जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
थ्रिलर चित्रपटांच्या दुनियेत हिचकॉकचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यानं नामवंत कलाकार चित्रपटात वापरले तसंच कित्येक अज्ञात कलाकारांना नामवंत केलं, अनेक वेचक आणि प्रसिद्ध स्थळं चित्रीकरणासाठी वापरली आणि कॅमेरा हवा तसा फिरवला.
गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शम्मीकपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत काम केले होते.
राजकपूर यांच्यासोबत त्यांनी 'बांवरे नैन' आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत 'आनंदमठ' सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मीकपूर यांच्यासोबत लग्न केल्या नंतर सुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे मा. भगवान यांच्या सोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३ मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' होता. बोनी कपूर,अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर मा.गीता बाली यांचे सेक्रेटरी होते.मा.गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
एका चष्माविक्रेत्या कंपनीची जाहिरात होती- बाई वर्गात येतात आणि फळ्यावर लिहायला लागतात. मात्र, त्यांना लिहिताना बघून मुले बुचकळ्यात पडतात. कारण बाई फळ्याऐवजी भिंतीवर लिहित असतात. चष्मा कंपनीच्या या जाहिरातीतील कल्पक संकल्पनेचा उदगाता होता एक मराठी तरुण उदय पारकर. कोकणच्या मातीचा ठेवा मनात जपणार्या पारकर यांनी जाहिरात जगतात १२७ मानाचे पुरस्कार मिळवले. आता स्वत:ची जाहिरात कंपनी आहेच, पण सिंधुदुर्गात युरोपच्या तोडीचा स्टुडिओ उभारण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून आहेत...
उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख पुढील पानावर वाचा.
उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख वाचा.
रविकिरण मंडळातील एक तेजस्वी किरण समजला जाणारा हा तरुण कवी, पुढे त्यांच्या जीवनग्रंथाचं अवघं एकच पान उलगडलं गेलं. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला.अवघ्या चोवीस वर्षांचं आयुष्य म्हणजे जाणत्या वयातली केवळ सात ते आठ वर्षच लाभली. पण एवढय़ा अल्पकाळात कवी मा.दत्तांनी जो वारसा मागे ठेवला तो चार पिढय़ांपर्यंत झिरपला. विपुल लेखन केलेल्या, आपल्या नातवंड-पतवंडांच्या सहवासात रमलेल्या किती कवी-लेखकांच्या वाटय़ाला हे भाग्य आलं असावं? काव्यप्रतिभेचा दुर्मीळ वारसा जपणारी चार पिढय़ांची परंपरा लाभलेलं घराणंही दुर्मीळच म्हणायला हवं. कवी मा. दत्त, त्यांचे मा विठ्ठलराव घाटे, त्यांच्या कन्या डॉ. अनुराधा पोतदार आणि त्यांची मुलं.. डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि यशोधरा पोतदार-साठे. कवी दत्त यांचे शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत.
दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे १३ मार्च १८९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. डॉ.नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव.
हेमंत करकरे हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.
ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म ५ डिसेंबर १९२८ रोजी झाला. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या. बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचा जन्म मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. सुरवातीचे नृत्य शिक्षण सीताराम प्रसाद यांच्याकडे घेतले.
दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. हे सगळे १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे. मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅलेमधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनका जोशी यांनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंती जोशींनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान महत्वाचे होते.
भारतीय नृत्य विदेशात पोहचवण्याचे श्रेय दमयंती जोशी यांना जाते. त्यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. मा.दमयंती जोशी यांचे निधन १९ सप्टेंबर २००४ रोजी झाले.
#DamayantiJoshi
आज १९ आक्टोबर.... आज गीतकार मा.शांताराम नांदगावकर यांची जयंती
जन्म: १९ आक्टोबर १९३६
"हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर.
मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. 'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते. चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.
शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्यात होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्या बहराचा काळ हा मराठी चित्रपट गीत-संगीताच्या दृष्टीनं अधोगतीचा होता. त्यामुळे अनेकदा ‘बिनडोक’ सिच्युएशन्ससाठी गाणी लिहिण्याचं ‘व्यावसायिक काम’ त्यांना करावं लागलं; तरीही जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी गीतकार म्हणून आपल्या क्षमतेचा प्रत्यय आणून दिला. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास भावगीताच्या प्रांतात सुरू झाला, तेव्हा चित्रपटसृष्टीत ग.दि.मा., सुधीर फडके, राम कदम, जगदीश खेबुडकर ही समीकरणे ऐन भरात होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांत सर्व काही बदलले. या दरम्यान नांदगावकर यांनी भावगीतांच्या प्रांतात मुशाफिरी केली. ‘रामप्रहरी राम गाथा’सारखे त्यांचे गाणे पूर्वसूरींशी आणि मराठी भक्तीगीतांच्या सुरेल परंपरेशी नाते सांगणारे होते. याच दशकात सांस्कृतिक अभिरुची सांधा बदलत होती. अर्थवाही शब्द, भाषेचा डौल, कल्पनांची भरारी हे सर्व एका विशिष्ट वर्गाच्या सांस्कृतिक अभिरुचीसाठी लिहिले जात होते. हा पांढरपेशा मध्यमवर्ग विस्तारला तसा मराठीतील गीत, संगीत, चित्रपट, नाटक या सगळ्यांचाच बाज बदलला. १९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले. परंतु, त्यांनी चित्रपटाबाहेर जशी गाणी लिहिली, उदाहरणार्थ, ‘सजल नयन नितधार बरसती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ तशी त्यांना चित्रपटात लिहिण्याची संधी क्वचितच मिळाली.
एक आठवण मा.नांदगावकरांची.
१९९५-९६ च्या सुमारास ‘तू सुखकर्ता’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार शांताराम नांदगावकर पार्टीला आपल्या सूनबाईला घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडे ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. त्या चित्रपटात बहुधा तिने एक गाणे गायले होते. त्यांच्या प्रसन्न मूडमध्येच त्यांना कोणीतरी विचारले, ‘तुमचा चष्मा डोळ्यांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो. असं का?’ नांदगावकर मिश्किल हसले आणि म्हणाले, ‘कवी नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो, त्यामुळे मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यांवर सरकवतो. एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो.’ गमती गमतीत ते एक मोठे सत्य सांगून गेले होते.
‘अष्टविनायक’नंतर सचिनच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुण सोबत त्यांची ‘वेव्हलेंग्ध’ चांगलीच जुळली, परंतु ‘धुमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ नंतर सचिन- महेश- अशोक- लक्ष्या यांची लाट आली. त्यात गीत संगीताला फार वाव नव्हता. त्यातल्या त्यात सचिनच्या काही चित्रपटांत त्यांना बरी गाणी देता आली. ‘गंमत जंमत’साठी किशोरकुमार यांना मराठी गाणे द्यायचे ठरले, तेव्हा मराठीतल्या ‘ळ’चा उच्चार करता येत नाही आणि ‘च’चा उच्चार आपण ‘च्य’ असा हिंदी पद्धतीने करतो, असे कारण सांगून ते गाण्यासाठी राजी होईनात. पण ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी, ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी सोपी शब्दरचना केली आणि किशोर कुमार यांनी धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. मात्र बऱ्याचदा ‘दोन रुपये दे मला, खर्चाला पानसुपारीला.’ असे शब्द जोडण्याची व्यावसायिक मजबुरी शांताराम नांदगावकर यांना स्वीकारावी लागली. १९९६ नंतर ते हळूहळू यापासून दूर गेले. अनेकदा प्रथितयश गीतकार बहुजनांच्या गीत- संगीतापासून फटकून राहतात, परंतु मुळातच निर्भय स्वभावाच्या नांदगावकरांनी स्वत:ला कधी अशा चौकटींमध्ये बंदिस्त केले नाही. त्यामुळे एका बाजूला ‘दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली’ अशी गाणी लिहिताना दुसरीकडे सुनील गावस्करच्या खासगी अल्बमसाठी शब्द पुरवत तितक्याच उत्साहाने ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला’ असे खेळाचे तत्त्वज्ञान सांगून गेले. क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. मा.शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते. मा.शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै २००९ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा.शांताराम नांदगावकर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
मा.शांताराम नांदगावकर यांची काही गाणी
पहिले ना मी तुला
रजनीगंधा
रुपेळी वाळूत
हरी नाम मुखी रंगते
श्रीरंग सावळा तु
१९६५ सालापासून प्रथमश्रेणी आणि १९६९ सालापासून क्रिकेटचे धावते समालोचन करणाऱ्या सुरेश सरैयांनी शंभर हून अधिक कसोटी सामन्यांत समालोचन केले होते.
आधुनिक काळातील संत आणि कवी सदगुरु स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी झाला.
त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. ते पुढील शिक्षणाकरता मुंबईला ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले. त्यांचे वाङ्मयविशारद पदवीचे शिक्षण पुण्याच्या ‘टिळक महाविद्यालया’त झाले. शिक्षण काळातच वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना सद्गुरु गणेश नाथ महाराज यांचा अनुग्रह झाला. त्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यात त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात तुरुंगवास सोसावा लागला. येथे त्यांनी अखंड सोsहं साधना केली. त्यामुळे त्यांच्या देहाचे आणि मनाचे अमुलाग्र परिवर्तन झाले.
कारागृहातच त्यांना एस. एम. जोशी, अच्युतराव पटवर्धन, शंकरराव पटवर्धन यासारखे त्यांना स्वामी म्हणून संबोधू लागले. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या महासमाधीपर्यंत म्हणजे जवळजवळ १९३४ ते १९७४ असे चाळीस वर्षे वास्तव्य आंबेवाले देसाई यांच्या घरात ‘अनंत निवास’मध्ये एका खोलीत केले. तेथेच त्यांना निर्गुण-निराकार श्रीमहाविष्णूच्या सगुण रूपाचा साक्षात्कार १९४२ साली झाला. त्यांनी अनंत निवासमधील वास्तव्य काळातच ‘श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी’, ‘श्रीभावार्थगीता’, ‘श्रीअभंग अमृतानुभव’, ‘संजीवनी गाथा’ (अभंग संग्रह), ‘चांगदेव पासष्टी’ यांसारखे प्रासादिक अनुवादित ग्रंथ लिहिले.
स्वामी स्वरूपानंद यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार सुबोधपणे साधकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. " मृत्यू पावलो आम्ही " या शब्दात स्वतःच्या मृत्यूचा अनुभव तारखेनिशी नोंदवला. भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते. १५ ऑगस्ट १९७४ रोजी स्वामी स्वरूपानंद पावस येथे समाधिस्त झाले. रत्नागिरी जवळ पावस येथे त्यांचे आज भव्य मंदिर आहे. मंदिर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. स्वामींचे चैतन्यारुपात अखंड वास्तव्य आहे असे मानले जाते. मंदिरात भक्तनिवास आणि प्रसादाची सोय आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti