वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं
भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् |
नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या
सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖
या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात,
भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे,
अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना अकल्प असे म्हटले. अर्थात त्यांना विनाश नाही.
शंभो - हे भगवान शंकरा ! कल्याणकारका !
मयैवं - मी अशा प्रकारे
भुजंगप्रयातेन वृत्तेन - भुजंगप्रयात या वृत्तामध्ये, एखादा वळवळणारा नागराज पुढे जात असताना त्याची गती ज्या प्रकारची असते त्याप्रकारची लय या वृत्तात असल्याने याला भुजंगप्रयात असे म्हणतात.
क्लृप्तम् - आपले स्तवन रचलेली आहे.
नरः - जो कोणी मानव, स्तोत्रमेतत् - या स्तोत्र रचनेला,
पठित्वोरुभक्त्या - दृढ भक्तीने पठन करील,
सुपुत्र - सद्गुणसंपन्न संतती, सातत्यपूर्ण वंशपरंपरा,
आयु: - प्रदीर्घ आयुष्य,
आरोग्यम् - निरोगी जीवन, जो वेगळ्या आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. याच्याशिवाय अन्य निरर्थक आहे.
ऐश्वर्यम् - विविध प्रकारचे ऐश्वर्य.
एति - प्राप्त करेल.
या एति शब्दामध्ये या सर्व गोष्टींसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागणार नाहीत तर या सर्व गोष्टी भगवान श्री शंकरांचा कृपेने, आपोआपच त्यांच्याकडे चालत येतील असा सुंदर भाव आहे.
अर्थात या स्तोत्राच्या पठनाने त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतील.
त्याचे सर्वार्थाने कल्याण होईल.
जय भोलेनाथ !
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
बाल्ये दुःखातिरेको मललुलितवपुः स्तन्यपाने पिपासा
नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मां तुदन्ति ।
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः शड्करं ना स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥२॥
पूर्वजन्मीच्या कर्मांच्या फलवशात गर्भवास प्राप्त झाला. आरंभीच्या श्लोकात त्याचे वर्णन केल्यानंतर आचार्यश्री पुढे म्हणतात की जन्म प्राप्त झाल्यानंतर देखील ही दुःख परंपरा सुटली नाही.
शैशवावस्थेतील दुःखांचा विचार मांडताना आचार्यश्री म्हणतात,
बाल्ये दुःखातिरेको - बालपणात मला अनेक दुःखदायक गोष्टींचा सामना करावा लागला. मललुलितवपुः- माझे शरीर मलाने व्याप्त होते. स्वतःचे मलमूत्र देखील स्वच्छ करता येत नव्हते. मी त्यातच लोळत होतो. आजूबाजूला इतर घाण असली तरी त्यातच लोळावे लागत होते. सरकण्याची देखील क्षमता नव्हती.
स्तन्यपाने पिपासा - सातत्याने स्तनपानाची तृष्णा जागृत होत होती. अर्थात तहान भुकेच्या वेदना त्रस्त करीत होत्या.
नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो- शरीराच्या अवयवांची मध्ये कोणत्याच प्रकारची शक्ती नव्हती. सर्वच बाबतीत पराधीनतेचे दुःख होते. भवगुणजनिता
जन्तवो मां तुदन्ति -
या संसारात जन्माला येणारे विविध जीव-जंतू मला तोडत होते. डास मुंग्या चावत होत्या. त्यांना हाकलण्याचीदेखील ताकद नव्हती.
नानारोगादिदुःखाद्रुदनपरवशः - नानाविध रोगांनी आणि दुःखांनी परवश झालेला मी केवळ रडत होतो.
शड्करं ना स्मरामि- हे भगवान शंकराच्या वेळी मला आपले स्मरण देखील करता येत नव्हते.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या अपराधांना क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
प्रौढोहं यौवनस्थौ विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्
धौ दष्टो नष्टो विवेकः सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः ।
शैवीचिन्ताविहीनं मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥३॥
मानवी जीवनातील दुःख परंपरेचे वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात की काळाच्या ओघात मी मोठा झालो. बालपणीच्या दुःख कारणांना दूर करण्याचे बळ तर अंगी आले पण तरी दुःख कुठे संपले? तारुण्यात वेगळे दुःख सुरू झाले.
प्रौढोहं यौवनस्थौ - मी थोडा मोठा झाल्यावर यौवन अवस्थेला प्राप्त झालो.
विषयविषधरैः पञ्चभिर्मर्मसन्धौ
दष्टो - त्यावेळी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाचही विषयरूपी विषधर म्हणजे सापांनी माझ्या मर्म स्थानांना चावा घेतला.
त्या पाच विषयांचा आस्वाद घेणारी अनुक्रमे कान,त्वचा, डोळे, जीभ आणि नासिका ही पाचही इंद्रिये त्याविषयांच्याच ताब्यात गेली होती. जणु त्यांच्या विषाने बेशुद्ध झाली होती.
नष्टो विवेकः - त्याचा परिणाम म्हणून माझा विवेक नष्ट झाला. काय करावे? आणि काय करू नये? हेच समजत नव्हते. सुतधनयुवतिस्वादुसौख्ये निषण्णः - मुलगा, पैसा, पत्नी यांच्या गोड गोड वाटणाऱ्या सुखात मी आकंठ बुडून गेलो.
शैवीचिन्ताविहीनं - भगवान शंकरांचे चिंतन करण्याचे सोडून,
मम ह्दयमहो मानगर्वाधिरूढं- माझे हृदय मानसन्मान गर्व यांच्या टोकावर आरूढ झाले होते.
हे सर्व माझे दोष आहेत.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेवा ! शिवशंकरा! माझ्या या अपराधांना क्षमा करा.
मला आपले चिंतन करण्याची बुद्धी प्रदान करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतिश्चाधिदैवादितापैः
पापै रोगैर्वियोगैस्त्वनवसितवपुः प्रौढिहीनं च दीनम् ।
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धूर्जटेर्ध्यानशून्यं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥४॥
बरे पुढे वय वाढत गेल्यानंतर तरी हे त्रास कमी झाले का? तर नाहीच. उलट त्यात वार्धक्यामुळे आलेल्या नवनवीन त्रासांनी भरच घातली.
कोणते त्रास?तर आचार्य श्री म्हणतात,
वार्द्धक्ये चेन्द्रियाणां विगतगति - म्हातारपणामुळे इंद्रियांची गती क्षीण झाली. आता त्यांना हालचाल करणेही कठीण झाले आहे.
मतिश्च- मती अर्थात स्मरणशक्तीची देखील तीच अवस्था आहे. काही वेळापूर्वी केलेले कार्यही आठवत नाही.
आधिदैवादितापैः - आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक अशा त्रिविध प्रकारच्या तापांनी,
पापै - आज वर जीवनात केलेल्या विविध पापांनी,
रोगै:- त्यांचा परिणाम होऊन झालेल्या विविध रोगांनी,
वियोगै:- उपयुक्तता कमी झाल्यामुळे नातलगांनी देखील तोंड फिरवल्यामुळे आलेल्या वियोगानी,
त्वनवसितवपुः- अस्थिर झालेल्या शरीरानी,
प्रौढिहीनं च दीनम् - माझी सगळी प्रौढी गळून गेली आहे. आता मी हीन-दीन अवस्थेला पोहचलो आहे.
मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो- मात्र अद्यापी माझे मन त्या खोट्या मोहांमध्ये,अभिलाषा मध्येच भ्रमण करीत आहे. धूर्जटेर्ध्यानशून्यं - ते मन भगवान शंकरांच्या ध्यानाने अजूनही शून्यच आहे.
भगवंताचे ध्यान करीत नाहीच आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझे हे अपराध क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥
भगवान श्री भोलेनाथांची क्षमायाचना करतांना आज पर्यंत मी कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत? याची एक सूची आचार्य देत आहेत. त्यातून खरेतर, वेगळ्या शब्दात आपण सगळ्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेस्तव काय काय करायला पाहिजे? ही सांगण्याची आचार्यांची ही सुंदर पद्धती आहे.
आचार्यश्री म्हणतात,
स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं
पूजार्थं वा - हे भगवंता मी कधीही प्रातःकाळी स्नान करून आपल्या अभिषेक विधी साठी किंवा पूजेसाठी कधी गंगेचे जल आणले नाही
कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि - किंवा कधीही अत्यंत गहन जंगलात जाऊन बिल्वपत्रे खुडून आणली नाहीत.
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं- हे भगवंता मी सरोवरामध्ये विकसित झालेली सुगंधाने युक्त अशी कमल फुलांची माला तुझ्याकरता कधी आणली नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान शंकरा! माझे अपराध क्षमा कर.
येथे आचार्यश्री आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीदेखील किती पर्याप्त आहेत ते सांगत आहेत.
सदैव वाहणाऱ्या गंगेचे जल, सहज मिळणारी बिल्वपत्र, जलाशयात आपोआप येणारी कमलपुष्पे या गोष्टी निसर्गात परस्पर उपलब्ध आहेत. निदान त्या तर आपण सहज जाणू शकतो ना?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा रौरवादि स्मरन्नेव भीत्या
व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् |
तदा मामहो नाथ कस्तारयिष्यत्यनाथं पराधीनमर्धेंदुमौले ‖ २७ ‖
सर्वसामान्य संसारी जीवांची अंतिम समयी जी भयावह अवस्था निर्माण होते त्याचे आचार्यश्री आपल्यासाठी वर्णन करीत आहेत. त्यावेळी आपला उद्धार व्हावा यासाठी खरे तर आपल्या करिता प्रार्थना करीत आहे. आपल्याकरिता यासाठी म्हटले की ही आचार्यश्रींनी अवस्था नाही. ते आपल्या अवस्थेची कल्पना करीत म्हणत आहेत,
यदा - ज्यावेळी
रौरवादि - रौवर इत्यादी ८४ प्रकारच्या नरकांचे, शास्त्रात वर्णन केलेल्या तेथे प्राप्त होणाऱ्या भीषण अशा यातनांच्या
स्मरन्नेव - स्मरणानेच
भीत्या - घाबरून जाऊन,
व्रजाम्यत्र मोहं महादेव घोरम् - हे भगवान महादेवा मी येथे घोर अशा मोहामध्ये जाईल. अर्थात बेशुद्ध पडेल.
या वर्णनात अत्र म्हणजे येथेच हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तिथे गेल्यावर तर भयानक यातना आहेतच पण येथे त्यांचे केवळ स्मरण देखील शेवटी जीवाचा थरकाप करते. त्यामुळे शेवटी तो बेशुद्ध पडतो.
सामान्यतः मृत्यूच्या पूर्वी जीव बेशुद्ध पडतो. अनेकांना थरकाप सुटतो. घाम फुटतो. मलमूत्र त्याग देखील होतो. त्याचे कारण हेच असते. आयुष्यभर केलेल्या पापांचे स्मरण होऊन आता त्यामुळे मला कशा नरकयातना होणार? या कल्पनेनेच तो जीव कासावीस होतो. त्याचे वर्णन करून आचार्य म्हणतात,
तदा - त्यावेळी
मामहो नाथ - हे माझ्या स्वामी मला, कस्तारयिष्यति - कोण तारणार? आपल्या शिवाय माझे आहे तरी कोण?
मी कसा आहे तर,
अनाथं - मला आपल्याशिवाय कोणीही नाही.
पराधीनम् - मी पूर्णतः पराधीन, हतबल आहे.
अर्धेंदुमौले - हे मस्तकावर चंद्रकोर धारण करणाऱ्या भगवंता, याप्रसंगी माझे रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितं नैव लिड्गं
नो लिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः ।
धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥६॥
भगवान श्री शंकरांच्या पूजनाचा विषय निघाल्यानंतर या पूजेमध्ये अर्पण करण्याच्या पुढील पदार्थांची आचार्यश्री ना स्वाभाविक आठवण झाली. या उपचारांचा देखील मी कधी विनियोग केला नाही. अशी कबुली देत त्यासाठी क्षमा मागताना आचार्यश्री म्हणतात,
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः - दूध,मध, आज्य म्हणजे तूप यांनी युक्त असलेल्या दही आणि साखर सह, अर्थात पंचामृताने,
स्नापितं नैव लिड्गं - मी कधीही शिवलिंगाला स्नान घातले नाही.
नो लिप्तं चन्दनाद्यैः- त्या भगवान शंकरांच्या प्रतीक शिवलिंगावर कधी चंदन इत्यादींचा लेप लावला नाही. कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः - कधी सोने इत्यादींनी सजविलेल्या फुलांनी, अर्थात फुले किंवा आभूषणांनी,
धूपैः- ऊद इ. धूपांनी, कर्पूरदीपै - कापूर आरती इत्यादींनी कधी भगवंता तुझी पूजा केली नाही.
र्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः - विविध रसांनी युक्त असणारे भक्ष इत्यादी नैवेद्य समर्पित केले नाही.
नैवेद्यात मधुर, आम्ल,लवण,कटू, कशाय आणि तिक्त हे
सहा रस असावेत आणि भक्ष्य म्हणजे खाता येणारे, लेह्य म्हणजे चाटता येणारे, पेय म्हणजे पिता येणारे आणि चोष्य म्हणजे चोखता येणारे अशा चार प्रकारचे अन्न असावे असे वर्णन आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे श्री महादेव शंभो माझ्या या अपराधांना क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यदा श्वेतपत्रायतालंघ्यशक्तेः
कृतांताद्भयं भक्तिवात्सल्यभावात् |
तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे ‖ २८ ‖
याच साठी केला होता अट्टहास ! शेवटचा दिस गोड व्हावा !! ही संतांनी मनी जोपासली आपल्या मनात रुजवलेली भावना.
"अंत भला तो सब भला" ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक.
आचार्यश्री देखील त्याच भूमिकेतून अंतकाल मांगल्याची प्रार्थना करीत आहेत.
ते म्हणतात,
श्वेतपत्रायत - हे श्वेत, विशाल छत्रधारी भगवान शंकरा !
श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचे छत्र हे सम्राट् पदाचे लक्षण. केवळ सम्राटाने पांढरे छत्र वापरण्याचा राजकीय शिष्टाचार असतो.
देवांचे देव असणाऱ्या महादेवांना सम्राट् स्वरूपात आचार्य श्वेतपत्रायत म्हणत आहेत. त्यांना प्रार्थना आहे की,
यदा- ज्यावेळी, अंतिम समयी.
अलंघ्यशक्तेः- ज्यांच्या शक्तीला म्हणजे सत्तेला कोणीही ओलांडू शकत नाही अशा,
कृतांताद्भयं - कृतांत अर्थात यमराजाचे भय, मला सतावेल, भक्तिवात्सल्यभावात् - आपल्या भक्तवत्सल स्वभावाने, माझ्यावर असणाऱ्या आपल्या सहजसुलभ कृपेने,
तदा पाहि मां - त्यावेळी आपण माझे रक्षण करा.
पार्वतीवल्लभ- हे पार्वती वल्लभा, पार्वती हे स्थिरतेचे प्रतीक आहे. पर्वत अविचल असतो. त्या पर्वताची पुत्री ती पार्वती. तशीच शांत, स्थिर ती पार्वती. तशीच हवी श्रद्धा.
तशी दृढ, अटल श्रद्धा म्हणजे पार्वती. अशा पार्वतीचे वल्लभ अर्थात अशा श्रद्धेने प्रसन्न होणारे,
अन्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे - मला आपल्या समान माझा अन्य कोणीही रक्षण कर्ता दिसत नाही.
आपणच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझे अंतकाळीच्या यमपीडेपासून रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
ध्यात्वा चित्ते शिवाख्यं प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो
हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः ।
नो तप्तं गाड्गतीरे व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥८॥
आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे मी काय काय केले नाही यांची सूची देण्याच्या निमित्ताने खरेतर आचार्यश्री आपण काय काय करायला पाहिजे ते सांगत आहेत.
त्या सूचीत ते पुढे म्हणतात,
ध्यात्वा चित्ते शिवाख्यं - मनामध्ये भगवान शंकरांचे नामस्मरण करीत करीत,
प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो - मी कधी ब्राह्मणांना भरपूर धन दिले नाही. अर्थात कधीही सत्पात्री दान केले नाही.
हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः - मी कधीही बीज मंत्रांनी लाखोच्या संख्येत अग्नीमध्ये आहुत्या दिल्या नाहीत.
यात बीज मंत्र म्हणतांना सर्वात लहान संख्येचा मंत्र असा भाव आहेत. तोदेखील कधी केला नाही. अर्थात तो दहा वीस वेळा किंवा एखादी माळ करून उपयोग नाही हे सांगण्याकरता आचार्य श्री लाखोच्या संख्येचा विचार करतात. किंवा मी इतके भव्यदिव्य विधान केले नाही. असा देखील अर्थ.
नो तप्तं गाड्गतीरे - मी कधीही गंगा नदीच्या तीरावर तप केले नाही. व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः - व्रत,जप इत्यादींची संबंधित नियमांचे पालन करून ना कधी रुद्र जप केला, ना कधी वेदांचा अभ्यास.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंकरा ! यापैकी काहीही न करता आयुष्य वृत्ता घालवले या अपराधाकरिता मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
इदानीमिदानीं मृतिर्मे भवित्री-
त्यहो संततं चिंतया पीडितोऽस्मि |
कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा
नमस्ते गतीनां गते नीलकंठ ‖ २९ ‖
या विश्वाचे स्वरूप अनिश्चित आहे. येथे कोणत्याच गोष्टीचे निश्चित पूर्वानुमान करता येत नाही.
मात्र या अनिश्चित जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे हे जग कधीतरी सोडावे लागणार आहे. मृत्यू एवढे एकच अटळ सत्य आहे.
त्यात आनंदाची गोष्ट एकच आहे की तो नेमका केव्हा येणार? हे आपल्याला निश्चित माहीत नाही. पण त्या आनंदाला एक वेगळी चिंतेची किनार आहे की तो कधी येणार हे माहिती नसल्याने, तो केव्हाही येऊ शकतो याची भीती जीवाला अखंड त्रास देते.
याच वास्तवाला आधार करीत आचार्य श्री म्हणतात,
इदानीमिदानीं - आत्ता अगदी आत्ताच,
मृतिर्मे भवित्रीति - माझा मृत्यू होऊ शकतो.
अहो संततं चिंतया पीडितोऽस्मि - या चिंतेने मी सतत पीडित आहे.
अर्थात कोणत्याही क्षणी माझा मृत्यू येऊ शकतो हा विचार सतत मनात येत असल्याने माझ्याजवळ असलेल्या, मी आज व अत्यंत परिश्रमाने मिळवलेल्या, सर्व सुख साधनांचे देखील पूर्ण सुख मला अनुभवता येत नाही.
कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा - माझा मृत्यू कसा होणार नाही? याची भीती मला सतत असते. अर्थात तो होऊ नये असे मला वाटते. मात्र त्याच वेळी तो टाळणे मला शक्य नाही हे समजत असल्याने भीती वाटते.
नमस्ते गतीनां गते नीलकंठ - हे भगवान नीलकंठा आपल्याला नमस्कार असो. अशा वेळी आपणच माझ्या गतीची गती अर्थात अंतिम अवस्था आहात.
येथे भगवंताला नीलकंठ हे विशेषण वापरणे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या काळजीच्या पलीकडेची गोष्ट भगवान करतात ते म्हणजे विषप्राशन.
मात्र विष पिऊन देखील मृत्यूची भीती त्यांच्या हृदयात जागृत होत नाही. कारण ते विष त्यांनी कंठातच अडवले आहे.
विषप्राशन करून देखील अमर असणाऱ्या भगवंताला त्या मृत्यूचा भीतीपासून वाचवण्याची ही प्रार्थना आहे. तोच वाचवू शकतो कारण तो स्वतः वाचला आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
Copyright © 2025 | Marathisrushti