वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
देवपूजा करण्यापूर्वी देवांना स्नान घालण्यासाठी तांबे किंवा पितळेचे जे पसरट भांडे वापरले जाते त्याला ताम्हण असे म्हणतात. ताम्हणाचा आकार गोल असल्यामुळे ते पृथ्वीचे प्रतीक समजले जाते.
संध्येसाठी देखील ताम्हणाचा उपयोग केला जातो. कारण संध्या ही सुर्याची उपासना असून जी आचमने केली जातात त्याध्ये दैवी शक्ती निर्माण झालेली असते.
ताम्हणात पडलेले शक्तिशाली जल पायदळी तुडवले जाऊ नये यासाठी ते झाडाच्या मुळाशी असलेल्या मातीत टाकले जाते कारण ते पवित्र मानले जाते.
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.
विकल्परहितसंकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेलतर आपण कुठेच पोहचू शकत नाही. डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो. योगी बनण्यासाठी योग साधना करावी लागेल तर गाणे शिकण्यासाठी योग्य गुरूच्या मार्गदर्शनात रियाज करावा लागेल. अर्थात जीवनात लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे. पोहणे न शिकतातच नदीत उडी मारणार्यांपैकी काहीच भाग्यशाली लोक असतात जे नदीत वाहणाऱ्या ओंडक्याच्या मदतीने दुसर्या किनार्यावर पोहचतात बाकींच्या नशिबी नदीत बुडणेच.
अखंड पुरुषार्थ: एकदालक्ष्य निश्चित केल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयास कारणे गरजेचे. एक दिवस १० तास अभ्यास करणारा आणि ५ दिवस झोपणार्या विद्यार्थीला चांगले मार्क्स मिळणे अशक्यच. त्या पेक्षा दररोज नियमित २ तास अभ्यास करणार्याला चांगले मार्क्स मिळण्याचीशक्यता जास्त. तसेच दुकानदार असो वा चाकर, दररोज नियमितपणे कार्य करणे गरजेचे असतेच. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी निरंतर कार्य करणे म्हणजेच तपस्या होय. या साठी आपल्याला ३ गोष्टींची गरज आहे - स्वस्थ शरीर, ज्ञान आणि अनासक्त कर्म.
स्वस्थ शरीर: निरंतर कर्म करण्यासाठी स्वस्थ निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर जर रोगग्रस्त किंवा दुर्बल असेल तर इच्छा असूनही आपण निरंतर कार्य करू शकत नाही. आता माझेच उदाहरण या घटकेला दिल्लीत थंडी आहे, कमरेचे जुने दुखणे पुन्हा वर आल्यामुळे इच्छा असूनही काम्पुटर वर टंकन करणे शक्य होत नव्हते. साहजिकच आहे शरीर दुर्बल आणि रोगी असेल तर आपण निरंतर कार्य करू शकणार नाही आणि आपले उद्दिष्ट हि साध्य करू शकणार नाही. मनात निराशा घर करेल. मन हि रोगी रोगी बनेल. म्हणूनच म्हंटलेले आहे. 'शरीर माध्यम धर्मं खलु साधनम'. कुठलेही कार्य, मग जप-तप, योग, अभ्यास, नौकरी-धंधा आणि शेती. शरीर निरोगी असणे गरजेचे. त्या साठी निरंतर योग आणि व्यायाम आवश्यक आहे.
ज्ञान: लक्ष्य प्राप्ती साठी लक्ष्यावर पोहचण्यासाठी लागणारे ज्ञान हि आवश्यक असते. डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या शिवाय आपण डॉक्टर बनू शकणार नाही. तसेच एखाद्या उंच पर्वतावर चढायचे असेल तर पर्वतावर चढण्याचे प्रशिक्षण व त्या साठी लागणारे सर्व उपकरण, या सर्वांची गरज असते. त्या शिवाय आपण पर्वतावरचढू शकत नाही. व्यापार करायचा असेल तर त्या धंद्याची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे, अन्यथा व्यापारात नुकसान हे होणारच.
अनासक्तकर्म: आपल्या उद्दिष्ट प्राप्ती साठी आपण अखंड पुरुषार्थ केला तरी हि कित्येकदा आपल्या हातात नसणाऱ्या घटनांमुळे कार्य सिद्ध होत नाही. आपले केलेले कर्म वाया जाते, त्यातून निराशेची भावना मनात घर करते. उदा: एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या परीक्षेसाठी उत्तम अभ्यास केला, परीक्षेत हि सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने दिली. पण कुठल्या तरी परीक्षा केंद्रात पेपर फुटला. परीक्षारद्द झाली. कुठलीही चुकी नसतानाही त्या विद्यार्थाची मेहनत फुकट केली. प्राकृतिक प्रकोप- पूर, वादळ, भूकंप, अग्नी या शिवाय चोरी, डकैती, अस्थिर राजकीय परिस्थिती इत्यादींचा परिणाम हि आपल्या कर्मांवर होतोच. कर्मावर आसक्ती असेल तर निराशा मनात घर करणे साहजिकच. या शिवाय कधी-कधी असे हि होते, थोडी बहुत सफलता मिळताच, आपल्या कर्माचे आणि पुरुषार्थाचे फळ मिळाले, असे समजून आपण पुरुषार्थ करणे सोडून देतो. आपल्या कर्माच्या आसक्तीत गाफील राहिल्यामुळे काही काळानंतर बदलत्या परिस्थितीचा फटका त्यांना बसतो. स्वर्गीय धीरूभाई अंबानी जर एक कारखाना लाऊन चैनीत बसले असते तर आज एवढा मोठा रिलायन्स समूह दिसला नसता. बाबा रामदेव हि एक योगपीठ टाकून स्वस्थ बसले नाही. त्यांनी फूडपार्क, ग्रामोद्योग, आयुर्वेद अनुसंधान आणि प्राकृतिक शेतीच्या संवर्धनाचे कार्य हि हातात घेतले. या शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणावर आचार्यकुलम उघडण्याची हि योजना आहे. अर्थातच एक लक्ष्य पूर्ण होताच, दुसरे लक्ष्य निर्धारित करणे व त्या साठी अखंड पुरुषार्थ करणाराच आपले उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. काळ आणि परिस्थिती निरंतर बदलत असते त्यामुळे पुरुषार्थ हि निरंतर करावाच लागतो. लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता जो माणूस अखंड पुरुषार्थ करत राहतो, तो आपल्या उद्दिष्टात निश्चित सफल होतो.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
-- विवेक पटाईत
परवा फेस बुक वरील माझ्या एका मित्राने समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख "नारायण ठोसर" असा एकेरी केला. मुद्दा वादाचा जरी होता तरी त्यात समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख अशा प्रकारे आल्याने मी फार व्यथित झालो. समर्थ कुठल्याही जातीच्या पलीकडले व्यक्तिमत्व होते, नव्हे ते तर प्रत्यक्ष हनुमान स्वरूप होते. ते ब्राम्हण जातीत जन्माला आले किंवा त्यांचा उल्लेख शिवरायांचे गुरु म्हणून इतिहासात आला आहे यावर कुणाचाही आक्षेप असू शकतो. परंतु त्यांनी केलेल्या दासबोधाची निर्मिती हि एक दैवी चमत्कार असलेली निर्मिती आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. मी दासबोधाचा नियमित वाचक आणि अभ्यासक आहे. अमृतानुभव जितका मला प्रिय आहे तितकाच दासबोध आणि तुकारामांची गाथा मला प्रिय आहे.
समर्थ जन्मताच "परामानस विद्या" ज्याला इंग्रजीत " Advanced Psychology " असे म्हणतात त्यात पारंगत होते. दासबोध हा त्यांचा ग्रंथ ३५० वर्षापूर्वीचा Advanced Psychology चाच ग्रंथ आहे.
समर्थांनी लिहिलेल्या आरत्या आणि स्त्रोत्र हि आजही घरोघरी गायली जातात. समर्थ देश भर फिरले, निबिड अरण्यात त्यांनी गुहेत बसून तपस्या केली. ग्रंथ निर्मिती केली. समर्थांचे आयुष्य वादातीत होते.
मी काही दिवस समर्थांच्या वर लिहिण्याचे ठरवले आहे. सुरवात करताना त्यांनी लिहिलेल्या "चातुर्य लक्षणा"पासून करणार आहे.
उच्च नीच जातीत जन्मणे हे कुणाच्याही हातात नसते. शरीराचे सुंदर दिसणे अथवा कुरूप पणा हा सुद्धा निसर्गदत्त असतो. पण म्हणून लोकांनी जाणीव पूर्वक काही 'गुण' धारण करावे असे समर्थ म्हणतात. या गुणांना समर्थ "आगंतुक गुण" असे म्हणतात.
समास सहावा : चातुर्यलक्षण || १४.६ ||
॥श्रीराम॥
रूप लावण्य अभ्यासितां नये | सहजगुणास न
चले उपाये | कांहीं तरी धरावी सोये | अगांतुक गुणाची ||१||
काळें माणुंस गोरें होयेना | वनाळास येत्न चालेना |
मुक्यास वाचा फुटेना | हा सहजगुण ||२||
आंधळें डोळस होयेना | बधिर तें ऐकेना |
पांगुळ पाये घेइना | हा सहजगुण ||३||
कुरूपतेचीं लक्षणें | किती म्हणोनि सांगणें |
रूप लावण्य याकारणें | पालटेना ||४||
अवगुण सोडितां जाती | उत्तम गुण अभासितां येती |
कुविद्या सांडून सिकती | शाहाणे विद्या ||५||
मूर्खपण सांडितां जातें | शाहाणपण सिकतां येतें |
कारबार करितां उमजतें | सकळ कांहीं ||६||
मान्यता आवडे जीवीं | तरी कां उपेक्षा करावी |
चातुर्येंविण उंच पदवी | कदापी नाहीं ||७||
ऐसी प्रचित येते मना | तरी कां स्वहित कराना |
सन्मार्गें चालतां जनां | सज्जना माने ||८||
देहे नेटकें श्रुंघारिलें | परी चातुर्येंविण नासलें |
गुणेंविण साजिरें केलें | बाष्कळ जैसें ||९||
अंतर्कळा श्रुंघारावी | नानापरी उमजवावी |
संपदा मेळऊन भोगावी | सावकास ||१०||
प्रेत्न करीना सिकेना | शरीर तेंहि कष्टविना |
उत्तम गुण घेईना | सदाकोपी ||११||
आपण दुसऱ्यास करावें | तें उसिणें सवेंचि
घ्यावें | जना कष्टवितां कष्टावें | लागेल बहु ||१२||
न्यायें वर्तेल तो शाहाणा | अन्याइ तो दैन्यवाणा |
नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||
जें बहुतांस मानलें | तें बहुतीं मान्य केलें |
येर तें वेर्थचि गेलें | जगनिंद्य ||१४||
लोक आपणासि वोळावे | किंवा आवघेच कोंसळावे |
आपणास समाधान फावे | ऐसें करावें ||१५||
समाधानें समाधान वाढे | मित्रिनें मित्रि जोडे |
मोडितां क्षणमात्रें मोडे | बरेपण ||१६||
अहो कांहो अरे कां रे | जनीं ऐकिजेतें किं रे |
कळत असतांच कां रे | निकामीपण ||१७||
चातुर्यें श्रुंघारे अंतर | वस्त्रें श्रुंघारे शरीर |
दोहिमधें कोण थोर | बरें पाहा ||१८||
बाह्याकार श्रुंगारिलें | तेणें लोकांच्या हातासि काये
आलें | चातुर्यें बहुतांसी रक्षिलें | नाना प्रकारें ||१९||
बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
समस्तीं बरें म्हणावें | ऐसी वासना ||२०||
तनें मनें झिजावें | तेणें भले म्हणोन घ्यावें |
उगेंचि कल्पितां सिणावें | लागेल पुढें ||२१||
लोकीं कार्यभाग आडे | तो कार्यभाग जेथें घडे |
लोक सहजचि वोढे | कामासाठीं ||२२||
म्हणोन दुसर्यास सुखी करावें | तेणें आपण सुखी व्हावें |
दुसऱ्यास कष्टवितां कष्टावें | लागेल स्वयें ||२३||
हें तों प्रगटचि आहे | पाहिल्याविण कामा नये |
समजणें हा उपाये | प्राणीमात्रांसी ||२४||
समजले आणी वर्तले | तेचि भाग्यपुरुष जाले |
यावेगळे उरले | तें करंटे पुरुष ||२५||
जितुका व्याप तितुकें वैभव | वैभवासारिखा हावभाव |
समजले पाहिजे उपाव | प्रगटचि आहे ||२६||
आळसें कार्येभाग नासतो | साक्षेप होत होत होतो |
दिसते गोष्टी कळेना तो | शाहाणा कैसा ||२७||
मैत्रि करितां होतें कृत्य | वैर करितां होतो मृत्य |
बोलिलें हें सत्य किं असत्य | वोळखावें ||२८||
आपणास शाहाणें करूं नेणें | आपलें हित आपण
नेणें | जनीं मित्रि राखों नेणे | वैर करी ||२९||
ऐसे प्रकारीचे जन | त्यास म्हणावें अज्ञान |
तयापासीं समाधान | कोण पावे ||३०||
आपण येकायेकी येकला | सृष्टींत भांडत चालिला |
बहुतांमध्यें येकल्याला | येश कैंचें ||३१||
बहुतांचे मुखी उरावें | बहुतांचे अंतरीं भरावें |
उत्तम गुणीं विवरावें | प्राणीमात्रांसी ||३२||
शाहाणे करावे जन | पतित करावे पावन |
सृष्टिमधें भगवद्भजन | वाढवावें ||३३||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चातुर्यलक्षणनाम समास सहावा || १४.६ ||
-- चिंतामणी कारखानीस
एखाद्याच्या वर प्रभू रामचंद्र प्रसन्न होतात पण त्यासाठी जशी त्याची भक्ती कारणीभूत असते तशी त्याचे पूर्व सुकृत सुद्धा जबाबदार असते. समर्थांच्या बाबतीत त्याचे पूर्व सुकृत प्रचंड होते. त्यांच्या आधीच्या २१ पिढ्या रामाची उपासना करीत होत्या. २१ पिढ्या गेल्यावर प्रत्यक्ष हनुमान त्यांच्या रूपाने पुन्हा रामनामाचा प्रचार करण्यासाठी त्याच्या कुळात प्रगट झाला. अशा या परम पावन कुळात, राम नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता, जांब या गावात समर्थांचा जन्म झाला. समर्थांच्या रूपाने प्रत्यक्ष हनुमानानेच जणु पुन्हा मानव देह धारण केला. लहानपणापासून वैराग्य वृत्तीचे समर्थ प्रपंचाबद्दल उदासीन होते.
कुठेतरी आडगळीत एकांती बसावे आणि चिंतन करावे असा दिनक्रम चालू असताना एके दिवशी त्यांच्या आईने त्यांना विचारले-बाळ आडगळीत काय करतो आहेस ? समर्थांनी उत्तर दिले "आई, चिंता करतोय विश्वाची". लहानपणापासून त्यांनी विश्वाची चिंता केली आणि ती चिंता सर्वव्यापी होती.
मुलाने प्रपंच करावा म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या लग्नाचा घाट घातला. समर्थांना प्रपंचात गुंतून राहणे मान्य नव्हते. त्यांनी लग्नाचा मंडप दारात उभा राहत असलेला पाहीला आणि सरळ कुणालाही न सांगता नाशिक जवळील टाकली हे गाव गाठले. (पळून गेले नाहीत ....पण आईला न सांगता गेले ) प्रभू रामचंद्र आणि सीता माई या शिवाय आता कुणीही नाही आणि विश्वाची चिंता कार्यवाहित आणायची तर आपण संसारात आडकणे योग्य नाही म्हणून संसार बंधनात त्यांनी स्वतःला गुंतून ठेवले नाही. समर्थांनी टाकली येथे घोर अनुष्ठान केले. उपासनेशिवाय सामर्थ्य नाही आणि सामार्थ्याशिवाय लोकोद्धार नाही हे त्यांनी जाणिले .
"राम तुज कारणे, जिवलगांचा संग सोडला ...! असे म्हणत त्यांनी १२ वर्षे घोर तप केले. उग्र अनुष्ठान केले. श्री राम प्रभूंनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांचा जन्म कृतकृत्य झाला. खरे तर प्रभूंच्या दर्शनाने त्यांचा मानव जन्म सफल झाला होता. करायचे असे काहीही राहिले नव्हते परंतु खुद्द हनुमानाने घेतलेले हे मानव रूप काही तरी विशेष करण्यासाठीच होते.
समर्थ प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाल्यावर संपूर्ण देशभर फिरले. अफगाणिस्थान ..पाकिस्थान ...नेपाळ...भूतान या आजच्या देशात समर्थ गेले होते. हिमालयापासून लंकेपर्यंत त्यांनी भ्रमण केले. लोकांचे दुखः पाहीले. धर्माचा ऱ्हास अनुभवला. आणि यवनांच्या अत्याचाराची त्यांना कल्पना आली.
समर्थांनी आपल्या सामर्थ्य बळाने अखिल राष्ट्र संघटीत केले.
-- चिंतामणी कारखानीस
लक्ष्मण माने यांना मी साता-याला भेटलो आहे. मध्यंतरी त्यांच्यावर काही आरोप झाले होते त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही. पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याची कारणे देणारा लेख मात्र तमाम हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
बौद्धधर्म हि एक स्वतंत्र विचार धारा आहे. गौतम बुद्धाचा जन्म हिंदू राज घराण्यात झाला होता .बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून खरे तर हिंदू समाजावर उपकारच केले आहेत.
कल्पना करा कि - बाबासाहेबांनी बौद्ध धर्म न स्वीकारता मुस्लिम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला असता तर या देशांत काय झाले असते. दलितांवर परंपरागत शेकडो वर्षे केलेल्या अत्याचाराची परिणीती म्हणजे प.पु. बाबासाहेबांचे धर्मांतर हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. या नंतरचा काळ कसा असेल याची कल्पना या लेखातून आली आहे. मी या लेखाशी पूर्णपणे सहमत आहे. समाजात potential difference असलेली अनेक माणसे असतात. पण त्यांना समाजानी नीट वागणूक दिली नाही तर असे धर्मांतर होते.
आपल्या देशाच्या पूर्वेकडील अनेक राष्ट्र बौद्ध धर्मियांनी व्यापली आहेत. दलितांनी हा धर्म स्वीकारला म्हणून या धर्मालाच "दलित" लेखण्याचा मूर्खपणा काही मंडळी करीत असतात. पूर्वी काही मंडळींना हा धोका जाणवला होता म्हणून त्यांनी गौतम बुद्धाला विष्णूचा १० वा अवतार असल्याचे जाहीर केले होते. हिंदू-बौद्ध याच मातीत वाढले, मोठे झाले याची जाणीव सतत ठेवून वागले पाहिजे. माउली त्यांच्या पसायदानातून सतत हाच तर संदेश देतात. पण लक्षात कोण घेतोय ?
असो सर्व बौद्ध आणि हिंदू भावंडांना शुभ कामना. हरी ओम !!! नमो बुद्धाय !!!!
-- चिंतामणी कारखानीस
समर्थांनी शिवथर घळीत त्याचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. दासबोधा शिवाय समर्थांनी निर्माण केलेले वाङ्मय प्रचंड आहे . या शिवथर घळीचे महात्म खूप मोठे आहे. महाड- भोर रस्त्यावर माजेरी हे गाव लागते. त्या गावा पासून ४ मैलावर शिवथर घळ आहे. समर्थांनी या ठिकाणी वाङ्मय निर्मिती केली.दासबोध लिहिला गेला. महाराष्ट्रात दोन ठिकाणे अशी आहेत कि तिथे कंपास दक्षिण -उत्तर दिशा दाखवत नाही.शिवथर घळ आणि ठाणे जिल्ह्यातील गणेश पुरी जवळ तुंगारेश्वर पर्वतावर एक प्रचंड मोठी पांडव कालीन शिळा आहे तिथे कंपास दिशा दाखवत नाही.गणेश पुरी येथील नित्यानंद स्वामी त्याठिकाणी एकांतात बसायचे.आता श्री सदानंद स्वामी त्याठिकाणी ध्यान धारणा करतात.
दासबोधा शिवाय त्यांनी करुणाष्टके, मनाचे श्लोक ,आनंदवनभुवनी, आनंदवनभुवनम् (संस्कृत) आत्माराम अंतर्भाव,सार्थ अंतर्भाव,चत्वारमान, जनस्वभावगोसावी ,जुनाटपुरुष, पंचसमासी, पंचीकरणयोग,पूर्वारंभ, बाग प्रकरण,कारखाने प्रकरण,मनोबोध ,मान पंचक , षड्रिपुनिरुपण ,सवाया, समर्थ-वेण्णास्वामी संवाद, समर्थ- कल्याणस्वामी संवाद, समर्थ- केशवस्वामी संवाद, सार्थ भीमरूपी स्तोत्र, श्री सूर्यस्तुती, गुरुगीता, अशी अनेक स्त्रोत्र , कवने आणि आरत्यांची निर्मिती केली .
चिंतामणी कारखानीस
शिवराय आणि रामदास स्वामी यांचे प्रत्यक्ष सान्निध्यात राहिलेल्या हनुमंत स्वामी याची बखर उपलब्ध आहे. त्या बखरीत असा उल्लेख आहे कि समर्थ सज्जन गडावर (परळीचा किल्ला )वास्तव्याला असताना त्यांनी कल्याण स्वामी यांना दासबोधाची प्रत शिवरायांना भेट देण्यास सांगितले होते.सुदैवाने बखरीतील लिहिलेल्या या घटनेला शिव चरित्रकार पाठींबा देतात.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दक्षिण दिग्विजय आटोपताच प्रताप गडावर श्री भवानीच्या दर्शना साठी गेले होते.त्या पूर्वी त्यांनी सज्जन गडावर समर्थांची भेट घेतली होती.सज्जन गडावर या शिव -समर्थ भेटीची वेळ वैशाख शुद्ध २ शके १६०० अर्थात १३ एप्रिल १६७८ अशी आहे.समर्थ श्रावण महिन्यात शिवथर घळीतून सज्जन गडावर वास्तव्याला आले.शिवथर घळ ते सज्जन गड हा पायी मार्ग असा आहे-----शिवथर घळ --कुम्भे शिवथर --ढालकाठी--कांगोरी किल्ला--महादेवाचा मुरा--नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव उमरठ--महाबळेश्वर मठ--तापोळा --बामणोली--शेंबडी वाघाली--नवरणवारीची खिंड --जुमडी--जळकेवाडी--वाघापूर सड्याचा उत्तर भाग --मोरवाडी --मोर घळ परसावडे --पांगरी --परळी --सज्जनगड.या पैकी तापोळा ते वाघरी हा मार्ग कोयनेच्या धरणात बुडालेला आहे.त्या ठिकाणी नौकेने प्रवास करावा लागतो.
मोरघळीच्या माथ्यावरून सज्जन गडाचे विलोभनीय दृश्य दिसते त्यामुळे शिवरायांनी मुक्कामासाठी कोणता किल्ला हवा असे समर्थांना विचारताच समर्थांनी परळीचा किल्ला देणे असे सांगितले.
शिवरायांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरच्या नायक राजांचा पराभव केला आणि दक्षिणेला मराठा साम्राज्य स्थापन केले.व्यंकोजी महाराजांनी समर्थ शिष्य भीमस्वामी यांना तंजावर मध्ये समर्थांचा मठ स्थापन करण्यासाठी जागा दिली.त्या ठिकाणी समर्थांचा मठ निर्माण झाला.व्यंकोजी राजांनी तारो गोपाल या नावाच्या अत्यंत धार्मिक अशा कारकुनास अनेक धार्मिक ग्रंथांच्या नकली करण्याची आज्ञा केली त्यात दासबोधाची प्रत सरस्वती महाल या ग्रंथालयात अजूनही जशीच्या तशी जतन केली आहे.अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे भोसल्यांचे सध्याचे वंशज जे तंजावरला राहतात त्यांच्या देवघरात आज तागायत दासबोध आहे आणि तो सोनेरी अक्षरांनी लिहिलेला असून त्याची दररोज पूजा होते.
शिवरायांच्या वंशाजापैकी नागपूरकर भोसले हे देखील समर्थांना पुज्य मानत होते. त्यांच्या देवघरात समर्थांची पंच धातूची मूर्ती आहे .त्या मूर्तीची दररोज पूजा होते.सातारा गादीचे वंशज सुद्धा दरवर्षी "गुरु गादी" म्हणून न चुकता सज्जन गडावर जातात आणि समर्थांच्या समाधि समोर डोके टेकवून या महान राष्ट्र संता समोर नतमस्तक होतात.
सदर लेखातील हा भाग हा नागपूरच्या म.रा. जोशी या संत साहित्य अभ्यासक यांच्या दासबोधाच्या प्रस्थावानेतून साभार घेतला आहे.श्री जोशी यांनी दासबोधाच्या १५० हस्त लिखित प्रतींचा अभ्यास केलेला असून त्यांनी 'दत्तात्रय स्वामी ' या नावाची प्रत प्रसिद्ध केली आहे.श्री जोशी यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वर आणि तुकारामांची गाथा सुद्धा संपादित करून प्रसिद्ध केलेली आहे. संत तुकाराम आणि समर्थ यांचा जीवन कालखंड एकच आहे.आणि ज्या ज्या ठिकाणी दासबोधाचा अभ्यास होतो त्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि तुकारामंची गाथा सुद्धा अभ्यासली जाते.त्यामुळे समर्थांचे मठ हे संत साहित्याची विद्यापिठेच आहेत .
--चिंतामणी कारखानीस
समर्थांनी मनावर भाष्य करणारे २०५ श्लोक लिहिले त्यांनाच मनाचे श्लोक असे म्हणतात.मानवाच्या अशांतीचे मूळ म्हणजे त्याचे मन ! या मनापासून मुक्त होण्यासाठी मनच कसे उपयोगी पडते याचे विवेचन समर्थांनी मनाच्या श्लोकात केले आहे.संत एकनाथांनी 'जोशी' या नावाचे भारुड लिहिले आहे.त्यात भारुडात ते मनाचा उल्लेख करताना म्हणतात --
" मानाजी पाटील देहागावीचा
विश्वास धरू नका त्याचा. "
मन हे असे विश्वास न ठेवण्या सारखे चंचल आहे.मानवी जीवनात मन हे वासना धरते,ज्ञान मिळवते,परमेश्वराची भक्ती करते किंवा परमेश्वरा सगट सर्वांची घृणा सुद्धा करते. मन आणि हृदय यांत फरक आहे.मन विचार , तर्क आणि विवेकाचे अधिष्ठान आहे तर हृदय भावना , अन्तः प्रेरणा ,आणि नैसर्गिक प्रवृत्ती यांत प्रेम आणि तिरस्कार सुद्धा येतो यांचे मूळ आहे. म्हणून मनापासून बोलताना कुणी डोक्यावर ( ज्या मेंदूत विचार उत्पन्न होतात तिथे हात न ठेवता ) स्वतःच्या छातीवर डावीकडे म्हणजेच हृदयावर हात ठेवतो. प्रेमाचे स्वरूप दाखवताना याच साठी हृदयाचे चित्र असते.
ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, तुकारामांचे अभंग आणि समर्थांचे मनाचे श्लोक हि सामान्य माणसांच्या अध्यात्म साधनेची प्रस्थानत्रयीच आहे.लोकांचे कल्याण व्हावे म्हणून अत्यंत तळमळीने केलेली हि जणू आकाशवाणीच आहे.विज्ञानात शरीराचे शास्त्र आहे तर अध्यात्मात मनाचे शास्त्र आहे, अध्यात्म शास्त्राने मन शुद्ध,प्रसन्न,आणि निकोप करावे लागते.मनाच्या श्लोकांनी मनाचे शुद्धीकरण होते.म्हणूनच मनाच्या श्लोकांचे पठण ,मनन,चिंतन आणि आचरण हे अध्यात्माच्या अभ्यासाची सुरवात आहे.मन जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा ते विवेकाचा विचार करते आणि मन जेव्हा अविवेकाचा ध्यास घेते तेव्हा ते वासनामय होते. याच मनाला समर्थ बोध करून त्याला राघवाच्या दिशेनी घेऊन जातात. मनाच्या श्लोकांचे पठण बालवयात करणे अत्यंत फायदेशीर आहे. मी ब्राह्मण विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतले.वर्गात मनाचे श्लोक म्हंटले जात असत.त्या वयात त्याचे महत्व लक्षात आले नव्हते पण आता त्याची आठवण झाली तरी मन कासावीस होते. शालेय शिक्षणात मनाचे श्लोक शिकवणे हि काळाची गरज आहे.मनाचे श्लोक हेच अत्यंत प्रगत नागरिक शास्त्र आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.
--चिंतामणी कारखानीस
समर्थांनी मराठी छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांना लिहिलेली दोन पत्रे इतिहासाला ज्ञात आहेत.या पैकी शिवरायांनी जो अभूत पूर्व पराक्रम केला त्याबद्दल त्याची स्तुती करणारे एक पत्र आहे.त्याच प्रमाणे शिवरायांच्या स्वर्गवासानंतर त्याचे सुपुत्र महा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले दुसरे पत्र आहे.पहिल्या पत्रात शिवरायांची स्तुती आहे तर दुस-या पत्रात शिव छत्रपतींच्या गादीवर आरूढ झालेल्या संभाजी महाराजांना उपदेश केलेला आहे.आज आपण समर्थांचे पहिले पत्र पाहूया ----
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांस अधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || 1 ||
परोपकाराचिया राशी, उदंड घडती जयाशी |
जयाचे गुणमहत्वाशी, तुलना कैशी || 2 ||
नरपति हयपति, गजपति गडपति |
पुरंधर आणि शक्ति, पृष्ठभागी || 3 ||
यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत आणि जयवंत, जाणता राजा || 4 ||
आचारशील विचारशील, दानशील धर्मशील |
सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठायी || 5 ||
धीर उदार सुंदर, शुरक्रियेसी तत्पर |
सावधपणेसी नृपवर, तुच्छ केले || 6 ||
तीर्थक्षेत्रे ती मोडिली, ब्राम्हणस्थाने बिघडली |
सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला || 7 ||
देवधर्म गोब्राम्हण, करावयासी रक्षण |
हृदायस्त झाला नारायण, प्रेरणा केली || ८ ||
उदंड पंडित पुराणिक, कविश्वर यज्ञिक वैदिक |
धूर्त तार्किक सभानायक, तुमचे ठायी || ९ ||
या भूमंडळाचे ठायी, धर्म रक्षी ऐसा नाही |
महाराष्ट्रधर्म राहिला काही, तुम्हा करीता || १० ||
आणखी काही धर्म चालती, श्रीमंत होउनी कित्येक असती |
धन्य धन्य तुमची कीर्ति, विस्तारली || ११ ||
कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले |
कित्येकांसी आश्रय झाले, शिवकल्याण राजा || १२ ||
तुमचे देशी वास्तव्य केले, परन्तु वर्त्तमान नाही घेतले |
ऋणानुबन्धे विस्मरण जाहले, बा काय नेणु || १३ ||
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति, सांगणे काय तुम्हा प्रति |
धर्मास्थापनेची कीर्ति, सांभाळली पाहिजे || १४ ||
उदंड राजकारण तटले, तेथे चित्त विभागले |
प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे || १५ ||
महाराजांची समर्थ शेवटच्या ओवीत क्षमा मागून त्यांना सांगतात कि - "आपण प्रचंड राजकारणात तटले म्हणजे अडकलेले आहात त्यामुळे आपले चित्त अनेक ठिकाणी विभागले गेले आहे तरीही काहीही कारण (प्रसंग ) नसताना मी तुम्हाला हे पत्र लिहिले आहे त्या बद्दल मला क्षमा करावी " ..!
--चिंतामणी कारखानीस
शिवप्रभूंच्या महानिर्वाणा नंतर महाराष्ट्रात एक अभूत पूर्व पेच प्रसंग निर्माण झाला. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई त्यांच्या लहानपणीच निवर्तल्या होत्या.आई शिवाय वाढलेले मुल कधी कधी हट्टी असते.शिवरायांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे संभाजी महाराजांवर अत्यंत प्रेम होते.आईचे दुध नशिबी नसलेल्या संभाजी युवराजांवर हिरडस मावळातील एका नव्याने बाळंत झालेल्या तरुणीला राजमातेने "दुधाची आई "म्हणून गडावर पाचारण केले.या गुंजवणी गावाच्या सध्याच्या भाटघर धारणा जवळच्या राहणारा-या माउलीने संभाजी राजांची काळजी घेतली.संभाजी महाराजांची सावत्र आई सोयराबाई राणी साहेब यांना राजाराम नावाचा पुत्र झाला. जिजाबाई यांच्या मृत्यू नंतर संभाजी राजे तापट स्वभावाचे ,अत्यंत मानी पण आई नसलेले लेकरू म्हणून अतिशय दुर्लक्षित झाले .महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच राजमातेने देह ठेवला आणि संभाजी महाराज ख-या अर्थाने पोरके झाले.शिवरायांच्या अष्ट प्रधान मंडळाशी त्याचे पटेना.सोयराबाई यांना राजारामाला गादीवर बसवायचे होते.खरा हक्क थोरल्या मुलाचा म्हणजेच संभाजी राजे यांचाच होता. खूप राजकारण झाले. पण शेवटी संभाजी राजांना स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. या कामी जे आडवे आले त्यांना त्यांनी शास्त केले.शिक्षा केली.राजकारणावर पकड घट्ट राहावी म्हणून स्वतःचा प्रचंड दरारा निर्माण केला.
सुक्याबरोबर ओलेही जळते तसे शिव प्रभूंसाठी जीवाचे रान केलेल्या काही मंडळींना यात शिक्षा झाली.
समर्थांचे सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष होते.संभाजी राजे आता छत्रपती झाले आहेत आणि शिव प्रभूंच्या पवित्र सिंहासनावर बसले आहेत तेव्हा त्यांच्या हातून चूक होणे म्हणजे शिवरायांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्र धर्माचे नुकसान होवू शकते हे समर्थांनी ओळखले.समर्थांना रयतेच्या भल्यासाठी संभाजी राजांना उपदेश करण्याची नितांत गरज आहे असे वाटले आणि त्यांनी संभाजी राजांना एका पत्राच्या माध्यमातून उपदेश केला.ते हे पत्र ......
अखंड सावधान असावे ।दुश्चित कदापि नसावे
तजवीज करींत बसावे। एकांत स्थळी ।।
काही ऊग्र स्थिती सोडावी। कांही सौंम्यता धरावी
चिंता परायी लागावी। अंतर्यामी ।।
मागील अपराध क्षमा करावे ।कारभारी हाती धरावे
सुखी करून सोडावे। कामा कडे ।।
पानवठी तुंब निघेना। तरमग पाणी चालेना
तैसे जनांच्या मना। कळले पाहिजे ।।
जनाचा प्रवाह चालिला। म्हणजे कार्य भाग आटोपला
जन ठाई ठाई तुंबला। म्हणजे तें खोटे ।।
श्रेष्ठी जे जे मिळविले ।त्यासाठी भांडत बैसले
तरी मग जाणावे फावले ।गलिमांसी ।।
ऐसे साहस करू नये। दोघे भांडता तिस-यासी जाये
धीर धरुनी महत्कार्ये। समजून करावे ।।
शिवरायास आठवावे ।जीवित तृणवत मानावे
या करणे समस्ती ।बुद्धी शोधावी ।।
राजी राखता जग मग ।कार्य भागाची लगबग
ऐसे जाणूनिया सांग। समाधान राखावे ।।
रांजी राखता जग। मग कार्यभागाची लगबग ।
ऐसे जाणुनिया सांग ।समाधान रांखावे ॥
सकल लोंक एक करावे ।गनीम निपटून काढावे ।
येणे करिता कीर्ती द्यावे । दिगंतरी ॥
आधी गाजवावे तडाके। तरिमग भूमंडळ धाके।
ऐसे न करिता धक्के ।राज्यास होती ॥
समय प्रसंग ओळखावा। राग निपटून काढावा ।
आला तरी कळो न द्यावा। जगा माजी ॥
राज्यामध्ये सकल लोक। सलगी देऊनि करावे सेवक ।
लोकांच्या मनामध्ये धाक ।उपजोंची नये ॥
बहुत लोक मिळवावे ।एक विचारे भरावे ।
कष्ट करोनी घसरावे ।म्लेंछावरी ॥
आहे जितुके जतन करावे। पुढे आधीक मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे ।जिकडे तिकडे
लोकीं हिम्मत धरावी ।शर्तींची तरवार करावी ।
चढती वाढती पदवी ।पावाल येणे ॥
आधींच पडली धास्ती। मग कार्यभाग होय नास्ती।
इहलोकी परलोकी राहावे ।कीर्ती रूपे ॥
शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा साक्षेप।
शिवरायांचा आठवावा प्रताप। या भूमंडळी ॥
शिवरायांचे कैसे बोलणे ।शिवरायांचे कैसे चालणे।
शिवरायांचे सलगी देणे। कैसी असे ॥
सकल सुखाचा केला त्याग। करुनी साधिजे तो योग ।
राज्य साधनेची लगबग। कैसी केली ॥
त्याहुनी करावे विशेष ।तरीच म्हणावे पुरुष ।
या उपरी आता विशेष। काय लिहावे ?॥
संभाजी महाराज तक्तावर बसले होते .छत्रपती झाले होते .या छत्रपतींना थोड्या कडक शब्दात समर्थांनी राजधर्म पालन करताना कोणती काळजी घ्यावी याचा उपदेश केला होता.
समर्थांचा हा एका राजाला केलेला उपदेश त्यांची प्रत्तेक ओवी बारकाईने वाचली तर आज सुद्धा राज्यकर्त्यांना उपयोगी पडेल असाच आहे.समर्थांच्या त्यावेळचा राजकारणाचा संदर्भ आजही तितकाच उपयुक्त आहे.
--चिंतामणी कारखानीस
Copyright © 2025 | Marathisrushti