वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रंगवल्ली या संस्कृत शब्दापासून झालेले रुपांतर म्हणजे रांगोळी होय. भारतीयांचा कोणताही सण अथवा धार्मिक कार्य असो, दारापुढे रांगोळी काढण्याचा प्रघात पूर्वी पासून चालत आलेला आहे. रांगोळी काढल्यानंतर धार्मिक विधीला आरंभ होतो.
दक्षिण भारतात अगदी रोज, तर बर्याच ठिकाणी सणासुदीला अंगणात अथवा दरवाज्यासमोर स्त्रिया रांगोळी काढतात. रांगोळी ही एक कला असून त्यासाठी निरनिराळ्या रंगांचा उपयोग केला जातो. फुलांची व धान्यांचीही रांगोळी काढली जाते.
चैत्र महिन्यात अंगणात एक कोपरा शेणाने सारवून त्यावर विविध प्रकारच्या चिंन्हांनी रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू व फुले वाहतात. रांगोळी काढल्यामुळे आपल्या वास्तूत सतत लक्ष्मीचा प्रवेश होतो ही त्यामागील भावना असते.
देवाच्या मुर्तीत प्राणप्रतिष्ठेच्या रुपाने मंत्रशक्तीचा वास असतो. यासाठी देवाच्या मस्तकावर वासाची फुले वाहिली जातात. मंत्रशक्तीचे उत्सर्जन त्या फुलांतून होत असते.
देवांना फुले अतिशय प्रिय असतात. गणेशाला तांबडे फूल, शिवाला पांढरे फुल, विष्णूला पिवळे फूल आणि ब्रम्हाला कमळाचे फूल वाहण्याचा प्रघात आहे.
फुलांचे हार करुन ते देवांच्या तसेच संत, महंत व विद्वानांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात घातले जातात.
स्त्रिया आपल्या केसांच्या वेणीत फुलांचा गजरा करुन माळतात.
फुलांपासून निरनिराळ्या प्रकारची अत्तरे बनवतात. त्या अत्तराचे थेंब कपड्यावर टाकल्यास त्यांच्या वासाने मन प्रसन्न होऊन शरीर उत्तेजित होते.
फुलपुडी
अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी .... !!!!
पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर !
पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत ...पिवळे नगर
पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ....पिवळा शृंगार !
पिवळे राजे तुम्ही ...पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा
विशाल शंकर ढवळा... विशाल शंकर ढवळा ,त्याहुनी तू पिवळा //१//
पिवळी बाणा बाई धनगरीण बाळ, धनगरीण बाळ
पिवळ्या घोड्यावरी बससी मैराळ !
चारी वाद्ये वाजती देवांच्या सकळा देवांच्या सकळा
दासी झाल्या मुरळ्या ..दासी झाल्या मुरळ्या
भोगिसी त्या सकळा !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा ....
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा , त्याहुनी तू पिवळा //२//
चंपाषष्ठी चा कुळधर्म केला ...कुळधर्म केला
पिवळ्या पुरणाची ..पिवळ्या पुरणाची आरती देवाला
रोग्याने सेवा केली त्यावरी सकळा ...त्यावरी सकळा ,
त्यावरी कृपा केली... त्यावरी कृपा केली ...पिवळ्या मैराळा
जयदेव जयदेव ..जयशिव मैराळा ,जयशिव मैराळा
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा ...त्याहुनी तू पिवळा //४//
सदानंदाचा येळकोट !!!
येळकोट येळकोट ...जय मल्हार !!!
-- चिंतामणी कारखानीस
सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे.
क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील हेतू असतो.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्तीच्या खाली अक्षता ठेवूनच मूर्तीची स्थापना केली जाते. कारण मूर्तीचा क्षय होऊ नये.
झोपताना उशीच्या खाली चारसहा अक्षता पुडीत बांधून ठेवल्यास झोप शांत लागते. अणि चित्त, मन व बुध्दी स्थिर राहुन त्याला बाधा येत नाही.
ओंकाराच्या आज्ञेनुसार ब्रम्हदेवाने अक्षतांची निर्मिती केली त्यामुळे प्रसन्न होऊन सर्व मंगलकार्यात अक्षतांना प्राधान्य दिले जाईल असा वर ओंकाराने ब्रम्हाला दिला अशी कथा पुराणात असल्यामुळे अक्षतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्त्री-पुरुषांचे भाळी कुंकूम तिलकावरही अक्षता लावल्या जातात ज्यायोगे त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त व्हावे.
परवा फेस बुक वरील माझ्या एका मित्राने समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख "नारायण ठोसर" असा एकेरी केला. मुद्दा वादाचा जरी होता तरी त्यात समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख अशा प्रकारे आल्याने मी फार व्यथित झालो. समर्थ कुठल्याही जातीच्या पलीकडले व्यक्तिमत्व होते, नव्हे ते तर प्रत्यक्ष हनुमान स्वरूप होते. ते ब्राम्हण जातीत जन्माला आले किंवा त्यांचा उल्लेख शिवरायांचे गुरु म्हणून इतिहासात आला आहे यावर कुणाचाही आक्षेप असू शकतो. परंतु त्यांनी केलेल्या दासबोधाची निर्मिती हि एक दैवी चमत्कार असलेली निर्मिती आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. मी दासबोधाचा नियमित वाचक आणि अभ्यासक आहे. अमृतानुभव जितका मला प्रिय आहे तितकाच दासबोध आणि तुकारामांची गाथा मला प्रिय आहे.
समर्थ जन्मताच "परामानस विद्या" ज्याला इंग्रजीत " Advanced Psychology " असे म्हणतात त्यात पारंगत होते. दासबोध हा त्यांचा ग्रंथ ३५० वर्षापूर्वीचा Advanced Psychology चाच ग्रंथ आहे.
समर्थांनी लिहिलेल्या आरत्या आणि स्त्रोत्र हि आजही घरोघरी गायली जातात. समर्थ देश भर फिरले, निबिड अरण्यात त्यांनी गुहेत बसून तपस्या केली. ग्रंथ निर्मिती केली. समर्थांचे आयुष्य वादातीत होते.
मी काही दिवस समर्थांच्या वर लिहिण्याचे ठरवले आहे. सुरवात करताना त्यांनी लिहिलेल्या "चातुर्य लक्षणा"पासून करणार आहे.
उच्च नीच जातीत जन्मणे हे कुणाच्याही हातात नसते. शरीराचे सुंदर दिसणे अथवा कुरूप पणा हा सुद्धा निसर्गदत्त असतो. पण म्हणून लोकांनी जाणीव पूर्वक काही 'गुण' धारण करावे असे समर्थ म्हणतात. या गुणांना समर्थ "आगंतुक गुण" असे म्हणतात.
समास सहावा : चातुर्यलक्षण || १४.६ ||
॥श्रीराम॥
रूप लावण्य अभ्यासितां नये | सहजगुणास न
चले उपाये | कांहीं तरी धरावी सोये | अगांतुक गुणाची ||१||
काळें माणुंस गोरें होयेना | वनाळास येत्न चालेना |
मुक्यास वाचा फुटेना | हा सहजगुण ||२||
आंधळें डोळस होयेना | बधिर तें ऐकेना |
पांगुळ पाये घेइना | हा सहजगुण ||३||
कुरूपतेचीं लक्षणें | किती म्हणोनि सांगणें |
रूप लावण्य याकारणें | पालटेना ||४||
अवगुण सोडितां जाती | उत्तम गुण अभासितां येती |
कुविद्या सांडून सिकती | शाहाणे विद्या ||५||
मूर्खपण सांडितां जातें | शाहाणपण सिकतां येतें |
कारबार करितां उमजतें | सकळ कांहीं ||६||
मान्यता आवडे जीवीं | तरी कां उपेक्षा करावी |
चातुर्येंविण उंच पदवी | कदापी नाहीं ||७||
ऐसी प्रचित येते मना | तरी कां स्वहित कराना |
सन्मार्गें चालतां जनां | सज्जना माने ||८||
देहे नेटकें श्रुंघारिलें | परी चातुर्येंविण नासलें |
गुणेंविण साजिरें केलें | बाष्कळ जैसें ||९||
अंतर्कळा श्रुंघारावी | नानापरी उमजवावी |
संपदा मेळऊन भोगावी | सावकास ||१०||
प्रेत्न करीना सिकेना | शरीर तेंहि कष्टविना |
उत्तम गुण घेईना | सदाकोपी ||११||
आपण दुसऱ्यास करावें | तें उसिणें सवेंचि
घ्यावें | जना कष्टवितां कष्टावें | लागेल बहु ||१२||
न्यायें वर्तेल तो शाहाणा | अन्याइ तो दैन्यवाणा |
नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||
जें बहुतांस मानलें | तें बहुतीं मान्य केलें |
येर तें वेर्थचि गेलें | जगनिंद्य ||१४||
लोक आपणासि वोळावे | किंवा आवघेच कोंसळावे |
आपणास समाधान फावे | ऐसें करावें ||१५||
समाधानें समाधान वाढे | मित्रिनें मित्रि जोडे |
मोडितां क्षणमात्रें मोडे | बरेपण ||१६||
अहो कांहो अरे कां रे | जनीं ऐकिजेतें किं रे |
कळत असतांच कां रे | निकामीपण ||१७||
चातुर्यें श्रुंघारे अंतर | वस्त्रें श्रुंघारे शरीर |
दोहिमधें कोण थोर | बरें पाहा ||१८||
बाह्याकार श्रुंगारिलें | तेणें लोकांच्या हातासि काये
आलें | चातुर्यें बहुतांसी रक्षिलें | नाना प्रकारें ||१९||
बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
समस्तीं बरें म्हणावें | ऐसी वासना ||२०||
तनें मनें झिजावें | तेणें भले म्हणोन घ्यावें |
उगेंचि कल्पितां सिणावें | लागेल पुढें ||२१||
लोकीं कार्यभाग आडे | तो कार्यभाग जेथें घडे |
लोक सहजचि वोढे | कामासाठीं ||२२||
म्हणोन दुसर्यास सुखी करावें | तेणें आपण सुखी व्हावें |
दुसऱ्यास कष्टवितां कष्टावें | लागेल स्वयें ||२३||
हें तों प्रगटचि आहे | पाहिल्याविण कामा नये |
समजणें हा उपाये | प्राणीमात्रांसी ||२४||
समजले आणी वर्तले | तेचि भाग्यपुरुष जाले |
यावेगळे उरले | तें करंटे पुरुष ||२५||
जितुका व्याप तितुकें वैभव | वैभवासारिखा हावभाव |
समजले पाहिजे उपाव | प्रगटचि आहे ||२६||
आळसें कार्येभाग नासतो | साक्षेप होत होत होतो |
दिसते गोष्टी कळेना तो | शाहाणा कैसा ||२७||
मैत्रि करितां होतें कृत्य | वैर करितां होतो मृत्य |
बोलिलें हें सत्य किं असत्य | वोळखावें ||२८||
आपणास शाहाणें करूं नेणें | आपलें हित आपण
नेणें | जनीं मित्रि राखों नेणे | वैर करी ||२९||
ऐसे प्रकारीचे जन | त्यास म्हणावें अज्ञान |
तयापासीं समाधान | कोण पावे ||३०||
आपण येकायेकी येकला | सृष्टींत भांडत चालिला |
बहुतांमध्यें येकल्याला | येश कैंचें ||३१||
बहुतांचे मुखी उरावें | बहुतांचे अंतरीं भरावें |
उत्तम गुणीं विवरावें | प्राणीमात्रांसी ||३२||
शाहाणे करावे जन | पतित करावे पावन |
सृष्टिमधें भगवद्भजन | वाढवावें ||३३||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चातुर्यलक्षणनाम समास सहावा || १४.६ ||
-- चिंतामणी कारखानीस
देवपूजेचे वेळी देवापुढे नागवेलीची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न, मुंज आदी मंगलकार्यप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे.
नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात. देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक म्हणून समजले जाते. हे पान हिरवेगार असून मनाला अल्हाद देणारे असते. विड्याच्या पानाला त्यात सुपारी व कात टाकून तो विडा भोजनानंतर मुखशुध्दिसाठी खाल्ला जातो. कारण विडा हा वातहारक व जंतनाशक असतो.
सुपारी ही मांगल्याचे व प्रेमभावाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे अखंड सुपारी ही गणपती देवाची प्रतिमा समजून तिची पूजा करतात.
पत्निचे देहावसान झाले असता पती आपल्या कनवटीला सुपारी लावून धार्मिक कृत्य करतो. कारण सुपारी ही त्याची प्रतिधिनिक स्वरुपातील पत्नी मानली जाते.
सुपारीचे अनेक प्रकार आहेत त्यांपैकी मसालेदार सुपारी ही सर्वांना आवडते. सुपारी चघळण्यामुळे लाळ रस उत्पन्न होतो.
एखाद्याच्या वर प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात पण त्यासाठी जशी त्याची भक्ती कारणीभूत असते तशी त्याचे पूर्व सुकृत सुद्धा जबाबदार असते. समर्थांच्या बाबतीत त्याचे पूर्व सुकृत प्रचंड होते. त्यांच्या आधीच्या २१ पिढ्या रामाची उपासना करीत होत्या. २१ पिढ्या गेल्यावर प्रत्यक्ष हनुमान त्यांच्या रूपाने पुन्हा रामनामाचा प्रचार करण्यासाठी त्याच्या कुळात प्रगट झाला. अशा या परम पावन कुळात, राम नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता, जांब या गावात समर्थांचा जन्म झाला. समर्थांच्या रूपाने प्रत्यक्ष हनुमानानेच जणु पुन्हा मानव देह धारण केला. लहानपणापासून वैराग्य वृत्तीचे समर्थ प्रपंचाबद्दल उदासीन होते.
कुठेतरी आडगळीत एकांती बसावे आणि चिंतन करावे असा दिनक्रम चालू असताना एके दिवशी त्यांच्या आईने त्यांना विचारले-बाळ आडगळीत काय करतो आहेस ? समर्थांनी उत्तर दिले "आई, चिंता करतोय विश्वाची". लहानपणापासून त्यांनी विश्वाची चिंता केली आणि ती चिंता सर्वव्यापी होती.
मुलाने प्रपंच करावा म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या लग्नाचा घाट घातला. समर्थांना प्रपंचात गुंतून राहणे मान्य नव्हते. त्यांनी लग्नाचा मंडप दारात उभा राहत असलेला पाहीला आणि सरळ कुणालाही न सांगता नाशिक जवळील टाकली हे गाव गाठले. (पळून गेले नाहीत ....पण आईला न सांगता गेले ) प्रभू रामचंद्र आणि सीता माई या शिवाय आता कुणीही नाही आणि विश्वाची चिंता कार्यवाहित आणायची तर आपण संसारात आडकणे योग्य नाही म्हणून संसार बंधनात त्यांनी स्वतःला गुंतून ठेवले नाही. समर्थांनी टाकली येथे घोर अनुष्ठान केले. उपासनेशिवाय सामर्थ्य नाही आणि सामार्थ्याशिवाय लोकोद्धार नाही हे त्यांनी जाणिले .
"राम तुज कारणे, जिवलगांचा संग सोडला ...! असे म्हणत त्यांनी १२ वर्षे घोर तप केले. उग्र अनुष्ठान केले. श्री राम प्रभूंनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा जन्म कृतकृत्य झाला. खरे तर प्रभूंच्या दर्शनाने त्यांचा मानव जन्म सफल झाला होता. करायचे असे काहीही राहिले नव्हते परंतु खुद्द हनुमानाने घेतलेले हे मानव रूप काही तरी विशेष करण्यासाठीच होते.
समर्थ प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाल्यावर संपूर्ण देशभर फिरले. अफगाणिस्थान ..पाकिस्थान ...नेपाळ...भूतान या आजच्या देशात समर्थ गेले होते. हिमालयापासून लंकेपर्यंत त्यांनी भ्रमण केले. लोकांचे दुखः पाहीले. धर्माचा ऱ्हास अनुभवला. आणि यवनांच्या अत्याचाराची त्यांना कल्पना आली.
समर्थांनी आपल्या सामर्थ्य बळाने अखिल राष्ट्र संघटीत केले.
-- चिंतामणी कारखानीस
देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर साखरफुटाणे, पेढे, खोबरे, फळे आदी पदार्थ भाविकांना वाटले जातात. त्याला देवाचा प्रसाद अशी संज्ञा आहे.
प्र म्हणजे पुढे, साद म्हणजे हाक मारणे. प्रसाद ग्रहणामागे देवाला `आमचे जीवन पुढे ने' अशी सुप्तपणे मारलेली हाक असते. या प्रसादामध्ये देवाची कृपादृष्टी असल्यामुळे तो श्रध्देने खाल्ला असता समाधान प्राप्त होते.
देवाला पंचामृताचे स्नान घातल्यानंतर ताम्हणात जे पंचामृताचे पाणी सांडते त्याला तीर्थ म्हणतात. कारण त्याला तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त झालेले असते. हे तीर्थ प्राशन केले असता तीर्थक्षेत्राचे पुण्य माणसाला लाभते. तीर्थ याचा अर्थ असा की जे तारते ते तीर्थ. म्हणूनच देवाची आरती झाल्यावर तीर्थप्रसाद देण्याचा प्रघात पूर्वापार चालत आला आहे.
रंगवल्ली या संस्कृत शब्दापासून झालेले रुपांतर म्हणजे रांगोळी होय. भारतीयांचा कोणताही सण अथवा धार्मिक कार्य असो, दारापुढे रांगोळी काढण्याचा प्रघात पूर्वी पासून चालत आलेला आहे. रांगोळी काढल्यानंतर धार्मिक विधीला आरंभ होतो.
दक्षिण भारतात अगदी रोज, तर बर्याच ठिकाणी सणासुदीला अंगणात अथवा दरवाज्यासमोर स्त्रिया रांगोळी काढतात. रांगोळी ही एक कला असून त्यासाठी निरनिराळ्या रंगांचा उपयोग केला जातो. फुलांची व धान्यांचीही रांगोळी काढली जाते.
चैत्र महिन्यात अंगणात एक कोपरा शेणाने सारवून त्यावर विविध प्रकारच्या चिंन्हांनी रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू व फुले वाहतात. रांगोळी काढल्यामुळे आपल्या वास्तूत सतत लक्ष्मीचा प्रवेश होतो ही त्यामागील भावना असते.
समर्थांनी शिवथर घळीत त्याचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. दासबोधा शिवाय समर्थांनी निर्माण केलेले वाङ्मय प्रचंड आहे . या शिवथर घळीचे महात्म खूप मोठे आहे. महाड- भोर रस्त्यावर माजेरी हे गाव लागते. त्या गावा पासून ४ मैलावर शिवथर घळ आहे. समर्थांनी या ठिकाणी वाङ्मय निर्मिती केली.दासबोध लिहिला गेला. महाराष्ट्रात दोन ठिकाणे अशी आहेत कि तिथे कंपास दक्षिण -उत्तर दिशा दाखवत नाही.शिवथर घळ आणि ठाणे जिल्ह्यातील गणेश पुरी जवळ तुंगारेश्वर पर्वतावर एक प्रचंड मोठी पांडव कालीन शिळा आहे तिथे कंपास दिशा दाखवत नाही.गणेश पुरी येथील नित्यानंद स्वामी त्याठिकाणी एकांतात बसायचे.आता श्री सदानंद स्वामी त्याठिकाणी ध्यान धारणा करतात.
दासबोधा शिवाय त्यांनी करुणाष्टके, मनाचे श्लोक ,आनंदवनभुवनी, आनंदवनभुवनम् (संस्कृत) आत्माराम अंतर्भाव,सार्थ अंतर्भाव,चत्वारमान, जनस्वभावगोसावी ,जुनाटपुरुष, पंचसमासी, पंचीकरणयोग,पूर्वारंभ, बाग प्रकरण,कारखाने प्रकरण,मनोबोध ,मान पंचक , षड्रिपुनिरुपण ,सवाया, समर्थ-वेण्णास्वामी संवाद, समर्थ- कल्याणस्वामी संवाद, समर्थ- केशवस्वामी संवाद, सार्थ भीमरूपी स्तोत्र, श्री सूर्यस्तुती, गुरुगीता, अशी अनेक स्त्रोत्र , कवने आणि आरत्यांची निर्मिती केली .
चिंतामणी कारखानीस
Copyright © 2025 | Marathisrushti