या सर्वांद्वारे ईश्वर तसेच आपले पूर्वज, महात्म्याचा आदर करणे, त्यांची कर्मकथा आठवून त्यांच्याकडून काही शिकण्याची समज दिली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे श्राद्ध.
वनशंकरी (बनशंकरी) किंवा शाकंभरी (शाकंबरी) ही देवी महाराष्ट्रात व कर्नाटकात अनेकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. बनशंकरी हे दुर्गेचेच एक नाव असून ती वनवासिनी आहे. देवी भागवतातील कथेनुसार दुष्काळातही जनांना अन्न व भाजीपाला पुरवून पोषण केल्याने तिला शाकंबरी असे नाव पडले. दुर्गम नामक दैत्याचा तिने नाश केल्याने तिला दुर्गा असेही म्हटले जाते.
आज भारत देशामध्ये सर्वत्र ‘महाशिवरात्री’ हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जात आहे. शिव मंदिरामध्ये बेल पत्र, धोतऱ्याचे फूल, दूध.. घेऊन रांगेत उभे राहून दर्शनाची वाट बघणारे भक्त दिसत आहेत. व्रत, उपवास करून ईश्वराकडे मनोमन आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी याचना सर्व करतात. पण ज्याची मनोभावे पूजा केली जात आहे त्या ईश्वराची खरी ओळख तसेच मंदिरातली अनेक प्रतीकात्मक रुपकांची ओळख आज आपण करून घेऊ या.
वारकरी संप्रदायाची व भजनाची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ‘महायोगपीठे तटे भीमरथ्या’ ही भजनाच्या पंचपदीची ओळ कानावर पडली नाही असा मनुष्य सापडणे विरळाच. हे श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले अत्यंत भक्तिपूर्ण पांडुरंगाष्टकम् भुजंगप्रयात वृत्तात गुंफलेले असून गावयासही सोपे आहे.
आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत. अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो.
निसर्गाचे काही शाश्वत नियम आहेत ज्याचे पालन सर्वानाच करावे लागतात. जन्म-मृत्यु आणि त्यानंतर पुन्हा जन्म हे परिवर्तन चालूच राहते. ह्या परिवर्तानाचा अनुभव सर्वाना आज नाही तर उदया करायचाच आहे. मृत्यु हा शब्द ऐकल्यावर स्वस्थ असणारा व्यक्ति ही घाबरून जातो कारण पूर्ण आयुष्यामध्ये ह्याची तयारी कोणीही करत नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti