वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सुंदरमठ,शिवथर घळ
ए,बी फॉर्म हा शब्द प्रसारमाध्यमातून गेले दोन दिवस सारखा ऐकायला मिळतोय.हा ए-बी फॉर्म म्हणजे काय ? निवडणुकीत त्याचं महत्त्व काय हे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच.
आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवितात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून 'ए' फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरू शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून 'बी' फॉर्म दिला जातो. त्यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. जर पडताळणी दरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म 'एए' आणि 'बीबी' म्हणून ओळखले जातात.
राष्ट्रीय, राज्य पातळीवरील किंवा केवळ निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला कुठलाही पक्ष हे फॉर्म उमेदवाराला देऊ शकतो. उशिरात उशिरा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत हे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. तसंच पक्षाच्या शिक्क्यासह पक्षाचे प्रमुख, सचिव किंवा पक्षाने जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तीची सही त्यावर असणं गरजेचं असतं. संबंधित व्यक्तीच्या सहीचा शिक्का, झेरॉक्स चालत नाही. फॅक्सने पाठविलेले अर्जही ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवार जाहीर केल्यावर पक्ष संबंधित उमेदवाराला केवळ सही करून उमेदवाराचं नाव न टाकलेले अर्ज देऊन टाकतात.
एकाच मतदार संघातून एकाच पक्षाच्या अनेक उमेदवारांनी अर्ज करू नयेत म्हणून राजकीय पक्ष हे फार्म अधिकृत उमेदवारांना देतात.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.श्री.साळगांवकर
२६ मार्च १९६३ साली आजच्या दिवशी मंदारमाला नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
जय शंकरा गंगाधरा, जयोस्तुते उषा देवते... हरी मेरो जीवन प्राण आधार... अशा "मंदारमाला‘ या नाटकातील गाण्यांनी मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घातली होती. त्या काळी हे नाटक तुफान गाजले होते. संगीतभूषण रामभाऊ मराठे, प्रसाद रावकर, ज्योत्स्ना मोहिले, विनोदमूर्ती शंकर घाणेकर, पंढरीनाथ बेर्डे अशा दिग्गजांच्या गायन व अभिनयाने हे नाटक गाजले; त्याचे शेकडो प्रयोग झाले. त्या वेळी नाटकाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुधा करमरकर यांनी केले होते; तर संगीत दिग्दर्शन रामभाऊ मराठे यांचे होते. "मंदारमाला‘चे १९६३च्या गुढीपाडव्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘भारत नाट्य प्रबोधन संघा’ने हे नाटक परत रंगभूमीवर आणले. दादर येथील रंगमंदिरात नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. पहिले शंभर प्रयोग ‘रंगमंदिर’तर्फे झाल्यावर नाट्यनिर्माते राजाराम शिंदे यांच्या ‘नाट्यमंदार’ने हे नाटक चालवायला घेतले आणि ४०० प्रयोगांचा पल्ला कधी ओलांडला हे रसिकांनाही समजले नाही. संपूर्ण देशभर प्रयोग झाले. अडीच-अडीच महिने सलग दौरे होत. कधीकधी नाटकाचे दिवसाला तीन-तीन प्रयोग होत. या नाटकाचे असे एकूण १२००हून अधिक हाऊसफुल्ल प्रयोग झाले. या नाटकाद्वारे विद्याधर गोखले यांनी मोठ्या आणि आळवून आळवून म्हणावयाच्या नाट्यपदांच्या परंपरेला छेद दिला. लागोपाठ पदे येणार नाहीत अशी नाटकाची सुरेख मांडणी त्यांनी केली.चटपटीत संवादांदरम्यान ही रसाळ पदे गुंफली होती. पंडित मा.राम मराठे आणि मा.प्रसाद सावकार यांच्यातील ‘बसंत की बहार आयी’ ही अजरामर जुगलबंदी ऐकण्याला प्रेक्षक उत्सुक असत. त्यासाठी नाटक साडेचार तास चालले तरी ते चुळबूळ करीत नसत.
‘संगीत मंदारमाला’चं कथानक सतराव्या-अठराव्या शतकात राजपुतान्यातील असल्याचे गृहीत धरण्यात आलं आहे. आपल्याकडे जे ज्येष्ठ श्रेष्ठ गायक, बंदीशकार, नायक, विद्वान पंडित होऊन गेले त्यांच्यापैकीच काहींच्या जीवनातील मोजक्या प्रसंगांना विद्याधर गोखले कल्पनेची अफलातून जोड दिली आणि ‘मंदार’ या कमालीचा स्त्रीद्वेष असलेल्या, जीवनाला विटलेल्या, मात्र सप्तसुरांच्या नादब्रह्मात कायम रमणार्या आणि संगीत भक्तीच्याच बळावर मनपरिवर्तन झालेल्या अवलिया वनवासी संगीतकाराचा जीवनप्रवास ‘संगीत मंदारमाला’च्या रूपानं रसिकांसमोर आला अन् इतिहास बनून गेला. ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही या नाटकातील तोडी रागावर आधारित बंदिश आजही लोकप्रिय आहे. नाटकातील इतर पदांमध्येही पं. राम मराठे यांनी अनेक राग-रागिण्यांचा वापर केला. ज्योतकंस, अहिरभैरव, गौडमल्हार, बसंत बहार, बैरागी भैरव, तोडी, मालकंस, बिहाग, हिंडोल, भैरवी असे अनेक राग रामभाऊंनी चपखलपणे वापरले. ‘बसंत की बहार आयी’ या जुगलबंदीतील ‘चक्रधार’ हा तर त्यांच्या सांगीतिक गणिताचा उत्तम नमुना होता.
सोऽहम हर डमरू बाजे
https://www.youtube.com/watch?v=m8tWvVY6UTk
मंदारमाला नाटकातील इतर गाजलेली पदे
कोण अससि तू न कळे (राग जोगकंस, गायक राम मराठे)
जय शंकरा गंगाधरा (राग अहिर भैरव, गायक राम मराठे)
जयोस्तुते हे उषादेवते (राग देसकार, गायक राम मराठे)
तारिल हा तुज गिरिजाशंकर (राग हिंडोल, गायक राम मराठे)
तारे नहीं ये तो रात को (राग मिश्र खमाज, गायक प्रसाद सावकार)
बसंत की बहार आयी (राग बसंत आणि बहार, गायक राम मराठे आणि प्रसाद सावकार)
बुझावो दीप ए सजनी (राग मिश्र भैरवी, गायक प्रसाद सावकार)
हरी मेरो जीवनप्राण-अधार (राग मिश्र पिलू, गायक राम मराठे)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
(डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.)
भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा विषय नाही. तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच झालो.
शास्त्रीय संगीतामधे प्रत्येक रागाची ऐकण्याची वेळ ठरलेली असते. बरेचदा सकाळी ऐकायचा राग जर तुम्ही दुपारी ऐकाल तर तो ऐकतांना काहीतरी बिघडलंय याची जाणीव करून देतो, उगीच काहीतरी चुकल्या सारखं वाटतं. या उलट जर त्या – त्या वेळेसचा राग त्या त्या वेळी ऐकला तर तो सगळ्य़ा जाणीवांना स्पर्शून जातो. मी स्वतः याचा बरेचदा अनुभव घेतला आह . एवढ्यातलीच गोष्ट आहे, अश्विनी भिडे देशपांडे यांच्या एका पहाट मैफिलीला गेलो होतो. सकाळचा गारवा.. हेमंत ऋतू असल्याने मंद वारे सुरु होते. अश्विनी भिडे यांचा “कवन बदरीया गयो माई, कौन गली गयो शाम” रे मनवा सुमर हरी नाम.. सुरु केले आणि साधारण २० एक मिनिटांच्या नंतर आपोआपच डोळ्यात पाणी आलं. इतका आर्त स्वर लागला होता की तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही. योग्य वेळी योग्य राग आणि उत्कृष्ट वातावरण निर्मिती यामुळे हे शक्य होऊ शकते! संगीता मधे जी शक्ती आहे ती फक्त अनुभवाने च समजते. संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही.
एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी मा.आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ” पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत मा.भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना पंडित भीमसेन जोशींचा एक बडॊद्याचा अनुभव सांगितला .रात्रीची वेळ, भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत पूरियाधनाश्री गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर.. तेवढ्यात काहीतरी झालं आणि टांगा थांबला. लय थांबली, आणि त्या बरोबरच पंडीतजींचा आवाजही थांबला. टांगेवाला म्हणतो, ” पूरियाधनाश्री क्युं बंद किया? शुरु रखिये नां”.. आता एक टांगेवाल्याने कुठला राग आहे हे ओळखलेले ऐकून पंडितजींना खूप आश्चर्य वाटले, त्यांनी विचारले,” आपको , कैसे मालूम की ये धनश्री पुरीया है” त्यावर टांगेवाल म्हणतो, ” बाबूजी, हम फैय्याज खां साहब के पडॊसमे रहते, है, और हमेशा उनका रियाज सुनते हुए बडे हुए है, इतना तो मालूम रहेगाही नां…”
वरचा अनुभव म्हणजे त्या टांगेवाल्याच्या कानावर ऐकण्याचे संस्कार झाले होते. हा प्रसंग ऐकण्याचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे दाखवणारा आहे. गाणं म्हणणं जितकं महत्त्वाचं, तितकंच ते ऐकता येणं हे ही महत्त्वाचं. त्या टांगेवाल्याच्या कानावर गाणं ऐकण्याचे संस्कार झाले होते.गाणं कसं ऐकावं यातलं मर्म त्याला समजलं होतं. म्हणूनच तो पंडितजींना दाद देऊ शकला. योग्य वेळी जर योग्य राग ऐकला, तर त्याचा परिणाम जास्त होतो. बरेचदा चुकीच्या वेळेस ऐकलेले राग उगाच नकोसे वाटतात. तेंव्हा, रागाची वेळ सगळ्यात जास्त महत्त्वाची.
इंटरनेट वरून आपल्या सभासदांसाठी, कुठला राग केंव्हा ऐकावा याची माहिती देत आहे. या वर अधिक प्रकाश आपल्या सभासदांनी टाकावा.
सकाळी २ ते ४ :- सोहिनी, पारज
सकाळी ४ ते ६ :- ललित, भटीयार,भनकर
सकाळी ६ ते ८ :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा, विभास,गुनकली
सकाळी ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल
दुपारी १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,
दुपारी १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग
दुपारी २ ते ४ :- भिमपलासी, मुलतानी
दुपारी ४ ते ६ :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी, बरवा
सायंकाळी ६ ते ८ :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी,परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण, हमीर, यमन कल्याण, कलावती
रात्री ८ ते १० :- देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद,खमाज, कलावती
रात्री १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा ,कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती,
रात्री १२ ते २ :-अदना, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ इंटरनेट
शिवचरित्र जाणून घ्यायचे असेल तर शिवपुर्वकालीन देशस्थिती ज्ञात असणे आवश्यक वाटते.
शिवाजीराजांनी इतर साम्राज्यापेक्षा स्वराज्यात जनतेला वेगळं असं काय दिलं? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शिवपूर्वकाळाचा आढावा घ्यावा लागतो. शिवपूर्वकालीन हिंदुस्थानावर नजर टाकली तर बहुतांश भागांवर इस्लामचे आधिपत्य झाले होते हे लक्षात येईल. इथले सत्ताधीश स्वतःला इस्लामचे अनुयायी म्हणवत. अशा या सत्ताधीशांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोषाची भावना होती. या यावनी सत्तेचे स्वरूप हे प्रामुख्याने ' लष्करी ' होते. इथे आलेले इस्लामी लोक हे मूळचे अरबी , इस्लामचा संस्थापक मुहम्मद पैंगंबर इ.स.६६२ मध्ये मरण पावला. तोपर्यंत इस्लाम धर्मप्रसाराला वेगळा रंग चढला होता. मग धर्मवेडाने पेटलेल्या या अरबांनी पैंगंबरच्या मृत्युनंतर जगभर आक्रमणे करून सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. या आक्रमणाची एक लाट आठव्या शतकाच्या मध्यात इराण ओलांडून भारत व चीन पर्यंत पोहोचली.
इस्लामी दाहकतेच पहिला संबंध आला तो इ.स. ७११ मध्ये मुहम्मद बिन कासीमच्या वेळी, यावेळी सिंध प्रांताचा चा हिंदु राजा 'दाहीर' याचा पराभव झाला.या स्वारीची जी वर्णने उपलब्ध आहेत त्यावरून हजारोंच्या कत्तली करणे,गुलाम म्हणून जनतेला कैद करणे,स्त्रियांचा छळ अशा प्रकारे विध्वंस माजवला.सुदैवाने हा मुहम्मद कासीम सिंध प्रांत ओलांडून दक्षिणेकडे आला नसल्याने त्याची दाहकता भारतातील इतर भागांना पोहोचली नाही. सुदैवाने या स्वारीनंतर हिंदुस्थान सुमारे ३०० वर्ष इस्लामी आक्रमणांपासून मुक्त राहीला. पण त्यानंतर इस्लामी आक्रमणे येतच गेली त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ .
महमुद गझनवी (इ.स. ९९८-१००२) - याने भारतावर एकूण १७ स्वाऱ्या केल्या त्यात प्रचंड मानवी संहार आणि लुट , मंदिरे उध्वस्त केली,स्त्रीयांचा अमानुष छळ केला.गुजरात मधील भव्य आणि प्रसिद्ध सोमनाथ मंदिर पाडले.
मुहम्मद घोरी (इ.स.११७५-१२०६) - नुसती लुट न करता इथेच सत्ता स्थापन करावी या उद्देशाने घोरी भारतावर आला, याने इस्लामचा पाया घालुन दिल्लीस सूलतानशाहीची स्थापना केली, यानंतर तब्बल एक लाख लोकांची हत्या करून दबदबा निर्माण केला.
अल्लाउद्दीन खल्जी - (इ.स.१3१३-१३१६) : खल्जी घराणे भारतात आले त्यावेळी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव राज्य करत होते. खल्जी वंशातल्या या अल्लाउद्दिनने विचित्र कायदे केले -हिंदुनी घोड्यावर बसू नये, हत्यार बाळगु नये, मौल्यावान पोषाख घालु नये असे कायदे केले, मूर्तीपुजेस बंदी , जिझिया कर लादून अमानुष छळ केला.
मुहम्मद तुघलक - (इ.स.१३२५-१३५१) हा तुघलक विक्षिप्त म्हणून प्रसिद्धच होता, याने जनतेवर एवढे कर बसवले कि गरीब जनता पार धुळीस मिळाली, श्रीमंत बंड करून उठले. दुष्काळी परिस्थितीत गावच्या गाव ओसाड झाली.
तैमुर -(इ.स.१३७२-१४०५) दिल्लीच्या लढाईत तुघ्लूकाचा पराभाव झाला आणि दिल्ली शहर तैमुरच्या हाती सापडले, उपलब्ध वर्णनानुसार सतत पाच दिवस त्याने दिल्ली रक्ताने धुवून काढली.
बाबर -(इ.स. १५२६ -१५३०) मुघल राजवाटीची मूळ सुरवात बाबरच्या भारत स्वारी पासून झाली.यानेही जनतेचे अतोनात हाल करत काफिरांच्या(हिंदूंच्या) शिरांचे पहाडीवर मनोरे रचून विजयोत्सव केला, स्त्रियांचा छळ, तसेच मंदिरे पडून तिथे मशिदी बांधल्या.
अकबर -बाबरची राजसत्ता पुढे कायम करत अकबरने असंख्य हिंदूंचे सक्तीचे धर्मांतर केले , पुढे चितोड हत्याकांडात जे राजपूत ठार केले , या मृत शरीरांवरून जमा केलेल्या जाणवांचे वजन तब्बल ७४ मण भरले एवढा संहार केला.अशीच भयंकर आणि दाहक कारकीर्द पुढे जहांगीर ,शाहजहान यांनी चालू ठेवली.
शिवपूर्वकाळात सर्व शाह्यातील सुमारे ७२ सुलतानांनी सतत तीन शतके महाराष्ट्र आपल्या जुलूमांनी भरडून काढला.
शिवपूर्वकाळात भारतात तथा महाराष्ट्रात अनेक हिंदु राजे होऊन गेले, पुढे यावनी आक्रमणात अनेकांनी कडवा प्रतिकार देखील केला.
महाराष्ट्रात सातवाहन-वाकाटक - राष्ट्रकुट - चालुक्य - शिलाहार -कदंब या राजवंशानी राज्य केले. त्याबद्दल थोडक्यात माहिती आता पाहु -
सातवाहन - (इ.स.पुर्व २३२ ते ~ इ.स. २१०) सातवाहनांचे वैशिष्टय असे की त्यांची सागरावर सत्ता होती. पैठण ही त्यांची पहिली राजधानी.याकाळात प्रजा आनंदी, स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य व प्रतिष्ठा होती. याच काळात शालीवाहन शक या कालगणनेचा उदय झाला.
वाकाटक - (इ.स. २४८ ते ~इ.स. ४९३) यांनी विदर्भात सत्ता स्थापन केली.त्यांच्या काळात धर्म , विद्या , कला , स्थापत्य, शिल्प यांना महत्व होते असे दिसते.
चालुक्य - (इ.स.५०० ते ७५०) हे घराणे मूळचे अयोध्येकडील.वाकाटकानंतर चालुक्य राजवंशाने सुमारे २५०वर्षे राज्य केले.शिल्पकलेत चालुक्य शैलीची मंदिरे , शिल्पे उत्कृष्ट समजली जातात.
राष्ट्रकुट - (इ.स.७५० ते ९८३) चालुक्यानंतर राष्ट्रकुटांनी २०० वर्षे राज्य केले. याच काळात जगप्रसिद्ध कैलास लेणे खोदले गेले. हे यांच्या कारकिर्दीतच मुसलमान व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर उतरले. राष्ट्रकुटांच्या काळातच संस्कृतीला विकृत स्वरूप येऊ लागले.सोवळे- ओवळे, देवदासी, विधवा केशवपन व सतीची चाल हळू हळू रूढ झाली. सातवाहनकाळातील महाराष्ट्राचा वैभवसूर्य राष्ट्रकुटांच्या काळात ढळू लागलेला दिसतो.
शिलाहार - (इ.स. ८२५ ते १२६५) या राष्ट्रकुटांनंतर महाराष्ट्रावर चालुक्य, कदंब आणि शिलाहारांचे राज्य आले. कादंबांचे आरमार हा एक अभ्यासाचा विषय आहे. एकाचवेळी या सत्ता निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करीत होत्या. कोकणात शिलाहार राज्य करीत , शिलाहारांचे वैशिष्टय म्हणजे बळकट डोंगरी किल्ले बांधण्याचा पहिला घाट त्यांनी घातला
यादव - (इ.स. ११७८ ते १३१८) देवगिरीकर यादवांनी शिलाहार व कदंब यांना जिंकून सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली. यादव हे यदुवंशीय आणि राजभाषा मराठी, सुवर्ण गरुडध्वज हे यादवांचे निशाण होते. १२२८ मध्ये पुंडलीकाने पंढरपुरी श्री विठ्ठलाची स्थापना केली. पुढे रामचंद्रदेव राजाच्या कारकिर्दीत संत ज्ञानेश्वरांनी हा काळ अविस्मरणीय केला. पण हा सुखद काळ जास्त दिवस टिकला नाही. रामदेवराय राजाच्या कारकिर्दीत दिल्ली सुलतानाचा पुतण्या (आणि जावई) ' अल्लाउद्दिन खल्जी ' देवगिरीवर चालून आला. दुर्दैव हे की यावेळी रामदेवपुत्र 'शंकरदेवराय' दक्षिणेत सैन्य मोहिमेवर घेऊन गेला होता.अशा परिस्थितीत हे यावनी आक्रमण यादवांना सोसले नाही आणि यादवांचा गरुडध्वज पडला.तब्बल २०० वर्षांची उज्वल परंपरा लाभलेलं देवगिरीच वैभवशाली साम्राज्य अवघ्या १५-२० दिवसात कोसळले. यादव साम्राज्याचा अस्त झाल्यावर पुढे ३०० वर्ष इस्लामी राजवटीचा वरवंटा फिरतच राहिला.
यापुढील प्रदीर्घ काळात.बहमनी, तुघलक, खल्जी, निजामशाही, आदिलशाही, बरिदशाही , इमादशाही, मोगल, पोर्तुगीज यांनी थैमान घातले.शिवपूर्वकालीन हिन्दुस्थानाचे इस्लामी राजवटीचे स्वरूप नुसते वरवर न्याहाळले तरी शिवपुर्वकालीन भारत कोणत्या बिकट आणि विचित्र परिस्थिती मधून जात होता आणि शिवाजीराजे जन्माला नसते आले तर काय परिस्थिती उद्भवली असती हे आता कोणालाही उमजू शकेल.
रोहित पवार
संदर्भ :
शककर्ते शिवराय (खंड १) - विजयराव देशमुख
श्री राजा शिवछत्रपती - गजानन मेहेंदळे
मुसलमानपुर्व महाराष्ट्र - वा.कृ. भावे
शिवकालीन महाराष्ट्र - वा.कृ. भाव
श्रीनिवास जोशी हा माझ्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा होता. आम्ही सर्व त्याला श्री म्हणायचो. त्याचा नंबर नेहमी फक्त वर्गातच नव्हे तर आख्या शाळेत पण पहिला असायचा. मी त्यामूळे मुद्दामुच त्याच्याशी दोस्ती करून घेतली होती. प्रशांत कासट हा आमच्या वर्गातला दुसरा मुलगा होता. तो म्हणजे विरुद्ध टोक होता कारण तो ‘ढ’ कॅटेगरीतला होता. तो दरवर्षी कसा बसा काठावर पास होत वरच्या वर्गात चढत आला होता. त्याच्या वडिलांचे वाण्याचे दुकान होते. ते माझ्या घराजवळ असल्यामूळे अनेक वेळा आम्ही त्याच्या दुकानातून किराणा माल आणत असु. बहुतेक संध्याकाळी तो दुकानाच्या गल्यावर बसलेला दिसे. वर्गातील मुले त्याला ‘वाणी’ म्हणून चिडवायची. माझी आणि प्रशांतची मात्र चांगली मैत्री जमली होती.
मॅट्रिकची परिक्षा ही त्यावेळी आयुष्यातील अत्यंत महत्वाची परिक्षा म्हणून ओळखली जात असे. त्यावेळी 11 वी ला मॅट्रिक असायचे. पुढील सर्व शिक्षण या परिक्षेतील मार्कांवर ठरायचे. त्यावेळी बोर्डात टॉपला आलेल्या पहील्या 30 मुलांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायची. त्याला ‘मेरिट लिस्ट’ म्हणायचे. मेरिटमध्ये येणे हा फार मोठा बहुमान समजला जायचा. अमच्या वेळच्या मॅट्रिकच्या परिक्षेमध्ये श्रीने सर्व रेकॉर्ड्स तोडली. तो फक्त आमच्या शाळेतच नव्हे तर आख्या पुणे शहरात पहिला तर आलाच पण बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये पण चौथ्या क्रमांकावर झळकला. अर्थात आम्हाला याचा सार्थ अभिमान वाटला. प्रशांत मात्र कसा बसा 51 टक्के मार्क मिळवून सेकंड क्लासमध्ये पास झाला.
अपेक्षेप्रमाणे श्री इंजिनिअरींगकडे गेला. बी. ई. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल झाला. इथे पण तो युनिव्हर्सिटी टॉपर होता. पुढे त्याला पुण्याच्याच एका चांगल्या कारखान्यात नोकरी मिळाली. आपल्या गुणांवर चढत चढत तो दहा वर्षांच्या आतच कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर झाला. स्वतःचा फ्लॅट घेतला, गाडी घेतली, लग्न केले. प्रशांत मात्र कॉमर्सला गेला पण त्याला काही शिक्षण पुरे करता आले नाही. तो सेकन्ड इयरला असताना त्याचे वडील आजारी पडले. तो घरातील सर्वात मोठा असल्याने दुकानाची जबाबदारी त्याच्यावर पडली. त्यामूळे शिक्षण अर्धवट सोडून त्याला वडिलांच्या धंद्याची जबाबदारी घ्यावी लागली.
श्रीने अचानक नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस सुरु केल्याचे मला कळले. त्याला कुठल्यातरी इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्सची एजन्सी मिळाली होती. श्रीने हातात असलेली चांगली नोकरी सोडून बिझनेस चालु करणे ही गोष्ट टिपिकल मध्यमवर्गीय मेन्टॅलिटी असलेल्या मला काही फारशी रुचली नाही. एकदा मला तो त्याचे ऑफीस दाखवायला घेऊन गेला. त्याचे ऑफिस एकदम पॉश होते, केबीनला ए.सी. बसवलेला होता. बाहेर सुरेख रिसेप्शनिस्ट होती. श्री सुट, बूट टायमध्ये होता. तो रुबाबात त्याच्या गाडीतून ऑफीसमध्ये येतो असे मला कळले. प्रशांतने मात्र काहीतरी वेगळाच उद्योग सुरू केला होता. त्याने भोसरीला स्वतःचे वर्कशॉप काढल्याचे मला कळले. धाकटा भाऊ हाताशी येताच त्याच्याकडे दुकानाची जबाबदारी सोपवून प्रशांतने हा नवीन उद्योग सुरू केला होता. त्याला वर्कशॉपमधले काही कळते का असा यक्षप्रश्न माझ्यापूढे होता. तो रोज मला त्याच्या जुन्या व्हेस्पा स्कुटरवर वर्कशॉपमध्ये जाताना दिसे. बहुतेक वेळा जेवणाचा डबा पण बरोबर असे. त्याच्या एकूण अवतारावरून त्याचे काही फारसे बरे चालले नसावे असे मला वाटे. असे असुनही अधुन मधुन आमची भेट होत असे आणि कोपर्यासवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला म्हणून आम्ही जात असु. कारण तेथील फिल्टर कॉफी लाजबाब असे.
श्रीने अचानक त्याचा धंदा बंद केल्याचे मला कळले. कारण विचारले तेव्हा धंद्यामध्ये लॉस होतो असे सांगीतले. तो नोकरीच्या शोधात आहे असे पण मला कळले. पण तो जेव्हा प्रशांतच्या वर्कशॉपमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरीला लागल्याचे मला कळले तेव्हा धक्काच बसला. आमच्या वर्गातील सर्वात हुषार मुलगा आमच्याच वर्गातील एका ‘ढ’ मुलाच्या कंपनीत काम करतो ही गोष्ट, नाही म्हटले तरी मला पचवणे अवघडच गेले. पण श्री लागल्यापसून प्रशांतच्या कंपनीत लक्षणीय बदल घडू लागले. प्रशांतने आपनी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि श्रीला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर केले. प्रशांतच्या वर्कशॉपची वेगाने तरक्की होत असल्याची लक्षणे मला दिसू लागली. प्रशांतने वडिलांचे जुने घर पाडून तेथे चार मजली पॉश इमारत उभी केली, मर्सिडिझ गाडी घेतली. जुन्या व्हेस्पा स्कुटरवरून फिरणारा प्रशांत आता मर्सिडिझमधून फिरू लागला. एक उद्योजक म्हणून तो ओळखला जाऊ लागला. तरी सुद्धा माझ्यासाठी तो पुर्वीचाच प्रशांत होता. अजुनही आम्ही कोपर्यािवरच्या उडप्याकडे कॉफी प्यायला जात होतो.
एकदा आम्ही असेच कॉफी प्यायला बसलो होतो तेव्हा श्रीचा विषय निघाला. अर्थात श्रीमुळेच आपली तरक्की झाल्याचे प्रशांत नेहमीच आवर्जून सांगायचा. यावेळचा विषय मात्र श्रीच्या बिझनेसचा निघाला. त्याने बिझनेस बंद का केला हे कोडे मला काही उलगडत नव्हते. मी प्रशांतला याचे कारण काय असेल असे विचारले.
‘कारण त्याला 1000 X 1000 हा फॉर्मुला ठाऊक नव्हता म्हणून!’ प्रशांतने उत्तर दिले.
‘ हा कसला फॉर्म्युला?’ मी प्रशांतला विचारले.
‘हा फॉर्मुला मला माझ्या वडीलांनी लहानपणीच शिकवला होता! माझे वडील फक्त सतवी पर्यंतच शिकलेले होते. पण त्यांचा हा फॉर्म्युला अगदी अचूक निघाला!’ प्रशांत म्हणाला.
‘हा कसला फॉर्म्युला आहे? मला जरा नीट समाजाऊन सांग ना!’ मी प्रशांतला म्हणालो.
‘माझे वडील म्हणायचे कि जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील पहीले 1000 दिवस, म्हणजे 3 वर्षे अत्यंत महत्वाची असतात. मूल या तीन वर्षतच खरी प्रगती करते. म्हणजे ते आधी कुशीवर वळायला लागते, मग पालथे पडायला लागते, पोटावर सरकायला लागते, रांगायला लागते, धरून धरून उभे रहायला लागते, चालायला लागते, पळायला लागते, बोबडे बोबडे बोलायला लागते. पण याच काळात त्याची तब्येत पण नाजूक असते. ते वारंवार आजारी पडत असते. त्याला सारखा ताप येत असतो. सर्दी, पडसे, खोकला होत असतो. इन्फेक्शन होत असते. दात येताना त्रास होत असतो. याच काळात त्याला अनेक लशी टोचण्यात येतात, पोलियोचा डोस द्यावा लागतो. त्याची काळजी घ्यावी लागते. मी सुद्धा लहानपणी बराच आजारी असायचो अशी माझी आई मला सांगते. पण मूल वारंवार आजारी पडते म्हणून काही कोणी त्याला मारून टाकत नाही!’ प्रशांत मला सांगत होता पण याचा श्रीच्या बिझनेसशी काय संबंध असा प्रश्न मला वारंवार पडत होता.
‘वडील म्हणायचे की जे मूल 1000 दिवस जगते ते मूल पुढे 1000 महिने म्हणजे 84 वर्षे जगू शकते. थोडक्यात आपल्याला जर दिर्घायुष्य मिळाले तर त्याचे खरे श्रेय पहिल्या 3 वर्षांत आपले कसे पालन पोषण झाले याला असते. माझे वडील याला 1000 गुणीले 1000 फॉर्म्युला म्हणायचे. हाच फॉर्म्युला बिझनेसला पण लागू असोतो!’ प्रशांत म्हणाला
‘ते कसे काय?’ मी प्रशांतला विचारले.
‘तुम्ही जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरू करता तेव्हा एखादे नवीन मूल जन्माला घालण्यासारखेच असते. याचे पहीले 1000 दिवस फार महत्वाचे असतात. या काळात जरी धंदा वाढत असला तरी याच काळात धंद्यात अनेक अडचणी येत असतात. अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागत असते. याच काळात फसवणारी, टोप्या घालणारी माणसे भेटत असतात. तुमचे स्पर्धक तुम्हाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच तुम्हाला मदत करणारे लोक पण याच काळात भेटत असतात. आता माझेच बघना! मी जेव्हा वर्कशॉप सुरु करायचे ठरवले तेव्हा वडिलांनी एकच अट घातली. कोणत्याही परिस्थितीत 1000 दिवसांच्या आत वर्कशॉप बंद करायचे नाही. जसे असेल तसे चालू ठेवायचे. माझे पहिल्यांदा खूप हाल झाले. एकतर मला वर्कशॉपमधले काही ठाऊक नव्हते. लेथ म्हणजे काय, मिलींग मशीन कशाला म्हणतात, ग्राईंडरचे काय काम असे मला काही म्हणजे काही ठाऊक नव्हते. ट्रॉब सारखे मशीन तर मला स्वप्नवटच वाटायचे. ज्या पार्टनरबरोबर वर्कशॉप सुरू केले त्याने टोपी घातली. जे वर्कर्स होते ते बेकार निघाले. वर्कशॉपमध्ये चोर्याॉ व्हायच्या. फसवाफसवी तर मोठ्या प्रमाणावर होत होती. अनेक वेळा वाटायचे की कुठून या फंदात पडलो. पण वडीलांना वचन दिले होते त्याप्रमाणे वर्कशॉप चालू ठेवले. आज त्याचे काय झाले हे तू बघतो आहेस! आता आमचा 1000 दिवसांचा काळ संपला असून आता 1000 महिन्यांच्या काळात आम्ही आलो आहोत. माझ्या वडीलांच्या दुकानाची पण हीच कथा आहे. माझ्या वडिलांना पहिल्या 1000 दिवसांमध्ये दुकान चालवायला फार त्रास पडला. आज आमच्या दुकानाला 55 वर्षे पूर्ण झाली असून अजून 30 वर्षे तरी आमचे दुकान व्यवस्थीत चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. माझ्या भावाने तर आता दुकानाचे रुपच पालटून टाकले आहे. आता आमच्या दुकानाचे रुपांतर भव्य स्टोअरमध्ये झाले असून लवकरच त्याचे मॉलमध्ये रुपांतर होणार आहे!’ प्रशांत म्हणाला आणि थोडे थांबून बोलू लागला
‘श्री जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा मी फक्त त्याच्या धंद्याचीच चौकशी केली आणि माहिती घेतली. माझ्या लक्षात आले की त्याचा धंदा चांगला चालू होता. पण त्याने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमूळे त्याला धंद्यात खोट बसली होती. म्हणून त्याने घाबरून धंदा बंद केला. थोडक्यात त्याने त्याचे मूल 1000 दिवसांच्या आतच मारले. त्याने जर त्याचा धंदा 1000 दिवस चालू ठेवला असता तर नक्कीच तो यशस्वी झाला असता आणि त्याचा धंदा 1000 महिने चालू शकला असता. पण त्याच्यात पेशन्सची कमी आहे हे माझ्या लक्षात केव्हाच आले आहे. असो’
मी जेव्हा कॉफी शॉप मधून बाहेर आलो तेव्हा माझ्या डोक्यात सतत 1000 X 1000 हा फॉर्मुला घोळत होता.
जी गोष्ट केवळ सातवीपर्यंत शिकलेल्या प्रशांतच्या वडिलांना ठाऊक होती तीच गोष्ट ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युउट, डॉक्टरेट तसेच युनिव्हर्सिटितले टॉपर असलेली मराठी मंडळींना अजुन सुद्धा का समजत नाही हे कोडे मला तरी उलगडलेले नाही.
अर्थात 1000 X 1000 हा फॉर्म्युला वापरून बिझनेस करायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे!
उल्हास हरी जोशी,
मोः-9226846631
शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्याच शेतकर्यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते. चौकशी केली तर आमची शेळी आपली साधी गावरान शेळी आहे, असे मोघम उत्तर दिले जाते. शेळींच्या जातींचा आणि प्रजननाचा विचार केल्याशिवाय शेळी पालन कधीही यशस्वी आणि ङ्गायदेशीर होणार नाही. चार-पाच किंवा ङ्गार तर दहा-बारा शेळ्या पाळणार्यांना ङ्गायद्या-तोट्याचा विचार ङ्गारसा करावा लागत नाही. कारण त्यांच्या शेळ्या बिनखर्ची पाळल्या जात असतात. काही शेतमजूर आपल्या सोबत चार-दोन शेळ्या घेऊन कामावर जातात. त्या शेळ्या दिवसभर इकडे तिकडे चरतात. त्यामुळे त्यांच्या चार्यावर वेगळा खर्चच करावा लागत नाही. त्यामुळे जे काही उत्पन्न मिळते तो ङ्गायदाच असतो. अशा लोकांना शेळ्यांची प्रजनन क्षमता, त्यांच्या क्षमतेत होणारी वाढ वगैरे मुद्यांचा विचार करण्याची गरजच पडत नाही. परंतु अशा चार-दोन किंवा दहा-बारा शेळ्या पाळणारे लोक आपल्या शेळ्यांना किती पिली होत आहेत आणि किती व्हायला पाहिजेत याचा कधी विचारच करत नाहीत. मग हळु हळु त्यांच्या शेळ्यांना होणार्या पाटींना एकेकच पिलू व्हायला लागते. त्याचे वजनही म्हणावे तसे भरत नाही.
हा सगळा त्या शेळीच्या वंशाचा होणारा र्हास असतो. त्याचे कारण काय ? थोडे समजून घेतले पाहिजे. आपल्या शेळ्यांच्या छोट्याशा खांडामध्ये सात-आठ शेळ्या आणि दोन-तीन बोकड असतात. त्या शेळ्यांच्या पोटी बोकड जन्माला आले की, आपण जुनी बोकडे विकून टाकतो आणि पुढे आपल्याकडे असलेले बोकड मोठे झाले की, त्यांचा त्याच खांडातल्या शेळ्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या शेळ्या यांच्याशी संबंध येतो. थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते बोकड त्या शेळीचे मूल आहे आणि त्यातल्या काही शेळ्यांचा भाऊ आहे. शरीर संबंधाच्या बाबतीत माणूस जसा विचार करतो तसा शेळ्या करत नाहीत. परंतु आपण त्यांच्या बाबतीत तसा विचार केला पाहिजे आणि आपल्याच खांडातल्या बोकडांचा आपल्याच खांडातल्या शेळ्यांशी म्हणजे एकाच कुटुंबातल्या शेळ्यांशी संबंध येऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. तशी न घेतल्यामुळे त्या शेळ्यांचा वंश दर्जेदार होत नाही. पुढे पुढे त्यांची क्षमता कमी कमी होते. यावर उपाय काय ? आपल्याच गावामध्ये आपल्यासारखे कोणी शेळीपालक असतील तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे शास्त्र पटवून दिले पाहिजे आणि बोकडांची आपापसात अदलाबदल केली पाहिजे. तर शेळी पालन ङ्गायदेशीर ठरू शकते.
महाराष्ट्रात सध्या मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळींची पैदास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे डॉ. वसंतराव मुंडे, उस्मानाबाद (ङ्गोन ९४२२५६५३६५) हे नेहमी शेळ्या पाळणार्यांना एक आव्हान देत असतात. ‘२५ शेळ्या पाळा आणि मारुती कार पळवा’ अशी त्यांची घोषणा आहे. मात्र या २५ शेळ्या अभ्यासपूर्ण रितीने पाळल्या पाहिजेत, असा त्यांचा कटाक्ष आहे. आपण आता केलेला बोकडांच्या अदलाबदलीचा विचार याच दृष्टीने महत्वाचा आहे. शेळी पालनाच्या शास्त्राची माहिती असणे हा व्यवसाय ङ्गायद्यात चालण्यासाठी आवश्यक असते. कारण शेळी हा सजीव प्राणी आहे. अनमानधपक्याने किंवा अंदाजपंचे हा व्यवसाय केला तर तो कसाबसा चालू शकेल. पण त्यात ङ्गारसा ङ्गायदा होणार नाही. तो शास्त्रीय पद्धतीने केला तर मात्र तो शेतकर्यांच्या जीवनाचा मोठा आधार बनू शकतो. काही शेतकरी अक्कलहुशारीने हा व्यवसाय करत असतात. काही लोकांनी या संबंधात माहिती दिलेली आहे. मुस्लीम समाजाच्या बकरी ईद या सणामध्ये प्रत्येक कुटुंबात एक तरी बळी देवाला दिला जात असतो. तो साधारणत: बकर्याचा असतो. त्यामुळे बकरी ईद दिवशी बोकडांची मोठी टंचाई जाणवत असते. अक्षरश: बोकडासाठी तू मी तू मी सुरू असते आणि या चढाओढीमध्ये बकर्याला जास्त पैसे मिळतात.
त्याचा ङ्गायदा घेऊन काही शेळी पालक शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकड विकतात आणि काही बोकड केवळ बकरी ईद साठी राखून ठेवतात. अगदी ग्रामीण भागात सुद्धा या बोकडांना त्या दिवशी प्रचंड मागणी असते. वेळ प्रसंगी चार पैसे जास्त देऊन बोकूड खरेदी करण्याची मुस्लीम भाविकांची तयारी असते. धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकूल मागे-पुढे पहात नाहीत. ती शेतकर्यांसाठी पर्वणीच असते. याचा विचार करून काही हुशार शेतकरी केवळ बकरी ईद साठी म्हणून खास बोकड सांभाळतात. विशेष करून मुंबईमध्ये त्या दिवशी बोकडांना ङ्गारच पैसे मिळतात. कित्येक शेतकर्यांच्या बोकडांना मुंबईत वीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत किंमत आलेली आहे. एरवी हेच बोकड गावच्या आठवड्याच्या बाजारात पाच-सहा हजाराला सुद्धा जात नाही. विशेषत: बोकूड जन्माला आल्यानंतर त्याच्या कपाळावर चंद्राच्या आकाराचा किंवा चंद्राच्या कोरीच्या आकाराचा पांढरा ठिपका असेल तर अशा बोकडाच्या मालकाचे उखळ पांढरे झालेच समजा. दर बकरी ईद सणाला असे पांढरे ठिपके असलेले बकरे केवढ्याला विकली जात असते याची चर्चा होत असते आणि दर वर्षी अशा बोकडाच्या किंमतीनी खळबळ निर्माण केलेली आपल्याला दिसते.
या वर्षी तर असे पांढरे ठिपकेवाली बोकडे लाखाच्या पुढे आणि दीड-दीड लाखापर्यंत गेलेली आहेत. तेव्हा शेळी पालकांनी जमेल तशी बकरी बकरी ईदसाठी राखून ठेवली पाहिजेत आणि पांढरा चॉंदवाला बोकड तर जीवापाड जपून त्याला मुंबईला नेऊन विकले पाहिजे. सोलापूर, नगर या भागामध्ये काही शेळी पालक हा व्यवसाय करतात आणि टेंपो भरून बकरे बकरी ईदला मुंबईत घेऊन जातात. हा एक अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा मुद्दा आहे. शेळी पाळणार्या शेतकर्यांना दरवर्षीच बकरी ईदच्या बोकडांच्या किंमतीची चर्चा ऐकायला मिळत असते. परंतु ती ऐकून त्यापासून ते काही बोध घेत नाहीत. तसा तो घेतला पाहिजे आणि व्यापारी बुद्धीचा वापर करून चार पैसे जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच तर अभ्यास आहे.
लहानपणी विविध भारती , बिनाका गीतमाला व आज च्या पिढीला विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा.. एकमेव अद्वितीय - रेडिओ
आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. पण त्याचा उपयोग मनोरंजनापेक्षा घडय़ाळासारखा जास्त व्हायचा. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती बघा.. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई.. उशीर झाला.. अजून भात व्हायचाय.. असे आवाज स्वैपाकघरातून यायचे.. वनिता मंडळ सुरू झालं की पेपर किंवा एखादं मासिक घेऊन घरातली गृहिणी जराशी कलंडत असे. मग संध्याकाळी बातम्यांच्या रूक्ष आवाजाच्या साथीने ‘परवचा’, रात्रीच्या ‘आपली आवड’च्या संगतीने डोळे मिटायचे. जरा जास्त शौकीन असलेला माणूस रेडिओ सिलोन, बिनाका गीतमाला, विविध भारती वगैरे सापडतंय का हे खुंटय़ा पिळून पहात असत. तेव्हाचे रेडिओही आवाजापेक्षा खरखराट करणारेच बनविले जात की काय कोण जाणे. पण तरीही तो ऐकायचा.. कारण रेडिओ टाईम कळला पाहिजे. मग दूरदर्शनच्या आगमनाने रेडिओ मागे पडला. समोर चित्रं पहायला मिळत असताना आवाज नुसता कोण ऐकणार. पण आता एफएमच्या आगमनानंतर रेडिओला जरासा प्राणवायू मिळाला आहे. रेडिओचा शोध १८८५ साली माकरेनी याने लावल्याचे मानले जाते. मात्र त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे. जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात १८८४ साली केले होते. पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला. भारतात रेडिओची सुरुवात १९२३ साली रेडिओ क्लब इथे झाली. १९३५ च्या कायद्याने राज्य सरकारांना रेडिओ केंद्रे चालविण्याची परवानगी देण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सत्याग्रह, मोर्चे, निदर्शने, चोरून पत्रके छापणे आणि वाटणे याच्यासोबत चोरटे रेडिओ केंद्र चालविणे हाही एक महत्त्वाचा भाग होता. १९४२ च्या चले जाव चळवळीच्या वेळी डॉ. राममनोहर लोहिया यांनी तीन महिने चोरटे रेडिओ केंद्र चालविले होते. इंडियन ब्रॉडकास्टींग कंपनीने मुंबई व कोलकात्यातल्या दोन रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून प्रसारणाला सुरुवात केली होती. पुढे ही कंपनी दिवाळखोरीत गेली व रेडिओ प्रसारण सरकारने आपल्या ताब्यात घेतले. १९३६ साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षी भारतात केवळ सहाच रेडिओ स्टेशन्स होती. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. स्वातंत्र्यानंतर भारतात रेडिओची मोठी भरभराट झाली. विविध भारतीने रेडिओवरच्या मनोरंजनाला एक वेगळी उंची बहाल केली. ‘हवामहल’, ‘सितारों की महफिल’ एकाहून एक सरस गाणी, कार्यक्रम, शास्त्रीय संगीत यामुळे ‘आकाशवाणी’ अल्पावधीतच लोकप्रिय झाली. टीव्हीच्या आगमनानंतर आकाशवाणीची पीछेहाट सुरू झाली. १९८२ साली भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच आले व रेडिओ मागे पडला. रेडिओतल्या बदलाबरोबरच रेडिओ संचातही अनेक बदल झाले. सुरुवातीच्या काळात केवळ काही नळ्या व वायरच्या माध्यमांतून हे रेडिओ सेट तयार केले जात असत. पुढे लाकडाच्या कॅबिनेटच्या आकाराचे रेडिओ सेट आले. बॅकेलाइट म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या प्लॅस्टिकचा शोध लागल्यानंतर मग रेडिओ तयार करण्यात त्याचा वापर होऊ लागला. १९५० नंतर प्लॅस्टिकचा वापर करून वेगवेगळ्या रंगांचे रेडिओ संच तयार करायला सुरुवात झाली. १९५४ साली लहान रेडिओ संचाचा म्हणजे ट्रान्झिस्टरचा उदय झाला. हे ट्रान्झिस्टर फारच महाग असत. त्यानंतर मात्र अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे लहान-मोठे रेडिओ तयार होत गेले. लहान आकाराचे रेडिओ मोठय़ा प्रमाणात क्रिकेटचे धावते वर्णन ऐकायला वापरले जाऊ लागले. त्यानंतर केवळ हेडफोनच्या आकाराचे रेडिओ आले. चीनी बनावटीचे आयपॉडच्या आकाराचे रेडिओही आले. सध्या मोबाइलमध्ये उपलब्ध असलेल्या रेडिओंमुळे एक नवीनच क्रांती झाली आहे. १९७७ साली भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले व आकाशवाणीची लोकप्रियता पुन्हा वाढू लागली. सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खाजगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचे प्रसारण करत आहेत. खाजगी एफएम वाहिन्यांची सुरुवात १९७७ साली मद्रासपासून झाली. त्यानंतर गोवा राज्यात काही खाजगी रेडिओ वाहिन्यांना परवाने मिळाले. सध्या भारतातल्या ७२ शहरांमध्ये खाजगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत. भारतात रेडिओ स्टेशन्स दोन पातळीवर चालतात. आकाशवाणीकडे मनोरंजन कार्यक्रम व वृत्तविषयक कार्यक्रम असे दोन भाग आहेत. तर खाजगी वाहिन्या केवळ मनोरंजनाचेच कार्यक्रम प्रसारित करतात. त्यांना सरकारने अद्याप बातम्या प्रसारित करण्याचे अधिकार दिले नाहीत. त्यांना केवळ आकाशवाणीच्या बातम्या पुन:प्रसारित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आकाशवाणीच्या एफएम रेन्बो व गोल्ड या माध्यमातून प्रसारण केले जाते. आकाशवाणीचा वृत्तविभाग हा बातम्यांच्या क्षेत्रातला अग्रेसर विभाग समजण्यात येतो. बातम्यांची सत्यता हे त्यांचे शक्तिस्थळ बनून राहिले आहे. आकाशवाणीच्या मनोरंजनाचा भर हा अधिक प्रमाणात केवळ गाण्यांवर असतो. तरीही श्रुतिका, नभोनाटय, विविध चर्चा, क्रीडाविषयक कार्यक्रम, धावते समालोचन याद्वारेही श्रोत्यांचे मनोरंजन केले जाते. फोन इन सारख्या कार्यक्रमांमुळे आता श्रोत्यांचा सहभागही वाढला आहे. खाजगी वाहिन्याही गीतांबरोबरच इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातही शहरातल्या ट्रॅफिकची माहिती देणे, काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्याविषयीची माहिती देणे अशा माध्यमातून ते आपला व्यवसाय जपत असलेले दिसतात. महाराष्ट्रात मुंबई-पुण्याबरोबरच इतर ठिकाणी खाजगी वाहिन्या चांगलीच लोकप्रियता मिळवत आहेत. स्थानिक कार्यक्रम व त्या त्या भागात वापरण्यात येणा-या विविध उत्पादनांसाठीच्या जाहिराती, शेतीविषयक उत्पादनांच्या जाहिरातींचाही समावेश आहे. आज ही रेडिओ हे प्रभावी माध्यम समजले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सेहचाळीस वर्षापूर्वी १२ मार्च १९७१ रोजी आनंद हा चित्रपट मुंबईत रिलीज झाला.
एक संवादच संपूर्ण चित्रपटच आपल्यासमोर उभा करतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’.
बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’
राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.
मा.ऋषिकेश मुखर्जी यांचा "आनंद' चित्रपट लोकप्रिय झाला, तो दुर्धर कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णाने, "आनंद' ने जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितल्यानेच! त्या चित्रपटात आनंदची भूमिका मा.राजेश खन्ना आणि डॉक्टरची भूमिका मा.अमिताभ बच्चन यांनी केली होती. क्षणाक्षणने मृत्यू आपल्याला गाठत असल्याचे माहिती असूनही, आनंद मात्र व्यथा, वेदनांची पर्वा न करता सहवासातल्या साऱ्यांच भरभरून आनंद वाटतो. कुणालाही आपला त्रास होवू नये, याची काळजी घेतो. शेवटच्या श्वासापर्यंत आनंद द्या आणि आनंदी जगा, हे या चित्रपटाच्या कथेचे सूत्र होते. या चित्रपटातील भावणारी गोष्ट म्हणजे मा.हृषिकेश मुखर्जी ह्यांनी दाखवलेलं साधसं घरगुती वातावरण; माणसासारखी साधी माणसं, चांगली माणसं, भावनिक मानसं आणि शेवटी सगळं ठाउक असूनही फक्त आपल्या माणसाच्या प्रेमापोटी अगतिक होत अतर्क्य गोष्टी करु पाहणारी माणसं हे सारं. हे सर्व वेगळच वातावरण. मा.हृषिकेश मुखर्जींचा हाच साधेपण मनाचा ठाव घेउन जातो. फार मोठा कॅनव्हास, अतिप्रचंड दे दणादण असं काही नाही. चित्रपटात "भावनिक" प्रसंग असले तरी कंटाळ्वाणा "मेलोड्रामाटिक" पिक्चर आपण ह्यास म्हणू शकत नाही. आनंद ची भूमिका मा.राजेश खन्ना यांनी ज्या पद्धतीनं सादर केली; तरी इतरही पात्रं अगदि व्यवस्थित लक्षात राहतात. म्हणजे ती लोकं येताहेत, नुसती दिलेले संवाद बोलताहेत असं होत नाही. अगदि पात्रं जिवंत होउन आल्यासारखी वाटतात. मा.ललिता पवार ह्या एकाच वेळी कडक शिस्तीच्या पण प्रेमळ नर्स आहेत. "ए मुरारीलाल" ह्या बाष्कळ हाकेला विनाकरण "ओ" देणारा गमत्या पण "माणूसपण" जाणणारा मा.जॉनी वॉकर आहेत. काहिसा व्यवहारी, थोडासा बनेल पण मित्रांची काळजी घेणारा डॉक्टर, डॉ. कुलकर्णी म्हणजेच मा.रमेश देव, त्यांची डॉक्टरची पत्नीही म्हणजेच मा.सीमा देव. रमेश देव यांचे मित्र हे तिचेही आप्त बनलेत.असा सारा मामला. बाबु मोशाय्,अजून एक भावनिक, जरा अव्यवहारी म्हणता यावा असा, मनाने सच्चा असा एक डॉक्टर, डॉ. बॅनर्जी आहे. मा.अमिताभ बच्चन त्याकाळातील नवोदित कलाकार होते. ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर उत्तर 'आनंद' हे येऊ शकेल.
या चित्रपटात भव्य दिव्य असे काहीच नाही. यातील गाणी तर लाजाब .
"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..."
“ना जिया लागे ना...”
"जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....कभी ये रुलाये...."
"कहीं दूर जब दिन ढल जाये..”
चारही गाणी अप्रतिम
या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, फिल्मफेअरचा सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार: राजेश खन्ना, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार: अमिताभ बच्चन, सर्वोत्तम संवाद पुरस्कार: गुलझार, सर्वोत्तम संपादन पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, सर्वोत्तम कथा पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी.
आनंद चित्रपट पूर्वी कधी पाहिला नसेल तर आता पहा. खरं तर पाहू नकाच. "अनुभवा" आनंद. सोबत लिंक दिली आहे.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आनंद पूर्ण चित्रपट
https://www.youtube.com/shared?ci=GCgBGXC2yMU
आनंद चित्रपटातील गाणी
Copyright © 2025 | Marathisrushti