(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • परमेश्वराचे अस्तित्व

    …. तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल.

  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ३

    कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया,
    कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया |
    मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ,
    कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३||

    श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी.
    कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार मांडण्यासाठी आचार्यश्री कदंबवनचारिणीं, कदंबवनवासिनीं, कदंबवनशालया अशा शब्दात वारंवार आई आणि कदंब वृक्षाचा सहसंबंध अधोरेखित करीत आहेत. कुचभरोल्लसन्मालया-हृदय मंडलावर मोत्यांच्या विविध माला धारण केल्याने सुंदर दिसणारी.
    कुचोपमितशैलया- पर्वताकार विशाल स्तनमंडल असणारी. गुरुकृपालसद्वेलया- गुरुकृपारूपी तरंगांनी संपन्न.
    गुरुकृपेने परमात्मा प्राप्त होतो. परमात्म्याचे स्वरूप आहे आनंद. जसे जल संग्रहावरील तरंग जलाचेच असतात तसे आनंद सागरातील तरंगही आनंदाचेच असतात.
    तरंग हे स्थिर असणाऱ्या जलाचे चंचल स्वरूप आहे.
    तशा स्वरूपात जी मूलतः निश्चल निर्विकार असूनही चैतन्य स्वरूपात विश्व संचालन करणारी. या आनंद स्वरूपामुळे गुरुकृपा.
    मदारुणकपोलया- मधु प्राशनाने कपोल म्हणजे गालावरचा प्रदेश लालबुंद झालेली. मधुरगीतवाचालया - मधुर गीत गुणगुणत असणारी.
    कयापि घननीलया कवचिता वयं लीलया - घनश्याम असणाऱ्या कोणत्या देवीच्या लीलेमुळे आम्ही कवच असल्याप्रमाणे सुरक्षित आहोत?
    अर्थातच आई जगदंबा त्रिपुरसुंदरीचीच ही कृपा आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १४

    स्तुतिं - हे भगवान शंकरा आपली स्तुती अर्थात स्तवन कसे करावे?
    ध्यानं- आपल्या दिव्य स्वरूपाचे ध्यान कसे करावे?
    अर्चां - आपले अर्चन अर्थात पूजा इ. कसे करावे?
    यथावद्विधातुं - याचे नेमके शास्त्रीय विधान काय आहे?
    भजन् अप्यजानन्- हे न जाणता देखील आपले भजन करीत,
    महेशावलंबे - हे भगवान महेशा !मी आपला आश्रय घेत आहे.
    अर्थात काहीही समजत नसूनदेखील मी आपल्या चरणी शरण आलो आहे. कारण या चरणांनी अनेकांना वाचवल्याचे मी वाचले आहे. जसे,
    त्रसंतं सुतं त्रातुमग्रे
    मृकंडो:- अल्पायुत्वाने त्रस्त झालेल्या, मृकंड ऋषींचे सुत ,महर्षी मार्कंडेय यांचे संरक्षण करण्यासाठी अग्रेसर झालेल्या,
    यमप्राणनिर्वापणं त्वत्पदाब्जम् - यमराजां पासून प्राण वाचवणार्‍या आपल्या चरणकमलांना, मी शरण येत आहे.
    मृकंड ऋषींना संतती नसल्यामुळे त्यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली. तुझा पुत्र, अल्पायु पण ज्ञानी किंवा दीर्घायू पण मूर्ख होईल असे दोन पर्याय श्रीशंकरांनी त्यांच्यासमोर ठेवले. ऋषींनी पहिला पर्याय निवडला. त्या आशीर्वादाने झालेल्या मार्कंडेय ऋषींनी सप्तर्षी आणि श्रीब्रह्मदेवांच्या कृपाप्रसादाने महामृत्युंजय मंत्र प्राप्त केला. पुढे त्यांनी केलेल्या महामृत्युंजय मंत्राच्या अनुष्ठानाने त्यांच्या मृत्यू समयी , प्रसन्न झालेल्या भगवान श्रीशंकरांनी, नियतीच्या नियमाप्रमाणे मार्कंडेय ऋषींचे प्राण हरण करण्यासाठी आलेल्या यमराजांपासून आपल्या या अल्पायुषी भक्ताचे प्राण वाचवून त्यांना चिरंजीव पद दिले. अशी कथा पुराणांमध्ये पहावयास मिळते. या कथेचा संदर्भ घेत भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या शरणागतीची कारण मीमांसा करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री वेंकटेश स्तोत्रम् – मराठी स्वैर अनुवादासह

    आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे.

  • श्री त्रिपुरसुंदरी स्तोत्रम् – ४

    कदंबवनमध्यगां कनकमंडलोपस्थितां,
    षडंबरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम् |
    विडम्बितजपारुचिं विकचचंद्रचूडामणिं ,
    त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥४||

    महाविद्या श्री त्रिपुरसुंदरीचे अतुलनीय वैभव सांगतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात,
    कदंबवनमध्यगां- कदंब वृक्षाच्या अर्थात कल्पवृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी. कनकमंडलोपस्थितां- कनक अर्थात सोन्यापासून मंडल म्हणजे वर्तुळाकार आसनावर विराजमान असणारी. मंडल हे पूर्णत्वाचे, अखंडत्वाचे प्रतीक आहे. वर्तुळ ज्या बिंदूपासून आरंभ होते त्याच बिंदूवर समाप्त होते. स्वतःतच परिपूर्ण असणे हे वर्तुळाचे लक्षण. आई त्या पूर्णतेवर आरूढ आहे.
    षडंबरुहवासिनीं- सहा कमळावर आरुढ असणारी. योगशास्त्रामध्ये मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्र अशा सहा चक्रांचे वर्णन असते. तेथे विविध संख्यांच्या कमळांचे वर्णन केलेले असते. या सहा चक्रांवर निवास अर्थात विश्राम करीत कुंडलिनी स्वरुपा आदिशक्ती प्रवास करते. त्यामुळे तिला सहा कमळांवर निवास करणारी असे म्हटले आहे. सततसिद्धसौदामिनीम् - भक्तगणांना त्यांची इच्छित वरदाने पुरवण्यासाठी सौदामिनी अर्थात विजेप्रमाणे अत्यंत चपलगतीने त्यांच्यापर्यंत जाण्यास सदैव सिद्ध असणारी.
    विडम्बितजपारुचिं- आपल्या तेजाने जपा पुष्प म्हणजे जास्वंदीच्या फुलाच्या लाल रंगाला विडम्बित अर्थात चेष्टेने पराजित करणारी. विकचचंद्रचूडामणिं - कच म्हणजे केस. विकच म्हणजे व्यवस्थित रचना केलेले केस, अर्थात वेणी. त्यावर चूडामणि म्हणून जिने चंद्र धारण केला आहे अशी.
    त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये- भगवान शंकरांच्या सहधर्मचारिणी असणाऱ्या श्रीत्रिपुरसुंदरीचा मी आश्रय घेतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १५

    शिरो दृष्टि हृद्रोग शूल प्रमेहज्वरार्शो जरायक्ष्महिक्काविषार्तान् |
    त्वमाद्यो भिषग्भेषजं भस्म शंभो
    त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय ‖ १५ ‖

    जगद्गुरूंच्या अफाट संदर्भ विश्वाची चुणूक दाखवणारा हा श्लोक. आरंभीच्या दोन चरणात त्यांनी विविध रोगांची सूची सादर केली आहे.
    शिरो - डोक्याशी संबंधित रोग,
    दृष्टि- दृष्टीशी संबंधित रोग,
    हृद्रोग- हृदयाशी संबंधित रोग,
    शूल - आयुर्वेदात वर्णिलेले वातज, पित्तज, कफज, सन्निपातज, आमज, वातश्लैष्मिक, पित्तश्लैष्मिक तथा वातपैत्तिक हे आठ प्रकारचे शूल म्हणजे आतून काटा टोचल्याप्रमाणे वेदना देणारे रोग,
    प्रमेह- यौवनांगाशी संबंधित रोग, प्रदर रोग,
    ज्वर- आयुर्वेदात वर्णिलेले वातजन्य, पित्तजन्य किंवा रसगत, रक्तगत, मांसगत, मज्जागत इ. सर्व प्रकारचे ताप,
    अर्श- मूळव्याध, गुदद्वाराशी संबंधित रोग,
    जरा- म्हातारपण, त्यामुळे येणारे रोग,
    यक्ष्म- फुफ्फुसे तथा श्वास यंत्रणेत होणारे क्षयरोग,
    हिक्का- पोटात समान आणि कंठात उदान वायु च्या प्रकोपाने निर्माण होणारे उचकी, ठसका इत्यादी रोग,
    विषार्तान् - विषाच्या परिणामाने होणारे रोग,
    अशा प्रकारच्या अनेक रोगाने माणूस ग्रस्त होतो. अशा सर्व रोगांनी त्रस्त असणाऱ्या जीवांसाठी,
    त्वमाद्यो भिषग्- आपणच आद्य म्हणजे श्रेष्ठ भिषग् म्हणजे वैद्य आहात.
    भेषजं भस्म शंभो- हे शंभो ! या सर्व रोगांवर आपल्या दृष्टीने भस्म हेच औषध आहे.
    अर्थात आपल्या चरणकमलांवरील भस्मानेच हे सर्व रोग दूर होतात.
    त्वमुल्लाघयास्मान्वपुर्लाघवाय - हे भगवंता माझे शरीर हलके करण्यासाठी मला या रोगां मधून दूर कर.
    रोग झाले की शरीर जड होते. त्यामुळे शरीर हलके कर अर्थात मला निरोगी कर. तसेच शेवटी या जड शरीरापासून मोकळे करून मुक्ती प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १९

    भवद्गौरवं मल्लघुत्वं विदित्वा
    प्रभो रक्ष कारुण्यदृष्ट्यानुगं माम् |
    शिवात्मानुभावस्तुतावक्षमोऽहं
    स्वशक्त्या कृतं मेऽपराधं क्षमस्व ‖ १९ ‖

    भगवंताच्या चरणी शरण जाताना परिपूर्ण शरणागती प्राप्त होण्यासाठी स्वतःच्या अहंकाराचा विलय होणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याजवळ कोणतीही पात्रता नाही याचे वारंवार चिंतन उपयोगी ठरते. अर्थात हे चिंतन हवे. कथन नाही. नाहीतर नुसते म्हणण्यापुरते होईल.
    वास्तविक विचार केला तर खरेच आपल्या जवळ कोणतीच योग्यता नाही. आचार्यश्री समान अद्वितीय विभूती जर हे म्हणत असेल तर आपली अवस्था काय? याचा विचारच केलेला बरा.
    आचार्य श्री म्हणतात,
    हे भगवान शंकरा !
    भवद्गौरवं - आपल्या मोठेपणाला, आपल्या विश्वनाथ अवस्थेला, दीनानाथ भूमिकेला,
    मल्लघुत्वं - माझ्या अल्प स्वरूपाला, दीनत्वाला,
    विदित्वा- जाणून कारुण्यदृष्ट्या- कारुण्यपूर्ण दृष्टीने
    अनुगं माम् - आपला अनुयायी असलेल्या माझे,
    प्रभो रक्ष - हे प्रभू माझे रक्षण करा.
    मी आपला अनुयायी आहे. मी दीन आहे. आपण दीनानाथ आहात. आपल्याशिवाय माझे रक्षण करणार तरी कोण?
    शिवात्मानुभाव- हे भगवान शिवशंकरा ! आपण आत्मानुभावी आहात. अर्थात आपल्याला सर्व समजते.
    स्तुतावक्षमोऽहं- मी स्तुती करण्यास देखील असमर्थ आहे.
    स्वशक्त्या - आपण आपल्या शक्तीने
    कृतं मेऽपराधं क्षमस्व - मी केलेल्या अपराधांना क्षमा करा.
    मला स्तुती कशी करायची? इतकेही ज्ञान नाही. पण असे असले तरी मला समजो की न समजो , हे भगवंता माझ्यासाठी काय योग्य आहे? हे तुला तर समजते ना?
    ते देणे देखील तुझीच शक्ती आहे. मग मी मागण्याची वाट का पाहतोस?

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १८

    भवान्यै भवायापि मात्रे च पित्रे
    मृडान्यै मृडायाप्यघघ्न्यै मखघ्ने |
    शिवांग्यै शिवांगाय कुर्मः शिवायै
    शिवायांबिकायै नमस्त्र्यंबकाय ‖ १८ ‖

    शिवशक्ती हे अभिन्न ऐक्य. अर्धनारीनटेश्वर स्वरूपात त्यांचे एकरूपत्व वंदिले जाते. भवं भवानीसहितं नमामि ! अशा स्वरूपात आपण या युगुलाला वंदन करतो. प्रस्तुत श्लोकात आचार्यश्री देखील असे युग्मवंदन करीत आहेत.
    हे वंदन करीत असताना देखील आचार्यश्री दोघांच्याही बाबतीत समान स्वरूपाची विशेषणे वापरत आहेत. जणूकाही त्यातूनही ते या दोघांच्या एकरूपत्वाचेच निर्देशन करीत आहेत.
    भवान्यै भवायापि - आई भवानीला आणि भव असणाऱ्या आपणाला,
    मात्रे च पित्रे - मातेला आणि पितृ स्वरूप आपल्याला,
    मृडान्यै मृडायापि- मृडाणीला आणि मृड असणाऱ्या आपणास, भगवान शंकरांना मृडअसे म्हणतात. या संस्कृत धातूचा अर्थ संतुष्ट करणे असा आहे. संपूर्ण विश्वाला संतुष्ट करणारी भगवान शंकर मृड तर देवी पार्वती मृडाणी रूपात वंदिली जाते.
    अघघ्न्यै मखघ्ने - अघ म्हणजे पापाचा, कलंकाचा विनाश करणाऱ्या आईला आणि मख म्हणजे यज्ञाचा विनाश करणार्‍या आपल्याला, भगवान शंकरांनी दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विनाश केला होता. त्या पौराणिक कथेचा येथे संदर्भ आहे.
    ते दक्षयज्ञाचा विनाश करणारे आहेत असे वर्णन केल्यामुळे समानता दाखवण्यासाठी आई जगदंबेच्या पाप विनाशक रूपाला आचार्य वंदन करतात.
    शिवांग्यै शिवांगाय- जिचे अंग,शरीर म्हणजे मूर्ती अतीव शिव म्हणजे पवित्र आहे अशा शिवांगी आणि शिवांग अशा आपल्याला,
    शिवायै
    शिवाय- शिव म्हणजे मंगल,पवित्र असणाऱ्या,
    अंबिकायै त्र्यंबकाय - अंबिका जगज्जननी ला आणि त्र्यंबक अशा आपणाला हात,
    नमस्कुर्म:- आम्ही वंदन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २०

    यदा कर्णरंध्रं व्रजेत्कालवाहद्विषत्कंठघंटा घणात्कारनादः |
    वृषाधीशमारुह्य देवौपवाह्यंतदा
    वत्स मा भीरिति प्रीणय त्वम् ‖ २० ‖

    प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या परम उपास्य भगवान श्री शंकरांच्या चरणी अत्यंत मनोहर प्रार्थना करीत आहेत.
    एखाद्या भक्ताने केलेले हे अत्यंत लडिवाळ आर्जव आहे.
    ते म्हणतात,

    यदा कर्णरंध्रं व्रजेत्- ज्यावेळी माझ्या कानावर येईल,
    कालवाह - म्हणजे भगवान यमराजांच्या
    द्विषत्कंठघंटा- कंठात बांधलेल्या घंटेचा घणात्कारनादः - भीषण अशा प्रकारचा आवाज.
    तो ज्यावेळी माझ्या कानावर येईल, अर्थात माझा मृत्यू, काळ जवळ येईल, त्यावेळी हे भगवान महाकाल !
    वृषाधीशमारुह्य - वृषभाधीश अशा आपल्या नंदीवर बसून,
    देवौपवाह्यंतदा- हे भगवन् त्यावेळी आपण माझ्याजवळ यावे.
    वत्स - हे भक्ता !
    मा भीरिति - घाबरू नको, अशा आपल्या आश्वासक ध्वनीने
    प्रीणय त्वम् - आपण मला प्रसन्न करा.
    ही तुलनाच मोठी रम्य आहे.

    आचार्य श्री म्हणतात माझ्या अंतिम समयी माझ्यासमोर भगवान यमराज नाही जर आपण असावे.
    माझ्या कानात यमांच्या रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटेचा भीषण नाद नाही तर, हे वत्सा ! घाबरू नको. असा आपला आशीर्वाद घुमावा.
    आपण वृषभा वर बसून यावे या विनंतीत, मला मृत्यू नंतर कशावर बसूनच जायची वेळ असेल तर ती यमराजाच्या काळ्याशार रेड्यावर नाही तर आपल्या पांढऱ्या शुभ्र नंदीवर बसून, यमराजांच्यासोबत त्यांच्या नरकात नव्हे तर नंदीवर बसून आपल्या परम वैभवशाली कैलास लोकांस जाण्याचे भाग्य प्रदान करावे. अशी अत्यंत सुंदरतम प्रार्थना आचार्यश्री करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २१

    यदा दारुणाभाषणा भीषणा मे
    भविष्यंत्युपांते कृतांतस्य दूताः |
    तदा मन्मनस्त्वत्पदांभोरुहस्थं
    कथं निश्चलं स्यान्नमस्तेऽस्तु शंभो ‖ २१ ‖

    जीवनामध्ये सर्व गोष्टी सरळ, आनंददायी, विनासायास सुरू असतात त्यावेळी उपासना, साधना, भक्ती करणे तुलनेने अधिक सोपी गोष्ट असते. मात्र सामान्यतः ही अडचण पहावयास मिळते की ज्या क्षणी कोणतीही समस्या येते त्याक्षणी या गोष्टी मागे पडतात. घरात चार गोष्टी जास्त असतात, चार कामे जास्त असतात त्या दिवशी नेमकी सोडलेली गोष्ट म्हणजे देवपूजा असते.
    नेमकी हीच भूमिका घेऊन आचार्यश्री म्हणतात ज्यावेळी माझ्या जीवनातील सर्वात मोठे संकट माझ्यासमोर येईल त्यावेळी माझ्या उपासनेत खंड पडायला नको. तरच ती उपासना खरी .
    सगळ्यात मोठे संकट कोणते? तर मृत्यू. त्याचे चिंतन करताना आचार्य म्हणतात,

    यदा - ज्यावेळी
    दारुणाभाषणा - अत्यंत भयदायक भाषण म्हणजे आवाज करणारे,
    भीषणा - अत्यंत भयानक असणारे,
    कृतांतस्य दूताः - यमराजांचे दूत,
    मे- माझ्या,
    भविष्यंत्युपांते- भविष्यात जवळ येतील.
    तदा- यावेळी
    मन्मनस्- माझे मानस,
    त्वत्पदांभोरुहस्थं- जे तुझ्या चरण कमलावर लागलेले आहे.
    कथं निश्चलं स्यान्- निश्चल कसे राहील?
    नमस्तेऽस्तु शंभो - हे शंकरा! आपणास वंदन असो.

    असा मृत्यू जेव्हा समोर येतो त्यावेळी सामान्य अवस्थेत वरपांगी चालू असलेली साधना, उपासना नष्ट होते.
    त्यावेळी देखील मन स्थिर राहण्यासाठी ते भगवंताच्या चरणी कायमचे स्थिर व्हायला हवे. मगच ते अंतिम समयी स्थिर राहते. मग मोक्ष प्रदान करते. आचार्यश्री यासाठी प्रार्थना करीत आहेत.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड