वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गोष्ट आहे ऑक्टोबर १९८६ मधली. फिलीप्समधील कामासंबंधात हॉलंडमधील आईन्धोवेन या गावी दोन आठवड्यांसाठी जाण्याचा योग आला. तेव्हा ‘द नेदरलंड’ असे न म्हणता त्या देशाला हॉलंड असेच संबोधत असू. माझी यूरोपची ही पहिलीच वारी होती. दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे मला मधल्या शनिवार रविवारची सुट्टी मिळणार होती. माझा लहान भाऊ डॉक्टर असून आईसलंड या देशाचा रहिवासी आहे. कर्म धर्म संयोगाने, तो नेमका त्याच सुमारास वैद्यकीय परिषदेसाठी लंडनला येणार होता. मनात आले की मधल्या शनिवार रविवारच्या सुट्टीत लन्डनला जाऊन त्याला भेटावे. एक भाऊ पुण्याहून तर एक भाऊ आईसलंडहून एका तिसऱ्याच देशात भेटण्याचा योग आणायचा विचार ठरला. त्याकाळी मी स्वतः स्वखर्चाने परदेशात जाऊन भावाला भेटणे हे कल्पने पलीकडचे होते. त्या काळात परदेश प्रवास तसा दुर्मिळ होता आणि त्यामुळे या भेटीचे जास्त अप्रूप वाटत होते.
January 25, 2026
दिवस हा देवांचा आणि रात्र ही राक्षसांची, जंतुंची... सर्व शुभकार्ये दिवसा आणि सर्व निषिध्द कामे रात्रीची. कारण ?
..... त्यांचा रात्रीस खेळ चाले...
काही भारतीय धारणा अश्या आहेत, ज्याचा पुरावा दाखवता येत नाही. पण त्यांचे अस्तित्त्व भारतीय संस्कृतीला मान्य आहे. आता "अणु" कुठे दाखवता येतो ? ती धारणा आहे. दाखवता येणार नाही. गृहीत धरून विज्ञानातला अख्खा परमाणुवाद त्यावर सिद्ध झालाय. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा यावर संशोधन सुरू आहे. गाॅडस पार्टीकल ही त्यातूनच जन्माला आलेली संकल्पना होती. विज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी सिद्ध करायच्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे रात्रीस खेळ चाले.
अदृश्य शक्तींचे प्राबल्य सूर्यास्तानंतर वाढते. सूर्यास्त झाल्यावरच वनस्पती आपले श्वसन बदलवतात.
सूर्यास्तानंतरच पक्षी आपले खानपान थांबवतात.
सर्व प्रकारची शुभकार्ये सूर्यास्तानंतर वर्ज्य सांगितलेली आहेत. ही अंधश्रद्धा नाही. ही धारणा आहे. म्हणून लग्न, मुंज, बारसे, वास्तुशांत, होम, या सारख्या कर्मकांडापासून अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या अग्नियानाच्या प्रक्षेपणाची वेळ देखील सूर्यावर अवलंबून आहे. याला मुहुर्त असा शब्द आहे. पण या शब्दाची सुद्धा काहीजणांना अॅलर्जी आहे. भारतीय परंपरांना छेद देणारी विधान करणं म्हणजे बुद्धीवाद असे काहीजणांना वाटते, म्हणून फक्त सांगितले. असो.
तर रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्य अस्ताला गेल्यावर, तापमानात घट झाल्यावर, दमट वातावरणात, जंतुंचे प्राबल्य जास्ती असते. जे आपल्या स्थूल डोळ्यांना दिसू शकत नाहीत, असे अतिसूक्ष्म जंतु सूर्यास्तानंतर वाढतात. आपण प्रत्येक वेळी सूक्ष्मदर्शी यंत्र घेऊन जंतुंना शोधू शकत तर नाही ना. पण त्यांच्या उत्पत्तीच्या विशिष्ट जागा असतात. जंतुंची वाढ होण्यासाठी विशिष्ट तापमान लागते, विशिष्ट जंतुंना विशिष्ट जागा आणि विशिष्ट हवामानच लागते. हे सर्व वैज्ञानिक सिद्धांत भारतीय संस्कृतीला मान्यच आहेत, किंबहुना भारत हीच या विचारांची जन्मभूमी आहे. म्हणून तर आपल्याकडे शौच अशौच सिद्धांत सांगितला गेलाय.
घरामधल्या कोणत्याही खोलीपेक्षा संडासमधे अनेक प्रकारचे जंतु असतात, वाढतात, हे ओळखूनच मलविसर्जन घरापासून लांब, बाहेर करावे. मल विसर्जन करताना उकीडवे बसावे म्हणजे जंतुसंसर्ग कमी होतो. मलविसर्जन झाल्यानंतर केवळ मलद्वार आणि डावा हातच नाहीत तर दोन्ही पाय, चेहेरा, डोळे सुद्धा पाण्याने धुवावेत, त्यासाठीचे पाणी अगोदरच काढून तयार ठेवावे, ही शुद्धीकरणाची, अंगावरील जंतुसंसर्ग घालवण्याची शास्त्रीय पद्धत नव्हती काय ? पण आज छोट्या मोठ्या शहरात अॅडजेस्ट म्हणून संडास घरातच बांधले जातात, ( पूर्वी घरात खायचे आणि मागे परसाकडे जायचे, आता बाहेर खायचे आणि घरामध्ये येऊन मलविसर्जन करायचे. सुधारणा आणि विकास.)
मलविसर्जन करायला पुनः त्या भांड्यावरच फतकल मारून बसतात, कमोडवर सर्वात जास्त जंतु असतात, हे विज्ञानाने वारंवार सांगून देखील काटकोनात बसून मलविसर्जन. नंतर पाणी सुद्धा वापरत नाहीत. (काही ठिकाणी तर हात धुवायला सुद्धा !!) काहीजणांनी त्यातूनही पळवाट शोधत, आम्ही स्वच्छता करायला डावा हात सुद्धा घाण करत नाही, म्हणून भांड्यालाच जेट स्प्रे बसवलेले असतात.
संडासमधेच ब्रश देखील करतात, तिथेच वर्तमानपत्र, पुस्तक देखील वाचतात.... तिथला सगळा जंतुसंसर्ग परत सर्व घरात आणतोय ? याकडे या बुद्धीवादी वैज्ञानिक लोकांचे लक्ष जात नाही काय ?
पण कसं आहे, ते जे जे करतात, त्यावर काहीही विचार न करता, अनुकरण केले तरी चालते. असं लिहिलं तरी आम्ही (संस्कृतीरक्षक) पुराणमतवादी ठरतो. आहोतच. त्याचा राग न येता, उलट ते भूषणच वाटते.
या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
असो.
कोणतीही शुभकार्ये करताना पंचांगानुसार अग्निचे स्थान बघून केली जातात. तिथी, नक्षत्र, दिन, रास हे सर्व सूर्याच्या उदयानुसार बदलते. एवढे अनन्य साधारण महत्त्व सूर्याला असताना, केवळ वेळ होत नाही, सवडच नाही असल्या फुसक्या कारणांसाठी.....
...........जाणिजे यज्ञकर्म....... एवढे महत्त्वाचे कर्मकांड सूर्यास्त झाल्यावर करायचे ?
आता याला काय म्हणावे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.03.2017
March 15, 2017
पूर्वी जेवणाची पंगत घरातील असो किंवा सार्वजनिक समारंभातील असो, त्याचे बरेचसे पैलू हे Eco friendly असत. जेवणासाठी पत्रावळ किंवा केळीचे पान वापरले जाई. पान वाढल्यावर नैवेद्य दाखवताना पानाभोवती दोनवेळा ( मंत्रांसह ) पाणी फिरवले जाई. ( पितृकार्यामध्ये पानाभोवती थोडेथोडे भस्म टाकले जाई ). काहीजण याबरोबरच आपल्या उजव्या हाताला, भाताच्या छोट्याछोट्या राशी, चित्राहुती म्हणून घालत असत. या ” शास्त्रा ” मागील ” शास्त्र आणि अन्य गोष्टी ” पाहू या.
December 23, 2017
श्रीमद् आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे हे अर्थगर्भ षटक होय. सहा श्लोकांचे हे काव्य अद्वैत वादाचा गाभाच म्हणावयास प्रत्यवाय नसावा. त्याला ‘निर्वाणषटकम्’ किंवा ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी (म्हणजे आत्मा) काय नाही हे सांगून शेबटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे.
December 1, 2020
अश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल – व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे धनत्रयोदशी म्हटले जाते.
November 6, 2010
ब्रह्मा विष्णु महेश
तीन रुपें एक अंश
विश्वाचे तुम्हीं ईश
दत्तात्रय रुपांत ।।१।।
उत्पत्ति स्थिति लय
तीन कार्ये होत जाय
विश्वाचा हा खेळ होय
तुझ्या आज्ञेने ।।२।।
तीन देवांचे रुप निराळे
एकत्र होती सगळे
दत्तात्रय होऊन अवतरले
ह्या जगती ।।३।।
दत्त जन्मकथा
आनंद होई वदता
ग्रहण करावे एकचिता
सकळजण हो ।।४।।
तिन्ही लोक फिरुनी
नारद आले विणा घेऊनी
गाऊं लागले स्तुती करुनी
अनुसयेची ।।५।।
अत्रीऋषी पत्नी अनुसया
पतिभक्ती करुनिया
श्रेष्ठ ठरली जगी ह्या
तीन्ही लोकी ।।६।।
ब्रह्मा विष्णु महेश पत्नी
सावित्री लक्ष्मी पार्वती
मिळोनी चर्चा करिती
सती अनुसयेची ।।७।।
तिन्हीं देवी विनविती
आपआपल्या पती
सत्व परिक्षा घेण्याती
सती अनुसयेची ।।८।।
नष्ट करावा पतिधर्म
अतिथी बनोनी करावे कर्म
तिन्ही देवी सांगती हे मर्म
समजावूनी प्रभूंना ।।९।।
अत्रि ऋषींचा आश्रम
अतिथीसाठी विश्राम धाम
यज्ञ याग नि ईश्वर नाम
सतत चालत असे ।।१०।।
अनुसयेची अपूर्व भक्ति
पतिसेवा करुनी होय सती
प्रसन्न तिजवर त्रिमुर्ति
होत असे ।।११।।
अतिथीचे रुप घेतले
अनुसयेच्या द्वारी आले
भिक्षा तिज मागु लागले
विश्वचालक तिन्ही देव ।।१२।।
स्वागत केले अनुसयेने
पुजा केली तयांची तिने
भिक्षा आणली भक्तीने
अर्पिण्या तयांना ।।१३।।
तिन्ही अतिथी उठोनी
भिक्षा तिची नाकारुनी
जावू लागले परतोनी
आश्रम सोडून ।।१४।।
अनुसयें तयांना रोकले
भिक्षा स्विकारण्या विनविले
कांहीं जर असेल चुकले
क्षमा करावी ।।१५।।
देहावर कांहीही नसावे
ह्याला पवित्र समजावे
भिक्षा देत समयी विवस्त्र असावे
समजून घे तू अतिथीना ।।१६।।
विचीत्र अपेक्षा अतिथींची
ही सत्व परिक्षा अनुसयेची
तीच्या पवित्र पतिव्रतेची
ब्रह्मा विष्णू महेश कडून ।।१७।।
अनुसया महान सती
तपसामर्थाने समजून जाती
कोण असावे ते अतिथी
उमजून जाते अनुसया ।।१८।।
अतिथीचे मुल्य महान
अनुसयेने ते जाणून
येऊं द्यावे पति बाहेरुन
विनवितसे थांबण्यांसी ।।१९।।
वेळ नाही आम्हासी
जावयाचे आहे तिर्थासी
उशीर होइल पतीसी
म्हणून उठले अतिथी ।।२०।।
द्विधा झाली मनःस्थिती
एकीकडे धर्म अतिथी
दुसरे ठिकाणीं पतिव्रता सती
काय करावे सुचेना ।।२१।।
पुजेमधले तीर्थ घेतले
पतिदेवाचे स्मरण केले
बाहेर येऊन शिंपडले
अतिथीचे अंगावरी ।।२२।।
परमेश्वरी लिला महान
अतिथी झाले बाळे लहान
मातृत्व बहाल करुन
अनुसयेला ।।२३।।
गोजिरवाणी बाळे तिन्हीं
आलिंगती जवळ घेवूनी
स्थनपान तयांना करुनी
समाधान पावली अनुसया ।।२४।।
सर्व देवता बघती नारदासह
आकाशातून अनुसयेचा भाव
बालरुप तिन्ही देवांचा ठाव
तपोबल शक्तीने ।।२५।।
तिघी झाल्या विचलित
पतीना अणावे कसे परत
अडकले सती शक्ती जाळ्यांत
अनुसयेच्या ।।२६।।
उपाय नाही त्याला
समजूनी घ्यावे सतीला
विनवूनी मागावे पतीला
सुचविले नारदाने ।।२७।।
सावित्री लक्ष्मी पार्वती
निराश होऊन जाती
अनुसयेच्या द्वारी येती
आपल्या पतीसाठी ।।२८।।
तिन्ही देवींना बघूनी
आनंदाश्रु आले नयनीं
पूजा केली वंदन करुनी
अनुसयेने ।।२९।।
आमचे पती परत करावे
बालरुपातून बदलून द्यावे
विश्व चालविण्या मुक्त करावे
जगाच्या कल्याणा ।।३०।।
जावे आपले पती घेऊन
न्यावे तयांना ओळखून
अनुसये बाळे देवून
त्यांचे हाती ।।३१।।
न ओळखी आपले पती
तिघीजणीं निराश होती
बाळरुपें तयांची राहती
सती शक्तींमुळें ।।३२।।
विनवीती देवी तिन्ही
बालरुपें बदलोनी
पतिरुपे परत देऊनी
आम्हास द्यावे ।।३३।।
स्मरण करुनी पतिदेवाचे
शिंपीती तीर्थ पूजेचे
रुप मिळाले अतिथीचे
पतिधर्म शक्तीमुळे ।।३४।।
ब्रह्मा विष्णू महेश
दर्शन देती अनुसयेस
प्रसन्न होऊनी वर माघण्यास
आशिर्वाद दिला ।।३५।।
सार्थक झाले जीवनाचे
दर्शन मिळोनी तिन्ही देवांचे
वंदन करुनी त्या चरणांचे
अनुसया बोले ।।३६।।
थोर भाग्य लाभले मला
स्थनपान केले परमेश्र्वराला
तुम्ही माझे बाळ झाला
खेळला मांडीवरी ।।३७।।
अनुसया बोले सत्वरी
विनंती माझी श्रीहरी
तिघांनी यावे माझे उदरी
एकरुप होऊनी ।।३८।।
तथास्तु म्हटले प्रभूनी
जन्म घेतला दत्त म्हणूनी
त्रिमुर्तीचे रुप घेवूनी
अवतरले ह्या जगती ।।३९।।
देवून मान सती भक्तीला
मार्गशीर्ष शुक्ल पोर्णिमेला
दत्तात्रयाचा जन्म झाला
अनुसयेचे पोटी ।।४०।।
दत्तात्रया श्रेष्ट महती
गुरुचे ठायीं ते असती
गुरुसेवा धर्म नि भक्ती
दत्तात्रया पावत असे ।।४१।।
गुरुकृपे संकटे जाती
सकळजन सुखी होती
गुरुसी पुजिले दत्त पावती
हेचि मर्म जाणावे ।।४२।।
गुरु चरित्र ग्रंथ थोर
त्यात गुरु महिमेचे सार
पारायण करिता सत्वर
पावन होत असे ।।४३।।
दत्तात्रय कथा रोज वाचती
ध्यान तयांचे मनीं करती
दुःख दूर सत्वर होती
गुरु आशिर्वादें ।।४४ ।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
४- ०७११८३
January 3, 2018
पेट्रोलियम खनिज तेलाचा रंग व स्वरूप पाहता, त्याला ‘काळे सोने’ असे संबोधिले जाते. त्याची वाढती गरज लक्षात घेता, वास्तविक ते औद्योगिक क्षेत्राला ‘जीवन देणारे रक्त’ असं म्हटल्यास वावगे न ठरो. फार फार जुन्या काळापासून प्राणी व वनस्पतींच्या जमिनीत गाडल्या गेलेल्या अवशेषातून हायड्रोकार्बन तेले निर्माण झाली व ती जमिनीत तसेच समुद्राच्या तळाशी काळ्या जाडसर तेलाच्या स्वरूपात साचली गेली.
March 2, 2023
युती, आघाडी हे काही भारतीयांना नवीन नाही. अशा प्रकारच्या अनेक युत्या-आघाड्या अगदी रामायण-महाभारतापासून आपल्याकडे होतच आल्या आहेत.
June 24, 2017
नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै ।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै।।१२।।
आई जगदंबा महालक्ष्मीला वंदन करताना जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराज विविध विशेषणांचा उपयोग करीत आहेत.
त्यातून आई जगदंबेच्या विविध गुणांचे वैभव विशद करीत आहेत.
आचार्य श्री म्हणतात,
नमोऽस्तु नालीकनिभाननायै- नालीक शब्दाचा अर्थ आहे कमळ. नाल म्हणजे पोकळ दांड्यावर ते फुलत असल्यामुळे त्याला नालीक असे म्हणतात. निभ अर्थात प्रमाणे, सारखे तर आनन म्हणजे मुख.
अर्थात जिचे मुख कमळाप्रमाणे अतीव आकर्षक आहे अशी.
तिला नमोऽस्तु अर्थात नमस्कार असो.
नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै- दुग्ध म्हणजे दूध. उदधि म्हणजे सागर. दुधाचा सागर अर्थात क्षीरसमुद्र ही जिची जन्मभूमी आहे अशी.
समुद्रमंथन कथेचा संदर्भ यात घेतलेला आहे. उद म्हणजे पाणी आणि धी म्हणजे साठा या अर्थाने सागराला उदधी म्हणतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या सामान्य पाण्याच्या समुद्राप्रमाणे पुराणात दुग्धसागर,दधिसागर इक्षुसागर,मधुसागर यांचेही वर्णन आहे.
यापैकी क्षीर म्हणजे दुधाच्या सागरातून समुद्रमंथन प्रसंगी महालक्ष्मी प्रगटली आहे. त्यामुळे सागर ही तिची जन्मभूमी.
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै- याच सागर मंथनातून सोम म्हणजे चंद्र आणि अमृत निघाले असल्याने त्यांची सोदरा अर्थात एकाच उदरातून जन्माला आलेली, बहीण.
नमोऽस्तु नारायणवल्लभायै- भगवान श्री नारायण यांची वल्लभा अर्थात प्रियतमा असणाऱ्या आई महालक्ष्मीला नमस्कार असो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 21, 2020
देवाने याउप्पर मला इतर काही नाही दिलं तरी माझी काही तक्रार नाही, कारण मला मकरंदजी, मुसाजी आणि अशाच काही निस्वार्थ मित्रांचं जे देणं सरस्वतीच्या आशीर्वादाने मिळालंय, ते कुठल्याही लक्ष्मीपुत्राच्या नशिबात नाही..
April 24, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti