(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • पं. उल्हास बापट यांनी सांगितलेल्या केरसी लॉर्ड यांच्या आठवणी.

    ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, म्युझिक अॅtरेंजर केरसी लॉर्ड यांच्यासमवेत अनेक चित्रपटांत संतूरची साथ करणाऱ्या पं. उल्हास बापट यांनी सांगितलेल्या केरसी लॉर्ड यांच्या आठवणी.

    भारतीय सिनेसंगीत क्षेत्रासाठी रविवार.. १६ ऑक्टोबरची सकाळ झाली; पण उजाडले नाही. कारण या दिवशी ज्येष्ठ संगीतज्ञ, वादक, अॅलरेंजर आणि जगन्मित्र केरसी लॉर्ड यांचे निधन झाले.

    त्यांना सांगीतिक विद्वत्तेचा ‘सूर्य’ म्हणू या, की प्रत्येक कामात परफेक्शनिस्ट असलेले आणि नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहणारे, स्वत:च्या विधानावर ठाम असणारे म्हणून ‘पृथ्वी’ म्हणू या? की चंद्राच्या शीतलतेने सर्व सहकलाकारांवर, चाहत्यांवर प्रेम करणारे म्हणून त्यांना ‘चंद्र’ म्हणू या? नको.. इतके सर्व म्हणण्याऐवजी त्यांना ‘केरसीबाबा’च म्हणू या.

    माझ्यासाठी ते गुरू होते. मोठे भाऊ होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सच्चे मित्र होते. आमच्या कुटुंबासाठी ते केरसीकाका होते. मी नेहमी गमतीने म्हणायचो, ‘केरसीजींची मोठी चूक म्हणजे त्यांनी मला सिने म्युझिशियन असोसिएशन (CMA) च्या ऑडिशनमध्ये पास केले ही होती.’

    १९७४ ची गोष्ट. केरसीजी तेव्हा CMA चे पदाधिकारी होते. ऑडिशन कमिटीत होते. ज्येष्ठ वादक कलाकार परशुरामजी हेही केरसीजींसोबत होते. माझे नाव पुकारल्यानंतर मी संतूर घेऊन आत गेलो. सर्वाना वंदन करून मला जे येत होते ते वाजवायला सुरुवात केली. केरसीजी माझे निरीक्षण करत होते. परशुरामजी माझी उलटसुलट परीक्षा घेत होते. त्यांनी सांगितलेले सर्व म्युझिक पीसेस, अलंकार मी सहज वाजवत होतो. पहिल्या दिवसापासूनच मी बारा सूर मिळवूनच वाजवत असल्याने टय़ुनिंगमध्ये वेळ न घालवता परशुरामजींनी सांगितलेले सर्व स्वरयुक्त स्वरसमूह संतूरच्या काठय़ांतून निघत होते. त्यांना नापास करण्यासारखे काही सापडत नव्हते. तेव्हा बी ग्रुपचे ८५ रुपये व ए ग्रुपचे १०० रुपये मानधन होते. सर्वसंमतीने मला पास करण्यात आले. नवीन असल्याने बी ग्रुप द्यायचे ठरले. तेव्हा केरसीजी ठामपणे माझ्यामागे उभे राहिले. संतूरसारखे वाद्य टॅक्सीशिवाय नेणे शक्य नसल्याने आणि या वाद्याच्या वेगळेपणामुळे मला ए ग्रुपच मिळावा म्हणून त्यांनी आग्रह धरला. आणि तेव्हाच मला जाणवले- ते माझे आहेत.. तेव्हापासून मी त्यांचा झालो.

    ते उत्कृष्ट ड्रम्स वाजवत. त्यांनी कॅस्ट्रोनट्स् टेंपल बेल्स, ग्लॉक्स (‘अभी ना जाओ छोड के’ गाण्यात) अशा विदेशी वाद्यांचा वापर पहिल्यांदा केला, हे सर्वपरिचित आहेच. सगळी वाद्ये वाजवणे हा त्यांच्या उजव्या हाताचा मळ असला तरी अॅिकॉर्डियन या वाद्यावर डाव्या हातानेसुद्धा त्यांचे प्रभुत्व होते. डाव्या हाताने बेलोचा वापर ते श्वासानुरूप करायचे. डाव्या बाजूला न दिसणाऱ्या छोटय़ा बटणांवर गाण्याच्या हार्मनीप्रमाणे त्यांची बोटे केवळ स्पर्शाने शिताफीने फिरत. ‘आराधना’तील ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्यात केरसींनी वाजवलेला अॅनकॉर्डियनचा पीस पुन्हा कधी ऐकायला मिळेल की नाही, याबद्दल मला शंका आहे.
    केरसीजींच्या म्युझिक अॅ रेंजमेंटमध्ये चटकन् ओठावर येणारे गाणे म्हणजे मदनमोहन यांच्या ‘संगीत दिग्दर्शनातील ‘तुम जो मिल गये हो..’मध्ये (‘हॅंसते जख्म’) समुद्राच्या उफाळून येणाऱ्या उत्तुंग लाटांप्रमाणे केलेली व्हायोलिनची रचना ऐकून कधी कधी वाटते की, केरसीजींचे संगीत ऐकून समुद्रही आनंदाने उफाळून लाटारूपी स्वरतुषार आपल्या अंगावर शिडकावतो आहे! त्यांच्या व्हायोलिनचे पीसेस लाटांसारखे असले तरी त्यांनी कोणाचेच संगीत कधी लाटले नाही.
    ते संगीताचे ‘लॉर्ड’ होते हे सिद्ध करणारा सिनेमा म्हणजे ‘साथी’! नौशादजींचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे अॅररेंजर केरसीजी होते. यातली गाणी नौशादसाहेबांच्या नेहमीच्या स्टाईलपेक्षा वेगळी आहेत. विशेषत: ‘मेरे जीवनसाथी’च्या वेळी केलेला वेगळ्या पीसेसचा वापर, त्याहीपेक्षा ‘हुस्न जाना इधर आ..’ या गाण्यातले गिटारचे दोन स्ट्रोक एका वेगळ्याच हार्मनीचा वापर हिंदी संगीतसृष्टीला बहाल करून गेला. ‘ऑगमेंटेड’ हार्मनीचा वापर गाण्यात यापूर्वी अन् यानंतरही कधी झालेला नाही. असे ऐकले की, पं. हृदयनाथ मंगेशकरांनीही हे गाणे ऐकल्यावर केरसीजींना फोन करून कौतुक केले होते.

    ‘शालीमार’ चित्रपटाचे केरसीजींनी केलेले टायटल म्युझिक संगीत क्षेत्राला कोंदण देऊन गेले. अकरा मात्रांत रचलेला पीस भल्याभल्यांची झोप उडवून गेला. त्यातला इलेक्ट्रिक गिटारचा पीस, बाकी वाद्यवृंद अॅेरेंजमेंट आणि त्यात अकरा मात्रा.. मोजता मोजता काय होते, ते सभ्य भाषेत सांगणे कठीण आहे!
    पंचमदांचे (आर. डी. बर्मन) ते उजवा हात होते. तसे पंचमदांना बासुदा, मनोहरीदा, मारुतीराव कीर आणि केरसीजी असे चार उजवे हात होते. जसे केरसीजींनी सिंथेसाइझर पहिल्यांदा या क्षेत्रात आणला तसे एकोलाईट मशीनही त्यांनी प्रथम वापरले. म्हणूनच पंचमच्या गाण्यात ‘पंचम पंचम पंचम’ अशा प्रकारचे प्रतिध्वनी येऊ शकले. केरसीजींशिवाय पंचमदांचे रेकॉर्डिग म्हणजे तारांशिवाय पियानो. बदलत्या काळाबरोबर ते स्वत:ला नेहमी ‘अपडेटेड’ ठेवायचे. सिंथेसाइझर असो किंवा कॅमेरा असो, कम्प्युटर असो वा कोणतेही आधुनिक उपकण असो, जगात कोठेही निर्माण झालेली वस्तू दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे असायची. आजच्या तरुणांनाही लाजवील अशी तल्लख बुद्धी त्यांची होती.

    वेस्टर्न म्युझिकचे उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या केरसीजी यशस्वी कंडक्टर म्हणून ओळखले जात. उजव्या हातातल्या काठीने कंडक्ट करताना वादकांना त्यांनी योग्य जागी बसवलं, त्यांच्याकडून हवं ते वाजवून घेतलं आणि संगीत खुलवलं. पाश्चात्य संगीताचा गाढा अभ्यास असल्यामुळे भलामोठा वाद्यवृंद असो, टिंफनी असो, ड्रमसेट असो, फ्ल्यूट असो, पियानो असो; सर्वाना काठीच्या एका इशाऱ्यावर त्यांनी एकत्रित वाजवून घेतलं. त्यांचं स्टाफ नोटेशन लेखन अतिशय सुरेख असल्याने अन् ‘व्हाईसिंग’ (प्रत्येक वाद्यसमूहाचे योग्य संतुलन) योग्य असल्याने सर्व विभागांवर त्यांचे वर्चस्व होते. अंगात मूळचाच ताल असल्याने, त्यातही त्यांचे तबल्याचे शिक्षणही खाँसाहेब इनामअली यांच्याकडे शास्त्रोक्त झाल्यामुळे केरसीजींच्या प्रत्येक रचनेला तालाची, त्याच्या विशिष्ट ‘खंडा’ची झालर असायची.
    माझ्यातल्या कलेला वेगळ्या उंचीवर नेणारा एक प्रसंग आठवतो. ‘टच डाऊन’ नावाची एअर इंडियाची एक डॉक्युमेंटरी होती. त्याचा रिलीज जगभर होता. त्याचे पाश्र्वसंगीत केरसीजींनी केले होते. ८०-९० वादक होते. व्हायोलिन, व्हिओला, चेलो, डबल बेस.. सर्व वाद्यं होती. त्याव्यतिरिक्त ब्रास सेक्शन, ट्रंपेट, सेक्सोफोन वगैरे, सिल्वर फ्लूट, ड्रम, तबला, ढोलक.. साधारण पूर्ण सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. भारतीय वाद्यांत सितार, संतूर होते. निर्माता हैद्राबादचा रईस होता. सर्व वादकांची यादी पाहिल्यावर तो चकित झाला. संतूरला माझे नाव पाहून तो थबकला. (तेव्हा माझे नावही नव्हते अन् आडनावही झाले नव्हते.) त्यांनी केरसीजींना विचारणा केली. ‘‘यह कौन नया लडका है? आप पैसे की चिंता मत करो. जो भी चाहे वो बडे कलाकार को बुलाओ.’’

    केरसीजी म्हणाले, ‘नहीं. मेरा काम उल्हास ही करेगा.’ त्या निर्मात्याला हे चांगलेच झोंबले. केरसीजींनी त्याच्या बोलण्याकडे दूर्लक्ष केलं. फक्त ते निर्मात्याला एवढंच म्हणाले, ‘रेकॉर्डिग के दिन आना और सुनना. बाद मे कहना.’ त्याकाळी ट्रॅक सिस्टीम किंवा डबिंग सिस्टीम नव्हती.

    शेवटी तो रेकॉर्डिगचा दिवस उजाडला. पहिलाच पीस मला वाजवायचा होता. सर्व वाद्यवृंदाला आपापले पार्ट दिलेले होते. मला दिलेला पीस साधारण आपल्या जोग रागावर आधारीत होता. सुरुवातीला तो पांढरी दोनमध्ये होता. नंतर इतर वाद्यांच्या वेगवेगळ्या हार्मनीनंतर टायटलच्या शेवटी तोच पीस आता पांढरी एकमध्ये वाजवायचा होता.

    टेक सुरू झाला. सुरवातीला ४-४ च्या तालात मला ५ चा तुकडा वाजवायचा होता. येथे केरसीजी पुन्हा दिसले! पांढरी दोनमध्ये सुरू झालेला पीस संपूर्ण वाद्यमेळानंतर पांढरी एकमध्ये वाजवायचा होता. गुरुजनांच्या कृपेने पहिलाच टेक ओके झाला. केरसीजींनी निर्मात्याला जवळ बोलावले अन् म्हटले,
    ‘‘एक ही टाइम में पहले सफेद दो और आखिर में सफेद एक मे पीस बजाना था. ये काम सिर्फ उल्हास क्रोमेटिक पद्धतीसे बजाता है. उस में ही यह मुमकीन है. और कोई नहीं बजा सकता है, इसलिये उल्हास को ही संतूर के लिये बुलाया.’’ माझ्याकरता ही घटना पुरस्कारासारखीच होती.

    त्यांना चविष्ट खाण्याची आवड होती. ते कधी कधी सर्वासाठी पेडर रोडला कुठून तरी चिकन कटलेट आणि बुरून पाव मागवायचे. त्यांना खाण्यात.. तेही वाटून खाण्यात जास्त समाधान मिळायचे. लॅमिंग्टन रोडला ‘लीलाधर’मध्ये भेजाफ्राय खाणे त्यांना खूप आवडायचे. ‘लीलाधर’मध्ये गेल्या गेल्या वेटरला सूचना असे- ‘मेरे लिये भेजा फ्राय जास्ती रख देना. खतम नहीं होना चाहिये!’

    ‘महान’ सिनेमाच्या पाश्र्वसंगीतासाठी आम्ही चेन्नईला प्रसाद स्टुडिओत पंधरा दिवस गेलो होतो. ते पंधरा दिवस अत्यंत बहारदार होते. मला कॅरेमल कस्टर्ड खूप आवडतं. कोणत्याही हॉटेलात गेलं की मी प्रथम विचारायचो, ‘कॅरेमल कस्टर्ड है ना?’ एकदा केरसीजी इतके वैतागले! ‘अरे, पहले खाना क्या है वो सोच. पहले कस्टर्ड क्यों?’ त्या दौऱ्यात माझे नाव त्यांनी ‘केके’च ठेवलं होतं.

    ..अचानक फोनची बेल वाजली आणि मी गतकाळातून खाडकन् भानावर आलो. कानावर शब्द पडले, ‘‘हॅलो उल्हासजी, संध्याकाळी चार वाजता केरसीजींचे अंत्यदर्शन आणि अंत्यविधी आहे.’

    मनात आठवणींचे काहूर माजले असतानाच आम्ही उभयता वरळीला निघालो. अत्यंत आवडत्या केरसीजींच्या अंत्यदर्शनाला! गर्दीत वाट काढत मी त्यांच्यापाशी पोहोचलो. चरणस्पर्श केला. त्या हार्मनीच्या राजाच्या चेहऱ्यावर हार नव्हती, तर सुरांना जिंकल्याचे समाधान होते. जणू तालाचा विचार करता करता आयुष्याची शेवटची सम आली होती.

    त्यांच्या तिन्ही मुली झरीन, परी आणि जास्मीन तिथं उभ्या होत्या. तिघींना भेटून निघताना अश्रू आवरेनासे झाले. जास्मीन म्हणाली, ‘’uncle Don’t Cry. He has gone to a better place.’’

    पं. उल्हास बापट
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य

    चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी दिग्दर्शक म्हणून 'तिसरी कसम' मधून आपला वेगळा ठसा उमटवला. 'तिसरी कसम'ला १९६६ मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालं.

    पुढे १९७० आणि १९८० च्या दशकांत त्यांनी समांतर चित्रपट चळवळीत अनुभव आविष्कार आणि गृहप्रवेश असे काही चांगले चित्रपट दिले; मात्र 'तिसरी कसम'ची सर त्यांना आली नाही.बासू भट्टाचार्यांचा ’अनुभव’ हा आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेमधे पारंपरिक लग्न व्यवहाराचे सांधे जुळून येताना ही लग्नव्यवस्था आपलं पारंपरिक रुप कसं बदलत गेली (किंवा अजिबात बदलत गेली नाही) याचं यथार्थ चित्रण करणारा ठरला.आश्चर्य वाटाव्या इतक्या खरेपणाने लग्नसंबंधांमधली गुंतागुंत यात बासूदांनी दाखवली. 'अनुभव' हा चित्रपट ब्लॆक ऍन्ड व्हाईट होता. कलात्मक सिनेमांची जी लाट नंतरच्या काळात आली त्यातलाच हा आर्टी सिनेमा म्हणून अनेकांनी तो हेटाळलाही. पण शहरांमधल्या बदलत्या लग्नसंबंधांचे चित्रण थेट वास्तवाने या आधी कोणीच केले नव्हते.

    बासूदांची फ़िल्म खर्‍या अर्थाने मॉडर्न आणि धीट होती. आधुनिक बदलत्या समाजशैलीतल्या लग्नांचे असे चित्रण अगदी आताच्या काळातही नंतर फ़ारसे कोणी केले नाही. बासू भट्टाचार्य यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी बंगाली चित्रपटांची उंची एव्हरेस्टला भिडवली. भारतीय संस्कृतीची नाळ बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेत असताना समाज ज्या स्थित्यंतरांमधून जात होता ते सिनेमाच्या पडद्यावर स्पष्टपणे दाखवू शकणारे असे फ़ार थोडे दिग्दर्शक त्या पैकी एक म्हणजे बासूदा. बासूदांनी त्यानंतर अजून दोन सिनेमांमधून, आविष्कार आणि गृहप्रवेश, हाच धागा पुढे नेला आणि भारतीय विवाहसंस्थेवर विशेषत: आधुनिक शहरांमधल्या पती-पत्नी संबंधांचे विश्लेषण करणारी एक उत्तम ट्रिलॉजी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आली.

    बासू भट्टाचार्य यांचे २० जुन १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सुषमा शिरोमणी

    मराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला.

  • संत ज्ञानेश्वर

    संत ज्ञानेश्वर (जन्मः १२७५ समाधीः १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत. वारकरी संप्रदायाचे दैवत.

  • “बॅटरीचा” संशोधक अलेझांड्रो व्होल्टा

    त्यांचा जन्म १८ फ़ेब्रुवारी १७४५ रोजी इटलीमधील कोमो इथं झाला. त्याला लहानपणी चर्चमधील पाद्रयांनी शिकवलं. तो इतका हुशार होता की पुढे जाऊन त्यानंही पाद्रीच बनावं यासाठी त्याच्या शिक्षकांनी चक्क त्याला चॉकलेट्स वगैरेंची ‘लाच’ द्यायचा अयशस्वी प्रयत्न करून बघितला. पण त्याच्या घरच्यांना हे कळताच त्यांनी त्याची शाळाच बदलून टाकली! शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला विजेशी संबंधित गोष्टीविषयी अभ्यास करावासा वाटला. वयाच्या २४ व्या वर्षी त्यानं यासंबंधीचा आपला पहिला प्रबंधही लिहून प्रकाशित केला. सुरुवातीचे त्याचे संशोधन हे प्रसिद्ध संशोधक लुई गॅव्हानी यांच्याबरोबर झाले. मात्र, सजीवांमध्ये असणार्याप विजेच्या अनुमानाविषयी गॅव्हानी यांनी केलेले प्रतिपादन त्याला तितकेसे रुचले नाही. त्यामुळे त्याने स्वतंत्रपणे विद्युतघटाविषयी संशोधन करण्याचा निश्चयय केला. दोन वस्तू एकत्र आणून घासून मग दूर करायच्या आणि हे असं सारखं करत राहायचं, की मग त्यातून वीज तयार होऊ शकते ही गोष्ट व्होल्टाच्या लक्षात अगदी लवकर आली होती. स्थिर प्रकारची वीज साठवून ठेवण्यासाठी त्यानं ओट्टो व्हॉन ग्यूरिकपेक्षा जास्त चांगलं यंत्र बनवलं, आणि त्याचं नाव ‘पर्पेच्युअल इलेक्ट्रोफोरस’ असं ठेवलं. ग्यूरिकच्या यंत्रात वीज साठवून ठेवण्यासाठी सतत ते चोळत राहावं लागे. पण व्होल्टाच्या यंत्रात अंबराचा तुकडा आणि सपाट आकाराच्या धातूचं आवरण अशा प्रकारे एकत्र केलं होतं की ते धातूचं आवरण अंबराच्या तुकडय़ाला घासे, आणि मग वेगळं होई; मग ते पुन्हा त्याला घासे, आणि पुन्हा वेगलं होई. या घर्षणक्रियेमुळे त्या यंत्रात सतत वीजनिर्मिती होत राही. ते व्हायचं कारण म्हणजे अंबराच्या तुकडय़ाला या यंत्रात बसवण्याच्या आधी एका केसाळ प्राण्याच्या कातडीवर घासलेलं असे. त्यामुळे त्या दोघांमधले धन आणि ऋण हे विद्युतभार एकाच संख्येचे केले जात. तेव्हा ही धातूची पट्टी त्या अंबराच्या तुकडय़ापासून वेगळी केली जाई, तेव्हा त्या अंबरावर धन आणि धातूच्या पट्टीवर ऋण विद्युतभार आलेला असे. झालं की मग या उपकरणाचं काम! या शोधाबद्दल व्होल्टाला कॉप्ले पुरस्कार आणि इंग्लंडच्या मानाच्या ‘द रॉयल सोसायटी’चं सदस्यत्व मिळालं. मग व्होल्टानं आपलं संशोधन पुढे न्यायचं ठरवलं. विद्युतघट अर्थात बॅटरी म्हणजे रासायनिक शक्तीचे विद्युतशक्तीत रुपांतर करणारे साधन होय. हीच बॅटरी निर्माण करण्याच्या प्रयत्नात शास्रज्ञ अनेक वर्षे होते. सुरुवातीला त्यांनी त्यासाठी मिठाचे पाणी कपामध्ये घेऊन त्यामध्ये निरनिराळय़ा धातूंच्या सळया ठेवून त्याविषयी अभ्यास केला. हा प्रयोग खूपच प्राथमिक अवस्थेत होता. मात्र त्यांनी या अतिशय साध्या अशा उपकरणांच्या साहाय्याने वीजदाब आणि त्याचा विद्युतप्रवाहाशी असणारा संबंध प्रस्थापित केला. दोन वस्तू एकत्र आणून घासून मग दूर करायच्या आणि हे असं सारखं करत राहायचं, की मग त्यातून वीज तयार होऊ शकते ही गोष्ट व्होल्टाच्या लक्षात अगदी लवकर आली होती. १७९० च्या सुमारास त्याला असं आढळलं की, धातूच्या क्षारांच्या द्रावणात चांदी किंवा जस्ताच्या पट्टय़ा ठेवून त्यांना बाहेरून धातूची तार जोडली तर या तारेतून विद्युतप्रवाह जातो.

    त्यानं दोन भांडय़ांमध्ये मिठाचं पाणी भरलं आणि त्यांच्यामध्ये दोन वेगवेगळ्या धातूंची मिळून बनलेली प्रत्येकी एक पट्टी ठेवली. त्या पट्टीची एक बाजू तांब्याची तर दुसरी जस्ताची बनलेली होती. यामुळे या दोन भांडय़ांमधल्या विजेच्या प्रमाणात कसला तरी फरक तयार झाला आहे हे त्याला कळालं. (ज्याला आता आपण ‘व्होल्टेज’ असं म्हणतो). ही दोन भांडी आणि या पट्टय़ा मिळून बनलेलं हे एक उपकरण मानलं तर अशी अनेक उपकरणं एका रांगेत ठेवून आणि ती एकमेकांना जोडून मोठं व्होल्टेज तयार करता येईल हे त्याच्या लक्षात आलं. मग त्यानं अशी प्रत्येकी २० भांडी असलेले तीन संच तयार केले. मग त्यानं आपल्या डाव्या हाताचं एक बोट पहिल्या भांडय़ात बुडवून उजव्या हाताचं एक बोट दुसऱ्या भांडय़ात, मग तिसऱ्या भांडय़ात, मग चौथ्या भांडय़ात असं करत करत विसाव्या भांडय़ापर्यंत बुडवत नेलं. त्या वेळी सुरुवातीच्या ४-५ भांडय़ांमध्ये उजव्या हाताचं एक बोट बुडल्यावर त्याला फारसं काही जाणवलं नाही. पण जसजसं तो ते बोट आणखी पुढच्या भांडय़ात बुडवत राहिला, तसतसा त्याला आधीच्या पेक्षा जास्त प्रमाणात विजेचा झटका बसत गेला. विसाव्या भांडय़ात त्याला सगळ्यात मोठा झटका बसला. याचाच अर्थ, व्होल्टाने रासायनिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यात यश मिळवलं होतं. पण, व्होल्टाने ही गोष्ट जाहीरच केली नाही. रॉयल सोसायटीला आपला हा शोध त्याने बऱ्याच उशिरा कळवला. म्हणूनच बॅटरीचा "शोध" लागायला १८०० साल उजाडले होते. जगातला पहिला विद्युतघट तयार करण्याचं श्रेय व्होल्टा याला दिलं जातं. यात मग त्यानं आणखीही काही बदल करून सुधारणा केल्या. त्याला मग नेपोलियननं सुवर्णपदक आणि इतर सन्मानही बहाल केले.

    बॅटरीचा शोध लागेपर्यंत विजेचा वापर आणि त्याविषयीचं ज्ञान हे फक्त एकीकडून दुसरीकडे विजेच्या ठिणग्या जाऊ शकतात (‘स्टॅटिक डिसचार्जेस) या माहितीपुरतंच मर्यादित होतं. त्यामुळे त्याविषयीच्या प्रयोगांचा वापर मनोरंजन आणि संशयास्पदरित्या केले जाणारे वैद्यकीय उपचार यांच्यापुरताच मर्यादित असे.

    जस्त आणि तांब्याचा वापर करून विद्युतशक्ती साठवून ठेवण्याचे तंत्र व्होल्टाने विकसित केले आणि जगातला पहिला विद्युत घट (बॅटरी) बनवली. यालाच व्होल्टाचा विद्युत घट असे शास्त्रीय नाव आहे. म्हणूनच त्याच्या सन्मानार्थ विद्युतघटाचे विभवांतर (व्होल्टेज) मोजण्याच्या परिमाणाला "व्होल्ट" असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता अतिशय खात्रीशीररित्या वीज एके ठिकाणी साठवून सातत्यानं ती पुरवत राहण्याच्या व्होल्टाच्या बॅटरीमुळं इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राची पाळंमुळंच रोवली गेली. यातूनच मग पुढे ‘इलेक्ट्रोकेमिस्ट्री’ आणि ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिझम’ यांच्यातले अनेक प्रयोग करणं शक्य झालं.व्होल्टाच्या कामगिरीचा वापर नंतर तारायंत्र (‘टेलिग्राफ’), दूरध्वनी (‘टेलिफोन’) आणि बिनतारी (‘वायरलेस’) या यंत्रणांच्या संबंधित तंत्रज्ञानांच्या संशोधनात होणार होता! त्यानं त्या काळात तयार केलेल्या ‘व्होल्टाईक पाईल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपकरणालाच आपण आज सगळीकडे वापरत असलेली बॅटरी म्हणून ओळखतो. अलेझांड्रो व्होल्टा यांचे ५ मार्च १८२७ रोजी निधन झाले..

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. अतुल कहाते / इंटरनेट

  • फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ कलाकार ‘कॅब्रे क्विन’ हेलन

    आपल्याला जरी त्या फक्त 'हेलन' म्हणून माहीत असल्या तरी त्यांचे पूर्ण नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे व त्या जन्माने अॅग्लो बर्मीज. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ रोजी बर्मा मध्ये झाला. ती बॉलिवुड मध्ये त्यांच्या अनेक विवीध भुमिकांमुळे व विशेष करून नृत्याविष्कारामुळे 'हेलन' या भरपूर गाजल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनच्या आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलन यांनी शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यांची एक कुटुंब स्नेही अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायच्या, त्यांच्या ओळखीने हेलन यांना अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले.

    हेलनचं अॅंग्लो व बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. त्या काळी आयटम नंबरसाठी ओळखल्या जाणा-या हेलन यांनी हावडा ब्रिज या सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या 'भारतीय नारी रोल'च्या विरूद्ध बऱ्याचदा 'हायलायटींग' म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या 'लिडींग' हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलन यांना खरे नाव व प्रसिद्धी ही त्यांच्या अनेक 'व्हॅम्प' व 'निगेटिव्ह' रोल्सनीच दिली. हेलन या त्यांच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होत्या. रस्त्यावरून जाताना त्यांना कधीही उघड चेहऱ्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. १९५८ च्या 'मेरा नाम चिं चिं चू' पासून ते १९७० च्या दशकातील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत हेलन यांनी चित्रपटसृष्टीवर 'कॅब्रे क्विन' म्हणून अधिराज्य गाजवले.

    १९७० च्या दशकात नवीन प्रवेश झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलन यांची प्रसिद्धी बरीच खालावली व त्या आर्थिक अडचणीतही सापडल्या. त्या वेळी त्यांना साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची. जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलन यांना चांगली भूमिका देऊ केली. हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात गाणाऱ्या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. 'मेरा नाम चिं चिं चू' व इतर बरीच गाणी गीता दत्त यांनी, तर साठ च्या दशकात व सत्तर च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. 'तिसरी मंझिल' चित्रपटातील 'ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ...' हे गाणं 'रॉक अॅलन्ड रोल' या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त 'शोले' चित्रपटातलं "मेहबूबा मेहबूबा..." 'इन्तेकाम' मधलं "आ जानेजा...पुढे त्या सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात. हेलन यांच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे. भारत सरकारने मा.हेलन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी

    त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे झाला. डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या "श्वास" आणि "डोम्बिवली फास्ट" या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'अवंतिका' मालिकेत त्यांनी काम केले होते. मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकार ही आहेत.

    बेधुंद, 'मी बाप', 'मेड इन चायना ' आणि 'साने गुरुजी' या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला. २००८ मध्ये नायजेरियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुलकर्णी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ख्यातनाम मराठी कोशकार चिंतामणी गणेश कर्वे

    ‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते.

  • ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे

    चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीत आपल्या स्वाभाविक अभिनयाने आणि अभिनयावरील निष्ठेने स्वतंत्र स्थान निर्माण करणारे कलावंत म्हणून वामन उर्फ सूर्यकांत तुकाराम मांडरे यांनी आपली खास ओळख निर्माण केली. शिवचरित्रावर आधारित ‘बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी वामन मांडरे यांचे नाव ‘सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते ‘सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले.

  • सेलेना गोमेज

    सेलेना गोमेज ए. आर. रेहमानची खूप मोठी चाहती आहे.एका मुलाखतीत खुद्द सेलेनाने ही कबुली दिली.मी भारतीय संगीत मनापासून ऐकेते आणि ते मला आवडतेही. ए़ आऱ रेहमानचे संगीत मला सर्वाधिक आवडते़ त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला प्रचंड आनंद होईल, बॉलिवूडसाठी गायलाही मला आवडेल,असे सेलेना म्हणाली.भारतीय संस्कृतीबद्दलही सेलेना बोलली. मला भारत आणि भारतातील हिंदू संस्कृती पूर्वापार आवडते.