वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यात मला जे सुचतंय, ते लिहितोय.
उतु नको मातू नको
घेतला वसा टाकू नको.
चातुर्मासात कहाण्या वाचायची पद्धत आहे. या कहाण्यांची सुरवात, एक आटपाट नगर होते..... अशी असते, मधेच कुठेतरी एखादी देवी किंवा मैत्रिणीच्या तोंडी हे वाक्य असते, उतु नको मातु नको, घेतला वसा टाकू नको... आणि पाचागावची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण असा शेवट असतो.
त्यात तुझ्यातील अहंकार सोडून दे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे. असा उपदेश केलेला असतो. जे व्रत तु स्विकारलेले आहेस, ते टाकू नकोस. तेच तुझे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. अशी समज दिलेली असते. म्हणून आई सांगते उतु नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.
उष्टे खाऊ नये.
एकमेकांच्या उष्टे खाल्ले की, जंतुसंसर्गामुळे होणारे व्याधी वाढतात, असे आधुनिक विज्ञान पण सांगते. पाश्चात्य संस्कारामुळे आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे, वेगवेगळ्या कुकरी शो मधे केक किंवा अन्य पदार्थ एकमेकांना हाताने भरवणे, किंवा त्याच उष्ट्या चमच्याने इतर सर्वांना भरवणे, या किळसवाण्या प्रकारामुळे, चलता है यार! उष्टे खाणे गैर नाही, असा चुकीचा संस्कार नकळतपणे होत जातो. आज असं चुकीचं का केलं जातं माहिती नाही, पण एकमेकांच्या उष्ट खाण्याची चुकीची प्रथा रूढ होत जातेय. यावेळी आईने किंवा बाबांनी आपल्या मुलामुलींना समजावून सांगितले पाहिजे, की उष्टे खाऊ नये. जंतुसंसर्गाचा पुढे धोका आहे.
घटाघट पाणी पिऊ नये.
पाणी सावकाश प्यावे. नाहीतर ठसका लागण्याचा संभव असतो. उगाचच बाटली लावली तोंडाला आणि संपवूनच तोंडातली काढली असं करू नये. पाणी वरून पिऊ नये. भांड्याला तोंड लावूनच प्यावे किंवा स्वतःच्याच ओंजळीने प्यावे.म्हणून पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचे स्वतःचे भांडे स्वतःबरोबर नेणारी मंडळी होती.
उगाच आरश्यात पाहू नये.
नटण्या मुरडण्याला पण मर्यादा असतात. सतत आरशासमोर उभे राहाणे, सतत चेहेरा पाहाणे, यात वेळ किती जातो, हे लक्षातच येत नाही. हे ज्या काळात सांगितले गेले, त्यापेक्षा आताचा काळ फार बदलला आहे. इतरांना आपण सुंदर दिसावे, ही विशिष्ट वयातील धडपड चुकीची नाही, पण सतत आरशासमोर उभे राहाणे चुकीचे आहे, हे मुलीला सांगितले तर आईचे काय चुकले ?
आता तर सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी काढताना तोंडाचे चंबू, गडू करून, ओठांची तोंडली नि आवळे करत, डोळ्यावरच्या भुवयांची धनुष्ये वाकवित, जेवढा विचित्र चेहेरा करता येईल तेवढा विदूषकी चेहेरा करण्याचा फंडा आला आहे. या काळानुसार बदलणाऱ्या फॅशन्स आहेत. हे आयुर्वेदात कुठुन येणार ? पण मूळ सूत्र सांगितलेले आहे, त्यात विस्तार करायला हवाच. जसा भाव चेहेऱ्यावर असतो, तसा तो मनी रूजतो. म्हणून चेहेऱ्यावर कधीही आठ्या नकोत. काही जणांना आठ्या पाडल्याशिवाय बोलताच येत नाही. आठ्या पाडून बोलू नकोस. असं आईने सांगितले आणि चेहरा नीट ठेऊन सेल्फी काढ, असे बाबा ओरडले तर काही चुकले का ?
परवाच एकाने प्रश्न विचारला, माझ्या चेहेऱ्यावर काळे डाग आहेत, मी काय करू ? विचारणाऱ्याने नाव सांगितलेले नाही, वय माहिती नाही, म्हणून सहज त्याचा डीपी पाहिला. तर डीपीवरच एवढा भेसूर चेहेरा ठेवलेला होता. आणि त्या चेहेऱ्यावर काळ्या रंगाचे पट्टे. मी सहज बापाच्या भूमिकेतून त्याला मेसेजलो, "अरे, आधी डीपी बदल. चेहेऱ्यावर काळे पट्टे ओढलेला हा भयानक डिपी कशाला ठेवलायस ?" त्यावर तो उत्तरला, "मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर द्या. नसत्या चौकशा कशाला ? "
आता याला काय उत्तर देणार. ?
माझेच चुकले म्हणा. मी कर्तव्य भावनेने त्याच्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायला हवं होतं. पण जळ्ळं बापाचं काळीज बाहेर पडलं. आणि हे असं उत्तर ऐकून घ्यावं लागलं.
बदलत्या काळानुसार पालकांनी पण बदलणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाशी संवाद करताना पण त्यांना रूचेल अशा भाषेत बोलायला हवे, हे पालकांनी समजून घ्यायला हवं.
केसांना हात लावू नये.
हे वाक्य म्हणजे सरळ सरळ आरोग्य जपणारा सल्ला आहे. केसांवर धुळ माती, बसत असते. त्यावर अनेक प्रकारचे जंतु चिकटलेले असतात. उगाचच केसातून हात फिरवायची सवय असणारी अनेक मुलगे मुली दिसतात. केसांवरून फिरवलेला हात न धुताच, बर्गर पिझ्झ्याला पण लागतोच. तोही शेयरींग मधे. म्हणजे अर्धा मी अर्धा तू. म्हणजे तिथेही स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जंतुसंसर्गाचा धोका.
केसांची मुळे नाजूक असतील तर ती सतत हलत रहातात. आणि गळतात. इतरत्र उडतात.
आधी डोक्यावर तेल घालत नाहीत, त्यात स्टाईल म्हणून उडत्या भुरूभुरूत्या केसातून बोटे फिरवीत राहिले, तर लवकरच गाॅन केस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१०.०८.२०१७
August 10, 2017
आमची मराठी मुले कुठे कमी पडतात ?
January 14, 2024
खरं तर आपल्या संस्कृतीचं असं कुठलंच क्षेत्र नाही, जे नागाच्या धारणेनं व्यापलेलं नाही. परंपरेने याला पृथ्वीला मस्तकी धारण करणारा सर्वश्रेष्ठ शेष म्हटलेला आहे. समुद्रमंथनात तर वासुकी नागाची दोरी देव-दानवांनी धरली होती. वास्तुपूजनाच्या विविध विधीत ज्या दहा जणांना बळी अर्पण करण्याची प्रथा होती. त्यात एक बळी वासुकी नागासाठी आहे.
September 10, 2018

ह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.
April 10, 2018
या देशाच्या संविधानाने सामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कायदे, नियम तयार केले आहेत, त्यांचे प्रामाणिकपणे पालन झाले, तरी अनेक पीडितांना सहज न्याय मिळू शकेल; परंतु हे कायदे, नियम बासनात गुंडाळून नोकरशाही आपली समांतर न्यायव्यवस्था चालविते आणि त्यात लाच दिल्याखेरीज कोणतेही काम होत नाही. खरेतर ही अनागोंदी संपविण्याचे काम निस्वार्थी, नि:स्पृह आणि धाडसी राजकीय नेतृत्वच करू शकते.
शेतकऱ्यांच्या आणि इतर पीडितांच्या गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आत्महत्या सत्राकडे पाहिले, तर लवकरच महाराष्ट्राची ओळख आत्महत्या करणाऱ्यांचा प्रदेश अशी होण्याची शक्यता आहे. खेदाची बाब ही आहे, की अशी दुर्दैवी ओळख या राज्याची निर्माण होऊ नये म्हणून शासन स्तरावर आणि सामाजिक स्तरावरही कोणतेही भरीव प्रयत्न होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले, की सरकार कर्जमाफीची तात्पुरती मलमपट्टी करते. आताही विरोधकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून अधिवेशन वेठीस धरले आहे; परंतु ही तात्पुरती मलमपट्टी आहे, त्यातून फार काही साध्य होणार नाही, अनुभव हेच सांगतो. शिवाय अशा कर्जमाफीचा खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांना लाभ होत नाही. मधले दलालच सगळा पैसा खिशात घालतात.
मनमोहन सिंग सरकारने काही वर्षांपूर्वी 72 हजार कोटींचे मोठे कर्जमाफी पॅकेज दिले होते, त्यानंतर खरे तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला हव्या होत्या, परंतु तसे झाल्याचे दिसत नाही, उलट शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. वास्तविक अशा कर्जमाफी राजकीय हेतूने प्रेरित असतात आणि त्यातून केवळ बँकांचे भले करण्याचे उदि्दष्ट साध्य होते. ज्याला देवेंद्र फडणविसांनी नुकतीच पुष्ठी दिली शिवाय एकदा कर्जमाफी दिल्याने तो शेतकरी पुन्हा कर्जाच्या दलदलीत फसणार नाहीच, असे ठामपणे सांगता येत नाही. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बघितला, तर सरकारला दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागेल, व्यावहारिकदृष्ट्या ते शक्य नाही. अशा परिस्थितीत शेती हा नफ्याचा व्यवसाय होण्यासाठी काही वेगळ्या मार्गांचा अवलंब करणे भाग आहे, परंतु त्याकडे कुणीही गांभीर्याने बघत नाही, कारण शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीयदृष्ट्या सगळ्याच पक्षांसाठी एक चलनी नाणे ठरला आहे. सरकारमधील पक्ष कर्जमाफी वगैरे करून शेतकऱ्यांची मते मिळविण्याच्या प्रयत्नात असतात, तर विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार कसे उदासिन आहे, हे छाती पिटून सांगत शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविण्याचे राजकारण करीत असतात. यांच्या या स्वार्थी गोंधळात शेतकऱ्यांचे खरे प्रश्न कायम बाजूला पडलेले असतात. शेतकरी संघटित नाही आणि राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसे पुरविण्याइतका आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही, या दोन कारणांमुळेच शेतकऱ्यांच्या नशिबी सरकारची उपेक्षा येत आहे.
महाराष्ट्राला, विदर्भाला आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येची काहीही नवलाई राहिलेली नाही. विषारी दारू पिऊन चार लोक मेले आणि तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या दोन्ही बातम्या तितक्याच तटस्थपणे वाचल्या जातात. अशा बातम्यांची आता कुणी दखलही घेत नाही, परंतु अलीकडील काळात इतरांच्या आत्महत्येचेही प्रमाण वाढू लागले आहे. फार क्षुल्लक कारणावरून लोक आत्महत्या करीत आहेत. सगळ्या समस्या कायमच्या सोडविण्याचा रामबाण उपाय म्हणून आत्महत्येच्या पर्यायाकडे पाहिले जात आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे. खरे तर या समस्या अगदी जीवघेण्या वगैरे नसतात, अगदी घरगुती भांडणाला कंटाळून आत्महत्या केल्या जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा कॉलम बाजूला ठेवला, तरी एकट्या अकोला जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत सहा लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला खरा, परंतु त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलावे, हा प्रश्न मात्र अस्वस्थ करणारा आहे. त्यातही अत्यंत खेदाची बाब म्हणजे या प्रश्नामुळे ज्यांनी अस्वस्थ व्हायला हवे, तेच अत्यंत निगरगट्टपणे या सगळ्या प्रकाराकडे पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने पालकमंत्र्यांच्या कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कारण काय तर जिल्हा रुग्णालयामध्ये संपावर असणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या गरोदर पत्नीला मारहाण केल्यामुळे तिचा गर्भपात झाला आणि त्या धक्क्यामुळे त्याचे सासरे म्हणजे मुलीचे वडील हृदयविकाराचा तीऋा धक्का येऊन मरण पावले; मात्र मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली नाही म्हणून त्या तरुणाने पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्र्यांसमोर विष प्राशन केले. त्या तरुणाचा जीव वाचला, परंतु काही बरेवाईट झाले असते, तर केवळ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्याचे कुटुंब रस्त्यावर आले असते. तर दुसऱ्या एका प्रकरणात खूप प्रयत्न करून, वारंवार खेटे घालूनही वीज जोडणी मिळत नाही म्हणून सत्ताधारी भाजपचा तालुकास्तरीय कार्यकर्ता असलेल्या एका तरुणाने दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. वीज वितरण कंपनीने थोडी कार्यक्षमता दाखविली असती आणि खाबुगिरी बाजूला ठेवून त्याच्या विनंतीची दखल घेतली असती तर या तरुणाला हकनाक आपला जीव गमवावा लागला नसता. आत्महत्या करणारे तर जीवाने जातात, परंतु त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबाला आयुष्यभर मरणयातना भोगाव्या लागतात. घरातला कर्ता पुरुष असा तडकाफडकी निघून गेल्यावर सगळा संसारच उघड्यावर पडतो. खरे तर आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी लोकांनी आपल्या कुटुंबाचा, आपल्यावर अवलंबून असलेल्या चिल्ल्यापिल्ल्यांचा विचार करायला हवा, आत्महत्या काही प्रश्न सोडविण्याचा मार्ग नाही. ही एक बाजू झाली तरी याच संदर्भातली दुसरी बाजू तितकीच विदारक आहे. वर म्हटल्याप्रमाणे अनेक आत्महत्या अतिशय किरकोळ कारणाने होत असतात आणि त्यांचा संबंध बहुतेक वेळा पोलिस किंवा प्रशासनाशी असतो. या नोकरशाहीने थोडी संवेदनशीलता दाखविली, लाचखोरीचे शेण खाणे थांबविले, आपला कारभार लोकाभिमुख केला, तर शेतकरी आणि अन्य लोकांनाही असा टोकाचा निर्णय घ्यावा लागणार नाही. आमच्या देशोन्नती हेल्पलाईनकडे अनेक जण तक्रारी घेऊन येतात, बरेचदा तक्रारींचे स्वरूप अगदीच किरकोळ असते, थोडे मार्गदर्शन केले, मदत केली तरी काम भागण्यासारखे असते; परंतु तितकेही सौजन्य सरकारी कार्यालयात दाखविले जात नाही. साध्या साध्या कामासाठी लोक चकरा मारून कंटाळून जातात आणि नंतर वैफल्यग्रस्त होऊन काही तरी टोकाचा निर्णय घेतात. आत्महत्या करणाऱ्या लोकांचा प्रदेश ही महाराष्ट्राची होऊ घातलेली ओळख बदलायची असेल, तर नोकरशाहीने लोकाभिमुख होण्याची गरज आहे. अगदी मुख्य सचिवापासून ते तलाठ्यापर्यंत सगळ्या नोकरशाहीने याची जाणीव ठेवायला हवी, की त्यांना मिळणारे पगार, भत्ते हे सामान्य लोकांच्या घामातून आलेले असतात, आपले नियत कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून त्याची थोडीफार तरी उतराई करण्याची भावना नोकरशाहीत असायला हवी. ते कोणत्याही पदावर असले, तरी शेवटी जनतेचे नोकर आहेत, याचे सदैव भान त्यांनी ठेवायला हवे; परंतु दुर्दैवाने आज नोकरशाही इतकी निगरगट्ट आणि माजोरी झाली आहे, की मरणाऱ्या लोकांच्या टाळूवरचे लोणी खायलाही ते कमी करत नाही. या नोकरशाहीला वठणीवर आणायचे असेल, तर सरकार आणि सरकारचा प्रमुख ठामेठोक असायला हवे, परंतु तिथेही बोंबच आहे. मंत्रीच नोकरशाहीला हाताशी धरून भ्रष्टाचार करतात. एका ताटात जेवणाऱ्या नेते आणि अधिकाऱ्यांकडून लोकांनी काय अपेक्षा बाळगाव्या? खरे तर या देशाच्या संविधानाने सामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कायदे, नियम तयार केले आहेत, त्यांचे प्रामाणिकपणे पालन झाले, तरी अनेक पीडितांना सहज न्याय मिळू शकेल; परंतु हे कायदे, नियम बासनात गुंडाळून नोकरशाही आपली समांतर न्यायव्यवस्था चालविते आणि त्यात लाच दिल्याखेरीज कोणतेही काम होत नाही. वीज जोडणी हवी, द्या लाच; मारहाणीच्या विरोधात तक्रार करायची, द्या लाच; सातबारावर नोंदी करायच्या द्या लाच; या लोकांना लाच नव्हे लाथ घालायला हवी; परंतु ती हिंमत सामान्य माणूस दाखवू शकत नाही. त्यामुळेच शेवटी कंटाळून तो आपल्याच जीवाचे काही तरी बरेवाईट करतो. ही अनागोंदी संपविण्याचे काम निस्वार्थी, नि:स्पृह आणि धाडसी राजकीय नेतृत्वच करू शकते.
नुकतेच फडणवीस सरकारने 'लोकसेवा हक्क विधेयक'' या अधिवेशनात मांडले आहे; त्यामुळे या नोकरशाहीवर काही बंधने व अंकुश येईल अशी आशा करायला हरकत नाही; या कायद्याकरिता देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदनच करायला हवे.
-- प्रकाश पोहरे
प्रहार,रविवार, दि. 19 जुलै 2015
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
July 19, 2015
कवठ हा वृक्ष मूळचा दक्षिण भारतातला आहे. कवठ हा काटेरी व पानझडी प्रकारचा वृक्ष आहे. भारतासहीत पाकिस्तान, श्रीलंका, जावा, ब्रह्मदेश, बांगला देश इ. प्रदेशांत कवठाचे वृक्ष आढळतात. हे फळ दक्षिण महाराष्ट्रात खूप प्रमाणात आढळते. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात या वृक्षाची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात आहे. त्यामुळेच औदुंबर, नरसोबावाडी येथे मिळणारी प्रसिद्ध कवठ बर्फी दुसरीकडे मिळत नाही.
May 4, 2024
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे एकावन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग नऊ
ग्रंथकार किती सावध करत आहेत पहा. ते म्हणतात, एकट्याने बाहेर फिरायला जाताना विशेष काळजी घ्यावी. ते म्हणतात, पहाटेचा किंवा रात्रीचा अंधार पडलेला असताना आकाशात ढग जमून आले असताना, भर दुपारी सूर्य तळपत असताना, आवश्यकता भासल्यास मधे कुठे पाणी सुद्धा मिळण्याची शक्यता नाही, अशा रस्त्यावरुन, फार जलद गतीने किंवा एकदम धीम्या चालीने, शत्रुवृत्ती असलेल्या किंवा अनोळखी व्यक्ती समवेत, किंवा अधार्मिक व्यक्तीबरोबर, एकट्याने जाऊ नये. रुग्णाच्या घरी देखील जाताना सोबतीला बरोबर कोणीतरी न्यावा.
आजच्या काळात या सूचना किती आवश्यक वाटतात ना ! सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती सायंकाळी सुस्थितीत घरी परतेल, याची खात्री नसलेल्या बेभरवंशी काळात याची काळजी जास्तीच घ्यावी लागेल. अबल असलेल्या व्यक्तींना जास्त सावध रहावे लागते. ('अबला' म्हटलेलं नाही. ज्यांचे 'बल' कमी आहे, असे पुरुष देखील ! )
या व्यक्तींना नेहेमीच सोबत कुठुन मिळणार ? अशा वेळी मोबाईल कामास येतो. आपत्कालीन प्रसंगी, मोबाईल बंद असला तरी, बॅटरी संपली असली तरी, कुणाचा नंबर पाठ नसला तरी, एकट्याने, अनोळखी जागी, रात्रीच्या अथवा पहाटेच्या वेळी, सुनसान राहोंपर, एखाद्या रिक्शेतून प्रवास करताना, खोटंखोटं फोनवर बोलायची सवय करून ठेवायला काहीच हरकत नाही. आपण कोण आहोत, कुठे जात आहोत, याचा पत्ता एखाद्या प्रवासी वाहतुक करणाऱ्या चालकाला लागू देऊ नये, याउलट चातुर्याने असे बोलणे करावे की, चालकाला जरासुद्धा शंका येऊ देऊ नये, की आपण घाबरलेलो आहोत. दगाफटक्याची शंका येईल तेव्हा चुकुनसुद्धा चालकाकडे माझा मोबाईल बंद पडलाय, आपल्या मदतीला कुणीपण येणार नाही, हे समजू देऊ नका. एवढी समयसूचकता आपल्यात हवीच.
तरुण पिढीला तंत्रज्ञान माहिती आहे, पण समयसूचकता नाही, आणि जुन्या पिढीला अनुभवाने समयसूचकता प्राप्त झाली आहे, पण नवीन तंत्रज्ञान अवगत नाही.
आपल्यातील ड्राॅ बॅक आपणच शोधून काढले पाहिजेत, कारण ते आपल्यालाच माहिती असतात. स्मार्ट फोन वरील नवीन यंत्रणा जुन्या पिढीने शिकून घेतलीच पाहिजे. त्यातील गुगल मॅप, जीपीआरएस, इमर्जन्सी काॅल करणे, मेसेज टाकणे, या गोष्टी नवीन पिढीकडून शिकून घेतल्या पाहिजेत.
आपत्कालामधे केवळ एखाद्या व्यक्तीमुळेच प्राणभय असेल असे नाही तर क्षुद्र किटक, वा हिंस्त्र पशु पक्षी, नैसर्गिक आपत्ती यापासून देखील आपल्याला आपले जीवरक्षण करायचे असते.
यासाठी एखादे लहानसे शस्त्रदेखील आपल्याबरोबर असावे. अगदी लायटर, खिळा, टाचणीसुद्धा उपयोगी ठरू शकते. फक्त त्यावेळी ते नवीन पिढीला कसे वापरायचे ते सुचले पाहिजे. यासाठी जाणकार मंडळीबरोबर त्यांचा इतिहास जाणून घ्यावा. मनात त्याची रंगीत तालीमही करून ठेवावी.
पानीपतच्या लढाईत विश्वासराव हरवल्यानंतर माणसामाणसावरचा विश्वास कमी होत चाललाय. यासाठी आपण सावध रहाणे हे जास्त हिताचे असेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०९.०९.२०१७
September 9, 2017
मी उत्सुकतेपोटी या विषयावरचे बरेच काही वाचले आहे. काही ज्येष्ठ माहितगारांकडून माहितीही घेतली आहे. अगदी रुपरेषेच्या स्वरूपात थोडे लिहितो आहे.
हिंदू धर्मातील मृत्यूनंतरचे जीवन आणि मोक्षाची संकल्पना अन्य कुठल्याही संस्कृतीत इतकी परिपूर्णपणे मांडलेली नाही. यासाठी फक्त हिंदू धर्मामध्येच प्रचलित असलेल्या पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पंचमहाभूतांनी बनलेला मनुष्य देह, यासारख्या गोष्टी मान्य केल्याशिवाय पुढची सर्व वाटचाल ही अगम्यच राहते.
पण या गोष्टी मान्य केल्या तर मग जन्ममृत्यू साखळीतील एकही गोष्ट अगम्य ( unsolved ) रहात नाही.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याच्या उत्क्रांतीवादाच्या शोधाच्या हजारो वर्षे आधी हिंदूधर्माचे तत्वज्ञान हेच सांगते आहे. अगदी ढोबळमानाने एखाद्या एकपेशीय जीवापासून उत्क्रांती होत होत सजीव तयार झाले असा थोडक्यात सिद्धांत ! मग हिंदू धर्मातील तत्वज्ञान काय सांगते ? १ लक्ष ८४ हजार विविध जन्मांनंतर मनुष्य जन्म मिळतो. सप्तपाताळ, मानवलोक आणि सप्तस्वर्ग हे काय आहे ? डार्विनला फक्त देहाचीच उत्क्रांती सांगता आली. हिंदू धर्मात देहाबरोबरच त्याचे पूर्वकर्मफल, पापपुण्य अशा अनेक गोष्टींचा एकत्रित विचार केलेला आहे. पुढे संशोधनच झाले नाही म्हणून, नाहीतर १ लक्ष ८४ हजार वेळा recycle म्हणजे इतके विविध जन्म घेतल्यावरच मनुष्य तयार होतो या आकड्याचाही काही संबंध असू शकेल. मनुष्य जन्मानंतरच्या उत्क्रांतीबद्दल मात्र विज्ञानाला काही सांगता आलेले नाही.
पण आपल्या धर्माने मात्र पुढे भू:, भुव, महा, जन , तप आणि सत्य लोक / स्तर असे उत्क्रांतीचे टप्पेही सांगितलेले आहेत. तेथील कामकाजाची माहितीही दिली आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा देह( कोष ) गळून पडला तरीही प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, ज्ञानमय हे कोष तसेच राहून पुढे प्रगती करतात.मनुष्यदेहातील पाणी, वायू, अग्नी, आकाश या ऊर्जा (energy )असल्याने Law of Indestructibility of energy नुसार त्या नष्ट न होता अनंतात विलीन होतात म्हणजे एका मोठ्या कोषात ( Universal Reservoir ) खेचली जाते. शरीराचे material जळून पुन्हा ते अनेक materials मध्य रूपांतरित होते.
या बद्दलची अनेक पुस्तके माझ्याकडे आहेत. असेच एका पुस्तक म्हणजे - - -मेटा सायन्सचे श्री. जॉर्ज मिक यांनी लिहिलेले " आफ्टर वुई डाय व्हॉट देन ?" नावाचे एक पुस्तक ! त्याचा मराठी अनुवाद ( " मृत्यूनंतर होते तरी काय? अनुवाद- पद्मा कुलकर्णी) पुण्याच्या प्रसाद प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. त्यात मिक यांनी या विषयावर जगभर केल्या गेलेल्या शेकडो वैज्ञानिक प्रयोगांची माहिती दिली आहे.यात आत्म्याची छयाचित्रेही दिली असून त्यात हिंदू तत्वज्ञानाचा पुसटसा उल्लेखही केलेला नसला तरी त्यांची सर्व अनुमाने ही हिंदू धर्मांतील या बाबतीमधील सर्वच्या सर्व १०० टक्के खऱ्या आहेत यावर शिक्कामोर्तब करतात.
ज्या ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्मच नाही तो धर्म मानणारे शास्त्रज्ञ मात्र या विषयावर संशोधन करायला कचरत नाहीत. पण आपल्याकडे मात्र या सर्व गोष्टी भंपकपणा, अवैज्ञानिक, अंधश्रद्धा म्हणून आधीच फेटाळल्या जातात. असो.
(यात मी फक्त तत्वज्ञानासंदर्भात थोडेसे लिहिले असून कर्मकांडे, विधी, प्रचलित चालीरीती, त्यांची योग्य-अयोग्यता याबद्दल काहीही लिहिले नाही)
(हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावा.)
-- मकरंद करंदीकर
September 19, 2017
cholesterol
February 25, 2019
होय आता ते अगदी शक्य आहे !
सात दिवसासाठी काही नियम
सतत उकळून आटविलेले गरम पाणीच प्यावे. शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यासाठी ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
आहारामध्ये चवीनुसार आले, पुदिना, लसुन, काळे मिरे, धने, जिरे लिंबु यांचा भरपुर वापर करावा.
या शिवाय त्रिफळा पावडर, चित्रक, नागरमोथा, मुलतानी माती, कुळीथ, वावडींग, अर्जुन, सारिवा, मंजिष्ठा यां पावडरचे मिश्रण करुन कोरडे पावडर अंगावर घासणे म्हणजे उद्वर्तन होय. या पावडरच्या मालीश ने वजन कमी होताना त्वचेवर होणारे दुष्परीणाम कमी होतात. नियमित मालिशने त्वचेवर सुरकुत्या पडत नाही, त्वचेचा टोन टिकुन राहतो, त्वचेचा रंग उजळ्तो. दररोज आंघोळीच्या वेळेस या पावडरची अंगावर ३० मिनिटापर्यंत मालिश करावी.
रात्रीचा आहार सुर्यास्तापुर्वी घेण्याचा काटेकोर प्रयत्न करावा
खालील आहार वेळापत्रकासोबत नियमित वेळेस कमी साखरेचा चहा, दुध, कॉफी घेऊ शकता.
दिवस पहिला :- पाचक आहार जवळपास सर्वांना सोमवार ते रविवार पर्यंत एखाद्या तरी उपवासाची सवय असते. दिवसभर उपाशी राहणे, रात्री एकदा जेवण करणे अशी सर्वसाधारण आपली पध्दत असते. त्याच पध्दतीने आमच्या वेळापत्रकानुसार व आयुर्वेदानुसार पहिल्या दिवशी आपणास दिवसभर फक्त ताज्या दह्याचे ताक पिऊन राहायचे आहे, ताक पातळ असावे, चांगले घुसळून लोणी काढून घ्यावे. ताकामध्ये लसुन, आद्रक, पोदीना, काळेमिठ हे चरबीचे शोषण करणारे व अन्नाचे पाचन करणारी औषधी द्रव्ये योग्य मात्रेत घालावीत, याच पध्दतीने २ थेंब तेल, कडीपत्त्ता, कोथींबीर , हिरवी मिर्ची, लसुन यांची फोडणी दिऊन बनविलेला मठ्ठा देखील चालतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ८ ते १० ग्लास या प्रमाणात आपण ताक किंवा मठ्ठा घेऊ शकता. रात्री मात्र आपण विनातेल तुपाची एक किंवा अर्धी भाकरी - चपाती व हळद-बेसन, लसुन -आद्रक घालुन बनविलेली पातळ दह्याची कढी दोन वाटी या प्रमाणात घ्यावे. आहे ना गंमत उपाशी राहणे ही नाही व पोटभरुन खाणे ही नाही.
दिवस दुसरा:- व्हिजीटेबल डायट दुसऱ्या दिवशी आपणास पालेभाज्यांचे रस किंवा सुप्स घ्यायचे आहे. पालक सुप, टोमॅटो सुप, गाजर रस, पत्तागोभी रस, बीट ज्युस, कद्दु किंवा काकडीचे रस सकाळ पासून संध्याकाळपर्यंत पोट भरुन घेऊ शकता. मात्र पालेभाज्या वाफवुनच त्यांचे सुप बनवावे किंवा रस काढावे. दुसरे महत्त्वाचे प्रत्येक रस किंवा सुप मध्ये पोदीना, आद्रक, लसुन, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीदाना, धने, जिरे, मोहरी आवश्यकते नुसार भरपुर प्रमाणात घ्यावी. रात्री भुक लागल्यास एक-दिड वाटी भात व आद्रक- लसुन घालुन बनविलेले पातळ मुगाचे किंवा तुरीचे वरण घेऊ शकता.
दिवस तिसरा:- फ्रुट डायट ताजी गोड फळे किंवा फळांचा रस. सफरचंद, डाळींब, संत्रा, मोसंबी, टरबुज, पपई ही फळे आपण पोटभरुन खाऊ शकता. आयुर्वेदिक नियमाप्रमाणे फळावर काळेमिरे पावडर घेण्याचे विसरु नका. मध्यंतरी भुक लागल्याची संवेदना झाल्यास नारळ पाणी प्यावे, किंवा बिनासाखरेचे लिंबु पाणी व काळे मीठ प्यावे. यामुळे भुक कमी होते व शरीरात उर्जा टिकून राहते.
सरासरी तिसरया दिवशी शरीरात हल्के पणा जाणवु लागतो, सुस्ती-आळस कमी होतो, उत्साह वाढतो. वजन दिड ते दोन किलो ने कमी झालेले जाणवायला लागते.
दिवस चौथा:- प्रोटिन डायट. सकाळी --- मांसाहारी असाल तर पिवळा भाग काढून एक उकडलेले अंडे, किंवा १ वाटी वाफवलेले मोड आलेले मुग किंवा मटकी, सोयाबीन किंवा चने सोबत चवीनुसार आद्रक, लसुन, मेथीदाना , कडीपत्त्ता, कोथीबीर, धने, जीरे.
दुपारी :- उकडलेले मुग किंवा मुग-तुरीचे पातळ वरण
संध्याकाळी :- एक ते दोन वाटी मुगाचे घट्ट वरण
दिवस पाचवा:- फळभाज्या कॉम्बी डायट सकाळी :- पोट भरुन कोशींबीर. आद्रक, लसुन, पोदिना, काळेमिरे पावडर घ्यायला विसरु नका.
दुपारी :- सफरचंद, अननस, पपई, टरबुज, डाळींब, संत्रा यापैकी कोणतेही एक ताजे गोड फळ किंवा नारळ पाणी. किंवा अननस ज्युस. पण साखर नको.
संध्याकाळी :- भरपुर पालेभाज्या-मुग डाळ - तांदुळ, लसुन , आद्रक घालुन बनविलेली एक वाटी खिचडी व सोबत दोन वाटी लसुन , आद्रक घालुन बनविलेली पातळ कढी .
आज बघा आपले २ ते ३ किलो वजन सहज कमी झालेले दिसून येइल. कपडयांची फिटींग सैल झाली आहे हे लक्षात येईल.
दिवस सहावा:- ग्रीन ब्लड डायट सकाळी :- एक कप बिनासाखरेचे गोड दुध, दुधामध्ये आद्रक-हळद-तुळस घालून उकळून प्यावे. सोबत २-३ मारी बिस्किट घेऊ शकता.
दुपारी : - वाफवलेल्या पालेभाज्यांचा रस
संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप किंवा एक ज्वारीची पातळ भाकरी व एक वाटी मुगाचे किंवा तुरीचे पातळ वरण खावे.
दिवस सातवा:- प्रोटिन व्हिजिटेबल डायट सकाळी :- सोललेल्या मुगाचे घट्ट वरण १-२ वाटी त्यास दोन थेंब तेलाची, मोहरी-आद्रक-लसुनाचीघालुन बनविलेली पातळ कढी .
संध्याकाळी :- पालेभाज्यांचे सुप
सात दिवस संपले आठव्या दिवशी सकाळी आपले वजन बघा.
या पध्दतीने वजन कमी केल्यानंतर आपला चेहरा आकर्षक, शरीर साचेबध्द दिसेल. शरीरातील सुस्ती, मरगळ, आळस निघून जाईल. नियोजित पार्टी मध्ये आपणच आकर्षण राहाल. कोठेही उपाशी राहायचे नाही , तेल-भातासारखे पदार्थ बंद करायचे नाही, आयुर्वेदाचे आहाराबद्दल सर्व नियम पाळायचे मग निश्चितच तुमचे वजन कमी होईल. शरीराची प्रोटिन, क्यॉलशियम, लोहाची ही गरज भागते अन वजनही सहज कमी होते, दुष्परीणाम ही काही होत नाही.
* संजीव वेलणकर पुणे.*
९४२२३०१७३३
संदर्भ. डॉ. पवन एस. लड्डा
September 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti