वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥
भगवान श्री भोलेनाथांची क्षमायाचना करतांना आज पर्यंत मी कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत? याची एक सूची आचार्य देत आहेत. त्यातून खरेतर, वेगळ्या शब्दात आपण सगळ्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेस्तव काय काय करायला पाहिजे? ही सांगण्याची आचार्यांची ही सुंदर पद्धती आहे.
आचार्यश्री म्हणतात,
स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं
पूजार्थं वा - हे भगवंता मी कधीही प्रातःकाळी स्नान करून आपल्या अभिषेक विधी साठी किंवा पूजेसाठी कधी गंगेचे जल आणले नाही
कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि - किंवा कधीही अत्यंत गहन जंगलात जाऊन बिल्वपत्रे खुडून आणली नाहीत.
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं- हे भगवंता मी सरोवरामध्ये विकसित झालेली सुगंधाने युक्त अशी कमल फुलांची माला तुझ्याकरता कधी आणली नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान शंकरा! माझे अपराध क्षमा कर.
येथे आचार्यश्री आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीदेखील किती पर्याप्त आहेत ते सांगत आहेत.
सदैव वाहणाऱ्या गंगेचे जल, सहज मिळणारी बिल्वपत्र, जलाशयात आपोआप येणारी कमलपुष्पे या गोष्टी निसर्गात परस्पर उपलब्ध आहेत. निदान त्या तर आपण सहज जाणू शकतो ना?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः स्नापितं नैव लिड्गं
नो लिप्तं चन्दनाद्यैः कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः ।
धूपैः कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥६॥
भगवान श्री शंकरांच्या पूजनाचा विषय निघाल्यानंतर या पूजेमध्ये अर्पण करण्याच्या पुढील पदार्थांची आचार्यश्री ना स्वाभाविक आठवण झाली. या उपचारांचा देखील मी कधी विनियोग केला नाही. अशी कबुली देत त्यासाठी क्षमा मागताना आचार्यश्री म्हणतात,
दुग्धैर्मध्वाज्ययुक्तैर्दधिसितसहितैः - दूध,मध, आज्य म्हणजे तूप यांनी युक्त असलेल्या दही आणि साखर सह, अर्थात पंचामृताने,
स्नापितं नैव लिड्गं - मी कधीही शिवलिंगाला स्नान घातले नाही.
नो लिप्तं चन्दनाद्यैः- त्या भगवान शंकरांच्या प्रतीक शिवलिंगावर कधी चंदन इत्यादींचा लेप लावला नाही. कनकविरचितैः पूजितं न प्रसूनैः - कधी सोने इत्यादींनी सजविलेल्या फुलांनी, अर्थात फुले किंवा आभूषणांनी,
धूपैः- ऊद इ. धूपांनी, कर्पूरदीपै - कापूर आरती इत्यादींनी कधी भगवंता तुझी पूजा केली नाही.
र्विविधरसयुतैर्नैव भक्ष्योपहारैः - विविध रसांनी युक्त असणारे भक्ष इत्यादी नैवेद्य समर्पित केले नाही.
नैवेद्यात मधुर, आम्ल,लवण,कटू, कशाय आणि तिक्त हे
सहा रस असावेत आणि भक्ष्य म्हणजे खाता येणारे, लेह्य म्हणजे चाटता येणारे, पेय म्हणजे पिता येणारे आणि चोष्य म्हणजे चोखता येणारे अशा चार प्रकारचे अन्न असावे असे वर्णन आहे.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे श्री महादेव शंभो माझ्या या अपराधांना क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
ध्यात्वा चित्ते शिवाख्यं प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो
हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः ।
नो तप्तं गाड्गतीरे व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥८॥
आपण सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे मी काय काय केले नाही यांची सूची देण्याच्या निमित्ताने खरेतर आचार्यश्री आपण काय काय करायला पाहिजे ते सांगत आहेत.
त्या सूचीत ते पुढे म्हणतात,
ध्यात्वा चित्ते शिवाख्यं - मनामध्ये भगवान शंकरांचे नामस्मरण करीत करीत,
प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो - मी कधी ब्राह्मणांना भरपूर धन दिले नाही. अर्थात कधीही सत्पात्री दान केले नाही.
हव्यं ते लक्षसंख्यैर्हुतवहवदने नार्पितं बीजमन्त्रैः - मी कधीही बीज मंत्रांनी लाखोच्या संख्येत अग्नीमध्ये आहुत्या दिल्या नाहीत.
यात बीज मंत्र म्हणतांना सर्वात लहान संख्येचा मंत्र असा भाव आहेत. तोदेखील कधी केला नाही. अर्थात तो दहा वीस वेळा किंवा एखादी माळ करून उपयोग नाही हे सांगण्याकरता आचार्य श्री लाखोच्या संख्येचा विचार करतात. किंवा मी इतके भव्यदिव्य विधान केले नाही. असा देखील अर्थ.
नो तप्तं गाड्गतीरे - मी कधीही गंगा नदीच्या तीरावर तप केले नाही. व्रतजपनियमैर्रुद्रजाप्यैर्न वेदैः - व्रत,जप इत्यादींची संबंधित नियमांचे पालन करून ना कधी रुद्र जप केला, ना कधी वेदांचा अभ्यास.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंकरा ! यापैकी काहीही न करता आयुष्य वृत्ता घालवले या अपराधाकरिता मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
नग्नो निःसड्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् ।
उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शड्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥९॥
भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना आचार्य श्री येथे त्यांच्या काही विशेषणांचा उल्लेख करीत आहेत. ते म्हणतात,
नग्नो- ज्यांचे मायारूपी वस्त्र गळून गेले आहे, ज्यांच्यावर कशाचेच आवरण पडूच शकत नाही, त्यांना शास्त्रात नग्न असे म्हणतात. निःसड्ग- ज्यांना कशाचाही संग अर्थात लेप लागत नाही.
शुद्ध- ज्यांच्या ठिकाणी मायेच्या मलीनतेचा अंश देखील नसतो त्यांना शुद्ध असे म्हणतात.
त्रिगुणविरहितो- मायेच्या सत्व, रज आणि तम या तीनही गुणांनी रहीत असलेले, निर्गुण निराकार. ध्वस्तमोहान्धकारो- ज्यांच्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा मोह शिल्लक उरलेला नाही असे.
नासाग्रे न्यस्तदृष्टि: - ज्यांनी आत्मध्यानासाठी नासिकाग्रावर दृष्टी स्थिर केली आहे असे,
विदितभवगुणो - अशा विविध गुणांनी युक्त असणाऱ्या,
नैव दृष्टः कदाचित् - आपल्या स्वरूपाचे मी कधीही दर्शन घेतले नाही.
उन्मन्यावस्थया - उन्मनी अवस्थेमध्ये,
त्वां विगतकलिमलं - कली अर्थात दोषांचा मळ नष्ट झालेल्या आपले,
शड्करं न स्मरामि- हे भगवान शंकरा ! मी कधीच स्मरण केले नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या सगळ्या अपराधां करिता मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
स्थित्वा स्थाने सरोजे प्रणवमयमरुत्कुण्डले सूक्ष्ममार्गे
शान्ते स्वान्ते प्रलीने प्रकटितविभवे ज्योतिरूपे पराख्ये ।
लिड्गज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शड्करं न स्मरामि
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥१०॥
येथे भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज ध्यान मार्गाच्या अंतिम अवस्थेचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
स्थित्वा स्थाने सरोजे - ब्रह्मरंध्रामध्ये असणाऱ्या सहस्त्रदल कमला मध्ये स्थिर होऊन,
प्रणवमय - ओंकार ब्रह्मस्वरूप भगवान शंकरांचे ,
मरुत्कुण्डले - जेथे प्राणवायु प्राणशक्ती मध्ये विलीन होतो त्या कुंडामध्ये,
सूक्ष्ममार्गे- कुंडलिनीच्या सूक्ष्म मार्गाने प्रवास करून, तेथे निवास करणाऱ्या,
शान्ते - काहीही मिळवायचे नसल्याने परमशांत असलेले,
स्वान्ते- स्वतःच्याच स्वरूपात असणारे,
प्रलीने- आत्मरूपात लीन असणारे,
प्रकटितविभवे - बाहेर आपल्या संपूर्ण वैभवाला प्रकट करणारे,
ज्योतिरूपे - चैतन्यस्वरूप तेजस्वी,
पराख्ये- परमतत्व असणारे,
लिड्गज्ञे - शिवलिंगाच्या माध्यमातून ज्यांचे ज्ञान घडते असे,
ब्रह्मवाक्ये - उपनिषदातील महा वाक्यांमध्ये ज्यांचे तत्त्ववर्णन केले आहे असे,
सकलतनुगतं- सर्व ईश्वर महेश्वर यांच्याद्वारे सेवा केली जात असणारी,
शड्करं न स्मरामि - असे जे भगवान शंकर आहेत त्यांचे मी कधीही स्मरण देखील केले नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान महादेव शंभू शंकरा ! माझ्या या अपराधाकरिता मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
हृद्यं वेदांतवेद्यं हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् !
सत्यं शांतस्वरूपं सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् !!
जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ त्रिगुणविरहितं शङ्करं न स्मरामि !
क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो !! ११!!
या स्तोत्राच्या अनेक आवृत्तीमध्ये प्रस्तुत श्लोक उपलब्ध नाही. मात्र कांची कामकोटि पीठाद्वारे प्रकाशित स्तोत्रावली मध्ये समाविष्ट असलेला हा अत्यंत सुंदर श्लोक.
जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
हृद्यं - अत्यंत मनोहारी असणाऱ्या,
वेदांतवेद्यं - वेदांत सारखा उपनिषदांमध्ये प्रतिपादित तत्वज्ञानाच्या द्वारे ज्यांची जाणीव होते असे,
हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् - ज्यांच्या कृपा स्वरूपात हृदय कमला मध्ये भक्तीची दिव्य ज्योत प्रज्वलित होते असे,
सत्यं - भूत, भविष्य वर्तमान या तीनही काळांच्या अतीत असणारे, परम सत्य,
शांतस्वरूपं- काहीच मिळवायचे नसल्याने परमशांत असणारे, सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् - सगळ्या ऋषीमुनींच्या हृदय कमलरुपी समर्पणानेच जाळता येणारे,
जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ- जागृती, स्वप्न व सुषुप्ति म्हणजे गाढ निद्रा या माझ्या तीनही अवस्थांमध्ये,
त्रिगुणविरहितं - तीनही गुणांनी रहित असणाऱ्या,
शङ्करं न स्मरामि - भगवान शंकरांचे मी कधीही स्मरण केले नाही.
येथे आचार्यश्री सांगत आहेत की जीव हा तीन अवस्थांमध्ये सारखा तीन गुणांनी युक्त आहे. तर भगवान त्रिगुणातीत आहे. तीन गुणांमुळे प्राप्त होणाऱ्या सकल समस्यांच्या निराकरणासाठी स्थान एकच त्रिगुणातीत भगवान शंकरांची चरणकमले.
पण जीव त्यांचे स्मरण करीत नाही.
क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या अपराधा करित मला क्षमा करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
चन्द्रोदभासितशेखरे स्मरहरे गड्गाधरे शंकरे सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे ।
दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः ॥१२॥
भगवान शंकरांच्या दिव्य वैभवाला आपल्या समोर ठेवताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात,
चन्द्रोदभासितशेखरे - मस्तकावरील चंद्रामुळे ज्यांचा शिरोप्रदेश उजळून निघाला आहे असे. मस्तकावरील चंद्र हे वेगळ्या अर्थाने मस्तकाच्या उज्ज्वलतेचे, शांततेचे, प्रसन्नतेचे, शीतलतेचे प्रतीक.
स्मरहरे - स्मर म्हणजे भगवान मदन. श्रीशंकरांनी मतदानाचे दहन केल्यामुळे त्यांना स्मरहर म्हटले आहे.
गड्गाधरे - मस्तकावर गंगा धारण करून संपूर्ण जगाच्या पावनतेची धुरा ज्यांनी आपल्या मस्तकावर घेतली आहे असे,
शंकरे - शम् म्हणजे कल्याण. संपूर्ण विश्वाचे कल्याण करतात ते भगवान शंकर. सर्पैभूषितकण्ठकर्णविवरे - ज्यांनी गळ्यात मोत्यांच्या माळांप्रमाणे आणि कानात कुंडलां प्रमाणे सर्प धारण केले आहेत असे.
नेत्रोत्थवैश्वानरे - ज्यांच्या तृतीय नेत्रातून विश्व विनाशकारी प्रलयाग्नी प्रगट होतो असे,
दन्तित्वत्कृतसुन्दराम्बरधरे - दंती म्हणजे हत्ती. त्याची त्वचा म्हणजे कातडे ज्यांनी वस्त्र प्रमाणे गुंडाळले आहे असे. गजासुर नावाच्या राक्षसाला सोबत झालेल्या संग्रामाचा इथे संदर्भ आहे.
त्रैलोक्यसारे- संपूर्ण त्रैलोक्याचे सार असणाऱ्या,
हरे- भक्तांची दुःखे दूर करणाऱ्या,
मोक्षार्थ कुरु चित्तवृत्तिमखिलामन्यैस्तु किं कर्मभिः - हे भगवान शंकरा ! माझ्या मोक्षासाठी कारणीभूत ठरणारी माझी वृत्ती निर्मल करा. अन्य स्तवनाचा अर्थात मागणीचा उद्देश तो काय?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे.
किं यानेन धनेन वाजिकरिभिः प्राप्तेन राज्येन किं
किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभिर्देहेन गेहेन किम् ।
ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं सपदि रे त्याज्यं मनो दूरतः
स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् ॥१३॥
आयुष्यामध्ये मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींपेक्षा भगवान श्री शंकराची कृपा हीच खरी प्राप्ती आहे हे सांगण्यासाठी आचार्यश्री म्हणतात,
किं यानेन - प्रवासाची सुखकारक साधने असून काय?
धनेन - प्रचुर स्वरूपात धन असून काय?
वाजिकरिभिः
प्राप्तेन राज्येन किं - सगळ्या जगावर आपली सत्ता चालेल असे राज्य मिळून देखील काय?
या सगळ्यामध्ये काय? या शब्दाच्या पुढे, उपयोग जी हा शब्द गृहीत आहे.
या सगळ्याच्या प्राप्तीने सुख मिळेल असे माणसाला वाटते. काही काळा पुरते ते सुख मिळते देखील. पण ते टिकाऊ असत नाही. अशा नश्वर सुखाच्या मागे लागणारे लोक, आणखी कशा कशाचा हव्यास करतात? ते सांगताना आचार्य म्हणतात,
किं वा पुत्रकलत्रमित्रपशुभि: - पुत्र संतती, कलत्र म्हणजे पत्नी, मित्र, पशुपक्षी, नवीन संदर्भात लावायचे तर वाहन सौख्य,
देहेन - इतकेच काय तर या सगळ्यांच्या द्वारे मिळणाऱ्या सुखाचा आधार असणारा देह.
गेहेन किम् - विशाल घराचे काय?
ज्ञात्वैतत्क्षणभंगुरं - या सगळ्यांचे क्षणभंगुरतत्व समजून घेऊन,
सपदि रे त्याज्यं मनो दूरतः - हे मना ! या सगळ्यांची आसक्ती दुरूनच, तत्काळ सोडून दे.
स्वात्मार्थ गुरुवाक्यतो भज भज श्रीपार्वतीवल्लभम् - जर तुला स्वतःचे खरंच कल्याण करायचे असेल! तर श्रीगुरूंचा सांगण्यानुसार भगवान पार्वतीवल्लभाचे भजन कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
जगणे आणि जिवंत असणे या दोन मध्ये फरक आहे. केवळ श्वास घेणे म्हणजे जगणे नव्हे. उदरभरण तर पशु पक्षांचे देखील चालतेच. मात्र त्यासाठी खालील गोष्टी करण्याची माझ्यावर वेळ येऊ नये. ही आचार्यश्रींची मागणी अनेक अर्थाने चिंतनीय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti