(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक पाच

    पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका - भाग 2

    घरातला तुरडाळ ठेवलेला डबा आठवतोय ? जेव्हा डब्यातील तुरडाळ संपतेय, तेव्हा मार्केट मधून तुरडाळ आणली जाते. तेव्हा डब्यात तळाला थोडी तुरडाळ शिल्लक असते. या शिल्लक असलेल्या तुरडाळीवर नवीन तुरडाळ ओतली जाते. असं जेव्हा वारंवार होईल, तेव्हा काय होतं ? तळातील जुनी तुरडाळ तशीच ठेवून जर त्यावर नवीन तुरडाळ ओतली गेली तर काय होईल ? जुनी तुरडाळ काही दिवसांनी खराब होईल. तिला दुर्गंध येऊ लागेल, अशी दुर्गंध येणारी डाळ डब्यात तशीच राहिली तर वरून पडणारी चांगली तुरडाळदेखील काही दिवसात दुर्गंधित होऊ लागेल आणि काही दिवसांनी डब्यातील सर्व तुरडाळ वास येणारी होईल.

    असं होऊ नये म्हणून काय करावे ?
    जी तुरडाळ तळात राहिलेली असते, तिला आधी एका ताटामधे काढून घ्यावी. नवीन तुरडाळ डब्यात भरावी. आणि डब्यात सर्वात वर जुनी तुरडाळ भरावी. त्यामुळे ती पहिल्यांदा वापरली जाईल. फुकट जाणार नाही.

    बेकरीवाल्याकडची बरणीतील शेव संपत आली की तो बेकरीवाला, ती बरणीतील तळातली शेव आधी वेगळी काढून मगच नवीन शेवेचं पाकीट बरणीत रिकामे करतो. आणि वर जुनी शेव परत भरतो, जेणेकरून पहिली शेव सहज संपून जावी.

    पहिलं संपल्याशिवाय दुसरं भरलं तर पहिलं पण फुकट जाते आणि दुसऱ्या पदार्थाचा आनंदही निघून जातो.

    अगदी तस्संच पोटामधे देखील होत असावं. आधी न पचलेल्या अन्नावर वरून कितीही सात्त्विक अन्न घातले तरी ते सर्व अन्न फुकट जाईल. कारण न पचलेलं अन्न म्हणजे आम. या आमामधे चांगले अन्न एकत्र झालं की, सर्वच अन्न "आममय" होईल.

    त्यामुळे पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न आत टाकलं तर नुकसान ठरलेलंच ! म्हणून पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका.

    नासलेल्या दुधात कितीही चांगले दूध ओतले तरी सर्व दूध नासणारच !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    02.05.2017

  • महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी

    वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यालाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा तो जास्त ‘देशीय’ असतो

  • आपलं मुल खरंच ‘आपलं’ असतं का?

    माझं’ किंवा ‘आमचं’ मुल ही घटना सत्य असली तरी मला ही कल्पनाच मान्य नाही. त्या जीवाचा जन्म आपल्यामुळे झालेला असला किंवा त्या जीवाला जगात आणण्याच्या निसर्गाच्या करामतीनुसार आपण केवळ निमित्तमात्र ठरलेलो असतो आणि म्हणून त्याला आपण ‘आपलं’ म्हणत असतो.

  • महाराष्ट्राची ‘मराठी परंपरा’

    आज महाराष्ट्र दिन..सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतील..परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती..

  • हिमोग्लोबिन

    रक्तात लोह वाहून नेणारं प्रोटिन असतं, त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. हिम म्हणजे लोह आणि ग्लोबिन हे एक प्रोटिन आहे. हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य आहे, सर्व पेशींना रक्तातून शुद्ध ऑक्सिजन पुरवणं आणि पेशींमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा रक्ताद्वारे फुफ्फुसांपर्यंत आणणं. हे हिमोग्लोबिन आपल्या रक्तातील लाल रक्त पेशींमध्ये असतं. रक्तातील हिमोग्लोबिनची योग्य मात्रा आपलं जीवनकार्य सुरळीत ठेवते. प्रौढ पुरुषांच्या रक्तातील हिमोग्लोबिन हे १३.५ ते १७ gms/dL, तर स्त्रियांच्या रक्तातील हिमोग्लोबिन १२ ते १५ gms/dL एवढं हवं. रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा गरजेपेक्षा कमी झाली, की त्या अवस्थेला अॅनिमिया म्हणतात (यालाच रक्तक्षय किंवा पंडुरोग असंही म्हटलं जातं). अॅनिमियाचेही बरेच प्रकार आहेत; परंतु रक्तातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया आपल्याकडे जास्त लोकांमध्ये आढळतो. लहान मुलं, पौगंडावस्थेतील मुली, तरुण मुली, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांमध्ये याचं प्रमाण खूप आहे. लोहयुक्त पदार्थांची आहारातील कमतरता हे अॅनिमियाचं महत्त्वाचं कारण आहे.

    बदलत्या जीवनशैलीमुळे आहारातील लोहयुक्त पदार्थांचं प्रमाण घटतंय. अॅनिमियाचं दुसरं कारण म्हणजे आहारातून मिळणाऱ्या लोहाचं रक्तातील शोषण रोखणाऱ्या काही घटकांचं सेवन आपल्याकडून कायम केलं जाते. त्यामुळे लोहयुक्त आहार घेऊनही त्याचं योग्य प्रमाणात शोषण न झाल्यानंही अॅनिमिया होतो. इतर कारणं म्हणजे अति रक्तस्त्राव, आतड्याचे रोग, इन्फेक्शन, रक्ताचा कर्करोग, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, बी १२ ची कमतरता, लिव्हरचे काही आजार, किडनीचे काही ठराविक आजार, गरोदरपणात होणारी लोहाची कमतरता अशी बरीच कारणं आहेत. थकवा येणं, अंधारी येणं, कामात लक्ष न लागणं, हातापायातील त्राण कमी झाल्यासारखं वाटणं ही अॅनिमियाची काही मुख्य लक्षणं आहेत. हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं लोहाच्या गोळ्या सुरू करणं हाच योग्य उपाय आहे. परिस्थिती खालावली, तर शरीराला जास्तीचं रक्तही पुरवावं लागू शकते. बऱ्याचदा रक्तातील लोहाची पातळी अतिरिक्त कमी होईपर्यंत ही लक्षणं जाणवत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी तपासणी करा.

    हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीचा आहार
    बीट, टोमॅटो, गाजर आणि अशा लाल रंगाच्या पदार्थांमधून लोह मिळतं किंवा त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं हा निव्वळ गैरसमज आहे. चिकन, अंडी, मासे, इतर मांसाहारी पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, काही डाळी, उसळी, सुका मेवा, हळीव, खजूर, नाचणी, पोहे, राजगिरा या पदार्थांमधून शरीराला लोह मिळतं. अन्नावाटे मिळणाऱ्या लोहाचेही दोन प्रकार आहेत. हिम आणि नॉन हिम. हिम प्रकारचे लोह सर्व प्राणिज स्रोतांमधून मिळतं, ज्याचे रक्तातील शोषण सहज होऊ शकतं. नॉन हिम प्रकारचे लोह सर्व वनस्पती स्रोतांमधून मिळतं, ज्याचं शोषण सहजासहजी होत नाही. याचाच परिणाम म्हणजे मांसाहारी लोकांपेक्षा शाकाहारी लोकांमध्ये अॅनेमियाचे प्रमाण जास्त आढळतं; कारण शाकाहारातून मिळणाऱ्या लोहाचं शोषण बऱ्याचदा योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांना आहारातील लोहाचं शोषण व्हावं यासाठी लोहयुक्त पदार्थ खाताना व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्त्व असलेले पदार्थ खाणं गरजेचं आहे. यामुळे रक्तातील नॉन हिम प्रकारच्या लोहाचं शोषण होण्यास मदत होते. अन्नावाटे मिळणारे फायटेट आणि टॅनिनयुक्त पदार्थ, कॅल्शियम आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ, अँटासिड्सचे अतिरेकी प्रमाणात सेवन, चहा, कॉफी असे पदार्थ शरीरातील लोहाचं शोषण होऊ देत नाहीत. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांचं सेवन करत असताना त्याचवेळी वर दिलेल्या या पदार्थांचं सेवन करणं जाणीवपूर्वक टाळलं, तर तुम्ही खाल्लेल्या लोहाचं शोषण योग्य प्रमाणात होऊ शकतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक पाच

    पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका.

    मिक्सरमधून नारळ वाटून घ्यायचा आहे, पहिला आत टाकलेला नारळ बाहेर काढायच्या आधीच दुसरा नारळ वाटण्यासाठी आत टाकावा का ?
    नाही ना !

    तसंच आपल्या पचनाचं देखील आहे. खाल्लेलं पचायच्या आधीच दुसरं आत टाकू नका. दुसरं आत टाकलेलं पचणार तर नाहीच, पण पहिलं आत टाकलेलं देखील खराब होईल.

    हं. मी "दर दोन तासाने खावे" असा जो प्रचार होतोय, त्यासाठी काय दृष्टीकोन असावा तेच सांगतोय.

    पहिलं खाल्लेलं पचलेलं नाही, तोपर्यंत वरून पुनः पचनासाठी माल आत पाठवला जातोय.

    गाई गुरांची गोष्ट वेगळी, त्यांना जसं मिळेल तिथून, जेवढा मिळेल तेवढा चारा, भसाभस खाऊन एका कप्प्यात अर्धवट खाल्लेला चारा साठवता येतो. आणि नंतर सुरक्षित जागी येऊन अर्धवट खाऊन साठवलेला चारा पुनः तोंडात आणून, निवांत, निर्धास्त, स अवकाश, सावकाश रवंथ करीत पचन करायचे असते. दिवसभर खा, खा, केलं तरी, रात्रभर खाल्लेलं पचवायला वेळ देतात. पचवायच्या वेळी परत परत खाणे नाही. त्यामुळे या प्राण्यांना सहसा गॅस प्राॅब्लेम कधी होत नाहीत.

    पण मानव प्राण्याची बातच वेगळी !

    भूक लागेल तेव्हा घरात डबे भरलेले आहेत. बाहेर जावं तेव्हा खिसे भरलेले आहेत. दर दोन तासानी खा खा खात रहायचं. पण पचवायला मात्र वेळ अजिबात द्यायचा नाही. वर "डाॅक्टरनीच सांगितलंय" असं म्हणायला मोकळे! कारण काय तर, अॅसिडीटी वाढू नये म्हणून, अल्सर होऊ नये म्हणून.....

    असं करून कसं चालेल ?
    आपणाला त्याने बुद्धी दिलेली आहे. तिचा सुयोग्य वापर करून घ्यायला पाहिजे. आपणाला, गाईगुरांसारखं खाल्लेलं अन्न परत बाहेर तर काढता येत नाही. परत परत अन्न बाहेर काढता येणार नाही. जे काही पचन करायचं ते एकदाच.

    सतत खात राहिल्याने पचन पूर्ण होत नाही, आधीचं खाल्लेलं पचलेलं नाही, आणि पुनः वरून सतत अतिरिक्त कामाचा ताण ! तोपर्यंत आधीचं पेंडींग काम आणखी काम वाढवलेलं असतं. मग एक ना धड भाराभर चिंध्या !

    म्हणजे कसं होतंय ना, मे महिन्याच्या सुटीतील पाहुण्याची सरबराई काही संपत नाही, सासरची माणसे घरातून बाहेर पडेपर्यंत, ह्यांच्या मित्राचं टोळकं येतं. माहेरची माणसे येऊन थडकतात. कुणाला काय काय हवं. सगळ्यांची उठाबस नीट व्हायला हवी. शिवाय पाहुण्यांच्या समोर आपली हौस मौज काय करायची असते ती वेगळीच. नवऱ्याची मदत मिळवायची तर त्याच्या वेगळ्याच तऱ्हा ! अश्शी धांदल उडते ना ! मग चिडचिड होते.

    बरं हे पाहुणे वेगवेगळ्या वेळी, जरा दमानं आले, तर थोडं बरं असतं. सगळे एकदम आले तर दम निघतो ! एका एका पावण्याची ऊठाबस करणं सोपं असतं. प्रत्येकाकडे लक्ष देता येतं. पण सगळ्यांचा एकत्र कल्ला म्हणजे म फारच होतं.....

    ......तसंच पोटाचं पण होतं.
    आता चटपटीत पावभाजी आत आली आहे, तोपर्यंत थंडगार आईस्क्रीमचा गोळा वरून खाली पडतो. आता कुठे पावभाजीचं प्रकरण संपवतेय, तोपर्यंत दुसरं प्रकरण पुढ्यात. त्याची व्यवस्था लावायच्या आत फणस आंबे जांभळं राडा करतात. पुनः जेवण वेगळंच ! सरबत पन्हे असंही अधे मधे होतं.
    या प्रत्येक पाहुण्याच्या तऱ्हा वेगळ्या !
    घरातल्या पाहुण्यांची उठाबस करणं एकवेळ सोपं. कोणीतरी माणूस हाताखाली ठेवता येतो, वाटलंच तर हाॅटेलही आहे. पण पोटाकडे असे पर्याय नाहीतच !

    एकदाच काय ते होऊन जाऊदे, पण नाही.
    एकट्या पोटानं काय काय आणि किती किती करायचं ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    01.05.2017

  • स्वार्थ..

    कोणी कितीही काही म्हटलं तरी कोणत्याही नात्यात स्वार्थ हा असतोच. स्वार्थाशिवाय नातं अशक्य आहे. नाती जुळण्याची सुरुवातच मुळी स्वार्थातून होते व अशा एकदा जुळलेल्या नात्यांवर पुढे वेगवेगळे रंग चढत जातात आणि मग पुढं कधीतरी निरपेक्ष नातं तयार होण्याची शक्यता निर्माण होते.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही-भाग अकरा

    आयुर्वेदीय औषधांना लवकर गुण का येत नाही ?

    इंग्लिश औषधांप्रमाणे आयुर्वेदीय औषधांना झटपट गुण दिसत नाही, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वेधन, अग्निकर्म, यासारख्या काही चिकित्सा इतक्या जलद काम करतात, की अॅलोपॅथीमधील, कोणतेही वेदनाशामक वा भूल देणारे द्रव्य देखील एवढ्या जलद काम करत नसावे. आश्चर्य वाटण्याएवढ्या चमत्कारिक चिकित्सा ग्रंथात वर्णन केल्या आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव जवळच्या वैद्याकडून घेणे महत्त्वाचे आहे.

    आयुर्वेद म्हणजे एक जीवनप्रणाली असल्याने, त्यात औषधांपेक्षा, आहार विहार जास्ती महत्त्वाचा ! तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आधीच पाणी शोधून ठेवावे, तसे रोग झाल्यानंतर उपाय शोधत बसण्यापेक्षा, रोग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगणारे हे शास्त्र !

    आयुर्वेद ही कोणतीही 'पॅथी' नाही. हे पुनः एकदा लक्षात घ्यावे. त्यामुळे 'औषधे' हा चिकित्सेतील गौण भाग आहे. औषधे ही पूरक म्हणून वापरली जातात. ( तशी वापरली जावीत. )

    जसजसा काळ बदलत गेला तसे आयुर्वेदातील औषधांमधे भर पडत गेली. सुरवातीला केवळ वनौषधींनी समृद्ध असलेली ही संपदा रसौषधींनी आणखीनच बहरत गेली. शरीरातील दोष ( पंचकर्माचा वापर करून ) काढून टाकून नंतर औषधांचा वापर केला गेला तर औषधे कमी पुरतात, हे अभ्यासले गेले. किंवा औषधे पुनः लागतच नाहीत, हे पण लक्षात आले. आणि रोग पुनः उद्भवू नयेत, यासाठी आहारविहारातील पथ्यापथ्य सांगितले गेले. व्यवस्थित पथ्यापथ्य पाळले तर औषधांची गरज कमी होते.

    औषधे मग ती कोणत्याही पॅथीची असोत, ती विकतच घ्यावी लागतात, दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. पण पथ्यापथ्याचे तसे नसते. माझा माझ्या मनावर विशेषतः जीभेवर संयम आणता आला की, बाहेरील अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत नाही. बाहेरील सर्व परिस्थितीवर मनःस्थितीने नियंत्रण आणता येते.

    काही वेळा औषधांची मात्र कमी पडते, काही वेळा अनुपान चुकते. अनुपान म्हणजे औषध ज्याच्या बरोबर घ्यायचे ते द्रव्य. अनुपानासोबत जर औषध घेतले की औषधांची क्षमता वाढते. आजच्या भाषेत सांगायचे तर कॅटेलिस्ट. जसे, कफाच्या आजारात मधासोबत, पित्ताच्या आजारात तुपाबरोबर, आणि वाताच्या आजारात तेल हे पूरक औषध म्हणून वापरले तर रोगाची लक्षणे झपाट्याने कमी होताना दिसतात. काही वेळा तर औषधांची गरजच उरत नाही, अनुपान हेच औषध ठरते. पित्तामुळे डोके दुखते, या आजारात केवळ सकाळी रिकाम्या पोटी तूप खाऊन वर दोन घोट गरम पाणी पिणे, हा घरगुती उपाय देखील चमत्कार घडवतो. (तूप म्हणजे गाईचे. आणि गाय म्हणजे भारतीय, हे पण विसरायचे नाय्ये हं. ) प्रकृतीनुसार किती काळपर्यंत हे घृतपान सुरू ठेवावे लागेल, याचा सल्ला अर्थातच वैद्य चांगला देऊ शकेल. { वैद्य म्हणजे सरकारी नोंदणीकृत आयुर्वेद पदवीधारक, ज्याचा अनुभव आणि ग्रंथाचा अभ्यास देखील उत्तम आहे, असा आप्त (आप्त म्हणजे ओळख असलेला, घरचा. पैशासाठी औषधांचा व्यापार न करणारा ) ही व्यक्ती देखील योग्य सल्ला देऊ शकतो. आज हे मुद्दाम सांगावेसे वाटते कारण वाॅटसपच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे असे आरोग्याचे संदेश देणाऱ्या स्वयंघोषित वैद्यांचे पेव खूप आलेले आहे. त्यात विश्वास कसा आणि कोणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मग तो नागरमुन्नळीचा असो वा मुरगुडचा, कोल्हापूर सारख्या शहरातला असो वा अन्य कोणत्याही खेड्यातला. }

    आपली प्रकृती काय आहे, कोणते औषध, कोणते अनुपान, किती दिवसांसाठी, कधी घ्यायचे आहे, त्याचे पथ्यापथ्य काय आहे, हे हे जाणकार वैद्यच चांगलं सांगू शकेल ना !

    नाहीतर घेतलेल्या औषधाचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी पुनः दुसरा वैद्य असे व्हायला नको !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    29.04.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक - चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही.- भाग दहा

    " जेनेरीक आणि ब्रॅण्डेड असं आयुर्वेदात नाही का हो भाऊ ?

    सध्या जेनेरीक आणि ब्रॅण्डेडचे वारे वाहाताहेत वाॅटसप वर ! म्हटलं आपल्या आयुर्वेदात असं काही असतं का ? आयुर्वेदातील काही औषध महाग असतात, म्हणून विचारतोय राग मानू नका."

    एका रुग्णाचा फोनवरून भाबडेपणाने विचारलेला एक सहज प्रश्न.

    खरंतर हाच विषय यापूर्वी गेल्या वर्षी वेगळ्या टायटलने येऊन गेला आहे. त्यावेळी टायटल होते, "स्वदेशी देशी आणि विदेशी !"

    एकदा अकबराने प्रश्न विचारला,
    सर्वात मोठे शस्त्र कोणते ?
    बिरबलाने नेहेमीप्रमाणे हजरजबाबी उत्तर दिलं, हाती असेल ते

    आयुर्वेदाला काय जेनेरीक काय ब्रॅण्डेड ! रुग्णाला गुण येणं महत्वाचे !

    न तु अहं कामये राज्यं
    न स्वर्गं न अपुनर्भवम्।
    कामये दु:खतप्तानां
    प्राणिनाम् आर्तिनाशनम्।।

    या श्लोकाचा अर्थ लक्षात घेतला कि औषधांच्या अर्थ व्यवस्थेत, काही अर्थ नाही हे लक्षात येईल.
    श्लोककर्ते म्हणताहेत,
    मला राज्य नको, मला स्वर्गातील इंद्रपदही नको, मला पुनः जन्म नको,
    ( मला कोणत्याही राजकीय पाठींब्याची गरज नाही, मला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह पण नाही, मला परत इलेक्शनलाही उभे राहायचे नाही, )
    रोगाच्या दुःखाने तप्त झालेल्या माझ्या रुग्णांच्या वेदना तात्काळ कमी करण्यासाठी जे काही करता येईल, ते मी करेन.
    ( पण समाजसेवा करण्यासाठी मला स्वतंत्र पक्षही काढायचा नाही, जे काही करायचे ते तुमच्याबरोबर राहून करेन, पण मला अढळपद द्यावे. )

    मी ज्या वैद्यकीय क्षेत्रात आहे, त्या आयुर्वेद शास्त्रामधील हे वचन विसरून कसे चालेल ? भले चार पैसे कमी मिळतील, कंठलंगोट बांधता येणार नाही, पायाला कापडी पिशवी गुंडाळायला जमणार नाही. (टाय आणि पायमोजे ) आणि भारतात गरज तरी काय ? तसं या ब्रॅण्डेड औषधांच झालंय.

    ह. अगदी फरक दाखवायचाच झाला तर ग्रंथोक्त आणि पेटंटेड असा दाखवता येईल. ग्रंथोक्त म्हणजे ग्रंथात जशी वर्णन केली आहेत तशी, जसे च्यवनप्राश. आणि मूळ औषधी फाॅर्म्युल्यामधे बदल करून सरकार दप्तरी नोंद केली ते पेटंट प्राॅडक्ट बनते, जसे आंबा फ्लेवर च्यवनप्राश किंवा सोन्यामारूती च्यवनप्राश इ. कितीही उत्खनन करून बघितले तरी यात सोनं आणि चांदी काही सापडणार नाही, पण किंमत मात्र चौवीस कॅरेटहून भारी.

    त्यामुळे ग्रंथोक्त औषधे खूप स्वस्त असतात, गुणवान असतात, आजच्या भाषेत 'टाईम टेस्टेड' आहेत, हजारो वर्षे झाली तरी त्रिभुवनकिर्तीचे नाव त्रिखंडात तसेच गाजतेय, किंवा ग्रंथोक्त सूतशेखरची घटकद्रव्ये तशीच आहेत, मग भारतातल्या कोणत्याही कंपनीने ही ग्रंथोक्त औषधे बनवली तरी फाॅर्म्युला तोच रहावा अशी सरकारची अपेक्षा असते. (आता आयुर्वेदीय औषधांचा क्वालिटी कंट्रोल हा संशोधनाचा भाग आहे, हे गृहीत धरले आहे. )

    आयुर्वेद महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येक वैद्याला दवाखान्यात आवश्यक असलेली औषधे, स्वतःची स्वतः तयार करता येतात, तेवढे प्रत्यक्ष ज्ञान त्याना महाविद्यालयाने दिलेले असते, (असे गृहीत धरलेले असते ) पण अन्य अभारतीय पॅथीमधली औषधे मात्र डाॅक्टर मंडळींना तयार करता येत नाहीत, त्यांच्या अभ्यासक्रमातील "औषध निर्माण" ही फार मोठी पोकळी आहे. त्यामुळे औषधांसाठी औषध कंपन्यावर अवलंबून रहाणे ही त्यांच्या व्यवसायाची गरज बनली आहे,

    पण आयुर्वेदात मात्र अगदी कच्च्या मालापासून तयार औषध बनवेपर्यंतची सर्व औषध निर्माण कृती शिकवली गेल्याने, अगदी घरच्या घरी देखील स्वस्त आणि मस्त औषधे, कोणत्याही आयुर्वेद पदवीधारकांना बनवता येतात. त्यामुळे आयुर्वेदीय औषध कंपन्यांची बनवेगिरी कमी होते, साहाजिकच स्पर्धा कमी होते.

    ब्रॅण्डेड वापरले नाही तर अवस्था जेनेरीकमधल्या त्या हिरो सारखी होते, असा एक फोटो व्हायरल होतोय. ब्रॅण्डेड म्हणजे खूप स्टॅण्डर्ड असा प्रचार मल्टीनॅशनल कंपन्याशिवाय आणखी कोण करणार ? यात नुकसान कंपन्यांचे होते आहे. डाॅक्टरांचे नाही. भारतातल्या डाॅक्टरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर नेम धरण्याचा कंपन्यांचा हा प्रकार आहे. इतकंच !

    शेवटी औषध ते औषध. हाती असेल तर माती सुद्धा औषध ठरते, असं सांगणाऱ्या आयुर्वेदात ब्रॅण्डेड आणि जेनेरीक असा भेद कसा असू शकेल ?

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    02362-223423.
    28.04.2017

  • राज्य हवं असेल तर स्वत:वर डाव घ्यायची तयारी ठेवा

    आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो.

    कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून बंडखोर काव्याची निर्मिती होत जाते.आपल्या शब्दांच्या कधी लाह्या होतात आणि आकाशातल्या सगळ्या चांदण्याची कधी जागा घेतात हे आपल्याला समजत नाही.मधूनच तत्वज्ञानाचे नवनवे फंडे आपल्या हातून जन्माला येतात.

    आपण या सगळ्यात एक साधी गोष्ट विसरून जातो की मुळात रखरखत्या उन्हात आपल्याला सावली मिळावी म्हणून नेहमी कुणीतरी ऊन झेलायलाच हवे असा काही दंडक होऊ शकत नाही.कधीतरी आपणसुद्धा आपल्या उन्हाची ख्याली-खुशाली विचारायला हवी.आपल्या उन्हानां आपल्याकडून होणाऱ्या विचारपुसेची आस लागून राहिलेली असते.बाकी सगळ्यांच्या स्पर्शापेक्षा त्यांना आपल्याकडून एक फुंकर अपेक्षित असते.आणि हे त्यांचे मागणं काही वावगं म्हणता येणार नाही.

    साऱ्या जगात कितीही कौतुक झाले. मानपत्रे मिळाली तरी गावाकडल्या पाठीवरल्या थापेपुढे त्यांना मोल नसते.आपल्याला आपल्या उन्हापेक्षा शेजारच्या अंगणातली सावली जादा भाजून काढत असते.जगात उन्हाच्या भाजण्यावर औषध मिळू शकते.पण सावलीच्या भाजण्याला काही कुठे आराम मिळत नाही.

    दुसरं असं होतं की आपल्याला सावली देणाऱ्या झाडाच्या फांद्या वठल्या की आपण त्यांचा हात अलगद सोडून देतो.आतापर्यंत केवळ त्यांच्यामुळे प्रत्येक नाजूक घडीला आपण सहीसलामत सुटलो याबद्दल आपल्याकडे कसलाही कृतज्ञपणा असत नाही.आणि कित्येकदा आपल्या कानावर पडणाऱ्या हाकांना आपण कृतघ्नपणे टाळून टाकत असतो. इथले सगळे व्यवहार केवळ देवाण-घेवाण अशा दोन बाजू असणार्या नाण्याच्या इशाऱ्यावर चालते हे सोयीस्करपणे विसरून जात असतो.

    दिलेल्या कडू गोळीच्या कडवटपणाचे वास्तव आपण स्वीकारत नाही. त्याला सामोरे जायची आपण हिंमत दाखवीत नाही.सत्य हे नागडे असायला हवे हे सत्य आपल्याला पचनी पडत नाही.वेगवेगळ्या वेशभूषा करून आपण कुणाला फसवीत होतो.याचं उत्तर आपल्या मानगुटीवर बसते तेव्हा आपल्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. आपण त्यावेळी स्वत:वर डाव घेण्यासाठी कबूल होऊन कितीही आर्जवे करीत गेलो तरी हाती काही लागत नाही.

    -- दीपक गायकवाड