वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

असे सांगितले जाते की तपश्चर्येच्या अवस्थेत, श्री भगवतानंद गुरूंना स्वप्नात शक्तिपाताद्वारे कुंडलिनी शक्तीचा साक्षात्कार झाला आणि नंतर भगवान शिवांनी त्यांना श्रीरामाच्या कथेवर आधारित श्रीराघवेंद्रचरितम् हा ग्रंथ लिहिण्यास प्रेरित केले. प्रस्तुत राम ताण्डव स्तोत्र हे या ग्रंथाचा एक भाग आहे.
तांडवाचा एक अर्थ भयंकर संहारक क्रिया असाही आहे. या स्तोत्राची शैली आणि भाव वीररस आणि युद्धाच्या भीतीने भरलेले असून ‘रामरावणयोः युद्धम् रामरावणयोः इव’ या उक्तीनुसार या युद्धाची भयानकता स्तोत्रात पुरेपूर उतरली आहे.
सर्वप्रथम दशाननाने शंकरस्तुतीपर ‘शिवतांडव’ स्तोत्र रचले. त्यानंतर इतर देवतांची ‘तांडव’ स्तोत्रे रचली गेली. प्रस्तुत स्तोत्र त्यापैकीच आहे. ते पंचचामर (जरजरजग) वृत्तात रचले आहे. त्यामुळे त्याला आलेली विशिष्ट लय भावप्रकटीकरणास पूरकच आहे. त्याच बरोबर अनेक श्लोकात एकच शब्द विविध अर्थांनी वापरून छेकानुप्रास अलंकाराचे मनोहर व अर्थपूर्ण उदाहरण व श्रीरामाचे सुंदर शब्दचित्र दिसते.
श्रीराम तांडव स्तोत्रम् - इंद्रादयो उवाच-
जटाकटाहयुक्तमुण्डप्रान्तविस्तृतम् हरे:
अपांगक्रुद्धदर्शनोपहार चूर्णकुन्तलः ।
प्रचण्डवेगकारणेन पिंजलः परिग्रहः
स क्रुद्धतांडवस्वरूपधृक् विराजते हरि: ॥१॥
मराठी- इंद्रादि देव म्हणाले “ मस्तकावर कूपाच्या आकारात बांधलेल्या जटा विखुरल्या गेल्यामुळे ज्याचा चेहेरा विशाल दिसत आहे, कटाक्षांमुळे ज्याचा चेहेरा संतप्त दिसत आहे, तो, अत्यंत वेगा (जोषा) मुळे शत्रु सैन्यात (जणू काही) निर्भय मूर्तिमंत ताण्डवच असा, श्रीहरी शोभून दिसत आहे."
जटा शिरी सुरेख चेहरा विशाल खास तो
विकीर्ण त्या, कटाक्ष टाकताच क्रुद्ध भासतो ।
रिपू-जमाव जोष कारणे अतीव घाबरे
तुफान नृत्य मूर्तिमंत रामरूप साजिरे ॥०१॥
अथेह व्यूहपार्ष्णिप्राग्वरूथिनी निषंगिनः
तथांजनेयऋक्षभूपसौरबालिनन्दना: ।
प्रचण्डदानवानलं समुद्रतुल्यनाशका:
नमोऽस्तुते सुरारिचक्रभक्षकाय मृत्यवे ॥२॥
मराठी- हा पहा व्यूह् ! आघाडीची आणि पिछाडीची; मारुती,जांबुवंत,सुग्रीव,अंगद यांच्यासारखे वीर योद्धे असलेली आणि असुरांच्या तीव्र अग्नी(प्रमाणे सेने)च्या नाशासाठी समुद्राप्रमाणे असलेली सेना ! अशा देवांचा शत्रू (असलेल्या) - दैत्यरूपी आग शमनासाठी जणू सागरच असणार्या दैत्यसेनेचा भक्षक, मृत्यो तुला नमस्कार असो.
बिनीस मारुती नि सूर्यपुत्र रीसराज तो (रीस- अस्वल)
दले लढाउ अंगदासवे अनेक, व्यूह तो ।
हरावयास दैत्य ताप नीर सागरी जसे
यमा, असूर नाशका, प्रणाम हा तुला असे ॥०२॥
कलेवरे कषायवासहस्तकार्मुकं हरे:
उपासनोपसंगमार्थधृग्विशाखमंडलम् ।
हृदि स्मरन् दशाकृते: कुचक्रचौर्यपातकम्
विदार्यते प्रचण्डतांडवाकृतिः स राघवः ॥३॥
मराठी- अंगावर भगव्या रंगाचा अंगरखा घातलेला, हाती धनुष्य घेतलेला, (सीतेसह) मीलनाच्या इच्छेने निर्भयतापूर्वक पाय फाकवून (रोवून) तिरंदाजीच्या पावित्र्यात उभा, मनात रावणाच्या फसवेगिरीने केलेल्या चोरीचे पातक आठवत प्रचंड तुफानाच्या स्वरूपाचा तो श्रीराम (राक्षसांचा) नाश करतो.
तनूस काव वर्ण वस्त्र, धारिले धनू करी
उपासनाच मीलनार्थ पाय रोवुनी करी ।
अघोर, नाटकी दशानन प्रमाद आठवी
तुफान रूप राम सर्व दैत्यसंघ नाशवी ॥०३॥
प्रकाण्डकाण्डकाण्डकर्मदेहछिद्रकारणम्
कुकूटकूटकूटकौणपात्मजाभिमर्दनम् ।
तथागुणंगुणंगुणंगुणंगुणेन दर्शयन्
कृपीटकेशलंघ्यमीशमेक राघवं भजे ॥४॥
मराठी- अत्यंत उत्कृष्ट अशा बाणांनी, वाईट कृत्ये करणार्यांच्या शरीराची चाळण करणार्या, आत्यंतिक खोटेपणा व फसवणूक करण्यासाठी खुबी वापरणार्या राक्षसकुलोत्पन्नाचा नाश करणार्या, तसेच (आपला) पराक्रम, सत्व, स्वभाववैशिष्ट्य, कसब धनुष्याच्या दोरी (च्या माध्यमातून) दाखवून देणार्या, आणि महासागर (पूल बांधून) पार करणार्या एकमेव रामचंद्राला मी भजतो.
शरें सुतीक्ष्ण दुष्ट कृत्य देह छिन्न जो करी
लबाड ढोंग धूर्त फार राक्षसास संहरी ।
विशेष तेज सत्त्व चाप-कौशलास दाखवी
करी समुद्र पार एक राम त्यास मी स्तवी ॥०४॥
सवानरान्वितः तथाप्लुतम् शरीरमसृजा
विरोधिमेदसाग्रमांसगुल्मकालखंडनैः ।
महासिपाशशक्तिदण्डधारकै: निशाचरै:
परिप्लुतं कृतं शवैश्च येन भूमिमंडलम् ॥५॥
मराठी- ज्याच्या सवे वानर सैन्य आहे, तसेच ज्याचे शरीर शत्रूच्या रक्ताने नाहून निघाले आहे (त्या श्रीरामाने), ज्यांच्याकडे धारदार तलवारी, दोरीचे फास, भाले, (लाकडी) दण्ड आहेत अशा रात्रींचरांच्या शरीरांचे चरबी, मांस, आंतडी यांचे तुकडे व कलेवरे यांनी धरित्री झाकून टाकली आहे......
कपी दला सवे, जया रिपू रुधीर रंगवी
कृपाण, दण्ड, फांस, शूळही करी, अमानवी। (कृपाण- लहान तलवार, शूळ- भाला)
वपा, रुधीर, मांस, आंत, राक्षसी कलेवरे
इथे तिथे नळे पडून सर्व झाकिती धरे ॥०५॥
विशालदंष्ट्रकुम्भकर्णमेघरावकारकै:
तथाहिरावणाद्यकम्पनातिकायजित्वरै: ।
सुरक्षिताम् मनोरमाम् सुवर्णलंकनागरीम्
निजास्त्रसंकुलैरभेद्यकोटमर्दनम् कृतः ॥६॥
मराठी- कराल दाढा असणारा कुंभकर्ण, मेघनाद तसेच अहिरावण इत्यादी अविचल अवाढव्य शरीराच्या दृढ विजयी वीरांनी जिचे रक्षण केले आहे अशा मनाला भुरळ पाडणार्या सोन्याच्या लंका नगरीच्या अभेद्य तटबंदीला आपल्या अस्त्रांच्या वर्षावाने उद्ध्वस्त केले.......
कराल दाढ कुंभकर्ण, इंद्रजीत, कैकसी
सुतें, बलाढ्य भव्य वीर रक्षिती जिला अशी।
सुवर्ण भूमि राखण्या अभेद्य कोट बांधिला
अमोघ अस्त्र वृष्टिने जयें समूळ तोडिला ॥०६॥
टीप- कृत्तिवास रामायणानुसार विश्रवा ऋषि आणि कैकसीचा पुत्र अहिरावण हा पाताळ देशाचा अधिपती व रावणाचा भाऊ होता. त्याला महिरावण नावाचा एक भाऊही होता.
प्रबुद्धबुद्धयोगिभिः महर्षिसिद्धचारणै:
विदेहजाप्रियः सदानुतो स्तुतो च स्वस्तिभिः ।
पुलस्त्यनंदनात्मजस्य मुण्डरुण्डछेदनम्
सुरारियूथभेदनं विलोकयामि साम्प्रतम् ॥७॥
मराठी- प्रगल्भ, बुद्धिमान अशा श्रेष्ठ ऋषी मुनींनी तसेच स्वर्गीय गायकांनी आनंदाने ज्याची सदैव प्रशंसा केली जाते व स्तुती गीते गायली जातात असा सीतेचा पती आता पुलस्त्याच्या नातवाचा शिरच्छेद आणि देवांच्या शत्रूच्या सैन्याचा घोर संहार करतांना मी पहात आहे.
मुनी महान बुद्धिमान दिव्य भाट गायने
प्रशंसती सदा सियापतीस शुद्ध भावने।
दशाननास राम आज कंठस्नान घालतो
रिपू दले करीत नष्ट, मी, क्षणास पाहतो ॥०७॥
करालकालरूपिणं महोग्रचापधारिणम्
कुमोहग्रस्तमर्कटाच्छभल्लत्राणकारणम् ।
विभीषणादिभिः सदाभिषेणनेऽभिचिन्तकम्
भजामि जित्वरम् तथोर्मिलापते: प्रियाग्रजम् ॥८॥
मराठी- ज्याचे (आत्ताचे) रूप भयाण मृत्युसमान दिसत आहे, ज्याच्या हातात अत्यंत उग्र धनुष्य आहे, जो वाईट अज्ञानाने पछाडलेल्या वानर आणि अस्वलां (जातीच्या जनां) च्या रक्षणाचे कारण आहे, विभीषण वगैरेंबरोबर शत्रू सैन्यावर मात करण्यासाठी नित्य विचारविनिमय करणार्या उर्मिलेच्या पतीच्या आवडत्या थोरल्या भावाला (श्रीरामाला) मी भजतो.
करी कमान, उग्र मृत्यु रूप जे भयाणसे
अजाण रीस वानरांस रक्षणार्थ जो असे। (रीस- अस्वल)
विभीषणासवे विचार नित्य मात द्यावया
रिपूस, उर्मिला दिरास वंदितो सदा तया ॥०८॥
इतस्ततः मुहुर्मुहु: परिभ्रमन्ति कौन्तिकाः
अनुप्लवप्रवाहप्रासिकाश्च वैजयंतिका:।
मृधे प्रभाकरस्य वंशकीर्तिनोऽपदानतां
अभिक्रमेण राघवस्य तांडवाकृते: गताः ॥९॥
मराठी- वारंवार इकडे तिकडे पळापळ करणारे इटेकरी, त्यांच्या सहकार्यांच्या (तलवार बहाद्दर इ.) तुकड्या आणि झेंडाधारी यांची रणात सूर्यकुलोत्पन्न श्रीरामाच्या उग्र आकृतीने केलेल्या हल्ल्यात दाणादाण झाली.
इटेकरी नि सोबती निशाण धारकासवे (इटा- भाला)
इथेतिथे पुन्हापुन्हा रणात धावती थवे ।
रवीकुलीन राम उग्र ग्रासुनी रिपूदलें
विनाश धूळधाण होत सर्व दूर पांगले ॥०९॥
निराकृतिं निरामयं तथादिसृष्टिकारणम्
महोज्ज्वलं अजं विभुं पुराणपूरुषं हरिम् ।
निरंकुशं निजात्मभक्तजन्ममृत्युनाशकम्
अधर्ममार्गघातकम् कपीशव्यूहनायकम् ॥१०॥
मराठी- जो निराकार आहे, विशुद्ध आहे, तसेच ही सृष्टी अस्तित्वात येण्याचे मूळ कारण आहे, अतीव तेजस्वी आहे, अनादी प्राचीन व सार्वभौम आहे, ज्याच्यावर कोणाचा ताबा नाही, आपल्या भक्तांच्या जन्म मृत्यूचा नाश करणारा आहे, अयोग्य मार्गाचा नाश करतो, जो वानर सेनेच्या सेनापतींसवे सैन्याच्या रचनेचा प्रमुख आहे .........
न आकृती जया, विशुद्ध, आद्य सृष्टिकारणा
सनातना, अनादि, भक्त जन्म मृत्यु नाशना ।
अतीव तेज, सार्वभौम, योग्य मार्ग दर्शना
प्लवंगमुख्य संगती रचे सुसज्ज योजना ॥१०॥ (प्लवंग- वानर)
करालपालिचक्रशूलतीक्ष्णभिंदिपालकै:
कुठारसर्वलासिधेनुकेलिशल्यमुद्गरै: ।
सुपुष्करेण पुष्करांच पुष्करास्त्रमारणै:
सदाप्लुतं निशाचरै: सुपुष्करंच पुष्करम् ॥११॥
मराठी- भीतिदायक गोल चक्रे,भाले,तीक्ष्ण बर्च्या,कुर्हाडी,बाण,खड्ग, टोकदार मुद्गल, धनुष्य व प्रत्यंचेने सोडलेली पर्जन्यास्त्रे यांच्या मार्याने मारल्या गेलेल्या राक्षसांची कलेवरे यांनी आकाश आणि सागर ओसंडून गेले आहेत.
भयाण चाक, तीक्ष्ण शूल, टोकदार मुद्गला
सवे कुर्हाड, खड्ग चाप बाण त्यास जोडिला ।
रणात सोडुनी जलास्त्र मार शत्रुला दिला
कलेवरे नभी, जलात साचलीत आजला ॥११॥
प्रपन्नभक्तरक्षकम् वसुन्धरात्मजाप्रियम्
कपीशवृंदसेवितं समस्तदूषणापहम् ।
सुरासुराभिवंदितं निशाचरान्तकम् विभुं
जगद्प्रशस्तिकारणम् भजेह राममीश्वरम् ॥१२॥
मराठी- आपल्याला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणार्या, भूमिकन्येला प्रिय असणार्या, वानरांचे मुख्य ज्याची सेवा करतात, जो सर्व दुर्गुणांचा नाश करतो, देव व दानवही ज्याला नमस्कार करतात, राक्षसांचा विनाश करणार्या, सार्या जगताचे जो भरण व रक्षण करतो अशा सार्वभौम राजा श्रीरामाला मी भजतो.
धरासुतेस आवडे, जगास सर्व राखितो
उपासकांस पाळतो नि दुर्गुणांस नाशितो।
प्लवंगमुख्य, देव, दैत्य सर्व ज्यास वंदिती
जगात सार्वभौम तू प्रणाम घे रघूपती ॥ १२
इति श्रीराघवेंद्रचरिते इन्द्रादि देवगणै: कृतं श्रीरामतांडव स्तोत्रम् सम्पूर्णम् ।।
-- धनंजय बोरकर.
(९८३३०७७०९१)
September 30, 2022
दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली.
September 4, 2017
आपल्या आराध्य देवतेची स्तुती करून तिला प्रसन्न करून कृपाप्रसाद प्राप्त करणे हे कोणाही भक्ताचे उद्दिष्ट असते. स्तोत्र पठण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘प्रतिवादी भयंकर’ स्वामी अण्णा यांनी मुख्यत्त्वे तोडक वृत्तात (सससस) रचलेल्या या स्तोत्रात श्री व्यंकटेशाचे गुणवर्णन व स्तुती आहे. कृपा किंवा उपकार एखाद्या गोष्टीची परतफेड म्हणून किंवा कारणाविना निर्हेतुक असू शकतात. येथे याच निर्हेतुक कृपेची तसेच आपल्या हातून जे अनेक अपराध, दुष्कृत्ये घडल्रेली आहेत त्याबद्दल क्षमा मागून याचना केली आहे.
June 12, 2020
सन २००८ ऑगस्ट मध्ये घडलेल्या ‘निकिता मेहता’ घटनेचा मागोवा घेऊन हा लेख लिहिण्याचा प्रपंच.
ह्या केसमध्ये गर्भपात विषयक वादात कायद्याला डावलून निसर्गानेच पूर्णविराम दिला. परंतु त्यातील मूळ प्रश्न मात्र कायमच राहिला. जगातील विविध देशांमध्ये हा विषय निरनिराळ्या रूपात चर्चिला जातो. ह्याच अनुषंगाने निकिता मेहता सारख्या केसेसमध्ये पुढे जन्मभर वादविवाद नको म्हणून गर्भपातासारख्या विषयावर जनता संवेदनशील होते.
व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असल्यामुळे माझ्या वीस वर्षाच्या अनुभवांवरून मला असे वाटते की, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस असले पाहिजे. प्रेम, विवाह, मातृत्व, घटस्फोट आणि गर्भनिरोध ह्यांसारखे निर्णय अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे असून त्यामधे इतरांनी ढवळाढवळ करू नये. धर्माचा उपसर्ग तर त्यास आजिबात येऊ देऊ नये. वैज्ञानिक प्रगतीचे उद्दिष्ट आणि उपयोग दोन्ही केवळ मानवी-जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने असावे. त्याचप्रमाणे आपल्या खाजगी जीवनात कोणी कोणता निर्णय घ्यावा ह्या बाबतीत किमान कायद्याचा किंवा सरकारचा हस्तक्षेप असू नये. सुख हेच जीवनाचे अंतिम सत्य असल्यास दु:खदायक श्रद्धा अनैतिक ठरू शकते.
स्वत:चे सुख अधिक महत्वाचे की, नव्याने या जगात प्रवेश करणारा जीव? ह्या जीवाचे आगमन झाल्यावर त्याला जन्मभर दु:खच भोगावे लागणार असल्यास त्याला जन्म देण्याचे प्रयोजन तरी काय? नवा जीव जन्माला घालणे हीच मानवी जीवनाची सार्थकता समजणे कितपत योग्य आहे? नव्याने ह्या जगात येणाऱ्या जीवाला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभावे ही अपेक्षा आई-वडिलांसाठी अवास्तव म्हणता येईल का?
निकिता मेहताचे गर्भपात प्रकरण कोर्टाने फेटाळले आणि काही दिवसांतच निकिताचे बाळ पोटातच गेले, जन्मण्याआधीच नाहीसे झाले. ह्या संदर्भातले कायदे आज काही नव्याने झालेले नाहीत. प्रश्न आहे तो केवळ लोकांच्या भावनेपोटी असे कायदे बदलावेत का? पूर्ण आरोग्यमय असलेले बाळ आपल्या पोटी जन्माला यावे अशी प्रत्येक मातेची स्वाभाविक अपेक्षा असते. त्यात काहीही चूक नाही पण दुर्दैवाने काही व्यंग असलेले, मतिमंद बाळ जन्माला येणार हे आधी कळले तर कोणतीही आई त्याला जन्माला घालण्यास स्वेच्छेने तयार होणार नाही. सामाजिक दडपणाखाली असे मूल जन्माला घालणे ही गोष्ट वेगळी. अशा वेळी समाज किंवा इतर नातेवाईक फक्त सल्ले देण्याचे काम बजावत असतात. यापेक्षा अधिक अपेक्षा त्यांच्याकडून न केलेलीच बरी. अशा वेळी कायद्याचा आधार घेऊन गर्भपात करणे योग्य राहील असे माझे व्यक्तिगत मत आहे. इतरांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आत्म्याचे अमरत्व वर्णन करणे व आपल्या घरातील प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यावर आत्म्याच्या अमरत्वाचे भान विसरणे ही तर नेहमीचीच बाब !
ह्या जगात कितीतरी अनैतिक गोष्टी चालतात. मुलामधे जन्मजात दोष, शारीरिक अथवा मानसिक दोष खूप जिकीरीचे आहे. आपला समाज अशा मुलांबाबत प्रगल्भ नाही. आपल्यानंतर आपल्या बाळाची काळजी घेणारा कोण ही चिंता अशा मुलांच्या पालकांना नेहमीच असते. काही मुले स्वबळावर जीवनाला आकार देतात. पण त्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे कौटुंबिक, सामाजिक वातावरण सक्षम असावे लागते. न्याय देऊन न्यायालयाचे काम संपुष्टात येते. पण त्या कुटुंबाला खूप मोठ्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावे लागते. ह्या बाबतीत आयुर्वेदातील ‘श्रेयसी प्रजेचा’ मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरतो. त्याचा उहापोह नक्कीच व्हायला हवा. म्हणून हा लेख प्रपंच.
मार्गाधारे वर्तावे विश्व हि मोहरे लावावे !
या भावार्थ दीपिकेतील वचनाप्रमाणे आप्तस्वकीयांनाही त्याच मार्गाने जाण्यास प्रवृत्त करावे. गरज निर्माण झाली की शोधाशोध किंवा संशोधन सुरु होते. म्हटलेच आहे की, ‘गरज ही शोधची जननी आहे.’ प्रचंड महागाईच्या काळात अनेक अपत्यांना जन्म देण्यापेक्षा ‘एक किंवा दोन अपत्येच पुरेत’ असा बहुतेकांचा निर्णय असतो. म्हणून होणारी संतती सदगुणी, सुंदर, दीर्घायु, बुद्धिमान, आरोग्यसंपन्न व व्यंगरहित असावी. ‘श्रेयसी प्रजेचे’ वर्णन करताना महर्षी चक्रपाणी म्हणतात.
श्रेयसी प्रजा इच्छतो इति अत्र श्रेयसी प्रजा
गुणवान पुत्रो, गुणवती च कन्या अभिप्रेतो !
गुणवान अपत्यप्राप्ती ‘क्वालिटी अश्युरन्स’ हेच ध्येय ठरविल्यावर नियोजन आणि व्यवस्थापन ओघाने आलेच. गर्भस्थापनेचे व गर्भावस्थेचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करणे ही माता पित्यांची जबाबदारी ठरते.
सामर्थ्यवान व निर्दोष वीर्य असलेला पुरुष, अविकृत रज, गर्भाशययुक्त स्त्री व श्रेष्ठ दर्जाचा पोषक आहार यामुळे ‘श्रेयसी प्रजा’ निर्माण होते. ऋतुकालानुसार उत्तम जमिनीत पोषक द्रव्यांचा वापर करून शेतीबागायत केली तर त्याचे फळही उत्तम मिळते. त्याचप्रमाणे सुयोग्य दिन गर्भस्थापनेसाठी निवडणे आवश्यक ठरते.
रजोदर्शनापासून सोळा रात्रींपैकी फक्त दहा रात्रीच गर्भाधारणेस प्रशस्त आहेत. रजोदर्शनापासून ४, ५, ६, ७, ८, ९, १०, १२, १४, १५ ह्या दहा रात्रीत मैथुन केल्यास व्यंगरहित संतती प्राप्ती होते. समरात्री समागम केल्याने पुत्रप्राप्ती व विषम रात्री समागम केल्याने कन्याप्राप्ती होते असे आयुर्वेदाचे मत असले तरी ह्यावर अधुनिक पद्धतीने संशोधन झालेले नाही, म्हणून तूर्त हा वादाचा विषय आहे.
ऋतुकाली चौदाव्या रात्री संग केल्याने अत्यंत धर्मनिष्ठ, कर्मनिष्ठ, परोपकारी, दृढनिश्चयी, आत्मानुभवी महापुरुष जन्माला येतो. पंधराव्या रात्री समागमामुळे पतिव्रता कन्या जन्माला येते. सोळाव्या रात्री व्यवाय केल्याने सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण करणारा सर्वाधारभूत चक्रवर्ती राजा जन्माला येतो.
शुभ वार - व्यंगरहित संततीसाठी - सोम, बुध, गुरु, शुक्र
शुभ तिथि – प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या अशा दहा तिथि गर्भधारणेसाठी वर्ज्य आहेत.
दोन्ही पक्षातील उरलेल्या वीस तिथि गर्भाधानासाठी शुभ आहेत.
अशुभ नक्षत्रे – रेवती, अश्विनी, पुण्य, अश्लेषा, मघा, चित्रा, मृग, मूळ ही नक्षत्रे गर्भाधानासाठी योग्य नाहीत.
मध्यम नक्षत्रे - भरणी, कृतिका, आद्रा, पूर्वा, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा ही सात नक्षत्रे मध्यम स्वरुपाची आहेत.
सर्वश्रेष्ठ नक्षत्रे - रोहिणी, पुनर्वसु, उत्तरा, हस्त, स्वाती, अनुराधा, उत्तराषाढा, श्रवण, घनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा ही अकरा नक्षत्रे गर्भधानासाठी सर्वश्रेष्ठ मानली आहेत.
शुभ मास - वसंत ऋतूतील दोन महिने व हेमंत – शिशीरातील चार महिने असे एकूण सहा महिने गर्भधानासाठी योग्य आहेत. इतर ऋतूंमधे प्रजास्थापनेसाठी व व्यंगरहित संततीसाठी मैथुन करू नये.
गर्भाधान व्यवस्थापन - विवाहानंतरच्या काळात गर्भाधानास योग्य अशा निवडलेल्या दिवसांच्या तीन महिने अगोदर स्त्री आणि पुरुष दोघांचीही वमन – विरेचन, स्नेहन / स्वेदनपूर्वक शरीरशुद्धी करावी. वमन - विरेचनानंतर संसर्जन क्रम विधिवत करावा. त्यानंतर पूर्ण आहार सुरु करावा. पंधरा दिवसांनी आस्थापन व अनुवासन बस्ति द्यावा. हे सर्व उपक्रम तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावे.
गर्भाधान - गर्भाधानासाठी सुनिश्चित दिवशी दोघांनीही उद्वर्तनादी सुगंधी द्रव्याचा वापर करून शुचिर्भूत व्हावे. श्वेत वस्त्रे परिधान करावीत. धूप, उदबत्ती, कापूर, इ. लावून घरात सुगंध पसरवावा. आनंद देणारे संगीत लावावे. मन प्रफुल्लित, आनंदित, प्रसन्न राहील असे वातावरण निर्माण करावे. मधुर, सात्विक असा आहार घ्यावा. शयनमंदिरात भडक रंग, हिंस्त्र प्राण्यांची चित्रे नसावीत. भिंती पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या असाव्यात. डोके पूर्वेकडे येईल अशी शय्येची रचना असावी. पूर्वरात्र उलटल्यावर पादप्रक्षालन करून पुरुषाने उजवा पाय, स्त्रीने डावा पाय शय्येवर ठेवून चढावे. स्त्रीने पुरुषाच्या डाव्या बाजूला असावे. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने समागम करावा.
आहारssचार चैष्टिभि: यादृशीभि समन्तितौ |
स्त्रीन्युसौ स्मुपेयातां तयो पुत्रोsपि तदृश ||
आहार, आचार, विचार व चेष्टा इत्यादिकांनी युक्त होऊन स्त्री-पुरुष ज्या भावनेने एकत्र येत असतील तशीच संतति त्यांना निश्चित प्राप्त होईल.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
August 4, 2015
मी कुर्ला शाखेत असतानाचा एक किस्सा.. मी नुकतीच बँकेत लागले होते, प्रोबेशन काळात संपात सहभागी होता येत नाही…अश्याच एका संपाच्या दिवशी मी, कॅशियर आणि एक वरिष्ठ अधिकारी एवढेच लोक उपस्थित होतो. फक्त रोख रकमेचे व्यवहार चालू होते म्हणून तुरळक गर्दी होती, ह्या शाखेत एक पेट्रोल पंपाचे खाते होते.
April 9, 2023
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले. सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या.
November 20, 2024
गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला.
September 8, 2010
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 14, 2018
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.
January 11, 2010
प्लास्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर केला जातो. ह्यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. जगात कृत्रिम रसायनांच्या निर्मितीमध्ये सर्वात अधिक निर्मिती ह्या रसायनांची होत आहे.
August 20, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti