जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
यत शिक्षण शाळेत ते मुख्याध्यपक होते. त्यांचा त्यावेळच्या अनेक साहित्यकांशी मैत्री होती.
मराठी कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकार व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचा जन्म ३ जानेवारी १८५३ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला.
त्यांचे वडील दशग्रंथी असल्यामुळे संहिता, शिक्षा, ज्योतिष, छंद इ. विषयांचे ज्ञान त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच प्राप्त झाले. याशिवाय कराड येथे त्यांचे थोडेसे इंग्रजी शिक्षण झाले. त्यानंतर पुण्याच्या ट्रेनिंग कॉलेजात राहून त्यांनी तेथील अभ्यासक्रम पूर्ण केलाद व शिक्षकाचा पेशा पतकरला. तथापि त्यांना चित्रकलेची आवड असल्यामुळे पाच वर्षानंतर शिक्षकाचा पेशा सोडून देऊन ते सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आले व तेथे त्यांनी तैलचित्रकलेचे विशेष ज्ञान संपादन केले. पुढे बडोद्यास असताना बडोदे संस्थानचे दिवाण सर टी. माधवराव यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी अनेक तैलचित्रे तयार केली. त्यानंतर कोचीन येथे ते जवळजवळ २० वर्षे होते. तेथील वास्तव्यात त्यांनी केरळ कोकिळ हे मासिक काढले व २५ वर्षे ते चालवून तत्कालीन मराठी वाचकांत वाङ्मयाची आवड निर्माण केली. पहिली पाच वर्षे हे मासिक कोचीनहून निघत असे. त्यातील पुस्तक-परीक्षणे, लोकोत्तर चमत्कारांचे कथन, कविता, कलमबहादुरांना शेला-पागोटे, कूटप्रश्न इ. आकर्षक सदरांमुळे ते त्या काळात फार लोकप्रिय होते.
भगवत गीते वर विविध वृत्तांत त्यांनी लिहिले. गीतापद्यमुक्ताहार (१८८४) हे आठल्यांचे पहिले पुस्तक. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर तिसांहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांचे बरेचसे लेखन अनुवादात्मक आहे. त्यात स्वामी विवेकानंदांच्या ‘राजयोग’, ‘भक्तियोग’ आणि ‘कर्मयोग’ या विषयांवरील लेखनाचे अनुवाद विशेष प्रसिद्ध आहेत. ते काव्यरचनाही करीत असत. सासरची पाठवणी (१९२३) आणि माहेरचे मूळ (१९२३) ही त्यांची काव्ये त्यांच्या काळात त्यातील प्रासंदिक रचनेमुळे लोकप्रिय झाली होती. त्यांची भाषाशैली आकर्षक व आलंकारिक होती. ‘महाराष्ट्रभाषा-चित्र-मयूर’ ही पदवी त्यांना शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडून मिळाली होती.
‘केरळ कोकीळ’च्या जून १९००च्या अंकात कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केलेल्या ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून अँड बॅक’च्या अनुवादाला सुरुवात झाली. हा अनुवाद १९०६ पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता. हा अनुवाद म्हणजे मराठीतली पहिली विज्ञान कथा होय. कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन २९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कृष्णाजी नारायण आठल्ये यांची प्रमाण ही कविता.
अतीकोपता कर्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।
अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।
अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।
अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।
अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।
अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।
अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।
अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।
अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।
अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।
अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।
अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।
अती शोक तो देतसे दु:खवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।
अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।
स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१६ ।।
अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।
अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।
जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१९ ।।
सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।
रितेश देशमुखची निर्मिती असलेल्या आणि चित्रपटसृष्टीत लक्षवेधी ठरलेल्या ‘यलो’ चित्रपटला यंदाच्या ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विशेष परिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गौरी गाडगीळ या विशेष मुलीच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘यलो’ चित्रपटाने सर्वांचे लक्षवेधून घेण्यास भाग पाडले.
कॅमेऱ्यासमोर आपण उभे राहिलो, की आपल्यासारखा दुसरा कलाकार कुणी नाही, हा शांता आपटे यांचा गुरुमंत्र जपणारे चित्तरंजन कोल्हटकर हे सर्वार्थाने महान रंगकर्मी होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला.
घराणेशाहीचा वरदहस्त लाभलेले, नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांचे सुपुत्र चित्तरंजन कोल्हटकर यांनी वडिलांचा अभिनयाचा वारसा तितक्याच सामर्थ्यांनं तब्बल ६० वर्षे मराठी रंगभूमीवर चालविला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’मुळे नाटकाचा वारसा चित्तरंजन कोल्हटकर यांच्याकडे आला असला तरी चिंतामणरावांना मात्र प्रारंभी आपल्या मुलाने नाटकात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याने उत्तम शिक्षण घेऊन बॅरिस्टर व्हावे आणि राष्ट्रकार्य करावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी देशभक्त बॅ. चित्तरंजन दास यांच्या नावावरून आपल्या या मुलाचे नाव ‘चित्तरंजन’ ठेवले होते. परंतु चित्तरंजनने बॅरिस्टर व्हावे, ही त्यांची इच्छा फलद्रुप होऊ शकली नाही. चित्तरंजन कोल्हटकरांनी प्राथमिक शिक्षण घेतले आणि ते पोटापाण्यासाठी नोकरी शोधू लागले. मुंबईत अॅीम्युनिशन फॅक्टरीत त्यांना नोकरी मिळालीही.
परंतु तिथे त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला गेल्याने स्वाभिमानी चित्तरंजननी नोकरीसह मुंबईही सोडली. त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते. परंतु उंची आणि वजनात मार खाल्ल्याने तिथे त्यांची डाळ शिजली नाही. मुलाचे कुठेच काही जमत नाही, हे पाहिल्यावर त्याला बेकार बसू देणे धोक्याचे आहे, हे ओळखून चिंतामणरावांनी त्यांना आपल्या नाटक कंपनीत प्रॉम्प्टरचे काम दिले. नाटक कंपनीचे मालक असलेल्या दुसऱ्या कुणा बापाने मुलाला एखाद्या नाटकात मुख्य नट म्हणून उभे केले असते. परंतु चिंतामणरावांनी तसे केले नाही. त्यामुळे एक झाले- अनेक नाटकांत प्रॉम्प्टर म्हणून काम केल्याने आणि प्रॉम्प्टरला सबंध नाटकभर दक्ष राहावे लागत असल्याने चित्तरंजनना अनेक नाटके मुखोद्गत झाली. त्याच वेळी वडिलांच्या नाटकांच्या तालमींतून हजर राहिल्याने त्यांची नाटक बसविण्याची पद्धत, संवादफेकीचं तंत्र, रंगमंचीय व्यवहारांतील मेख, बडय़ा नटांच्या अभिनयातील खाचाखोचा यांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष शिक्षण त्यांना मिळत गेले.
तरीही चिंतामणरावांनी त्यांना नाटकात घेण्याचे मनावर घेतले नाही. परंतु एके दिवशी काही अडचणीमुळे ‘भावबंधन’मधील बावळट मोरूचे काम करण्याची संधी चिंतामणरावांनी चिरंजीवांना दिली. त्या छोटय़ा कामात चित्तरंजननी हुकमी हशे वसूल करून वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. आणि तेव्हापासून कंपनीच्या नाटकांतून चित्तरंजनना छोटय़ा छोटय़ा भूमिका मिळू लागल्या. पण वसंत शिंदे, जयराम शिलेदार यांच्यासारखे बडे नट कंपनीत असेतो चित्तरंजनना कधीही मोठी भूमिका मिळाली नाही. या नटांनी कंपनी सोडल्यावर ‘युद्धाच्या सावल्या’त मारवाडी, ‘भावबंधन’मधील घन:श्याम, ‘पुण्यप्रभाव’मध्ये नुपूर अशा महत्त्वाच्या भूमिका चित्तरंजन यांच्याकडे आपसूक चालत आल्या. विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही भूमिका चित्तरंजन एव्हाना लीलया पेलू लागले होते. याच काळात बोलपटांमुळे नाटकाच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आणि चिंतामणरावांची नाटक कंपनी बंद पडली.
चित्तरंजन यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तेव्हा नाइलाजाने ते मुंबईच्या नाटकांतून ‘नाइट’वर कामे करू लागले. याच दरम्यान त्यांना ‘गरिबांचे राज्य’ या बोलपटात एक छोटीशी भूमिका मिळाली आणि त्यांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला. या चित्रपटातले त्यांचे काम भालजी पेंढारकरांना इतके आवडले, की त्यांनी ‘मी दारू सोडली’ या त्यांच्या चित्रपटात चित्तरंजनना घेतले. आणि इथून त्यांचे चित्रपटसृष्टीत बस्तान बसले. यशस्वी खलनायकी भूमिकांबरोबरच काही चित्रपटांतून त्यांनी नायकाची कामेही केली. ‘सौभाग्य’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मुरळी मल्हारीरायाची’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘रायगडचा राजबंदी’, ‘अशी रंगली रात’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. शारीरिक उंचीची उणीव त्यांनी अभिनयाने भरून काढली. गोरेपान देखणे व्यक्तिमत्त्व, घारे डोळे आणि सहजाभिनयाबरोबरच सळसळता उत्साह यामुळे त्यांच्याकडे भूमिका चालून येऊ लागल्या. एव्हाना सिनेमाचा रूपेरी पडदा त्यांनी आपलासा केलेला असला तरी स्वत:ला रंगभूमीचा विसर त्यांनी कधीही पडू दिला नाही.
दोन्हीकडे त्यांचा मुक्त संचार सुरू झाला. तत्कालीन नाटकांतून पल्लेदार संवाद, भाषेची चित्तचमत्कारिक आवर्तने, स्वच्छ, सुस्पष्ट वाणी यांना मागणी होती. चित्तरंजन कोल्हटकर या सगळ्यांत ‘बाप’ होते. पल्लेदार वाक्ये उच्चारताना भल्याभल्यांचा अभिनय सटपटे आणि अभिनयाकडे जास्त लक्ष दिले की तोंडची वाक्ये घरंगळत. पण चित्तरंजन याला अपवाद होते. ‘भावबंधन’मधील त्यांचा घन:श्याम आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ‘एकच प्याला’तील ‘सुधाकर’ आणि ‘तळीराम’ या दोन्ही भूमिकांवर त्यांनी अशीच आपली नाममुद्रा उमटविली. कुठल्याही भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यात चित्तरंजन वाकबगार होते. रंगभूमीवर सहज वावर असलेल्या हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा कलावंतांमध्ये चित्तरंजन कोल्हटकरांचा अंतर्भाव करावा लागेल. ते एकदा का रंगमंचावर अवतरले, की नाटक सहजी कवेत घेत. ‘नाटय़संपदा’चे ‘अश्रूंची झाली फुले’ हे अत्यंत गाजलेले नाटक रंगभूमीवर येत असताना एका मोठय़ा अनर्थातून चित्तरंजननीच वाचविले. त्याचे झाले असे : ‘नाटय़संपदा’ची तत्पूर्वीची दोन-तीन नाटके कोसळल्याने संस्था अडचणीत आली होती. त्यामुळे ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक संस्थेसाठी जीवनमरणाचा विषय झाले होते. या नाटकासाठी सरकता रंगमंच बनवण्यात आला होता. परंतु पहिल्याच प्रयोगाच्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे तो रंगमंच सरकेचना. त्याची दुरुस्ती करून तो चालू करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले.
तशात प्रयोगाला जसजसा उशीर होऊ लागला, तसतसे प्रेक्षकही अस्वस्थ होऊ लागले होते. शेवटी प्रयोग आहे त्या परिस्थितीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलीच एन्ट्री चित्तरंजन कोल्हटकरांची होती. रंगमंचावरील आयत्या वेळच्या अडचणीमुळे दुसरा तिसरा नट कदाचित हेलपाटला असता; परंतु चित्तरंजननी सहज एन्ट्री घेतली आणि काही क्षणांतच प्रयोगातील ताण नाहीसा झाला. नाटक मार्गी लागले. या नाटकाने पुढे उत्तम धंदा केला आणि ‘नाटय़संपदे’ला कर्जातून बाहेर काढले. कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाणे, हा चित्तरंजन कोल्हटकरांचा स्वभावच होता. ‘गारंबीचा बापू’मध्ये डॉ. काशीनाथ घाणेकरांचा ‘बापू’ लोकांनी डोक्यावर घेतला होता. घाणेकरांचा करिष्माच तसा होता. काही कारणांनी घाणेकरांनी चांगले चाललेले हे नाटक अचानक सोडले आणि निर्माते मोहन वाघांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला : डॉ. घाणेकरांच्या जागी ‘बापू’ म्हणून कुणाला उभे करायचे? या भूमिकेवर त्यांची एवढी जबरदस्त छाप होती, की त्यांच्या जागी कुणा ऐऱ्यागैऱ्याला प्रेक्षक स्वीकारणे शक्यच नव्हते. मोहन वाघांनी चित्तरंजनना या भूमिकेसाठी विचारलं.
दुसऱ्या नटाने गाजवलेली भूमिका सहसा कुणी नट स्वीकारीत नाही. कारण त्याची आधीच्या नटाशी तुलना होते आणि त्याने कितीही जीव तोडून काम केले तरी ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. पण चित्तरंजन कोल्हटकरांनी हे आव्हान स्वीकारले आणि डॉ. घाणेकरांची आठवणही येऊ न देता आपल्या पद्धतीने ही भूमिका रसिकांच्या गळी उतरविली. रंगभूमीवरील अव्यभिचारी निष्ठा हे चित्तरंजन कोल्हटकरांचे व्यवच्छेदक लक्षण होते. ते शेवटपर्यंत आपल्या ‘वरद रंगभूमी’ या संस्थेद्वारे सक्रीय होते. साठहून अधिक वर्षांच्या प्रदीर्घ नाटय़-कारकिर्दीत त्यांनी वाटय़ाला आलेल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. ‘मुद्राराक्षस’ या नाटकातील आर्य चाणक्याची भूमिकाही त्यांनी नव्या रंगभाषेच्या शोधात निघालेल्या मंडळींबरोबर तितक्याच सहजतेने केली. ‘वरद रंगभूमी’तर्फे त्यांनी आपल्या हातखंडा भूमिका असलेल्या ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’ आदी नाटकांची निर्मिती केली. शेवटपर्यंत आपल्याला रंगभूमीची सेवा करता यावी, ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार ते शेवटपर्यंत सक्रीय राहिले. या प्रवासात विष्णुदास भावे पुरस्कारासह अनेक मानसन्मान त्यांच्याकडे चालत आले. नाटय़संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. पुणे नाटय़ परिषदेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
चित्तरंजन कोल्हटकरांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांना सिनेमांतील आणि नाटकांसाठी विष्णुदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले. अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित होते. हिंदुत्ववादाचा वसा त्यांनी अभिमानाने मिरवला. रंगभूमीच्या भल्यासाठीच्या मागण्या घेऊन ते शासनाकडे जात आणि त्या पदरात पडेतो त्यांचा पाठपुरावा करीत. आपल्या नाटय़कर्तृत्वाने शासन दरबारी दबदबा निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मीमध्ये चित्तरंजन कोल्हटकर अग्रस्थानी होते. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांचे २५ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ प्रशांत देसाई
मारुती राव कीर यांनी आधी एस.डी बर्मन यांच्या साठी आणि नंतर आर.डी बर्मन यांच्या साठी शेवटपर्यत रिदम असिस्टट म्हणून काम केले.
मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्ससाठी राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच झालेल्या 'सीमॅट' या परीक्षेत व्हीजेटीआयच्या प्रियंवदा म्हडाळकरने मुलींमध्ये पहिला नंबर मिळवत बाजी मारली.
दहावीमध्ये शाळेतून पहिली...बारावीला कॉलेजमधून तिसरी...इंजिनीअरिंगला व्हीजेटीआय कॉलेजमधून चारही वर्षं पहिल्या पाचात आणि आता सीमॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) या राष्ट्रीय परीक्षेत देशभरातून मुलींमध्ये पहिली येण्याचा घसघशीत मान तिने मिळवला. व्हीजेटीआय कॉलेजमध्ये शिकणार्या प्रियंवदा म्हडाळकर या विद्यार्थीनीने मिळवलेलं हे सुयश आहे.
सीमॅटच्या ४०० मार्कांच्या या परीक्षेत २८८ मार्क मिळवत प्रियंवदाने बाजी मारली. मुलींमध्ये पहिली आलेली प्रियंवदा देशातून ४३ व्या क्रमांकावर आहे. 'फेब्रुवारीमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी मी गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच तयारीला लागले होते. आयआयएमसाठी कॅटची परीक्षासुद्धा दिली होती. यानंतर आयआयएम-कोझीकोडेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सीमॅटची परीक्षा मी एक ऑप्शन म्हणून दिली होती,' असं प्रियंवदा सांगते. इंजिनीअरिंगनंतर आयआयएममधून एमबीए आणि त्यानंतर आयएएस अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. 'दोन वर्षं जॉब करून त्यानंतर पुन्हा एकदा कॅटची परीक्षा देऊन आयआयएममध्ये अॅडमिशन मिळवायची प्रयत्न मी करणार आहे. आयएएस अधिकारी बनून देशासाठी काम करत विकासामध्ये हातभार लावण्याचा माझा निर्धार आहे,' असं ती आपण कमावलेल्या यशाबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल बोलताना सांगते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
डीन मार्टिन हे एक प्रसिद्ध अमेरिकी गायक, अभिनेता व हास्य अभिनेता होते. डीन मार्टिन यांना “द किंग ऑफ कूल” असेही म्हणत असत.
१९५२ मध्ये ऑस्ट्रेलियातील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. सिडनी जवळील पोट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (पॅराबोलीक) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९६१ मध्ये अमेरिकेतील स्टँनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली.
झैल सिंग यांना ब्रिटिश शासनाने तुरुंगात डांबले. सुटका झाल्यानंतर ते भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी फरीदकोट संस्थानात समांतर शासन स्थापन करून शेतमजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळही उभी केली.
सी. रामचंद्र यांचे पूर्ण नाव रामचंद्र चितळीकर, ‘सी. रामचंद्र’ हे नाव त्यांनी सिने दिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांची ठिकठिकाणी बदली होत.त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीत क्षेत्राविषयी निस्सीम प्रेम व भक्ती असल्याने याच विषयात कारकीर्द गडवण्याच्या हेतूने नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त प्रवेश घेऊन त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले; व उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. जयकोडी या तमीळ चित्रपटासाठी त्यांनी प्रथम संगीतरचना केली.
सुखी जवान हा त्यांनी संगीत दिलेला पहिला हिंदी चित्रपट! मा. भगवान यांनी तो निर्माण केला. त्यात सारे जहाँसे अच्छा या इक्बाल यांच्या विख्यात गीतासाठी सी रामचंद्र यांनी चाल दिली. या जोडीचा अलबेला हा चित्रपट तुफान चालला. त्यात मास्टर भगवानची नृत्ये आणि सी.रामचंद्र यांचे अफलातून संगीत यांची जादू आजही कायम आहे. त्यातील भोली सुरत दिलके खोटे हे गीत तर जाम धमाल आहे. सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले सरगम,पतंगा, सगाई, अनारकली इत्यादी अनेक चित्रपट आले. काही संगीतदृष्टया चांगलेच गाजले. त्यात अनारकली हा ऑल टाईम ग्रेट आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे २५० हिंदी, मराठी, तमिळ , तेलुगु चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या बहराचा काळ १९४४ ते १९५५ हा मानला जातो. १९४९ ते १९५८ या काळात त्यांच्यासह लता मंगेशकर गात असत. पण नंतर त्यांचा वाद झाला. पण लता आणि त्यांचे बिनसले आणि ते नंतर जवळजवळ या व्यवसायातून बाहेर फेकले गेले. १९६० नंतर त्यांची कारकीर्द संपली.
१९६४ च्या सुमारास कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख मे भर लो पानी या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीत दिले. लता मंगेशकर यांनी ते गीत गायिले होते. त्यांनी हलक्या फुलक्या पाश्चात्य संगीतावर मनापासून प्रेम केले आणि त्या संगीताच्या सादरीकरणाचे एक नवे युगच निर्माण केले. भारतीय संगीत आणि पाश्वात्य संगीताचा एक अप्रतिम संगम त्यांनी घडविला. कव्वाली या संगीत प्रकाराला संजीवनी देण्यातहि त्यांचा महत्वाचा वाटा होता. अनारकली या १९५३ साली आलेल्या चित्रपटात त्यांनी यह जिंदगी उसी की है या गीताला दिलेलं संगीत अत्यंत सुंदर आहे. त्या गीतात वापरलेली सतार अविस्मरणीय आहे. ते अष्टपैलू संगीतकार होते. मा.सी.रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे. मा.सी. रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti