वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
यदा दुर्निवारव्यथोऽहं शयानो
लुठन्निःश्वसन्निःसृताव्यक्तवाणिः |
तदा जह्नुकन्याजलालंकृतं ते
जटामंडलं मन्मनोमंदिरे स्यात् ‖ २२ ‖
मृत्युसमयी भगवंताचे स्मरण भवसागरातून नि:संशयरीत्या पार करणारी नौका आहे.
अन्य समयी माणसाने भगवंताचे नामस्मरण करणे तशी तुलनेने सोपी गोष्ट आहे. मात्र सामान्य कष्ट पडले तरी भगवंत अनुसंधानाचा विसर पडतो. पूजा, अर्च्या बाजूला पडते. नामस्मरण थांबून जाते. काहीवेळा तर चक्क त्यालाच नावे ठेवली जातात. इतके सगळे करून काय उपयोग? असा परम अविवेकी प्रश्न, बौद्धिकतेचा आव आणून मांडला जातो.
जिथे सामान्य व्यथेची ही अवस्था तेथे मृत्युसमयीच्या व्यथे बद्दल काय बोलावे? मात्र आचार्यश्री त्यावेळी कृपा करण्याबाबत प्रार्थना करीत आहेत.
यदा - ज्यावेळी
दुर्निवारव्यथ- दूर करण्यास असंभव असणाऱ्या, अंतिम पीडेने,
अहं- मी, ग्रसित झालो असल्याने,
शयानो- झोपलो असताना, खाटेला खिळलो असताना,
लुठन्- लोळत असताना, वेदनेने तडफडत असताना,
निश्वसन्- धाप लागली असताना,
नि:सृताव्यक्तवाणिः - अव्यक्त वाणी काढत असतांना, माणसाच्या अंतिम समयी त्याला अनेक गोष्टी बोलायच्या असतात. पण बोलण्याची शक्ती संपली असल्याने, तोंडातून केवळ घर् घर् असा आवाज निघतो त्यावेळी अर्थात अंतिम घरघर लागली आहे अशा अवस्थेत,
तदा- त्यावेळी जह्नुकन्या - राजा जह्नुची कन्या अर्थात देवी गंगा.
जलालंकृतं - तिच्या जलाने अलंकृत झालेले,
ते- आपले
जटामंडलं- जटेचा विस्तार,
मन्मनोमंदिरे स्यात् - माझ्या मंदिरात स्थिर असावा.
अर्थात त्या वेळी मी त्याचेच ध्यान करीत असावे. आपलेच ध्यान करीत असावे.
ती पीडा शरीराला असावी. मनात आपले चिंतन असावे. अशी अद्भुत प्रार्थना आचार्य करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा पुत्रमित्रादयो मत्सकाशे
रुदंत्यस्य हा कीदृशीयं दशेति |
तदा देवदेवेश गौरीश शंभो
नमस्ते शिवायेत्यजस्रं ब्रवाणि ‖ २३ ‖
भगवान श्रीशंकर महाकाल आहेत. कालकाल आहेत. त्यामुळे अंतिम समयी भगवान स्मशानवासी भोलेनाथाचे स्मरण भारतीय संस्कृतीचे एक कथन आहे.
भगवान शंकर हे जीवाचे तारक आहेत. जीवाच्या उद्धारासाठी तारक मंत्र तेच प्रदान करतात. त्यामुळे अंतिम समयी त्यांना शरण जाण्याची भूमिका आचार्य मांडत आहेत.
त्या अंतिम समयाचे वर्णन करताना ते म्हणतात,
यदा- ज्यावेळी
पुत्रमित्रादयो- पुत्र मित्र इत्यादी माझे नातेवाईक,
मत्सकाशे- माझ्याजवळ येऊन,
रुदंति- रडत असतील,
अस्य हा कीदृशीयं दशेति - अरे अरे काय ही याची दशा? असे म्हणत माझ्या मरणासन्न अवस्थेत चे वर्णन करीत असतील,
अर्थात माझ्या त्या जराजर्जर अवस्थेला पाहून, त्या बाह्य अवस्थेलाच माझी वास्तव अवस्था समजत ज्यावेळी ते शोक करीत असतील,
तदा - त्यावेळी
देवदेवेश- हे देवाधिदेव !
गौरीश शंभो- भगवान गौरीनाथा शंकरा,
नमस्ते शिवाय- नमः शिवाय , हा महामंत्र
इत्यजस्रं ब्रवाणि - मी अखंड जपत असावा.
आचार्यश्री म्हणत आहेत की अंतिम समयी देहाची परिस्थिती ही गलितगात्रच असणार आहे. पण तशी "परिस्थिती" असताना देखील माझी "मनस्थिती" वाईट असू नये.
जमलेले नातेवाईक बाहेर माझ्याबद्दल काहीही म्हणोत , मी आत मध्ये नमःशिवाय हेच म्हणत असावे. अंतरंगी आपल्या स्मरणाने शांती असावी. चिंतनात आपले नामस्मरण असावे.
बाहेरून पाहणाऱ्या नातेवाईकांना माझी अवस्था कशी ही दिसत असली तरी अंतरंगामध्ये मी चा नातेवाईकांशी नाही तर आपल्या चरणांशी गुंतलेला असो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा पश्यतां मामसौ वेत्ति नास्मान्
अयं श्वास एवेति वाचो भवेयुः |
तदा भूतिभूषं भुजंगावनद्धं
पुरारे भवंतं स्फुटं भावयेयम् ‖ २४ ‖
अंतिम तारक असणाऱ्या भगवान शंकरांच्या त्याच स्वरूपाला वेगवेगळ्या अंगाने आळवतांना आणि आपल्यासमोर स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी माणसाच्या अंतिम समयीच्या अवस्थेचे विविध पैलू आधारभूत मानले आहेत.
आचार्यश्री म्हणतात,
यदा पश्यतां माम्- ज्यावेळी मला पाहणारे, अर्थात त्या अंतिम समयी माझे जे नातेवाईक माझ्या आजूबाजूला जमलेले असतील, माझ्या कडे पहात असतील,
असौ वेत्ति नास्मान्- हा आपल्याला ओळखत नाही.
अयं श्वास एवम्- बस हाच शेवटचा श्वास,
इति वाचो भवेयुः - असे बोलत असतील.
अर्थात एखाद्या मरणासन्न व्यक्तीच्या अंतिम समयी जेव्हा त्याचे नातेवाईक त्याच्या जवळ उभे राहतात त्या वेळी तो त्यांच्यापैकी कोणालाही ओळखत नाही.ही जवळपास अंतिम अवस्था असते. यावेळी बाकीचे लोक फक्त त्याचे श्वास मोजत असतात. शेवटचे काही श्वास राहिले असे म्हणत असतात.
तदा - त्यावेळी
भूतिभूषं - भूती म्हणजे विभूती अर्थात भस्माने विभूषित असणारे,
भुजंगावनद्धं- सर्प वेष्टित अशी
पुरारे - हे त्रिपुरासुराच्या विनाशका !
भवंतं - आपले
स्फुटं - स्फुट या शब्दाचे संस्कृत भाषेत मुक्त, व्यापक, स्वच्छ, अस्तित्व, क्षमतायुक्त असे वेगवेगळे अर्थ आहेत. तसेच दृश्य, संवेद्य असाही अर्थ आहे. लक्षार्थाने स्फुट म्हणजे मूर्ती.
आपले सगुण-साकार स्वरूप. स्फुट चे वर दिलेले सर्व अर्थ भगवंताच्या मूर्तीला, सगुणरूपाला लागू पडतात.
भावयेयम् - मी त्या मूर्तीचे ध्यान करो.
घरदार, नातेवाईक इतकेच काय तर श्वास देखील मागे पडून मला आपल्या चरणी स्थान मिळावे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा यातनादेहसंदेहवाही
भवेदात्मदेहे न मोहो महान्मे |
तदा काशशीतांशुसंकाशमीश
स्मरारे वपुस्ते नमस्ते स्मराणि ‖ २५ ‖
मानवाच्या अंतिम अवस्थेचे विविधांगी वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज त्यातील एकेका पैलूला आपल्यासमोर ठेवत आहेत.
येथे देहासक्ती बद्दल बोलताना आचार्य श्री म्हणतात,
यदा - ज्यावेळी, अर्थात जेव्हा माझा अंत समय येऊन पोहोचलेला असेल त्यावेळी,
यातनादेह- आचार्यश्रींनी योजिलेला हा शब्द किती अद्वितीय आहे.
ते आपल्या शरीराला यातना देह म्हणत आहेत. अर्थात या देहात जीवाला असंख्य यातनाच भोगाव्या लागतात.
ऊन, वारा, पाऊस इत्यादी बाह्य आणि कामक्रोधादी आंतरिक यातनांनी हा देह सतत ग्रस्त आहे.
संदेहवाही - संदेह धारण करील. म्हणजे असा हा देह आता टिकेल की नाही? याचा संदेह स्वतः त्या जीवाला आणि जमलेल्या सगळ्यांना वाटेल त्यावेळी.
यातनादेह हा शब्द शास्त्रात आणखी एका अर्थाने वापरतात. यमलोकांमध्ये किंवा स्वर्गामध्ये गेल्यानंतर केलेल्या पाप-पुण्याच्या फळांना भोगण्यासाठी जे देह प्राप्त होतात. त्यांना भोगदेह म्हणतात.
पापाचा विचार आधी येत असल्याने नरकातील देहाचा विचार केला. त्याला यातना देहच म्हणतात.
तो देह मिळण्याची संभावना तयार होईल अर्थात मृत्यूची वेळ येईल तेव्हा,
भवेदात्मदेहे न मोहो महान्मे - मला माझ्या या देहाच्या बाबतीत अत्यंत बळकट आसणारा मोह होऊ नये. अर्थात मी यामध्ये अडकू नये.
तदा - त्यावेळी,
काश - काश नावाचे पुष्प,
शीतांशु - ज्याची अंशु म्हणजे किरणे शीत आहेत असा, चंद्र.
संकाशम्- समान पांढरेशुभ्र असणारे,
ईश - हे भगवान शंकरा !
स्मरारे - हे कामदेव विनाशका,
वपुस्ते नमस्ते स्मराणि- हे भगवंता मी त्या आपल्या चंद्रधवल शरीराचे स्मरण करो. आपल्याला वंदन असो
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदापारमच्छायमस्थानमद्भि-
र्जनैर्वा विहीनं गमिष्यामि मार्गम् |
तदा तं निरुंधंकृतांतस्य मार्गं
महादेव मह्यं मनोज्ञं प्रयच्छ ‖ २६ ‖
यमलोकात गेल्यावर प्राप्त होणाऱ्या यातना देहाचा विचार आल्यानंतर स्वाभाविकच आचार्यश्री त्या यमलोकाचा प्रवासाचा विचार आपल्या समोर मांडतात.
किती कष्टदायक आहे हा मार्ग? आचार्य श्री म्हणतात,
यदा - ज्यावेळी, त्या यमराजाचे दूत माझे प्राण हरण करून नेतील,
अपारम् - प्रचंड लांब असणाऱ्या, त्यामुळे चालून-चालून कष्ट देणाऱ्या,
अच्छायम् - मार्गात सावली देणारे वृक्ष इत्यादी नसल्याने छाया विरहित. उन्हाच्या त्रासाने अधिकच क्लेशदायी होणाऱ्या,
अस्थानम् - मध्यंतरी विश्राम करण्यासाठी कोणतेच आराम स्थान नसलेल्या,
अद्भिर्जनैर्वा विहीनं - पाणी किंवा माणसांनी विहीन असणाऱ्या, अर्थात शारीरिक तृप्तता मिळावी यासाठी आवश्यक असणारे जल किंवा मानसिक शांती मिळावी यासाठी आवश्यक असणारे जन यापैकी कोणतेही साधन नसणाऱ्या,
गमिष्यामि मार्गम् - मार्गाने मी जेव्हा जाईल.
तदा - त्यावेळी
तं निरुंधं
कृतांतस्य मार्गं - त्या कृतांत म्हणजे यमराजाच्या मार्गाला बाजूला सारून,
महादेव - हे भगवान महादेवा !
मह्यं मनोज्ञं प्रयच्छ - मला मनोहारी असा, आपल्या परम वैभवशाली आणि आनंददायी कैलास लोकाचा मार्ग प्रदान करावा.
शास्त्रात एका बाजूला वर वर्णन केल्याप्रमाणे कोणतेही सुख साधन नसलेले, उलट सर्व दुःखदायक गोष्टी असणारे यम नगरीचे वर्णन आहे. तर दुसरीकडे सकल सौख्यदायक कैलासाचे वर्णन. आचार्य यमलोकाचा मार्ग सोडून त्या मार्गावर नेण्याची प्रार्थना करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
इदानीमिदानीं मृतिर्मे भवित्री-
त्यहो संततं चिंतया पीडितोऽस्मि |
कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा
नमस्ते गतीनां गते नीलकंठ ‖ २९ ‖
या विश्वाचे स्वरूप अनिश्चित आहे. येथे कोणत्याच गोष्टीचे निश्चित पूर्वानुमान करता येत नाही.
मात्र या अनिश्चित जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे हे जग कधीतरी सोडावे लागणार आहे. मृत्यू एवढे एकच अटळ सत्य आहे.
त्यात आनंदाची गोष्ट एकच आहे की तो नेमका केव्हा येणार? हे आपल्याला निश्चित माहीत नाही. पण त्या आनंदाला एक वेगळी चिंतेची किनार आहे की तो कधी येणार हे माहिती नसल्याने, तो केव्हाही येऊ शकतो याची भीती जीवाला अखंड त्रास देते.
याच वास्तवाला आधार करीत आचार्य श्री म्हणतात,
इदानीमिदानीं - आत्ता अगदी आत्ताच,
मृतिर्मे भवित्रीति - माझा मृत्यू होऊ शकतो.
अहो संततं चिंतया पीडितोऽस्मि - या चिंतेने मी सतत पीडित आहे.
अर्थात कोणत्याही क्षणी माझा मृत्यू येऊ शकतो हा विचार सतत मनात येत असल्याने माझ्याजवळ असलेल्या, मी आज व अत्यंत परिश्रमाने मिळवलेल्या, सर्व सुख साधनांचे देखील पूर्ण सुख मला अनुभवता येत नाही.
कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा - माझा मृत्यू कसा होणार नाही? याची भीती मला सतत असते. अर्थात तो होऊ नये असे मला वाटते. मात्र त्याच वेळी तो टाळणे मला शक्य नाही हे समजत असल्याने भीती वाटते.
नमस्ते गतीनां गते नीलकंठ - हे भगवान नीलकंठा आपल्याला नमस्कार असो. अशा वेळी आपणच माझ्या गतीची गती अर्थात अंतिम अवस्था आहात.
येथे भगवंताला नीलकंठ हे विशेषण वापरणे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या काळजीच्या पलीकडेची गोष्ट भगवान करतात ते म्हणजे विषप्राशन.
मात्र विष पिऊन देखील मृत्यूची भीती त्यांच्या हृदयात जागृत होत नाही. कारण ते विष त्यांनी कंठातच अडवले आहे.
विषप्राशन करून देखील अमर असणाऱ्या भगवंताला त्या मृत्यूचा भीतीपासून वाचवण्याची ही प्रार्थना आहे. तोच वाचवू शकतो कारण तो स्वतः वाचला आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
नग्नो निःसड्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् ।
उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥९॥
भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना आचार्य श्री येथे त्यांच्या काही विशेषणांचा उल्लेख करीत आहेत. ते म्हणतात,
नग्नो- ज्यांचे मायारूपी वस्त्र गळून गेले आहे, ज्यांच्यावर कशाचेच आवरण पडूच शकत नाही, त्यांना शास्त्रात नग्न असे म्हणतात. निःसड्ग- ज्यांना कशाचाही संग अर्थात लेप लागत नाही.
शुद्ध- ज्यांच्या ठिकाणी मायेच्या मलीनतेचा अंश देखील नसतो त्यांना शुद्ध असे म्हणतात.
त्रिगुणविरहितो- मायेच्या सत्व, रज आणि तम या तीनही गुणांनी रहीत असलेले, निर्गुण निराकार. ध्वस्तमोहान्धकारो- ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा मोह शिल्लक उरलेला नाही असे.
नासाग्रे न्यस्तदृष्टि: - ज्यांनी आत्मध्यानासाठी नासिकाग्रावर दृष्टी स्थिर केली आहे असे,
विदितभवगुणो - अशा विविध गुणांनी युक्त असणाऱ्या,
नैव दृष्टः कदाचित् - आपल्या स्वरूपाचे मी कधीही दर्शन घेतले नाही.
उन्मन्यावस्थया - उन्मनी अवस्थेमध्ये,
त्वां विगतकलिमलं - कली अर्थात दोषांचा मळ नष्ट झालेल्या आपले,
शड्करं न स्मरामि- हे भगवान शंकरा ! मी कधीच स्मरण केले नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या सगळ्या अपराधां करिता मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
स्वामी `प्रतिवादी भयंकर’ अण्णा रचित मंगलाशासनम् म्हणजे व्यक्तिगत स्वार्थांपासून दूर होऊन अत्युच्च पातळीची भक्तिपूर्ण प्रार्थना जेथे केवळ भगवंताच्याच कल्याणाचा विचार केलेला असतो. मंगलाशासनम् म्हणजे भक्ताची वेंकटेशाबद्दलची सततची वचनबद्धताच होय.
अमर्यादमेवाहमाबालवृद्धं
हरंतं कृतांतं समीक्ष्यास्मि भीतः |
मृतौ तावकांघ्र्यब्जदिव्यप्रसादाद्भवानीपते निर्भयोऽहं भवानि ‖ ३० ‖
महाभारतामध्ये आलेल्या विश्व प्रसिद्ध अशा यक्ष धर्मराज संवादात यक्षाने एक प्रश्न विचारला आहे की या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य काय? त्यावर उत्तर देताना श्री धर्मराज युधिष्ठिर म्हणाले की जगामध्ये असंख्य लोकांना रोज मरतांना पाहून देखील पाहणारा स्वतःला अमर समजतो यापेक्षा मोठे आश्चर्य नाही.
श्री धर्मराजांचे उत्तर अत्यंत यथार्थ आहे. पण हा झाला अविवेकी माणसाचा विषय.
याउलट विवेकशील व्यक्ती नेमक्या याच गोष्टीने व्यथित होतो.
त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
अमर्यादम् - कोणत्याच प्रकारची मर्यादा अर्थात बंधन नसलेले,
एवाहम् - अशा त्या यमराजांना मी
आबालवृद्धं- बालकापासून वृद्धापर्यंत सगळ्यांना
हरंतं कृतांतं - धरून नेणाऱ्या यमराजांना, समीक्ष्यास्मि भीतः - पाहून मी घाबरून जातो.
मृतौ - या मृत्यूच्या विषयात, तावकांघ्र्यब्ज- आपल्या चरणकमलांच्या,
दिव्यप्रसादाद्- दिव्य प्रसादामुळे
भवानीपते - ही भवानी पती भगवान शंकरा !
निर्भयोऽहं भवानि - मी निर्भय होवो.
भगवान यमराज खऱ्या अर्थाने समदर्शी आहेत. बालकापासून वृद्धापर्यंत, गरीबा पासून श्रीमंता पर्यंत, मूर्खा पासून पंडिता पर्यंत, कुरुपा पासून विश्वसुंदरी पर्यंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता ते सगळ्यांना नेतात. हे पाहिल्यावर ते मला तरी कसे सोडतील? हा विचार माझ्या मनात येऊन मी त्रस्त होतो.
अशावेळी आपली चरणकमले हेच माझ्या दुःख निवृत्तीचे एकमेव स्थान आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुण्डले सूक्ष्ममार्गे
शान्ते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे ज्योतिरूपे पराख्ये ।
लिड्गज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शड्करं न स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१०॥
येथे भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज ध्यान मार्गाच्या अंतिम अवस्थेचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
स्थित्वा स्थाने सरोजे - ब्रह्मरंध्रामध्ये असणाऱ्या सहस्त्रदल कमला मध्ये स्थिर होऊन,
प्रणवमय - ओंकार ब्रह्मस्वरूप भगवान शंकरांचे ,
मरुत्कुण्डले - जेथे प्राणवायु प्राणशक्ती मध्ये विलीन होतो त्या कुंडामध्ये,
सूक्ष्ममार्गे- कुंडलिनीच्या सूक्ष्म मार्गाने प्रवास करून, तेथे निवास करणाऱ्या,
शान्ते - काहीही मिळवायचे नसल्याने परमशांत असलेले,
स्वान्ते- स्वतःच्याच स्वरूपात असणारे,
प्रलीने- आत्मरूपात लीन असणारे,
प्रकटितविभवे - बाहेर आपल्या संपूर्ण वैभवाला प्रकट करणारे,
ज्योतिरूपे - चैतन्यस्वरूप तेजस्वी,
पराख्ये- परमतत्व असणारे,
लिड्गज्ञे - शिवलिंगाच्या माध्यमातून ज्यांचे ज्ञान घडते असे,
ब्रह्मवाक्ये - उपनिषदातील महा वाक्यांमध्ये ज्यांचे तत्त्ववर्णन केले आहे असे,
सकलतनुगतं- सर्व ईश्वर महेश्वर यांच्याद्वारे सेवा केली जात असणारी,
शड्करं न स्मरामि - असे जे भगवान शंकर आहेत त्यांचे मी कधीही स्मरण देखील केले नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभू शंकरा ! माझ्या या अपराधाकरिता मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti