वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाण्याची शुद्धाशुद्धता
पाणी जसे मिळते तसेच जर वापरले तर ते प्रमेहाचे कारण आहे, असे सांगितले आहे.
त्यासाठी शास्त्रकार ग्राम्य उदक असा शब्द वापरतात. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी सोडून अन्य सर्व प्रकारच्या पाण्यात दोष असतात. दोष फक्त नलोदकात असतात, असे नाही.
अनेक आजार अशुद्ध पाणी पिऊन होत असतात, हे केवळ आधुनिक विज्ञान सांगते असे नाही तर, अतिप्राचीन आयुर्वेदात देखील, ज्या काळात दुर्बीणी, सूक्ष्मदर्शित्रे बहुधा नव्हती,( असं आपणाला आज वाटतं. ) त्या काळात आज न सांगितले गेलेले व्याधी पण सांगितले आहेत, हे नवल !
एवढेच नव्हे तर प्रदेशानुसार पाण्याचे गुण आणि दोषही सांगितलेले आहेत. जसे पश्चिमेकडे असणाऱ्या अरबी समुद्राच्या दिशेत वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी हितकर असते, पण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी दोषयुक्त असते. ज्या नद्यांचे पाणी खळाळत वाहाणारे, दगडांवर आपटत इकडेतिकडे तुषार उडवित येणारे असते, ते पाणी पचायला हलके असते.
याउलट ज्या प्रदेशातील नद्या संथ वाहातात, पाणी हलताना पण दिसत नाही, अश्या नद्यांचे पाणी पिऊ नये. विषयाची व्याप्ती अधिक होऊ नये यासाठी हे फक्त माहितीसाठी सांगतो.
पाणी शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखावे या विषयी ग्रंथकार म्हणतात, जे पाणी साठवण्यासाठी दगडाचे कुंड किंवा डोणी असेल तर चांगले. किंवा दगडाच्या खोलगट भागात साठलेले पावसाचे पाणी उत्तम असते.
पण पहिल्या पावसाचे पाणी नकोच, असेही शास्त्रकार सांगायला विसरत नाहीत. त्यात वातावरणातील अशुद्धी जास्त प्रमाणात असतात. पहिले एक दोन पाऊस पडून गेल्यावर म्हणजे पाऊस चांगला सुरू झाल्यावर वातावरणातील दोष कमी होत जातात. पाण्यानेच ते धुवुन टाकले जातात.
सकाळी पाणी भरावे. दिवसभर वापरावे आणि सायंकाळी संपवून टाकावे. सूर्य असेपर्यंत पाण्यात दोष निर्माण होण्याचे प्रमाण कमी असते. नंतर मात्र त्यात जंतुसंसर्गामुळे दोष निर्माण होतात.
स्वच्छ वस्त्राने गाळून घेतलेले, सोन्याच्या वा मातीच्या किंवा काचेच्या पात्रात जमवलेले पाणी चांगले. तांब्याच्या किंवा पितळीच्या कल्हई केलेल्या भांड्यात पाणी ठेवलेले असेल तर त्यातील अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव मरतात, असे आजचे एक संशोधन सांगते.
पण तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवणे आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी वापरणे चुक आहे. ते पाणी कळकते. पाण्याची चव पण बदलते.त्या पाण्यावर सूर्य किरणे पोचत नाहीत अश्या पाण्याने व्याधी वाढतात.
आजचे वाॅटर प्युरीफायर किती भरवंशाचे आहेत, हे सांगता येत नाही.
आजच्या जाहिरीतीच्या जमान्यात सचीन सांगतोय ते बरोबर कि हेमामालीनी ? कोणावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे.
धातुंचा पाण्याबरोबर संयोग होतो. साहचर्याचा परिणाम म्हणून ज्या धातुच्या भांड्यात पाणी ठेवणार, भले पाणी उकळले नसेलही, त्या धातुचे गुण अवगुण पाण्यात उतरणार हे नक्की आहे.
बरं आमच्या घरात लोखंडी नळात रात्रभर साठून रहाणारे आणि प्लॅस्टिकच्या टाकित साठवलेले पाणी तर आम्ही टाळू शकतच नाही.
आता आली का पंचाईत !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.12.2016
आनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे.
भारतीय संस्कृतीत मानल्या गेलेल्या चार पुरुषार्थांपैकी एक. बहुतेकांसाठी इतर तिघांच्या तुलनेत थोडासा दुर्लक्षित तर काहींसाठी (विनाकारणच) वर्ज्य असलेला असा हा विषय.
सतत पाऊस असल्याने कपडे वाळविण्यापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कित्येकांच्या तर घरांच्या भिंतींवर बारीक बुरशी वाढू लागली असेल. ही बुरशी जशी पावसाळ्यात भिंतीवर येते तशीच माणसाच्या त्वचेवर सुद्धा येते. ओले कपडे सतत घालण्यात आल्याने. मग ‘दाग, खाज, खुजली’ अशा जाहिरातीसुद्धा सुरू होतात आणि वेगवेगळी बुरशी मारण्याची औषधे जशी भिंतीवर मारली जातात तशीच त्वचेवरही लावली जातात. काहींना यांनी तत्काळ आराम मिळतोही. मात्र काहींचा हा त्वचारोग काही केल्या जात नाही. त्याचे कारण त्यांच्या शरीरावरील बाह्य़ ओलीमध्ये दडलेले नसून शरीराच्या आतील ओलीत दडलेले असते. याला आयुर्वेदीय शास्त्रीय भाषेत ‘क्लेद’ असे म्हणतात. हा क्लेद वाढला की त्वचारोग वाढतात.
दही, ब्रेड (पाव), इडली, डोसा, आंबवलेले पदार्थ हे सर्वच रोज आहारात आले की क्लेद वाढवतात. थोडेसे बारकाईने पाहिलेत तर जाणवेल की हे सर्वच आंबवलेले पदार्थ अथवा बेकरीचे पदार्थ एक रात्र संस्कार झाल्याशिवाय बनत नाहीत. म्हणजे आंबविल्याशिवाय बनत नाहीत, म्हणजेच प्राकृत बुरशीचा प्रकार (यीस्ट) शिवाय यांचे फर्मेन्टेशन होत नाही. मग हे शरीरामध्ये जाऊन स्वत:च्या गुणांची वाढ करतात. कारण आपण जसे खाणार तसेच होणार. मग यामुळे शरीरातील क्लेद हळूहळू वाढू लागतो व हा क्लेद बाह्य़ बुरशीचे पोषण करतो. त्यामुळे या लोकांचे बुरशीजन्य त्वचाविकार लवकर बरे होत नाहीत. मग ते कित्येक त्वचारोग तज्ज्ञांना दाखवितात, कित्येक वर्षे औषधे घेतात; पण जोपर्यंत हा क्लेद कमी होणार नाही तोपर्यंत हा आजार बरा होणार नाही, असे आयुर्वेदाचे ठाम मत आहे. कारण एखाद्या साठलेल्या पाण्यावर जीवजंतू वाढत असतील तर नुसते त्या जीवजंतूंची परीक्षणे करून, महागडय़ा तपासण्या करून, औषध फवारणी करणे म्हणजे चिकित्सा करणे नव्हे. ते साठलेले पाणी काढून टाकणे व परत साठणार नाही अशी व्यवस्था करणे, ही त्याची खरी चिकित्सा होय. यालाच आयुर्वेदीय परिभाषेत पंचकर्म करणे असे म्हणतात. वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण असे शोधन केले की हे आजार लगेच बरे होतात. तसेच शमन औषधीसुद्धा असतात ज्या या क्लेदास व पर्यायाने या त्वचा रोगांस पटकन बरे करतात. आजकाल सतत डोके ओले राहिले की, डोक्यात फार कोंडा होऊ लागतो, सतत असे झाल्याने नंतर स्काल्प सोरीयासीस होण्याची शक्यता वाढते. हा कोंडा चेहऱ्यावर, पाठीवर ज्या भागात पडेल त्या भागात खाज येणे पुळ्या उठणे असे प्रकार सुरू होतात. फार वाढल्यास बऱ्याच जणांना सर्वागावर सोरीयासीस आलेला पाहायला मिळतो. आधुनिक शास्त्रानुसार याचे अनेक प्रकार आहेतही व तात्काळ उपशय देणारी औषधेही आहेत. मात्र कित्येक प्रकारांची कारणे अनाकलनीय असे सांगून या आजाराबद्दल रुग्णास काहीही ठोस उपचार सांगितला जात नाही अथवा कधी बरा होणार, होणार की नाही याबद्दलही पूर्ण माहिती सांगितली जात नाही. आयुर्वेदानुसार मात्र सर्व त्वचारोगांची कारणे व लक्षणे वेगवेगळी सांगितली आहेत. पैकी साध्य म्हणजे बरे होणारे त्वचारोग व असाध्य म्हणजे बरे न होणारे अशीही त्यांची विभागणी केलेली आहे. विरुद्ध आहार सेवनापासून ते चुकीच्या विहारापर्यंत कारणे वर्णन केली आहेत. नायटा, खरुज, गजकर्ण, सुरमा, दद्रु, पामा अशी व्यवहारात वेगवेगळी नावे असणारे त्वचारोग हे आयुर्वेदात कुष्ठ या त्वचा रोगांच्या यादीत महाकुष्ठाचे सात व क्षुद्र कुष्ठाचे अकरा प्रकार म्हणून वर्णन केलेले आहेत. प्रत्येकाची चिकित्साही वेगवेगळी वर्णन केली आहे. त्यामुळे गरज आहे ती फक्त आपल्या त्वचारोगाची आयुर्वेदीय निदान काय आहे हे जाणून घेण्याची. पैकी सोरीयासीसचे प्रमाण हल्ली फार वाढले आहे. फास्ट फूड, हॉटेलचे पदार्थ, शिळे अन्न, मशरूमसारख्या भाज्यांचे अधिक सेवन, वेगवेगळे सॉस, चायनीज फूड, जंक फूड इत्यादी अनेक पदार्थाच्या सततच्या सेवनामुळे रक्त दुष्टी होते व पर्यायाने क्लेद दुष्टी होऊन अनेक त्वचारोग मागे लागतात. लक्षात ठेवा छोटे छोटे त्वचारोगच मोठ मोठय़ा त्वचारोगाला जन्म देतात. एखादा चट्टा छोटा असेल, पण बऱ्याच दिवसांपासून असेल तर लवकरात लवकर तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घ्या. तसेच वर उल्लेख केलेला आहारातील व विहारातील बदल जरी पालन केलात तरी तुम्ही कित्येक त्वचारोगांना दूर ठेवू शकता.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :-वैद्य हरीश पाटणकर
लेखाची ओळख :: झाडांच्या बियांत, सर्व पोषणमूल्ये असलेली तेले आणि अितर घटक का असतात? तसेच, बाळंत झाल्यानंतर आअीच्या स्तनांत, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध का निर्माण होत? हे सांगणारा लेख.
आयुर्वेदानुसार गायीचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप अमृताचे भांडार आहे. केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात 'सूर्यकेतू' नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला 'स्वर्णक्षार' म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांतीचे असते.
जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते निश्चितच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात तसेच त्यांच्या विचारांमध्येही सात्विकता राहते. फक्त देशी गायीचेच दुध हितकार आहे; जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे नव्हे. डेअरीच्या प्रक्रियेमुळे (उदा. पाश्चुरायझेशन) दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.
डोळे दुखणे - उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते.
आम्लपित्त - आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दुध एकेक घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी प्यायला पाहिजे. दुध गार केलेले असावे, फ्रिजचे नव्हे !
रक्तपित्त - ( शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्राव होऊ लागणे ) : कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो.
बद्धकोष्ठ ( मलावरोध ) : गरम दुधाबरोबर इसबगोलची पूड किंवा गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो.
आतड्यांचे रोग - जेवणापूर्वी एक चमचा कोमट दुध घेऊन हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एक तास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होतात तसेच आतडे मजबूत बनतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा नाताळाचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे, ख्राईस्ट मास. याचा अर्थ, येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहीक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षो उल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी या पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ या द्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांचा गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. सध्या साजरा केला जातो तशा पद्धतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमसमध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर हा दिवस दोन गोष्टींशिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. ड्रायफ्रूट्स रममध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच. बेल्जियम, जर्मनी, फिनलंड या देशांत नाताळसाठी खास बिअर बनवली जाते, तर नॉर्डिक देशात "ग्लोग' हे पारंपरिक ख्रिसमस ड्रिंक बनवले जाते. रेड वाईनमध्ये थोडा संत्र्याचा रस व लवंग, दालचिनी, सुंठ आणि वेलदोडा असे मसाले घालून ग्लोग बनवले जाते. इस्टर्न युरोपमध्ये नाताळच्या जेवणासाठी बारा पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. याचे कारण म्हणजे बारा हा आकडा श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो तसेच तो आकडा वर्षाच्या सगळ्या महिन्याचे प्रतिनिधित्व करतो. हे जेवण संपूर्ण शाकाहारी असून त्यात पारंपरिक पद्धतीनुसार व त्या सीझनमध्ये मिळणारी फळे व भाज्या वापरून बनवलेले पदार्थ असतात. त्यामध्ये बीटचे सूप, भाज्या भरलेले डंपलिंग्ज, खसखस घातलेली केक, जिंजर ब्रेड, कोबीचे रोल्स, हे पदार्थ प्रामुख्याने असतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
ख्रिसमससाठी काही खास पदार्थ
ख्रिसमस केक
ब्लॅक फॉरेस्ट केक
ख्रिसमस जिंजर कुकी
खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्
हनी बनाना ब्रेड
सोया नानकटाई
कॉर्न नानकटाई
रम केक
पोटॅटो ब्रेड
पायनापल पेस्ट्री (बिना अंडय़ाची)
पाणी कसे साठवावे ?
अंतरिक्षातून पडणारे पाणी साठवण्यासाठी स्वच्छ पात्र अपेक्षित आहे. सोन्याचे असल्यास सोन्याहून पिवळे ! नाहीतर ज्या अठरा मूलद्रव्यांनी शरीर बनलेले तीच अठरा मूलद्रव्ये असलेल्या मातीच्या मडक्यात अंतरिक्ष पाणी साठवावे.व्यवस्थित झाकून ठेवले तर हे टिकाऊ असते. कोणत्याही संस्कारांची आवश्यकता नसते. पण एकदा हे पाणी जमिनीमधे मुरले की त्यात अशुद्धी येण्यास सुरवात होते.
प्रदेशानुसार पाणी साठवण्याच्या पद्धतीमधे बदल होत जातो. आपणाला जो पर्याय योग्य वाटतो तो निवडावा, शास्त्रकार हट्टी नाहीत. आम्ही सांगतो तस्सेच तुम्ही करावे, असे नाही सांगत. अनेक प्रदेशात पाणी कसे साठवले जाते, त्या त्या प्रदेशाची ती गरज असते. तोच नियम आपण दुसऱ्या ठिकाणी वापरू शकत नाही. वापरू पण नये.
ऋतु, काळ, प्रदेश, उपलब्धता या निकषांचा युक्तीने वापर करावा, असे शास्त्रकार वारंवार बजावतात. केवळ नियमावर बोट ठेवून कधी आरोग्य मिळणारे नसते. हे लक्षात ठेवावे.
आपणाला फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून पुढे नऊ दहा महिने साठवलेल्या पाण्यावर जीवन व्यतीत करायचे असते. जमिनीवर पडलेले पाणी साठवण्याचा मोठा आणि सोपा पर्याय म्हणजे तलाव. गावामधे लोकसंख्येनुसार किती पाणवठे असावेत, त्याची खोली किती असावी, त्याची सार्वजनिक स्वच्छता कशी ठेवावी, हे टीकाकार अधिक स्पष्ट करून सांगतात.
( टीकाकार म्हणजे टीका करणारे नव्हेत तर आपल्या गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेले आहे ते आणखी सोप्या भाषेत समजावून सांगणे, त्याचे अर्थ विस्ताराने सांगणे. जसे भगवद्गीता सोपी करून सांगावी म्हणून लोकमान्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. विनोबा भावेंनी गीताई लिहिली, ज्ञानेश्वर माऊलीचा ग्रंथराज तर सुपरिचित आहेच. )
नैसर्गिकरित्या जिथे पाणी साठवले जाते ते सरोवर.
वाहाणारे पाणी मुद्दाम अडवून योग्य जागी साठवणे म्हणजे बांध, याचेच मोठे रूप म्हणजे धरण.
नदी ओहोळ याचे पाणी देखील उगमाच्या दिशेत स्वच्छ होत जाते.
जमिन खणून त्यातून कायम स्वरूपी, नैसर्गिक झऱ्यातून येणारे पाणी विहिरीत साठवणे.
किंवा जमिनीखाली असणाऱ्या मोठाल्या दगडामधे साठलेले पाणी, कूपनलिकेच्या रूपात साठवणे (आजच्या भाषेत बोअरचे पाणी.) असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
जिथे पाऊस अगदी कमी पडतो अशा वाळवंटी प्रदेशातील पाणी गरजेप्रमाणे जमिनीखाली साठवले जाते.( किंवा आजच्या भाषेत रेन वाॅटर हार्वेस्टींग. ही आता अन्य प्रदेशात सुद्धा काळाची गरज बनू लागली आहे. )
जमिनीखालील पाण्याचे प्रवाह जमिनीवरून कसे ओळखावेत, याचे काही जणांना ज्ञान असते. यांना पाणके म्हणतात. विशिष्ट दिशा, जांभूळ, औदुंबर सारखी झाडे, जमिनीचे चढाव उतार, यांच्या वरून जमिनीखालचे प्रवाह समजू शकतात.
या सर्व प्रकारांनी पाण्याची साठवणूक करता येते. सूत्रस्थानाचा अभ्यास करता असे दिसून येते, की ग्रंथकर्त्यांनी पूर्ण मानवजातीचा विचार करून या साहित्याची रचना केली आहे. याचाच अर्थ त्यांनी केवळ आताचा भौगोलिक भारतच नव्हे तर पूर्ण विश्वातील पाण्याचा स्थानानुसार अभ्यास केलेला होता.
हे सर्व आम्हाला गावामधे मिळू शकते, पण शहरात रहाणाऱ्यांचे काय ?
त्यांनी काय करावे
?????
त्यांच्यासाठी नलोदक झिंदाबाद !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
26.12.2016
आता आपण खोबरेल तेलाचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)खोबरेल तेल व चुन्याची निवळी हे मिश्रण घोटून केले मलम केसांना लावल्यास केस गळणे थांबते.
२)थंड हवेशी संपर्क आल्याने त्वचा फुटते ह्या करीता खोबरेल तेल व लोणी हे मिश्रण समभाग मिसळून त्वचेवर लावावे.
३)खोबरेल तेल अंगाला नियमीत चोळल्यास मांसपेशी व स्नायू पुष्ट होतात.
४)संडास करताना व नंतर गुदद्वाराची आग होत असल्यास खोबरेल तेलाचा फाया गुदद्वारात ठेवावा.
५)लहान मुलांची टाळू भरायला खोबरेल तेल टाळूवर लावावे.
६)बोटांना होणाऱ्या कोरी बऱ्या होण्सासाठी त्यावर लोखंडी न गांजलेली सुरी तापवून त्यावरून खोबरेल तेल सोडावे.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गोडा मसाला बनवताना सुके खोबरे व तीळ हे स्निग्ध पदार्थ टाळून अथवा अत्यल्प प्रमाणात घेऊन, धने-जीरे, लवंग - दालचिनी, तमालपत्र, लालसुकी मिरची वगैरे पदार्थ तेलाशिवाय कोरडे भाजून दळून मसाला बनवावा.
मैद्याऐवजी नेहमी गव्हाचे पीठ म्हणजे कणीक वापरावी. चवीत काहीही फरक पडत नाही. रोजच्या पोळीच्या कणकेत थोडे सोयाबीनचे पीठ मिसळून ठेवावे. ज्वारी - बाजरीच्या पिठात थोडे नाचणीचे पीठ मिसळून ठेवावे म्हणजे रोजचीच पोळी - भाकरी अधिक पौष्टिक बनेल.
कॅलरीज कमी करण्यासाठी स्किम्ड दुधाचा वापर करावा. दोन वेळा दुधावरची मलई काढून टाकल्यावर ते दूध "लो फॅट स्किम्ड मिल्क' बनेल. ह्या दुधाचे दही, ताक सर्व बनवता येते. शक्य तर गाईचे दूध वापरावे.
डाळींमध्ये भरपूर प्रथिने असतात. तुरीची, मुगाची, मसुरीची उडदाची अशा सर्व प्रकारच्या डाळी आपण वापरतो. डाळ शिजवतानाच त्यात आवडीप्रमाणे कांदा - लसूण - टोमॅटो - हिरवी मिरची घालावी. म्हणजे नंतर चमचाभर तेलाची फोडणी पुरेल. बदल म्हणून डाळ शिजतानाच त्यात मेथी, पालक, शेपू अशी कोणतीही पालेभाजी घालून शिजवावे. म्हणजे प्रथिनांबरोबर पालेभाजीतील "लोह' व "अ' जीवनसत्व मिळेल.
डाळींप्रमाणे कडधान्ये म्हणजे प्रथिनांचे स्रोत मानतात. कांदा, टोमॅटो, काकडी, कोबी, गाजर, मुळा बीटरूट अशा कोणत्याही कोशिंबीरीत मोड आलेले कोणतेही कडधान्य कच्चेच घालावे. फोडणी देणे टाळावे. म्हणजे रोजचीच कोशिंबीर अधिक पौष्टिक बनेल.
प्रेशर कुकर, ओव्हन, नॉनस्टिक तवा, पॅन, कढई यांचा वापर केल्यास कमीत कमी तेलात अनेक पदार्थ बनवता येतील.
साखरेऐवजी शक्ये तेथे गूळ वापरावा, मधाचा उपयोग करावा.
ताजी फळे खाणे उत्तम! सुकामेव्यापैकी आक्रोड, खजूर, काळ्या मनुका, सुके अंजीर सर्वांत पौष्टिक असतात. वजन कमी करण्याचा प्रश्न् नसेल तर रोज दोन बदाम खावेत.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. उमाशशी भालेराव
Copyright © 2025 | Marathisrushti