(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • वजन कमी करण्यासाठी

    आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं "परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात". आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल. वर्षानुवर्ष सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात. आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.

    गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.

    सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.

    चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.

    चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
    जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.

    लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.

    दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
    निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.

    बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.

    दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.

    जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून बस’ करा.

    जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
    ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.

    दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
    मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपाना मुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.

    कडधान्यां बद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.

    व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातू च्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सहा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल
    कालचा भाग 1 आजचा भाग 2

    ज्या लॅबोरेटरीच्या रिपोर्टस् वर आपण अवलंबून रहातो, त्या लॅब रिपोर्ट च्या मागील छापील बाजू कधी वाचून बघीतली आहे ? किंवा काही वेळा रिपोर्ट च्या खालीच अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं.( सिगरेटच्या पाकिटावर कसं दिसेल न दिसेल अशा अक्षरात लिहिलेलं असतं.... "सिगरेट स्मोकिंग इज इन्युरस टु हेल्थ")

    मुद्दाम वाचा.
    मला त्यांचं कायम कौतुक वाटतं. सगळी कार्डस अगदी ओपन असतात. लपाछपीचा व्यवहार नाही. जे सत्य आहे ते अगदी लेखी लिहूनच देतात. नंतर मागाहून कोणी गडबड नको करायला, आम्हाला सांगितलेच नाही, माहितीच नव्हतं वगैरे.....

    आपले जे रक्त लघवी वगैरेचे रिपोर्टस दिले जातात, त्या रिपोर्टवर जे काही लिहिलेलं असते, ते फक्त ती चिठी लिहून देणाऱ्या डाॅक्टरसाठीच असते. त्याचा रूग्णाशी खरंतर काहीच संबंध असत नाही. रूग्ण हा त्या कागदाचा केवळ वाहक असतो. तो रिपोर्ट काय आहे, कसा आहे, बरोबर आहे की नाही, हे त्या पॅथाॅलाॅजीच्या असिस्टंटनी कधीही रूग्णाला सांगायचे नसते. सल्लेही द्यायचे नसतात. त्यामुळे त्या कागदावर खाली काही वाक्ये असतात...
    जसे,
    The analysis results are only answer to corrosponding sample.
    The reported results is for information and for interpretation of referring doctor only.

    याचा अर्थ असा होतो की, हा केवळ वैद्यकीय व्यावसायिकासाठी समजेल अशा वैद्यकिय भाषेत लिहिलेला कागद आहे. त्यात रूग्णांनी आपले डोके खर्च करू नये. त्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा वैद्यकिय जाणकारांनी त्या रिपोर्ट चे अर्थ नीट समजतील अशा भाषेत लावावेत, आणि आपल्या रुग्णांना सांगावेत. त्यासाठी योग्य तो मोबदला रूग्णांनी, त्यांना दिलेला असतो. (काही वाक्यांचे विस्तृत अर्थ खरंतर कंसातील आहेत, पण कंस न टाकता लिहिले आहेत.)

    Referring doctor.......who understand the meaning of reporting units, reference ranges, and limitations of technologies should interpret the results.

    "त्यांनीच याचे अर्थ लावावेत, ज्यांना या रिपोर्टमधील युनीट, रेफरन्स रेंज यांची पूर्ण माहिती, पूर्ण अभ्यास, ज्ञान आहे. तसेच रिपोर्ट करण्यासाठी जी मशीनरी वापरली गेली, त्या विशिष्ट कंपनीच्या मशीनरीचे, त्या मशीन मधील रिपोर्टींग करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीमधील त्रुटींचे, अंतिम निष्कर्षावर जे परिणाम होतात, ते समजून घेऊन तसे रुग्णाला सांगितले जावे."

    हे सर्व ज्यांना माहिती नाही, त्यांनी जर, गलत तरीकेसे, अपने अंदाज से, इस रिपोर्ट को पढा और अपने तरीके से यदी समझ लेने की कोशीष की, और अगर गलतीसे कुछ उल्टा पुल्टा हो गया, तो इसके जिम्मेदार हम नही रहेंगे ।

    बरोबरच आहे ना. मोबाईल जरी आपल्या मालकीचा असला तरी, त्याचा बिघाड बघण्यासाठी, अतिहुशारी करून, नेट वरून वाचून, मोबाईल खोलून, दुरूस्ती करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का ?

    आणि इथे तर प्रत्यक्ष स्वतःच्या जीवाशी खेळ असतो. म्हणून पॅथाॅलाॅजीचे तज्ञ डाॅक्टरदेखील या रिपोर्टचा योग्य तो अर्थ लावू शकत नाहीत, कारण त्यांनी रुग्णाला काही वेळा बघितलेला पण नसतो.

    अशा अर्धवट ज्ञानावर आरोग्याचे निष्कर्ष काढणे तर फार धोक्याचे असते.
    ना रे बाबा ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.02.2017

  • वार्धक्यातील काळजी

    वयाच्या ६० ते ६५ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींची गणना वृद्ध अशी होते. वृद्ध व्यक्ती सगळ्या सारख्या नसतात. प्रसिद्ध जर्मन पॅथॉलॉजिस्ट व्हर्काव्ह यांनी म्हटलेले आहे, की Man is as old as his arteries. म्हणजे माणसाच्या रक्तवाहिन्या जितक्यास वृद्ध तितका तो वृद्ध असतो. याचा अर्थ प्रत्येक अवयवाला रक्त नेणाऱ्या रोहिण्यांची स्थिती त्या-त्या अवयवाची कार्यक्षमता ठरविते. सगळेच अवयव महत्त्वाचे खरे; पण त्यातल्या माणसाचा मेंदू, त्याचे नेत्रपटल, त्याचे हृदय, मूत्रपिंडे आणि पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्या स्थितीकडे अधिक कसोशीने पाहिले जाते. वार्धक्याचतील आजारांचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी अनेक अवयवांत दोष निर्माण होतात. शिवाय आजारांचे स्वरूप तरुण व्यक्तींच्या आजारापेक्षा वेगळे असू शकते. म्हणजे न्यूमोनिया, टॉयफॉइड अशा आजारात लहान वयात ताप येणे हे एक प्रमुख लक्षण असते; तर वृद्ध व्यक्तींना अशा इन्फेक्टि्व्ह आजारांतसुद्धा ताप नसेलही. मात्र विकारसदृश प्रत्येक दोषाचा खोलात जाऊन तपास करणे किंवा त्यावर उपचार करणे आवश्य्क नसते. उदाहरणार्थ एखादा शब्द न आठवणे, व्यक्तीचे, स्थळाचे नाव न आठवणे अशा गोष्टी म्हणजे मेंदूला विस्मृतीचा विकार जडला आहे असा अर्थ नसतो. वार्धक्यात एक महत्त्वाचा भाग ‘दुबळेपणा’चा असतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते. अवयवांच्या कार्यक्षमतेत झालेली घट म्हणजे दुबळेपणा. दीर्घकाळ चालू असणारे दाह, स्नायूंच्या आकारमानात आणि शक्तीत झालेली घट, मज्जासंस्था आणि अंतर्ग्रंथींच्या संस्थेच्या कार्यातील कमजोरी यामुळे शरीराच्या विविध संस्था दुबळ्या व्यक्तींमध्ये तणाव सहन करू शकत नाहीत. अशा दुबळ्या वृद्ध व्यक्तींमध्ये सर्व संस्थांचे कार्य झपाट्याने घटते व मृत्यू ओढवतो. दुबळेपणा मोजता येत नाही; पण चाल संथावते, हाताच्या पकडीतील बळ कमी होते, वजन कमी होते, ऊर्जेचा वापर खालावतो आणि आकलन किंवा समजशक्ती संथावते. असे दुबळेपण दुरुस्त करण्यासाठी निश्चिपत उपाय सापडलेले नाहीत. योग्य प्रमाणात हालचाल करणे आणि थकवा किंवा वेदना टाळणे महत्त्वाचे असते. सकस परंतु पचेल असा आहार आवश्यक असतो. मनाची प्रसन्नता आणि अनुरंजता उपयुक्त ठरते. भविष्याबद्दल आशादायक भावना आणि विचार करता उत्तेजक परिसर असावा. सत्‌-श्रद्धा जोपासावी. डॉक्टर आणि परिचारिका, शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तींची वृत्ती सहानुभूतिपूर्वक आश्वासक असावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • किचन क्लिनीक – लोण्याचे औषधी उपयोग भाग २

    ब)ताकावरचे लोणी:

    १)हे लोणी लहान मुलांना अत्यंत पोषक आहे.त्यांना जेवणासोबत ३ भाग लोणी व १ भाग मध असे मिश्रण द्यावे(फक्त शाकाहार करत असतानाच हा उपाय करावा मांसाहार जेवणासोबत नाही).

    २)रसायनांशी संपर्क,उन्हाचा प्रभाव ह्यामुळे त्वचेचा वर्ण खराब होतो तेव्हा त्वचेवर लोण्याचा लेप लावावा व पोटात देखील लोणी घ्यावे वर्ण सुधारतो.

    ३)गर्भिणी स्त्रीने नियमीत आपल्या आहारात लोणी ठेवावे त्यामुळे माता व गर्भ दोघांचेही आरोग्य उत्तम रहाते.

    ४)मुळव्याधीची तक्रार तसेच त्यात वेदना,रक्त पडणे,संडासला घट्ट होणे,संडासच्या जागी दाह होणे अशा तक्रारी असताना त्या व्यक्तिने १ ग्लास दुधामध्ये १ मोठा चमचा लोणी घालून रात्री घ्यावे व जेवणामध्ये बिनमसाल्याची दुधीभोपळ्याची भाजी खावी आराम मिळतो.

    लोण्याच्या अतिसेवनाने वजन वाढते व शरीरातील मेद वाढतो.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग नऊ

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 5

    लॅबच्या रिपोर्ट मधे आणखीन एक वाक्य असते.
    Results of test may vary from laboratory to laboratory and also in some parameters from time to time, for the same patient.

    इतकं खरं कोणच बोलत नसेल. आता हेच बघा ना,
    आम्ही ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत, त्याचे आमच्या लॅबोरेटरीमध्ये जे रिपोर्टस् आले आहेत ते दुसऱ्या लॅबमधे कदाचित वेगळे येऊ शकतात. आणि काही वेळा कदाचित एकाच रुग्णाचे, वेगवेगळ्या वेळी तपासणी केली असता, ते ही रिपोर्टस् वेगळे येऊ शकतात.

    भाषा इतकी गोड असते, पण खरं आणि निर्णायक काय आहे, ते अगदी आयएसो प्रमाणित लॅबसुद्धा सांगू शकत नाही. कारणही तसेच आहे. प्रत्येक रुग्णाचे शरीर क्षणाक्षणात बदलत जाणारे असते. त्याची व्याख्या करतानाच शीर्यते तत् शरीरः अशी केली आहे. जे क्षणाक्षणाला क्षरण पावते, किंवा संपत जाते ते शरीर. त्यामुळे प्रत्येक पेशी जी आत्ता आहे ती नंतर बदललेली असते. हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. त्याला विशिष्ट काळात बंदिस्त करणे कधीही शक्य नाही. त्यामुळे त्याचे रिपोर्टस देखील बदलतेच रहाणार.

    यावरून आपण लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच की, लॅबोरेटरीमध्ये तपासून आलेलं शरीर म्हणजे पूर्णत्व नाही. " शरीराच्या सर्व तपासण्या करून घेतल्या पण कुठेच एकपण फाॅल्ट मिळाला नाही" असं जेव्हा रुग्ण सांगतात, तेव्हा त्यांच्या अपेक्षांची कीव करावीशी वाटते.
    सर्व शरीर यंत्राने तपासून मिळते, ही विज्ञानावरची अंधश्रद्धा आहे. असं मी म्हटलं तरी ते चुक ठरू नये.

    किती जणांना, किती पद्धतीने आणि कसं समजावून सांगणार की, सर्व तपासण्या हा शब्दच फसवा आहे. सर्वांना असे वाटते आहे की, विज्ञानाला सर्व शरीर समजले आहे. यंत्राने वरून तपासले, किंवा मशीनमधे शरीर घातले, की आतून उत्तर येईल. "हे बघा, इथे फाॅल्ट आहे. इथेच लक्ष द्या." तर असं नाहीये. हा भ्रम आहे. यालाच आध्यात्मिक भाषेत "माया" म्हणतात. जे आहे ते तसे नाही, या नाव माया.

    विज्ञानाला जे काही शरीर समजलेलं आहे, ते खूप मर्यादित स्वरूपात आहे. हे शरीर समजून घेण्यासाठी किती तरी पद्धतीने प्रयत्न सुरूच आहेत. अजूनही हे स्थूल शरीर काय आहे हे कळलेलंच नाही. मग सूक्ष्म शरीराची बातच वेगळी! मन, इंद्रिये, आत्मा तर दूरच राहिले. यांचा प्रत्येकाचा एकमेकांशी, आणि प्रत्येकाचा शरीराशी असलेला संबंध अभ्यासायला एक जन्म पण पुरा पडणार नाही.

    हे शरीर 'आतून' समजून घ्यायला एक वेगळी दृष्टी लागते, ( जिची चर्चा आपण आधी केली आहे.) ही दृष्टी मिळाली की चिकित्सा कशी करायची, कुठे करायची, का करायची, करायची की नाही, हे सर्व स्पष्ट होत जाते. यालाच मी म्हणतो, आयुर्वेद चिकित्सेमागील दृष्टीकोन! ही दृष्टी सर्वांना लवकरात लवकर लाभो ही प्रार्थना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.02.2017

  • किचन क्लिनीक – लोण्याचे औषधी उपयोग

    अ)दूधापासून तयार केलेले लोणी:

    १)वारंवार पातळ भसरट संडास होत असल्यास १० ग्राम लोण्याचा समावेश दोन्ही वेळच्या जेवणात करावा.

    २)ज्यांना वारंवार नाकाचा घोळणा फुटण्याची सवय असते त्यांनी जेवणानंतर १ मोठा चमचा लोणी समभाग साखर घालून खावे व त्यावर तासभर पाणी पिऊ नये.

    ३)डोळ्यांची आग होत असल्यास,वाचताना डोळे दुखत असल्यास,डोळे कोरडे वाटत असल्यास १ चमचा लोणी,१ चमचा मध,व १ चमचा त्रिफळा चुर्ण हे मिश्रण चाटण करून खावे मात्र त्यावर पाणी व इतर खाद्य पदार्थ खाऊ नये.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग आठ

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 4

    आपण अवलंबून रहात असलेल्या रिपोर्ट मधला फोलपणा आपल्याला काही वेळा दुसरे निदान करायला भाग पाडतो. निदानच बदलले तर चिकित्सा पण बदलत जाते, पथ्यपाणी बदलते.
    आयुर्वेदाचा एखाद्या रोगाच्या चिकित्सेमागील दृष्टीकोन लक्षात यावा यासाठी हे लिहितोय.

    म्हणून वैद्य जेव्हा रूग्णांची तपासणी करतात, तेव्हा रिपोर्ट तपासणे, हा कार्यक्रम सगळ्यात शेवट पार पाडतात. पण रूग्णांना काय कौतुक असते, रिपोर्ट दाखवण्याचे ! एवढ्याऽऽऽऽऽ तपासण्या केल्यात ! ही एवढी फाईल. ज्याचा खरंतर त्यावेळेस काऽऽही उपयोग नसतो.

    हे सर्व रिपोर्ट का करायचे, तर त्यावेळेस रुग्णाची काय परिस्थिती होती, एवढंच समजण्यासाठी. तो रिपोर्ट " असा " का आला याचे उत्तर मात्र कोणाकडेच नसते. तो आत्ताच असा का आला, याचेही उत्तर कोणाकडे नसते. हे कमी आहे, आणि हे वाढले आहे, त्यासाठी आमच्याकडे हे औषध आहे, हे उत्तर मात्र सगळ्यांकडे असतं. फक्त कंपन्यांची नाव फक्त बदलतात. एवढंच !

    आयुर्वेदात अश्या काही प्रयोगशालेय चाचण्या सांगितलेल्या नाहीत का ?
    आयुर्वेदातील सारे निष्कर्ष हे संशोधनाअंतीच लिहिलेले आहेत. "इदं आगमसिद्धत्त्वात्" असे ग्रंथकर्ते स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात,
    " हे आम्ही यापूर्वी तपासून बघितलेले आहे, आता यावर पुनः डोके खर्च करू नका. यापुढील संशोधन करा."
    त्वचेची, रक्ताची रंग परीक्षा, लघवीची तेलबिंदू परीक्षा, मलाची परीक्षा करून निदान कसे करावे, हे सुस्पष्ट पणे मांडून ठेवलेले आहे. काळाच्या ओघात यातील काही तपासण्या मागेच राहिल्या, त्यातील मुत्राच्या तैलबिंदू परिक्षणा सारख्या परीक्षांचा वैद्यांनी पुनः अभ्यास करायला हवाय.

    थोडं विषयांतर होतंय, पण मनात आलं ते लिहून टाकतो,

    कावीळ झालेली नाही, काविळीचे एकही लक्षण रूग्ण सांगत नाही. पण रिपोर्टमधे कुठेतरी विकृती दाखवली जाते, कावीळ वाढू नये म्हणून उगाचच आयुष्यभर पथ्य करीत बसायचे असते का ? रोगापेक्षा रोगाची भीती ही आपल्याला मृत्युकडे लवकर नेणारी असते.

    त्यापेक्षा कोणताही रोग होऊ नये यासाठी आपली प्रतिकारक्षमताच एवढी वाढवून ठेवावी, की चुकुन जरी काही वेळा अपथ्य झाले तरी, काहीही होता कामा नये.

    चेक बाऊंस होऊ नये यासाठी कसं पुरेसा बॅलन्स अकाउंटमधे ठेवणे आवश्यक असते, तसं आपल्याकडील इंद्रियांच्या सर्व क्षमता एवढ्या वाढवून ठेवायच्या की, चुकुन एखाद्या वेळी एखाद्या रोगाचा सामना करायची वेळ आलीच तर पुरेसा शक्तीचा साठा आपल्याकडे तयार असेल. ऐनवेळी कुठे जाणार ना ! एनी टाईम मनी कधी मिळतील? पुरेसा बॅलन्स असेल तरच !

    केवळ अॅण्टीऑक्सीडंटस् घेणे म्हणजे प्रतिकार क्षमता वाढवणे नव्हे हं !
    हे सगळं पाश्चात्य डोकं. त्यांना सगळं कसं इन्स्टंट हवं असतं. पाणी विहिरीतून येतं, त्यासाठी ती जमिन खणावी लागते, विहिर बांधावी लागते, तरच विहिरीला असलेले पाणी हवे तेव्हा वापरता येते.

    हे कोणाला कळेल ? ज्यांनी कायम टॅप वाॅटरच वापरले आहे त्यांना ? विहिरच बघीतली नाही त्यांना ? मग त्यांच्यासाठी वेगळी गरज निर्माण होते, त्याला ते इन्स्टंट म्हणतात.

    एक गोळी टाकली तोंडात की आली एनर्जी. असं कुठाय ? ती काय हवा आहे का ? चाकाला ट्यूब जोडली आणि हवा भरली !

    तसं शोधायला गेलं तर आयुर्वेदातील सगळी रसायन औषधे ही अॅण्टी ऑक्सीडंटच आहेत. सगळे मसाल्याचे पदार्थ अॅण्टीऑक्सीडंटच आहेत. असो. पाश्चात्यांची संशोधक वृत्ती मात्र अभ्यासण्यासारखी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचाही ते अतिशय मनापासून अभ्यास करतात, आणि महत्त्वाचे म्हणजे आपले संशोधन लिहून ठेवतात, इतरांना सांगतात. त्यामुळे पुढील पिढीला त्याचा फायदा होतो. एकदा झालेली चुक टाळता येते.

    भारतीय संशोधनातील एक मोठ्ठा दोष हा रहातो, की आमचं डाॅक्युमेंटेशन नीट होत नाही. ज्यावेळी जे गरजेचं आहे, ते केलंय. काहीवेळा, त्याचं महत्व लक्षात येत नाही, काही वेळा, कशाला लिहून ठेवायचं, राहातंय लक्षात. असं म्हटलं जातं.
    मग कधीतरी गरज असते तेव्हा इसारलंय म्हटलं की झालं....
    भारतीय संशोधक प्रत्येक वेळी चुकतात असं नाही,
    आता इस्रोचीच गोष्टच बघा ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.02.2017

  • किचन क्लिनीक – ताक प्यायचे नियम

    आता आपण ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये ते पाहूयात:

    १)फुफ्फुसाला जखम होऊन थुंकीमधून रक्त पडत असल्यास त्या व्यक्तिने ताक पिऊ नये.

    २)अशक्त व कृश व्यक्तिने ताक पिऊ नये.

    ३)बेशुद्ध पडणे,चक्कर येणे,अंगाची आग होणे ह्या तक्रारीमध्ये ताक पिऊ नये.

    ४)कोड,त्वचा रोग,अंगावर पुरळ येणे,गळवे होणे,मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव अधिक होणे अशा तक्रारी मध्ये ताक प्यायचे नाही.

    ५)पित्ताचा त्रास जसे तोंड येणे,पोटात आग होणे,अंगावर पित्त उठणे,कावीळ,तोंड आंबट कडू होणे,पुष्कळ तहान लागणे,खुप घाम येणे अशा तक्रारी मध्ये ताक पिणे अयोग्य आहे.

    ६)उन्हाळा व शरद ऋतुमध्ये ताक पिंऊ नये.

    ७)घोळ हा ताक प्रकार प्यायचा असल्यास दह्याचे सर्व नियम पाळावे.

    ८)सर्दी,खोकला होण्याची सवय असणाऱ्यांनी जेवणानंतर,सकाळी दहा पुर्वी व संध्याकाळी ७ नंतर ताक पिऊ नये.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • देहदान हाही अेक अंत्यसंस्कारच

    कोणताही सजीव मरण पावला म्हणजे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून, आवश्यक असते. मानवी पार्थिवावर धार्मिक विधिनुसार अंत्यसंस्कार केले जातात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाॅटॉमी विभागाला, वैद्यकीय अभ्यासासाठी देहदान करणे हाही अेक अंत्यसंस्कारच आहे या विषयी या लेखात चर्चा केली आहे.

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सात

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 3

    लॅबच्या रिपोर्टच्या मागील बाजूला एक वाक्य अजून छापलेले असते.
    Individual laboratory investigations are never conclusive, but should be used along with other relevant clinical examinations to achieve final dignosis.

    त्याचा भावार्थ असा की, आम्ही दिलेले हे तपासणीचे रिपोर्ट हे कदापि अंतिम निदान असत नाही. रुग्ण जी लक्षणे सांगत असतो, त्यातील लक्षणाबरोबर हा रिपोर्ट अभ्यासून पहावा. आणि त्यानंतरच अंतिम निदान करावे.

    याचा दुसरा सरळ अर्थ असा होतो, जिवंत रुग्ण जी लक्षणे सांगतोय ती, निर्जीव यंत्र सांगत असलेल्या रिपोर्टपेक्षा, जास्त महत्वाची असतात. कोणत्याही यंत्रावर पूर्णपणे विसंबून राहू नका. अहो साधा वजन काटाच घ्या ना, चार वजन काट्यावरचे आपलेच वजन वेगवेगळे येते. रेल्वे स्टेशनवरच्या चकाकत्या मशीनमधले वजन वेगळे, बस स्टॅन्ड वरचे वेगळे, रेल्वेच्या ब्रीजवरील एक रूपयातले वजन वेगळे, दवाखान्यातले वेगळे, जीम मधल्या काट्यावरचे वेगळे. असे का होते ? प्रत्येक मशीनमधले हे तांत्रिक दोष असतात. कुणाची स्प्रिंग जुनी असते तर कुणाचा सेल संपत आलेला असतो, कुणाचा बॅलन्स गेलेला असतो, तर कुणाचा पाया पक्का नसतो.
    पण वजन करणाऱ्याचं काय ? त्याचं वजन तर बदलत रहातं ना !

    यंत्र जेवढं मोठं तेवढी त्यातली गुंतागुंत जास्त.

    बरं हे कोण सांगतंय तर, ज्या लॅबमधे आपण तपासणीसाठी जातो, त्या लॅबला असलेली कायदेशीर बंधने सांगत आहेत. जर चुकुन कोणी या दिलेल्या रिपोर्टविरोधात कोर्टात तक्रार वगैरे करायला जाणार असेल तर, त्याचाही काही उपयोग होणार नाही. कारण 'कंडीशन ऑफ रिपोर्टींग'मध्ये आणखी एक वाक्य लिहिलेले असते.
    "This medical dignostic report is not valid for medico legal purposes."

    आहे ना गंमत ?

    आश्चर्य वाटण्यासारखे आणखी एक विधान त्यावर लिहिलेले आढळते...

    It is presumed that....
    हे गृहीत धरले आहे, (काय? )
    The test performed on the specimen belongs to the patients name or identified.
    की, हा रिपोर्ट त्याचा आहे, ज्याचे नाव त्या सॅपलच्या बाटलीवर लिहिलेले आहे, ( म्हणजे त्याचेच असावे, असे वाटते. ) नक्की सांगता येणार नाही, की ते रिपोर्ट त्याचेच असतील.

    दिलेल्या रिपोर्टमधे एवढी संदिग्धता का ? एवढासुद्धा विश्वास ठेवायचा नाही का ?

    मग विश्वास नेमका कोणत्या यंत्रावर ठेवावा ?
    समर्थ म्हणतात,
    "या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही"

    हे यंत्र ज्याने निर्माण केले, तो परमात्मा
    आणि ज्याच्याकडे शरीर, मन इंद्रियांसह, सांभाळायला दिले, तो अंतस्थ आत्मा, यांच्यावरच ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    17.02.2017