(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • समर्थ रामदास स्वामी ……७

    शिवप्रभूंच्या महानिर्वाणा नंतर महाराष्ट्रात एक अभूत पूर्व पेच प्रसंग निर्माण झाला. संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई त्यांच्या लहानपणीच निवर्तल्या होत्या.आई शिवाय वाढलेले मुल कधी कधी हट्टी असते.शिवरायांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे संभाजी महाराजांवर अत्यंत प्रेम होते.आईचे दुध नशिबी नसलेल्या संभाजी युवराजांवर हिरडस मावळातील एका नव्याने बाळंत झालेल्या तरुणीला राजमातेने "दुधाची आई "म्हणून गडावर पाचारण केले.या गुंजवणी गावाच्या सध्याच्या भाटघर धारणा जवळच्या राहणारा-या माउलीने संभाजी राजांची काळजी घेतली.संभाजी महाराजांची सावत्र आई सोयराबाई राणी साहेब यांना राजाराम नावाचा पुत्र झाला. जिजाबाई यांच्या मृत्यू नंतर संभाजी राजे तापट स्वभावाचे ,अत्यंत मानी पण आई नसलेले लेकरू म्हणून अतिशय दुर्लक्षित झाले .महाराजांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच राजमातेने देह ठेवला आणि संभाजी महाराज ख-या अर्थाने पोरके झाले.शिवरायांच्या अष्ट प्रधान मंडळाशी त्याचे पटेना.सोयराबाई यांना राजारामाला गादीवर बसवायचे होते.खरा हक्क थोरल्या मुलाचा म्हणजेच संभाजी राजे यांचाच होता. खूप राजकारण झाले. पण शेवटी संभाजी राजांना स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. या कामी जे आडवे आले त्यांना त्यांनी शास्त केले.शिक्षा केली.राजकारणावर पकड घट्ट राहावी म्हणून स्वतःचा प्रचंड दरारा निर्माण केला.

    सुक्याबरोबर ओलेही जळते तसे शिव प्रभूंसाठी जीवाचे रान केलेल्या काही मंडळींना यात शिक्षा झाली.

    समर्थांचे सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष होते.संभाजी राजे आता छत्रपती झाले आहेत आणि शिव प्रभूंच्या पवित्र सिंहासनावर बसले आहेत तेव्हा त्यांच्या हातून चूक होणे म्हणजे शिवरायांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्र धर्माचे नुकसान होवू शकते हे समर्थांनी ओळखले.समर्थांना रयतेच्या भल्यासाठी संभाजी राजांना उपदेश करण्याची नितांत गरज आहे असे वाटले आणि त्यांनी संभाजी राजांना एका पत्राच्या माध्यमातून उपदेश केला.ते हे पत्र ......

    अखंड सावधान असावे ।दुश्चित कदापि नसावे
    तजवीज करींत बसावे। एकांत स्थळी ।।
    काही ऊग्र स्थिती सोडावी। कांही सौंम्यता धरावी
    चिंता परायी लागावी। अंतर्यामी ।।
    मागील अपराध क्षमा करावे ।कारभारी हाती धरावे
    सुखी करून सोडावे। कामा कडे ।।
    पानवठी तुंब निघेना। तरमग पाणी चालेना
    तैसे जनांच्या मना। कळले पाहिजे ।।
    जनाचा प्रवाह चालिला। म्हणजे कार्य भाग आटोपला
    जन ठाई ठाई तुंबला। म्हणजे तें खोटे ।।
    श्रेष्ठी जे जे मिळविले ।त्यासाठी भांडत बैसले
    तरी मग जाणावे फावले ।गलिमांसी ।।
    ऐसे साहस करू नये। दोघे भांडता तिस-यासी जाये
    धीर धरुनी महत्कार्ये। समजून करावे ।।
    शिवरायास आठवावे ।जीवित तृणवत मानावे
    या करणे समस्ती ।बुद्धी शोधावी ।।
    राजी राखता जग मग ।कार्य भागाची लगबग
    ऐसे जाणूनिया सांग। समाधान राखावे ।।
    रांजी राखता जग। मग कार्यभागाची लगबग ।
    ऐसे जाणुनिया सांग ।समाधान रांखावे ॥
    सकल लोंक एक करावे ।गनीम निपटून काढावे ।
    येणे करिता कीर्ती द्यावे । दिगंतरी ॥
    आधी गाजवावे तडाके। तरिमग भूमंडळ धाके।
    ऐसे न करिता धक्के ।राज्यास होती ॥
    समय प्रसंग ओळखावा। राग निपटून काढावा ।
    आला तरी कळो न द्यावा। जगा माजी ॥
    राज्यामध्ये सकल लोक। सलगी देऊनि करावे सेवक ।
    लोकांच्या मनामध्ये धाक ।उपजोंची नये ॥
    बहुत लोक मिळवावे ।एक विचारे भरावे ।
    कष्ट करोनी घसरावे ।म्लेंछावरी ॥
    आहे जितुके जतन करावे। पुढे आधीक मेळवावे ।
    महाराष्ट्र राज्य करावे ।जिकडे तिकडे
    लोकीं हिम्मत धरावी ।शर्तींची तरवार करावी ।
    चढती वाढती पदवी ।पावाल येणे ॥
    आधींच पडली धास्ती। मग कार्यभाग होय नास्ती।
    इहलोकी परलोकी राहावे ।कीर्ती रूपे ॥
    शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा साक्षेप।
    शिवरायांचा आठवावा प्रताप। या भूमंडळी ॥
    शिवरायांचे कैसे बोलणे ।शिवरायांचे कैसे चालणे।
    शिवरायांचे सलगी देणे। कैसी असे ॥
    सकल सुखाचा केला त्याग। करुनी साधिजे तो योग ।
    राज्य साधनेची लगबग। कैसी केली ॥
    त्याहुनी करावे विशेष ।तरीच म्हणावे पुरुष ।
    या उपरी आता विशेष। काय लिहावे ?॥

    संभाजी महाराज तक्तावर बसले होते .छत्रपती झाले होते .या छत्रपतींना थोड्या कडक शब्दात समर्थांनी राजधर्म पालन करताना कोणती काळजी घ्यावी याचा उपदेश केला होता.

    समर्थांचा हा एका राजाला केलेला उपदेश त्यांची प्रत्तेक ओवी बारकाईने वाचली तर आज सुद्धा राज्यकर्त्यांना उपयोगी पडेल असाच आहे.समर्थांच्या त्यावेळचा राजकारणाचा संदर्भ आजही तितकाच उपयुक्त आहे.

    --चिंतामणी कारखानीस

  • समर्थ रामदास स्वामी …….८

    समर्थांनी दासबोधात सत्व गुण , रजो गुण , आणि तमोगुणांचे वर्णन केले आहे.हे तीनही गुण असलेली माणसे आपल्या आजूबाजूला फिरत असतात.सर्व प्रथम आपण तमोगुण पाहू.

    समर्थांचा दासबोध वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते कि त्यांनी केलेले भाष्य हे त्रिकाळ बाधित सत्य आहे हे नंतरच्या काळात सिद्ध झालेले आहे. समर्थ ज्या काळात वावरत होते त्या काळात शहरे विकसित झाली नव्हती.आज जो लोकसंखेचा भस्मासुर उभा राहिलेला आहे तो नव्हता. सर्व सामान्य लोकांच्या गरज त्याकाळात खूप कमी होत्या .तरी सुद्धा स्त्री भ्रूण हत्या. अप्पल पोटेपणा, श्रीमंतीचा हव्यास ,दुस-यांना त्रास देण्याची मानसिकता.आपले तेच खरे करण्याची वृत्ती ,.स्वतःच्या माता- पित्याला सुद्धा मारण्याची मानसिकता, स्वार्था साठी दुस-याचा प्राण घेणे , सतत भांडणे लावून आपण त्याची मजा पाहत राहणे,किडामुंगी श्वापद याची हत्या करण्याची आवड ,सदैव मस्तवाल आणि उद्धट वागणे, फळझाडे ,वृक्ष यांची कत्तल करणे ,ज्यास निष्ठुर पणाच आवडतो,भक्ती मार्ग आणि ईश्वारोपासना न करणे इत्यादी अनेक कु कर्माची यादी समर्थांनी या दशक २ समास ६ मध्ये दिलेली आहे.तमोगुण सर्वथा टाळावा आणि तो अत्यंत प्रयत्न पूर्वक टाळावा हे समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. तो हा समास......वाचा तमोगुण लक्षण ....

    समास सहावा : तमोगुणलक्षण* || २.६ ||

    ॥श्रीराम॥
    आतां ऐका तमोगुण | तोहि सांगिजेल ||१||
    संसारीं दुःखसंमंध | प्राप्त होतां उठे खेद |
    कां अद्भुत आला क्रोध | तो तमोगुण ||२||
    शरीरीं क्रोध भरतां | नोळखे माता पिता |
    बंधु बहिण कांता | ताडी तो तमोगुण ||३||
    दुसऱ्याचा प्राण घ्यावा | आपला आपण स्वयें
    द्यावा | विसरवी जीवभावा | तो तमोगुण ||४||
    भरलें क्रोधाचें काविरें | पिश्याच्यापरी वावरे |
    नाना उपायें नावरे | तो तमोगुण ||५||
    आपला आपण शस्त्रपात | पराचा करी घात |
    ऐसा समय वर्तत | तो तमोगुण ||६||
    डोळां युध्यचि पाहावें | रण पडिलें तेथें
    जावें | ऐसें घेतलें जीवें | तो तमोगुण ||७||
    अखंड भ्रांती पडे | केला निश्चय विघडे |
    अत्यंत निद्रा आवडे | तो तमोगुण ||८||
    क्षुधा जयाची वाड | नेणे कडु अथवा गोड |
    अत्यंत जो कां मूढ | तो तमोगुण ||९||
    प्रीतिपात्र गेलें मरणें | तयालागीं जीव देणें |
    स्वयें आत्महत्या करणें | तो तमोगुण ||१०||
    किडा मुंगी आणी स्वापद | यांचा करूं आवडे
    वध | अत्यंत जो कृपामंद | तो तमोगुण ||११||
    स्त्रीहत्या बाळहत्या | द्रव्यालागीं ब्रह्महत्या |
    करूं आवडे गोहत्या | तो तमोगुण ||१२||
    विसाळाचेनि नेटें | वीष घ्यावेंसें वाटे |
    परवध मनीं उठे | तो तमोगुण ||१३||
    अंतरीं धरूनि कपट | पराचें करी तळपट |
    सदा मस्त सदा उद्धट | तो तमोगुण ||१४||
    कळह व्हावा ऐसें वाटे | झोंबी घ्यावी ऐसें
    उठे | अन्तरी द्वेष प्रगटे | तो तमोगुण ||१५||
    युध्य देखावें ऐकावें | स्वयें युध्यचि करावें |
    मारावें कीं मरावें | तो तमोगुण ||१६||
    मत्सरें भक्ति मोडावी | देवाळयें विघडावीं |
    फळतीं झाडें तोडावीं | तो तमोगुण ||१७||
    सत्कर्में ते नावडती | नाना दोष ते आवडती |
    पापभय नाहीं चित्ती | तो तमोगुण ||१८||
    ब्रह्मवृत्तीचा उछेद | जीवमात्रास देणें खेद |
    करूं आवडे अप्रमाद | तो तमोगुण ||१९||
    आग्नप्रळये शस्त्रप्रळये | भूतप्रळये वीषप्रळये |
    मत्सरें करीं जीवक्षये | तो तमोगुण ||२०||
    परपीडेचा संतोष | निष्ठुरपणाचा हव्यास |
    संसाराचा नये त्रास | तो तमोगुण ||२१||
    भांडण लाऊन द्यावें | स्वयें कौतुक पाहावें |
    कुबुद्धि घेतली जीवें | तो तमोगुण ||२२||
    प्राप्त जालियां संपत्ती | जीवांस करी यातायाती |
    कळवळा नये चित्तीं | तो तमोगुण ||२३||
    नावडे भक्ति नावडे भाव | नावडे तीर्थ नावडे देव |
    वेदशास्त्र नलगे सर्व | तो तमोगुण ||२४||
    स्नानसंध्या नेम नसे | स्वधर्मीं भ्रष्टला दिसे |
    अकर्तव्य करीतसे | तो तमोगुण ||२५||
    जेष्ठ बंधु बाप माये | त्यांचीं वचनें न साहे |
    सीघ्रकोपी निघोन जाये | तो तमोगुण ||२६||
    उगेंचि खावें उगेंचि असावें | स्तब्ध होऊन बैसावें |
    कांहींच स्मरेना स्वभावें | तो तमोगुण ||२७||
    चेटकविद्येचा अभ्यास | शस्त्रविद्येचा हव्यास |
    मल्लविद्या व्हावी ज्यास | तो तमोगुण ||२८||
    केले गळाचे नवस | राडिबेडीचे सायास |
    काष्ठयंत्र छेदी जिव्हेस | तो तमोगुण ||२९||
    मस्तकीं भदें जाळावें | पोतें आंग हुरपळावें |
    स्वयें शस्त्र टोचून घ्यावें | तो तमोगुण ||३०||
    देवास सिर वाहावें | कां तें आंग समर्पावें |
    पडणीवरून घालून घ्यावे | तो तमोगुण ||३१||
    निग्रह करून धरणें | कां तें टांगून घेणें |
    देवद्वारीं जीव देणें | तो तमोगुण ||३२||
    निराहार उपोषण | पंचाग्नी धूम्रपान |
    आपणास घ्यावें पुरून | तो तमोगुण ||३३||
    सकाम जें का अनुष्ठान | कां तें वायोनिरोधन |
    अथवा राहावें पडोन | तो तमोगुण ||३४||
    नखें केश वाढवावे | हस्तचि वर्ते करावे |
    अथवा वाक्‍शून्य व्हावें | तो तमोगुण ||३५||
    नाना निग्रहें पिडावें | देहदुःखें चर्फडावें |
    क्रोधें देवास फोडावें | तो तमोगुण ||३६||
    देवाची जो निंदा करी | तो आशाबद्धि अघोरी |
    जो संतसंग न धरी | तो तमोगुण ||३७||
    ऐसा हा तमोगुण | सांगतां तो असाधारण |
    परी त्यागार्थ निरूपण | कांहीं येक ||३८||
    ऐसें वर्ते तो तमोगुण | परी हा पतनास
    कारण | मोक्षप्राप्तीचें लक्षण | नव्हे येणें ||३९||
    केल्या कर्माचें फळ | प्राप्त होईल सकळ |
    जन्म दुःखाचें मूळ | तुटेना कीं ||४०||
    व्हावया जन्माचें खंडण | पाहिजे तो सत्वगुण |
    तेंचि असे निरुपण | पुढिले समासीं ||४१||
    इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
    *तमोगुणलक्षणनाम समास सहावा || २.६ ||

    -- चिंतामणी कारखानीस

  • समर्थ रामदास स्वामी ……९

    समाजात रज , तम , आणि सत्व या तिन्ही गुणांची माणसे असतात.या पैकी रजोगुणी माणसांची संख्या प्रचंड आहे.

    आपण तमोगुण कसा असतो हे दासबोधातून जाणून घेतले.तमोगुण हा अत्यंत हीन दर्जाचा गुण आहे.त्या पेक्षा बरा आहे तो रजो गुण .या गुणाची माणसे दुस-याला ठार मारण्या पर्यंत जात नाहीत परंतु अशा लोकांना समर्थ अप्पलपोटे असे म्हणतात. माझे घर , माझा संसार , माझे कुटुंब ,माता पिता आणि मुला बाळांची जो फक्त जो सदैव काळजी करतो तो रजो गुणी .चांगले जेवावे,चांगले नेसावे ,चांगले राहावे याच बरोबर जो दुस-याच्या चांगल्या गोष्टींची सतत अभिलाषा बाळगतो तो रजो गुणी.जो तीर्थ , व्रत , आणि पाहुणे यांचे करता काहीही खर्च करीत नाही,ज्याचे मन सदैव पैसा अडका, धान्य,संपत्ती यातच अडकलेले असते आणि जो अत्यंत कंजूस असतो तो रजो गुणी.

    मीच सुंदर, मीच बलाढ्य ,मीच चतुर, मीच थोर अशी ज्याची समजूत असते तो रजोगुणी.कपटी,अंतर्यामी मत्सरी, सतत कामवासना ज्याच्या मनात असते आणि दुस-याला जो हीन लेखतो तो रजोगुणी. .जो सतत संसाराच्या चिंतेत असतो आणि माझे कसे होईल याची सतत काळजी करतो तो रजो गुणी.जो पूर्वी जे सुख भोगले त्याची आठवण करतो आणि ते सुख आता भोगता येत नाहीत म्हणून दुखः करतो तो रजो गुणी.

    ज्याला विनोद, शृंगार,नाच गाणे ,गायन,याची आवड असते आणि गाणे आणि त्यासाठी हावभाव करणे इत्यादी मध्ये जो रंगून जातो त्याच्या अंगी रजो गुण पुरेपूर भरला आहे असे समर्थ म्हणतात.जो विनाकारण दुस-याची टिंगल टवाळी करतो,विनाकारण सतत हास्य विनोद करतो तो रजो गुणी.जो कलावंत असतो , नाटक पाहण्याचा शौकीन असतो.निरनिराळ्या खेळात पैसे खर्च करतो तो रजो गुणी असे समर्थ म्हणतात.

    समर्थ म्हणतात रजो गुणांमुळे वासना प्रपंचात गुंतून राहते.समर्थ रजोगुणाला पूर्ण त्याज्य ठरवत नाहीत पण रजो गुणात पण "शुद्ध रजोगुण" आणि "शबल रजोगुण" हे दोन प्रकार आहेत.

    समर्थ म्हणतात हा शबल रजोगुण माणसाला संसारात अडकवतो तर शुद्ध रजो गुण माणसाला भक्ती मार्गात घेवून जातात. संगीत , नाट्य , ,कीर्तन हे जर लोकांसाठी त्यांच्या मनोरंजना साठी जो उपयोगात आणतो आणि ज्यामुळे समाजात आनंद निर्माण होतो तो अतिशय चांगला "शुद्ध रजो गुण" आहे असे समर्थ म्हणतात ---

    रज तम आणी सत्व | येणेंचि चाले जीवित्व |
    रजोगुणाचें कर्तुत्व | दाखऊं आता ||६||
    रजोगुण येतां शरीरीं | वर्तणुक कैसी करी |
    सावध होउनी चतुरीं | परिसावें ||७||
    माझें घर माझा संसार | देव कैंचा आणिला
    थोर | ऐसा करी जो निर्धार | तो रजोगुण ||८||
    माता पिता आणि कांता | पुत्र सुना आणी दुहिता |
    इतुकियांची वाहे चिंता | तो रजोगुण ||९||
    बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
    दुसर्‍याचें अभिळाषावें | तो रजोगुण ||१०||
    कैचा धर्म कैचें दान | कैचा जप कैचें ध्यान |
    विचारीना पापपुण्य | तो रजोगुण ||११||
    नेणे तीर्थ नेणे व्रत | नेणे अतीत अभ्यागत |
    अनाचारीं मनोगत | तो रजोगुण ||१२||
    धनधान्यांचे संचित | मन होये द्रव्यासक्त |
    अत्यंत कृपण जीवित्व | तो रजोगुण ||१३||
    मी तरुण मी सुंदर | मी बलाढ्य मी चतुर |
    मी सकळांमध्ये थोर | म्हणे तो रजोगुण ||१४||
    माझा देश माझा गांव | माझा वाडा माझा ठाव |
    ऐसी मनीं धरी हांव | तो रजोगुण ||१५||
    दुसऱ्याचें सर्व जावें | माझेचि बरें असावें |
    ऐसें आठवे स्वभावें | तो रजोगुण ||१६||
    कपट आणी मत्सर | उठे देहीं तिरस्कार |
    अथवा कामाचा विकार | तो रजोगुण ||१७||
    बाळकावरी ममता | प्रीतीनें आवडे कांता |
    लोभ वाटे समस्तां | तो रजोगुण ||१८||
    जिवलगांची खंती | जेणें काळें वाटे चित्तीं |
    तेणें काळें सीघ्रगती | रजोगुण आला ||१९||
    संसाराचे बहुत कष्ट | कैसा होईल सेवट |
    मनास आठवे संकट | तो रजोगुण ||२०||
    कां मागें जें जें भोगिलें | तें तें मनीं आठवलें |
    दुःख अत्यंत वाटलें | तो रजोगुण ||२१||
    वैभव देखोन दृष्टी | आवडी उपजली पोटीं |
    आशागुणें हिंपुटी | करी तो रजोगुण ||२२||
    जें जें दृष्टी पडिलें | तें तें मनें मागितलें |
    लभ्य नस्तां दुःख जालें | तो रजोगुण ||२३||
    विनोदार्थीं भरे मन | शृंघारिक करी गायेन |
    राग रंग तान मान | तो रजोगुण ||२४||
    टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा |
    हास्य विनोद करी सर्वदा | तो रजोगुण ||२५||
    आळस उठे प्रबळ | कर्मणुकेचा नाना खेळ |
    कां उपभोगाचे गोंधळ | तो रजोगुण ||२६||
    कळावंत बहुरूपी | नटावलोकी साक्षेपी |
    नाना खेळीं दान अर्पी | तो रजोगुण ||२७||
    उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती | ग्रामज्य आठवे
    चित्तीं | आवडे नीचाची संगती | तो रजोगुण ||२८||
    तश्करविद्या जीवीं उठे | परन्यून बोलावें वाटे |
    नित्यनेमास मन विटे | तो रजोगुण ||२९||
    देवकारणीं लाजाळु | उदरालागीं कष्टाळु |
    प्रपंची जो स्नेहाळु | तो रजोगुण ||३०||
    गोडग्रासीं आळकेपण | अत्यादरें पिंडपोषण |
    रजोगुणें उपोषण | केलें नवचे ||३१||
    शृंगारिक तें आवडे | भक्ती वैराग्य नावडे |
    कळालाघवीं पवाडे | तो रजोगुण ||३२||
    नेणोनियां परमात्मा | सकळ पदार्थी प्रेमा |
    बळात्कारें घाली जन्मा | तो रजोगुण ||३३||
    असो ऐसा रजोगुण | लोभें दावी जन्ममरण |
    प्रपंची तो सबळ जाण | दारुण दुःख भोगवी ||३४||
    आतां रजोगुण हा सुटेना | संसारिक हें तुटेना |
    प्रपंचीं गुंतली वासना | यास उपाय कोण ||३५||
    उपाये येक भगवद्भक्ती | जरी ठाकेना विरक्ती |
    तरी येथानुशक्ती | भजन करावें ||३६||
    काया वाचा आणि मनें | पत्रें पुष्पें फळें जीवनें |
    ईश्वरीं अर्पूनियां मनें | सार्थक करावें ||३७||
    येथानुशक्ती दानपुण्य | परी भगवंतीं अनन्य |
    सुखदुःखें परी चिंतन | देवाचेंचि करावें ||३८||
    आदिअंती येक देव | मध्येंचि लाविली माव |
    म्हणौनियां पूर्ण भाव | भगवंतीं असावा ||३९||
    ऐसा सबळ रजोगुण | संक्षेपें केलें कथन |
    आतां शुद्ध तो तूं जाण | परमार्थिक ||४०||
    त्याचे वोळखीचें चिन्ह | सत्वगुणीं असे जाण |
    तो रजोगुण परिपूर्ण | भजनमूळ ||४१||
    ऐसा रजोगुण बोलिला | श्रोतीं मनें अनुमानिला |
    आतां पुढें परिसिला | पाहिजे तमोगुण ||४२||
    इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
    रजोगुणलक्षणनाम समास पांचवा || २.५ ||

    -- चिंतामणी कारखानीस

  • समर्थ रामदास स्वामी – भाग १०

    सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो सत्व गुणी असे समर्थ म्हणतात .समर्थांनी या समासात सत्व गुणी माणसांचे वर्णन केले आहे.

    भगवान श्रीकृष्ण जरी अर्जुनास युद्धाला तयार हो म्हणून जरी युद्धभूमी वर सांगत असले तरी त्यांना कुणी तमो गुणी म्हणणार नाही याचे कारण जो सन्मार्ग दाखवतो,अज्ञानी लोकांना ज्ञान देतो तो सत्व गुणी असतो.ज्या ज्ञान दानात स्वार्थ नसतो तर समाजाचेच हित असते त्या ज्ञान दानाला सत्व गुणी म्हणावे लागेल.

    देशाच्या रक्षणासाठी रणात युद्ध करणारा योद्धा सुद्धा सत्व गुणीच म्हणावा लागेल. स्वतःचे दुखः पचवून जो निदकांवर सुद्धा उपकार करतो, जो इंद्रिय दमन करतो,ईश्वराच्या अस्तित्वावर ज्याचा विश्वास आहे,जो संत आणि विद्वान यांना शरण जातो,ज्यास लोकांना शहाणे करण्याची सवय असते.जो सतत ज्ञानोपासना करण्यासाठी प्रयत्न करतो,दुस-याला दुःख झालेले ज्यास सहन होत नाही आणि त्याचे दुखः निवारण करण्यासाठी जो सतत प्रयत्नशील असतो तो सत्व गुणी.

    दानधर्म करावा,रुग्णांची सेवा करावी ,विहिरी खोदून लोकांच्या पाण्याची सोय करावी.समाजाच्या कल्याणासाठी उत्सव साजरे करावे.मंदिरे बांधावी,संतांची सेवा करावी अशी सत्व गुणी माणसास आवड असते.

    लांड्या लबाड्या ज्यास आवडत नाहीत , समाजाची फसवणूक होणार नाही यासाठी जो सगज असतो तो सत्व गुणी असतो.म्हणून प्रामाणिक व्यापारी,प्रामाणिक पोलिस,सैनिक,आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना सत्व गुणीच म्हणावे लागेल.मी पहिल्या लेखात सांगितल्या प्रमाणे समर्थ परामानस शास्त्रात पारंगत होते.समाज कसा असावा याचे ज्ञान त्याच मूळे समर्थ देऊ शकले.

    दासबोधाची व्याप्ती प्रचंड आहे.त्यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही परंतु मला समर्थ मनापासून आवडतात.जगात वाचण्या सारखे पुष्कळ आहे.परंतु जे ज्ञान सहज उपलब्ध आहे तो दासबोध,ज्ञानेश्वरी , गाथा,आणि एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत अथवा आनंद लहरी सोडून आपण इतर सगळे वाचतो पण ज्यात खरे " विज्ञान " आहे ते ज्ञान मात्र आपण अभ्यासत नाही.संतांचे ग्रंथ एकदा तरी मनापासून वाचावे खूप फरक पडतो.

    ॥श्रीराम॥

    मागां बोलिला तमोगुण | जो दुःखदायक दारुण |
    आतां ऐका सत्वगुण | परम दुल्लभ ||१||
    जो भजनाचा आधार | जो योगियांची थार |
    जो निरसी संसार | दुःखमूळ जो ||२||
    जेणें होये उत्तम गती | मार्ग फुटे भगवंतीं |
    जेणें पाविजे मुक्ती | सायोज्यता ते ||३||
    जो भक्तांचा कोंवसा | जो भवार्णवींचा भर्वसा |
    मोक्षलक्ष्मीची दशा | तो सत्वगुण ||४||
    जो परमार्थाचें मंडण | जो महंतांचें भूषण |
    रजतमाचें निर्शन | जयाचेनि ||५||
    जो परम सुखकारी | जो आनंदाची लहरी |
    देऊनियां निवारी- | जन्ममृत्य ||६||
    जो अज्ञानाचा सेवट | जो पुण्याचें मूळपीठ |
    जयाचेनि सांपडे वाट | परलोकाची ||७||
    ऐसा हा सत्वगुण | देहीं उमटतां आपण |
    तये क्रियेचें लक्षण | ऐसें असे ||८||
    ईश्वरीं प्रेमा अधिक | प्रपंच संपादणे लोकिक |
    सदा सन्निध विवेक | तो सत्वगुण ||९||
    संसारदुःख विसरवी | भक्तिमार्ग विमळ दावी |
    भजनक्रिया उपजवी | तो सत्वगुण ||१०||
    परमार्थाची आवडी | उठे भावार्थाची गोडी |
    परोपकारीं तांतडी | तो सत्वगुण ||११||
    स्नानसंध्या पुण्यसीळ | अभ्यांतरींचा निर्मळ |
    शरीर वस्त्रें सोज्वळ | तो सत्वगुण ||१२||
    येजन आणी याजन | आधेन आणी अध्यापन |
    स्वयें करी दानपुण्य | तो सत्वगुण ||१३||
    निरूपणाची आवडी | जया हरिकथेची गोडी |
    क्रिया पालटे रोकडी | तो सत्वगुण ||१४||
    अश्वदानें गजदानें | गोदानें भूमिदानें |
    नाना रत्नांचीं दानें | करी तो सत्वगुण ||१५||
    धनदान वस्त्रदान | अन्नदान उदकदान |
    करी ब्राह्मणसंतर्पण | तो सत्वगुण ||१६||
    कार्तिकस्नानें माघस्नानें | व्रतें उद्यापनें दानें |
    निःकाम तीर्थें उपोषणे | तो सत्वगुण ||१७||
    सहस्रभोजनें लक्षभोजनें | विविध प्रकारींचीं दानें |
    निष्काम करी सत्वगुण | कामना रजोगुण ||१८||
    तीर्थीं अर्पी जो अग्रारें | बांधे वापी सरोवरें |
    बांधे देवाळयें सिखरें | तो सत्वगुण ||१९||
    देवद्वारीं पडशाळा | पाईरीया दीपमाळा |
    वृंदावनें पार पिंपळा | बांधे तो सत्वगुण ||२०||
    लावीं वनें उपवनें | पुष्प वाटिका जीवनें |
    निववी तापस्यांचीं मनें | तो सत्वगुण ||२१||
    संध्यामठ आणी भूयेरीं | पाईरीया नदीतीरीं |
    भांडारगृहें देवद्वारीं | बांधें, तो सत्वगुण ||२२||
    नाना देवांचीं जे स्थानें | तेथें नंदादीप घालणें |
    वाहे आळंकार भूषणें | तो सत्वगुण ||२३||
    जेंगट मृदांग टाळ | दमामे नगारे काहळ |
    नाना वाद्यांचे कल्लोळ | सुस्वरादिक ||२४||
    नाना सामग्री सुंदर | देवाळईं घाली नर |
    हरिभजनीं जो तत्पर | तो सत्वगुण ||२५||
    छेत्रें आणी सुखासनें | दिंड्या पताका निशाणें |
    वाहे चामरें सूर्यापानें | तो सत्वगुण ||२६||
    वृंदावनें तुळसीवने | रंगमाळा समार्जनें |
    ऐसी प्रीति घेतली मनें | तो सत्वगुण ||२७||
    सुंदरें नाना उपकर्णें | मंडप चांदवे आसनें |
    देवाळईं समर्पणें | तो सत्वगुण ||२८||
    देवाकारणें खाद्य | नाना प्रकारीं नैवेद्य |
    अपूर्व फळें अर्पी सद्य | तो सत्वगुण ||२९||
    ऐसी भक्तीची आवडी | नीच दास्यत्वाची गोडी |
    स्वयें देवद्वार झाडी | तो सत्वगुण ||३०||
    तिथी पर्व मोहोत्साव | तेथें ज्याचा अंतर्भाव |
    कायावाचामनें सर्व | अर्पी, तो सत्वगुण ||३१||
    हरिकथेसी तत्पर | गंधें माळा आणी धुशर |
    घेऊन उभीं निरंतर | तो सत्वगुण ||३२||
    नर अथवा नारी | येथानुशक्ति सामग्री |
    घेऊन उभीं देवद्वारीं | तो सत्वगुण ||३३||
    महत्कृत्य सांडून मागें | देवास ये लागवेगें |
    भक्ति निकट अंतरंगें | तो सत्वगुण ||३४||
    थोरपण सांडून दुरी | नीच कृत्य आंगीकारी |
    तिष्ठत उभी देवद्वारीं | तो सत्वगुण ||३५||
    देवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन |
    नित्य नेम जप ध्यान | करी, तो सत्वगुण ||३६||
    शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले |
    योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||
    सांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन |
    श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||
    अंतरीं देवाचें ध्यान | तेणें निडारले नयन |
    पडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||
    हरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती |
    आदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||
    मुखीं नाम हातीं टाळी | नाचत बोले ब्रीदावळी |
    घेऊन लावी पायधुळी | तो सत्वगुण ||४१||
    देहाभिमान गळे | विषईं वैराग्य प्रबळे |
    मिथ्या माया ऐसें कळे | तो सत्वगुण ||४२||
    कांहीं करावा उपाये | संसारीं गुंतोन काये |
    उकलवी ऐसें हृदये | तो सत्वगुण ||४३||
    संसारासी त्रासे मन | कांहीं करावें भजन |
    ऐसें मनीं उठे ज्ञान | तो सत्वगुण ||४४||
    असतां आपुले आश्रमीं | अत्यादरें नित्यनेमी |
    सदा प्रीती लागे रामीं | तो सत्वगुण ||४५||
    सकळांचा आला वीट | परमार्थीं जो निकट |
    आघातीं उपजे धारिष्ट | तो सत्वगुण ||४६||
    सर्वकाळ उदासीन | नाना भोगीं विटे मन |
    आठवे भगवद्भजन | तो सत्वगुण ||४७||
    पदार्थीं न बैसे चित्त | मनीं आठवे भगवंत |
    ऐसा दृढ भावार्थ | तो सत्वगुण ||४८||
    लोक बोलती विकारी | तरी आदिक प्रेमा धरी |
    निश्चय बाणे अंतरीं | तो सत्वगुण ||४९||
    अंतरीं स्फूर्ती स्फुरे | सस्वरूपीं तर्क भरे |
    नष्ट संदेह निवारे | तो सत्वगुण ||५०||
    शरीर लावावें कारणीं | साक्षेप उठे अंतःकर्णी |
    सत्वगुणाची करणी | ऐसी असे ||५१||
    शांति क्ष्मा आणि दया | निश्चय उपजे जया |
    सत्वगुण जाणावा तया | अंतरीं आला ||५२||
    आले आतीत अभ्यागत | जाऊं नेदी जो भुकिस्त |
    येथानशक्ती दान देत | तो सत्वगुण ||५३||
    तडितापडी दैन्यवाणें | आलें आश्रमाचेनि गुणें |
    तयालागीं स्थळ देणें | तो सत्वगुण ||५४||
    आश्रमीं अन्नाची आपदा | परी विमुख नव्हे कदा |
    शक्तिनुसार दे सर्वदा | तो सत्वगुण ||५५||
    जेणें जिंकिली रसना | तृप्त जयाची वासना |
    जयास नाहीं कामना | तो सत्वगुण ||५६||
    होणार तैसें होत जात | प्रपंचीं जाला आघात |
    डळमळिना ज्याचें चित्त | तो सत्वगुण ||५७||
    येका भगवंताकारणें | सर्व सुख सोडिलें जेणें |
    केलें देहाचें सांडणें | तो सत्वगुण ||५८||
    विषईं धांवे वासना | परी तो कदा डळमळिना |
    ज्याचें धारिष्ट चळेना | तो सत्वगुण ||५९||
    देह आपदेनें पीडला | क्षुधे तृषेनें वोसावला |
    तरी निश्चयो राहिला | तो सत्वगुण ||६०||
    श्रवण आणी मनन | निजध्यासें समाधान |
    शुद्ध जालें आत्मज्ञान | तो सत्वगुण ||६१||
    जयास अहंकार नसे | नैराशता विलसे |
    जयापासीं कृपा वसे | तो सत्वगुण ||६२||
    सकळांसीं नम्र बोले | मर्यादा धरून चाले |
    सर्व जन तोषविले | तो सत्वगुण ||६३||
    सकळ जनासीं आर्जव | नाहीं विरोधास ठाव |
    परोपकारीं वेची जीव | तो सत्वगुण ||६४||
    आपकार्याहून जीवीं | परकार्यसिद्धी करावी |
    मरोन कीर्ती उरवावी | तो सत्वगुण ||६५||
    पराव्याचे दोषगुण | दृष्टीस देखे आपण |
    समुद्रा ऐसी साठवण | तो सत्वगुण ||६६||
    नीच उत्तर साहाणें | प्रत्योत्तर न देणें |
    आला क्रोध सावरणें | तो सत्वगुण ||६७||
    अन्यायेंवीण गांजिती | नानापरी पीडा करिती |
    तितुकेंहि साठवी चित्तीं | तो सत्वगुण ||६८||
    शरीरें घीस साहाणें | दुर्जनासीं मिळोन जाणें |
    निंदकास उपकार करणें | हा सत्वगुण ||६९||
    मन भलतीकडे धावें | तें विवेकें आवरावें |
    इंद्रियें दमन करावें | तो सत्वगुण ||७०||
    सत्क्रिया आचरावी | असत्क्रिया त्यागावी |
    वाट भक्तीची धरावी | तो सत्वगुण ||७१||
    जया आवडे प्रातःस्नान | आवडे पुराणश्रवण |
    नाना मंत्रीं देवतार्चन | करी, तो सत्वगुण ||७२||
    पर्वकाळीं अतिसादर | वसंतपूजेस तत्पर |
    जयंत्याची प्रीती थोर | तो सत्वगुण ||७३||
    विदेसिं मेलें मरणें | तयास संस्कार देणें |
    अथवा सादर होणें | तो सत्वगुण ||७४||
    कोणी येकास मारी | तयास जाऊन वारी |
    जीव बंधनमुक्त करी | तो सत्वगुण ||७५||
    लिंगें लाखोलीं अभिशेष | नामस्मरणीं विस्वास |
    देवदर्शनीं अवकाश | तो सत्वगुण ||७६||
    संत देखोनि धावें | परमसुखें हेलावे |
    नमस्कारी सर्वभावें | तो सत्वगुण ||७७||
    संतकृपा होय जयास | तेणें उद्धरिला वंश |
    तो ईश्वराचा अंश | सत्वगुणें ||७८||
    सन्मार्ग दाखवी जना | जो लावी हरिभजना |
    ज्ञान सिकवी अज्ञाना | तो सत्वगुण ||७९||
    आवडे पुण्य संस्कार | प्रदक्षणा नमस्कार |
    जया राहे पाठांतर | तो सत्वगुण ||८०||
    भक्तीचा हव्यास भारी | ग्रंथसामग्री जो करी |
    धातुमूर्ति नानापरी | पूजी, तो सत्वगुण ||८१||
    झळफळित उपकर्णें | माळा गवाळी आसनें |
    पवित्रे सोज्वळें वसनें | तो सत्वगुण ||८२||
    परपीडेचें वाहे दुःख | परसंतोषाचें सुख |
    वैराग्य देखोन हरिख | मानी,तो सत्वगुण ||८३||
    परभूषणें भूषण | परदूषणें दूषण |
    परदुःखें सिणे जाण | तो सत्वगुण ||८४||
    आतां असों हें बहुत | देवीं धर्मीं ज्यांचें चित्त |
    भजे कामनारहित | तो सत्वगुण ||८५||
    ऐसा हा सत्वगुण सात्विक | संसारसागरीं तारक |
    येणें उपजे विवेक | ज्ञानमार्गाचा ||८६||
    सत्वगुणें भगवद्भक्ती | सत्वगुणें ज्ञानप्राप्ती |
    सत्वगुणें सायोज्यमुक्ती | पाविजेते ||८७||
    ऐसी सत्वगुणाची स्थिती | स्वल्प बोलिलें येथामती |
    सावध होऊन श्रोतीं | पुढें अवधान द्यावें ||८८||
    इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
    *सत्वगुणलक्षणनाम समास सातवा || २.७ ||
    ॥श्रीराम॥
    लेखनसीमा ...... संपूर्ण

    --चिंतामणी कारखानीस

  • मंदिरप्रवेश-लढा आणि स्त्री-पुरुष-समानता

    एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें.

    आठलेकरांच्या कांहीं वाक्यांना (statements) दुजोरा द्यायलाच हवा. उदा. ‘स्त्रीची दुय्यमता या धर्मशास्त्रांनी वारंवार अधोरेखित केली’ ; ‘लिंगभेदावर आधारित असलेल्या व्यवस्थेला निग्रहानें नकार दिलाच पाहिजे’. अशा स्टेटमेंट्स बद्दल त्यांच्याशी मतभेद असण्याचें कारणच नाहीं. प्रश्न आहे तो, त्यांनी मंदिरप्रवेशाच्या बाबीचा जो अर्थ लावला आहे, त्याबद्दल. मात्र, कांहीं मतभेद असले तरी, मी त्यांना ‘पुरुषधार्जिणी’ असें अभिधान देणार नाहीं.

    पुढे जाण्यापूर्वी मी हें स्पष्ट करूं इच्छितो की, मी कर्मकांड मानीत नाहीं, तसेच मी निधर्मी व बेसिकली निरीश्वरवादी आहे, आणि मी स्त्री-पुरुष समानता मानतो. हें स्पष्ट करायचें कारण म्हणजे, मला देव-धर्म-पुजारी वगैरेंची बाजू मांडायची नाहीं , किंवा पुरोगामी-प्रतिगामी या वादातही शिरायचें नाहीं. थोडक्यात म्हणजे, ‘आय् हॅव नो पर्सनल ऍक्स टु ग्राइंड’ . तसेच, हेंही स्पष्ट करायला हवें की, आठलेकर यांनी उल्लेखलेल्या तृप्ती देसाई व केवडकर यांच्याविषयी, त्यांच्या विविध विषयांवरील मतांविषयी, आणि त्यांच्या आपसातील-संबंधांविषयी मला कांहींही माहिती नाहीं. त्याचप्रमाणें, इलेक्ट्रॉनिक मीडियांसंबंधी कांहींही मतप्रदर्शन मला करायचें नाहीं. अशा गोष्टींमध्ये शिरल्यास, मूळ मुद्दा बाजूलाच पडेल. त्यामुळे त्या सगळ्यात न शिरतां, मी सरळ, आणि केवळ, मूलभूत मुद्यालाच स्पर्श करत आहे.

    आपण हें ध्यानात ठेवायला हवें की, शनि-शिंगणायुर हें फक्त, एक ‘पूजास्थळ’ आहे ; पण तिथें आहे तशीच स्थिती त्र्यंबकेश्वर, साबरीमाला , हाजी अली वगैरे अनेक ठिकाणीही होती व आहे. अहो, हिंदूधर्मात, एखादी पूजा जर जोडप्यानें करायची असेल, व पत्नी तिथें नसेल, तर पती तिच्या स्थानीं ‘सुपारी’ किंवा अन्य कांहींतरी ठेवून पूजा करूं शकतो (जसें, उत्तररामचरित्रात, रामानें , सीतेची मूर्ती ठेवून केलेलें आहे) . पण हा,अधिकार स्त्रीला नाहीं. मुस्लिमांमध्ये, पुरुष तीनदा ‘तलाक’ असें म्हणून ( हल्ली तर ई-मेल पाठवूनही) पत्नीला डायव्होर्स देऊं शकतो, पण अर्थातच, हा हक्क पत्नीला उपलब्ध नाहीं. खरें तर, स्त्रियांना मंदिर-प्रवेशाचा अधिकार मिळण्याचा मूळ प्रश्न, धर्माशी संबंधित नसून स्री-पुरुष-समानतेशी निगडित आहे. मंदिरात किंवा त्याच्या गर्भागारात प्रवेश मिळण्यासाठी लढणें, किंवा हाजी-अली दर्ग्यात प्रवेशासाठी झगडणें, म्हणजे स्त्री-पुरुष-समानतेसाठी झगडणें . मान्य आहे, अशा अनेक बाबी आहेत, जिथें समानतेसाठी लढा द्यायला हवा . तसा, अनेक-अंगीं, अनेक-पदरी लढा चालूच आहे, असें मला वाटतें. एके काळी, ‘तथाकथित- प्रगत’, अशा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्येसुद्धां महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी महिलांना लढा द्यावाच लागला. १९३० च्या सुमारास त्यांना तो हक्क प्राप्त झाला. महाराष्ट्रात, स्त्री-शिक्षणासाठी महात्मा फुले, महर्षि कर्वे यांना लढा द्यावा लागला. हल्लीहल्लीच, टेनिसच्या क्षेत्रात, ग्रँड-स्लॅम स्पर्धांमध्ये स्त्रियांना मिळणारी बक्षिसाची रक्कन ही पुरुषांएवढी असायला हवी, या समानतेसाठी, मार्टिना नव्हरातिलोव्हानें लावून धरलें. हाही स्त्री-पुरुष-समानतेच्या लढ्याचाच एक भाग आहे. तसेंच, मंदिरप्रवेश हाही या समानतेच्या लढ्याचा एक भागच आहे. आणि, आपण तसेंच त्याच्याकडे पहायला हवें.

    मंदिरप्रवेशासाठी लढणें या गोष्टीचा, ‘देव मानणें’ किंवा ‘धर्म मानणे’ आवश्यक आहे , असें नाहीं. साने गुरुजी हे समाजवादी होते. ही सर्व मंडळी निरीश्वरवादी, निधर्मी असतात. तरीही, साने गुरुजींनी १९४८-१९४९ च्या सुमारास, पंढरपुरच्या विठ्ठल-मंदिरात हरिजनांना (दलितांना) प्रवेश मिळावा म्हणुन लडा दिला, प्राणांतिक उपोषणही केलें. स्पष्ट आहे की, त्यांचा हा लढा सामाजिक-असमानतेशी निगडित होता. आठलेकर यांच्या, ‘हा हक्क नव्हता म्हणून स्त्रिया आयुष्यातल्या कोणत्या मोठ्या संधीपासून वंचित राहिल्या आहेत?’ ; ‘गाभार्‍यात प्रवेश हवा या मागणीत कोणती धर्मसुधारणा आहे?’ , या स्टेटमेंटस् ‘मिसप्लेस्ड’ आहेत, हें साने गुरुजींच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे. त्यावर अधिक टिप्पणी करायची आवश्यकता नाहीं.

    वैदिक काळात स्त्रियांना यज्ञ करण्याचाही अधिकार होता. त्या काळानंतर, शतकानुशतकें स्त्री पुरुषांमध्ये असमानताच होती, व तें अयोग्यच आहे. मध्य-युगात तर ती दरी भयानकच होती. पण १९ व्या – २०व्या शतकात स्त्री-पुरुष-समानतेच्या हक्कासाठी लढाईची ठिणगी पडली, आणि ती आतां, भिन्नभिन्न ठिकाणीं, विविध प्रश्नांच्या माध्यमांमधून, अनेक अंगांनी, प्रस्फुटित होत आहे ; मग तो लढा मंदिरप्रवेशाचा असो, लोकसभेत किती टक्के जागा स्त्रियांसाठी रिझर्व असाव्यात हा असो, मुलींच्या शिक्षणाचा असो, स्त्री-भ्रूणहत्येचा असो, सुनांवर अत्याचाराचा व सुनांना जाळण्याचा असो, ‘खटना’ ( female circumcision) चा असो, ‘Right to Pee’ चा असो, विनयभंगाचा असो, ‘मॅरिटल रेऽप’ चा असो, तलाकचा असो, पोटगीचा असो, हँडिकॅप्ड व चॅलेंज्ड स्त्रियांच्या संरक्षणाचा असो, किंवा अन्य कांहीं असो. प्रत्येक मुद्दयावर लढा हा व्हायलाच हवा, आणि सुजाण नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यायलाच हवा. समाजात दुसरे अनेक प्रॉबलेम्स आहेत, म्हणून एखाद्या मुद्दयवर लढा द्यायचा नाहीं, असें शक्य आहे काय ? साने गुरूजींना नक्कीच माहीत होते की विठ्ठल-मंदिरात प्रवेशासाठी लढा देऊन दलितांचे आर्थिक प्रश्न कांहीं संपणार नव्हते. पण, जिथे-जिथें असमानता आहे, तिथें-तिथें लढा द्यायला हवा, या भावनेनेंच त्यांनी विठ्ठलमंदिराचा लढा दिला. ते तो लढा जिंकले ; स्त्रियाही पूजास्थळांचे कांहीं लढे जिंकत आहेत, कांहीं नाही. पण, असेंच असतें. कांहीं कांहीं लढे जिंकले जातात, कांहीं हरले जातात ( उदा. १८५७ चें स्वतंत्र्ययुद्ध). पण ठिणगी पडली की, तिच्या शॉर्ट-टर्म परिणामांबरोबरच, दूरगामी परिणामही असतात, आणि त्यांचाही विचार व्हायला हवा. तरच अशा लढ्यांचें महत्व अधोरेखित होईल. साथ देतां आली तर उत्तमच ; पण तें जमत नसल्यास, किमान, ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ इतपत तरी सपोर्ट करायला हरकत नसावी.

    - सुभाष स. नाईक
    सांताक्रूझ, मुंबई
    M- 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in

  • नवग्रह स्तोत्राचा मराठी अर्थ

    १) जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो.

    २) दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणार्या, क्षिरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणार्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो.

    ३) धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी अंगकांती असलेल्या, हातात शक्ती हे शस्त्र धारण केलेल्या, कुमारस्वरूप अश्या त्या मंगळाला मी नमस्कार करतो.

    ४) अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल-श्यामल रंग असलेल्या, अति रूपवान, बुद्धिवंत, सोज्वळ, सरळमार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो.

    ५) देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारखी अंगकांती असलेल्या, अति बुद्धिवंत, त्रिलोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला (गुरूला) मी नमस्कार करतो.

    ६) हिमकमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळांत जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो.

    ७) निळ्यारंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र, यमाचा मोठा भाऊ असलेल्या, त्या शनैश्चराला (शनीला) मी नमस्कार करतो.

    ८) अर्धेच शरीर धारण केलेल्या, वीर्यवान, चंद्र-सूर्याला छळणार्या, सिंहीकेपासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो.

    ९) पळसाच्या फुलाप्रमाणे लाल, तारका आणि ग्रहांमध्ये प्रमुख, भीती निर्माण करणार्या, रुद्राप्रमाणे तापदायक, अशा केतुला मी नमस्कार करतो.

    १०) याप्रमाणे श्रीव्यास ऋषींच्या मुखांतून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील.

    ११) नर-नारी-राजा या सर्वांची दुःखे नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर्य, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल.

    १२) ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यांपासून होणारा त्रास नष्ट होईल यांत संशय नाही असे श्रीव्यास ऋषी म्हणतात.

    अशारीतीने श्रीव्यास ऋषींनी रचिलेले हे नवग्रह स्तोत्र संपूर्ण झाले.

    -- मराठीसृष्टी टिम

  • गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

    आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.....
    आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.....
    ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.....
    त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे.....
    अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे.....
    एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात.....

    ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.....

    व्यासपौर्णिमेच्या दिवशी ' *ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे*' अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा
    आहे.....

    आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.....
    आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो.....
    अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय.....
    महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.....
    आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.....
    भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.....

    जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे.....
    मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.....

    भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.....

    गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.....

    गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही.....
    त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?' हेच खरे आहे.....

    गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -

    गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
    गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

    अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.

    आपण सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपले मार्गदर्शन, प्रोत्साहन, आशिर्वाद, सुचना देऊन आमच्या आयुष्याला आकार देण्याचे गुरुंचे कार्य करीत असता.

    ॥ गुरू पौर्णिमेच्या आपणास मनापासून शुभेच्छा॥

  • श्रावण महिना

    या महिन्याचे पौर्णिमेच्या आजूबाजूला श्रवण नक्षत्र येत असल्याने या महिन्याला श्रावण असे म्हणतात. या महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. या महिन्यात दररोज कोणते ना कोणते व्रत सांगितले आहे. त्यामुळे या महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना चातुर्मासांत येत असल्याने सध्या अनेक लोक संपूर्ण चार महिने नियम पाळणे शक्य होत नसल्याने या महिन्यापुरते तरी नियम पाळतांना आढळतात. उत्तर भारतात या महिन्यांत झुलन यात्रा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नंदोत्सव वगैरे प्रमुख उत्सव मानतात. तेथे पौर्णिमेचे दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात - हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा करतात.

    श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात. नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो. हा महिना निसर्गदृष्ट्या सुद्धा आल्हाददायक असतो. सर्वत्र हिरवेगार वातावरण असते. अनेक फुलांना बहर आलेला असतो व सुवासाने संपूर्ण वातावरण प्रसन्न झालेले असते. श्रावणमासी हर्ष मानसी... ही कविता सर्वांना ' माहीतच आहे. हे सर्व पाहायला, अनुभवायला घेण्यास शहरात न राहता खेडेगावांत, रानात जाणे आवश्यक आहे. हल्ली हे शहरातील लोकांना पहाण्यास मिळत नसल्याने वर्षा सहलींचे आयोजन केले जाते.

    -- विद्याधर करंदीकर

  • श्रावण मासातील वार विशेष

    रविवार - श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ति नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे असेही शास्त्रात सांगितले आहे.

    सोमवार - श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुष्ठि नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या. जे धान्य घेणार त्याच्यापैकी तांदूळ असल्यास त्याचा एक दाणा रुप्याचा व इतर ध्यान्यामध्ये एक सोन्याचा दाणा अर्पण करावा. मूठ वाहताना म्हणावयाचा मंत्र असा -

    'नम : शिवाय शान्ताय पञ्चवक्त्राय शूलिने ।
    शृङ्गभङ्गिमहाकालगणयुक्ताय शम्भवे । ।'

    पहिल्या सोमवारी - तांदूळ, दुसऱ्या - तीळ, तिसऱ्या - मूग, चौथ्या - जवस, पाचव्या - सातू या व्रताची पाच वर्षे झाल्यावर उद्यापन करतात.

    मंगळवार - श्रावणातील प्रत्येक मंगळवारी 'मंगलागौरी ' यांचे व्रत केले जाते. हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर ५ किंवा ७ वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांचेबरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र असा -
    'पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङ्गले । अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽस्तु ते । । '
    पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी.

    बुधवार - महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध - बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते. बुध - बृहस्पतीचे (गुरु) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्यांची पूजा करतात. दही भाताचा नैवेद्य दाखवतात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात.

    गुरुवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितले आहे. यांची देवता बृहस्पती (गुरु) आहे.

    शुक्रवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे. ही बालसंरक्षक आहे. पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे -

    'जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि ।
    रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते । ।'

    जीवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात. व देवीची प्रार्थना करतात - ' अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत् । तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करूणार्णवे !!' हे करूणामयी माते मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर.

    आपल्या इकडे जरा -जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवी सुद्धा बालकांची रक्षण करणारी आहे .

    शनिवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनीपीडेचा त्रास होऊ नये म्हणून हे व्रत केले जाते शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी, व पंचामृती पूजा करावी; शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी शनैश्र्चर आणि मंद या नावांचा जप करावा. उडीद-तांदूळाची खिचडी करावी, पायस,आंबिल, पुऱ्या यांचा नेवैद्य अर्पण करावा.

    या व्रताचा पर्याय - प्रत्येक शनिवारी लक्ष्मी-नृसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करावी. मारूतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. लक्ष्मी - नृसिंहाप्रीत्यर्थं ब्राम्हण - सवाष्ण भोजनाला बोलवावे. शनीप्रीत्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी. मुंज्या मुलाला अभ्यंगस्नान व भोजन द्यावे. एकभुक्त राहावे. श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार म्हणतात.

    -- विद्याधर करंदीकर

  • श्रावणी (उपाकर्म)

    श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्राचे दिवशी करावयाच्या वैदिक विधीला श्रावणी म्हणतात. यालाच उपाकर्म असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते, त्या दिवशी किंवा पंचमीला, हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा यजुर्वेद्यांचा मुख्य काळ, भाद्रपद महिन्यातले हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. यांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा धर्मशास्त्रानुसार निर्णय करावा लागतो.

    श्रावणी कशाकरिता करावी? सांप्रत या दिवशी यज्ञोपवित फक्त बदलतात. हे योग्य नाही. यज्ञोपवित (जानवे) बदलल्याने श्रावणी होत नाही. जे वेदांचे अध्ययन केले आहे त्याचा शिळेपणा नष्ट करणे, तसेच म्हणताना काही दोष झाले असतील तर ते नाहीसे करण्यासाठी हा विधी आहे. नूतन उपनयन झालेल्यांची प्रथम श्रावणी गुरु-शुक्रास्त, सिंहस्थ गुरु असता, करू नये असा शास्त्र संकेत आहे.

    -- विद्याधर करंदीकर