(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • नोटा बदली आणि अटलजी 

    ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री ८ च्या सुमारास विद्यमान पंतप्रधान माननीय श्री . नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटांची त्या मध्यरात्री पासून कायदेशीर मान्यता संपुष्टात येईल असे जाहीर केले . आणि ती संपुष्टात आलीही . नंतरच्या काळात आधी अस्तित्वात नसलेल्या २००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या .

  • जरा याद करो कुर्बानी- परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन करमसिंग

    23 मे 1948 रोजी रिचमर गली व टीथवाल या रणक्षेत्रावर हिंदुस्थानी फौजांनी तिरंगा फडकवला. या पराभवामुळे जायबंदी झालेल्या पाकी फौजेने एक अरेरावी ब्रिगेड उतरवून टीथवाल मधून श्रीनगर पर्यंत मुसंडी मारायची असा व्यूह रचला. 13 ऑक्टोथबर 1948 या ईदच्या मुहूर्तावर रीचमर गलीवर प्रचंड सैन्य उतरवले.

  • जाहिरातींचे मायाजाल

    जो खोटे बोलतो तो सर्वात मोठ्याने ओरडून सांगतो, हा मानसिकतेचा नियम आहे. चोवीस तास टीव्ही व रेडिओ वर साबण, तेल, सुंदर दिसण्याची क्रीम, शीतपेय, टूथपेस्ट, यांच्या हास्यास्पद जाहिराती आपल्याला दाखवतात यातून आम्ही काय बोध घ्यावा हेच समजत नाही.

    आजकाल हिंदी चित्रपटातील हिरो शितपेयातील जाहिरातीत सुपरमॅन सुद्धा न करू शकणारे स्टंट करून दाखवतात व शेवटी शीतपेय पिताना दाखवतात, आहे कि नाही कमाल? आम्ही सामान्य लोक असली पेय पिऊन हे उद्योग खरच करू शकणार आहोत का? या पेयात अदभूत शक्ती देणारी रसायने असतात का? यातील एक तरी पेय शरीराला व पचनसंस्थेला मदत करणारे आहे का? हि आमची फसवणूक नाही का? बरं यातून सरकार कराच्या रुपात गडगंज संपत्ती मिळवते असेही नाही. यातील दोन कंपन्या परदेशी आहेत, ज्या आपल्याला मूर्ख बनवतात. कधी कधी वाटते, कदाचित आपण मूर्ख आहोच, हे लोक आपल्याला ते सिद्ध करून देतात इतकेच. तसे नसते तर ह्या कंपन्या असली कुचकामी पेय विकत आपल्या देशात कॅन्सर सारख्या फ़ोफ़ावल्या नसत्या.

    असेच उदाहरण साबणाचे व क्रीमचे आहे, मी जेव्हापासून समजायला लागले आहे, तेव्हापासून गोरेपणाच्या साबणाच्या व क्रीमच्या जाहिराती पाहतो आहे, हे जर खरे असते तर भारत सोडाच, आफ्रिका सुद्धा गोरगोमट्यांचा खंड दिसला असता असे नाही का वाटत? बरं या साबणाने अंग स्वच्छ होते असेही नाही, हा हि खोटा आभास आहे. मुळात आपल्या शरीरावर असणारे जंतू जेव्हा मेलेल्या पेशींवर ताव मारतात, त्यातून दर्प किव्वा वास येतो, या साठी कोणतेच साबण मदत करत नाही. जर अंग खरबरीत उटणे वापरून घासले तर मेलेल्या पेशी गळून जातात, व अंग स्वच्छ होते, मग हि महागडी साबणे घेण्याची गरज काय? आजकाल या विदेशी कंपन्यांना तोडीसतोड, आमचे देशी बाबा सुद्धा असली साबणे विकायला अग्रेसर झाले आहेत. यात फरक इतकाच, पैसा परदेशात जाणार नाही, पण अंग स्वच्छ होण्याचे काय?

    दात साफ करण्यासाठी नामांकित कंपनीने पूर्वी आम्हाला सांगितले कि कोळसा, मीठ याने दात खराब होतात, तीच कंपनी, जाहिरातीत, क्या आपके टूथपेस्ट में नमक है, असे म्हणणारी ललना धाडकन एका घराचा दरवाजा उघडून येऊन विचारते, असे दाखवतात, असे वागणे मुळात शोभते का? हाच माझा खरा मुद्दा आहे. असो

    काही दिवसापूर्वी मला दाढ दुखीमुळे डॉक्टरांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला, त्यांनी स्पष्ट सांगितले, आक्रोड, बदाम दाताने फोडण्याच्या कला तुम्ही चुकूनसुद्धा दाखवू नका, जाहिरातीत दाखवतात ते अतिशयोक्ती असते. असे केल्याने दात तुटू शकतो, किव्वा हिरड्यांना गंभीर इजा होऊ शकते. जगातला एकही दातांचा डॉक्टर असले उद्योग करा याला संमती देणार नाही. केवळ त्यांच्या भूलथापांना आपण बळी पडावे हाच एकमेव हेतू या जाहिरातीतून असतो.

    सिनेमाला जसा सेन्सॉर बोर्ड असतो तसा या जाहिरातीसाठी नसतो का????? यांना पण जाहिरातीत स्टार( * ) करून अटी व शर्ते लागू किव्वा, जाहिरातीत दाखवलेले खरे नाही, असल्यास निव्वळ योगायोग समजावा... सारखी ओळ बंधन कारक करायला हवी.

    रोल्स रॉईस ने कधीही जाहिरात केली नाही. ज्यांच्या वस्तू उत्कृष्ठ असतात त्यांना अश्या जाहिराती करायची गरज नसतेच. लोकांना माहित होण्यासाठी, नवीन वस्तू पहिल्यांदाच बाजारात विकायला आणली असेल तर सुरवातीला ठीक आहे, पण एकदा नाव मिळवल्यावर काहीच गरज नसते. व्यर्थ पैसा जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा सर्वाना परवडेल अश्या रास्त किमतीत वस्तू विका.

    ग्राहक राजा जागा हो,

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पाच

    आतापर्यंत मनापासून खाल्लेले अन्न तोंडात आलेले आहे. असे गृहीत धरू.

    धान्यापासून आपण अन्न रूपांतरीत केले, आपल्या जीभेला, मनाला, शरीराला हवे तसे बदलवून घेतले, आणि घास करून तोंडात घेतला. पहिली प्रक्रिया सुरू होते ती लाळेची, ज्याला आयुर्वेदात बोधक कफ असे म्हटलेले आहे. रसनेंद्रियामार्फत त्याचे बोधन होऊन त्या पदार्थाला पचवायला जे जे द्रव्य पुढे आतमधे हवे आहे, त्याचा एसेमेस त्वरीत फाॅरवर्ड होतो. त्या पदार्थाच्या स्वागतासाठी आतमधे तयारी सुरू होऊ लागते. असलेल्या बत्तीशी ने तो बत्तीस वेळा सावकाश चावला की त्यात लाळ चांगली मिसळली जाते. अगदी बत्तीस वेळा असं काही मोजत बसत नाही कुणी पण, त्याचा गिळण्याएवढा गिळगिळीत गोळा तयार झाला की तो अन्ननलिकेत जीभेने ढकलला जातो. तेव्हा श्वासनलिका एका पडद्याने पूर्णपणे बंद होते. अन्नाचा एकही थेंब त्या टाईट बसलेल्या झाकणातून श्वासनलिकेत लिकेज होत नाही.

    या पडद्याला कुठेही थ्रेड नाही, कुठेही फेवीकाॅल नाही, कुठेही कडीकुलुप नाही, पण काही सेकंदामधे पूर्ण बंद, तर काही सेकंदात पूर्ण उघडतो देखील !
    अन्न कसे गिळावे, पडदा कसा बंद करावा, याचे कोणीही वर्कशाॅप घेतलेले नाही, कोणीही ट्रेनिंग दिलेले नाही, तरी हे काम जन्माला आल्यापासून अव्याहतपणे सुरू असते. हा एकच पडदा नाही तर असे असंख्य पडदे / व्हाॅल्व्ह, आतबाहेर आपल्याला दिसतात, डोळे, ओठ, मूत्रद्वार, मलद्वार हे बाहेर दिसणारे सगळे अवयव कसे उघडायचे कसे बंद करायचे, हे शिकवूनच त्याने जन्माला घातलंय.

    कदाचित आधीच्या जन्मी हे सगळं अनुभवलेलं असतं, ते संस्कार घेऊनच आपला मनुष्य जन्म झालेला असतो. आजच्या भाषेत डिफाॅल्ट प्रोग्राम असा काही पक्का झालेला असतो, की कधीही परत फाॅर्मॅट मारावाच लागत नाही.

    शेवटी हे यंत्र बनवणारा कोण आहे ?
    तोच, जो आपल्या शरीरात राहून सर्व करवून घेत असतो.
    तो
    सर्वशक्तीमान !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.03.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चार

    आपण खातोय त्या पदार्थाचे ज्ञान इंद्रियांना अगोदर होते. शब्द, स्पर्श, रूप, रस गंध या तन्मात्रा द्वारे, पृथ्वी आप तेज वायु आणि आकाश महाभूतांची आहारातील अनुभूती निर्गुण आत्म्यापर्यंत, चंचल मनामार्फत नेली जाते. आणि जी अनुभूती येते तिला "समाधान" म्हणतात. जेवताना हे समाधान मिळाले पाहिजे. नाहीतर "माझ्या श्योन्याला खाल्लेले अंगालाच लागत नाही" अशा तक्रारी सांगणाऱ्या अनेक माता असतात.

    खाताना लक्ष अन्य गोष्टीमधे असणे, म्हणजे जसे, टीव्ही पहाणे, मोबाईलवर बोलणे किंवा चॅटींग, गोष्टीचे पुस्तक वाचणे, अभ्यास करत करत जेवणे, वृत्तपत्र वाचणे, वायफळ गप्पागोष्टी करणे, पटत नसलेल्या मुद्द्यांवर जेवताना भांडणे, लक्ष जेवणामधे नसणे, स्वतःच्याच विचारात असणे, किंवा दुसऱ्यांच्या विचारात असणे, लक्ष जेवणात असले तरी जेवणातले दोष दिसणे, आवडीचे पदार्थ अति खाणे, नको असतील त्यांची चव सुद्धा न पहाणे, एकाच पद्धतीचे, एकाच चवीचे जेवण घेणे इ. दोष आहेत, आणि रुग्णाला तपासल्यानंतर अनेक शारीरिक दोष देखील वैद्यांना समजतात. ज्यांचा संबंध खाल्लेले अन्न, अंगाला न लागण्याशी आहे. हे बालक पालकांनी लक्षात ठेवावे. याला म्हणतात, इंद्रियगम्य ज्ञान !

    मग कितीही बॅलन्स डाएट द्या, काहीही उपयोग होत नाही.
    बदाम अक्रोड हे पदार्थ पचायला जड असतात. ते अशा मुलांनाच द्यावेत, ज्यांना नारळ, शेंगदाणे, तीळ, काजूगर कधी मिळतच नाहीत. आणि ज्यांची भूक खूप जास्ती आहे. नाहीतर हेच पदार्थ पौष्टिक म्हणून कितीही खाल्ले तरी अजीर्ण होण्याशिवाय काही होणार नाही.

    काय खातोय यापेक्षा कसं पचवू शकतोय हे जास्त महत्त्वाचे! मनापासून खाल्लं, आनंद निर्माण करत खाल्लं तरच पचते. रडत रडत, ताटातल्या अन्नाला नावे ठेवत, नाक मुरडत, चिडत चिडत, जेवलो तर आतील अवयव आणि इंद्रिये यांचे संतुलन बिघडते.

    बाहेरील परिस्थिती जर बिघडलेली असेल तर आत कितीही भूक असेल तरी जेवण जात नाही. भले साग्रसंगीत पंचपक्वान्नाचे ताट समोर आहे, पण बाजूच्याच घरात एका कोणाचा मृत्यु झालाय तर जेवण जाईल ? घरात भांडण सुरू आहे तर जेवण जाईल ? काही रागाने भरलेलं ताट कोणी भिरकावून दिलं तर जेवण जाईल ?
    आणि जबरदस्ती करून जेवलात तर ते नीट पचेल असे वाटतेय ?

    नुसते अन्न गिळले म्हणजे सर्व धातु तयार होतात असे नाही. म्हणून पालक आणि बीट खाल्ला म्हणजे रक्त वाढेलच असं नाही आणि आवळाज्युस प्याला तर कॅल्शियम वाढेल असंही नाही.

    बाहेरील शक्तीपेक्षा, आतली इंद्रियांची ताकद जास्ती काम करणारी असते, हे लक्षात घ्यावे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.03.2017

  • शिवपुर्वकाळ

    शिवचरित्र जाणून घ्यायचे असेल तर शिवपुर्वकालीन देशस्थिती ज्ञात असणे आवश्यक वाटते.

    शिवाजीराजांनी इतर साम्राज्यापेक्षा स्वराज्यात जनतेला वेगळं असं काय दिलं? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शिवपूर्वकाळाचा आढावा घ्यावा लागतो. शिवपूर्वकालीन हिंदुस्थानावर नजर टाकली तर बहुतांश भागांवर इस्लामचे आधिपत्य झाले होते हे लक्षात येईल. इथले सत्ताधीश स्वतःला इस्लामचे अनुयायी म्हणवत. अशा या सत्ताधीशांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोषाची भावना होती. या यावनी सत्तेचे स्वरूप हे प्रामुख्याने ' लष्करी ' होते. इथे आलेले इस्लामी लोक हे मूळचे अरबी , इस्लामचा संस्थापक मुहम्मद पैंगंबर इ.स.६६२ मध्ये मरण पावला. तोपर्यंत इस्लाम धर्मप्रसाराला वेगळा रंग चढला होता. मग धर्मवेडाने पेटलेल्या या अरबांनी पैंगंबरच्या मृत्युनंतर जगभर आक्रमणे करून सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. या आक्रमणाची एक लाट आठव्या शतकाच्या मध्यात इराण ओलांडून भारत व चीन पर्यंत पोहोचली.

    इस्लामी दाहकतेच पहिला संबंध आला तो इ.स. ७११ मध्ये मुहम्मद बिन कासीमच्या वेळी, यावेळी सिंध प्रांताचा चा हिंदु राजा 'दाहीर' याचा पराभव झाला.या स्वारीची जी वर्णने उपलब्ध आहेत त्यावरून हजारोंच्या कत्तली करणे,गुलाम म्हणून जनतेला कैद करणे,स्त्रियांचा छळ अशा प्रकारे विध्वंस माजवला.सुदैवाने हा मुहम्मद कासीम सिंध प्रांत ओलांडून दक्षिणेकडे आला नसल्याने त्याची दाहकता भारतातील इतर भागांना पोहोचली नाही. सुदैवाने या स्वारीनंतर हिंदुस्थान सुमारे ३०० वर्ष इस्लामी आक्रमणांपासून मुक्त राहीला. पण त्यानंतर इस्लामी आक्रमणे येतच गेली त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ .

    महमुद गझनवी (इ.स. ९९८-१००२) - याने भारतावर एकूण १७ स्वाऱ्या केल्या त्यात प्रचंड मानवी संहार आणि लुट , मंदिरे उध्वस्त केली,स्त्रीयांचा अमानुष छळ केला.गुजरात मधील भव्य आणि प्रसिद्ध सोमनाथ मंदिर पाडले.

    मुहम्मद घोरी (इ.स.११७५-१२०६) - नुसती लुट न करता इथेच सत्ता स्थापन करावी या उद्देशाने घोरी भारतावर आला, याने इस्लामचा पाया घालुन दिल्लीस सूलतानशाहीची स्थापना केली, यानंतर तब्बल एक लाख लोकांची हत्या करून दबदबा निर्माण केला.

    अल्लाउद्दीन खल्जी - (इ.स.१3१३-१३१६) : खल्जी घराणे भारतात आले त्यावेळी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव राज्य करत होते. खल्जी वंशातल्या या अल्लाउद्दिनने विचित्र कायदे केले -हिंदुनी घोड्यावर बसू नये, हत्यार बाळगु नये, मौल्यावान पोषाख घालु नये असे कायदे केले, मूर्तीपुजेस बंदी , जिझिया कर लादून अमानुष छळ केला.

    मुहम्मद तुघलक - (इ.स.१३२५-१३५१) हा तुघलक विक्षिप्त म्हणून प्रसिद्धच होता, याने जनतेवर एवढे कर बसवले कि गरीब जनता पार धुळीस मिळाली, श्रीमंत बंड करून उठले. दुष्काळी परिस्थितीत गावच्या गाव ओसाड झाली.

    तैमुर -(इ.स.१३७२-१४०५) दिल्लीच्या लढाईत तुघ्लूकाचा पराभाव झाला आणि दिल्ली शहर तैमुरच्या हाती सापडले, उपलब्ध वर्णनानुसार सतत पाच दिवस त्याने दिल्ली रक्ताने धुवून काढली.

    बाबर -(इ.स. १५२६ -१५३०) मुघल राजवाटीची मूळ सुरवात बाबरच्या भारत स्वारी पासून झाली.यानेही जनतेचे अतोनात हाल करत काफिरांच्या(हिंदूंच्या) शिरांचे पहाडीवर मनोरे रचून विजयोत्सव केला, स्त्रियांचा छळ, तसेच मंदिरे पडून तिथे मशिदी बांधल्या.

    अकबर -बाबरची राजसत्ता पुढे कायम करत अकबरने असंख्य हिंदूंचे सक्तीचे धर्मांतर केले , पुढे चितोड हत्याकांडात जे राजपूत ठार केले , या मृत शरीरांवरून जमा केलेल्या जाणवांचे वजन तब्बल ७४ मण भरले एवढा संहार केला.अशीच भयंकर आणि दाहक कारकीर्द पुढे जहांगीर ,शाहजहान यांनी चालू ठेवली.

    शिवपूर्वकाळात सर्व शाह्यातील सुमारे ७२ सुलतानांनी सतत तीन शतके महाराष्ट्र आपल्या जुलूमांनी भरडून काढला.

    शिवपूर्वकाळात भारतात तथा महाराष्ट्रात अनेक हिंदु राजे होऊन गेले, पुढे यावनी आक्रमणात अनेकांनी कडवा प्रतिकार देखील केला.

    महाराष्ट्रात सातवाहन-वाकाटक - राष्ट्रकुट - चालुक्य - शिलाहार -कदंब या राजवंशानी राज्य केले. त्याबद्दल थोडक्यात माहिती आता पाहु -

    सातवाहन - (इ.स.पुर्व २३२ ते ~ इ.स. २१०) सातवाहनांचे वैशिष्टय असे की त्यांची सागरावर सत्ता होती. पैठण ही त्यांची पहिली राजधानी.याकाळात प्रजा आनंदी, स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य व प्रतिष्ठा होती. याच काळात शालीवाहन शक या कालगणनेचा उदय झाला.

    वाकाटक - (इ.स. २४८ ते ~इ.स. ४९३) यांनी विदर्भात सत्ता स्थापन केली.त्यांच्या काळात धर्म , विद्या , कला , स्थापत्य, शिल्प यांना महत्व होते असे दिसते.

    चालुक्य - (इ.स.५०० ते ७५०) हे घराणे मूळचे अयोध्येकडील.वाकाटकानंतर चालुक्य राजवंशाने सुमारे २५०वर्षे राज्य केले.शिल्पकलेत चालुक्य शैलीची मंदिरे , शिल्पे उत्कृष्ट समजली जातात.

    राष्ट्रकुट - (इ.स.७५० ते ९८३) चालुक्यानंतर राष्ट्रकुटांनी २०० वर्षे राज्य केले. याच काळात जगप्रसिद्ध कैलास लेणे खोदले गेले. हे यांच्या कारकिर्दीतच मुसलमान व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर उतरले. राष्ट्रकुटांच्या काळातच संस्कृतीला विकृत स्वरूप येऊ लागले.सोवळे- ओवळे, देवदासी, विधवा केशवपन व सतीची चाल हळू हळू रूढ झाली. सातवाहनकाळातील महाराष्ट्राचा वैभवसूर्य राष्ट्रकुटांच्या काळात ढळू लागलेला दिसतो.

    शिलाहार - (इ.स. ८२५ ते १२६५) या राष्ट्रकुटांनंतर महाराष्ट्रावर चालुक्य, कदंब आणि शिलाहारांचे राज्य आले. कादंबांचे आरमार हा एक अभ्यासाचा विषय आहे. एकाचवेळी या सत्ता निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करीत होत्या. कोकणात शिलाहार राज्य करीत , शिलाहारांचे वैशिष्टय म्हणजे बळकट डोंगरी किल्ले बांधण्याचा पहिला घाट त्यांनी घातला

    यादव - (इ.स. ११७८ ते १३१८) देवगिरीकर यादवांनी शिलाहार व कदंब यांना जिंकून सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली. यादव हे यदुवंशीय आणि राजभाषा मराठी, सुवर्ण गरुडध्वज हे यादवांचे निशाण होते. १२२८ मध्ये पुंडलीकाने पंढरपुरी श्री विठ्ठलाची स्थापना केली. पुढे रामचंद्रदेव राजाच्या कारकिर्दीत संत ज्ञानेश्वरांनी हा काळ अविस्मरणीय केला. पण हा सुखद काळ जास्त दिवस टिकला नाही. रामदेवराय राजाच्या कारकिर्दीत दिल्ली सुलतानाचा पुतण्या (आणि जावई) ' अल्लाउद्दिन खल्जी ' देवगिरीवर चालून आला. दुर्दैव हे की यावेळी रामदेवपुत्र 'शंकरदेवराय' दक्षिणेत सैन्य मोहिमेवर घेऊन गेला होता.अशा परिस्थितीत हे यावनी आक्रमण यादवांना सोसले नाही आणि यादवांचा गरुडध्वज पडला.तब्बल २०० वर्षांची उज्वल परंपरा लाभलेलं देवगिरीच वैभवशाली साम्राज्य अवघ्या १५-२० दिवसात कोसळले. यादव साम्राज्याचा अस्त झाल्यावर पुढे ३०० वर्ष इस्लामी राजवटीचा वरवंटा फिरतच राहिला.

    यापुढील प्रदीर्घ काळात.बहमनी, तुघलक, खल्जी, निजामशाही, आदिलशाही, बरिदशाही , इमादशाही, मोगल, पोर्तुगीज यांनी थैमान घातले.शिवपूर्वकालीन हिन्दुस्थानाचे इस्लामी राजवटीचे स्वरूप नुसते वरवर न्याहाळले तरी शिवपुर्वकालीन भारत कोणत्या बिकट आणि विचित्र परिस्थिती मधून जात होता आणि शिवाजीराजे जन्माला नसते आले तर काय परिस्थिती उद्भवली असती हे आता कोणालाही उमजू शकेल.
    रोहित पवार

    संदर्भ :
    शककर्ते शिवराय (खंड १) - विजयराव देशमुख
    श्री राजा शिवछत्रपती - गजानन मेहेंदळे
    मुसलमानपुर्व महाराष्ट्र - वा.कृ. भावे
    शिवकालीन महाराष्ट्र - वा.कृ. भाव

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तीन

    स्वयंपाकघरात मधे वाढलेली राईस प्लेट थेट टेबलावर आणून समोर ठेवणे आणि टेबलावर ताट ठेवून एकामागून एक पदार्थ आणून वाढणे, यात फरक आहे. पदार्थ कोणत्या क्रमाने वाढले जातात, त्या क्रमालाही महत्व आहे. सुरवात लिंबू मीठाने करून शेवट वरणभातावर वाढलेल्या तुपाने करावा. तूप वाढून झाले की बसलेल्यांनी समजावे, आता वाढायला येणारी आणखी कोणी नाही. आता फक्त "हर हर महादेव" म्हणून आक्रमणाला सुरवात करायची, एवढे समजले तरी पुरे.

    ताटात जसजसा एक पदार्थ येत जातो, तस तसा डोळ्यांनी म्हणजे चक्षुरेंद्रियांनी, घ्राणेंद्रियांनी म्हणजे नाकाने वास घेत त्याची वार्ता आतमधे पोहचवलेली असते. बाकी सगळे अगदी तैय्यार असतात. प्रत्येक पदार्थ वेगळा वाढल्यामुळे प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण अगदी उत्तम करता येते.

    मीठ वाढताना त्याची सूक्ष्म चव आपण अनुभवतो, लिंबू वाढताना, त्याच्या रसाचा फवारा आपल्या तोंडात उडायला सुरवात होते, पापड वाढताना त्याचा कुर्रकुर्र आवाज कानात नाद निर्माण करतो. भजी आल्यावर त्याचा खमंग वास चोंदलेलं नाक सैल करून टाकतो. लालबुंद रस्सा डोळ्यांनी बघताक्षणी पोटात भूक चाळवायला सुरवात झाली नाही, तरच नवल.

    (काहीजण एवढे चाळवतात, की वाढला पापड झाला गट्टम, कोशिंबीर पुढच्या पानात वाढायच्या अगोदर ही संपली सुद्धा. वाढली भाजी खाऊन टाकली. याला पंगत म्हणत नाही. त्याचेही काही भारतीय नियम असतात, तेही "मॅनर्स" पाळलेच पाहिजेत. थोडा संयम हा हवाच. तरच "सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम्, यातील सह ला महत्व आहे. ) असो.

    तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड त्याच्या आवाजाने, पुरणपोळी आपल्या स्पर्शाने, भजी आपल्या वासाने, चटणी आपल्या चवीने, आणि सुंदर रंगसंगतीने, असं छान वाढलेलं, पदार्थांनी भरलेलं ताट, बघताक्षणी डोळ्यांचेही पारणे फिटते. म्हणजे डोळ्यांनी ते पचवायला सुरवात केलेली असते.

    शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा या परिपूर्ण आहारात एकवटलेल्या असतात. केवळ कॅलरीज मोजून जेवणे, वजनी प्रमाणात जेवणे, याला चौरस आहार म्हणता येईल का, विचार करून पहावे.

    एकापेक्षा एक उत्तम पदार्थांचे एकमेकांमधे एकत्र झालेले वास. आणि आग्रह करून, प्रेमाने वाढणाऱ्यांचा सहवास यामुळे अग्निवृद्धी आपोआपच होत जाते. कधी एकदा ताटातले हे उत्तम पदार्थ पोटात जातात असे होऊन जाते.
    हे सर्व मीच अगोदर अनुभवणार अशी जणु काही स्पर्धाच लागते सगळ्या इंद्रियामधे.
    जो जे वांछील तो ते लाहो, अशी अनुभुति इंद्रिये घेत असतात, तो आनंद शब्दात वर्णन करणं अशक्यच आहे. याचा दृष्य परिणाम म्हणून हर हर महादेव चा गजर होण्याअगोदरचा कल्ला, पुढील पाच मिनिटांसाठी पूर्ण बंद झालेला असतो. निमूटपणे सर्वजण आतील प्रज्वलीत अग्निनारायणाला एकेका पदार्थाची आहुती देत असतात.

    पंचहाभूतात्मक आहार, पंचमहाभूतात्मक शरीरासाठी, पंचमहाभूतांच्या तन्मात्रांसह...

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    18.03.2017

  • आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

    आज १८ मार्च – जागतिक निद्रा दिवस

    दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते. सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असतो. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

    हल्ली व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्यासमोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगासारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे. आपल्या झोपेच्या चार अवस्था असतात.

    त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात. या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते, परंतु हल्ली रात्री तरुण पिढीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे. भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते. या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्तींमध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या याबरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    झोपेची सायकल म्हणजे?

    झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असते. १,२,३ आणि रेम अशा ४ अवस्थांची एक सायकल होते. ही सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था वीस मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोपेल तर ४ सायकल पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी चार्ज होतात. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो. ही तंदुरुस्तीची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे आजार बळावततात, असे झोपेचे वैद्यकशास्त्र म्हणते. प्रत्येकाने किमान आठ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान साडेसात तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • शोध – यशाचा

    “यश हा एक प्रवास आहे. ते केवळ अंतिम ठिकाण किंवा साध्य नव्हे.”
    – बेन स्वीटलँड, लेखक

    “यश म्हणजे काय? मला वाटतं यश हे अनेक विचारांचं अजब मिश्रण असतं. तुम्ही जे करताय, तेवढंच पुरेसं नाही, तुम्हाला आणखी कष्ट करायला हवेत आणि या सगळ्यात काहीतरी प्रयोजनही नक्की हवं. यश या साऱ्या विचारातून घडत जातं.”
    – मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान

    “यश मिळवणं? अगदी सोपी गोष्ट आहे ही! फक्त योग्य वेळी, योग्य प्रकारे योग्य ती कृती करत राहा.”
    – अरनॉल्ड ग्लासो, प्रसिद्ध उद्योजक

    “कधीच चुका न करणं म्हणजे यश नाही; तर एकच चूक दुसऱ्यांदा न करणं ही गोष्टच तुम्हाला यशप्राप्तीकडे घेऊन जात असते.”
    – जॉर्ज बर्नार्ड शॉ, प्रसिद्ध नाटककार

    “मनाशी एखादी कल्पना ठरवा. त्यानंतर तुमचं सारं आयुष्य त्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी झोकून द्या. मनात फक्त तिचाच विचार असू दे. स्वप्नातही तीच दिसू दे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात ती असू दे. तुमच्या शरीराचा अणू-रेणू त्याच ध्येयाने पछाडलेला असू दे. बाकी साऱ्याचा विचारही सोडून द्या. यशाचा मार्ग हाच आहे.”
    – स्वामी विवेकानंद

    “जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमची यशासाठीची तळमळ अपयशाच्या भीतीपेक्षा कित्येक पटीनं जास्त हवी.”
    – बिल कॉस्बी, अभिनेते, लेखक

    “ज्यांच्यात प्रचंड अपयश पचवण्याची धमक असते, तेच भव्यदिव्य यश संपादन करू शकतात.”
    – रॉबर्ट एफ. केनेडी, राजकीय नेते

    “प्रत्येक यशाची गुरुकिल्ली एकच! ती म्हणजे कृती करत राहणं.”
    – पाब्लो पिकासो, चित्रकार

    “तुम्हाला अमुक एक गोष्ट चांगली आहे किंवा तमुक गोष्टीवर विश्वास ठेवा असं सांगितलं गेलं, तरी तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला स्वत:ला जे ठाऊक आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. त्यावर जेव्हा विश्वास ठेवता तेव्हाच तुमचं तुम्ही भव्य स्वप्न साकारण्याच्या मार्गावर पाऊल ठेवता. यशाचा आविष्कार तुमच्या आतूनच होत असतो.”
    – राल्फ वाल्डो इमर्सन, लेखक व कवी

    “आपल्या प्रत्येकाच्या स्वत:च्या अशा खास इच्छा असतात. प्रत्येकाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे आणि खास तशाच त्या वेगळ्या असतात. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला काय आवडतं, तुमचं कशावर प्रेम आहे, याचा शोध घेणं. त्यानंतर इतरांना सेवा म्हणून ते उत्तम प्रकारे देऊ करणं, खूप कष्ट करणं आणि या विश्वातल्या ऊर्जेच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करणं.”
    -ऑप्रा विन फ्रे, टीव्ही शो अ‍ॅन्कर, सामाजिक कार्यकर्त्यां

    “अपार कष्ट आपल्या कामाप्रती अविचल निष्ठा आणि आपण जिंकू किंवा अपयशी ठरू याची तमा न बाळगता आपल्या कामात १०० टक्के झोकून देण्याचा, पूर्ण शक्ती लावून ते काम करण्याचा निश्चय या गोष्टीतूनच यश साकारत जातं. म्हणूनच यशस्वी व्यक्ती आणि इतरांच्यातला फरक काय? इतरांकडे क्षमता नसतात, ताकद नसते किंवा ज्ञान नसते असं नाही. पण यशस्वी व्यक्तींमध्ये जी आंतरिक तळमळ आणि इच्छा असते, त्याची कमी इतरांमध्ये असते.”
    – विन्सेट (विन्सी) लोम्बार्डी, ख्यातनाम फूटबॉलपटू

    “समाजाला हितकारक ठरतील अशा कृती करणं आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेणं म्हणजे यश! यावर तुमचा विश्वास असेल, अन् ही व्याख्या तुम्ही मनापासून स्वीकारत असाल, तर ‘यश’ तुमचंच आहे.”
    – केली किम

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग दोन

    प्रत्यक्ष इंद्रिय पचनाला ताटातच सुरवात होते. आपल्या हातानी, बोटांनी आपण आहार जेवायला सुरवात करतो. म्हणजे त्या अन्नाचा स्पर्श आपण अनुभवतो. एखादा पदार्थ गरम, गार, कोमट, कडक, मऊ, त्याचा घट्टपणा, पातळपणा हे आपण बोटांमार्फत अनुभवतो.

    सुरी काट्या चमच्याने जेवत हा अनुभव घेता येईल का ? नाही.
    आणि हातपाय पाण्याने धुवुन जेवायला बसावं हे ओघाने आलंच.
    आणि नखं सुद्धा कापलेलीच असावीत, हे पण गृहीत धरलेले असते. नाहीतर नखातील घाण जेवताना पोटात जाते, त्याने पोट दुखते, हे इयत्ता दुसरी अ मधे आपण शिकलेलो आहोतच !

    हेच भारतीयत्व !

    बाळाला भरवताना सुद्धा चमचा वापरू नये. बाळाला सुद्धा या ज्ञानेंद्रियांचा अनुभव घेऊ देत ना ! घास किती गरम आहे हे आईच्या हाताला सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर घाई घाईत चमच्याने जर त्या बाळाला काही गरम भरवलं तर बाळाचं काही खरं नाही. जमाना जरी चमच्यांचाअसला तरी "हात" असताना, वेगळ्या चमच्यांची काय गरज ?

    भात किती मुरडला पाहिजे, ते चमच्यापेक्षा बोटानाच कळेल ना. आता चायनीज राईस बाहेर मुरडायचा नसतो, हे मॅनर्स समजल्यानंतर चाजनीज राईस खायला चमचा ठीक आहे. पण नूडल्सना मात्र स्टीकच लागणार.

    कोकणातल्या ताज्या शेवया खाताना हाताच्या पाची बोटांचा युक्तीने वापर करता यायलाच हवा. शेवया नारळाच्या रसात बुडवून अंगावर न सांडता, सर्व शेवया बाहेर न लोंबता, थेट तोंडात घालवण्याची ती मजा स्टीकने खाण्यात नाही.

    दक्षिण भारतीय लोक इडली सांबार खाताना सुद्धा काटे चमचे वापरत नाहीत. इडली हातानी कुस्करून, सांबारात बुचकळून, भुरके मारत खातात.

    पंजाबी लोकांना पराठा कधी चमच्याने खाताना बघितलंय ? दोन्ही हातानी धरून त्याला उभा आडवा फाडून दह्यात बुडवूनच खातात.

    शेवग्याची शेंग चमच्याने कशी खाणार ? तर्जनी आणि करंगळी मधे उभी धरून थम्स अप करीत, सगळा गर अंगठ्यावर कोरून कोरूनच खायचा, त्यापेक्षा तो शेंगेचा तुकडाच तोंडात कोंबायचा आणि त्या तुकड्याचे पार रसग्रहण करून चोथा चिपाड करूनच बाहेर काढायचा, हा शेंग खाण्याचा उत्तम प्रकार.

    आमरसात पुरी बुडवताना तिच्या दोन बाजू तर्जनी आणि अंगठ्यात पकडून पुरीला आमरसाच्या वाटीत अशी आंघोळ घालून बाहेर काढावी की जशी विहिरीत कळशी.

    समोसा, वडापाव खाताना काय चमच्याने खायचा ? मस्त दोन्ही हातांनी धरून जणुकाही माऊथ ऑर्गन वाजवतो आहोत, असा भास दुसऱ्याला होईल अशा शिस्तीत राहूनच वडापाव खाल्ला पाहिजे.

    आहारीय पदार्थ पचवण्यासाठी तो तोंडात जाण्याआधी ताटातच पचवून घ्यायला सुरवात झालेली असते, हे समजलं म्हणजे झालं.

    जो पदार्थ जसा खायचा तसा खाल्ला तरच त्यातून इंद्रियाना आनंद मिळतो, नाहीतर करकोच्याला ताटलीतून आणि कोल्ह्याला बाटलीतून खीर "सर्व्ह" केल्यासारखं होईल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    17.03.2017