जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मा.रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. `थंडीचे दिवस` सुखाचे दिवस, `नवरंग` इत्यादी त्यांची प्रवासवर्णन अतिशय वैशिष्टयपूर्ण ठरली आणि वाचकांच्या पसंतीत उतरली. त्यांनी प्रचंड लेखन केले.
जयेंद्र सरस्वती हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱ्या या अभिनेत्याकडे त्यांच्या अभिनयक्षमतेला वाव मिळू शकतील असे चित्रपट अपवादानेच मिळाले.
वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली.
मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मागे वळून पाहिलेच नाही. नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्मीकांत बेर्डे नाही असे सहसा घडलेच नाही.कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. सचिन बरोबरही 'बनवाबनवी'सह अनेक चित्रपट केले.
त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या' मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. शिवाय अनेक चित्रपट त्यांना समोर ठेवून काढण्यात आले.त्यात अनेक पडेल चित्रपटही होते. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला. वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते.
मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले. मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदीत चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली, मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला.
पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या चित्रपटातील भूमिकेने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. पण तशा भूमिका त्यांना फार काही मिळाल्या नाहीत. शेवटच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱ्याच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे १६ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज ६ नोव्हेंबर..आज “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार यांची पुण्यतिथी.
जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला.
जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला. निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .
सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल. बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा र्वष. मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण मा.जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.
राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्हीठ. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्द र्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.
'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत. 'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून मा.जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते. मा.जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुमारे २५ पुस्तके लिहिणारे कथा-कादंबरीकार प्रभाकर गोविंद अत्रे यांचा जन्म २० ऑगस्ट १९२२ रोजी झाला.
“माझे जीवनगाणे”, “रंगात रमलो मी” या त्यांच्या कादंबर्यांना नाट्यसृष्टीची पार्श्वभूमी आहे.
Prabhakar Govind Atre
जन्म-एप्रिल ३, १८८२
मृत्यू- जून २१, १९२८
नाथमाधव हे मराठी लेखक होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ त्यांनी शिवरायांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासीक साहित्या बरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते.
दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली.
आपल्याच तोऱ्यात मिरवणारी खाष्ट सासू आठवली की इंदिरा चिटणीस यांचा ठसका आपल्या मनात उभा राहतो. नऊवारी साडी, अस्ताव्यस्त सुटलेले केस, ठेंगणी-ठुसकी अंगकाठी आणि अचूक संवादफेक यामुळे इंदिरा चिटणीस यांच्या अनेक व्यक्तिरेखा मराठी चित्रपटातून चांगल्याच उठून दिसल्या.
जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कर्करोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला २५ लाख कर्करोगपीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते – उदा. आतड्यांमध्ये सुरू होणार्याप कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात इ.
ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करु शकतात अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालींमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात. एक काळा असा होता की, कॅन्सर अर्थात कर्करोग म्हणजे आयुष्य संपल्याची खूण समजली जायची; मात्र या जीवघेण्या आजारावर आणि त्याच्या उपचारासंबंधी कित्येक दशकांच्या संशोधनानंतर कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. वाजवी खर्चाचे विविध उपायांसोबतच इच्छाशक्ती वापरून यावर मात केलेल्या रुग्णांच्या यशोगाथेमुळे हे चित्र आता पालटत आहे.
कर्करोगावर मात करण्याचे उपाय
कर्करोग पूर्णत : टाळता येणे जरी शक्य नसले तरी त्यावर मात करण्याचा दुसरा उपाय म्हणजे त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे. वेळेत निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. कर्करोगाची सूचक लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा.
नियमितपणे शरीराची स्वतपासणी करा, स्त्रियांनी स्वत:चे स्तन तपासणी करणे गरजेचे.
नियमितपणे तज्ज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी व काही प्रयोगशालीय तसेच रेडिओलॉजीकल चाचण्या करवून घेणे आवश्यक आहे. कर्करोगाच्या उपचारांकरिता खूप खर्च लागतो हा समज चुकीचा आहे. सध्याच्या उपचार पध्दतीत एक लाख रुपयांच्या आत 90 टक्के कर्करोगांवर पूर्ण उपचार करता येतो. फक्त योग्य अशा कर्करोग रुग्णालयात उपचारांना सुरुवात होणे गरजेचे असते. राजीव गांधी योजना आणि जीवनदायिनी योजना या शासकीय योजनांतूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळतो.
कर्करोगाच्या उपचार पद्धती
किमोथेरपी किमोथेरपी ही तात्पुरत्या स्वरूपात त्रायदायक ठरते. या थेरपीनंतर केस गळतात, अशक्तपणा जाणवतो, रक्त कमी होते, मळमळते यांसारख्या तात्पुरत्या त्रासांना सामोरे जावे लागते.
टार्गेटेड थेरपी
यापूर्वी कोबाल्टच्या मशीनव्दारे रेडिएशन दिले जात; मात्र जगभरात या तंत्रज्ञानावर बंदी आली आहे, त्याऐवजी आता बायोटेक्नॉलॉजीच्या आधारावरील तंत्रज्ञानाने टार्गेटेड रेडिएशन थेरपी केली जाते. लिनियर अँक्सेलेटर आणि एक्सरे जनरेटेड याव्दारे ही थेरपी होते. यात कॅन्सर ट्यूमरच्या (गाठीच्या) आकार आणि खोलीनुसारच रेडिएशन दिले जाते, त्याचा परिणाम केवळ ट्यूमरवरच होतो.
कर्करोगापासून दूर राहण्यासाठी
समतोल आहार : आहारात सर्व डाळी, कडधान्ये, विशेषत: मोड आलेली कडधान्ये, सालीच्या डाळी यांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या व सर्व प्रकारची फळे (सालीसह) तर कोशिंबीर (गाजर, मुळा, काकडी, बीट इत्यादी.) मुबलक खावीत. शरीराला तंतुमय पदार्थ व रोगप्रतिबंधक घटक मिळतात. जंक फूड, कृत्रिम अन्नपदार्थ, अतिशय तिखट आहार, अतिरिक्त मांसाहार, स्निग्ध पदार्थांचे अतिसेवन टाळा.
व्यसनांना ठेवा दूर
धूम्रपान व इतर कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. अतिरिक्त प्रमाणात मद्यपानदेखील यकृत व पचनसंस्थेच्या कर्करोगाचा धोका वाढवते. तरुणांनी या व्यसनांची सुरुवातच न करणे केव्हाही हितकारकच ठरते.
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायामाव्दारे वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते. त्यायोगे स्तनांच्या, आतड्यांच्या कर्करोगाची जोखीम कमी होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह या आजारांनाही नियंत्रणात ठेवता येते.
लसीकरण
हिपॅटायटीस बी या विषाणूविरुध्दची लस यकृताच्या कर्करोगापासून बचाव करते. या लसीचे तीन प्राथमिक डोस घेणे गरजेचे आहे. स्त्रियांमधील गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एच.पी.व्ही. (ह्युमन पॉपीलोमा व्हायरस) या विषाणूविरुध्दची लस उपयुक्त आहे. 9 ते 26 वयोगटातील मुलींनी ही लस घेणे आवश्यक आहे. केवळ 2500 रुपयांत ही लस स्त्रीरोगतज्ज्ञांसह कर्करोग हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असते.
डॉ. नगरकर
संकलनसंजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
“कन्नड कोकिळा" अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती, त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीचे गाण छान गात असे. त्यांचा जन्म ५ मार्च १९१३ रोजी धारवाड येथे झाला. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगुबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. सोळाव्या वर्षी त्यांचे गुरुराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. १९३७ पासून सवाई गंधर्वानी कुंदगोळ या हुबळीपासूनच्या जवळच्या गावात त्यांना संगीत शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या घरी जाऊन गंगुबाई शिकत होत्या, त्या वेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी तेथे दुसरे सहाध्यायी होते. नंतर ते गंगुबाईंचे गुरुबंधू झाले. १९३८ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीतपरिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाई हनगळ यांचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ साली पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. त्यांना गमकाच्या अंगाने गायला खूप आवडे; जे स्त्री गायिका सहसा गात नसत. नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे.
गंगुबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), पार्श्वयगायक के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षणा नंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली.
मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगिताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तीगीत व गझल गायानाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिली युगलगीत विख्यात गायक जी. एन जोशी व गंगूबाई हनगळ यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत असत. गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल यांना अनेक पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे.त्यात त्यांची छायाचित्र, ध्वनिमुद्रिका, तानपुरे पहायला मिळतात.
गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरीक म्हणूनही थोर होत्या. आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी 'दि साँग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत. भारत सरकारने गंगूबाई हनगळ त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. फक्त पाचवी शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. १९९२ ते १९९४ त्या कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या होत्या. गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti