वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१२ मिनिटात २८८ योगासने.
सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.
सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.
एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.
३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट
३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:
वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,
बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.
वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?
‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’
कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.
इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.
सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?
सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ
सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता
‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.
सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा. आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.
सुषमा मोहिते
आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन
आपल्याकडे कुंकवाने दारावर, भिंतीवर लाल स्वस्तिक काढायची पद्धत आहे. मात्र स्वस्तिके वापरून आरोग्य सुधारता येते याबद्दल कोणतीही माहिती शास्त्रीय ग्रंथात उपलब्ध झाली नाही. मी एका लेखात वाचले की स्वस्तिकात खूप पॉवर असते. त्यावरून कल्पना सुचून मी इंद्रधनुष्याच्या सात रंगाची स्वस्तिके तयार केली. आणि असे लक्षात आले की, रंग किरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिकाचे गुण साधारणतः सारखे आहेत.
ठराविक आकाराचे व रंगाचे स्वस्तिक शरीरावर योग्य ठिकाणी लावल्यास आरोग्य सुधारते असे अनुभव आले. लाल स्वस्तिक छातीवर ठेवले असता कफ कमी होतो. थंडीच्या दिवसांत लाल स्वस्तिकावर बसले असता थंडी कमी वाजते. पिवळे स्वस्तिक माकाहाडला लावले असता संडासला साफ होते आणि वात कमी होतो. फिक्यानिल्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी, पित्ताचा त्रास कमी होतो. गर्द निळे स्वस्तिक बेंबीवर लावले असता पचन शक्ती वाढते. हिरवे स्वस्तिक उन्हाळ्यात टोपीमध्ये ठेवले असता उन्हाचा त्रास कमी होतो. अशा प्रकारे अभ्यास करवून घेऊन "आरोग्यदायी सप्तरंगी स्वस्तिके" असे पुस्तक २००७ साली परमेश्वराने माझ्याकडून लिहून घेतले. ते वाचून अनेकांनी स्वतः स्वस्तिके तयार करून वापरली तर अनेकांनी माझ्याकडून स्वस्तिकाचे सेट नेऊन ती स्वस्तिके वापरली आणि त्यांना फायदा झाला.
स्वस्तिके शरीरातील सात चक्रांना किंवा अवयवांना आजाराप्रमाणे किमान दोन तास ते दिवसभर लावावीत. स्वस्तिकाची रंगीत बाजू शरीराला लागली पाहिजे.
आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. हि चक्रे आपल्या अवयवांना जोडली गेली आहेत. त्या प्रत्येक चक्राला एक ठराविक रंग आहे. एखादा आजार होतो म्हणजे त्या संबंधित चक्राचा रंग वाढतो किंवा कमी होतो. रंग कमी झाला की त्या रंगाचे स्वस्तीकाद्वारे तो रंग त्या चक्राला द्यायचा. तसेच रंग जास्त झाला तर त्याला मारक रंग देऊन रंग संतुलित करायचा. काहीवेळा दुसऱ्या रंगाचे आक्रमण झाल्यास त्याला मारक रंग देऊन नंतर त्या चक्राचा रंग द्यावा.
चक्रांचे रंग पुढील प्रमाणे-
मूलाधार चक्र-तांबडा
स्वाधिष्ठान चक्र-नारिंगी
मणिपूर चक्र-पिवळा
अनाहत चक्र-हिरवा
विशुद्ध चक्र-फिका निळा
आज्ञा चक्र-गर्द निळा
सहस्त्राधार चक्र-जांभळा
स्वस्तिकाला जे अधिकचे चिन्ह आहे. त्याची लांबी विषम संख्येत असावी. म्हणजे एक इंच, तीन इंच, सात इंच इ. स्वस्तिकांच्या भुजांची रुंदी लांबीच्या १० ते १२ टक्के असावी. स्वस्तिकाचे रंग इंद्रदानुष्याच्या रंगाशी मिळते हवेत. सध्या बाजारात उपलब्ध व्हायोलेट रंगात तांबडा रंग कमी आहे.तो जांभळा हवा. स्वस्तिक हे कागदावर (शक्यतो पांढरा), सफेद कापडावर, थार्मोकोलवर, पांढर्या प्लास्टिक शीटवर काढले तरी चालते. स्वस्तिक निट आखून घेऊन काढणे चांगले. यासाठी वाॅटर कलर, ऑईल पेंट, बाटिक पेंट, छपाई चे रंग व कोणत्याही प्रकारचे रंग चालतात. माझेकडे कार्ड पेपरवर छापून व लॅमिनेट करून घेतलेली स्वस्तिके तयार आहेत व ती चांगली उपयोगी पडत आहेत.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
आपट्याचे झाड सर्वांना ऐकून, वाचून माहिती असते, पण फार थोड्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले असते.
दसऱ्याला सोनं म्हणून आपट्यांची पानं वाटायची असतात, याचे ज्ञान सगळ्यांना असते; पण क्वचितच कोणी खऱ्या आपट्याची पाने वाटत असतील! याचे कारण कांचनाच्या विविध जातींशी असलेले त्यांचे साम्य. बिचाऱ्या कांचनाच्या झाडांचे बेसुमार खच्चीकरण, पर्यावरणाची हानी, कचरा समस्या आणि चुकीच्या आणि कालबाह्य समजुतीवर आधारलेली ही घातक प्रथा कमी होत चालली आहे, ती पूर्णपणे बंद होण्याची आवश्यकता आहे. संस्कृतमध्ये "वनराज' म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेलाय. दसऱ्याला त्याची रोपे वाटावीत, लागवड करावी, फार तर पूजाही करावी.
आपट्याचे अश्मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात! त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
अश्मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित् ।।
पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.
उपयुक्त आणि टिकाऊ
आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे इ. तयार करण्यासाठी होतो. उष्मांक मूल्य (कॅलॅरिक व्हॅल्यू) भरपूर असल्यामुळे सरपण, इंधन म्हणून ते फारच चांगले असते. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम व स्फुरद इत्यादींची संयुगे असतात. (कृषी ज्ञानकोश खंड 2 रा) त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते. जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दारे बनवतात. पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे बिड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर ही झाडे लावावीत, असे जुन्या ग्रंथात सांगितले आहे. झाडे खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळे खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्चित राहतात. छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो. आपट्याच्या मुळांवर नत्रस्थिरीकरण करण्याच्या करम्याच्या गाठी असतात.
संस्कृतमध्ये आपट्याला कितीतरी नावं आहेत - वनराज, चन्द्रक, आम्लपत्रक, युग्मपत्र, मालुकापर्ण, कुद्दाली इत्यादी. इतर काही भाषांतली नाव अशी ः हिंदी - अष्टा, कचनाल, घिला, झिंझोरी; गुजराती - असुंद्रो ः बंगाली - बनराज, बनराजी; कन्नड - औप्टा, बन्ने, आरेपत्री; तमीळ - अराईवत्ता, आरेका; तेलगू - आरी, आरे. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे बाउहिनिया रेसिमोसा. बाऊहिनिया हे प्रजातीनाम बाउहिन नावाच्या दोन वनस्पतीशास्त्रज्ञ बंधूच्या स्मरणार्थ दिलं असून कांचनाच्या सर्व जातींचा समावेश त्यात केला जातो. रेसिमोसा म्हणजे विशिष्ट प्रकारचा फुलांचा तुरा येणारे झाड. त्यात फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारी असतात. बहावा, चिंच, गुलमोहर यांच्या कुळातला हा वृक्ष आहे (फॅमिली सिसालपिनेसी).
उन्हाळ्यात फुलणारा आपट्याचा वृक्ष 2 ते 5 मीटर उंच वाढतो, कित्येक वेळा झुडूपवजा आणि वेडावाकडा वाढलेला दिसतो. तो पानझडी असली तरी जास्त पावसाच्या प्रदेशात पानगळ अल्पकाळासाठी होते. बुंधा 5 ते 25 सें.मी.व्यासाच असून साल काळसर तपकिरी रंगाची, खडबडीत, भेगाळलेली दिसते. कात्रज घाटातल्या एका वृक्षाच्या खोडावर मोठे अणकुचीदार काटे पाहायला मिळाले. फांद्यांचे शेंडे बहुधा खाली वाकलेले (ड्रूपिंग) असतात. खोडा- फांद्यांची आंतरसाल गडद गुलाबी दिसते. पाने एकांतरित, साधी, दुभागलेली, लांबीपेक्षा रुंदीला जास्त (2 - 5 ु 3 - 6 सें.मी.), चामट (कोरियारियस) वरच्या बाजूला गुळगुळीत हिरवीगार तर खालच्या बाजूने फिक्कट आणि लवयुक्त असतात. तळापासून निघालेल्या 7 ते 9 शिरा स्पष्ट, उठावदार दिसतात.
फुलण्याचा हंगाम उन्हाळ्यात (मार्च - जून) असून फुलोरे (मांजिऱ्या, रेसीम्स) डहाळ्यांच्या अग्रभागी आणि पानांच्या देठाजवळही येतात. फुले लहान (1 ते 1.5 सें. मी.) हिरवट - पिवळसर - पांढरी, पाच निमुळत्या पाकळ्यांची असतात. कळ्या लांबट, टोकदार दिसतात. पुकेसर 10 असून ते सुटे, सूक्ष्म आणि केसाळ असतात. पावसाळ्यात वीतभर लांबीच्या चपट्या, वाकड्या, हिरव्या शेंगा झाडावर दिसू लागतात, त्या कित्येक महिने झाडावर राहून पुढच्या उन्हाळ्यात पिकून काळ्या होतात. प्रत्येक शेंगेत 12 ते 20 काळ्या, चपट्या लंबगोल बिया असतात. बिया सहजपणे रुजून रोपे तयार होतात.
आपट्याची झाडे भारतात सर्वत्र, अगदी आसेतूहिमाचल पाहायला मिळतात. जंगलात वाढतात आणि लावलीही जातात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात (पर्जन्यमान 1000 ते 2000 मि. मी.) विपुल प्रमाणात झाडं आहेत. बाजी पासलकर जलाशयाच्या काठावरील "इको- व्हिलेज'मध्ये कितीतरी छान वाढलेली झाडे पाहायला मिळतात, तर मध्य प्रदेशातील राजस्थान सीमेवरील राजगढ जिल्ह्यातील निमवाळवंटी प्रदेशातही (पर्जन्यमान 250 ते 500 मिमी) ती मोठ्या संख्येने आढळतात. रोपवाटिकामधून रोपे मिळू शकतात. कोणत्याही हवामानात, कसल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी ही झाडे मुद्दाम लावली जातात. त्याच्या मुळांना फुटवे (रूट सकर्स) येतात, त्यांच्या रूपाने शाकीय पुनरुत्पादन घडून येते. अत्यंत उपयोगी, बहुगुणी अशा या वृक्षकाची लागवड वनशेती आणि ऊर्जालागवडीसाठी (एकसुरी लागवड टाळून) सर्वत्र आवर्जून करावी. उद्यानात, छोट्या परसबागेत, रस्ता दुभाजकांमध्ये, शेताच्या कुंपणावर आणि बांधावर, कॅनालच्या बाजूने लावण्यासाठी अश्मंतक हा एक उत्तम "वनराज' आहे.
-- प्रा. श्री. द. महाजन
अलीकडे नोकरदार स्त्रियांमध्ये त्यातही विशेष करून संगणकाशी संबंधित काम करणाऱ्या तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामुळे चेहरा थकल्यासारखा दिसतो. पार्टी अथवा समारंभाला जाताना मेकअपच्या साहाय्याने ही वर्तुळे झाकता येत असली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्याला बाधा येऊ शकते. तसेच ही वर्तुळे अनारोग्याची सूचना देणारी असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही त्यांबाबत विचार करणे गरजेचे असते.
डोळ्यांखाली काळी वर्तुळे सततची जागरणे, डोळ्यांवर ताण येणारे काम, लोह कमी असणे, अपुरी झोप, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे यांसारख्या प्रमुख कारणांमुळे दिसून येतात.
ही वर्तुळे घालवण्यासाठी कच्च्या पपईचा गर चेहऱ्याला लावावा. याशिवाय, बटाटे किसून त्या जागी लावल्यासही परिणाम दिसून येतो.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला 10 ते 15 मिनिटे दुधावरची साय लावून ठेवल्यास ही वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
काकडीचे काप डोळ्यांवर ठेवून झोपल्यानेही ही वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
रक्त दूषित झाल्यामुळेही बरेचदा अशा प्रकारची वर्तुळे निर्माण होतात. रक्तशुद्धीसाठी आयुर्वेदात सुचवलेल्या महामंजिष्ठादी काढ्यासारख्या औषधांचा वापर करता येईल.
डोळ्यांखालील वर्तुळांवर बाह्योपचार करण्याबरोबरच आहारातही काही बदल करावे लागतात. यासाठी काळ्या मनुका, अंजिर, केशर, दूध, द्राक्षे, डाळिंबे यांचे सेवन केल्यास लाभदायी ठरू शकते.
हे सर्व करत असतानाच प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे. प्रखर उन्हात बाहेर जाताना गॉगलचा वापर अवश्य करावा. अपुऱ्या प्रकाशात वाचनासारख्या गोष्टी करण्याचे टाळणे, रात्री उशिरापर्यंत संगणकासमोर अथवा टीव्हीसमोर बसणे टाळणे, शांत आणि पुरेशी झोप घेणे आदी गोष्टीही लक्षात घेणं गरजेचं आहे.
डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ञ, मुंबई
9820584716
आपल्याला शाळेत आठवी, नववी मधे शरीर शास्त्रात शिकवलेआहे की--आपल्या पोटात जठर, यकृत म्हणजे मराठीत लिव्हर,प्लीहा,स्वादु पिंड,लहान आंतडे, मोठे आंतडे मुत्र पिंड वगेर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी 22 फूट आहे.--
आता विचार करा. देवाने,निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व 22 फूटाचे आतडे कसे बसविले असेल? 22 फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचा व्हाल्युम किती? हे कसे? विचार चालेना!! एक दिवस
फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले, आन्नाचा घास जेव्हा येतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो,प्रसरण पावते आणि घास पुढे गेला की अकुंचन पावते. म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीरा बाहेर पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व पसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सुर्यनमस्कारात ते होते.
सुर्यनमस्कारात प्रथम खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर डावा पाय दुमडतो व उजवा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते.नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना उजवा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लॅडला व स्रियाना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो. दिवसभराच्या कामाने संध्याकाळीच आपण दमून जात असू तर सकाळी 5 ते 12 नमस्कार घातले तर दमायला होत नाही. रात्री पर्यंत फ्रेश राहतो व दिवस उत्साहात जातो असा माझा गेल्या 32 वर्षाचा अनुभव आहे.
1985 साली मला एक गृहस्थ भेटले. वय 72 होते. मला म्हणाले--मला दोन दिवस संडासला झाली नव्हती, डायबेटीस,गुडघे दुखी होती. (हे बोटीवर कॅप्टन होते) 69 व्या वर्षी आयुष्यातील पहिला सुर्यनमस्कार घातला आणि संडासला धावलो. जोशी आता किती नमस्कार घालत असेन सांगा. मी म्हणालो २०-२५ घालत असाल. ते म्हणाले- रोज 156 नमस्कार घालतो माझे सर्व त्रास गेले
ह्या गृहस्थाचे पासून मी स्फुर्ती घेतली व नमस्कार चालू केले. माझा अनुभव असा की रोज 5 ते 12 नमस्कार तब्बेत चांगली ठेवायला पुरतात.
नमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते. 10 ते 15 मिनीटे लागतात. घरी करणे असल्याने जीमची फी व जाण्या येण्याचा वेळ वाचतो.
फक्त केले पाहिजे रे !!?
अरविंद जोशी B.Sc.
९४२१९४८८९४
योगरत्नाकर या ग्रंथामधील हा आणखी एक श्लोक पहा.
सायं प्रातर्मनुष्यानां अशनं श्रुतिचोदितम्।
नान्तरा भोजनं कुर्यात् अग्निहोत्र समो विधि:।।
शास्त्रात इतक्या स्पष्ट शब्दात लिहिले आहे.
सायंकाळी आणि सकाळी या दोन वेळा जेवले पाहिजे. जसे सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळी अग्निहोत्र चुकत नाही, तसंच भोजन हे पण एक प्रकारचे अग्निहोत्रच आहे. या वेळेला जेवण्याचा नियम अजिबात चुकवू नये.
"काल भोजनम् आरोग्य कराणाम् श्रेष्ठः। "
म्हणजे योग्य वेळी घेतलेले भोजन हे आरोग्य मिळवण्यासाठी योग्य असते. आपण काय जेवतोय, यापेक्षा किती वाजता खातोय, या वेळेला महत्त्व आहे.
हे सगळं ठीक आहे हो, पण आजच्या काळात हे तर्कसंगत वाटत नाही. पूर्वीच्या गोष्टी सांगून हे असं स्वप्नरंजनात जाणं आणि तिथे रमणं, हे वय वाढल्याचं लक्षण वाटते. असं काहीजण म्हणतात. विशेषतः वैद्यांनी म्हटले की यांच्या पराभूत मानसिकतेला काय म्हणावं कळत नाही.
आयुर्वेद समजून घेण्याच्या प्रक्रियेत चुक झाली की अश्या शंका निर्माण होतात. आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेताना रंजक आणि रोचक भाषेत न शिकवल्यामुळे शिक्षणाबद्दलचे प्रेम वाढत तर नाहीच उलट कमी होते, एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी वेगवेगळी रूपके वापरायची असतात, हे अजूनही शिक्षकांच्या लक्षात येत नाहीये. आपली जेवणाची वेळ सकाळ आणि सायंकाळ असावी हे एकच वाक्य आपण कितीतरी वर्षापासून तसे ऐकतंच आलोय, पण बदल झाला का ?
नाही. पण कालचक्राची गती फिरल्यामुळे हेच वाक्य पुनः पुनः पटवून द्यावे लागत आहे. आणि हे सांगण्यासाठी जर भारतीय संस्कृती प्रमाण मानली तर आपला गौरवशाली इतिहास देखील लक्षात येईल आणि मुख्य म्हणजे आयुर्वेद समजून घेतला जाईल ना ! पण पटतच नाही.
समजा आपण एका रस्त्यानं जातोय, आणि काळाच्या ओघात रस्ता चुकलो. आणि अगदी एकशे ऐशी अंशात चुकलो, तर काय करायचं ?
आता एवढं आलोच आहोत तर पुढेच जायला पाहिजे ना. असा विचार करून चालेल का ?
जिथून रस्ता चुकला आहे, तिथपर्यंत मागे आलंच पाहिजे. आणि परत योग्य दिशेने प्रवास सुरू केला पाहिजे. तरच आपण आपल्या ध्येयाच्या दिशेकडे वाटचाल करू.
'काळ खूप पुढे गेला आहे. आता परत मागे फिरता येणे शक्यच नाही, प्रवाहाच्या दिशेत गेलंच पाहिजे,' अशी नकारात्मक मानसिकता असेल तर काऽही शक्य नाही. जिवंत मासेच प्रवाहाच्या विरोधात पोहू शकतात, आणि मेलेले प्रवाहात वाहात जातात.
आणि आपला आपल्या शास्त्रावर, आपल्या स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर, अशक्य ते शक्य करतील स्वामी या उक्तीप्रमाणे, जे रोग कधीही बरे न होणारे असे पाश्चात्य मानसिकतेचे लेबल लावलेले रोग आपण मुळातून उखडून टाकू शकतो.
आरोग्यटीप लिहिण्याचा मुळ उद्देश भारतीय आयुर्वेद आणि त्यातील आरोग्य समजून घेणे हा असल्याने ते मी करणारच. त्याच पद्धतीने तो समजून घ्यावा लागेल. जी चुक आधीच्या पिढीने केली ती आता परत करायची नाही.
आता या टीपेमधे स्वामी समर्थांना आणि अग्निहोत्राला कशाला आणलं ? असा प्रश्न विचारू नका.
रुग्ण बदलायला तयार असतात. वैद्यांनी सांगितलेले सर्व मनापासून करतात, विश्वास ठेवून केले की परिणाम दिसतात. असा माझा अनुभव आहे. अर्थात त्या विश्वासाने वैद्यांनी पण सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यांनी आपल्यामधे सकारात्मक बदल केले पाहिजेत, असे वाटते. मी सांगतो म्हणून अजिबात नको. शास्त्रात काय सांगितले आहे, ते तरी परत एकदा अभ्यासूया.
अर्थात गरज आहे ती, आपलं चुकलंय, हे समजण्याची. आणि मान्य करायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
03.03.2017
खाद्य तेले
आहारात नियमित वापरासाठी कोणते तेल घ्यावे असा आजकाल सगळ्यांच्याच मनात संभ्रम असतो. मोठमोठ्या कंपन्या आकर्षक पॅकिंग करून बेसुमार जाहिराती करतात. त्यामुळे हा संभ्रम दिवसेंदिवस आणखीनच वाढत जात आहे. काही सुशिक्षित कुटुंबांमध्ये तर तेल म्हणजे जणू विषच अशी धारणा झालेली आढळते. तेलाने कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन हार्ट अटॅक येणारच अशी भीती मनात कुठेतरी बसलेली मंडळी आहेत. ह्या विषयावर प्रकाश टाकणार आहेच, परंतु त्यापूर्वी एका ओळीत सांगायचे तर “अति सर्वत्र वर्जयेत” हे वाक्य कायम ध्यानात ठेवावे. स्निग्धपदार्थ दोन प्रकारे आहारातून सेवन केली जातात. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे तूप तेल यांसारखे पदार्थ आणि अप्रत्यक्ष म्हणजे आहारातील इतर पदार्थांमधून जाणारा स्निग्धांश, जसे शेंगदाणे, चिक्की, लाडू इ.
ही भीती कोठून आली?
स्निग्ध पदार्थ हृदयाला घातक आहेत ही भीती पश्चिमी देशांकडून आपल्याकडे आली. ज्यांच्या आहारात फक्त आणि फक्त मांसाहारच असतो त्यांना ही भीती असणे साहजिक आहे. मांसाहारातून (रेड मीट) अप्रत्यक्षपणे अवाजवी प्रमाणात घातक स्निग्धांश शरीरात जातो आणि त्यामुळे अशांना “तेल – तूप खाऊ नका” हे आवर्जून सांगणे जरुरीचे आहे. शाकाहारी लोकांच्या आहारात फोडणीच्या स्वरूपात आणि अप्रत्यक्ष स्वरूपात स्निग्धांश सेवन केला जातो. त्यामुळे शाकाहारींनाही ही भीती बाळगायला हवी. प्रथिनांमध्ये आणि पिष्टमय पदार्थांमध्ये प्रत्येक ग्रॅममध्ये ४ तर स्निग्ध पदार्थांमध्ये ९ उष्मांक (कॅलरीज) असतात. म्हणून जास्त स्निग्ध पदार्थ सेवन करणाऱ्यांना व्यायामाच्या माध्यमातून त्या बर्न करणे अधिक जरुरीचे असते. तेल तूप पचायला तुलनेने अधिक जड असतात आणि शरीरातील मेदाशी ह्याचे साधर्म्य असते म्हणून ह्याने चरबी वाढते. प्रौढ पुरुषांना दर दिवशी सुमरे २५ ते ४० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते तर स्त्रियांना २० ते ३० ग्रॅम स्निग्ध पदार्थांची गरज असते.
आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा आणि मज्जा असे ४ प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात. ह्यापैकी गुणधर्मांच्या दृष्टीने घृत हे सर्वोत्तम, तेल हे त्यापेक्षा कमी, वसा त्याहून कमी आणि मज्जा सर्वात कनिष्ठ असल्याचे वर्णन आहे. ह्या ४ स्निग्ध पदार्थांपैकी तेल संपूर्णपणे वनस्पतीजन्य असून बाकीचे प्राणिज स्नेह आहेत. घृत (तूप) हे प्राण्यांच्या दुधातील स्निग्धांश वेगळा काढून तयार केले जाते आणि वसा आणि मज्जा प्रत्यक्ष प्राण्यांच्या शरीरातून काढली जाते. ह्यात ट्रान्स फॅट्स, धार्मिक विचारांच्या दृष्टीने ह्याचा वापर आपल्याकडे जास्त होत नाही. शिवाय पचनाच्या दृष्टीनेही वसा आणि मज्जा खूप जड आहेत. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्यपदार्थाची चव सुधारते. भाजलेला पापड आणि तळलेला पापड, साधे वरण आणि फोडणीचे वरण किंवा साधी भाजलेली पोळी आणि तूप लावलेली पोळी अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील.
आधुनिक विज्ञान शाखेत स्निग्ध पदार्थांवर बरेच संशोधन झाले आहे. स्निग्ध पदार्थांचे विश्लेषण करून त्यातील सूक्ष्म घटकांचा अभ्यास आज आपल्याला उपलब्ध आहे. विविध खाद्य तेलांविषयी विचार करतांना पुफा, मुफा, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड असे अनेक शब्द आपल्या वाचण्यात आले असतील. त्याविषयी नेमकी व थोडक्यात माहीती आपल्याला असणे जरुरीचे आहे.
वनस्पतींमधून निर्माण केल्या जाणाऱ्या तेलांना टिकाऊपणा विशेष नसतो. अशा तेलांना लवकर खवट वास येऊ लागतो म्हणून आहारात वापरता येत नाहीत. त्यांना अधिक टिकाऊ व अधिक स्वादिष्ट करण्यासाठी हायड्रोजनेशन नावाची प्रक्रिया केली जाते. ही हायड्रोजनेशनची क्रिया अपूर्ण झाल्यास त्यांच्यामध्ये ट्रान्स फॅट्स तयार होतात. ह्या ट्रान्स फॅट्स रक्तातील एल. डी. एल. (स्वास्थ्यास घातक चरबी) वाढवितातव एच. डी. एल. (स्वास्थ्यवर्धक चरबी) कमी करतात. परिणामी हृदयाला रक्ताभिसरण करणाऱ्या धमन्या कडक होतात, कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकाराचा धोका वाढतो. म्हणून तेल खरेदी करतांना शक्यतो हायड्रोजनेटेड तेलाचा वापर करू नये. सरकारी नियमांनुसार तेलाच्या डब्यावर/ पाकिटावर हे छापणे बंधनकारक आहे.
स्निग्ध पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड असे दोन प्रकार आढळतात. २२ ते २५० डिग्री तापमानात गोठणारे सॅच्युरेटेड व ह्याच तापमानात द्रवावस्थेत राहणारे अनसॅच्युरेटेड असे ढोबळ मानाने समजावेत. सॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेल द्रव्य स्वास्थ्याच्या दृष्टीने घातक व अनसॅच्युरेटेड त्यामानाने चांगली असतात. संपूर्णपणे अनसॅच्युरेटेड स्निग्धता असलेली तेले असत नाहीत. त्यात किंचित प्रमाणात सॅच्युरेटेड स्निग्धता असतेच. पण हे प्रमाण नगण्य असावे एवढेच ध्यानात असावे.
अनसॅच्युरेटेड स्निग्धता ही पण दोन प्रकारांची असते. ह्यात मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) आणि पॉलिअनसॅच्युरेटेड (PUFA) असे दोन प्रकार आहेत. ओमेगा जातीचे वसाम्ले मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) मध्ये असतात व ही स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायक असतात. हृदय, मेंदू, सांधे, ज्ञानेंद्रियांची शक्ती उत्तम राखणे अशी गुणवत्ता त्यांमध्ये असते.
भारतीय आहारात मुख्यतः खालील तेलांचा वापर मुख्यत्वाने होतो. त्यातील घटकांमधील रसायनांचा तक्ता –
| मराठी नाव | इंग्रजी नाव | सॅच्युरेटेड
स्निग्धांश |
MUFA | PUFA | ओमेगा ३ | ओमेगा ६ |
| तीळ तेल | Sesame oil | १४ % | ४३ % | ४३ % | ०.३ % | ४१ % |
| भुईमूग तेल | Peanut oil | १८ % | ४९ % | ३२ % | ० % | ३१ % |
| पाम तेल | Palm oil | ५२ % | ३८ % | १० % | ०.२ % | ९.१ % |
| सोयाबीन तेल | Soybean oil | १५ % | २४ % | ६१ % | ६.७ % | ५० % |
| सुर्यफुल तेल | Sunflower oil | ११ % | २० % | ६९ % | ० % | ५६ % |
| सरकी तेल | Cotton seed oil | २४ % | २६ % | ५० % | ०.२ % | ५० % |
| खोबरेल तेल | Coconut oil | ९२ % | ०६ % | ०२ % | ० % | १.८ % |
| करडई तेल | Safflower oil | १० % | १३ % | ७७ % | ० % | ७४ % |
| ऑलिव्ह तेल | Olive oil | १४ % | ७३ % | ११ % | ० % | ० % |
| राईचे तेल | Mustard oil | १३ % | ६० % | २१ % | ५.९ % | १५ % |
| तांदूळ कोंड्याचे तेल | Rice Bran oil | २० % | ७४ % | ३३ % | १.६ % | ३३ % |
| मक्याचे तेल | Corn oil | १३ % | २५ % | ६२ % | १.१ % | ५३ % |
| जवसाचे तेल | Flax Seed oil | ११ % | २१ % | ६८ % | ५३ % | १३ % |
तीळ तेल -
रिफाइंड आणि नॉन रिफाइण्ड असे तिळाचे तेल दोन प्रकारचे असते. सेंद्रिय, रिफाइण्ड न केलेले तिळाचे तेल आपल्या अन्नाला मोहक सुगंध देते. तीळ तेलात मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्स् असतात जे फ्री रॅडिकल्सची निर्मिती रोखतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे गुण आहे. तीळ तेल चिंता करणार्यांसाठी तसेच आपल्या नसा (नर्व्ह) आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे. ते रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. तसेच पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. जे लोक तीळ तेल नियमितपणे वापरतात, ते ताण-तणावावर मात करू शकतात, मज्जासंस्थेला पोषक ठरते, थकवा कमी करते, रात्री झोप बरी येते आणि आयुष्य वाढवते. तीळ तेलाने कर्करोगापासून रक्षण होऊ शकते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.
शेंगदाणा तेल :
यामध्ये जवळपास सगळ्या प्रकारच्या फॅट्स्चं उत्तम मिश्रण आहे. शेंगदाण्याच्या तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडन्ट्स असतात जे फ्री रॅडिकल्स (पेशीविघातक दोष) तयार होण्यापासून रोखतात आणि विविध प्रकारच्या कर्करोगांपासून रक्षण करतात. ते शरीरातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉलचीही पातळी कमी करतात. चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच एचडीएल. हे कोलेस्टेरॉलची परत यकृताकडे पाठविते आणि अडथळ्यांपासून बचाव करते. वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल. हे कोलेस्टेरॉलचे वहन पेशींकडे आणि वाहिन्यांकडे करून वाहिन्यात अडथळे निर्माण होतात.
पाम तेल
जगात होणाऱ्या खाद्य तेलाच्या निर्मितीपैकी ४४ टक्के हिस्सा पाम तेलाचा आहे. ह्यात पाल्मेटिक अम्ल नावाचा घटक असतो. ह्यात ट्रान्स फॅट व सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे प्रमाण मोठे आहे व हृदयाच्या रक्ताभिसरणासाठी योग्य नाही असे जागतिक आरोग्य संघटन संस्थेने प्रसिद्ध केले आहे.
सोयाबीन तेल
सोयाबीनच्या द्विदल बियांपासून सुमारे ५०% खाद्य तेल काढता येते. यात प्रथिनांचे प्रमाण उत्तम असते. रिफाइंड सोयाबीन तेलाचा खप शेंगदाण्याच्या तेलाच्या खालोखाल आहे. रक्तातील घातक स्निग्धांश व स्वस्थ्यकर स्निग्धांशांचा याने समतोल राखला जातो. प्रथिनांचे उत्तम स्रोत असल्याने शुद्ध शाकाहारी लोकांनी ह्याचा वापर जरूर करावा. सोयाबीनमधील अॅन्टिऑक्सिडंट घटक विशिष्ट कॅन्सर पेशींना आळा घालून त्यांची वाढ रोखतात असे संदर्भ मिळतात.
सनफ्लॉवर तेल -
या तेलामध्ये जीवनसत्त्व ‘ई’ जास्त आणि सॅच्युरेटेड फॅट कमी असते. हे तेल हृदयास हितकर आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते कारण त्यात पॉलिसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असते. यातील PUFA आणि MUFA जातीची स्निग्धाम्ले तीव्र उष्णता, प्रखर प्रकाश, हवेतील बाष्प अशा कारणांमुळे तेलाचे गुणधर्म नाश पावतात. म्हणून ह्याच्या निर्मिती प्रक्रियेत आणि साठविण्याच्या पद्धती नियंत्रित असणे जरुरीचे आहे.
सरकी तेल –
कपाशीच्या बियांना सरकी म्हणतात. यात फॉस्फरससुक्त संयुगे, स्टेरॉल, क्षार आणि अ, ब, ड व ई ही जीवनसत्त्वे आहेत. याशिवाय सरकीत अल्प प्रमाणात पण विशिष्ट गुणधर्मांचे घटक म्हणजे ‘गॉसिपॉल’ नावाचे संयुग आणि कच्च्या सरकी तेलाला गडद रंग देणारी रंगद्रव्ये असतात. पितळी भांड्यांवर ह्याची रासायनिक क्रिया होते म्हणून स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. हृदय स्वास्थ्याच्या दृष्टीने हे चांगले आहेच शिवाय ई जीवनसत्वाचे प्रमाणही ह्यात चांगले आहे. गॉसिपॉल’ नामक विशिष्ट घटकामुळे स्त्री व पुरुष प्रजननक्षमता खालावते असे काही वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहे.
खोबरेल तेल -
खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक आहे. त्यानुसार हे खाण्यास अत्यंत घातक आहे असा निष्कर्ष निघतो. परंतु ह्यातील मीडियम चेन फॅटी अम्ल हृदयाला हितकार आहेत. ह्याच्या सेवनाने रक्तवाहिन्यांमधील घातक चरबी कमी होते. नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच दोन बाजू तेलांनाही असतात. सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे लाभही अनेक आहेत. मेंदूच्या जडणघडणीमध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे अशा तेलांना पूर्णपणे वर्ज्य करून चालत नाही. अल्झेमर्स डिसीजमध्ये (वार्धक्यात होणारा स्मृतिभ्रंश) खोबरेल तेलाचा उपयोग अतिशय प्रशंसनीय आहे असे संशोधन नुकतेच झाले आहे.
करडई तेल (सॅफ्लॉवर) -
ह्या तेलात पॉलिअन्सॅच्युरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असे गुणधर्म असतात ज्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करते. तसेच ते पेशीचे आवरण मजबूत करण्यात मदत करत ज्यामुळे विषारी घटकांना प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो ज्यामुळे मग रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या रोगांपासून बचाव करते. हे तेल मधुमेहींनासुद्धा वापरायला सांगितले जाते कारण ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच स्त्रियांमध्ये पाळी येण्यापूर्वीची लक्षणे कमी करते.
ऑलिव्ह तेल
हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते. ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे. स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो. या तेलाचा वापर तळणीसाठी केल्यास गुणधर्म नाश पावतात म्हणून कच्च्या स्वरूपात याचा वापर करणे अधिक योग्य आहे.
राईचे तेल –
हे खाद्यतेल मोहरीपासून बनविण्यात येते. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात. हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो. भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली कडे याचा वापर होतो. ह्यात MUFA चे प्रमाण उत्तम असल्याने ओमेगा ३ जातीचे मेदाम्ल प्रचुर प्रमाणात आहेत. हे प्रमाण एकंदरीत स्वास्थ्यासाठी चांगले आहे. मात्र याचा वास उग्र असतो. अन्य तेलांचा वापर करणाऱ्यांना रुचत नाही.
राईस ब्रान तेल -
या तेलात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि ट्रान्स फॅट नसतात. त्यात जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडन्ट्सही असतात. त्यामुळे ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. याला सूक्ष्म असा वास असतो आणि धुराचा बिंदू जास्त असतो. त्यामुळे ते तळणासाठी व अन्न शिजवण्यासाठी व भाजण्यासाठीही वापरता येते.
मक्याचे तेल –
मक्याच्या अंकुरापासून तेल काढतात. याच्यात क्लोरेस्टेरॉलचे प्रमाण खूप कमी असल्याने हृदयरोगावरती उपयुक्त आहे. मक्याच्या अंकुरातून तेल काढल्यानंतर राहिलेल्या पेंडीपासून जनावरांचे खाद्य तयार केलं जात. तसाच कोरडया प्रक्रियेतून निघालेला कोंडा पशुखाद्यात वापरला जातो. ऑलिव्ह तेलाच्या तुलनेत हे तेल अधिक उष्णता सहन करते म्हणून तळणीसाठी हे अधिक योग्य आहे. मशीनद्वारे काढलेले मक्याचे तेल अधिक स्वास्थ्यकर आहे. आजकाल बाजारात हेक्झेन किंवा आयसोहेक्झेन या रसायनांचा वापर करून काढलेले तेल अधिक प्रमाणात मिळते. त्यातील रसायनांचा घातक परिणाम होण्याची शक्यता असते.
जवसाचे तेल -
जवसाच्या बिया (flaxseed किंवा linseed) अत्यंत आरोग्यदायी आहेत. यालाच अळशी असेही नाव आहे. आजकाल जवसाला खूप महत्त्व लाभले आहे. याचे प्रमुख कारण आहे जवसामध्ये असलेले ओमेगा-3 हे मेदाम्ल. आहारशास्त्रानुसार आपल्या आहारात ओमेगा-3 व ओमेगा-6 या दोन मेदाम्लांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. सामान्यतः ओमेगा-6 हे मेदाम्ल रोजच्या वापरातल्या तेलांमधून सहजपणे मिळत असते; परंतु ओमेगा-3 असलेले पदार्थ कमी आहेत. म्हणून हे मेदाम्ल शरीराला सहजासहजी मिळत नाही. तेलीय मासे, अक्रोड, मोहरी, मेथी, जवस या पदार्थांपासून आपल्याला ओमेगा-3 मिळू शकते. हे मेदाम्ल विशेषत्वाने हृदय व त्याच्या धमन्यांचे आरोग्य राखण्याचे काम करते. रक्तातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स या घटकांचे प्रमाण ओमेगा-3 ने कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उच्चरक्तदाब, संधीविकार, कर्करोग व स्थूलता यांपासून संरक्षण मिळते. ओमेगा-3 या मेदाम्लामुळे स्मरणशक्ती वाढते, डोकेदुखी, नैराश्य कमी होते. जवस हे रजोनिवृत्तीशी संबंधित तक्रारी कमी करते. रोज साधारणपणे ३० ग्रॅम जवस खाण्याने रजःनिवृतीपूर्वी होणारी डोकेदुखी, चिडचिडेपणा, शरीरातून गरम वाफा निघणे, हे त्रास कमी होतात. जवसाची चटणी किंवा जवसाचे तेल या स्वरूपात जवसाचा आहारात वापर करता येईल. जवसाच्या बिया बडीशेपेसारखे तव्यावर परतून खाव्यात. किंचित मीठ घालून मुखवास रूपाने खूप रुचकर लागतात. जवसाचे तेल शक्यतो तापवू नये, ते चटणीवर किंवा सॅलडवर घ्यावे. तापवल्याने याला विशिष्ट उग्र वास येतो.
सारांश:
खाद्य तेलांबद्दल एवढी माहीती वाचल्यावर “मी कोणते तेल वापरू” हा प्रश्न आपल्याला नक्कीच भेडसावणार आहे. म्हणून सारांशाने थोडक्यात महत्वाचे मुद्दे आता पाहूया –
१) लेबलवर “हायड्रोजनेटेड” शब्द दिसला तर असे तेल वापरू नये.
२) तळणीसाठी एकदा वापरलेले तेल परत वापरू नये. (निरांजनात वापरण्यास हरकत नाही)
३) “ट्रान्स फॅट्स” असलेले तेल वापरू नये.
४) मांसाहाराचे बंधन नसेल तर मधूनच फिश ऑईलचा आहारात वापर करावा.
५) सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असलेले तेल टाळावे (याला खोबरेल तेल अपवाद आहे)
६) नॉन-रिफाइंड तेलांना नैसर्गिक गंध असतो व ती तेले अधिक पौष्टिक असतात. परंतु तुलनेने लवकर खवट होतात. तळणीसाठी अशा तेलांचा वापर शक्यतो करू नये.
७) रिफाइंड तेलांचा वापर तळणीसाठी अधिक योग्य असतो. रिफायनिंग प्रक्रियेत तेलामधील कित्येक स्वास्थ्यकर जीवनसत्व नाश पावतात. रिफाइंड तेल अधिक टिकाऊ असते, मात्र त्याला नैसर्गिक स्वाद फारच कमी असतो.
८) ज्याज्या ठिकाणी गायीचे तूप वापरता येईल त्यात्या ठिकाणी तेलाऐवजी अशा तुपाचा वापर करावा.
९) उपलब्ध असलेल्या सर्व तेलांचा वापर अदलून बदलून करावा. एकच एक तेल कधीही खाण्यास वापरू नये.
१०) आहारात कोणतेही तेल घ्या पण ‘४५ मिनिटे नियमित व्यायाम करणे’ हा नियम कधीही विसरू नका.
११) स्निग्ध पदार्थ म्हटल्यावर सर्वांच्या मनात “कोलेस्टेरॉलची” दहशत बसलेते. म्हणून ह्याबद्दल थोडी माहीती हवीच -
कोलेस्टेरॉलबद्दल ज्यांच्या मनात भीती आहे त्यांनी त्याचे फायदेही समजून घेतले पाहिजेत. कोलेस्टेरॉल हा यकृतात निर्माण होणारा एक घटक आहे. हा घटक सर्वस्वी वाईट असता तर निसर्गाने ह्याची निर्मिती केलीच नसती. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अति सर्वत्र वर्जयेत हा नियम येथेही लागू होतो. त्याचे संतुलन शरीराच्या गरजेपुरते असावे, अति वाढू नये ह्याची काळजी घ्यावी. शरीरात निर्माण होणाऱ्या कोलेस्टेरॉलशिवाय आपण आहारातून घेतलेले कोलेस्टेरॉल देहाचे स्वास्थ्य खालावत नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डॉ. संतोष जळूकर, मुंबई
+917208777773
मुळात 'नगरसेवक' व त्यांच्या ' निवडणुका ' हा एक ह्या काळातील भ्रष्टचाराचा एक मूळ उगम आहे व त्या आता रद्दबदल करूनच हा भ्रष्ट राजमार्ग कायमचा बंद करणे हीच ह्या काळाची गरज आहे. एक सांगा ह्या ऑनलाईन च्या काळात आपल्या नगरीत हा नगरसेवक हवाच कशाला ? जर सगळ्या महापालिका वॉर्ड कार्यालयांनी आपल सगळा कारभार पारदर्शक ठेवून आपली सगळी टेंडर्स, प्रोजेक्ट्स माहिती व जनसंपर्क अधिकाराखाली जनतेला खुली करून आपल्या सर्व कामाचा तपशील वेळोवेळी प्रसिद्ध केला तर ह्या नगरसेवकांची अजिबातच गरजच नाही.
प्रत्येक नागरिक हा नगरसेवकाच्या भूमिकेतून आपल्या वॉर्ड मधील चालू असलेल्या, होऊ घातलेल्या कामांचा तपशील अभ्यासून त्यावर उपयुक्त सूचना केल्या तर ह्या भ्रष्ट नगरसेवकांची गरजच काय ! प्रत्यके पालिका शसनाने ऑनलाईन कॉल सेंटर प्रस्थापित करून त्याद्वारे नागरिकांच्या समस्यां,सूचना दाखल करून त्यावरील पुढील कार्यवाहीची जबाबदारी घेतली व तसेच प्रत्येक रहिवासी कार्यकारी मंडळे पालिकेतील कारभारात अधिकृतपणे सहभाग घेवुन आपआपल्या समस्यां/सूचना मांडुन त्यान्चा पाठ्पुरावा केला तर नागरिकान्च्या मताची पोळी खाऊन वर त्यावर मिळालेल्या सत्तेचे तूप ओरपणारे नगरसेवक हवेतच कशाला ?
महापालिका अधिकाऱ्यांची कार्यपातळी तपासणी वेळोवेळी स्वतंत्र संस्थेकडून करवुन त्यात वेळोवेळी पारदर्शक सुधारणा होत राहिली तर आतापर्यंत त्यांच्या सहकार्याने होत असलेल्या भ्रष्ट कारभारावर आपले कोटिकोटिचे इमले उभारून माजलेल्या ह्या नगरसेवकांची गरजच काय?
तेव्हा आता खरंच पाळी आली आहे कि हे किडलेले भ्रष्ट नगरसेवक पद कायमचे गाडून टाकले पाहिजे, मग त्याच्या निवडणुकांचा किळसवाणा खेळखन्डोबा तर थांबेलच वर त्यावरील होणारा अनावश्यक खर्च हा नगर सुधारण्यासाठी कामी येईल. त्याबरोबरच इतिहासातच रमणारे काही राजकीय पक्ष, नेते हे पण अस्त पावतील व ती ह्या काळाची गरजच होती म्हणून आपल्या इतिहासातच नोंद केली जाईल !
-- राजेन्द्र नन्दा
१०४ उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्याची अफाट कामगिरी केल्याबद्दल इस्रो च्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके कमी आहे. इस्रो असू दे किंवा डी आर डी ओ यात काम करणारी शास्त्रज्ञ मंडळी म्हणजे आधुनिक ऋषी आहेत आणि सुदैवाने आजपर्यंतच्या सरकारांनी त्यांची हि स्वायतत्ता कायम राखली आहे. बहुसंख्य मंडळी दक्षिण भारतीय, बहुसंख्य मंडळी ब्राह्मण आणि अत्यंत धार्मिक. खऱ्या अर्थाने ज्ञानी आहेत आणि त्यामुळे मानवी ज्ञानाच्या कक्षा सुद्धा त्यांना ज्ञात आहेत. कर्मयोगी आहेत आणि त्यातूनच नकळत अध्यात्मिक प्रगती सुद्धा साधली गेली आहे आणि म्हणूनच मी फक्त निम्मित्तमात्र आहे, कर्ताकरविता तो ईश्वर आहे आणि म्हणून माझी प्रत्येक रचना त्याच्या चरणी अर्पण करून मी पुढे जातो आहे हि अस्सल योग्याच्या हृदयात असणारी भावना, आपल्या हृदयात बाळगून हि मंडळी कार्यरत असतात. काम करण्यासाठी मिळणारा अत्यल्प निधी, सरकारी खाक्यातूनच मिळणारे श्रेणीनिहाय वेतन जे तुलना केली असल्यास पाश्चात्य देशातील शास्त्रज्ञांच्या वेतनाच्या फक्त १० % भरेल त्यात सुद्धा समाधानी राहून, इतर केंद्रीय कर्मचारी ओव्हर टाईम सारख्या सगळ्या सुविधा घेत असताना घड्याळ्याच्या काट्याकडे न पाहता काम करणारे हे आधुनिक ऋषी पहिले कि आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते.
केंद्र आणि राज्य सरकार चालवत असणाऱ्या इतर कोणत्याही संशोधन संस्थाना टार्गेट नसते. तेथील मंडळी अक्षरशः पाट्या टाकत असतात. हे मी पाहून पूर्ण जबाबदारीने सांगतो आहे. मध्यंतरी औरंगाबाद मधील बाजरी संशोधन संस्थेच्या एका शास्त्रज्ञाच्या भेटीचा योग आला. मी त्यांना विचारले तुम्ही काय करता ? बाजारीवर संशोधन करतो. मग एखादे नवीन वाण विकसित करत आहात का ? नाही आम्ही संशोधन करतो. उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी संकरीत वाण तयार करत आहात का ? नाही आम्ही संशोधन करतो . इतकेच उत्तर ते देत होते. मी त्यांना विचारले तुम्हाला काही टार्गेट नसते का ? त्यावर त्यांनी नाही हे उत्तर दिले. आपल्या देशातील कृषीक्षेत्राची वाट लागण्यास असल्या कृषी संस्था आणि विद्यापीठे जबाबदार आहेत आणि या उलट इस्रो हि सतत नासाशी स्पर्धा करण्याच्या आणि त्यांना मागे टाकण्याच्या प्रयत्नात असते. डी आर डी ओ ला तर सतत चीन आणि अमेरिकेवर नजर ठेवून त्यांच्या तोडीची शस्त्रात्रे विकसित करावी लागतात आणि ती सुद्धा इंडियन प्राईस मध्ये. परंतु हि मंडळी जिद्दीने आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन हे कार्य निरलसपणे करत असतात.
मंगलयान प्रकल्पावर मध्यंतरी डिस्कव्हरी च्यानेलने एक सुंदर वृत्तांत दाखवला. त्यात त्यांनी दाखवले कि ज्यावेळी मंगलयान हे मंगल ग्रहाच्या कक्षेत जाणार होते त्यावेळी काही काळ अश्या लोकेशन ला असणार होते कि त्या यानाला सूर्य अथवा पृथ्वी काहीही दिसणार नाही आणि तरीसुद्धा त्याला त्याचे को ordinate पृथ्वीशी सेट करावे लागतील. या टप्प्यावर जाऊनच यापूर्वीच्या मंगलयानांच्या मोहिमा अपयशी झालेल्या होत्या. इस्रो ने या साठी प्राचीन भारतीय ऋषींच्या ज्ञानाची मदत घेतली. वराहमिहीर हा प्राचीन astro फिजिशियन होता त्याने या परिस्थितीत तुम्ही तुमचे लोकेशन इतर ग्रहांच्या अभ्यासाने कसे ठरवावे याचे मार्गदर्शनपर लेखन केलेले आहे. ( त्याच्यामते तो देहातीत अवस्थेत या पद्धतीने अंतराळात संचार करू शकत असे आणि ते इतर ऋषींना सुद्धा साध्य होते ) त्याच्या गणितीय माहितीचा आधार घेऊन इस्रो मध्ये कार्यरत असणाऱ्या astro फिजिशियन शास्त्रज्ञांनी मंगलयानाचे परिभ्रमण ठरवले आणि त्यांचे ज्ञान किती परिपूर्ण असेल कि पहिल्याच प्रयत्नात भारताने हि मोहीम यशस्वी केली. हा संपूर्ण प्रकल्प अत्यल्प खर्चात पूर्ण करणे साध्य व्हावे म्हणून या मंडळीनी गोफणीच्या तत्वाचा वापर करून मंगलयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यावर अंतराळात अक्षरशः भिरकावून दिले. आणि तब्बल ३०० दिवस कोणत्याही इंधनाचा वापर न करता इंजिन बंद करून हे मंगलयान मंगळाजवळ दाखल झाले. या शास्त्रज्ञांच्या बुद्धीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. भोवताली नकारात्मक वातावरण असताना सुद्धा सकारात्मक वृत्तीने प्रत्येक संकटाला प्रत्येक अल्प साधनांना एक संधी समजून आपल्या बुद्धीला आव्हान समजून त्यातून काही तरी असे अफाट घडवणाऱ्या या शास्त्रज्ञ मंडळीना आपण सामान्य भारतीयांनी लाख वेळा शीरसाष्टांग वंदन केले तरी सुद्धा ते कमीच असेल. या अश्या तमाम अग्नीदिव्यातून जाऊन हि मंडळी प्रकल्प पूर्ण करतात आणि कृष्णार्पणमस्तु भावनेतून त्याची प्रतिकृती ईश्वराला अर्पण करतात आणि नवीन जबाबदारी स्वीकारतात.
दुर्दैवाने आपल्या देशात पुरोगामी नावाची एक अत्यंत मनोविक्रृत जमात अस्तित्वात आहे त्यांना प्रतिकृती मंदिरात अर्पण करणे सुद्धा त्यांच्या पुरोगामी पणाचा अपमान वाटतो आणि ते या शास्त्रज्ञ मंडळीना अंधश्रद्धा पसरवत आहेत म्हणून फैलावर घेतात. यांच्या विद्वत्तेच्या आणि ज्ञानाच्या एक शतांश पातळीवर नसणारी अर्धवट अक्कल असणारी मंडळी अशी टीका करताना पाहून मन खरच विदीर्ण होते.
असो. परत एकदा आधुनिक ऋषी मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि आम्हाला विश्वास आहे असे अभिमानाचे क्षण या राष्ट्राच्या नशिबी तुमच्यामुळे वारंवार येणार आहेत .
(अतिशय सुंदर असलेल्या या लेकाचे लेखक कोण आहेत ते माहित नाही. Whatsapp वरुन आलेला हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत)
मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मेनू विषयी मत मागितलं ...त्यावेळी त्यांना दिलेले हे उत्तर...
मेनू साधारण असा असावा-
वरण- भात, तूप, मीठ, लिंबू - त्याबरोबर शक्य असल्यास चमचाभर पूरण.
मसाले भात, पण त्यावर ताज्या ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं आवश्यक...
पुऱ्या, अळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी,
सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी.
पापड-कुरडई. कोथिंबीर वडी किंवा घोसाळ्याची भजी.
ओल्या नारळाची कोथिंबीरीची चटणी, काकड़ी मोजक्या प्रमाणात दाण्याचा कूट व दही घातलेली कोशिंबीर.
चवी पुरतं पंचामृमत.
गोडात श्रीखंड किंवा बासुंदी.
मठ्ठा.
आता काही सूचना....लक्षपूर्वक वाचा..
आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेंव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको.
तेलात आंम्हास पोहावयाचे नाही, तेंव्हा तवंगाचा तलाव नको.
श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...
आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही...श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हास मान्य नाही...
उगीचच गळेपडू आग्रह नसावा ( विनाकारण आग्रह करून वाढल्यास अपमान करण्यात येईल ) .
अळुच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावेत, उगाच तुकडे तुकडे टाकू नयेत...
तसेच खोबरे देखील पाउण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नकोत.
वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.
पापड-कुरडई मरतुकडे नको....त्याच्यातला कुरकुरीतपणा निघुन गेल्यास आमची कुरकुर सुरु होईल...
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी ...तिखट नको...
त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारख तिखट त्यात उधळू नये...
आता पान वाढावयाच्या सूचना -
पाट मांडून त्यासमोर छान (आटोपशीर) रांगोळी घालावी.. रांगोळी स्पर्धा असल्यासारखे वागू नये.
पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...
पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मिठ वाढावे आणि
त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे
वाढावे...
उणे 90 अंशावर पापड़, त्याखाली पूरी वाढावी.
मध्यभागी भाताची मुद असावी व सगळं वरण भसकन वाढू नये... वरणाचा ओघळ अजिबात येता कामा नये...
मुदाचा आकार प्रमाणशीर असावा...भसाडा नको...
वरण-भाता खाली मसाले भात वाढावा.
मसालाभाताच्या उजव्या बाजुलाच भाजी वाढलेली असावी..
आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.
उजव्या हाताला वरच्या साइडला 45 अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.
आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.
वर नमूद केलेल्यात काही त्रुटि असल्यास दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आंम्हाला दाखवू नये.
बस ऐवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या असे समजू नये. प्रत्यक्ष जेवताना असतीलच.
आपला , ( नम्र वगैरे म्हणून मान खाली घालणे आवश्यक नाही )
"काटेकोर" पुणेकर
Copyright © 2025 | Marathisrushti