वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
समर्थ रामदास स्वामींची ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.
अतीकोपता कार्य जाते लयाला,
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना नित्य लाज,
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख शोकास मूळ,
अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।
अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,
अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही प्रपंचात छिद्र,
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग येतो घराला,
उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का रुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड,
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी प्रेतरूप,
अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास,
अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती बुद्धिवंत,
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती वाद घेता दुरावेल सत्य,
अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।
अती औषधे वाढवितात रोग,
उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत नाना उपाधी,
अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे दुःखवृद्धी,
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग तो संकटाचा,
अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती,
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।
अती भांडणे नाश तो यादवांचा,
हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे रोज इष्ट,
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी,
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।
सदा पद्य घोकोनियां शीण येतो,
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।
-- समर्थ रामदास स्वामी
September 30, 2017
ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.
April 17, 2020
विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे एकमेव कारण अशा स्वरूपात आपल्या उपास्य देवतेची आराधना केली जाते.
August 24, 2020
सी. टी. अॅन्जियोग्राफीत जर कॉरोनरी धमनीत अडथळा दिसला तर पारंपरिक अॅन्जियोग्राफी करावीच लागते. पारंपरिक अॅन्जियोग्राफी ही ‘गोल्ड स्टॅण्डर्ड’ तपासणी समजली जाते. या तपासणीसाठी एक दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते.
May 3, 2023
एकदा पेनसिल्व्हेनीयामधे असताना, आमच्या लॅबमधल्या टेरा नावाच्या एका टेक्नीशियन मुलीच्या लग्नाला जाण्याचा योग आला. तिचं गाव पेनसिल्व्हेनीया आणि न्यूयॉर्क या राज्यांच्या सीमेजवळ, न्यूयॉर्क राज्यात होतं. न्यूयॉर्क राज्याचा वरचा बराचसा भाग डोंगर, झाडी, शेती आणि कुरणांनी भरलेला असून हा भाग शेती आणि डेअरीसाठी प्रसिद्ध आहे. टेराच्या गावाला जायचा रस्ता असाच गर्द झाडीने भरलेल्या टेकड्यांमधून जाणारा होता. मधे मधे मोकळ्या जागेत, दुधाळ गाई लुसलुशीत गवतावर चरत होत्या. अधे मधे छोटी छोटी गावं लागत होती. टेराचं गाव देखील ४००-५०० वस्तीचं. गावातलं पांढरं सुबकसं चर्च चक्क एका मक्याच्या शेतात होतं. आजूबाजूला कापलेल्या मक्याचे खुंट शेतातून दिसत होते. चर्चमधे जेमतेम ६०-७० लोकांना दाटीवाटीने बसायला जागा. कसलं भव्य दिव्य वास्तूशिल्प नाही, प्रचंड मोठे घुमट आणि नक्षीदार कमानी नाहीत किंवा डोळे खिळवून ठेवेल असं रंगीत काचेरी कोरीव काम नाही. साधासा एक क्रॉस भिंतीवर लटकवलेला. मंद मेणबत्त्यांच्या उजेडात उभी असलेली फादरची गंभीर मूर्ती, खिडक्या-दारांतून येणारा बाहेरचा शेताचा, गवताचा वास, दूर अस्पष्टपणे ऐकू येणारं गायींचं हंबरणं आणि ट्रॅक्टरचा आवाज. अस्सल खेडवळ वातावरणातलं ते छोटंसं चर्च, लोकजीवनाचा एक अविभाज्य भाग बनून, त्यांच्या आयुष्याला आकार देत होतं.
आयोवातल्या सू सेंटरला आल्यावर, ६००० वस्तीच्या त्या छोट्याश्या गावात फेरफटका मारताना, खूपशी चर्चेस बघून मी आश्चर्यचकित झालो. हळू हळू तिथल्या वास्तव्यात, गावात एकूण १६ चर्चेस आहेत असं समजलं. ही चर्चेस न्यूइंग्लंडमधल्या ठरावीक धाटणीच्या चर्चेसपेक्षा खूपच वेगळी वाटत होती. एकतर ही चर्चेस खूपच मोठी होती. त्यांची बांधणी देखील एखाद्या आधुनिक इमारतीसारखी होती आणि त्यांची प्रांगणे देखील प्रशस्त होती. सू सेंटर आणि बाजूचं ऑरेंजसिटी ही दोन्ही प्रामुख्याने डच लोकांची गावं. आजूबाजूला देखील डच लोकांचं प्राबल्य. त्यामुळे बहुतेक सारी चर्चेस ही Reformed churches. त्यात देखील नाना प्रकार. उदाहरणच द्यायचं झालं तर सू सेंटरमधील वेगवेगळ्या चर्चेसची यादी देता येईल - फर्स्ट रिफॉर्मड् चर्च, फ्रि ग्रेस रिफॉर्मड् चर्च, हेरीटेज रिफॉर्मड् कॉंग्रिग्रेशन, होप लुथर्न चर्च, नेदरलॅंड रिफॉर्मड् चर्च, न्यू लाईफ रिफॉर्मड् चर्च, पीस लुथर्न चर्च, युनायटेड रिफॉर्मड् चर्च, बेथल ख्रिश्चन रिफॉर्मड् चर्च, कव्हेनंट ख्रिश्चन रिफॉर्मड् चर्च, फेथ ख्रिश्चन रिफॉर्मड् चर्च, फर्स्ट ख्रिश्चन रिफॉर्मड् चर्च, ख्राईस्ट द किंग कॅथलिक कम्युनिटी चर्च, ख्राईस्ट कम्युनिटी चर्च, कॉर्नर स्टोन रिफॉर्मड चर्च आणि सेंट्रल रिफॉर्मड चर्च.
सू सेंटरमधली चर्चेस भली मोठ्ठी. ही चर्चेस म्हणजे फक्त धार्मिक प्रार्थनास्थाने नसायची. प्रत्येक चर्चमधे मोठमोठी सभागृहे, बर्याच खोल्या व इतर सोयी असायच्या. त्यांचा उपयोग community centres म्हणूनच अधिक व्हायचा. सगळे वरवर ख्रिश्चनच असले तरी प्रत्येकाचा आपल्या पंथाच्या किंवा चर्चच्या वेगळेपणाबद्दल ठाम विश्वास. इतर वेळी एकत्र येणारे सारे जण आपापल्या चर्चच्या घुमटाखाली एकत्र आले, की इतरांच्या चर्चेसना नाक मुरडणार. एकाच चर्चमधे जाणार्या लोकांच्यात जवळीक निर्माण व्हावी यात काही नवल नाही. मग अगदी मुलांमधे किंवा तरुणांमधे देखील ही चर्चेसची भाऊबंदकी रुजवली जाते. मग आपल्याच चर्चमधे जाणार्या मुलांशी खेळणे, आपल्याच चर्चच्या तरुणांबरोबर सहलीला जाणे वगैरे प्रकार सर्रास चालतात. आपल्या चर्चबांधवांसाठी मदतीचा हात पुढे करणे हे ओघाने आलेच. मग नोकरी शोधणार्या कुण्या सोम्यागोम्याचा चुलत मेव्हणा जर तुमच्या चर्चमधे जात असेल, तर नोकरी मिळण्यासाठी एक मोठ्ठं qualification होऊन जातं.
सू सेंटरमधे आम्ही आणि आमच्या सहा महिने अगोदर आलेले सोळंकी अशी दोनच भारतीय कुटुंबं. मोठाल्या शहरांमधे, विविध देशांतल्या लोकांचा संपर्क येऊन, तेथील स्थानिक अमेरिकन्सच्या अनुभवाच्या कक्षा थोड्या विस्तारलेल्या असतात. परंतु मिडवेस्ट मधल्या छोट्या गावांत, तसे दुसर्या देशातून आलेले लोक विरळाच. त्यात काही असलेच तर मेक्सिको, कोलंबिया, व्हेनेझुएला, अर्जेंटिना, कोस्टारिका वगैरे मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील देशांतून आलेले. बहुतांशी कॅथलिक. मध्य आणि दक्षिण अमेरिकेत स्पेनने आपले साम्राज्य स्थापन केल्यावर, आपली भाषा आणि आपला कॅथलिक धर्म मोठ्या जबरदस्तीने स्थानिक जनतेवर लादला. एक ब्राझीलचा अपवाद वगळता (जो पोर्तुगीजांच्या अमलाखाली असल्यामुळे तिथे पोर्तुगीज भाषा रूढ झाली), सार्या मध्य आणि दक्षिण अमेरिकन देशांत, भाषा आणि धर्म हे समान धागे निर्माण झाले. त्यामुळे मिडवेस्टमधल्या छोट्याश्या गावात, मेक्सिकन लोकांसारखे दिसणारे, गव्हाळ वर्णाचे, काळ्या केसांचे, मध्यम चणीचे भारतीय आणि त्यात हिंदू म्हणजे अपूर्वाईची गोष्ट. सुरवातीला बरेचदा, कुठे रस्त्यावर किंवा दुकानात, एखादा मेक्सिकन आमच्या जवळ येऊन ‘होला’ (स्पॅनिश भाषेतलं “हॅलो”) म्हणून संबोधायचा आणि स्पॅनिशमधे वचावचा बोलायला सुरुवात करायचा. आम्ही गोंधळून अजागळासारखे त्याच्या तोंडाकडे बघायचो आणि मग, आम्ही “इंडियन, नो स्पॅनिश” असं सांगितल्यावर, तो चालू लागायचा.
-- डॉ. संजीव चौबळ
April 21, 2016
ओट्स, सीरियल्स, ऑलिव्ह तेल, किवी आदी पदार्थाचे गुण काय आहेत, याचा बराच गवगवा केला जातो. परंतु त्यांचे दोष काय, हे कधीच सांगितले जात नाही.
सफरचंदाने होणारा मलावरोध आणि मलावरोधजन्य विकृती, शरीरात वाढणारे शीतत्व व शीतत्वजन्य विकार, किवीच्या आंबटपणामुळे होणारे घशाचे विकार, ओट्समुळे मंदावणारी आतडय़ाची पुर:सरण गती, पचनाचे विकार व मलावरोध, ओट्समधील फायटिक अॅसिडमुळे आतडय़ांमधून कॅल्शिअम, जस्त व लोहाच्या शोषणामध्ये येणारा अडथळा, ब्रेकफास्ट सीरियल्समुळे स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य अनेक विकृतींचा धोका, शरीरात वाढणारा कोरडेपणा व रूक्षत्वजन्य विकृती, बदामामुळे होणारी कठीण मलप्रवृत्ती, ऑलिव्ह तेलामुळे होऊ शकणारे पित्तविकार- या सर्व आरोग्यसंकटांकडे भारतीयांनी काणाडोळा करावा काय?
आपल्या उत्पादनांचे ढोल पिटताना या अन्नपदार्थाचे हे आरोग्यधोके का सांगितले जात नाहीत?
हा प्रश्न केवळ आपल्या आरोग्यापुरताच मर्यादित नाही, तर त्याला आर्थिक पलूसुद्धा आहे. २०१५-१६ या वर्षांत परदेशी सफरचंदे खरेदी करण्यासाठी भारताला तब्बल १७५५ कोटी रुपये मोजावे लागले. या वर्षी ऑलिव्ह तेलाची भारताची खरेदी १३,५०० टनांवर जाईल अशी अपेक्षा आहे. ऑलिव्ह तेलाच्या लीटरमागे अगदी वीस टक्के- म्हणजे २०० रुपये फायदा आहे असे गृहीत धरले तरी १३,५०० टन तेल विकले गेल्यास दोन अब्ज सातशे कोटी रु. इतका फायदा विक्रेत्यांना होईल.
आजमितीस भारतीयांना एक कोटी १७ लाख टन खाद्यतेल लागते. त्यातला केवळ ०.१ टक्क्याहून कमी वाटा ऑलिव्ह तेलाचा आहे; जो वाढविण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात आहेत.
भारतीयांना ज्याची गरज नाही अशा ऑलिव्ह तेलाचा आपल्या खाद्यतेलांच्या सेवनातील हा वाटा जर दहा टक्क्यांवर गेला तर परकीय देशांना त्यातून होणाऱ्या नफ्याचा आकडा किती प्रचंड असेल याची कल्पनाच केलेली बरी.
सकाळचा नाश्ता, रोजच्या जेवणासाठी लागणारे खाद्यतेल, जेवणातील प्रमुख धान्य, भाजी, फळे, सुकामेवा असे सगळेच अन्नपदार्थ जर आपण अमेरिका व युरोपमधून आयात करणार असू, तर त्याचा आपल्या देशाचा आर्थिक ताळेबंद आणि एकंदर आíथक स्थर्यावर काय व किती विपरीत बोजा पडेल याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.
परकीय खाद्यान्नातून देशाचे होणारे हे आíथक नुकसान व भारतीयांच्या आरोग्याला संभवणारे धोके समाजासमोर येणे म्हणूनच अगत्याचे आहे.
या ओट्स, ऑलिव्ह तेल, ब्रेकफास्ट सीरियल्स, किवी, ब्रोकोली वगरे पदार्थाबाबत असे काही चित्र उभे केले जाते, की यांचे सेवन केले की हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, स्थूलत्व आदी भारतीयांना ग्रासणाऱ्या जीवनशैलीजन्य आजारांवर सहज मात करता येईल. परंतु ही चक्क फसवणूक आहे. कारण या सगळ्या प्रकारात जीवनशैलीजन्य आजारांची जी खरी कारणे आहेत, त्यांकडे साफ दुर्लक्ष झालेले दिसते.
साखर, मदा, रिफाइण्ड धान्ये, मीठ, जंक फूड, तळलेला आहार यांचे नित्य सेवन, आहारसेवनाचे दोष, व्यस्त, स्पर्धात्मक, तरीही बठी जीवनशैली, परिश्रमांचा, व्यायामाचा, घामाचा अभाव, पोटावरची चरबी, स्थूल शरीर, मानसिक ताण आदी मूळ कारणांचा विचार न करता केलेले अन्य प्रयत्न निर्थक आहेत.
मूळ कारणांकडे दुर्लक्ष करून केवळ हे अन्नपदार्थ खाऊन तुम्ही आजारांचा प्रतिबंध करू पाहत असाल तर तो प्रयत्न फोल ठरेल यात शंकाच नाही.
ऑलिव्ह, ओट्स, ब्रोकोली, किवी, सफरचंद वगरे कोणतेही परकीय फळ वा भाजीची बी आपल्या भूमीमध्ये निसर्गत: उगवत नाही. इथेच खरे तर ते पदार्थ आपल्यासाठी बनलेले नाहीत याचा संदेश निसर्गाने दिलेला आहे.
प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, अग्नी, बल, वय, कामाचे स्वरूप या सर्वाचा विचार करून आपल्याला सात्म्य होईल ते अन्न सेवन करावे. तेसुद्धा ऋतू-काळ-प्रदेश यांना अनुसरून- असे आयुर्वेदात म्हटले आहे.
परंतु परकीय पदार्थाचे सेवन करताना या मूलभूत आरोग्यनियमांना पूर्णपणे धाब्यावर बसवले जाते.
आज जग जवळ आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांतील अन्नपदार्थाचा चवीमध्ये बदल म्हणून आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र, तो आपल्या नित्य सेवनाचा आहार बनला तर आरोग्याची पार वासलात लागेल, हे नक्की.
आयुर्वेदानुसार, जो आहार देशसात्म्य आहे- अर्थात निसर्गत: तुमच्या प्रदेशामधील आहे, तोच तुमच्या आरोग्याला अनुकूल आहे. आपल्या गुणसूत्रांना सर्वस्वी परक्या प्रदेशांमध्ये पिकलेले अन्नपदार्थ आपल्या आरोग्याला पूरक होण्याची शक्यता नाहीच; उलट, ते बाधक ठरेल. तसेच विविध आजारांनाही कारणीभूत ठरेल.
आफ्रिका आणि आशिया खंडांमधील मूलनिवासी जोवर आपल्या मूळ आहाराला चिकटून होते, तोवर त्यांच्यामध्ये आधुनिक जीवनशैलीजन्य आजार दिसत नव्हते, हे सांगणारे अनेक संशोधकांचे अहवाल आज उपलब्ध आहेत.
हा इतिहास असतानाही आपण जर ओट्स, ब्रेकफास्ट सीरियल्स, ऑलिव्ह तेल आदी परकीय पदार्थाच्या मागे लागणार असू, तर दुर्दैव आपल्या आरोग्याचे आणि आपल्या देशाचेही!
आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, याच पाश्चात्त्यांनी आपल्या बापजाद्यांना लाल तांदूळ सोडून पांढरा, रिफाइण्ड तांदूळ खायला शिकवले; जे आता पांढरा तांदूळ आरोग्याला कसा घातक आहे, हे पटवून लाल तांदळाचे गुणगान गाऊ लागले आहेत.
याच पाश्चात्त्यांनी दातांवर मिठाचे मंजन करणाऱ्या आपल्या पूर्वजांना अडाणी ठरवून टुथपेस्टने दात घासायला शिकवले. आणि आता त्याच टुथपेस्टमध्ये मीठ आहे का, म्हणून विचारताहेत.
यांनीच आपल्या मागच्या दोन पिढय़ांना वनस्पती घी खायला घालून रोगी बनवले आणि नंतर वनस्पती घी कसे घातक आहे, ते सांगू लागले.
यांनीच खोबरेल तेलामुळे कोलेस्टेरॉलचा व हार्ट अटॅकचा धोका बळावतो असे सांगितले; आणि आज तेच खोबरेल तेलाचे प्राशन कसे दीर्घायुष्य देते, हे सांगत आहेत.
यांनीच गूळ खाल्ल्यामुळे कृमी होतात, असे सांगून भारतीयांना साखरेची चटक लावली; आणि आता साखरेमुळेच अनेक रोग होतात, असे ते म्हणू लागले आहेत.
ज्या पाश्चात्त्यांची आहारासंबंधीची मते हरघडी बदलत असतात, त्यांच्या सल्ल्यावर, आहारावर विश्वास ठेवायचा कसा? तोही आयुर्वेदासारखी संपन्न आरोग्य परंपरा व समृद्ध आहार-संस्कृती ज्यांना लाभली आहे त्या देशवासीयांनी?
वैद्य अश्विन सावंत
drashwin15@yahoo.com
(पोषणसंदर्भ : नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबाद)
January 19, 2017
३ मे १९५९ पासून मराठी भाषिक प्रदेशात साराबंदीचा प्रचार करण्यात आला. सीमा भागातील १५० गावात साराबंदीचे आंदोलन सुरू करण्याचे ठरविण्यात आले. परंतु हे आंदोलन करतांना दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साराबंदी आंदोलन करताना मराठी व कानडी भाषिकांत संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व साराबंदीचा निर्णय गावच्या जनतेने स्वयंस्फुर्तीने घ्यावा, असे ते दोन निर्णय होते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळाला.
September 13, 2021
मेघदूत या महाकवी कालिदासाच्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला तो रामगिरीवर अर्थात सध्याचं रामटेक. मेघदूत हे दूतकाव्य तसेच विरह काव्यसुद्धा. या मेघदूत काव्याचा नायक यक्ष कुबेराच्या शापामुळे आपल्या प्रिय पत्नीपासून दूर एकांतवासात एका वर्षासाठी रामगिरीवर राहत असतो. पत्नीचा विरह त्याला सहन होत नाही. अशातच त्याला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात मेघ दिसतो. आपल्या पत्नीपर्यंत आपला खुशालीचा निरोप देऊ शकेल, पोहोचवू शकेल अशा विचाराने मेघाला दूत बनवायचं यक्ष ठरवतो.
July 11, 2021
…60,000 प्रथमश्रेणी धावा जमविणारा हॉब्ज हा एकमेव फलंदाज आहे – मोठे डाव खेळलेला नसूनही. त्याला डॉन ब्रॅडमनसारखी मोठ्या डावांची ‘सवय’ असती तर हा आकडा किती फुगला असता याची कल्पनाही करवत नाही.
August 30, 2010
वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी खेडेगावातील मंदिरात रात्री कीर्तनं होत असत. अशाच एका खेडेगावात एका महाराजांचं कीर्तन ठरलं. गावातील प्रतिष्ठित माणसाच्या घरी ते संध्याकाळी पोहोचले. चहापाणी झालं. रात्री नऊच्या सुमारास त्यांनी कीर्तन सुरु केलं. मंदिर गावकऱ्यांनी भरुन गेलं होतं. दोन तास कीर्तन व नंतर हरिजागर रंगलं. ते संपल्यावर गावकरी आपापल्या घरी गेले.
June 18, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti