(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आध्यात्माची आवश्यकता

    आध्यात्म म्हणजे आत्म्याची स्थिरता होय. जोपर्यत आत्मा स्थिर होत नाही, तोपर्यत कितीही पैसा, ऐषोराम, नोकर -चाकर सुख देवू शकत नाहीत. हे सुख फक्त आध्यात्मामुळेच मिळते. म्हणुनच ईश्वराचे नामस्मरण करणारा शेतकरी  दिवसभर काबाड कष्ट करूनही रात्री सुखाची झोप घेतो, तर पैसेवाला दिवसभर आरामात राहूनही रात्रीच्या रात्री जागून काढतो. 

  • श्रीकृष्ण जन्मकथा

    श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो
    ऐका विनवितो
    श्री विष्णु अवतार घेतो
    ह्या सृष्टीवर ||१||

    दुष्टांचा होई अनाचार
    पृथ्वीते होई पापभार
    त्यांचा करण्या संहार
    परमेश्र्वर अवतरती ||२||

    कंस राजा दुष्ट
    स्वतःस समजे श्रेष्ठ
    प्रजेला देई कष्ट
    स्वार्थापोटी ||३||

    छळ करु लागला जनांचा
    लुटमार अत्याचार छंद त्याचा
    खूनही करी साधूसंतांचा
    दुष्टपणे ||४||

    कंसाची देवकी बहीण
    चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन
    सात्विक होते तिचे मन
    परमेश्र्वराठायीं ||५||

    देवकीचे लग्न ठरले
    वसुदेवाला तिनें वरले
    सर्व कार्य पार पडले
    कंस राजा घरी ||६||

    देवकी वसुदेवासंगे बैसली
    भोयांनी डोली उचलली
    वरात घरी जाण्या निघाली
    कंस भावा घरुन ||७||

    कंस राजा चाले संगे
    वरातीच्या मागोमगे
    निरोप देण्या तिजलागें
    वसुदेव देवकीसी ||८||

    वरात येता गांव वेशीला
    एक चमत्कार घडला
    आकाशवाणी झाली त्या वेळेला
    चकीत होती सर्वजण ||९||

    कंस राजा तूं मातला
    नष्ट कराया तुजला
    विष्णू अवतरती पृथ्विला
    देवकीचे पोटी ||१०||

    देवकी वसुदेवाचे आठवे बाळ
    कंसाचा तो कर्दनकाळ
    योग्य येता वेळ
    ठार करील कंसाला ||११||

    देवकी पुत्र शत्रु माझा
    दचकून गेला कंस राजा
    विस्मयचकीत झाली प्रजा
    आकाशवाणी ऐकूनी ||१२||

    कंसाने विचार केला
    देवकीपुत्र जन्मता मारण्याला
    बंदीस्त केले त्याना
    ठार करण्या बाळ तयांचे ||१३||

    एका मागुनी एक मारीले
    सात पुत्राना ठार केले
    पापाचे तेंव्हा घडे भरले
    कंसाचे ||१४||

    आठव्या वेळी देवकीस
    गर्भ राहता नऊ मास
    आगळाच होत असे भास
    चमत्कार घडला ||१५||

    पृथ्वी पावली समाधान
    सृष्टी गेली बहरुन
    प्रफूल्ल झाले वातावरण
    स्वागत करण्या प्रभूचे ||१६||

    पूर्वीचे सर्व बदलले
    दुःखी मन पालटले
    रोम रोम ते आनंदले
    चिंता न उरली देवकीस ||१७||

    प्रभू आगमनाची तयारी
    सर्व देव मिळूनी करती
    देवकीस सांभाळी
    आपली शक्ती देवूनीया ||१८||

    सुर्य उधळी प्रकाश
    वरुण जल शिंपी सावकाश
    वायु लहरी फिरती आकाशी
    देवकीसाठी ||१९||

    बागेत पसरला सुगंध
    वातावरण होई धुंद
    देवकीचा आनंद
    द्विगुणीत झाला ||२०||

    देवकीचे सारे चित्त
    प्रभुचरणी जात
    झाली ती निश्चिंत
    भार ईश्वरी सोडूनी ||२१||

    श्रावणमासे कृष्णपक्षे आष्टमीला
    मध्यरात्रीचे सुमाराला
    देवकीचे बाळ आले जन्माला
    ईश्वर अवतार घेई ||२२||

    सर्व वातावरण शांत
    बाळ करी आकांत
    परी सर्व होते निद्रिस्त
    कारागृहाचे द्वारपाल ||२३||

    थकून देवकी झोपली
    बाळ तिचे पदराखालीं
    वसुदेवासी चिंता लागली
    बाळाची ||२४||

    झाला एक चमत्कार
    साखळदंड तुटूनी उघडले दार
    विजेमुळे मार्ग दिसे सत्वर
    वसुदेवाला ||२५||

    त्वरीत उठूनी बाळ उचलले
    तयासी टोपलीत ठेवले
    डोईवर ठेवूनी चालले
    वासुदेव ||२६||

    वसुदेव चालला
    नागराज पाठी आला
    फणा काढूनी वाचवी बाळाला
    पावसापासून ||२७||

    वसुदेव यमुनाकाठी
    दुथडी वहात होती
    निश्चयी पाण्यांत शिरती
    बाळ घेऊन ||२८||

    पाण्यांत टाकता पाय
    यमुना ही दर्शना धाव
    ईश्वरचरणीं स्पर्श होय
    पावण होणेसी ||२९||

    पाण्याची पातळी वाढली
    चरणस्पर्श होता दुभंगली
    वाट करुनी दिली
    वसुदेवाला ||३०||

    पैलतिरी गांव गोकूळ
    नंद गवळ्यातील श्रेष्ठ सकळ
    पत्नी यशोदे झाले बाळ
    त्याच रात्रीं ||३१||

    कन्या होती आदिमाया
    ईश्वर सुरक्षे जन्म घ्याया
    ईच्छित त्याचे कार्य कराया
    आली उदरी यशोदेच्या ||३२||

    घर नंदाचे उघडे
    यशेदा निद्रिस्त पडे
    लक्ष्य नव्हते कन्येकडे
    घरातील लोकांचे ||३३||

    बाळ ठेवले यशोदेपासी
    उचलून घेतले कन्येसी
    पांघरुन घालूनी बाळासी
    वसुदेव परतला ||३४||

    मुलीस घेऊन आला
    ठेवी देवकीच्या कुशीला
    कोण जाणील ह्या लिला
    प्रभूविणा ||३५||

    बंद झाले द्वार पूर्ववत
    मुलीने केला रडूनी आकांत
    द्वारपाल जागविले त्वरित
    ते खबर देई कंसाला ||३६||

    कंस आला धाऊन
    सर्व लष्कर घेऊन
    बाळ मारावे म्हणून
    आपल्या शत्रुते ||३७||

    कन्या बघूनी चकीत झाला
    कां फसवितोस मजला
    शिव्या देत असे प्रभुला
    मुलीचे रुप बघूनी ||३८||

    मुलीस घेतले बळजवरीं
    आपटण्या दगडावरी
    हात नेता आपले शिरीं
    कन्या हातून निसटली ||३९||

    चमत्कार घडला त्या समयीं
    कन्या आकाशी जाई
    अचानक अकाशवाणी होई
    त्यावेळी ||४०||

    आठवे बाळ नंदा घरी
    ईश्वर रुप अवतारी
    येतां वेळ ठार करी
    कंसा तुला ||४१||

    आकाशवाणी ऐकोनी
    घडला चमत्कार बघून
    कंसा ते कापरे भरुनी
    राजगृही परतला ||४२||

    कंस प्रयत्न जाय निष्फळ
    विधी लिखीत असे अटळ
    कोण रोकती काळ
    प्रभूविणा ||४३||

    इकडे यशोदे देखिले
    बाळ गोजिरे वाटले
    आनंदमय गांव झाले
    बाळाचे आगमनें ||४४||

    नांव श्रीकृष्ण ठेविले
    नंदाघरी वाढले
    गोपाळांत खेळले
    आनंदरुप ||४५||

    यशोदाघरी देवकीचे बाळ
    ठार केले कंसा येता वेळ
    मारले नंतर दुष्ट सकळ
    श्रीकृष्णाने ||४६||

    श्रीकृष्णाचा अवतार
    दुर्बलांना तो आधार
    करसी दुःखाचा निवार
    प्राणीमात्रासाठी ||४७||

    जन्माष्ठमीचा उत्सव
    ओतून त्यांत दुर्बलांना तो आधार
    करसी दुःखाचा निवार
    प्राणीमात्रासाठी ||४७||

    जन्माष्ठमीचा उत्सव
    ओतून त्यांत भक्तीभाव
    साजरा करिती सर्व
    प्रेमभरे ||४८||

    श्रीकृष्ण सांगे गीता
    युद्धभूमीवर असता
    कौरव पांडव युद्धा सज्ज होतां
    अर्जूनासी ||४९||

    भगवत् गीता महान
    ग्रंथ म्हणून मान
    जीवनाचे तत्वज्ञान
    तयामध्यें ||५०||

    श्रीकृष्णभक्तांनी
    वाचावी ही कहाणी
    भक्तिरुपें होऊनी
    रोज एकदां ||५१||

    ।। शुभं भवतु ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ७- १००८८३

  • मारुती स्तोत्रचा मराठीत अर्थ

    मारुतिस्तोत्र समर्थ रामदासांनी रचले आहे. त्यांनी शरीर कमावणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिले होते. बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून मारुतीची उपासना त्यांनी केली आणि करावी अशी शिकवण दिली. या उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र. यात प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बलाचे वेगवेगळे पैलू वर्णिलेले आहेत.

  • भगवत् नामातून – मुक्तीकडे

    ईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला.  या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील.

  • श्री. तुलसी वृदांवन जन्मकथा

    तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।।
    त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।।

    पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।।
    पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।।

    तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।।
    गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।।

    तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे 'वर' मिळोन ।।
    कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन हो ।। ४।।

    राजा नामें जालंदर । होता तो आसुर ।।
    स्वभाव त्याचा क्रूर । गरीब जनांसाठी ।। ५ ।।

    तयाची पत्नी सती । त्यास पतिव्रता लाभती ।।
    महान तिची पतिभक्ति । वृंदा नाम तिचे ।। ६ ।।

    पतिसी मानती देव । अर्पूनी त्याचे चरणीं भाव ।।
    पुजिती त्यासी सदैव । मनोभावे ।। ७।।

    राजाने देवांना जिंकूनी । बंदी त्यांना करूनी ।।
    त्रास सर्वांना देवूनी । हा हा:कार माजविला ।। ८।।

    प्रत्यक्ष शिव आला लढण्यास । मारण्या जालंदरास ।।
    सोडविण्या देवांचा त्रास । त्याचे कडून ।।९।।

    अपूरी पडली शिवशक्ती । मरण त्यास न येती ।।
    कोण त्यास वाचविती । प्रश्न पडला शिवे ।।१०।।

    ब्रह्म आले सत्वर । पूजा करुन विश्वेश्वर ।।
    सुचविती उपाय त्यावर । दैत्यास मारण्याचा ।। ११।।

    वृंदा आहे सती महान । पतिवृता शक्ती कठीण ।।
    त्या शक्तीमुळे रक्षण । दैत्याचे होई ।।१२।।

    तिचा पती धर्म । नष्ट करावा हे मर्म ।।
    विष्णूसी सांगावे हे कर्म । करणे करिता ।।१३।।

    पतिवृता हरण करणेसाठीं । कारस्थान केले जगतजेठीं ।।
    दैत्यनाशा पोटीं । घात केला वृंदेचा ।।१४।।

    दैत्य रुप घेवूनी । पती आहे हे भासवूनी ।।
    पातिवृत्या नष्ट करोनी । वृंदासी फसविले ।। १५।।

    प्रकार आला ध्यानीं । पतिधर्म गेला डागळूनी ।।
    खिन्न झाली मनी । सती वृंदा ।। १६।।

    शाप दिला संतापूनी । मानव जन्म घेवूनी ।।
    पत्नी विरहाचे दु:ख मनीं । सहन करावे लागेल ।। १७।।

    विष्णू 'राम' अवतरला । आजन्म विरह सोसला ।।
    दु:खी, कष्टी आला । सीते साठीं ।। १८ ।।

    वृंदेचे जेव्हां पावित्र जाई । रक्षणकवच दूर होई ।।
    शिव दैत्यास मारण्या येई । त्याच वेळीं ।। १९।।

    दु:खाचा डोंगर कोसळला । पति व पतिधर्म गेला ।।
    जगण्यास अर्थ न उरला । वृंदेसाठी ।। २०।।

    पति वियोग होतां । सती गेली पतिव्रता ।।
    परमेश्वर तिज दर्शन देतां । आशिर्वाद दिला ।।२१।।

    परमेश्वरांनी वर दिला । तुलसीचे रूप मिळेल तिला ।।
    विष्णुचे सानिध्य लाभण्याला । तिचे भोवतीं ।।२२।।

    घरातील अंगण । त्यांत तुलसी वृंदावन ।।
    आनंद सुख समाधान । त्या घरी वसे ।।२३।।

    पूजा आभिषेकांतील तीर्थ । अर्पूनी जल वृंदावनांत ।।
    भाव भक्तीचे मनोरथ । तुलसी ठायी ठेवावे ।। २४।।

    सौभाग्यवती ही सति । पतिव्रतेची एक शक्ति ।।
    तुळशीच्या आशीर्वादे मिळती । गृहलक्ष्मींना ।।२५।।

    तुळसी अंगणीं वसे । संरक्षण वलय असे ।।
    दु:ख ना तेथे दिसे । त्या घरामाजीं ।।२६।।

    ( तुलसी विवाह कार्तिक शुक्ल द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत )
    शुभ भवतू

    डॉ. भगवान नागापूरकर
    ८- २५११८३

  • माघ महिन्यातील गणेश जयंती उत्सव 

    गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

  • श्रावणी

    श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते.

  • ।। श्री शंख जन्म कथा ।।

    देव्हाऱ्यातील देव अनेक शंख तयांमध्ये एक
    महत्त्व त्याचे जाणोनी ठीक सकलजन हो ।। १।।

    हिंदूची दैवते अनेक रूपे देवांची कित्येक
    इष्ट देवता पूजितो प्रत्येक सर्व देवांमध्ये ।।२।।

    देव्हाऱ्यातील देवांत शंखघंटा असावी त्यांत
    प्रथा पूजेची असण्यात हिंदूच्या ।।३।।

    शंखास पूजेतील मान प्राप्त होई ‘वर’ मिळोन
    कथा त्याची जाणून घ्यावी तुम्ही ।। ४।।

    सांदिपनी ऋषीच्या आश्रम शिष्यगण करिती श्रम
    प्रफुल्लता आनंद नी प्रेम आश्रममध्ये ।। ५।।

    कृष्ण गोपा संगती विद्या अभ्यास घेती
    संदिपनीचे आश्रमी राहती सर्व शिष्य गण ।। ६।।

    ईश्वर होई शिष्य जेथे काय उणे मग तेथे
    सीमा नसे आनंदाते ऋषीच्या आश्रमी ।। ७।।

    निसर्ग नयन मनोहर पुष्पलता यांचे माहेर
    तृप्त होती घेता फलाहार आश्रमवासी ।। ८।।

    श्रीकृष्णाचा सहवास लाभता त्या आश्रमास
    वाव नसे दु:खास त्या वातावरणी ।। ९ ।।

    परि तेथील एक व्यक्ती दु:खी कष्टी होती
    रात्रंदिनी झोप न येती गुरु पत्नीला ।। १० ।।

    सांदिपनी गुरुपत्नी आश्रू होते तिचे नयनी
    स्वपुत्र गमावूनी सागरामध्ये ।। ११।।

    कृष्ण विनविता गुरूसी स्वीकारण्या गुरू दक्षिणेसी
    सोडण्यापूर्वी आश्रमासी ज्ञान संपादूनी ।।१२।।

    शिष्य म्हणूनी राहीला सार्थक दिले जीवनाला
    हेच फळ गुरू दक्षिणेला मिळत असे तूजमुळे ।। १३ ।।

    सांदिपनीचे सारे समाधान कृष्ण जैसा शिष्य गण
    गुरू दक्षिणा मागील कोण प्रभू कडूनी ।। १४ ।।

    गुरूपत्नी संसारिक आंतरमनी इच्छा एक
    गुरू दक्षिणेचा मागती हक्क कृष्णाकडून ।।१५ ।।

    बाळ बुडाला सागरी असह्य माझे जीवन करी
    कशी जगू त्याचे परी बाळाविना ।। १६।।

    असता इच्छाशक्ती घेवूनी यावे बाळाती
    परत द्यावे माझे हाती हीच आसे गुरूदक्षिणा ।।१७ ।।

    गुरूपत्नीस वंदिले कृष्ण सागरतिरी आले
    सागरासी आव्हान केले गुरुपुत्रासासाठी ।। १८।।

    प्रगट झाली सागर देवता कृष्णासी वंदन करिता
    सांगू लागली लीन होता प्रभू समोरी ।। १९।।

    शंखासूर नामे राक्षस सागरतळी करी वास
    सागरी जिवांना देता त्रास राजा बनूनी तयांचा ।। २० ।।

    गुरुपुत्र पडता सागरी शंखासूर गिळंकृत करी
    बाळ तयाचे उदरी जात आसे ।। २१।।

    सागरी राजा शंखासूर असूनी तो आसूर
    भक्ती तयाची हरीवर विष्णूसी पूजित आसे ।। २२।।

    रावणाचे जैसे शिव दैवत तैसा शंखासूर विष्णू भक्त
    भाव प्रभू चरणी अर्पित मनोभावे ।।२३।।

    शंखासूरास दर्शन दिले श्रीकृष्ण प्रकट झाले
    प्रभू आसूनो विनविले शंखासुरासी ।।२४।।

    गुरूबाळ तुझे उदरी तो मजलागी परत करी
    इच्छा केली श्री हरी शंखासूरासी ।। २५ ।।

    झाला शंखासूर धन्य घेवूनी प्रभूचे दर्शन
    आनंदाने भरले मन प्रभूसी बघोनी ।। २६ ।।

    फाडोनीया उदरासी काढावे बाळासी
    विनविले प्रभूसी शंखासूराने ।। २७ ।।

    बघूनी त्याचे आत्मापर्ण बाळ देण्या पोट फाडून
    श्रीकृष्ण होई प्रसन्न त्याचे वरी ।। २८।।

    प्रसन्न होई भक्ती बघोनी आशीर्वाद दिला प्रभूनी
    घ्यावा ‘वर’ मागोनी श्रीकृष्ण बोले ।। २९।।

    पूजेमध्ये मान मिळावा देवामाजी गणला जावा
    सदैव प्रभू सहवास घडावा ही माझी इच्छा ।। ३०।।

    ‘तथास्तू’ म्हटले प्रभूनी त्याच्या भक्तीस बघूनी
    ‘वर’ दिला हरीनी शंखासुरास ।। ३१ ।।

    आत्मार्पण करूनी स्वत:चे उदर फाडूनी
    बाळास परत देवूनी टाकले आसे ।। ३२।।

    बलीदानाचे प्रतीक रूप मिळेल तव शंख
    जल पडता होईल अभिषेक तुझ्या पोटातूनी ।। ३३ ।।

    तुझ्या उदरातून जलधार पडत राहील देवांचे वर
    सार्थक पूजा न होई तोवर तूजविण पूजेमध्ये ।। ३४ ।।

    शंखाविना पूजा निरर्थक पूजेमध्ये असेल तो एक
    मिळण्या पूजेचे सार्थक शंख घंटा आसावी ।। ३५ ।।

    शंखासी धरले हाती प्रभूचा सहवास लाभती
    मोठेपण तयासी मिळती अपूर्व भक्तीमुळे ।।३६।।

    शंखासूराचा शंख बनला देवाऱ्यात मान मिळाला
    सर्व देवामध्ये बसला भक्ती सामर्थ्याने ।।३७।।

    भक्तीचा महीमा थोर अंतरयामी आसावा ईश्वर
    देवत्व येते असूनी असूर कुणालाही ।।३८।।

    कुणीही नसती थोर लहान मिळवावे लागते मोठेपण
    जेव्हां होई प्रभूचरणी लीन देवत्व तयांना येई ।। ३९।।

    जीवनाचे तत्त्वज्ञान थोर बनूनी व्हावे लीन
    सकलजनांचा मिळेल मान हेच माझे सांगणे ।। ४० ।।

    “ शुभं भवतू “

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९- २९१०८३

  • श्री सिद्धिविनायक मुळ रहस्य व श्रीस्वामी समर्थांचा संबंध

    अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.

  • श्री. गंगावतरण

    श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
    धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।

    जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
    गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।

    कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
    पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।

    समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
    विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।

    जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
    ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।

    विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
    आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।

    गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
    पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।

    आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
    सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।

    सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
    सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।

    तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
    परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।

    तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
    गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।

    तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
    धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।

    भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
    सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।

    प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
    तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।

    हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
    पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।

    भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
    सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।

    नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
    गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।

    हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
    परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।

    प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
    दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।

    उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
    नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।

    प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
    मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।

    भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
    शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।

    गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
    घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।

    गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
    गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।

    उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
    नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।

    एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
    जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।

    स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
    पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।

    पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
    पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।

    डॉ.भगवान नागापूरकर
    १०- ३०१०८३

    ( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )