(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • उन्हामुळे मृत्यू का होतो?

    आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

    आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात

    घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.

    पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं

    जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

    शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

    स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.

    रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

    माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

    उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.

    Hot & cold food list

    सफरचंद - थंड
    चिकू - थंड
    संत्री - उष्ण
    लिंबू - उष्ण
    कांदा - थंड
    बटाटा - उष्ण
    पालक - थंड
    टॉमेटो - उष्ण
    कारले - उष्ण
    कोबी - थंड
    गाजर - थंड
    मिरची - उष्ण
    मका - उष्ण
    मेथी - उष्ण
    वांगे - उष्ण
    भेंडी - उष्ण
    बीट - थंड
    बडीशेप - थंड
    वेलची - थंड
    पपई - उष्ण
    अननस - उष्ण
    डाळींब - थंड
    ऊस - उष्ण
    मीठ - थंड
    मूग डाळ - थंड
    चणा डाळ - उष्ण
    गुळ - उष्ण
    तिळ - उष्ण
    शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
    हळद - उष्ण
    कॉफी - थंड
    दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड

    उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो .

    आयुर्वेदातून संकलन

  • कफाचे प्रमाण

    फाल्गुन व चैत्र महिन्यात आपल्या शरिरातील कफाचे प्रमाण निसर्गत: वाढत असते असे रंगकिरण चिकीत्सेत सांगितले आहे.म्हणून ह्या महिन्यांमधे सकाळी अनाशा पोटी पिवळ्या व गर्द निळया रंगाच्या बाटलीत सुर्य प्रकाशात चार्ज केलेले पाणी सम प्रमाणात मिसळून एक डोस सकाळी आणि रात्री एक डोस घ्यावा असे सांगितले आहे. त्या प्रमाणे मी गेली तीस वर्ष करत आहे.त्यामुळे ह्या दिवसात शरीर हलके राहते आळस व खोकल्याचा त्रास होत नाही.

    ज्यांना पाणी चार्ज करणे जमत नाही त्यानी रात्रभर पोटाला गर्द निळे व छातीवर पिवळे स्वस्तिक लावावे फायदा होतो.

    तसेच ह्या दिवसात कडूलिंब व साखर किंंवा गूळ कालवून खाल्ला तरी उपयोग होतो. तसेच सुंठसाखर खाल्लीतरी फायदा होतो. ह्या दोन्ही महिन्यांचा केद्रबिंदु म्हणजे गुढी पाडवा. गुढीला कडूलिंब व साखरेची गाठी. हे गुढी उतरवयानंतर आपण खाण्यासाठी आहे.

    तसेच राम नवमी व हनुमान जयंतीला प्रसाद काय तर सुंठसाखर.! ह्या दिवसात हे पदार्थ ह्या दिवसांतील औषध आहे आणि हे औषध एकदातरी पोटात जावेत म्हणून आमच्या पूर्वजानी देवाच्या नावे ह्या प्रथा पाडल्या आणि समाजाचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. ते अडणी, मागासलेले नक्कीच नव्हते.

    -- अरविंद जोशी B.Sc.

    ह्या लेखात सांगितलेल्याला ग्रंथाधार आहे का नाही हे मला माहीत नाही.मला आलेल्या अनुभवांवरून माझे विचार मांडले आहेत

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 7

    आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ?

    दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे.
    काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण घ्यावे. म्हणजे पचनाला पुरेसा वेळ मिळतो.

    आधी पोटोबा मग विठोबा
    आधी स्वार्थ मग परमार्थ
    या म्हणी केव्हा तयार झाल्या असतील ? कोणत्या परिस्थितीमधे तयार झाल्या असतील, त्याचा परत एकदा विचार करायला हवा. एका पिढीपूर्वीची मुलाखत घेतली तर याचा उलगडा होत जाईल.

    ती माणसे सांगतात, आमच्यावेळी सूर्यास्ताचे अग्निहोत्र झाले की लगेचच दिवसाउजेडी एकाने देवाकडे, अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा, ( घरात येणारी लक्ष्मी काळोखातून कशी येणार ? म्हणून अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा. ) तर दुसरीने स्वयंपाकघरात दिवा लावून पाटपाणी घ्यायचे. आधी स-अवकाश भोजन करून नंतर सावकाऽश भजन करीत बसायचे...... मग परमार्थ !

    तेव्हा सारवलेल्या जमिनीवर ताट पाट मांडून खाली बसून, मांडी घालून पंगत वाढून जेवायचे. घरात कुटुंब नियोजन नव्हते, गोकुळ होते. दहा पंधरा माणसे एकमेकांशी बोलायची, शुभंकरोती एका सुरात म्हटली जायची,पाढे पावकी निमकी, सर्व श्लोक स्तोत्रे यांची उजळणी व्हायची.

    चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या घरातील परिस्थिती आठवली तर टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे रेडीओ आणि सिनेमा थिएटर. थिएटरमधे जाऊन हौस म्हणून सिनेमा पहाणे त्या तिकिटासाठी तब्बल दोन ते अडीज रूपये खर्च करणेदेखील परवडत नव्हतं. एवढा श्रीमंत काळ आपण अनुभवला आहे.

    त्याआधीची फक्त वीसेक वर्षे आता आठवून पहा. म्हणजे आपल्या बाबांच्या लहानपणीचा काळ सुखाचा......

    रेडिओ ही अत्यंत प्रतिष्ठेची चीज होती, गावातील एखाद्या घरीच तो असायचा, बिनाका गीतमाला ऐकायला दर्दी गर्दी जमायची, तेव्हाच्या काळातील जेवणाच्या वेळा आठवून बघा, त्या काळातील ज्येष्ठ माणसांना आजही विचारून पहा. तेपण सांगतील, " आमच्या तारूण्याच्या सुवर्ण युगात आमची जेवणे दिवसाउजेडी संपायची. लाईटपण नव्हता तेव्हा. रात्री साडेआठ नऊ वाजता झोपी जात होतो."

    विज्ञानयुग आले, विद्युतीकरण झाले, प्रगती झाली, विकास झाला. कोपऱ्यात टीव्ही आला. करमणुकीचे साधन बदलले, दूरदर्शनवर बातम्या देणारी माणसे, त्यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या माशा देखील पहाता यायला लागल्या. मालिका पहायला वेळ कमी पडू लागला. त्याच दरम्यान स्वयंपाकघरात कुकर आला, मिक्सरपण आला. मनोरंजन ही गरज बनली. खाना खान्यातला (म्हणजे स्वयंपाकघरातला) वेळ दिवाणखान्यात जाऊ लागला.
    गोजिरवाण्या घरात लाजीरवाण्या सिरीयल सुरू झाल्या. बातम्यांपेक्षा जाहीरातीमधे जास्ती वेळ जाऊ लागला. आणि हळुहळू सगळंच बदललं. सुखाच्या कक्षा वाढत गेल्या आणि.....
    विठोबा मागं गेला आणि पोटोबा पुढे आला........

    कसं बदलत गेलं? कोण बदलत गेलं ? कोणी बदललं हे सगळं? कधी कळलंच नाही.

    मुठीत घट्ट धरून ठेवलेल्या वाळूसारखं दोन्ही बाजूने ते बाजूला कधी पडत गेलं लक्षातही आलं नाही. आरोग्याची मूठ कधी रिकामी झाली, ते कधी समजलं देखील नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02.03.2017

  • पोटदुखीची कारणे

    पोटदुखीची आणखी काही कारणे आहेत. स्टमक फ्लू किंवा विषाणूद्वारे होणारे पोटातील संक्रमण, अन्नातून विषबाधा होणे, कृमी होणे, अॅ सिडिटी, टायफॉईड, कावीळ या आजारांमध्ये पोटदुखी होते. ही कारणे केवळ उदाहरणासाठी आहेत. यामध्ये पोटदुखीची सर्वच कारणे समाविष्ट नाहीत. पित्ताशयातील खडे, किडनी स्टोन, रक्त वाहिन्यामधील अडथळा निर्माण होणे, गाठ होणे किंवा अन्य कारणांमुळे सुद्धा पोटदुखी होऊ शकते.

    लक्षणे
    पोटात मुरडा येऊन वेदना होणे, पोट फुगणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठतेची समस्या होणे, उलटी होणे, मळाद्वारे आव किंवा रक्त पडणे अशा स्थितीत पोट दुखत असल्यास, वारंवार उलट्या होत असल्यास, पोटाला स्पर्श करताच तीव्र वेदना होत असल्यास किंवा श्वारस घेण्यास त्रास होत असल्यास तसेच पोट साफ होण्यास अडचण येत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.

    उपचार
    पोटदुखीवर उपचार हा त्यामागची कारणे आणि लक्षणांच्या आधारावर केला जातो. साधारणपणे अपचनासाठी अॅचन्टासिड किंवा गॅस दूर होण्याची औषधे दिली जातात. डॉक्टरांच्या सल्ल्याने कृमी नष्ट करण्याचे औषध घेता येऊ शकते. हलका आहार ठेवावा, पुरेशा प्रमाणात पातळ पदार्थ घ्यावेत, परिस्थिती नियंत्रणात नसल्यास रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जावे आणि उपचार करावा.

    पोटदुखीपासून बचाव करण्यासाठी काही सामान्य नियम पाळता येऊ शकतात. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ आहार याकडे लक्ष द्यावे. फळांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. तळलेले, मसालेदार पदार्थ कमी खावेत. नियमित अंतराने आणि कमी प्रमाणात आहार घ्यावा. खाण्यापूर्वी आणि शौचालयातून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. याचे कारण म्हणजे पोटातील संक्रमणाची बरीचशी कारणे असू शकतात. अस्वच्छ अन्न खाणे किंवा पाणी पिणे, अस्वच्छ हातांद्वारे शरीरात जंतूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे वारंवार जुलाब होणे, अशक्तपणा वाटणे, उलटी होणे, काही वेळेला ताप येणे अशी लक्षणे दिसतात.

    पोट खराब असेल तर तात्पुरते घरगुती उपाय काही प्रमाणात नक्कीच आराम देऊ शकतात.
    सफरचंदाचे व्हिनेगर : पोटदुखीसाठी सफरचंदाचे व्हिनेगर खूप लाभदायक ठरते. यामध्ये पेक्टीनचे प्रमाणे मुबलक प्रमाणात असते. यामुळे पोटदुखी आणि मुरडा येणे यापासून आराम मिळतो. तसेच यातील आम्लीय गुण खराब पोटातील संक्रमण बरे करण्यास उपयोगाचे ठरते. एक चमचा व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून ते प्यावे.
    आले : पोट बिघडल्यास आल्याचा वापर खूप फायद्याचा ठरतो. यामध्ये अॅेन्टीफंगल आणि अॅ न्टीबॅक्टेरीयल घटक असतात. ते पोटदुखीपासून आराम देतात. एक चमचा आले पावडर दुधात मिसळून दिल्यास आराम मिळतो.
    दही पोटदुखीत दही फायद्याचे ठरते. यातील जीवाणू संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे पोट लवकर बरे होते आणि ते थंडही राहते.

    केळे वारंवार जुलाब होत असल्यास केळ खाणे फायद्याचे ठरते. कारण केळामध्ये पेक्टीन असते ते बांधण्याचे काम करते. तसेच त्यात पोटॅशियम भरपूर असल्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो.

    पुदिना पुदिन्याची पाने प्राचीन काळापासून अनेक समस्यांवर उपचार म्हणून वापरली जातात. यातील अॅ्न्टीऑक्सिडन्ट पचन क्रिया सुधारण्यासाठी सहाय्यक ठरतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ संतोष काळे

  • मन कि बात – जयहिन्द

    माझी पत्नी जिथे नोकरी करते, तिथल्या रोजच्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करत असते. ती सांगत असलेल्या सर्वच गोष्टींकडे माझं लक्ष असतंच असं नाही परंतू काही वेगळ्या गोष्टी मात्र कान आणि लक्ष वेधून घेतात.हल्ली तिच्या बोलण्यात ‘जयहिन्द’ हा शब्द वारंवार येऊ लागलंय ह्याची मी नोंद घेतली व माझं कुतूहल जागृत झालं.

  • डिलिव्हरी नंतर काय कराल; काय टाळाल?

    सध्याच्या काळात हा एक यक्षप्रश्नच झाला आहे. खरं तर हा काही गहन प्रश्न नाही. पण दुर्दैवाने एखाद्या शास्त्राची काहीही माहिती नसलेले लोक ‘असं काही शास्त्र नसतंच’ अशी अवैज्ञानिक विधानं करून आपली मतं लोकांच्या डोक्यावर थापण्याचे प्रकार करत असतात त्यातलाच हा भाग. काही मुद्दे क्रमाने पाहूया.
    - तेलाचे मालिश करावे का?
    पूर्वीपासूनच बाळ-बाळंतीण यांना कोमट तेलाने मालिश करण्याची पद्धत आपल्याकडे होती. प्रसूतीच्या काळात या दोघांवरही शारीरिक ताण पडत असल्याने वात वाढीला लागतो. हा वात आटोक्यात आणण्यासाठी दोघांनाही कोमट बला तेल किंवा अगदी सध्या तीळ तेलाचे मालिश करणे आवश्यक ठरते. त्यामुळे तसे मालिश अवश्य करावे.
    - पोट बांधणे
    बाळंतीणीचा गर्भाशय प्रसूतीनंतर त्याच्या मूळ आकारावर पुन्हा जायला; म्हणजे आक्रसायला सुरुवात होते.
    अशा स्थितीत वात वाढू नये. तसेच शरीर बेढब दिसू नये याकरता आयुर्वेदाने सांगितलेला मार्ग म्हणजे उदरपट्टबंधन अथवा पोट बांधणे. यासाठी पंचाचा वापर केला जातो. अर्थात; ही क्रिया नैसर्गिक प्रसूतीनंतर आणि आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करायची आहे.
    - काय खावं?
    बाळासाठी अर्थातच मातेचे दूध हेच सर्वोत्तम अन्न आहे असे थोर आयुर्वेद वैद्य श्रीमद्वाग्भटाचार्य ‘मातुरेव पिबेत् स्तन्यं तत् परं देहवृद्धये|’ इतक्या स्पष्ट शब्दांत सांगून गेले आहेत. बाळंतीणीच्या आहाराबाबत काळजी दुहेरी असते. इथे स्वतःच्या शरीराची झीज भरून काढणे आणि बाळासाठी स्तन्यनिर्मिती नीट व्हावी या दोन्ही बाबी महत्वाच्या असतात. वेगवेगळ्या खीरी, लाडू यांचा आहारात समावेश करावा. आईस्क्रीम वा दह्यासारखे पदार्थ शक्यतो टाळावेत. असे पदार्थ मातेच्या आहारात असल्यास तिच्या दुधामार्फत बाळापर्यंत अतिरिक्त कफ पोहचून त्यास त्रास होवू शकतो.
    - बाळगुटी द्यावी का?
    अलबत द्यावी. मात्र याविषयी आपल्या वैद्यांकडून संपूर्ण माहिती करून घ्यावी. (बाळगुटी या विषयावरील विस्तृत लेख #घरोघरी_आयुर्वेद या माझ्या पुस्तकात वाचायला मिळेल.) वयाचे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळगुटीचा उपयोग अवश्य करावा.
    बाळंतपण झाल्यावर वरील गोष्टी करू नका असं सांगण्याची सध्या फॅशन निघाली आहे. या गोष्टी नेमक्या का आणि कशा करतात हेच असे सांगणाऱ्यांना माहित नसते. त्यामुळे; वरीलपैकी कोणत्याही गोष्टी करू नयेत असा सल्ला कोणीही दिल्यास दुर्लक्ष करा. आणि यांपैकी कोणत्याही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या वैद्यांचे चिकित्सालय गाठा. पिढ्यानपिढ्या या देशातले लोक बाळ-बाळंतीणीची व्यवस्थित काळजी घेत आहेत. ते जणू मूर्खच होते असे चित्र रंगवून परदेशी कंपन्यांच्या चकचकीत वेष्टनातली ‘बेबी किट्स’ वा ‘टॉनिक’ गळ्यात मारण्याच्या उद्योगांपासून सावधान!!
    © वैद्य परीक्षित स. शेवडे
    (आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
    श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३६

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 6

    कावळ्याचिमणीची गोष्ट

    गुरू दत्तात्रेयांनी 24 गुरू केले होते. त्यात एक क्षुद्र किटक, कोळी सुद्धा होता. भक्ष्याला पकडण्यासाठी तयार केलेलं जाळं तुटलं तरी जिद्द न हरता, परत परत तो तयार करीत होता. ज्याच्याकडून जे शिकता येईल ते शिकावं हे दत्तगुरूनी शिकवलं होतं. तसं हा कावळा पक्षी माझा गुरू झाला. खूप काही शिकवून गेला.

    एकदा रात्री साडे दहा वाजता दवाखान्यातून घरी येत असताना, घरासमोरच रस्त्यावर एका बाजूला एक मांजर गाडीखाली सापडून मरण पावले होते. खूप वाईट वाटलं. पण....

    दुसऱ्याच दिवशी सकाळी साडेसहा वाजता काही कामानिमित्त घराबाहेर पडलो, तेव्हा त्या मृत मांजराभोवती तीन चार कावळे बसून त्याला खात होते. माझी गाडी त्यांच्या जवळून गेल्यावर ते उडून गेले. मी पुढे गेल्यावर परत तिथे आले. माझे काम संपवून जेव्हा अर्ध्या पाऊण तासाने परत आलो तेव्हा जवळपास अर्धेअधिक मांजर त्यांनी फस्त केले होते.

    गाडीतून उतरताना बुद्धीने विचार केला....
    काल रात्रीपासून ते मांजर तिथे पडून होते, रात्रीची शांत निवांत वेळ खाण्यासाठी योग्य होती, वाहानांचा, माणसांचा कोणाचाही त्रास नव्हता, मग या कावळ्यांनी रात्रीच या मृत मांजराला का खाल्ले नाही ??????
    तेव्हा, त्याने आखून दिलेला नियम आठवला आणि लक्षात आले. रात्रीचे खायचे नसते.

    जे काही खायचे ते सूर्योदय झाल्यावर खावे. पोटभर खावे. भीती न बाळगता खावे आणि महत्त्वाचे म्हणजे खाल्ल्यानंतर काय खाल्ले होते, ते अजिबात आठवू नये. म्हणजे खाल्लेले सर्व सहज पचून जाते. खाल्लेल्या अन्नाविषयी मनात नकारार्थी भावना तयार व्हायच्या अगोदरच आहार पचून गेला पाहिजे.

    सूर्यास्त झाल्यानंतर काहीही खाऊ नये, हे त्याच दिवशी संध्याकाळी चिमण्यांनीदेखील मला शिकवले. एका दुकानात सौ. बरोबर गेलो होतो. ती आत मधे खरेदी करताना मी गाडीत बसलो होतो. आणि दुकानाच्या बाहेर जमिनीवर पडलेले धान्य खाण्यासाठी येणाऱ्या चिमण्यांच्या थव्याकडे कुतुहलाने पाहात होतो.
    सायकल वाला आला, चिमण्या भुर्रऽऽऽ,
    रिक्शा आली पुनः चिमण्या भुर्रऽऽऽ
    माणसं गेली तरी चिमण्या भुर्रऽऽऽ
    कितीतरी वेळ असा पोटभरतीचा खेळ चालला होता. त्यांचा चिवचिवाट ऐकून बरं वाटत होतं.

    तेवढ्यात सौ.चा निरोप आठवला, काळोख पडायच्या आत पिठाच्या चक्कीवरून दळण आणायचे आहे. म्हणून अगदी जवळच असलेल्या चक्कीवरून दळणाची पिशवी आणून गाडीत ठेवली. एव्हाना दुकानाबाहेर दिवे पण लागले होते आणि त्या संधीप्रकाशात मी परत चिमण्या शोधायला लागलो, पण एकही चिमणी दिसेना. चिमण्यांनी फुललेला बाजुचा गुलमोहर देखील अबोल झाला होता. एक विषण्णता मनात दाटून आली. सायकलवाला पण नव्हता, रिक्शावाला पण नव्हता, माणसांची वर्दळ पण थांबली होती, पण सर्व चिमण्या मात्र निमूटपणे परत फिरल्या होत्या......घराकडे अपुल्या....

    कारण एकच होतं. तो "दिनकर" अस्ताला गेला होता.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.03.2017

  • सव्वा शहाणा फडणवीस

    देविदास देशपांडे यांचा हा लेख शेअर करत आहे. हा लेख Whatsapp वरुन आला आहे.

    “लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!”

    बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा शरद पवार यांनी उच्चारलेले हे एक मार्मिक वाक्य. ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यावर पवारांनी टीका केली असता “पवारांनी हा अहवाल वाचला आहे की नाही, हीच शंका आहे,” असे गोडबोले म्हणाले होते. तेव्हा पवार हे बोलले होते.

    वाचन, लेखन, शिक्षण किंवा एकूणच विचारांच्या क्षेत्रावर आतापर्यंत ब्राह्मणांची मक्तेदारी होती. आता ती राहिलेली नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नका, असे पवारांना म्हणायचे होते. कारण विजेचा प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा ठपका गोडबोले आयोगाने ठेवला होता. आता गोडबोले म्हणजे ब्राह्मण आणि त्यांनी आम्हाला उपदेश करू नये, हा पवारांच्या वक्तव्याचा आशय होता.

    अर्थात पवार हे पुरोगामी नेते असल्यामुळे त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हे सूचकपणे सांगितले होते. मात्र जायचा तो संदेश गेला होता. “वीज क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा, जी राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, ती पवार यांनी इतक्या खालच्या पातळीवर नेली आहे की यापुढे मी त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घेणार नाही व भाष्यही करणार नाही. माझ्यापुरता हा विषय संपलेला आहे. यापुढे सुजाण समाजानेच समितीच्या अहवालाबाबत मत बनवावे,” असे उद्वेगाने गोडबोले म्हणाले होते.

    शिक्षण ही जशी काही काळापूर्वी ब्राह्मणांची मक्तेदारी होती, तशी राजकारण ही साखर कारखानदार, सहकार दरोडेखोर (सम्राट!) आणि पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्यांची मक्तेदारी झाली होती. ती तशी आता राहिलेली नाही, हे पवारांना सांगणारा नेता महाराष्ट्रातच निघाला आहे.

    बापट, देशपांडे, जोशी इ. ब्राह्मणांना आम्ही पदरी बांधू, त्यांच्यामार्फतच व्यवसाय-उद्योग चालवू पण त्यांनी आमच्या राजकारणात येऊ नये, हा पवारांचा अलिखित दंडक. त्यांच्या पुरोगामी वगैरे वगैरे गणंगांनी तो प्राणपणाने जपला होता. तो मोडला नागपूरच्या देवेंद्राने. पेशवे, फडणवीस म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांची हेटाळणी केली त्यांनीच पवारांच्या गढीला सुरुंग लावला आहे. पवारांच्याच काय, मुंबई (शिवसेना), पुणे, पिंपरी-चिंचवड (एनसीपी), सोलापूर (काँग्रेस) अशा सगळ्याच गडांना या फडणवीसाने धक्के दिले आहेत.

    ऑक्टोबर २०१४ पासून म्हणजे फडणवीस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून पवार यांनी येता-जाता त्यांची जात काढण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या वरदहस्ताने मोठे झालेल्या झिलकऱ्यांची त्याला साथ होतीच. तसा तो त्यांनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांची जात काढूनही केला होता.

    मात्र फडणवीस यांच्या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा कोण मोठा दिड शहाणा लागून गेला, अशाच आविर्भावात प्रस्थापित राजकारणी वावरत होते. म्हणून त्यांच्या कारभाराची फडणवीशी अशा शिवीवाचक शब्दांनी संभावना करण्यात आली. ज्यांच्या ऐतिहासिक उपमा संपल्या त्यांनी डोरेमॉन-शिनचान वगैरेंना हाताशी धरले. आज त्यांचेच कार्टून झाले आहे.

    म्हणूनच छत्रपती पेशव्यांना नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना खासदारकी देत आहेत, असा तद्दन जातवाचक उल्लेख त्यांना करावा लागला. “छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते. तर पेशवे फडणवीसांची नेमणूक करत होते. पण आता मात्र फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केली,” हे वक्तव्य काही प्रामाणिक पणातून आलेले नाही. त्याच प्रकारे मराठा मोर्चाच्या वेळेस पवारांची भूमिका त्यांच्या स्तुतीपाठकांना वाटते तेवढी पुरोगामी खचितच नव्हती. अन् तरीही फडणवीस यांनी या सर्वावर मात करून एकहाती यश मिळवले आहे.

    ‘तावद् भयेषु भेतव्यं यावत् भयम् अनागतम्’. म्हणजे भीती वाटते ती गोष्ट येत नाही, तोपर्यंतच तिचे भय असते. ब्राह्मणाचे राज्य आले, तर पेशवाई परत येणार, ही भीती हेच आजपर्यंत काँग्रेस-एनसीपीचे कुरण ठरले होते. फडणवीस आल्यावर तसे काही नाही, हे जाणवल्यानंतर ती भीती सरली आणि त्यासरशी त्या भीतीवर जगणाऱ्यांची दुकानेही उठली. उलट गेल्या काही दिवसांत फडणवीसांचा विश्वास निर्देशांक हा अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा अधिकच झालेला आहे. म्हणून तर “लिहून देतो” म्हणणाऱ्या शदर पवारांवर लोक भरवसा ठेवत नाहीत. “मी शब्द देतो,” म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठेवतात. विश्वास एकदा गेला की गेला..

    पालिकेच्या या निवडणुकांसाठी भाजपचे केंद्रीय पातळीवरील कोणतेही नेते वा चेहरे फिरकले नाहीत. अगदी उद्धव ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतरही. प्रचाराची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली. पायाला भिंगरी लावल्यासारखे फडणवीस हेच राज्यात फिरले. शिवसेनेचे नेते भाजपवर तुटून पडत असले, तरी फडणवीस यांच्यावर त्यांनी हात राखूनच राळ उडवली, हे मान्य करावे लागेल. मात्र काँग्रेस-एनसीपीचा सगळा भर फडणवीस यांच्यावरच होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर फडणवीस यांनाच लक्ष्य केले होते.

    फडणवीसांनी अगदी हळूवारपणे आपले काम चालूच ठेवले. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना व्यवस्थित कामाला लावले. इतकेच नाही, तर निवडणुकीतल्या निकालानुसार मंत्र्यांवर कारवाई करणार, असे सांगून चुकार मंत्र्यांना इशाराही दिला. दिल्लीश्वरांचे अभय असल्यामुळे आपले कर्तृत्व दाखवायची पूर्ण संधी त्यांना मिळाली आणि ती त्यांनी 100 टक्के साधली.

    स्वच्छ चारित्र्य हे फडणवीस यांचे मुख्य चलनी नाणे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही तीच जमेची बाजू. पण चव्हाण यांनी स्वच्छ चारित्र्य हे निष्क्रियतेचे समानार्थी करून ठेवले होते. ती चूक फडणवीसांनी टाळली. स्वच्छ प्रतिमा हे फडणवीस यांचे बलस्थान. या दोन वर्षांच्या काळात एकही गैरव्यवहार झालेला नसल्याचा आनंद त्यांनी नुकताच व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांनी अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून ते परतवून लावले. तरीही एकनाथ खडसे यांना ते वाचवू शकले नाहीत. या सर्व प्रवासात झाले एवढेच, की राज्यात सरकारचा एकमेव चेहरा बनण्यात फडणवीस यांना यश आले आहे. महापौरपद वगळता अन्य कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेल्या एखाद्या राजकारण्यासाठी हे मोठेच यश आहे. प्रशासकीय कौशल्याबरोबरच आपल्या राजकीय बुद्धिकौशल्याने त्यांनी अनेक पेचप्रसंगावर मात केली आहे.

    नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून उत्तर पेशवाईच्या काळात अर्धा शहाणा मानला जाई. काँग्रेस-एनसीपीने 15 वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात उत्तर पेशावईचीच अवस्था निर्माण केली होती. त्याला उत्तर म्हणून लढाया (निवडणुका) खेळून तो जिंकणारा फडणवीस प्रतिस्पर्ध्यांना मिळाला आहे. हा शहाणा पूर्ण शहाणाच नाही, तर सव्वा शहाणा आहे.

    - देविदास देशपांडे

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 5

    सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
    हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली.

    वो हुआ कुछ इस प्रकार...
    एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी "फिस्ट" चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन चार दिवसापूर्वी मेलेला असावा. किडे पण पडले होते. पण कावळ्यांसाठी ती दावतच होती. निरीक्षणाअंती असे दिसले, सर्वजण मजेत तो मेलेला, कुजलेला कुत्रा खात होते. म्हणजे अस्वच्छ, शिळे, नासलेले, कुजलेले खाऊ नये, हे पथ्य ते पाळत नव्हते. तरीही ते निरोगी दिसत होते. कारण त्यांचा नेहेमीचा आहार पण असलाच असतो. पण सगळे अगदी एकाच आकाराचे दिसत होते. एकही बारीक नाही, एकही जाड नाही.

    असे का ? असे स्वतःलाच विचारले, तेव्हा असे लक्षात आले की, कावळे सूर्योदयापुर्वी उठतात, खायला सुरवात करतात, कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता खातात. कोणताही विचार न करता खातात, खाऊन झाल्यावर सुद्धा विचार करत नाहीत, की मी हे का खाल्ले ? हे असे खाऊन सुद्धा सगळे पचवतात. आणि त्यांच्या अंगावर चरबीचा अंशही शिल्लक रहात नाही !

    कसा राहील आणि कशाला त्या कावळ्यांचा आकार बदलेल? जर खाल्लेलं सर्व अन्न पचवायला पुरेसा वेळ दिला तर !

    कावळ्यांची सूर्योदयाला काव काव सुरू होते ती अगदी सूर्यास्त होईपर्यंत ! मग कावळ्यांच्या पोटात कितीही कावळे ओरडले तरीही...
    त्यानंतर खाव खाव अजिबात नाही. अपवादाला पण नाही.

    हे सगळे कावळे असे का वागतात, असा प्रश्न स्वतःला विचारल्यावर लक्षात आले, की कावळ्यांच्या शाळेत फक्त त्याचीच सत्ता चालते. त्याचाच नियम सर्वत्र पाळला जातो. त्याच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही.
    सगळे कावळे फक्त त्याचेच ऐकतात. फक्त कावळेच नाही तर चिमण्या, पोपट, कबूतर आणि सर्व पशुपक्षी हाच एकमेव वैश्विक नियम पाळतात, सुर्योदय ते सुर्यास्त खायचे आणि सुर्यास्त ते सुर्योदय खाल्लेलं पचवायचे !

    त्यानेच सांगितले आहे ना, "अहं वैश्वानरो भूत्वां..... " मीच तो जाठराग्नि आहे. तुम्ही चारही प्रकारचे अन्न खाल्लेत तरी ते पचवायचे काम माझे आहे.अन्न खाण्याची जबाबदारी तुमची आणि पचविण्याची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी पूर्णतः माझी. फक्त प्रत्येक वेळी एकच नियम पाळा, जो वैश्विक नियम मी आखून दिला आहे. तो म्हणजे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत मनसोक्त खावे. आणि नंतर सुर्यास्त ते सुर्योदय या वेळी खाल्लेलं पचवायला वेळ द्यावा.

    या सुर्यास्ताच्या वेळेला येऊन थांबल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले........
    सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    28.02.2017

  • गवती चहा

    गवती चहास कोठें कोठें हिरवा किंवा ओला चहा म्हणतात. बंगालीत या चहास बंधबेन व हिंदुस्तानींत गंधतृण म्हणतात. संस्कृतांत यास भूस्तृण असें नांव आहे. इंग्लिश मध्ये lemon grass असे म्हणतात. हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हें गवत हिरवेंगार असून खरबरीत असतें. पूर्वेकडील आर्चिपिलेगोंतल्य पुष्कळ बेटांत, सिलोनांत व हिंदुस्थानांत गवती चहा मुद्दाम बागांत लावितात. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. या गवतास क्वचित फूल येतें. गवती चहा हे बहुवार्षिक गवत असून, ते दोन मीटरपर्यंत उंच वाढते. त्याला भरपूर फुटवे येतात. पाने केसाळ असून ८० ते १२५ सें.मी. लांब असतात. पानांना लिंबासारखा वास येतो. सिंगापूर व सिलोन येथें सुवासिक तेल काढण्याकरितां गवती चहा पुष्कळ लावितात. अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. मग त्यात गवती चहाच्या काही पाती मिसळा. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात. हा चहा चवीला उत्तम आणि आरोग्याला हितकारी आहे. यामुळे शरीर स्वच्छ होते, अवयवांचे कार्य सुधारते. मात्र लहान मुलांना गवती चहा देण्यापूर्वी अवश्य सल्ला घ्यावा. या गवताचा सुवासिक तेल काढण्याकडेच विशेष उपयोग होतो. 'कोलन वॉटर' तयार करण्यांत या तेलाचा फार खप होतो. तापांत घाम येण्यासाठीं गवती चहाचा काढा करून पाजतात. ऊर्ध्वपातन पद्धतीने पानांतील तेल काढले जाते. या तेलात सिट्रल, सिट्रोनेलॉल, मिरसीन आणि निरोल हे घटक आहेत. तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, उपदंश, त्वचाविकार, कुष्ठरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे. तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो. कफ आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो.पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य़प्रसाधनांत, तसेच अत्तर म्हणून होतो. साठवण्याच्या धान्यांमध्ये आणि कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात. कपभर गवती चहा घेतल्याने किंवा त्याची वाफ घेतल्याने चोंदलेले नाक व छाती मोकळी होण्यास मदत होते. त्यातील अॅंन्टीबॅक्टेरियल घटक संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव करते. गवती चहाचे तेल डोकेदुखीची समस्या कमी करते. किडनी आणि यकृताचे कार्य सुधारते. गवती चहामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. तसेच सतत मुत्र विसर्जन झाल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते व पचनही सुधारते. गवती चहातील 'अॅतन्टीमायक्रोबाईल' घटक पचनसंस्थेचा मार्ग सुधारण्यास मदत करतो. त्यातील अॅसन्टीसेप्टीक घटक बॅक्टेरियांचा नाश करून बद्धकोष्ठता, छातीत होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. वाताचा त्रास असलेल्या रुग़्णांनी गवती चहाचे तेल लावणे हितदायी आहे. त्यातील दाहशामक घटक सांधेदुखी कमी करतात. यासाठी गवती चहाचे तेल खोबरेल तेलात मिसळून गुडघ्यांवर लावावे. तसेच गवती चहा पिणेदेखील संधीवाताच्या रुग्णांसाठी हितावह आहे. गवती चहामुळे कर्करोगापासून बचाव होतो. त्वचेचा तसेच स्तनांच्या कर्करोगापासून बचावण्यासाठी गवती चहा फायदेशीर आहे. गवती चहा मधील व्हिटामिन ए त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यातील अॅसन्टीसेप्टिक घटक आणि अॅलस्ट्रिंजंट घटक पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. गवती चहा प्यायल्याने त्वचा आणि शरीर दोन्ही स्वच्छ राहण्यास मदत होते. गवती चहाचे तेल नेहमीच्या तेलात मिसळून लावल्यास शरीराची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या. या गवती चहा पासून पाण्याच्या वाफेच्या साह्याने उर्ध्वपातन (डिस्टिलेशन) करून तेल काढण्यात येते. तेल हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगते. तेलात ७० ते ८५ टक्के सिट्रॉल असते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट