वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
१८ एप्रिल हा `जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषध काम करत नाही.
काही गोष्टी आपण गृहीत धरतो, जसे एकदा रक्तदाब वाढला म्हणजे तो रोग मला झाला, एकदा कधीतरी रक्तात साखर मिळाली म्हणजे मला डायबेटीस झाला, एकदा रिपोर्ट मधे कोलेस्टेरॉल वाढलेले दिसले, आता जेवणातले तेल तूप नारळ शेंगदाणे बंद करायला हवेत. असंही नाही.
काही जणांना मात्र उगाचच औषधे घेण्याची हौस असते, किंवा मी औषधांशिवाय जगूच शकणार नाही अशी भीतीदेखील असते. आणि औषधे सुरू केली जातात. ही औषधे घेतली की मी बरा राहीन, आता मला काही होणार नाही, अशी भाबडी आशा असते.
कायमस्वरुपी औषध ही संकल्पना आयुर्वेदात नाही. जेव्हा रोग तेव्हा औषध. नाहीतर कशाला हवंय औषध ? रोग वाढू नये याकरीता औषध, रोग होऊ नये यासाठी औषध, प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी औषध, रक्तवाढीसाठी औषध, कॅल्शियम सप्लीमेंटसाठी औषध, फूड सप्लीमेंटच्या नावाखाली औषधं हे केवळ बिझनेस फंडे आहेत, हे लक्षात घ्यावे.
ताप आला तर औषध जरूर घ्यावे. ताप येऊ नये यासाठी औषध घ्यायचे नसते. तसे चक्कर वगैरे येत असेल तर औषधांचा विचार करावा, पण चक्कर येऊ नये यासाठी चक्क औषधे ? रोग वाढला तर, हा भविष्याचा विचार अस्वस्थ करतो आणि भीतीपोटी कायमचे औषध सुरू होते.
औषध कसे असावे, यासाठी ग्रंथात एक प्रमाण दिले आहे. अल्पमोली बहुगुणी असावे. एका औषधाने दुसरा रोग निर्माण होऊ नये, किंवा एका औषधाचे दुष्परिणाम होऊ नयेत, याकरीता दुसरे, त्यासाठी तिसरे, चौथे औषध घ्यावे लागू नये.
एखादे औषध डोकेदुखीसाठी जरी घेतले तरी जाते पोटातच ! पोटात गेल्यावर फक्त जिथे डोके दुखते, त्या डोक्यामधेच ते जाते का ? नाही. सर्व रक्तात ते औषध मिसळून जाते. एखाद्या अवयवाला ठीक करण्यासाठी अन्य पाच सहा निरोगी अवयवांना आपण जास्ती कामाला लावत नाही का ?
ही औषधे शरीरातून बऱ्या बोलाने बाहेर पडतंच नाहीत. येतो तो मुक्कामीच येत असतो. आतडी, किडनी, यकृत, डोळे अशा नाजुक अवयवांना नाहक हा कचरा साठवून ठेवावा लागतो.
आपले संविधान असे म्हणते, शंभर आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता नये. इथे तर सगळं उलटंच चाललेलं आहे. एका दोषी अवयवाला निर्दोष करण्यासाठी बाकी सर्व अवयवांना जणु काही वेठीला धरले जातंय, त्यांच्यावर अन्याय करीत, एखाद्या अवयवाला सांभाळण्याची कसरत केली जातेय. बरं इथे जनरली प्रत्येक अवयव प्रत्येक डाॅक्टरने वाटून घेतलेले. प्रत्येक तज्ञ धडपडतोय, माझ्या अवयवाचाच मी विचार करणार ! बाकीचं तुमचं तुम्ही बघा !
कुणी कुणाचे नाही राजा,
कुणी कुणाचे नाही.
लळा जिव्हाळा शब्दच खोटे.
पण शरीरातील अवयव जन्मापासूनच एकमेकांशी रक्ताने बांधलेले आहेत म्हणून काय कोण जाणे, पण हे सर्व अवयव एकमेकांना स्वतःच जीव धोक्यात घालून, त्यांच्यावरील हा औषधांचा मूक अत्याचार दूर करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावीत असतात.
हे डाॅक्टरांचे नशीब !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.04.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक तीन - रोगाचे लेबल लावू नका."
ज्याप्रमाणे एखाद्या एसटी ला पाटी लावली की ती गाडी त्याच मार्गाने फिरेल. त्याच मार्गाने जाताना त्याच सर्व नियमांचे पालन करावेच लागेल. तेच सर्व खड्डे, तेच स्पीड ब्रेकर, तेच अडथळे, तेच वाहतुकीचे नियम, तेच थांबे, तीच वेळ, तशीच गती अपेक्षित ठेवली जाते. कारण आपण गाडीला बोर्ड लावलेला असतो. हा बोर्ड लावला नसता तर हीच गाडी मोकळेपणाने कुठेही सहजपणाने फिरवता आली असती.
हं! रोगाच्या बाबतीत असेच आहे. एकदा आपण आपल्याला विशिष्ट रोगाचे लेबल चिकटवून घेतले की, स्वतंत्र विचाराने जाऊच शकणार नाही.
जसे, मी रक्तदाबाचा रोगी आहे, असे स्वतःला लेबल चिकटवले, डाॅक्टरनी तसे सांगणे हे डाॅक्टरांचे कर्तव्यच आहे, त्यामुळे ते तसे सांगणारच. पण आपण ठरवायचे आहे की मी या कायमस्वरूपी रोगाची पाटी मला चिकटवून घ्यायची आहे की नाही.
एकदा मी रक्तदाबाचे लेबल लावले की सहजपणे आपण गृहीत धरतो,
आता ही औषधे कायमची.....
कुठेही गेलो तरी औषधे लक्षात ठेवायची कायमची.......
या औषधांबरोबर त्याचे दुष्परिणाम कायमचेच...
त्यासाठी दरमहा तपासणी कायमची......
वैद्यकीय खर्च कायमचा.....
मीठ कमी अळणी जेवणे कायमचे.....
अधिक श्रमाची कामे बंद कायमची.....
तेल तूप नारळ शेंगदाणे बंद कायमचे.....
कधीच टेन्शन घ्यायचे नाही, याचे टेन्शन कायमचे......
यामधे जरा चूक झाली की जे होईल त्याला मीच जबाबदार आहे, कायमचा ......
आणि हे वयाच्या तिसाव्या वर्षीपासून आजन्म....
संपला जीवनातला आनंद !
आणि येतं अकाली वृद्धत्व.
लवकर म्हातारे झाल्यासारखं वाटू लागतं.
पुल म्हणतात तसं
........जेव्हा भज्याच्या वासाने मन भरून जायच्या अगोदर जेव्हा अॅसिडीटी आठवते, तेव्हा समजावं आपण म्हातारे झालो.....
........तरूणीकडे लक्ष जाण्याअगोदर जेव्हा तिच्या कडेवरील मुलाकडे पहिले लक्ष जाते तेव्हा समजावं आपण म्हातारे झालो...
.......पिकनिकला निघताना औषधांच्या डब्याची जेव्हा आठवण होते, तेव्हा खुशाल समजावं, आपण म्हातारे झालो....
म्हणूनच म्हणतो,
सदा तरूण रहा.
काढून टाका गाडीचा बोर्ड आणि मस्त फिरवा गाडी, मन मोकळेपणाने.
आणि एन्जाय करा जीवनाची पिकनिक. औषधांच्या डब्याशिवाय !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.04.2017
शरीर सांगते ते सगळंच अगदी बरोबर असतं असं नाही. याचा अर्थ असाही नाही, की शरीर जे करतंय, ते सर्व माफ आहे !
एच.आय.व्ही. किंवा हिपेटायटिस बी हे आजार पन्नास वर्षांपूर्वी कुणाला माहिती नव्हते. आजकाल हे आजार माहिती झाले. त्यावर संशोधन चालू झाले आणि काही प्रमाणात आटोक्यात आणण्यापर्यंत यश पण मिळते आहे. तसाच एक नवीन आजार आजकाल फार वाढलेला दिसतो. तो आहे “टाच दुखणे”. हा आजार खूप जुना फक्त आजकाल प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते. टाचदुखी काही जीवघेणा आजार नाही म्हणून त्यावर फारसे संशोधन करण्याची धडपड फारशी कोणी करत नाही. पण ज्याची टाच दुखत असते त्यालाच समजते की त्या वेदना किती जीवघेण्या असतात ते.
ही टाच दुखी आजकाल का वाढली आहे? त्याला कसा आळा घालता येईल? पेन किलर औषधे न घेता फक्त काही सवयी बदलून टाच दुखीवर कसा इलाज करता येईल? ह्या सर्व प्रश्नांचे “अनुभविक बोल” समजून घेऊया.
पूर्वी ज्यांच्या घरी फ्रीज आहे ते श्रीमंत समजले जात. आजकाल फ्रीज म्हणजे अगदी जीवनावश्यक वस्तू बनली आहे. फ्रीजचा आणि टाच दुखीचा काय संबंध असा विचार आता आपण नक्कीच सुरु केला असेल. लहानपणा पासून आपण बघत आलो आहोत की कुठेही दुखत असेल तर शेकण्यामुळे बरे वाटते. खेळता खेळता चेंडू जरी डोळ्याच्या आसपास लागला तर लगेच खिशातून रुमाल काढून तोंडाच्या वाफेने थोडी ऊब निर्माण करुन लगेच डोळ्यावर धरतात हे आपण बघितले असेल. पाठ दुखी, कंबर दुखी होत असेल तर गरम लाईट किंवा रबरी पिशवीतून गरम पाणी भरुन शेकण्यामुळे आराम पडतो हे आपण नेहमी अनुभवतो. म्हणजेच उष्णता ही वेदना घालवते ह्या उलट थंड पाण्यामुळे वेदना वाढते हे समजले पाहिजे. थंड गार सरबत किंवा पाणी पिताना दातांमध्ये कळ येते हा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मग त्या थंड पाण्यामुळे शरीरात इतर ठिकाणी वेदना होणं शक्य आहे हे आपल्याला का लक्षात येत नाही.
उत्तरेकडे अती थंडीच्या वातावरणात चालता चालता हाता-पायाला जरा धक्का लागला तरी किती जोरात ठणका लागतो. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आमच्या लहान पणी वडील एप्रिल-मे महिन्यात आम्हाला आईसक्रीम खायला घेऊन जात त्या काळात आईसक्रीम हा पदार्थ फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत खायचा असतो असे आमच्या डोक्यात ठाम बसले होते. आजकाल कोणताही ऋतु असो, अगदी धो धो पाऊस कोसळत असला तरी आणि कडाक्याची थंडी असली तरी “आईसक्रीम चालते.” फ्रीजचे थंड पाणी बारा महिने पिणारे लोक आहेत. काही होत नाही असा गोड गैरसमज त्यांच्या मनात कोण भरुन देते हेच कळत नाही. ह्या थंड पदार्थांचा मारा शरीरातील ऊब कमी करतो. नैसर्गिक ऊर्जा कमी होत जाते आणि जोडीला टाचा दुखणे चालू होते. हा विचार सांगितल्यावर काही विद्वान म्हणतात, “आम्ही इतके वर्ष फ्रीजचे पाणी पितो, तेव्हा काही नाही झालं, मग आता का?” ह्याचं उत्तर काहीही कुपथ्य केलं तर शरीर दीर्घकाळ पर्यंत त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतं. आणि एक वेळ अशी येते की शरीर संपावर जातं अत्याचारांना साथ देणं सोडून देतं.
ह्याचा दुसरा भाग म्हणजे थंड पदार्थ अति प्रमाणात वारंवार घेण्यामुळे वजन वाढते. वाढलेल्या वजनाचा सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल गुडघे नंतर कंबर व शेवटी मणके. गरज नसताना उगाचच पाणी पिण्यामुळे हे पाणी हाडांच्या भागात जास्त ओलावा निर्माण करतात आणि हाडांमध्ये सूज येऊ लागते. हा प्रकार समजण्यासाठी पावसाळ्यात लाकडी दरवाजे कसे फुगतात ते आठवून पहा. ओलावा वाढला की लाकूड जसे फुगते तशीच हाडे पण फुगतात, म्हणजेच सुजतात अशा वेळी आपण कोणतेही पेन किलर औषध घेतले की वेदना कमी होते. पण औषधाचा परिणाम होताना भरपूर घाम येतो म्हणजेच शरीरात ठोसलेलं जास्तीचं पाणी औषधाने बाहेर फेकून देण्याची क्रिया होते. हे उदाहरण देण्याचे प्रयोजन फक्त विषय समजण्यापुरते नव्हे तर हा प्रयोग असंख्य रुग्णांच्या अनुभवातून सिद्ध झाला आहे. पूर्वीच्या काळी “संध्या” करण्याची पद्धत होती. ह्या संध्येच्या पद्धतीमध्ये पळी पळीने घेऊन आचमन आणि काही मंत्रोच्चानकरण्याची पद्धत होती. संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी संध्या करावी अशी शिकवण होती. म्हणजेच सूर्यास्तानंतर जास्त पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे असा संकेत होता.
फ्रीज सारखा दुसरा टाचांचा शत्रू म्हणजे ए.सी. वेदना शामक गोळी घेतली की घाम येतो ह्याचाच उलट अर्थ असा की घाम येण्याचे थांबवणारी क्रिया वेदना वाढवण्यास कारण होते. मग हे सर्व टाळण्यासाठी काय करता येईल? वातानुकुलित ऑफिस, घर,गाडी असताना कसलाच वापर करायचा नाही का? ह्याचे उत्तर “वापर जरुर करावा पण मर्यादेत”. दिवसातून वीस तास आपण जर ए.सी. मध्ये असाल तर किमान ४० मिनिटे असा काही व्यायाम करा की ज्यामुळे आडवून ठेवलेला सर्व घाम औषधाशिवायचबाहेर पडेल. स्टीम, सोना हे प्रकार करण्यासही हरकत नाही पण बॅडमिंटन, टेनिस, सायकलिंग सारखा व्यायाम केला तर तसा घाम तर बाहेर पडेलच पण सांधे पण लवचिक राहतील.
टाचदुखीमुळे चालणं फिरणं कमी होते, परिणामी व्यायाम कमी होतो आणि वजन वाढू लागते. वाढलेल्या वजनाचा परिणाम सर्व प्रथम टाचांवर होऊ लागतो. म्हणून थोडा व्यायाम नियमित करण्याची सवय ठेवावी.
१) टाच दुखी ताबडतोब थांबवण्यासाठी सहन होईल इतक्या गरम पाण्यात मीठ टाकून १० मिनिटे पाय बुडवून बसावे.
२) फ्रीज शी चक्क कट्टी करावी.
३) कोल्ड ड्रिंक किंवा आईसक्रीम फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत घेण्याचे पदार्थ आहेत असे समजावे.
४) “बर्फ” हा शब्द पण उच्चारु नये.
५) सूर्यास्तानंतर पाणी किंवा थंड पदार्थ घेण्याचे टाळावे.
६) ए.सी. चा वापर जेथे टाळता येणे शक्य नाही तेथेच करावा.
शांतपणे विचार केल्यावर लक्षात येईल की ह्या गोष्टींचा वापर ह्या सवयी गेल्या २५ वर्षांत अति प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून वाढते आहे टाच दुखी.
-- आर.बी.पाटील
संयोजक
फिटनेस मूवमेंट ऑफ़ इंडिया
आज १७ एप्रिल. जागतिक हेमोफिलिया दिवस.
हिमोफेलिया हा रक्ताचा आजार समजला जातो. शरीरात रक्त गोठण्यासाठी तेरा घटक असतात. ‘हिमोफेलिया’च्या पेशंटमध्ये आठ क्रमांकाचा घटक कमी असेल तर ‘हिमोफेलिया ए’ नावाचा आजार होतो. नऊ क्रमांकाच्या घटकाची कमतरता असल्यास ‘हिमोफेलिया बी’ आणि अकरा क्रमाकांचा घटक नसल्यास ‘हिमोफेलिया सी’ असे आजार होतात. हिमोफिलिया हा दुर्मीळ आजार असून, तो ०.०१ टक्के लोकांमध्ये आढळून येतो. या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्त्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्त्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. जगभरात हीमोफीलिया आजार या आजाराने त्रस्त लोकांची संख्या जवळपास ५०,००० आहे.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
छातीत दुखण्याचे जाणवणे विविध प्रकारचे असू शकते. ते तीव्र किंवा सौम्य असू शकते. एखादा चाकू खुपसल्याप्रमाणे अथवा गुद्दा मारल्यानंतर दुखावे असे असते. सतत अथवा ठोके पडल्याप्रमाणे स्पंदनात्मक प्रवृत्तीचे असते, ते एका बोटाने जागा दाखविता येण्याजोग्या जागेत अथवा तळहात ठेवून अंदाजे जागा आखून दाखविता येते.
हृदयविकाराची वेदना केवळ छातीतच मर्यादित असेल असे नसते. हृदयविकारात दुखणे छातीवर, जबड्यावर, मानेत अगर पाठीत, क्वचित वरच्या पोटात दाब आल्यासारखे दुखते. मळमळ होते, उलटी येते, धाप लागते, अंगाला घाम सुटतो व अकस्मात खूप थकवा जाणवतो. अंजायना पेक्टोतरिस या प्रकारात सहसा श्रमामुळे छातीत किंवा उपरोधित इतर ठिकाणी वेदना येते. ही वेदना विश्रांती घेताच शमते. हृदयविकाराचा झटका विश्रांती घेतानाच येतो.
छातीच्या मध्यभागी दुखण्याचे दुसरे नेहमी आढळणारे कारण म्हणजे अन्ननलिकेचा दाह होणे. असा दाह जठरातील आम्लयुक्त पाचकरस अन्ननलिकेत येण्याने होतो. कधी केवळ सौम्य जळजळ जाणवते, तर कधी हृदयविकाराच्या झटक्याकसारखी तीव्र वेदना होते.
मनाचा शरीरावर मोठा परिणाम होतो, हे तर माहीत आहेच. चिंतातूर व्यक्तीला तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आली, की छातीत, सहसा डाव्या बाजूला धारदार शस्त्र खुपसल्यासारखी जोरात वेदना येते.
काही वेळा शारीरिक श्रमानंतर विशेषतः हाताच्या स्नायूंच्या अतिश्रमाने, छातीच्या स्नायूत गोळा आल्याप्रमाणे वेदना येतात. गोळा गेला तरी वेदना रेंगाळते.
छातीचा फासळ्यांचा पिंजरा दर श्वसनाबरोबर कार्यरत असतो. फासळ्यांचे पुढचे टोक कूर्चेला जोडलेले असते. या कूर्चेतील सूजेमुळे छातीत मध्यभागाच्या डाव्या बाजूला दुखते. ही जागा एका बोटाने दाखविता येते व बोटाने दाब दिल्यास वेदना येते. इतर अनेक कारणांनी छातीत दुखू शकते.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई.
एप्रिल व मे महिन्यात गुलमोहोर फुलतो. त्याच्या पाकळ्यांचा सडा जमिनीवर पडतो. ह्या 10--15 पाकळ्या ग्लासभर पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी पाणी गाळून, सकाळ दुपार व संध्याकाळ हे पाणी पिण्याने उन्हाळ्याच्या उष्णतेचा त्रास व पित्ताचा त्रास कमी होतो.
माझी आई व सासुबाई दोघीना पित्ताचा खूप त्रास होता. त्या दोघीना गुलमोहोराचे पाणी रोज दिले. आणि त्याना पित्ताचा त्रास पुढे सहा सात महिने झाला नाही.
माझे संशोधनात कंपवातावर गुलमोहोर उपयोगी पडेल असे आले. डोंबिवलीच्या एका गृहस्थानी मी सांगितल्या प्रमाणे गुलमोहोराचे पाण्याने कंपवात कमी झाल्याचे फोन करून सांगितले. तसेच माझ्या एका 73 वर्षे वयाच्या मित्राना हे पाणी 3-4 महिने दिले. त्यांना चहा पिताना कप किंवा बशी इतकी हालायची की चहा पिणे नको व्हायचे ते आता व्यवस्थित एका हाताने चहा पितात.
गुलमोहोराच्या फुलांचे सरबतही करता येते. बर्याच पाकळ्या मिक्सरमधून फिरवून चांगल्या क्रश कराव्यात व पाण्याबरोबर मिसळून चवी प्रमाणे साखर मीठ घालून प्यावे. ह्यामुळे उन्हाळ्यातील गर्मीचा त्रास कमी होतो असा माझा अनुभव आहे.
-- अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,
आनंदनगर, पुणे
आपल्या नेहेमीच्या कामात, दुसऱ्याने केलेली ढवळाढवळ आपण मान्य करीत नाही. मग शरीराने तरी का मंजुरी द्यावी ?
गुरूवार दिनांक १३ एप्रिल २०१७ हा दिवस बोरिवलीकरांच्या, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या, कायमचा स्मरणात राहील. या दिवशी या वर्षातल्या सर्वात देखण्या आणि भारदस्त कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचा योग बोरिवलीकरांना आला
Copyright © 2025 | Marathisrushti