(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आंगणेवाडीची श्री भराडीदेवी

    मालवणपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्या मसूरे या गांवातील बारा वाड्यांपॆकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे. पण श्री भराडीदेवीच्या प्रसिद्धीमुळे आंगणेवाडी हे एक गांवच असल्याचा समज सर्व-सामान्य लोकांमध्ये निर्माण झालेला आहे.

    p-34368-bharadideviश्री भरडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. साधारणत: ३०० वर्षापूर्वी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची कथा आहे. आंगणे नामक ग्रामस्थाची गाय नेहमी रानातील एका विशिष्ठ ठिकाणी एका पाषाणावर पान्हा सोडत असे. एके दिवशी तो रानात गेला असता सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याच दिवशी, देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला आणि आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले. आणि तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करु लागले. 'भरड' भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते कि, ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. ते वडे तेथून आपल्या घरी आणता येत नाहीत.

    देवी जशी वड्यातून आली तशी ती वड्यातून बाहेर गेली तर ? अशी भिती वाटत असल्यामुळे ते प्रसादाचे वडे बाहेर नेऊ देत नाहित. असे या नवसाला पावणार्या देवीचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे. जत्रोत्सवाला तर भाविकांचा पूरच येतो.
    या देवीचा जत्रॊत्सव साधारणपणे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातून होतो. विशेष म्हणजे जत्रा विशेष तिथीवर अवलंबून नसून ती वेगळ्या प्रकारे ठरवली जाते. देवदिवाळी झाल्यानंतर देवीचा डाळप विधी (मांजरी बसणं) होतो. या विधीमध्ये आंगणेवाडीतील ठरावीक ठिकाणी पुजारी, गुरव, आंगणे कुटुंबीय व इतर यांसह सहभोजन केलं जातं, या वेळी जत्रेचं नियोजनही ठरवलं जातं. हा विधी झाल्यानंतर मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी...’’ असे गार्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. यालाच ‘रान धरणं’ असं म्हटलं जातं.जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत पुढील काम होत नाही.पारध म्हणून डुकराची शिकार झाल्यानंतर, या शिकारीची गावातून मिरवणूक काढली जाते.

    मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. या पारधीनंतर पुन्हा देवीचा कौल घेतला जाऊन जत्रेची तारीख निश्चित केली जाते. गावाबाहेर इतरत्र असलेल्यांना या जत्रेची तारीख जाहीर होण्याबाबत प्रचंड उत्सुकता असते.

    नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकर्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही. देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते.उत्सवादिवशी देवीची स्वयंभू पाषाण मूर्ती अलंकारांनी सजविली जाते. या पाषाणास मुखवटा घालून
    साडीचोळी नेसविली जाते. संपूर्ण अलंकार धारण केलेलं देवीचं रूप मनात घर करून जातं. जत्रेच्या पहिल्या दिवशीच पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या ओटय़ा भरण्यास प्रारंभ होतो. या दोन दिवसीय उत्सवामध्ये देवीचं रूप अवर्णनीय दिसतं. देवीची ओटी खणानारळानं, तर नवस तुळाभारानं फेडले जातात. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते.याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो.यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवीसमोर नैवेद्याची ताटं लावण्याचा (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो.हा मान आंगणे समाजातील कुटुंबांचा असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणार्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.

    जत्रेच्या दिवशी रात्री हा विधी झाल्यानंतर आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेऊन हा उपवास सोडला जातो. जत्रेचा दुसरा दिवस हा मोड जत्रेचा असतो. या दिवशी इतर ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. मसुरे पंचक्रोशीचं आराध्य दैवत असलेल्या या भराडी देवीची ही जत्रा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्याचा योग वर्षातून एकदाच लाभतो.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – अंतिम भाग 20

    घड्याळ दोन तास पुढे करा.

    जेवणाची वेळ सायंकाळी सात वाजता करणे हे
    "आताच्या प्रमाणित सरकारी वेळेनुसार शक्य नाही."
    प्रत्येकाचा हाच एक प्राॅब्लेम.
    त्यालाही एक पर्याय सुचवतो.
    आपले राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे करावे. म्हणजे काही प्रश्न आपोआपच सोडवले जातील.

    मी त्या क्षणाची वाट पहातोय, जेव्हा मा. पंतप्रधान मोदीजी रात्री आठ वाजता, कधीतरी रात्री राष्ट्र के नाम संदेश घोषित करतील....

    "मित्रो, उद्या सूर्योदयापासून सरकारी कार्यालयांची वेळ बदलण्यात आली असून राष्ट्रीय घड्याळ दोन तास पुढे सरकवण्यात आलेले आहे. साडेदहा ऐवजी सकाळी साडेआठला सरकारी कार्यालये सुरू होतील. आणि सायंकाळी साडेपाच ऐवजी 3.30 ला सर्व कार्यालयातील कामकाज थांबेल. जास्तीत जास्त उशीरा म्हणजे 4 वाजेपर्यंत पर्यत काम होईल. त्यानंतर सर्व सरकारी कामे बंद करण्यात येतील. त्यामुळे घरी यायला कोणतेही कारण उरणार नाही. साडेपाच ते सहापर्यंत सर्वजण घरी पोचतील. आणि पुढील एक तास जेवण बनवण्यात खर्च होऊन सात वाजता जेवण आटपेल. साडेसातला स्वयंपाकघरात कोणी गेल्यास जेवण मिळणार नाही. कुलुप लावण्यात यावे. घरातील स्त्री पुरूषांनी त्यानंतरचा वेळ सामाजिक कामांसाठी खर्च करावा. काळ वेळ ओळखून बागेत, देवळात, प्रयोगशाळेत, वाचनालयात जरूर जावे. विशेषतः महिला वर्गाने स्वतःसाठी स्पेस घ्यावी.
    चूल, मूल, रांधा,वाढा, उष्टी काढा या जोखडातून बाहेर पडावे. साडेसात ते रात्रौ साडेदहा पर्यतचा वेळ फुल्ल फॅमिली टाईम."
    रात्रीची लास्ट लोकल दीड ऐवजी 12 वाजता असेल.

    असं केल्याने पहाटे उठावे लागेल, भूक लागूनच जाग येईल, आपोआपच ब्राह्म मुहूर्तावर उठणे होईल. दिनचर्या वेळेत सुरू होईल. माॅर्निंग वाॅक बंद. त्याऐवजी दहा पंधरा मिनिटं प्राणायाम योगासाठी देता येईल.
    नाश्त्याला काय असा प्रश्नच पडणार नाही. त्याऐवजी जेवणाचीच तयारी करावी. जेवूनच बाहेर पडावे. शाळा, ऑफीस, बॅका, पोस्ट, दुकाने, माॅल, सरकारी दवाखाने, कोर्ट, संसद कामकाज नऊला सुरू झालेले असतील. जेवणाचा डबा फार जणांना न्यावाच लागणार नाही. अगदी हलका फुलका नाश्ता किंवा उत्तम प्रतीचे फळ दुपारी खावे. ते सरकारकडून पुरवण्यात येईल.

    सायंकाळी नंतर या सर्व सरकारी आस्थापने बंद झाल्याने वीजेची प्रचंड प्रमाणात बचत होईल. भारनियमन कायमचे बंद होईल. पहाटे लवकर उठायचे असल्यामुळे रात्री लवकर झोपणे होईल, त्यामुळे झोप पूर्ण होईल.
    फायदेच फायदे होतील....

    म्हणून,
    "मेरे प्यारे देशवासीयोऽऽ, ये बदलाव किसी राजकीय स्वार्थ से नही, बल्की आपकी याने आपके देह की रक्षा केलिऐ और मेरे देश की रक्षा के लिए बहोत जरूरी है, मेरी आपसे गुजारीश है, मुझे सिर्फ एकसो बीस दिन यानी तीन महिना दिजीए, आपको बदलाव जरूर दिखेगा, जिंदगीभर की यातायात, और दवाओ का काला बाजार हमेशा केलिए बंद हो जाएगा.
    बस्स मुझे आपका सहयोग चाहिए । अपने लिए, अपने परिवार केलिए और अपने देश केलिए कुछ करने का, कुछ कर दिखाने का समय आ गया है ।
    मित्रो, मुझे पूरा भरोसा है, आप मेरा साथ जरूर दोगे, शुरूवाती के दिनो मे आपको तकलीफ जरूर होगी, लेकीन आपकी सेहत मे काफी सुधार आएगा ।
    सुबह जल्दी उठने की वजह से दो लोगों की मौत....
    दवाईयों का कारोबार खत्म होने से अस्पताल पडे सुने.....
    घरेलू और सरकारी स्तर पर लाईट बिल मे भारी कमी की वजह वीज वितरण कंपनी मे भारी हडताल....
    मोदीनी सत्तर वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढली....
    आयुष मंत्रालय को सख्त आदेश जारी। सभी आयुष अधिकारी चुस्तफुस्त दिखने लगे ।

    ऐसी ब्रेकींग न्यूज आपको मिडीया दिखाएगा, पर इनपर भरोसा मत करना ।

    खुद को पहचान कर, अपने आप मे जो बदलाव आप महसूस करेंगे वो आपके अपनो केलिए बडे अच्छे साबीत होंगे।

    नई सोच के साथ भारत आगे जा रहा है, मेरा भारत बदल रहा है, अच्छे दिन आ रहे है ।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    15.03.2017

  • मरावे परी अवयव रुपी उरावे……..

    कालचा रविवार हा सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक ठरला कारण होते एका जेमतेम शिकलेल्या पित्याने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णययाचे, ज्यामुळे चार व्यक्तींना जीवनदान मिळाले!

    गणेश उर्फ शिवपार्थ शिवशंकर कोळी हा अवघा 14 वर्षंचा मुलगा फुटबॉल खेळत असताना उष्माघाताने कोसळला,उपचारासाठी दाखल करताच डॉक्टररांनी,मेंदुला जब्बर धक्का बसल्याने त्याचे वाचणे अशक्य आहे हे त्याच्या नातेवाईकांना सांगितले,शेवटचे प्रयत्न करण्यात आले पण शेवटी रुग्णाचा मेंदु मृत झाल्यामुळे अखेर त्याला "ब्रेनडेड" घोषित करण्यात आले.ह्यानंतर जेमतेम दहावी शिकलेले मुलाचे वडील शिवशंकर कोळी यांनी मला माझ्या मुलाच्या आठवणी जपायचा आहेत त्यामुळे अवयव दानाची इच्छा बोलून दाखवली.सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले.

    शिवपार्थ चे चार अवयव.....हृदय,यकृत,दोन मूत्रपिंड हे काढण्यात आले,हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठवण्यात आले (पुण्याच्या इतिहासातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट) व एक मूत्रपिंड अन यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर व नोबेल हॉस्पिटलला पाठवण्यात आले.एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका engineering शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले जो 2 वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंड निकामी असल्यामुळे डायलसीस वर होता.

    आता इथे एक जीव गेल्याची खंत तर निश्चितच आहे पण त्याहून समाधान चार जीव वाचल्याचे आहे.......सलाम त्या पित्याला व मातेला ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला.सोलापुरातील डॉक्टरांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांना सलाम!!अवयव घेऊन जाताना ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी पोलीस अन सोलापुरातील नागरिकांनी जे सहकार्य केले त्यासाठी सर्वांना सलाम!

    शेवटी एवढचं म्हणेन हि घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपली विचारसरणी बदलण्यासाठी...........नक्की विचार करा!!!

  • प्रतिकारशक्ती

    आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ.
    काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.

    तुळस
    रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.

    तूप
    कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.

    आवळा-लिंबू
    लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे.

    आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.

    पाणी
    आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो.

    नाचणी सत्वं
    दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.

    नाचणीची भाकरी खावी .
    बीट
    दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.

    दूध-हळद
    रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये.

    लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवं. दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात.

    दही आणि ताक
    रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं. मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.

    गुळाचा खडा आणि खडीसाखर.
    घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.

    लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी.

    -- आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप वरुन

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 19

    गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू.
    कशासाठी ?
    जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते.

    कमळ कधी उमलते ?
    कमळ कधी मावळते ?
    सूर्योदय झाला की उमलते, आणि सूर्यास्त झाला की मावळते. सूर्यफुलाचे नावच मुळी सूर्यावरून ठेवले आहे. त्यांच्याकडे कोणतेही घड्याळ नाही, तरीदेखील त्याला बरोबर कळते, दिवस आणि रात्र. कधी कसे वागायचे, कधी कसे फुलायचे, कधी कसे वळायचे ते !

    सूर्योदयाला सुरू झालेला आपला दिवस सूर्यास्ताला संपतो. (निशाचर प्राणी अपवाद आहेत.)

    मनुस्मृतिमधील निद्रा प्रकरणामधे देखील "सूर्यामुळे दिवस होतो आणि सूर्यामुळे रात्रही होते, असे सांगितलेले आहे. रात्र ही झोपण्यासाठी, विश्रांतिसाठी. तर दिवस हा दैनंदिन कामे करण्यासाठी आहे.
    केवळ आपली पृथ्वीच नव्हे तर सर्व ग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यापासूनच शक्ती, उर्जा मिळवित असतात. सूर्याच्या अस्तित्वामुळेच आपले अस्तित्व आहे, याचे ज्ञान आमच्या ऋषीमुनीना होते. आणि ते त्यांनी लिहूनदेखील ठेवले आहे.

    सगुणरूपातील एकमेव देवता म्हणजे सूर्य. रामदास स्वामीनी सर्व तरूणांना सूर्यनमस्काराचे, व्यायामाचे महत्व पटवून दिलेलेच होते.ते स्वतः दररोज शेकडो समंत्र सूर्यनमस्कार घालीत असत.

    भोजनाच्या संदर्भात आणखी एक श्लोकात सांगितले आहे,
    सायंकृते प्रभाते जीर्यती,
    प्रभातकृते सायं जीर्यती.
    सकाळी जेवलेले अन्न सायंकाळी पचते, तर सायंकाळी घेतलेले अन्न सकाळी पचते.
    सायंकाळी आणि सकाळी असेच शब्द या श्लोकामधे आहेत. दुपार आणि माध्यान्ह असे शब्द नाहीत. याचा अर्थ जेवायचे कधी तर सकाळी आणि सायंकाळी.

    काही जण म्हणतील, या जेवायच्या वेळा त्याकाळात ठीक होत्या. आजच्या काळात त्या सुसंगत नाहीत. काळ बदलला आहे, त्यानुसार आपण बदलायला नको का ?

    ज्या ठिकाणी सूर्य सहा सहा महिन्यात दिसतंच नाही, अशा ठिकाणी रहाणाऱ्या लोकांनी कोणता नियम पाळायचा ?
    जिथे सूर्य नाहीच दिसत त्याठिकाणी अन्य नियम वापरू शकतो. पण जिथे सूर्य दिसतोय तिथे तर या जेवणाच्या वेळा पाळायला सुरवात करूया. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आम्ही पहिल्यांदा शंका घेणार. "कसं शक्य होणार ? हे असं लवकर जेवणं जमणारच नाही." सुरवातीलाच नकारघंटा वाजवली की पुढे सगळं चुकतंच जात ना. मग काही करावसं वाटत नाही.

    या वेळा पाळणे तर्कसंगत नाही, व्यवहार्य नाहीत. हे एकवेळ मान्य करूया. पण पचन होण्यासाठी लागणारी उर्जा कुठुन आणणार ?

    विज्ञानाने बाकी सगळी सोंग आणता येतील पण सूर्याचा प्रकाश आणि त्याची शक्ती तर आणू शकणार नाही ना. शेवटी कुठेतरी निसर्गाला शरण जायलाच हवं ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.03.2017

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 18

    दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची... सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ?
    ..... त्यांचा रात्रीस खेळ चाले...

    काही भारतीय धारणा अश्या आहेत, ज्याचा पुरावा दाखवता येत नाही. पण त्यांचे अस्तित्त्व भारतीय संस्कृतीला मान्य आहे. आता "अणु" कुठे दाखवता येतो ? ती धारणा आहे. दाखवता येणार नाही. गृहीत धरून विज्ञानातला अख्खा परमाणुवाद त्यावर सिद्ध झालाय. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा यावर संशोधन सुरू आहे. गाॅडस पार्टीकल ही त्यातूनच जन्माला आलेली संकल्पना होती. विज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी सिद्ध करायच्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे रात्रीस खेळ चाले.

    अदृश्य शक्तींचे प्राबल्य सूर्यास्तानंतर वाढते. सूर्यास्त झाल्यावरच वनस्पती आपले श्वसन बदलवतात.
    सूर्यास्तानंतरच पक्षी आपले खानपान थांबवतात.
    सर्व प्रकारची शुभकार्ये सूर्यास्तानंतर वर्ज्य सांगितलेली आहेत. ही अंधश्रद्धा नाही. ही धारणा आहे. म्हणून लग्न, मुंज, बारसे, वास्तुशांत, होम, या सारख्या कर्मकांडापासून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या अग्नियानाच्या प्रक्षेपणाची वेळ देखील सूर्यावर अवलंबून आहे. याला मुहुर्त असा शब्द आहे. पण या शब्दाची सुद्धा काहीजणांना अॅलर्जी आहे. भारतीय परंपरांना छेद देणारी विधान करणं म्हणजे बुद्धीवाद असे काहीजणांना वाटते, म्हणून फक्त सांगितले. असो.

    तर रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यावर, तापमानात घट झाल्यावर, दमट वातावरणात, जंतुंचे प्राबल्य जास्ती असते. जे आपल्या स्थूल डोळ्यांना दिसू शकत नाहीत, असे अतिसूक्ष्म जंतु सूर्यास्तानंतर वाढतात. आपण प्रत्येक वेळी सूक्ष्मदर्शी यंत्र घेऊन जंतुंना शोधू शकत तर नाही ना. पण त्यांच्या उत्पत्तीच्या विशिष्ट जागा असतात. जंतुंची वाढ होण्यासाठी विशिष्ट तापमान लागते, विशिष्ट जंतुंना विशिष्ट जागा आणि विशिष्ट हवामानच लागते. हे सर्व वैज्ञानिक सिद्धांत भारतीय संस्कृतीला मान्यच आहेत, किंबहुना भारत हीच या विचारांची जन्मभूमी आहे. म्हणून तर आपल्याकडे शौच अशौच सिद्धांत सांगितला गेलाय.

    घरामधल्या कोणत्याही खोलीपेक्षा संडासमधे अनेक प्रकारचे जंतु असतात, वाढतात, हे ओळखूनच मलविसर्जन घरापासून लांब, बाहेर करावे. मल विसर्जन करताना उकीडवे बसावे म्हणजे जंतुसंसर्ग कमी होतो. मलविसर्जन झाल्यानंतर केवळ मलद्वार आणि डावा हातच नाहीत तर दोन्ही पाय, चेहेरा, डोळे सुद्धा पाण्याने धुवावेत, त्यासाठीचे पाणी अगोदरच काढून तयार ठेवावे, ही शुद्धीकरणाची, अंगावरील जंतुसंसर्ग घालवण्याची शास्त्रीय पद्धत नव्हती काय ? पण आज छोट्या मोठ्या शहरात अॅडजेस्ट म्हणून संडास घरातच बांधले जातात, ( पूर्वी घरात खायचे आणि मागे परसाकडे जायचे, आता बाहेर खायचे आणि घरामध्ये येऊन मलविसर्जन करायचे. सुधारणा आणि विकास.)
    मलविसर्जन करायला पुनः त्या भांड्यावरच फतकल मारून बसतात, कमोडवर सर्वात जास्त जंतु असतात, हे विज्ञानाने वारंवार सांगून देखील काटकोनात बसून मलविसर्जन. नंतर पाणी सुद्धा वापरत नाहीत. (काही ठिकाणी तर हात धुवायला सुद्धा !!) काहीजणांनी त्यातूनही पळवाट शोधत, आम्ही स्वच्छता करायला डावा हात सुद्धा घाण करत नाही, म्हणून भांड्यालाच जेट स्प्रे बसवलेले असतात.
    संडासमधेच ब्रश देखील करतात, तिथेच वर्तमानपत्र, पुस्तक देखील वाचतात.... तिथला सगळा जंतुसंसर्ग परत सर्व घरात आणतोय ? याकडे या बुद्धीवादी वैज्ञानिक लोकांचे लक्ष जात नाही काय ?

    पण कसं आहे, ते जे जे करतात, त्यावर काहीही विचार न करता, अनुकरण केले तरी चालते. असं लिहिलं तरी आम्ही (संस्कृतीरक्षक) पुराणमतवादी ठरतो. आहोतच. त्याचा राग न येता, उलट ते भूषणच वाटते.

    या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
    असो.

    कोणतीही शुभकार्ये करताना पंचांगानुसार अग्निचे स्थान बघून केली जातात. तिथी, नक्षत्र, दिन, रास हे सर्व सूर्याच्या उदयानुसार बदलते. एवढे अनन्य साधारण महत्त्व सूर्याला असताना, केवळ वेळ होत नाही, सवडच नाही असल्या फुसक्या कारणांसाठी.....
    ...........जाणिजे यज्ञकर्म....... एवढे महत्त्वाचे कर्मकांड सूर्यास्त झाल्यावर करायचे ?
    आता याला काय म्हणावे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    13.03.2017

  • एकाग्रता कशी वाढवायची?

    प्रयोग क्रमांक १

    या प्रयोगासाठी तुम्हांला दोन व्यक्तींची गरज आहे,एक तुम्ही स्वत: व एक दुसरी कोणीही घरातील व्यक्ती अथवा मित्र.

    सर्वप्रथम तर तुम्ही स्वत: काही वेळासाठी घराबाहेर जा.

    बाहेर जाण्याअगोदर आपल्या दुसऱ्या व्यक्तीला एक छोटे घड्याळ घरात लपवून सांगायला सांगा.

    थोड्या वेळाने घरात अंधार करा व एका ठिकाणी बसून मन एकाग्र करत त्या घड्याळ्याची टिकटिक कोठून ऐकू येते ते शोधण्याचा प्रयत्न करा.

    हा प्रयोग सतत करुन पहा तुमची एकाग्रता नक्की वाढेल.

    -- दीपक गायकवाड

  • ताण परीक्षांच्या तयारीचा

    ताणावर उपाय काय?
    *अभ्यासाचे वेळापत्रक बनवा, वेळेचा अपव्यय टाळा
    *ताण आल्यासारखे वाटेल तेव्हा खोल श्वास घ्या
    *नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक बाजूला सारून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा
    *रोज थोडा वेळ व्यायाम करा
    *ताण घालवण्यासाठी थोडा वेळ विनोद किंवा गाणी ऐका
    *बागेत फेरफटका मारून या
    *मित्र-मैत्रिणींबरोबर थोडा वेळ गप्पा मागल्यानेही मनावरचा ताण कमी होईल.
    या गप्पांत एकमेकांशी तुलना नको.

    लक्षणे परीक्षेचा ताण आल्याचे सुचवणारी असू शकतात
    *थकवा आल्यासारखे वाटते
    *अभ्यासात लक्ष लागत नाही
    *सतत मनात नकारात्मक विचार येतात
    *केलेला सगळा अभ्यास विसरल्यासारखा वाटतो
    *परीक्षेत आपल्याला काहीच आठवणार नाही असे वाटते
    *आपण नापास होऊ अशी सारखी चिंता वाटते
    *डोके दुखते
    *शांत झोप लागत नाही
    *लोकांमध्ये मिसळण्यात रस उरत नाही
    *एकटे राहावेसे वाटते.

    अभ्यासाच्या काळात किंवा परीक्षा काळात हे शक्यतो टाळाच
    *रात्री उशिरापर्यंत जागरण
    *जागरणासाठी अतिरिक्त
    चहा-कॉफीचे सेवन
    *सामोसा, वडा असे तेलकट आणि मसालेदार पदार्थ
    *पावासारखे बेकरीचे पदार्थ
    *खूप वेळ टीव्ही पाहणे
    *खूप मोठय़ा आवाजात गाणी ऐकणे
    *मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर गेम्स खेळणे

    का येतो?
    *पालक, शिक्षक, नातेवाईक, शेजारी अशा अनेकांच्या अपेक्षांचे ओझे
    *‘पीअर ग्रुप प्रेशर’ म्हणजे समवयस्कांचा/ मित्रमैत्रिणींचा प्रभाव
    *‘करिअर’चा ‘टर्निग पॉइंट’चे वर्ष असल्याची जाणीव
    *आत्मविश्वासाची कमतरता
    *न्यूनगंड बाळगणे
    *सततची तुलना

    -- दीपक गायकवाड

  • बालविवाह ; विकासातील अडथळा

    बालकांनी शिकावे. जीवन जगण्याची कौशल्य प्राप्त करावीत.अनेक क्षेत्रात यश मिळवावे. देशाचे भले व्हावे. या देशाचे सुजान नागरिक व्हावे या अपेक्षेने येथील शिक्षणव्यवस्था चालते . सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणासाठी कायदा (आरटीई अॅक्ट-2005 ) करण्यात आलेला आहे. कायदे आहेत.यंत्रणा आहे . ज्या स्तरावर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तिथे मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. विवाहाचे योग्य वयाचे देखील कायदे आहेत .वयाचे मुलासाठी एकवीस आणि मुलीचे अठरा वर्षे वय योग्य असते . मुलांमुलींची शारीरिक वाढ या वयात पुर्ण होते असे समजले जाते . शहरी , सुशिक्षीत समाजात, उच्च वर्गात हे घडतही असेल. ग्रामीण भागात , झोपडपट्टी , अशिक्षीत समाजात , दुर्लक्षित भागात उलट घडत असते .बालविवाह लावला जातो.त्याची वाच्यताही कुठे होत नाही .सारे काही अलबेल आणि गोपनिय असते .शाळेत पाचवी ते दहावी - बारावीपर्यंतच मुलींचे लग्न उरकले जातात. कोणतेही सबळ कारण त्यामागे नसते .त्या लेकराला नीट कळतही नसते .बैठक बसते.लग्न ठरते . बोभाटा होत नाही .सारे काही चुपचाप . कुणाचं वाटोळं नको म्हणून प्रशासकिय यंत्रणा याकडे रितसर डोळेझाक करते .गावातील कर्तीधर्ती मंडळी मूग गिळून गप्प असते . समाजप्रबोधन करण्याची भाषा ज्या सेवाभावी संस्था करतात. त्यासुद्धा या प्रश्नापर्यंत पोहचू शकत नाही .अशा घटना उघडकीस आल्या की त्या चक्रव्यूहात पालक , कर्मचारी सापडतात.त्यामुळे ' सपादलं तर सपादल ' अशी भावना वाढीस लागते . अनेक शिकलेली माणसं बालविवाहाच तोटे समजत असूनही न समजल्यासारखे करतात आणि शिंगे मोडून वासरात ... अशी गत होते .आजकाल संकरित अन्नधान्य यासारख्या इतर कारणांनीदेखील मुले वयात यायची प्रक्रीया लवकरच घडते .त्यामुळे पालक चिंताक्रांत होतो आणि सामाजिक भीतीमुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे बालविवाहास प्रवृत्त होतो. अमुक एका व्यक्तीने असा बालविवाह केला त्याचे कुठे काय झाले म्हणून आपले काय होणार आहे अशी प्रवृत्ती बळावते .खेळण्याच्या , शिक्षण घेण्याच्या बालवयातच असा आघात बालकांच्या माथी मारला जातो . कित्येक समाजात आता मुलीची वानवा जाणवू लागली आहे . पाशाची आमिष दाखवून सर्रास बालविवाह लावले जातात. मुलगा तीस वर्षाच्या पुढील आणि मुलगी अल्पवयीन ! ही मानसिकता बदलायला हवी .कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती मिळाली तर सदर न्यायालय त्या बालविवाहास मनाई करणारा आदेश जारी करू शकते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंधाचे सर्व अधिकार असतात. याची जाणीव असायला हवी .
    आता तर मालिका , चित्रपटांतूनदेखील अल्पवयीन बालविवाह दाखविले जातात .प्रेमप्रकरण दाखवितात. एवढेच नाही तर बालनायिकेला आंतरजातीय विवाहाचा ब्रँड अँबेसिटर बनविण्याची तयारी करताहेत . कला आणि वास्तव यात कुठेतरी गल्लत होते. मुलांच्या कलेचे कौतुक आहे . ते असायला पाहिजे. दुनिया त्यास डोक्यावर घेते . यातून काय बोध घ्यायचाय तो घ्यावा पण बालविवाह हे समर्थनिय मुळीच नाहीत . कोणतीही शारीरिक , मानसिक परीपक्वता नसताना विवाह लावणे योग्य नाही . लगीनसराईच्या धामधुमीत काही गुपचूप बालविवाह लावून दिले जाता. त्यातून भविष्यातील अनेक जटील समस्या निर्माण होतात.बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जाणीवजागृती , जनजागृती मोठ्या प्रमाणात होणेही तितकेच गरजेचे आहे. पालकाचे प्रबोधन केले पाहिजे .बालविवाहाचे तोटे सर्वसामान्यापर्यंत पोहचले तरच ते विचार करणार आहेत . आजही कितीतरी बालविवाह होत आहेत . यापुढील बालविवाह जरी थांबले तरी सशक्त भारत निर्मीतीसाठी ती मदतच ठरणार आहेत .एकीकडे आपण खूप प्रगती केली असे म्हणतो दुसरीकडे बालविवाहाकडे दुर्लक्ष करतो हे कितपत योग्य आहे . या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत. बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.आवश्यक आहे . काही समजात जातपंचायती बालविवाहास संमती देतात . तेथे प्रबोधनाची गरज आहे. नाट्य, कला, जनजागरण यातून हे शक्य आहे . समाजहितासाठी प्रशासन , सेवाभावी संस्था , समाजसेवक , सुजान नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ती काळाची गरज आहे बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.
    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    मो. ९४२१४४२९९५

  • औषधे उपयोग – मक्याची कणसे

    १. मक्याचं कणीस खाल्यामुळे दात मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांना देखील मका खाऊ घाला.
    २. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर ते टाकून देऊ नका. मक्याच्या कणसाचे दोन तुकडे करा आणि मधल्या भागाचा नाकाद्वारे सुंगध घ्या. यामुळे सर्दी कमी होते.
    ३. मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो.
    ४. आयुर्वेदात मक्याचं कणीस तृप्तीदायक, वातकारक, कफ, पित्तनाशक, मधूर असल्याचं म्हटलं आहे. भाजलेले कणीस हे कॅरोटीनायड विटामिन-एचं एक उत्तम स्रोत आहे.
    ५. भाजलेल्या कणीसपासून 50 टक्के अँटी-ऑक्सीडेंट्स वाढतं. कँसरवर देखील हे लाभदायक आहे.

    संकलक : प्रमोद तांबे

    आरोग्यदुत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने..