थोडीशी प्रेरणा – संघर्षयात्रा

ही कहाणी आहे वाशीम जिल्ह्यातील एका पाड्यावर राहणाऱ्या ध्येयवादी तरुणाची. वाशीम ही वाकाटकांची राजधानी होती. ही कहाणी काल्पनिक नाही. सत्यघटनेवर आधारित माझा एका ध्येयवादी विद्यार्थ्याची आहे.



ही कहाणी आहे वाशीम जिल्ह्यातील एका पाड्यावर राहणाऱ्या ध्येयवादी तरुणाची. वाशीम ही वाकाटकांची राजधानी होती.

स्पर्धा परीक्षेचे आजचे स्वरूप पाहता ही परीक्षा गोर-गरीब व आदिवासी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही असा बऱ्याच लोकांचा तसेच विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे.ग्रामीण भागातून आजही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होत आहे. आपले माननीय उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते सर हे त्याचे सध्याचे चालू उदाहरण आहे.

या कहाणीचा हिरो हा आपल्यासारखाच आपल्यापैकी एक असलेला स्वप्नाळू तरुण. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळेल या आशावादावर जगणारा व त्यासाठी मेहनत घेणारा तरुण आहे.ग्रामीण भागात आजही पाहिले तर स्पर्धा परीक्षा विशेषत एमपीएससीचा अभ्यास करणे म्हणजे एकतर बापाकडे भरपूर पैसा आहे किंवा आईबापाने पोराला वार्यावर सोडले आहे असे पाहणाऱ्याला प्रथमदर्शनी नक्की वाटल्याशिवाय राहत नाही. साहजिकच या तरुणाविषयी सर्वाना हेच वाटते.

निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे व माणुसकी काय चीज आहे हे लहानपणापासून पहात असल्याने यासारख्या तरुणांना प्रशासनात यावेसे वाटते.आता ही जरी समान प्रेरणा वाटत असली तरी ती तितकीच प्रामाणिक आहे.प्राणीमित्र व व उत्तम सर्पमित्र असणारा हा तरुण तितकाच भावूक आहे.जेव्हा सापांची तस्करी व अंधश्रध्देचे दर्शन होते त्यावेळी याविरुध्द तो आवाज उठवितो.जनजागृती करतो. तुकोबांची वचणे आचरणात आणण्याची विनंती करतो.

असाच एक दिवशी भटकत भटकत हा माझ्याकडे आला ज्यावेळी नुकतेच Whatsapp वर फ्री ग्रुप सुरु केले होते.अभ्यास कच्चा होता पण त्याचे प्रश्न मलाही विचार करण्यास भाग पाडत होते. दिवसेंदिवस तो कच्चा लिंबू आता पिकू लागला होता. विविध डिबेटमध्ये सहभागी होत आपली मते आपल्या भाषेत मांडत होता. कोणतेही कॉपीपेस्ट नव्हते त्यात. फक्त काहीतरी नवीन शिकण्याची उर्मी व आई वडिलांना सांगितले त्याचे शब्द ‘अच्छे दिन आयेंगे’.

कहाणीत Twist & Turn आता येतो.जेव्हा पेड ग्रुप सुरु करण्यात आले.तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी माघार घेत ग्रुप सोडून दिले.पण हा गरीब विद्यार्थी शिकण्यासाठी एक विनवणी करत होता “सर,मला ग्रुपमध्ये घ्या.मी पैसे आले की देतो”. हे सर्व घडत असतांना त्याच्याबद्दल मला फारसे माहीत नव्हते.जेव्हा त्याचा इतिहास भूगोल कळला तेव्हा मी सरळ शब्दात सांगितले आधी पैसे मग प्रवेश त्याशिवाय अपडेट्स मिळणार नाही.

मी असे का म्हणालो, याचा उलगडा त्याला काही दिवसाने झाला.घरची नाजूक परिस्थिती आई वडील कमावते नाही.अशात घरातील एक तरुण मुलगा फक्त अभ्यास करतो व घरची कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही व पैशाची मागणी करतो हे चूकीचे आहे.हे त्याच्या लक्षात आले.’स्वावलंबी शिक्षण हेच खरे शिक्षण’ हे कर्मवीरांचे वाक्य त्याला पटले.काही दिवसातच त्याने तालुक्यात एक नोकरी पत्करली व फी भरत प्रवेश घेतला.त्या दिवशी तो माझ्यापेक्षाही जास्त आनंदी होता.त्याला शाळेतील आवडती असलेली व आजही संपूर्ण पाठ असलेली कुसुमाग्रजांची कणा कविता मला म्हणून दाखविली.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

ही कहाणी इथेच संपत नाही,आता तर कुठे बी रुजले आहे.ते वाढत जाईल व त्याला झुबकेदार कणसं लागतील व या कणसातून टपोर दाणे निघतील.अशी दाणे जी दुनियादारीच्या गिरणीत भरडली जाणार नाहीत.तर तेजतन करून पुन्हा नव्याने जमिनीत रुजवून घेण्यासाठी.

साने गुरुजींनी मोठ्या सुंदर शब्दात प्रेम कुणावर करावे हे सांगितले आहे.

खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।। जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।। सदा जे आर्त ‍अति विकल जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे।।

मित्रांनो,प्रेम करा आपल्या आई-वडिलांवर जर तेआपले ATM होऊ शकतात तर आपण त्यांचे आधारकार्ड का होऊ शकत नाही.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.

(ही कहाणी काल्पनिक नाही. सत्यघटनेवर आधारित माझा एका ध्येयवादी विद्यार्थ्याची आहे)

— दीपक गायकवाड

Author