वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बाहुबली…..भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक भवदिव्य चित्रपट म्हणून अजरामर होईल अशी एक कलाकृती.
चित्रपटाविषयी अधिक लिहिणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण आयुर्वेद हा केवळ माझा व्यवसाय-साधन इतकाच मर्यादित नसल्याने आणि तो नसानसांत भिनलेला असल्याने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतो तो आयुर्वेदच. तसाच तो बाहुबली पाहतानाही दिसला. तुमच्या समोर तो मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
बाहुबली आणि भल्लालदेव (की बल्लाळदेव?) यांच्यातील द्वंद्वयुद्धाचा प्रसंग आठवा. रक्तबंबाळ बाहुबली शिवाच्या पिंडीवरील भस्म उचलतो आणि आपल्या भळभळत्या जखमांवर लावतो आणि अल्पावधीतच रक्त वाहायचे कमी होऊ लागते. हा शिवाचा चमत्कार म्हणायचा, दाक्षिणात्य तडका म्हणायचा की अन्य काही?! हा चमत्कार नाही; रजनीकांत स्टाईल तडकादेखील नाही. हा आयुर्वेद आहे. आश्चर्य वाटलं ना? पण अगदी आयुर्वेदच आहे हा!
सुश्रुतसंहितेत अतिरिक्त रक्तस्राव थांबवण्यासाठी आलेली ही सूत्रे पहा;
चतुर्विधं यदेतद्धि रुधिरस्य निवारणम् |
सन्धानं स्कन्दनं चैव पाचनं दहनं तथा ||
व्रणं कषायः सन्धत्ते रक्तं स्कन्दयते हिमम् |
तथा सम्पाचयेद्भस्म दाहः सङ्कोचयेत् सिराः ||
(सुश्रुतसंहिता सूत्रस्थान १४/ ३९-४०)
चार प्रकारांनी रक्त वाहणे रोखता येते. संधान, स्कंदन, पाचन आणि दहन. यांतील संधान हे तुरट रसाच्या वनस्पतींच्या काढ्याने, स्कंदन हे थंड गुणाच्या गोष्टींचा वापर करून, पाचन हे भस्म वापरून तर दाह हा तापलेली शलाका वापरून केला जातो. यातील दाह हा प्रकार आजही शस्त्रकर्म करताना वापरतात; त्याला cauterisation असं म्हणतात. हा संदर्भ आयुर्वेदाला कालबाह्य समजणाऱ्या लोकांसाठी सहज नमूद करत आहे. आपल्यासाठी इथे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भस्म. रक्त थांबवण्यासाठी वापरण्यात येणारे हे भस्म म्हणजे औषध म्हणून वापरले जाणारे धातूंचे भस्म नसून इथे विशेषतः तुरट रसाच्या वनस्पती वा रेशीम, कापूस इत्यादी जाळून तयार केलेले भस्म अपेक्षित आहे. पूर्वी यज्ञ, होम हवन होत असत. त्यात वापरल्या जाणाऱ्या समिधा बहुतांशी औषधी वनस्पतींच्या असत. या भस्माचा उपयोग संध्यावंदनाच्या वेळी केला जात असे. आपल्याकडे भस्मस्नान हा एक स्नानप्रकारदेखील सांगितला आहे. सुश्रुत संहितेत वर्णन करण्यात आल्याप्रमाणे या भस्माचा वापर करून रक्तस्राव खरोखरच थांबवता येतो हे आम्ही आयुर्वेद शिकताना प्रत्यक्ष करूनदेखील पाहिले आहे. (कृपया आयुर्वेद वैद्यकीय सल्ल्याशिवाय हा प्रयोग कोणीही स्वतः करायला जाऊ नये. वैद्यांची देखरेख अत्यावश्यक आहे.) बाहुबलीच्या या एका दृश्यात हा आयुर्वेद अंश सामावला आहे. अन्य काही ठिकाणी नाडी परीक्षणाचे एक दृश्यही आहे. मात्र त्यात दाखवलेला वैद्य अभिनेता चुकीच्या बाजूला नाडी पाहतो आहे; काही चित्रपट वा मालिकांत डॉक्टरची भूमिका करणारे अभिनेते स्टेथोस्कोप उलटा लावत असतात; अगदी तीच गत इथे नाडी परिक्षणाची झाली आहे.
विषयाच्या अनुषंगानेच हेही आवर्जून नमूद करावेसे वाटते की; तलवार, भाला, गदा, मुद्गर, शक्ति आदि एक से बढकर एक घातक आयुधे वापरून ज्या काळात युद्ध होत असे त्यावेळी जखमींना केवळ मलमपट्टी करण्यास नव्हे तर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासही आयुर्वेदच होता. असे खंडीभर संदर्भ सुश्रुतसंहितेत मिळतील. जिथे ब्रिटिशांनी आमच्याकडच्या विणकारांचीदेखील बोटे छाटली तिथे शस्त्रकर्म आणि मर्मविद्या जाणणाऱ्या व्यक्तींची या परकीय आक्रमकांसमोर काय कथा? यामुळेच एकेकाळी प्रगत असलेल्या आयुर्वेदीय शल्यतंत्राचा आज थेट प्रत्यक्ष वापर फारसा दिसत नाही. कदाचित बाहुबलीच्या आगामी भागात शल्यतंत्रातील एखादा संदर्भ मोठ्या पडद्यावर पहायलादेखील मिळेल. तूर्त बाहुबली-२ पाहताना वर नमूद केलेले दृश्य पाहताना आयुर्वेदाला नक्की आठवा!
जय माहिष्मती!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
पिकलेले केस व उरलेलं टक्कल’ या विषयावर काल लिहीलेल्या लेखात टकलाचे फायदे-तोटे या विषयावर लेखाच्या विस्तारभयास्तव लिहीण्याचं मुद्दामहून टाळलं होतं. ते आता लिहीतो. फायदा दिसल्याशिवाय कोणी कुठेही पुढे जात नाही म्हणून माझ्या दृष्टीनं टकलाचे फायदे काय, ते पहिलं सांगतो.
मधुमेहींनुसार हा विकार कर्करोगापेक्षा धोकादायक आहे. या विकाराने तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकत नाही. ज्यांनी आपले आयुष्य चपाती, पराठा, आमटी आणि भात खाण्यात घालवले आहे, ते अचानक काहीच खाऊ शकत नाहीत. आयुष्यात झालेल्या या नव्या बदलांमुळे खूप मानसिक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरासाठी काही पदार्थ न खाणे हेच योग्य आहे, हे स्वीकारण्यास वेळ लागतो. कारण त्यांचे स्वादुपिंड इन्सुनिलची निर्मिती करणे थांबवते. शरीरात केवळ ग्लुकोज (शर्करा) तयार होत असल्याने अनेक समस्या उद्भवतात. आपण या लक्षणांना मधुमेह असे म्हणतो. मूळात स्वादुपिंडामधून होणारा स्त्राव हा यकृतातर्फे नियंत्रित केला जातो, म्हणूनच मधुमेह हा यकृताचा विकार आहे. असे काही पदार्थ आहेत, जे यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणतात. कडीपत्त्यामध्ये खूप चांगले गुणधर्म असतात. दिवसातून तीनवेळा कडीपत्त्याची ४-५ पाने खाल्ली तर यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. सकाळी उठल्यावर अर्धा चमचा तुळशीच्या बिया, मोड आलेली कडधान्ये, दही आणि तूप खाल्याने यकृत अधिक कार्यक्षम होते. मधुमेहींनी साखर, दूध, प्रिझर्व्हेटिव्हज (पदार्थ नासू नयेत, यासाठी घालण्याचा पदार्थ) आणि अधिक मेद असलेले पदार्थ टाळावेत. मधुमेही भात, बटाटा आणि केळे इत्यादी खाऊ शकतात, असे शेकडो गैरसमज मधुमेहींच्या आहाराबद्दल आहेत. पण हे पदार्थ योग्यवेळी आणि योग्य संयोगासह खाल्ले तरच चालू शकतात. सुमारे तीन तासांची भूक भागेल, असा आरोग्यदायी न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आहार मधुमेहींनी घ्यावा. क्रॅशन डाएट (लवकर परिणाम मिळविण्यासाठी केलेले आहार नियोजन) करू नका, कारण ते जास्त अपायकारक ठरू शकेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मधुमेहींसाठी पाककृती
गव्हाच्या दलियाचा उपमा
साहित्य- २ वाट्या दलिया, १ वाटी खोवलेला नारळ, मीठ, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टी. स्पू. गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या, ४-५ लसणाच्या पाकळ्या आणि १ टी. स्पू. साखर.
कृती - हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट बनवावी. दलियामध्ये चार वाट्या पाणी, मीठ-मिरची लसूण पेस्ट, गरम मसाला आणि साखर घालावी. हा दलिया कुकरमध्ये शिजवून घ्यावा. शिजल्यावर दलियात खोवलेलं नारळ आणि थोडं पाणी टाकून तो वाफवून घ्यावा. दलियाचा उपमा वाढताना त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मशरूम बार्ली रिसोटो
साहित्य- १ कप भिजवेलेली बार्ली, १ टीस्पून ऑलिव्ह तेल,१ चिरलेला कांदा,१/२ कप चिरलेली लीक (कांद्यासारखी फळभाजी), १ लवंग, बारीक तुकडे केलेली लसूण,काही स्प्रिग्स रोसमेरी पाने,काही स्प्रिग्स थीम पाने, ३ कप भाज्यांचे स्टॉक (पनीर पाणी), १ टीस्पून चिली फ्लेक्स,टोबॅस्को सॉसचा एक डॅश, स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पावडर.
कृती:- जाड तळ असलेल्या कढईत ऑलिव्ह तेल तापत ठेवा. त्यात कांदा, लसूण, लिक्स घालून परतवा. त्यानंतर त्यात मशरूम घालून व्यवस्थित परतवा. आता त्यात बार्ली आणि स्टॉक घालून व्यवस्थित मिश्रण करा. कढई झाकून ठेवून हे मिश्रण सुमारे १० मिनिटे शिजू द्या. अधूनमधून पळी फिरवा. आवश्यकता असल्यास थोडा अजून स्टॉक घाला. बार्ली शिजल्यावर त्यात टोबॅस्को, परमेसन (एक प्रकारचे पनीर), चिली फ्लेक्स, रोझमेरी, थाइम, मीठ आणि काळी मिरी घाला. त्याचे व्यवस्थित मिश्रण करा आणि त्यावर लसणाची पात घालून वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
लिंबू आणि कोथिंबीरीचे सूप
साहित्य- स्टॉकसाठी लेमन ग्रासचे दोन तीन धुतलेले तुकडे, उभ्या चिरलेल्या 1-2 लाल मिरच्या, इतर घटक- १/४ कप गाजराचे काप, १/४ कप मशरूमचे काप, १/४ कप बारीक चिरलेला कोबी, २ चिरलेल्या कांद्याच्या पाती,मीठ आणि काळी मिरी पावडर स्वादानुसार.
कृती:- लेमन ग्रास आणि मिरच्या ३ कप पाण्यात टाकून १५ मिनिटे उकळू द्या. हे मिश्रण गाळून बाजूला ठेवून द्या. थोडेसे पाणी घालून कांद्याची पात परतवून घ्या. त्यात कोबी, मशरूम आणि गाजर घालून 2 मिनिटे शिजवा. त्यात स्टॉक ओतून भाज्या मऊ होईपर्यंत उकळा. त्याच्यासोबत मीठ, काळी मिरी पावडर आणि लिंबू देऊन कोमट स्थितीत वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कोबीचे रोल
साहित्य- कोबीची ५-६ पाने,एक कप बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, फरस्बी, फ्लॉवर, मटार),अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप टोमॅटोची ग्रेव्ही, २५ ग्रॅम पनीर/ मोड आलेली कडधान्ये, २ टीस्पून तेल,मीठ आणि मिरी पावडर स्वादानुसार.
कृती:- पाण्यात मीठ टाकून कोबीची पाने १ मिनिटापर्यंत शिजवून घ्या. पाणी पूर्ण काढून टाका.
तेल तापवा. काही सेकंद कांदा परतवा. त्यात हिरव्या मिरच्या घालून पुन्हा एकदा काही सेकंद परतवा. त्यात भाज्या, मोड आलेली कडधान्ये, मीठ आणि मिरी पावडर घाला. भाज्यांचे हे मिश्रण कोबीच्या कोबीच्या प्रत्येक पानावर ठेवा, वरून थोडीशी टोमॅटोची ग्रेव्ही घाला. प्रत्येक पान गुंडाळून घ्या आणि ते तूप लावलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. शिल्लक राहिलेली टोमॅटो ग्रेव्ही उकळून घ्या आणि ती रोल्सवर ओता.. ओव्हनमध्ये 225 अंश सेल्सिअस तापमानावर 10 मिनिटे ठेवा आणि गरगरम खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
राजगिरा डोसा
घटक - रात्रभर भिजवून ठेवलेला 1/2 कप राजगिरा, १/२ कप चणा डाळ ४-६ तास भिजवलेली, १-२ हिरव्या मिरच्या, बारीक तुकडे केलेल्या (आवश्यकता असल्यास) स्वादानुसार मीठ, दीड टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,शिजविण्यासाठी तेल.
कृती:- राजगिरा, चणाडाळ, हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करून त्याचे मिक्सरमध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून मिश्रण करून घ्यावे. ते बाऊलमध्ये काढून त्यात कोथिंबीर घालावी आणि व्यवस्थित मिसळून घेऊन, डोसा घालण्यासाठी योग्य असे मिश्रण तयार करावे.
नॉन स्टिक तव्यावर पातळ डोसे घालावेत. हिरवी चटणी आणि सांबार यांच्यासह ते खायला द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू वागलं..केस (अर्थात पुरूषांचे. स्त्रीयांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहीले गेलेत) शरिराच्या शीर्षभागी असुनही त्यावर फार काही लिहीलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, पण का कोण जाणे, मला ते जमलं नाही.
३ मे १९१३ रोजी गिरगावातील 'कॉरोनेशन सिनेमा' च्या परिसरात जमलेल्या गर्दीनं एक अद्भुत क्षण अनुभवला. दादासाहेब फाळके निर्मित "राजा हरिश्चंद्र" हा भारतीय चित्रपट जगतातील पहिला चित्रपट या दिवशी दाखवण्यात आला आणि ह्या मूकपटाच्या प्रदर्शनानं भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाचा श्रीगणेशा झाला. दादासाहेब फाळके यांनी "राजा हरिश्चंद्र‘ या चित्रपटाद्वारे प्रथमच "हलत्या चित्रां‘चे दर्शन घडवीत भारतीयांच्या "चित्रपट वेडाची‘ मुहूर्तमेढ रोवली. गेल्या शंभर वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीने मोठी भरारी घेतली असतानाच मराठी, तमीळ व बंगालीसारख्या प्रादेशिक भाषांतील चित्रपटांनीही आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. "हलत्या चित्रांचा विजय असो,‘ म्हणत फाळक्यांनी लावलेल्या वृक्षाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. परदेशामध्ये फिल्मच्या मदतीने पडद्यावर हलते चित्रपट दाखविण्याचा प्रयोग होऊ लागला व हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी दादासाहेब फाळके या अवलियानं कंबर कसली व "राजा हरिश्चंद्र" च्या रूपानं भारतात मोठ्या पडद्यावर हलती चित्रे दिसली. "भस्मासुर मोहिनी‘ फाळकेंच्या दुसऱ्या चित्रपटात अभिनेत्रीचा प्रवेश झाला आणखी एक इतिहास घडला. फाळकेंकडून प्रेरणा घेऊन अनेक निर्माते व दिग्दर्शक चित्रपट निर्मितीकडे वळले.
१९१८ मध्ये इंडियन सिनेमॅटोग्राफ कायदा पास झाला व मुंबई, कलकत्ता, मद्रास व लाहोर बोर्ड १९२० मध्ये सुरू झाले. कलकत्त्यामध्ये धीरेन गांगुली व मुंबईमध्ये चंदुलाल शहा यांनी ब्रिटिश आणि जर्मनांची मदत घेत चित्रपट आधुनिक करण्यास सुरवात केली. हिमांशू रॉय यांनी "द लाइट ऑफ एशिया‘ची निर्मिती करीत भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. १९२९ मध्ये प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. याच दरम्यान इम्पिरिअल फिल्म कंपनीने १४ मार्च १९३१ ला "आलम आरा‘ या भारतातील पहिल्या बोलपटाची निर्मिती केली. या चित्रपटात प्रथम गाण्यांचा समावेश केला गेला व चित्रपटाच्या यशामुळे भारतीयांच्या गाणी व संवादांच्या आवडीचं बीज रोवलं गेलं! चलचित्रांबरोबरच आवाजही आल्यानं "टॉकीज‘चा जन्म झाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा
पोटात खड्डा पडावा - भाग दोन
खड्ड्यात पाणी आपोआप ओढले जाते.
पण केव्हा ?
जर तो खड्डा रिकामा असेल तरच ! जर तो पाण्याने भरलेला असेल तर ? पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्ड्यात आणखी पाणी कसे ओढून घेतले जाईल ?
अगदी तसेच पोटाचेही होते. सकाळी उठल्यापासून जी काही खायला सुरवात होते, ती रात्री झोपेपर्यंत ! अगदी ओव्हरफ्लो. अगदी पुलंचा अतिशोयोक्ती अलंकार वापरायचा झाला तर.....
......एवढे श्रीखंड हाणले की, "नको आता. पुरेऽऽ" एवढे शब्दही त्याच्या तोंडून उच्चारवेनात. त्याच्या घशात बोट घातले असते तर, बोटाला पोटातले श्रीखंड लागले असते.......इथे पोटात खड्डा कुठचा ? मिठी नदीचा जणुकाही महापूरच लोटतो.
अतिशोयोक्ती सोडून देऊया, पण अगदी आकंठ जेवल्यावर जी सुस्ती येते, ते सुख पुढे जाऊन, दुःखाचे कारण बनणारे असते.
बरं त्यानंतर काही किरकोळ काम करावे, त्याने पोट थोडे फार हलेल, तर तेही नाही. एवढे टम्म जेवल्यावर पोट हलायची बातच नाही. अंथरूण पसरून, पांघरुण घेऊन, पाय ताणून दिले, की पोटात पचनासाठी आलेल्या भगवान विष्णुंनी करायचे तरी काय ?
( संदर्भ - अहं वैश्वानरोभूत्वाम्.....पचाम्यति चतुर्विधम )
ते बिचारे ताटकळत वाट बघताहेत, "आता याची कुस बदलेल, मग तिथल्या कुशीखाली दबले गेलेले अन्न, मला पचनासाठी घेता येईल".
पण कुठचे काय ! दोन तास झाले तरी, पोट हलायची बातच नाय. खड्डा कसा पडणार ? बिचारे भगवान वाट बघून निघूनही जातात. मग काय होणार ?
बरं असं एखादा दिवस झाले तर ठीकाय, पण असं दररोज व्हायला लागलं तर काय करणार ?
दरवाज्याला कुलुप बघून भांडी कामवाली बाई जशी परत निघून जाते, आणि दुसऱ्या दिवशी आपल्या नेहेमीच्या वेळेवर परत येते, तोपर्यंत बाथरूममधल्या, तसेच पाणी खात पडलेल्या भांड्यांमधे पुनः रात्रौची भांडी अस्ताव्यस्त अडकून पडलेली असतात., 'तिची' वाट बघत ! बाथरूममधे अगदी पाय टाकायला पण जागा उरलेली नसते.
तसंच पोटातल्या अन्नाचं होतं. वेळेत पचन झालं नाही. जर हा खड्डा तयार झाला नाही तर काय होणार ? हा खड्डा, ही रिकामी जागा तयार होणं महत्त्वाचे असते.
मुख्य नदीतील पाणी जर ओहोटीच्या वेळी समुद्रात गेले तरच, नदीला जोडल्या गेलेल्या छोट्या छोट्या ओहोळातील पाणी, कचरा, घाण इ. अडकलेले पदार्थ पुनः नदीच्या पात्रात ढकलले जातील तसे, मुख्य स्रोतसातील अन्न पुढेपुढे ढकलत जाऊन, तिथे जागा झाल्याशिवाय आजूबाजूच्या छोट्या स्रोतसातील चांगले वाईट स्राव मुख्य स्रोतसामधे कसे पोचणार ?
तसेच पोटातही, खड्ड्याची जागा होणे, जागे राहून, अन्नाला, आणि अन्न पचनासाठी आलेल्या इन्शुलीन सारख्या स्रावांना, जागा करून देणे महत्त्वाचे असते. जर आत जागाच नसेल तर, "पॅन्क्रीयाज" मधे तयार झालेले "इन्शुलीन" आत जागा नाही या एका कारणास्तव, कुलुप असलेल्या दरवाजासमोर वाट पहाणाऱ्या कामवालीसारखे, काहीच करू शकत नाही. बिचारे पोटात उतरूच शकत नाही. आणि परत आपल्या स्वस्थानी जाते. तिचे अधिपती भगवान विष्णु स्वरूपी मेंदू महाराजांना ही बातमी कळते, ते देखील "दखल घेतली", असं म्हणण्या पलीकडे काही करू शकत नाहीत.
अशी जागा, असा खड्डा जर तयार नसेल तर......??
तर पालक विष्णुंचा कोप होऊन ते एक दिवस म्हणतील, "जावा खड्ड्यात! "
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
04.05.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा
पोटात खड्डा पडावा.
सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे.
त्यामुळे काय होते ?
आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते.
पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व शरीराचे पोषण सुरू होते. आपण जे काही खातो पितो, त्यातूनच हे पोषण होत असते. जे काही खातो पितो, त्यातून पोषण झाल्यावर जो भाग शिल्लक रहातो, त्याला मल असे म्हणतात. जो टाकाऊ असतो. घाम, लघवी, संडास या मुख्य मार्गाने तो काढला जातो.
ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. पचन पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः तर काहीच करत नाही. जे काही करायचे तेवढे सर्व शरीरच करत असते. आध्यात्मिक भाषेत हे सर्व ईश्वर करत असतो. आणि वैज्ञानिक भाषेत यालाच "नेचर" असे म्हणतात.
आपला "मीपणा" यामधे आला की पचन बिघडते. आणि आम तयार होतो. या आमाचा स्वभाव चिकटून रहाण्याचा असतो. आणि कोणतीही गोष्ट पाण्याशिवाय चिकटतच नाही. म्हणजे जर या आमातील रस म्हणजे द्रव भाग, कमी केले गेले तर चिकटण्याची प्रक्रिया कमी होत जाईल.
अतिरिक्त पाणी काढण्यासाठी आजूबाजूला जर खड्डा असेल तर हेच पाणी वेगळे करण्याचे काम विनासायास होते. यालाच मी सोकपिट टेक्निक म्हणतो. आता हा खड्डा जर पोटात तयार केला तर ?
खड्डा म्हणजे रिकामी जागा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हे पोट भर भर भरत असतो. आतमधे तो जागा असतो, म्हणून खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. दर दोन तासांनी खा खा खाऊन ही जागा आपण कमी करत जातो. त्याच्या कामावरचा लोड जर आम्ही वाढवला तरच आम तयार होऊन चिकटणार आहे. म्हणून पोट थोडे रिकामे करावे, त्याच्यावरचा लोड कमी करावा, पोटात थोडा खड्डा तयार करावा. म्हणजे "आमातील रस म्हणजे द्रवांश" या खड्ड्यांमधे आपोआपच ओढला जाईल. चिकटणे कमी होईल, उरलेला आम सहजच सुकुन जाईल.
नियम म्हणून हा खड्डा ( सोकपिट ) तयार करून घेतला की, आम नष्ट झालाच म्हणून समजा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
03.05.2017
मराठी नाटयरसिक, कलावंतांशी हृद्य नाते जोपासणा-या दादरमधील शिवाजी मंदिरचा शुभारंभ ३ मे १९६५ रोजी झाला. मराठी रंगभूमी ही आज देशातील अत्यंत प्रगत रंगभूमी मानली जाते, याचे कारण तिचा पावणेदोनशे वर्षांचा वैभवशाली इतिहास एवढेच नसून ती सतत प्रवाही, पुरोगामी आणि कालसुसंगत राहिली, हेही आहे. चित्रपटाच्या उदयानंतर संगीत रंगभूमी अस्ताकडे निघाली असता तिने कात टाकली, काळानुरूप आपले रूप बदलले आणि ती पुनश्च बहरली. त्यानंतरही अनेक चढउतार तिने अनुभवले. या सर्व घटना-घडामोडींची जिवंत साक्षीदार असलेली मुंबईतली दादरच्या शिवाजी मंदिरची वास्तू आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीशी तिचे अविचल नाते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक रंगकर्मीला एक ना एक दिवस आपण शिवाजी मंदिरच्या मंचावर स्वत:ला जोखून बघावे असे वाटत असते, यातच या वास्तूची महत्ता दडली आहे. १९६५ साली जेव्हा मुंबईत बंदिस्त नाटय़गृह ही दुर्मीळ चीज होती त्या काळी शिवाजी मंदिर बांधले गेले. अर्थात त्याआधीही ते खुले नाटय़गृह म्हणून अस्तित्वात होतेच. परंतु शिवाजी मंदिरचा बंदिस्त रंगमंच उपलब्ध झाला आणि १२ महिने १३ काळ मराठी नाटकांना कायमस्वरूपी रंगमंच मिळाला. या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता.
पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, रहस्यनाटय़, बालनाटय़ अशा सर्व प्रकारांतली नाटके इथे सादर होऊ लागली. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, रंगमंच कामगार यांच्या अनेक पिढय़ा शिवाजी मंदिरच्या मांडवाखालून गेल्या, मोठय़ा झाल्या. ८०-९० च्या दशकापर्यंत शिवाजी मंदिरचा कट्टा हा हौशी, होतकरू रंगकर्मीचा अड्डा होता. शिवाजी मंदिरमध्ये आपला हुन्नर दाखवायची संधी एक ना एक दिवस आपल्याला मिळेल आणि आपण मोठे होऊ, नावारूपास येऊ, हे स्वप्न उराशी बाळगत कटिंग चहावर दिवसचे दिवस ढकलत या अड्डय़ावर नित्य हजेरी लावणाऱ्या अनेकांचे हे स्वप्न पुढे साकारतही असे. यातले कित्येक जण शिवाजी मंदिरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छबिलदास रंगमंचावरून आलेले असत. छबिलदासच्या प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर नाटके करणारे रंगकर्मी आणि शिवाजी मंदिरचे नाटकवाले यांच्यात एके काळी विस्तवही जात नसे. परस्परांना ते कमी लेखत. कारण त्यांच्यातला एक असे आपल्याला रंगभूमीवर जे ‘प्रयोग’ करायचे आहेत, त्याकरता म्हणून नाटक करणारा; तर दुसरा- रसिकांचे रंजन करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करण्याचा वसा घेऊन नाटके करणारा. खरे तर दोघांचीही भूमिका मराठी रंगभूमी आणि मराठी संस्कृतीच्या उत्थानाकरता तितकीच महत्त्वाची होती. यथावकाश दोघांनाही आपले हे आग्रह दुराग्रह असल्याचे ध्यानी आले आणि त्यांच्यातला दुरावा संपला. म्हणूनच एके काळी छबिलदासवर सक्रिय असलेली मंडळी आज शिवाजी मंदिरमध्ये आपली ‘प्रयोगसिद्ध’ नाटके सादर करताना दिसतात. शिवाजी मंदिर ज्याने जिंकले, तो जगाच्या पाठीवर कुठल्याही रंगमंचावर हार खाणार नाही असे म्हटले जाते. ते खरेच आहे. याचे कारण शिवाजी मंदिरचा प्रेक्षक सुशिक्षित, सुजाण, दर्जेदार अभिरुची बाळगणारा आहे. त्याला उडदामाजी काळे-गोरे चोखपणे पारखता येते.
शिवाजी मंदिर नाट्यगृहाने अनेक दशके पहिली आहेत. वेळेनुसार घडणारे बदलही प्रेक्षकांनी पाहिले आहेत आणि पहात आहेत. मात्र आजही तोच पारंपारिक नाट्यकलेचा ठेवा या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. आशिया खंडातील हे आदर्श नाट्यगृह आहे येथील दर्जेदार आणि निर्दोष ध्वनीयोजना, आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास एक हजार प्रेक्षक एकावेळी बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. वेळोवेळी होत असलेल्या देखभालीने नाट्यगृह अजून काही दशके सुस्थितीत चालेल अशी अपेक्षा आहे. शिवाजी मंदिरमध्ये नाटक व तत्सम नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असं आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, मा. दत्ताराम, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर, सुधा करमरकर, आशा काळे यांच्यापासून आज लोकप्रिय असलेल्या विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यापर्यंत सर्वांचेच शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे. शिवाजी मंदिराच्या रंगमंचावर प्रवेश केला की वेगळंच स्फुरण चढतं, उत्साह संचारतो असे त्यांचे उद्गार आहेत. समाज प्रबोधनासाठी केले जाणारे लोकनाट्य, मुक्तनाट्य सादर करण्यात आली. शिवाजी मंदिरने अनेक नवनव्या उपक्रमांना नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे, आश्रय दिला आहे.
१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेआधी शिवाजी मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे, हे एका कोकणी मुस्लीम प्रेक्षकाने शिवाजी मंदिरच्या ट्रस्टींना पत्र लिहून सावध केले होते. त्या पत्राधारे आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळेच शिवाजी मंदिर या हल्ल्यातून वाचले. या वास्तूच्या धर्मनिरपेक्ष पुण्याईमुळेच हे शक्य झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ लोकसत्ता
हायड्रेटिंग फेस पॅक
उन्हाच्या वातावरणात आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त तेलकट होते. अशा वेळेस चेह-यावर तजेलदारपणा आणायचा असेल तर आंब्याचा रस घेऊन त्यात मुलतानी माती टाकावी. आंब्याचा रस व मुलतानी माती यांचे उत्तम मिश्रण करून चेह-यावर लावावं. हे मिश्रण चेह-यावर पंधरा मिनिटं ठेवावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. चेह-यावर तेज येऊन त्वचा सुंदर दिसते.
संवेदनशील त्वचेसाठी
काही तरुणींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे बाहेरील उन्हाचा, हवेचा व वातावरणाचा त्यांच्या चेह-यावर लगेच फरक जाणवतो. अशा वेळेस आमरसमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यात २ चमचे पाणी आणि १ चमचा दही टाकून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट तयार करून चेह-यावर व मानेवर हलक्या हाताने लावावी. हा फेस पॅक चेह-यावर जवळपास तीस मिनिटे ठेवावा. अध्र्या तासानंतर चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावा.
ताजे मँगो फिल्टर
संपूर्ण दिवसभर काम केल्यावर शरीरासोबतच आपला चेहराही थकतो. त्यामुळे चेह-यावर आलेला थकवा घालवण्यासाठी व अकालीन आलेलं वृद्धत्व दूर करण्यासाठी ताज्या मँगो फिल्टरचा वापर करावा. ७-८ अक्रोड किसून त्यात ओटचे जाडे भरडे पीठ २-३ चमचे टाकावे, ३ चमचे मुलतानी माती आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळावे. या सगळ्यांचे योग्य मिश्रण करावे.
तयार झालेले मिश्रण चेह-यावर व मानेवर लावून जवळपास तीन तास तरी सुकवावे. चेहरा पूर्णपणे सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावा. जेणेकरून चेह-यावरचा ताण कमी होऊन चेहरा त्राणविरहीत दिसू लागतो. हा उपाय सर्व प्रकारच्या चेह-यासाठी उपयुक्त असून रोज वापर केल्यास चेहरा जास्त खुलून येतो.
मँगो बॉडी स्क्रब
चेह-यासोबतच बाहेरील वातावरणामुळे शरीरावरही परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होते तसंच त्वचेतील पेशी मृत पावतात. अशा वेळेस एका भांडयात २ चमचे आंब्याचा रस घ्यावा, त्यात २ चमचे दूध आणि एक चमचा साखर घालून मिश्रण तयार करावं. मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण चेह-यावर व शरीरावर लावून घ्यावं. २० ते २५ मिनिटं शरीरावर मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका. साखरेमुळे शरीरावरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे शरीर व चेहरा टवटवीत दिसतो.
डागविरहीत त्वचेसाठी
आंब्याच्या रसामध्ये हरभ-याचे कूट टाकून त्यात एक चमचा मधाचा टाकावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. चेह-यावर आणि विशेषत: डाग असलेल्या भागावर हे मिश्रण लावावं. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय रोज केल्यास चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ होऊन डागविरहीत होतो.
मँगो फेशिअल
चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेह-याला तेज आणण्यासाठी मँगो फेशिअल नावाचा प्रकार सध्या पार्लरमध्ये प्रचलित आहे. या फेशिअलमध्ये आंब्याच्या रसामध्ये अंडयातील आतील पिवळा द्रवपदार्थ मिसळावा आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावेय.
१५ मिनिटांनंतर थंड पाणी व फेस वॉशने चेहरा धुवून घ्यावा. फेस वॉशने चेह-यावर अंडयामुळे आलेली दरुगधी कमी करता येते. साधारण तरुणी महिन्यातून एकदा तरी फेशिअल करतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात. मँगो फेशिअलमुळे चेहरा निखळ व तेजस्वी दिसतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.
2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.
माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.
आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते
वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.
ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत
ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.
अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे,
सनसिटी रस्ता, आनंदनगर,
सिंहगड रोड, पुणे
फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk
Copyright © 2025 | Marathisrushti