(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 2

    रोग वाढण्याच्या काही कारणांचा विचार केला असता, त्यातील एक कारण म्हणजे जेवणाची वेळ न पाळणे.
    उत्तम आरोग्यासाठी जेवणातील अन्नपदार्थ हा वेगळा च विषय होईल, पण केवळ जेवणाची वेळ पाळल्याने बरेचसे आजार कमी होतात किंवा आयुर्वेदीय परिभाषेत सांगायचे झाल्यास, व्याधीचा संप्राप्ती भंग करता येतो. कमी वेळात व्याधीची लक्षणे कमी होत जातात. आणि लवकर बरे वाटते. म्हणून जेवणाची वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. जेवणाची वेळ पाळली तर औषध घ्यायच्या वेळा पाळायची वेळ येत नाही.

    जेवण नेमके कोणत्या वेळी घ्यावे, असा शोध मी ग्रंथात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा मला थेट उत्तर मिळाले नाही.पण एक श्लोक मात्र मिळाला आणि विचारांना दिशा मिळाली.

    अष्टांग संग्रह सूत्रस्थान अध्याय 11-63 मधे शास्त्रकार म्हणतात,
    प्रातराशे तु अजीर्णे अपि,
    सायमाशो न दूष्यति ।
    अजीर्णे सायमाशे तु
    प्रातराशो हि दूष्यति ।।

    म्हणजे दिवसा सेवन केलेले अन्न सम्यक रितीने जर पचले नाही, आणि जर सायंकाळी भोजन केले तर विशेष हानी होत नाही.
    पण सायंकाळी घेतलेले भोजन जर सकाळी पचले नसेल आणि सकाळी पुनः अन्न सेवन केले तर मात्र हानी अवश्य होते.

    अजीर्ण होऊ नये म्हणून हा श्लोक उद्धरीत केला आहे. आता शास्त्रकारांनी ज्या कारणासाठी हा श्लोक तिथे सांगितला होता, त्याचे कारण वेगळे होते. अजीर्ण केव्हा होते, कसे होते हे सांगताना हा श्लोक सांगितला आहे.

    आता या श्लोकातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. प्रातः आणि सायम् प्रातःकाल आणि सायंकाळ. म्हणजे सकाळ आणि सायंकाळ.
    इथे दुपारी आणि रात्री असे शब्द वापरलेले नाहीत. याकडे विशेष लक्ष द्यावे. यावरून असे लक्षात येते, की आपल्या दोन वेळा जेवायच्या. सकाळी आणि सायंकाळी.

    हे काही आपल्याला जमणारे नाही बुवा, असं म्हणून, सोडून द्यायचा हा विषय नाही. कारण औषधाशिवाय निरोगी जगायचं असेल तर कुछ ना कुछ करना तो पडेगा ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.02.2017

  • ताप आलाय

    पूर्ण विश्रांती हाच साध्या तापावरचा परिणामकारक उपाय आहे. पण आपल्या धावपळीच्या जीवनात आपण ताप घालवायला औषधे वापरू लागलो. आपली प्रतिकारशक्ती कमी होत चालली आणि विषाणू मात्र अधिकाधिक प्रबल होत चालले आहेत. त्यामुळे अँटिबायोटिक्सणचा वापरही वाढला आहे. ताप हा खरे तर तापदायक नाही. तो आपल्याला आजाराविषयी सावध करणारा आहे. त्यामुळेच औषधाने ताप दडपून टाकण्याऐवजी त्यामागची कारणे शोधायला हवीत.
    पूर्वी पावसाळ्यात सर्दी-तापाच्या रुग्णांत वाढ व्हायची. सर्दी असली की अंगात थोडी कसकस असायची. काही वेळा तापही अंगात असायचा. पण त्याचे काही वाटायचे नाही. साध्या पॅरासिटामॉलने रुग्ण बरे व्हायचे. तुळशीची पाने टाकून गरम पाण्याचा वाफारा आणि सुंठीचा काढाही सर्दीच्या रुग्णांना पुरायचा. पण गेल्या काही वर्षांत आम्हाला तापही तापदायक वाटू लागलाय. प्रदूषण वाढले आहे. व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे आपली प्रतिकारशक्तीही कमी होते आहे. या पार्श्वयभूमीवर विषाणू मात्र दिवसेंदिवस साध्या औषधांना न जुमानण्याची क्षमता मिळवत आहेत. त्यामुळे बहुतेक रुग्णांना साध्या औषधाने बरे वाटले नाही, तर अँटिबायोटिक्स् देण्याची वेळ येते. पूर्वी ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवायला सांगत होतो. आता त्याचबरोबर छातीवर व पोटावरही पट्टी ठेवायला सुचवत आहोत.
    वास्तविक ताप हा "आजार' नाही, तर ते केवळ आजाराचे एक लक्षण आहे. बहुतेक आजारांमध्ये कमी-जास्त प्रमाणात ताप येतच असतो. तापामध्ये सगळ्याच शारीरिक व्यवहारांवर बंधन येत असल्यामुळे "काहीही करून प्रथम ताप कमी करा' अशी मागणी केली जाते.
    ताप येणे चांगले की वाईट? तापामुळे आपल्या एखाद्या अवयव संस्थेची कायमस्वरूपी हानी होऊ शकते का?
    "ताप' येतो म्हणजे काय?
    आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 36.8 डिग्रीज सेल्सिअस एवढे असते. त्यात थोडा फरक पडत राहतो. हे तापमान आपल्या शरीरातील हजारो रासायनिक क्रिया कार्यक्षमतेने चालण्यासाठी आवश्याक असते. तापमान वाढले तर या क्रिया अधिक वेगाने होतात. तापमान कमी झाले तर त्या संथावतात. हे तापमान शरीरात उष्णता निर्माण होणे आणि शरीरातून उष्णता बाहेर पडणे या दोन गोष्टींवर अवलंबून राहते. उष्णता अधिक निर्माण झाली किंवा बाहेर टाकण्याची क्रिया संथावली की शरीर अधिकाधिक गरम होते. उलटे झाल्यास शरीर थंड होऊ लागते. तापमान 36.8 एवढे ठेवण्याकरिता आपल्या मेंदूतील हायपोथॅलॅमस हा भाग अहोरात्र कार्यरत असतो. आपल्या त्वचेत उष्णता आणि थंडी यांना जाणणारे स्वीकारक असतात. शिवाय हायपोथॅलॅमसला रक्तपुरवठा होत असतो. त्या रक्ताचे तापमानही हायपोथॅलॅमसच्या पेशींवर परिणाम करते. आपण थंड वातावरणात गेलो की त्वचेतील स्वीकारकाकडून ही माहिती हायपोथॅलॅमसकडे जाते. आता शरीर गरम करण्याची वेळ आहे, असा निर्णय मेंदूत घेतला जातो. मेंदूतून सर्व शरीरावरच्या त्वचेकडे संदेश पाठविले जातात. त्वचेतील रक्तवाहिन्यांचे आकुंचन होते व रक्त अंतःस्थ अवयवांकडे वळवले जाते. त्वचेला रक्तपुरवठा कमी झाला की त्वचेतील पेशी गार होतात. हात, पाय, नाक व इतर उघडे भाग गार होतात. ही माहिती परत मेंदूकडे जाते व अधिक उष्णतेची गरज पडते. त्वचेवरील केस उभे केले जातात. त्यामुळे त्वचेभोवती हवा हलत नाही. तेथे हवा स्थिरावते. त्यामुळे हवेचे एक लपेटणे तयार होते. शरीरातून उष्णता बाहेर पडण्याला एक अडथळा निर्माण होतो. एवढ्याने न भागल्यास मेंदूकडून शरीराच्या विविध स्नायूंना इशारा मिळतो. स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होते. त्यालाच आपण हुडहुडी भरणे असे म्हणतो. जबड्याचे स्नायू कार्यान्वित झाले म्हणजे वरचे दात व खालचे दात एकमेकांवर आपटू लागतात. हाताप
    ायांचे स्नायू आलटूनपालटून आकुंचन पावू लागले की अंग कापू लागते. पाठीचे स्नायू कापताना आपल्याला दिसत नाहीत, परंतु ते या प्रक्रियेत मोठा भाग घेतात. ताप येऊन गेल्यावर पाठ दुखत राहते. नाडीची गती वाढते. रक्ताचे अभिसरण अधिकाधिक होते. कवटीच्या आजूबाजूचे स्नायू आकुंचित झाल्याने व रक्तवाहिन्यांचे प्रसरण झाल्याने डोके दुखू लागते. ताप हा आपल्या प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग असतो. ज्या रासायनिक क्रिया जंतूंना नामोहरम करतात त्या अधिकाधिक वेगाने होऊ लागतात. साधारणपणे दर एक डिग्री सेल्सिअस इतके तापमान वाढल्यास 13 टक्के अधिक कार्यक्षमतेने या रासायनिक क्रिया होऊ लागतात, असा अंदाज आहे. प्रतिकाराचा भाग असल्याने ताप येणे हा युद्ध अथवा पलायन या प्रतिसादात भाग घेतो.
    तापमान स्थिर कसे राहते?
    शरीराची उष्णता त्वचेद्वारा बाहेर टाकण्याच्या दोन पद्धती अशा-
    1) उष्णता वाहून नेणे (संवहन) ः आपल्या त्वचेचा उघडा भाग एखाद्या कमी तापमानाच्या वस्तूच्या संपर्कात असेल तर शरीराकडून त्या वस्तूंकडे उष्णतेचे वहन होते. उदाहरणार्थ, आपण खुर्चीवर बसलेले असू तर शरीरातील उष्णता खुर्चीकडे वाहून जाईल.
    2) घाम येणे ः शरीरात उष्णता वाढल्यावर घाम येतो. त्याचे बाष्पीभवन होऊन त्वचेचे तापमान कमी होते. त्वचेचे तापमान कमी झाले की आतली उष्णता रक्ताद्वारा त्वचेपर्यंत आणली जाते. त्वचेतील रक्तवाहिन्यांतला रक्तप्रवाह वाढतो आणि अधिकाधिक रक्त त्वचेपर्यंत पोचून उष्णता बाहेर टाकली जाते. एवढ्या साऱ्या यंत्रणा कार्यरत असताना शरीराचे तापमान वाढून ताप का येतो?
    ताप म्हणजे काय?
    शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाणे म्हणजे ताप होय. साधारणपणे केव्हाही शरीरातील चयापचयाचा वेग वाढला की शरीरात उष्णता वाढते (उदा.- व्यायाम केल्यावर किंवा अति तणावपूर्ण मनःस्थिती, इत्यादी) पण रूढार्थाने ज्याला ताप म्हणतात तो हा नव्हे. कारण यात उष्णता शरीराबाहेर टाकली जात असते आणि तापमाननियंत्रक यंत्रणा योग्य पद्धतीने कार्य करत असते. सर्वसाधारणपणे येणारे ताप विषाणू किंवा जीवाणू यांच्यामुळे येतात. या जीवाणू-विषाणूंचे काही भाग शरीरात गेल्यावर त्यांना नष्ट करण्याची क्रिया सुरू होते. अनेक जीवाणू दूषित रासायनिक रेणू तयार करतात, त्यांना एण्डोटॉक्सिुन्स म्हणतात. या एण्डोटॉक्सिषन्सचा अतिसूक्ष्म डोसदेखील माणसाला ताप आणवू शकतो.
    आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सायटोकाइन्स नावाचे सूक्ष्म प्रथिनांचे रेणू. आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीमध्ये हे रेणू महत्त्वाची भूमिका बजावतात. सायटोकाइन्सचे बरेच प्रकार असतात, परंतु शरीरात ताप आणविण्याच्या प्रक्रियेत हे रेणू खूप महत्त्वाची कार्ये करतात. टायपोथॅलॅमसमधील तापमानावर ताबा ठेवणाऱ्या यंत्रणेवर सायटोकाइन्सचा परिणाम होतो व शरीराचे तापमान वाढविले जाते. ताप हा प्रतिकाराचा महत्त्वाचा भाग असल्याने तो काहीही करून उतरविण्याच्या उपचारांचा अधिक विचारपूर्वक वापर करणे इष्ट असते. ताप बहुतेक वेळा विषाणूंमुळे येतो. तो निसर्गक्रमाने आपोआप उतरणारा असतो. दर तापामध्ये ताप उतरवण्यासाठी औषध घेणे आवश्योक नसते, इष्ट नसते. साध्या तापावर तीन दिवस पूर्ण विश्रांती हाच अधिक परिणामकारक उपाय आहे.
    ताप उतरवण्यासाठी दिलेल्या औषधाने तापाचा नैसर्गिक चढउतार आखला जातो, त्याप्रमाणे तापाच्या कारणाचे निदान अस्पष्ट केले जाते. या उपचारांनी खूप घाम सुटतो. त्यामुळे शरीरातून पाणी व क्षार यांचा निचरा होतो. थकवा वाढतो. औषधांचा परिणाम उतरला की परत ताप भरतो. दर वेळी ताप भरताना स्नायूंचे आकुंचन होते. ऊर्जा वाया जाते.
    स्नायू दुखतात. थकवा पुन्हा वाढतो. आजार जाणे महत्त्वाचे असते, परंतु ताप उतरण्याने आजार तसाच राहिलेला असतो. शिवाय या ताप उतरवण्याच्या औषधांना नको असणारे अनेक परिणाम असतात. बहुतेकांच्या जठराच्या अस्तराचा दाह होतो. आम्लपित्त (ऍसिडिटी) वाढते. काहींना यकृताच्या पेशींवर अपायकारक परिणाम होऊन कावीळ होते. अनेकांचा मूत्रपिंडावर परिणाम होऊन शरीरात सोडिअम क्षार साचू लागतो. परिणामी, रक्तदाब वाढतो. हृदयावर ताण येतो. अंगावर सूज येते. ऍस्पिरीनसारख्या औषधाने रक्तस्राव होण्याचा संभव निर्माण होतो. शिवाय ऍस्पिरीनमुळे लहान मुलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायक पातळीवर उतरू शकते. नेम्युलसीड हे जगभर बंदी असलेले औषध फक्त भारतातच मिळते. भारतात बारा वर्षांखालील मुलांना हे औषध देण्यास बंदी आहे. मात्र खरे तर ते वापरूच नये.
    तापामध्ये भरणारी थंडी (चिल)
    तापमाननियंत्रक यंत्रणेचा "स्थिरबिंदू' अचानक वर जातो; पण शरीराचे तापमान मात्र हळूहळू वाढते. दरम्यानच्या काळात रक्ताचे तापमान "स्थिरबिंदू'पेक्षा कमी असते. "स्थिरबिंदू'चे तापमान जास्त आणि रक्ताचे कमी, अशा स्थितीमुळे चेतातंतूंना थंडीचा आभास होतो. त्यामुळे रुग्णाला खूप थंडी वाजते. अशी थंडी कोणत्याही तापात वाजू शकते. थंडी वाजून येणारा ताप हा युरीन इन्फेक्शंनचाही असू शकतो.
    हुडहुडी (रायगर्स)
    कधी कधी- विशेषतः तापामध्ये "स्थिरबिंदू' वाढल्यामुळे ताप येतो. स्थिरबिंदूवर असतानाच घाम येऊन ताप कमी होतो. अचानक तापमान कमी होऊ लागते. मग तापमान एका विशिष्ट मर्यादेखाली जाऊ नये याकरिता स्नायूंवरील तणाव अचानक वाढतो आणि स्नायूमध्ये उष्णता निर्माण होते. शरीरात उष्णता काही प्रमाणात राहावी यासाठी ही क्रिया शरीराकडून वारंवार केली जाते. त्यालाच आपण हुडहुडी म्हणतो.
    ताप चांगला की वाईट?
    यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ताप हा रोग नाही, तर रोगाचे एक लक्षण आहे. ते आपल्याला सांगते, की कुठेतरी काहीतरी गडबड आहे. जोपर्यंत ही गडबड, म्हणजे तापाचे कारण सापडत नाही, त्यावर उपचार होत नाहीत, तोपर्यंत फक्त ताप उतरवण्यासाठीच्या औषधांसारखे (उदा.- "क्रोसिन') उपाय म्हणजे फक्त वरवरची मलमपट्टी आहे. (जरी तापामुळे आपल्या शारीरिक दिनक्रमांवर मर्यादा येत असली तरी ताप दडपून टाकण्यासाठी डॉक्टतरांवर दडपण आणणे उपयोगाचे नाही. कारण ताप कमी झाला म्हणजेच रोग कमी झाला, असे नव्हे) किंबहुना कित्येकदा तापाच्या पॅटर्नवरून रोगाचे निदान होण्यास मदत होते. उदाहरणार्थ (1) "संध्याकाळी येणारा ताप' - "लो-ग्रेड फीव्हर' गटात मोडणारा हा ताप क्षयाच्या रुग्णांमध्ये आढळतो. (2) सेकंडरी, टर्शरी, क्वार्टन फीव्हर - म्हणजे दर दुसऱ्या, तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी विशिष्ट वेळी येणारा ताप. मलेरियाचा ताप या प्रकारचा असतो. (3) सततचा जादा ताप - न्यूमोनियामुळे येणारा ताप असतो. (4) स्टेप लॅडर पॅटर्न - शिडीच्या पायऱ्यांप्रमाणे हा ताप काही काळ स्थिर राहतो. मग वर चढतो. तेथे काही काळ स्थिर राहतो; मग आणखी वर चढतो. टायफॉईडमध्ये येणारा ताप अशा स्वरूपाचा असतो. ब्लड कल्चर टेस्टमध्ये पहिल्या चार दिवसांत विषमज्वर कळू शकतो. याचा अर्थ असा नव्हे, की ताप आला तर येऊ द्यावा किंवा त्यावर उपाय करू नये. तर तो कशामुळे आला यावर लक्ष केंद्रित करावे. ताप आला की ताबडतोब एखादी गोळी घेऊन कामाला लागणारे, दुखणे अंगावर काढणारे अनेक जण असतात. कित्येकदा ती त्यांची अपरिहार्यता असते. कदाचित अशा दोन-चार गोळ्यांनी ताप थांबेलही; पण तो का आला होता ते कळणार नाही. कुठेतरी काहीतरी गडबड आहे, असंतुलन आहे, असे ताप आपल्याला सांगत असतो. तेव्हा त्याचे सांगणे ऐकून घेणे हेच महत्त्वाचे. ताप अंगावर न काढता सरळ डॉक्टारांची भेट घेणे सर्वोत्तम.
    ताप आल्यास काय करावे?
    निव्वळ तापाच्या प्रकारावरून म्हणजे केव्हा येतो, किती चढतो या बाबींवरून तापाचे कारण साधारणपणे ओळखता येते. पण हल्ली अनेक डॉक्टचरांशी बोलताना असे जाणवते, की पूर्वी वैद्यकशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणेच आढळणारा ताप रोगनिदानास साह्यभूत ठरत असे, तसे हल्ली दिसत नाही. हल्ली ताप बऱ्याचदा "टिपिकल' स्वरूपाचा नसतो. (पुस्तकांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे असतोच असे नाही) अशा वेळी तापाबरोबरच असणारी अन्य लक्षणे महत्त्वाची ठरतात. कोणत्या अवयवसंस्थेमध्ये जंतुसंसर्ग झाला आहे ते या अन्य लक्षणांवरून ओळखले की मग रोगनिदान सोपे होते. उदा.- खोकला असेल तर श्वंसनसंस्थेमध्ये संसर्ग, अंग मोडून येत असेल तर विषाणुसंसर्ग किंवा फ्लू इत्यादी.
    ताप आल्यामुळे आपल्या शारीरिक व्यवहारांवर मर्यादा येते, एक प्रकारचा अस्वस्थपणा वाटत असतो. म्हणून ताप ताबडतोब कमी व्हावा अशी प्रत्येक पेशंटची इच्छा असते. पण एखादी गोळी वारंवार घेऊन ताप दडपून टाकण्यापेक्षाही काही अधिक योग्य गोष्टी आपण करू शकाल, त्या अशा ...
    1) तापाची नोंद ठेवावी - थर्मामीटर किमान एक मिनिट तोंडामध्ये ठेवून तापमानाची नोंद करावी. दिवसातून तीन-चार वेळा पुनःपुन्हा तापमान तपासून त्याची योग्य नोंद केल्यास डॉक्टारांना निदान करण्यास तिचा उपयोग होईल.
    2) ताप असताना शक्य तो अधिक कपडे किंवा अधिक चादरी अंगावर घालू नयेत. कपड्यांचे दोन किंवा तीन थर जर असतील तर त्यामध्ये हवेचे थर राहतील. हवा ही उष्णतेची दुर्वाहक आहे. त्यामुळे त्वचेवाटे उष्णता बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत गतिरोध निर्माण होऊ शकतो. खूप थंडी वाजत असेल तर एकच जाड वस्त्र आणि जाड चादर अंगावर घ्यावी.
    3) तापमान नैसर्गिक रीतीने कमी करण्यासाठी डोक्याववर, पोटावर, छातीवर साध्या पाण्यात भिजवलेली पट्टी ठेवावी. ही पट्टी तेवढ्या भागातली उष्णता शोषून घेते. तेवढ्या भागाचे तापमान कमी झाले की मग शरीरातील अन्य भागातील उष्णता रक्ताद्वारा त्या भागात पोचते, ती पुन्हा पट्टी शोषून घेते. हे करताना पट्टी सतत बदलत ठेवावी. म्हणजे पुन्हा पुन्हा पाण्यात भिजवून ठेवत राहावी किंवा ओल्या फडक्याेने संपूर्ण अंग सतत पुसून काढावे.
    4) तापामध्ये घाम येईल असे पाहावे. घामाचे बाष्पीभवन झाल्यास तापमान कमी होत असते.
    5) शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) चांगली राहील याकडे लक्ष पुरवावे. अधूनमधून थोडे थोडे पाणी पीत राहावे.
    6) ज्या अवयव संस्थेशी संबंधित लक्षणे असतील, त्या लक्षणांवर उपचार करावेत. उदा.- खोकला असल्यास गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. याने कफ मोकळा होऊन लवकर पडून जाईल. ताप लवकर कमी होईल. जुलाब असल्यास पाण्यामध्ये मीठ, साखर व लिंबू पिळून ते सतत थोडे थोडे पीत राहावे.
    7) ताप जंतुसंसर्गामुळे येत असतो आणि त्यावरील औषधे व प्रतिजैविकांचा कोर्स केल्यानंतरच्या कालावधीत जीवनसत्त्वांच्या (व्हिटॅमिन्स) गोळ्यांचा कोर्सही जरूर करावा. तापामुळे झालेली झीज आणि प्रतिजैविकांनी निर्माण केलेली घट भरून काढण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • एनर्जी देणारी काटेसांवर

    ह्या दिवसात फेब्रुवारी मार्च महिन्यात काटेसावर हा वृक्ष फुलांनी बहरतो. पेपरमधे फोटोपण येतात. ह्याच्या फुलांचा माझा अभ्यास होण्याचा योग आला.

    1995चे डिसेंबर मधे, वयाच्या 49 वर्षी, माझे हातापायाचे स्नायूतील घट्टपणा जाऊन लूज पडले अगदी 80 वयाचे वृध्दासारखे. ह्या आधी मी एक गोष्ट ऐकली होती.

    -- एका ट्रक ड्रायव्हरला अपघात होतो म्हणून लोकं त्याला बडवतात आणि तो दुसरे दिवशी मित्रांच्यात येतो, मित्र विचारतात अरे काल तुला एवढा मार बसला आणि तू इथे कसा? त्रास होत नाही का? तो सांगतो कांटेसावरीचे फुल खाल्ले. त्यामुळे त्रास गेला.--

    ही 1992 साली ऐकलेली गोष्ट एकदम आठवली. विचार केला मार बसून त्रास होतो तो स्नायुना. म्हणजे हे फुल स्नायुवर काम करते. दैवयोगाने फेब्रूवारी 96 ला आमचे जवळ असणारे काटेसावर फुलले असल्याचे लक्षात आले. मी एक फुल खाल्ले. अतिशय गिळगीळीत लागले तरीपण खाल्ले. रोज एक फुल खात होतो. आठ दिवसांत माझे स्नायुत जोर येऊन पूर्ववत झाले.

    ह्यानंतर मी ही फुले सुकवून पावडर करून गोळ्या केल्या. ह्या गोळ्या प्रथम ट्रायल म्हणून श्री आगाशे (वय 82) यांना दिल्या. दुसर्याच दिवशी त्यांचा मला फोन आला. "तुम्ही कसल्या गोळ्या केल्यात ताबडतोब या." मी घाबरलो व सगळी कामे सोडून त्यांच्याकडे गेलो.एवढे तातडीने बोलावले काय त्रास झाला असे विचारले. त्यांनी मला खुर्चीत बसायला लावले. आणि स्वतः उठून चालायला लागले व म्हणाले, "तुमच्या गोळ्यां घेतल्यावर अर्ध्या तासांतच माझी चाल सुधारली आहे बघा." त्याच्या चालीत बरीच सुधारणा होती. ते भरभर चालत होते.

    ह्या गोळ्यांचा उपयोग चांगला झाला व होत आहे. ह्या गोळ्यांमुळे स्नायुना फायदा होतो, एनर्जी येते, आजारपणा नंतरचा थकवा जातो, असा माझा व माझेकडील पेशंटचा अनुभव आहे. (पेशंट बघितल्या शिवाय मी औषधे देत नाही) साठ वयाच्या पुढील लोकांना खुप उपयोग होतो. व्हायटल एनर्जी वाढते असा अनुभव आहे.

    सध्या ह्या फुलांचा सिझन आहे. शहरात ही झाडे लावली जात नाहीत ( आहेत ती तोडली जातात). ही फुले गोळा करून, सुकवून, मिक्सरमधे पावडर करून ठेवून वापरावी. घरच्यासाठी गोळ्या करणे गरजेचे नाही. ही पावडर पाण्या बरोबर वा मधा बरोबर आवश्यकतेनुसार घ्यावी. फुलांचा गुलकंद पण करता येतो व तो पण उपयोगी पडतो.
    फोटो बघण्यासाठी लिंकवर क्लीक करा
    http://www.google.co.in/search?site=webhp&tbm=isch&oq=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87&aqs=mobile-gws-lite.3.0l5&q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0#imgrc=7vljf1cdu05g1M:

    अरविंद जोशी (बी.एस्सी.)
    9421948894

  • ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’

    ‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रण देखील असू शकतं. हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.
    पित्त प्रकृती
    ‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.
    पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.
    काय टाळावं-
    यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.
    वात प्रकृती
    ‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.
    वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.
    वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.
    कफ प्रकृती
    ‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.
    कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं?
    या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.
    काय टाळावं-
    पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- वैद्य राहुल सराफ

  • किचन क्लिनीक – तुप कसे वापरावे

    १)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे.

    २)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो.

    ३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले.

    ४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे.

    ५)अजीर्णाचा त्रास असताना तुप सेवन करू नये.

    ६)तुपाचा वापर करत असताना नियमीत गरम पाणीच वापरावे.

    तुप कोणी खाऊ नये:

    स्थूल मेदस्वीव्यक्ती,आमवात,भुकनसणे,
    अजीर्ण,जुलाब व कफाचे विकार असल्यास तुप सेवन करू नये.

    तूपसेवनाचाअतिरेक केल्यास,मळमळ,
    उल्टी,जुलाब व शरीरात अवास्तव चरबी वाढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 1

    केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी पथ्य एकच. मी मला स्वतःला बदलायची तयारी ठेवायला हवी.

    नेमकी जेवणाची वेळ कोणती आहे, यावर पुनः मतमतांतरे असण्याची शक्यता आहे.
    आयुर्वेद म्हणतो. रोगाच्या मुळापर्यंत पोचा. तरच तो रोग कायमचा नष्ट होईल......

    ......केवळ वैद्य सुविनय दामले म्हणतो आहे, म्हणून नव्हे, हा अहंकार मुळीच नाही. एक आयुर्वेदभक्त म्हणून जे योग्य असेल ते सांगण्याची, आणि जे अनुभवले आहे ते इतरांना वाटण्याची मला आवश्यकता वाटते. म्हणून लिहितोय. नाहीतर मी माझ्या व्यवसायात ठीक आहेच.

    समर्थ म्हणतात,
    जे जे आपणास ठावे,
    ते ते दुसऱ्यास सांगावे
    शहाणे करूनी सोडावे
    सकल जन.

    मी खूप सकारात्मक बदललोय. माझ्यातला बदल मलाच आश्चर्य वाटणारा आहे.
    मी जे माझ्या स्वतःवर प्रयोग करतोय, जे गेली पंचवीस तीस वर्षे प्रत्यक्ष अनुभवतोय, जे माझ्या आयुर्वेदीय ग्रंथात वाचले आहे, जे माझ्या अनेक गुरूंकडून शिकलोय, जे माझे अनेक रूग्ण श्रद्धेने करत आहेत, त्यांच्यातील बदलाचे अनुभव परत येऊन सांगताहेत, ते फक्त शब्दबद्ध करून सांगतोय. काय लिहायचे, हे सुचवणारी, लिहवून घेणारी ती निसर्गशक्ती ( देव म्हटलं तरी काही जणांना पोटशूळ उठतो हल्ली.) मला सतत मदत करतेय, त्यामुळे हे लेखन कर्तृत्व माझे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. मी फक्त निमित्तमात्र आहे.

    कसं वागायचं, आणि ते कसं आचरणात आणायचं, स्वतःला कसं बदलायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

    कायदे करून सगळे प्रश्न सुटत नसतात, कायद्याची भीती दाखवून तर काहीच होत नसते. अहो, पूर्वी पोलीस म्हटले तरी भीती वाटायची. आता काही वाटेनासे झाले आहे. भीतीचा बडगा संपलाय. भारतीय विचार सरणी ही कायद्यापेक्षा पाप आणि पुण्याला जास्त घाबरते, ही वस्तुस्थिती आहे, ही भारतीय मानसिकता आहे. जे चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना सरळ मार्ग दाखवणे ही जर चुक असेल तर ही चुक मी वारंवार करेन.

    धृतराष्ट्र आणि गांधारी प्रत्येक वेळी आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरुण घालत राहिली, चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत राहिली, म्हणून कौरव उन्मत्त झाले. आणि राजा असून देखील, संख्येने अधिक असूनही, स्वतः सकट स्वतःच्या कुळाचा सर्वनाश ओढवून घेतला. हा इतिहास विसरून कसा चालेल ?

    चला, सावध होऊया.
    त्या नीलकंठ शिवशंभुला शरण जाऊया.
    आपल्या मनातील विद्वेषाचे विष नष्ट करूया.
    अजूनही वेळ गेलेली नाही.
    आयुर्वेद समजून घेऊन जगुया !!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    24.02.2017

  • किचन क्लिनीक – तुपाचे प्रकार व गुण भाग २

    ४)मेंढीचे तुप:

    पचायला जड,तत्काळ पोषण व बल गाणारे,शरीर पुष्ट करंणारे.नाजूक प्रकृतीच्या माणसांनी ह्याचे सेवन करू नये.

    ५)ताजे तुप:

    श्रमनाशक,तृप्तीकर,नियमीत भोजनात सेवन केल्यास अशक्तपणा,रक्ताची कमतरता भरून काढते.तसेच डोळंयाना हितकर आहे.

    ६)जुने तुप:

    दहा वर्षांवरील तुपास रसायन म्हणतात.शंभर वर्ष जुन्या तुपाला कुंभसर्पि म्हंणतात.त्याहीपेक्षा जुने तुप म्हणजे महाघृत होय.जसजसे तुप जुने होत जाते तसे ते अधिक गुणकारी होते.जुने तुप खोकल्याचा नाश करते,डोळ्यांना हितकर आहे,टाळुवर चोळून जिरवले असता मानेच्यावरील सर्व आजारांना बरे करते,तसेच ते त्वचारोगा मध्ये देखील उपयुक्त आहे.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तेरा

    परत परत त्याच शंका विचारल्या जात आहेत, याचा अर्थ मला नेमकेपणाने काय म्हणायचं आहे ते नीट समजले नसावे. एकतर मला नीट सांगता येत नसावे, किंवा वाचणाऱ्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला नसावा. असो. पुनः एकदा सांगतो. कोणतेही, कोणाचेही गैरसमज नसावेत

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग बारा

    केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.

    म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
    भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !

    थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.

    हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.

    त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.

    आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.

    तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
    त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
    यालाच म्हणतात,
    चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
    भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
    माझे काही चुकलंय का ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.02.2017

  • जीभेची कशी घ्याल काळजी?

    आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती आहे. त्या तुमच्या जीभेवर जास्त प्रमाणात पांढरट थर साचलाय का? असं असेल तर ती निश्चीतच चिंतेची बाब असू शकते.

    दातांसाठी ब्रश करणं जितकं महत्वाचं आहे. तितकंच जीभेची स्वछता राखण पण गरजेचं आहे. तोंड धुताना डॉक्टरांच्यामते जीभ टंग क्लिनरनं स्वच्छ करावी. टंग क्लिनरनं जीभ स्वच्छ करताना जीभेवर जास्त दबाव टाकू नये. दोन-तीन वेळा हलक्या हतांनी टंग क्लिनरचा उपयोग करावा. आपल्या तोंडामध्ये हानिकारक जीवाणूंना जराही थारा देवू नका.
    तोंडाच्या आजारांशी संबंधीत विशेषज्ज्ञ सोनाली बस्सींच्या मते गडद रंगाचे खाद्य पदार्थ खाल्यामुळं जीभेचा रंग बदलतो. परंतु ते एवढे हानीकारक नसते आणि ते टंग क्लिनरच्या साहाय्यानं स्वच्छ करता येवू शकतात. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा धातुचा टंग क्लिनर वापरता येतो. काही कंपन्याच्या ब्रशच्या मागं जीभ स्वच्छ करण्यासाठीची सोय केलेली असते. ज्यामुळं आपण दातही घासू शकतो. आणि जीभही साफ करू शकतो.

    जीभ स्वच्छ करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे माउथवॉशचा वापर करणे. अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाच-सहा वेळा गुळण्या करण्यानं सुध्दा जीभ स्वच्छ करता येते. जीभेवर घाण असल्यास ते डिहॉयड्रेशनचं कारण ठरु शकतं. त्यामुळं आपल्या जीभेची काळजी घ्या.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट